Skip to main content

जबाबदारी - मुलींची आणि मुलांची

नमस्कार मंडळी
आज एका नवीन अन संवेदनशील विषयावर चर्चा करून आपली मते आजमावायची आहेत ...

आजकाल भारतीय / हिंदू समाजामध्ये एकच अपत्य होऊ देण्याची प्रथा रूळली आहे. आईवडिलांची आर्थिक परिस्थिति ,मुलांच्या शिक्षणावर होणारा अफाट खर्च याबरोबरच मुलगा-मुलगी समान समजून "मुलाची वाट पाहत अधिक अपत्ये " वाढवण्या विरुद्ध सरकारचा जोरदार प्रचार तसेच अन्य काही घटक या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल किंवा पती -पत्नीना अधिक मुले होऊ देणे योग्य वाटत नसल्याने म्हणा , समाजात एकच अपत्य असणार्‍या अथवा एकच मुलगी असणार्‍या कुटुंबांची संख्या प्रचंड वाढत असलेली दिसून येते...

अतिप्राचीन भारतीय हिंदू संस्कृतीतील आध्यात्मिक समजुतीनुसार मातापित्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्राने त्याचे उत्तरकार्य अथवा श्राद्धकर्म केले असता त्या पितरांस सद्गती लाभते असा शास्त्रादेश असल्याने "घराण्याचा कुलदीपक " म्हणून एक तरी मुलगा हवाच ... असा हट्ट असे. आज मुलांप्रमाणेच मुलीदेखील उच्चशिक्षण घेवून पैसा कमावत असतात व जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे आहेत , असे असताना एक करूणाजनक चित्र देखील डोळ्यासमोर उभे राहत आहे ,ज्यामुळे एकाच अपत्यावर थांबण्याचा अथवा एकाच मुलगी पुरे म्हणण्याचा हा हट्ट उद्या तुम्हालाच खड्ड्यात टाकणारा ठरू शकेल अशी सार्थ भीती वाटते ... त्यासाठीच हा लेखनप्रपंच ......

समाजात अनेक ठिकाणी असे दृष्टीस पडते की एकच मुलगी असलेल्या घरांत मुली शिक्षित होवून नोकरी करून स्व-निर्णयाने नवरा निवडतात , तो कदाचित (बर्‍याच वेळेला ) आंतरजातीय अथवा आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध असतो . मग लग्नानंतर नाइलाजाने जावयाशी जुळवून घेतले जाते .अथवा कटुता तशीच राहते ..आणि ... आईबाप वृद्ध होतात ,अन एके दिवशी या जगाचा निरोप घेतात ..मग जावयाला आयती प्रॉपर्टी मिळते ..... म्हणजे त्याची फुकट मजा .....

इकडे ज्या आईबापाने आपल्या स्व-कमाईचा मोठा हिस्सा खर्चून मुलीला चांगले शिक्षण व सोयीसुविधा दिलेल्या असतात ,त्याचे त्यांना काय रिटर्न्स मिळतात? नुसत्या मायेपोटी एवढा मोठा त्याग करणे कितपत सयुक्तिक? आज अनेक ठिकाणी अशी परिस्थिति आहेकी मुलगी व जावई करोडपती असून महिन्याला लाखात उत्पन्न असताना देखील मुलीचे आईबाप मात्र हलाखीच्या परिस्थित जगत आहेत... म्हणून मला वाटते की यास्तव एकच अपत्याचा हट्ट सोडावा आणि हे कायद्याने कंपल्सरी करावे की मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या उत्पन्नातील ठराविक वाटा लग्नानंतर आईबापाला दिलाच पाहिजे ... आणि ते उपकार म्हणून नव्हे तर आईबापाणी तुमच्या पालन-पोषण/ शिक्षणावर केलेल्या खर्चाची परतफेड म्हणून...!

आपल्याला काय वाटते?

.शुचि. Mon, 25/01/2016 - 23:26

म्हणून मला वाटते की हे कायद्याने कंपल्सरी करावे की मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या उत्पन्नातील ठराविक वाटा लग्नानंतर आईबापाला दिलाच पाहिजे ... आणि ते उपकार म्हणून नव्हे तर आईबापाणी तुमच्या पालन-पोषण/ शिक्षणावर केलेल्या खर्चाची परतफेड म्हणून...!
आपल्याला काय वाटते?

यामागील भावना स्तुत्यच आहे पण अशी कोर्ट्कचेरी हडेलहप्पी नात्यांच्या नाजूक विणीत चालत नाही ना. अर्थात वारसहक्कात कोर्ट हस्तक्षेप करु शकते मग याच बाबतीत का नाही असेही काहीजण म्हणू शकतात.
.

नुसत्या मायेपोटी एवढा मोठा त्याग करणे कितपत सयुक्तिक?

निसर्गाने या बाबतीत विकल्पच ठेवलेला नाही. आपले मूल आपल्याला किती प्रिय असते हे मी वेगळे सांगायला हवे का?

अतिशहाणा Mon, 25/01/2016 - 23:20

इकडे ज्या आईबापाने आपल्या स्व-कमाईचा मोठा हिस्सा खर्चून मुलीला चांगले शिक्षण व सोयीसुविधा दिलेल्या असतात ,त्याचे त्यांना काय रिटर्न्स मिळतात?

माझ्या मर्यादित माहितीनुसार देशाला मनुष्यबळ पुरवण्यासाठी आईबापाने हे सर्व केलेले असते. बाकी रिटर्न्स पाहिजे असतील तर मुलाबाळांत पैसे गुंतवण्यापेक्षा शेअरबाजारात गुंतवलेले चांगले.

.शुचि. Mon, 25/01/2016 - 23:31

In reply to by अतिशहाणा

नेटवर्किंग करतानाही आपण बरेचदा या दृष्टीने पहातो की ती व्यक्ती जॉब हवा असेल, कुठे काही संधी असतील तर मदत करेल / सोशल नेटवर्किंगचा काहीतरी उपयोग होइल .... क-दा-चि-त!! अगदी वशीला नाही तरी एखाद्या व्हेकन्सी ची माहीती कळवून किंवा तत्सम.
मग पालक-मुलांच्या नात्यात का रिटर्न्स पाहू नयेत? विशेषतः जिथे म्हातारपणी खरोखर कोणाची तरी आवश्यकता भासते तेव्हा.
.
.
अवांतर - ते अतिशहाणाजी संबोधन उगाच/मुद्दाम. म्हणजे तुमच्यावरती प्रतिसाद देण्याचा अंशतः दबाव यावा म्हणून. हाहाहा =))

अतिशहाणा Mon, 25/01/2016 - 23:36

In reply to by .शुचि.

जर या नात्यातही रिटर्न्स बघायचे असतील तर त्यासाठी दुसरे पर्याय आहेत ना. साधारण मुलगा हाताशी येईपर्यंत तो पुढे कसा वागेल याची माफक कल्पनाही पालकांना येत नाही काय? मग त्यावेळी म्हातारपणाची आपआपली सोय बघण्याऐवजी सरकारने या संपूर्ण वैयक्तिक बाबतीत हस्तक्षेप करावा ही मागणी चुकीची वाटते. निवृत्तीमहाराज इंदुरीकर हे त्यांच्या कीर्तनात सांगतात की मेल्यानंतरच मुलाबाळांच्या नावे जमीन घर होईल अशी व्यवस्था करा. मरेपर्यंत नको. इतकंही शहाणपण नसेल तर काय बोलणार!

.शुचि. Mon, 25/01/2016 - 23:46

In reply to by अतिशहाणा

साधारण मुलगा हाताशी येईपर्यंत तो पुढे कसा वागेल याची माफक कल्पनाही पालकांना येत नाही काय?

समजा कल्पना आलीही तरी त्या मूला/मुलीला टाकता तर येत नाही. तेव्हा बरा कायदा (?) आड येतो :(
उद्या आई-बाप म्हटले की मूलाला आम्ही हाकलून देऊ तो तसाही पुढे कुचकामाचा वाटतो. तर .... हां मला एक प्रश्न आहे तर सरकार हस्तक्षेप करेल का? की फक्त सामाजिकच दबाव येइल?

अतिशहाणा Mon, 25/01/2016 - 23:55

In reply to by .शुचि.

टाकून द्या असं कुठं सांगितलंय. जर पुढे मुलगा करोडपती होऊन आईबापाला भिकेला लावणार असेल तर आईबापाने वेळीच हात आखडता घेऊन भिकेला लागणे टाळावे इतकंच म्हणायचंय.

.शुचि. Mon, 25/01/2016 - 23:57

In reply to by अतिशहाणा

:) हे खरे आहे प्रेमात आंधळे होताच कामा नये. अन मुलांचे (अपत्य) विचारायलाच नको जन्मतःच आईबापाला इमोशनल ब्लॅकमेल कसे करायचे ते शिकून आलेली असतात.

गब्बर सिंग Tue, 26/01/2016 - 08:44

म्हणून मला वाटते की हे कायद्याने कंपल्सरी करावे की मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या उत्पन्नातील ठराविक वाटा लग्नानंतर आईबापाला दिलाच पाहिजे ... आणि ते उपकार म्हणून नव्हे तर आईबापाणी तुमच्या पालन-पोषण/ शिक्षणावर केलेल्या खर्चाची परतफेड म्हणून...!

अशा कायद्याचा मी समर्थक नाही.

परंतू असा कायदा झालाच तर - फक्त तेच आईबाप या कायद्याच्या लाभास पात्र असावेत ज्या आईबापांनी त्यांच्या आईबापाला असेच पैसे दिले होते. ज्या आईबापांनी आपली सर्व कमाई फक्त आपल्या व आपल्या मुलांच्या दैनंदिन व भविष्यकालीन गरजांसाठी केली त्यांना या कायद्यातून वगळण्यात यावे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की - मुलगा आणि मुलगी यांच्या कमाईतली प्रत्येक पै जी मुलग्याच्या/मुलीच्या आईबापाकडे वळवली जाते ती प्रत्येक पै ... मुलग्याच्या/मुलीच्या अपत्यावर खर्च केली जाऊ शकत नाही.

-----

नटसम्राट (अवतार) चा परिणाम वाटतं !!! ( मिश्किल मोड मधे लिहिलेले आहे. )

.शुचि. Tue, 26/01/2016 - 19:55

In reply to by गब्बर सिंग

फक्त तेच आईबाप या कायद्याच्या लाभास पात्र असावेत ज्या आईबापांनी त्यांच्या आईबापाला असेच पैसे दिले होते.

पहील्यांदा सुरुवात होऊ द्यात मग पुढच्या पीढीत असे नियम करता येतील.

'न'वी बाजू Tue, 26/01/2016 - 09:09

हे कायद्याने कंपल्सरी करावे की मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या उत्पन्नातील ठराविक वाटा लग्नानंतर आईबापाला दिलाच पाहिजे ... आणि ते उपकार म्हणून नव्हे तर आईबापाणी तुमच्या पालन-पोषण/ शिक्षणावर केलेल्या खर्चाची परतफेड म्हणून...!

करेक्ट मी इफ आय अ‍ॅम राँग, पण माझ्या कल्पनेप्रमाणे, 'आपल्या हिंदू संस्कृती'त (व्हॉटेवर द्याट मे मीन) मातृपितृऋण म्हणून जे सांगितले आहे, ते आपल्या संततीचे पालनपोषण करून, त्यांना लहानाचे मोठे करून फेडायचे असते. कारण आपल्या आईबापांनी (सपोज़ेडली) आपलेही असेच पालनपोषण केलेले असते, आपल्याला लहानाचे मोठे केलेले असते, म्हणून.

बास. द्याट इज़ द नेट लायेबिलिटी ऑफ वन टुवर्ड्ज़ वन्स पेरेण्ट्स. पण लक्षात कोण घेतो?

बाकी, 'आपल्या हिंदू संस्कृती'ने 'वानप्रस्थाश्रमा'चा त्याग तर केला, परंतु त्याच वेळेस 'वृद्धाश्रमा'चा स्वीकारही केला नाही, ही बहुधा हिंदू संस्कृतीची सर्वात मोठी शोकांतिका असावी.

इत्यलम्|

चार्वी Tue, 26/01/2016 - 20:26

* एकच मुलगी असण्यावर रोष का ते कळले नाही.

एकच मुलगी असलेल्या घरांत मुली शिक्षित होवून नोकरी करून स्व-निर्णयाने नवरा निवडतात , तो कदाचित (बर्‍याच वेळेला ) आंतरजातीय अथवा आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध असतो . मग लग्नानंतर नाइलाजाने जावयाशी जुळवून घेतले जाते .अथवा कटुता तशीच राहते ..आणि ... आईबाप वृद्ध होतात ,अन एके दिवशी या जगाचा निरोप घेतात ..मग जावयाला आयती प्रॉपर्टी मिळते

एकच मुलगा असलेल्या घरात मुलगे शिक्षित होवून नोकरी करून स्व-निर्णयाने बायको निवडतात , ती कदाचित (बर्‍याच वेळेला ) आंतरजातीय अथवा आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध असते. मग लग्नानंतर नाइलाजाने सुनेशी जुळवून घेतले जाते .अथवा कटुता तशीच राहते ..आणि ... आईबाप वृद्ध होतात ,अन एके दिवशी या जगाचा निरोप घेतात ..मग सुनेला आयती प्रॉपर्टी मिळते....असेही होऊ शकते.
किंवा

मुलगी व जावई करोडपती असून महिन्याला लाखात उत्पन्न असताना देखील मुलीचे आईबाप मात्र हलाखीच्या परिस्थित जगत आहेत

असे असेल तर मुलगा व सून श्रीमंत असून मुलाचे आईबाप मात्र हलाखीत आहेत अशी परिस्थितीही असू शकते.

* (माझ्या माहितीनुसार) हिंदू वारसा कायद्यात तांत्रिकदृष्ट्या तरी जावयाला संपत्ती मिळत नाही. मुलीला मिळते.

गब्बर सिंग Tue, 26/01/2016 - 23:07

एकच मुलगी असलेल्या घरांत मुली शिक्षित होवून नोकरी करून स्व-निर्णयाने नवरा निवडतात , तो कदाचित (बर्‍याच वेळेला ) आंतरजातीय अथवा आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध असतो . मग लग्नानंतर नाइलाजाने जावयाशी जुळवून घेतले जाते .अथवा कटुता तशीच राहते ..आणि ... आईबाप वृद्ध होतात ,अन एके दिवशी या जगाचा निरोप घेतात ..मग जावयाला आयती प्रॉपर्टी मिळते

लग्नाचा निर्णय आईवडीलांच्या मर्जीविरुद्ध असला तरी आईवडीलांची प्रॉपर्टी आयती जावयाला/सुनेला आईवडीलांच्या पश्चात मिळेल ह्याबद्दल चिंता खरंतर कमी असायला हवी. कारण ते आईवडिलांच्या पश्चात घडणार आहे. आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत ते त्यांच्या स्वतः कमवलेल्या प्रॉपर्टीचा लाभ घेऊ शकतात का ? ते महत्वाचे आहे. नैका ?? समजा आईवडीलांच्या कमाईचा एकच फ्लॅट असेल तर ते स्वतः त्या फ्लॅट मधे राहतात हे योग्यच. पण (पीएफ्/ग्रॅच्युएटी तुटपुंजा असेल तर) दैनंदिन उदरनिर्वाहासाठी पैसे मुलीकडे/मुलाकडे मागणार ? त्यापेक्षा आहे त्या फ्लॅट मधे जी इक्विटी आहे ती मॉनेटाईझ् करून ती दैनंदिन उदरनिर्वाह्/औषधे यासाठी वापरली जाऊ शकतेच ना ? होम इक्विटी लोन सारखी काही तरी अ‍ॅरेंजेमेंट केली जाऊ शकतेच की.

अनु राव Wed, 27/01/2016 - 10:01

मुलगा किंवा मुलगी ह्यां पैकी कोणावरच आईबापांची जबाबदारी असता कामा नये.
खरे तर आपल्या मुलांची , त्यांच्या ( मुलांच्या ) आयुष्यापुरती बेगमी करुन ठेवणे हे आई-बापांचे कर्तव्य आहे. असा काहीतरी कायदा आणला पाहिजे.

गब्बर सिंग Wed, 27/01/2016 - 10:21

In reply to by अनु राव

खरे तर आपल्या मुलांची , त्यांच्या ( मुलांच्या ) आयुष्यापुरती बेगमी करुन ठेवणे हे आई-बापांचे कर्तव्य आहे. असा काहीतरी कायदा आणला पाहिजे.

कोणाच्या पोटी, कधी, कुठे जन्म घ्यायचा हे मुलांच्या हातात नव्हतं. आईवडीलांनी जन्म द्यायचा निर्णय घेतला व त्यानिर्णयाचे परिणाम भोगायची जबाबदारी आईवडीलांचीच असली पाहीजे - असा विचार या वाक्यामागे आहे. पण मग हाच प्रश्न आईवडील त्यांच्या आईवडिलांना विचारू शकत नसावेत कारण ते लोक "वर" गेलेले असू शकतात. म्हंजे यात संधीची समानता नाही. ( प़ळा पळा )

यावर अमिताभ बच्चन नी हरिवंश राय यांची अशाच स्वरूपाची एक मस्त खुसखुशीत आठवण सांगितली होती. नुकताच तो व्हिडिओ व्हॉट्सॅप वर पाहिला होता.

अनु राव Wed, 27/01/2016 - 12:49

In reply to by गब्बर सिंग

पण मग हाच प्रश्न आईवडील त्यांच्या आईवडिलांना विचारू शकत नसावेत कारण ते लोक "वर" गेलेले असू शकतात. म्हंजे यात संधीची समानता नाही. ( प़ळा पळा )

सध्याचे आई-वडील त्यांच्या आई-वडीलांना प्रश्न विचारु शकतात, त्यातले काही लोक जर वर गेले असतील तर सध्याचे आई-वडील अन्याय झाला असा टाहो फोडु शकतात. पण म्हणुन त्यांच्या आई-वडीलांनी केलेला गुन्हा पुन्हा ह्यांनी करायचा हक्क त्यांना प्राप्त होत नाही.
रादर संधीची समानता ही अनैतिक, बेकायदेशीर, गुन्हेगारी गोष्टींना लागु होते असे मला वाटत नाही.

गब्बर सिंग Wed, 27/01/2016 - 13:24

In reply to by अनु राव

सध्याचे आई-वडील त्यांच्या आई-वडीलांना प्रश्न विचारु शकतात, त्यातले काही लोक जर वर गेले असतील तर सध्याचे आई-वडील अन्याय झाला असा टाहो फोडु शकतात. पण म्हणुन त्यांच्या आई-वडीलांनी केलेला गुन्हा पुन्हा ह्यांनी करायचा हक्क त्यांना प्राप्त होत नाही. रादर संधीची समानता ही अनैतिक, बेकायदेशीर, गुन्हेगारी गोष्टींना लागु होते असे मला वाटत नाही.

अधोरेखित भाग समस्याजनक आहे. पण आत्ता कंटाळा आलाय...

म्होरल्या टायमाला.