Skip to main content

आपली संस्कृती : २(एडवर्डच्या ब्लॉगवरून साभार)

संस्कृती ही एकप्रवाही नसते. त्यामुळे तिच्या सर्व प्रवाहांत एकाच वेळी पोहणे शक्य नाही. तिच्याबद्दल थोडंसं लिहिताना मी वहिवाटीचा प्रवाह निवडलाय.

अमेरिकेत राहणारा एडवर्ड. भारतात फिरायला जायचं असं कधीपासून चाललेलं त्याचं. पण जमत नव्हतं अखेर सगळं व्यवस्थित जुळून आलं आणि तो यायला निघाला. एकूणच भारताबद्दल त्याला प्रचंड आकर्षण होतं. अतिशय वेगळी, आकर्षक, गूढ अशी ती जागा आहे असं त्यानं वाचलेलं कुठतरी. योग, आयुर्वेद, करी, स्लमडॉग मिलेनियर, गांधी, हिमालय असं थोडं थोडं ऐकून होता. पण अजूनही अनेक गोष्टी माहित नव्हत्या. माहित करून घ्यायच्या होत्या. भारताच्या संस्कृतीबद्दल त्याला कुतूहल होतं. ही नेमकी आहे तरी कशी हे स्वत: जगून पाहण्याची त्याची इच्छा होती. भारतात प्रवास करताना तिच्याबद्दलही बरंच काही अगदी तपशीलवार जाणून घ्यायचा त्यानं निश्चय केला. त्यादृष्टीनं आपलं वेळापत्रक आखलं आणि मुंबईचं विमान पकडलं.
परत आल्यावर त्यानं भारतावर जे अनेक ब्लॉग लिहिले त्यातल्या एका ब्लॉगवर टाकलेल्या त्याच्या डायरीतल्या काही परिच्छेदांचा स्वैर अनुवाद खाली देतोय :

शीर्षक – Land of Culture Shocks

मुंबई -

२३ सप्टेंबर – मुंबईत किंवा बॉम्बेत (जे काही असेल ते) कालच आलो. इथे पाउस पडतोय. काही सुचत नाहीये. काय करू आणि काय नको असं झालंय. 2 नोव्हेंबर चं परतीचं तिकीट आहे. माझ्याकडे मोजून एक महिना आहे. काय काय बघणार इतक्या मोठ्या देशात?

२५ सप्टेंबर - इथे सध्या एक पारंपारिक उत्सव सुरु आहे. गणेशोत्सव असं नाव आहे(बाप रे मला धड उच्चारता पण नाही येत). माझा गाईड मला तिथे घेऊन जाणारे. बाकी आज गेटवे, संग्रहालय आणि मरीन ड्राईव पाहिला. मला गाईडकडे आणि इतर लोकांकडे या उत्सवाबद्दल थोडी चौकशी केल्यानंतर काही गोष्टी समजल्या.

१] इथे लोक धार्मिक उत्सवात मांसाहार करत नाहीत.
२] उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भव्य मिरवणूक असते.
३] गणपती नामक देवतेचा हा उत्सव असतो.
४] हा ११ दिवस चालतो.

आणखीन एक, इथे अनेक लोक शाकाहारी असल्याचं सांगतात. जरा रोचक आहे हे. म्हणजे अनेक ठिकाणी ‘शुद्ध शाकाहारी’ अशी पाटी असलेली हॉटेल्स दिसली. शुद्ध शाकाहारी हा शब्द मला अजूनही कळलेला नाही. मांसाहार करणारे शुद्ध नसतात की काय? विनोद बाजूला ठेवू. पण बहुतांशी भारतीय लोक शाकाहारी आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. इथे अंडीसुद्धा मांसाहारी समजली जातात. माझा गाईडसुद्धा “मी ‘जैन’ असल्यामुळे मांसाहार करीत नाही” असे म्हणाला. म्हणजे शाकाहारी लोकांची जात वेगळी आणि मांसाहारींची वेगळी आहे असं काहीतरी दिसतंय. पण जैन ही जात नाही धर्म आहे असं कळल्यावर मात्र मी बुचकळ्यात पडलो. थोडंसं अवघड आहे समजायला. एक गोष्ट मात्र नक्की. भारतीय हिंदू लोक गोमांस खात नाहीत हे १०० % खरं आहे.
इथे जेवणात डोसा , चिकन तंदुरी, नान आणि करी खात नाहीत हे ऐकून मला धक्का बसला. हे प्रमुख भारतीय पदार्थ आहेत ना ? आमच्या इथे तर इंडियन फूड म्हणून हेच विकतात. म्हणजे इथेही ते मिळतात पण लोक रोज नाही खात. हे नवीनच ऐकतोय.

२७ सप्टेंबर- बापरे!!! काय ती गर्दी. मला आधी वाटलेलं की भारतातला मुख्य सण दिवाळी आहे. पण इथल्या काही लोकांनी सांगितलं की दिवाळीपेक्षा इथे गणपती उत्सवाला जास्ती महत्व आहे. निदान या राज्यात तरी. मला जरा गोंधळल्यासारखं झालं. अच्छा मुंबई हे महाराष्ट्र राज्यात येतं. राज्याच्या राजधानीचं शहर. छान, नवनवीन गोष्टी कळतायत. आणखी कुठे हा उत्सव नसतो का असं विचारल्यावर ‘नाही’ असं उत्तर मिळालं ?

२८ सप्टेंबर – चला , मुंबई सोडण्याची वेळ झाली आता गोवा. सीजन नसल्यामुळे स्वस्तात होऊन जाईल असं एकाने सांगितलं.

गोवा -

१ ऑक्टोबर - अरेच्चा !! इथे तर वेगळंच दिसतंय सगळं. मला तर वेगळ्याच देशात आल्यासारखं वाटतंय. परदेशी लोकपण बरेच आहेत. स्वच्छता पण कमालीची आहे. चर्चेस भरपूर आहेत. माझा गाईड कॅथोलिक आहे. मी जन्माने कॅथोलिक असूनही धर्म मानत नाही हे ऐकून नाराज झाला बिचारा. बाकी इथे चार दिवस मुक्काम पुरेसा झाला. छान जागा आहे. रशियन सरकारी नोकर इथे पडीक असतात म्हणे. असो.

कोची -

५ ऑक्टोबर – इथे हा तिसरा दिवस. अनेकांनी आवर्जून केरळ पाहा असं सांगितल्याने इथे येण्याचा निश्चय केला. छान शहर आहे. पण हे काय? नुकताच ओळखीचा झालेला माझ्या हॉटेलचा वेटर ’संदीप मेनन’ हिंदू असून गोमांस खातो असं त्यानं मला सहज बोलता बोलता सांगितलं. इथे हॉटेलमध्ये बीफ सर्रास मिळतं. म्हणजे हिंदू गोमांस खात नाहीत हे खरं नाही? तो म्हणाला निदान केरळमध्ये तरी खातात बाकी माहित नाही. हे काय नवीनच. इथली भाषा पण वेगळी आहे. तिची लिपी वेगळी आहे. म्हणजे इथे हिंदी बोलत नाहीत. मला तर वाटलेलं की भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. पण प्रत्येक राज्याची वेगळी राज्यभाषा असते असं समजलं. महाराष्ट्राची मराठी, केरळची मल्याळम, बंगालची बंगाली असं एकंदरीत प्रकरण आहे. पण भारतात अनेकांना इंग्रजी येते ही माझ्यासाठी चांगली बातमी आहे. बाकी हे शहर मस्त आहे. किनारा तर सुंदरच आहे. पण आता समुद्र नको. काहीतरी वेगळं पाहावंसं वाटतंय.
भारतीय संस्कृतीबद्दल रोज नवीन काही माहिती समोर येत आहे. चांगलं आहे.

त्रिवेंद्रम -

११ ऑक्टोबर – जवळजवळ सर्व केरळ फिरून झालंय. गुरुवायूर, आलेप्पी, मुन्नार, कोझिकोडे, त्रिवेंद्रम, थ्रिसुर आणि बरंच काही. त्रिवेंद्रम येथे मी राहत असलेल्या हॉटेलच्या मालकाच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण मला मिळालं आणि मी गेलोही. पण मला तिथे अजून एक धक्का बसला.

भारतात लग्न खूप धूमधडाक्यात होतात असं पुसटसं ऐकलेलं. पण इथे मात्र अगदी साध्या पद्धतीनं पार पडलं. कोणताही गाजावाजा नाही. अनेक बायका पांढऱ्या साड्या नेसलेल्या. पण पांढरी साडी भारतात अशुभ मानली जाते ना? मुंबईमध्येच एकाकडून कळालेलं मला तसं. जाऊदे. बाकी लग्न छान झालं. सकाळ-सकाळी ७ च्या मुहूर्तावर. मुहूर्त हा प्रकारही माझ्यासाठी नवीनच होता. अमेरिकेतल्या माझ्या एका पंजाबी मित्राने भारतात लग्न संध्याकाळी होतं असं सांगितल्याचं स्पष्ट आठवतंय. नाच-गाणं पण असतं म्हणे. पण मग एका व्यक्तीने “नॉर्थची गोष्ट वेगळी,इथली वेगळी” असं सांगितलं. इथे लग्नात पण मांसाहार करत नाहीत. कारण हे कुटुंब ब्राम्हण होतं. म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी जाती वेगळ्या हे माझं निरीक्षण खरं ठरलं तर. लोक भात खाताना चमच्याचा वापर करत नाहीत हे अजून एक निरीक्षण.

त्रिवेंद्रमपासून २ तासांच्या अंतरावर असलेलं कन्याकुमारी पण पाहून आलो. पुन्हा तेच. अंतर कमी पण राज्य वेगळं त्यामुळे नवी भाषा , नवी लिपी आणि नवी संस्कृती. अध्यात्म या भारताच्या सर्वात गूढ गोष्टीची पहिली ओळख मला कन्याकुमारीला झाली. मनाला शांती मिळाली. स्वामी विवेकानंद. त्यांच्याबद्दल इथे एक प्रवचन ऐकलं आणि आता उद्या कोलकात्याला जातोय. माझं नशीब जोरावर म्हणून की काय तिथे दुर्गापूजा नावाचा एक सण अनुभवायला मिळेल. मी आतुर आहे.
टीप – एक गोष्ट नक्की. इथे देव आणि मांसाहार या परस्परविरोधी गोष्टी आहेत. मंदिरात मांस चालत नाही. चुकूनही नाही. देवाला मांसाहार वर्ज्य.

कोलकाता -

१५ ऑक्टोबर – इथली हवाच निराळी. वेगळंच शहर आहे हे. आतापर्यंत पाहिलेल्या भारतीय शहरांपेक्षा पूर्ण वेगळं. भाषा वेगळीच. बंगाली. पण ऐकायला गोड वाटते.

१६ ऑक्टोबर - इथे आल्यावर आधी गेलो ते बेलूर मठात. कन्याकुमारी ते बेलूरमठ, एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. काली माता मंदिर पाहिलं. बाकी भारतातली मंदिरे म्हणजे मला विरोधाभासाची जागृत केंद्रे वाटतात. आत प्रचंड वैभव आणि बाहेर बकाली. पैसे मागणारे, मागे मागे फिरणारे गरीब लोक. उदास होतं मन. गरिबी आणि धार्मिकता यांचा काही संबंध असावा का ?
दुर्गापूजेचं भारावलेलं वातावरण मी स्वत: अनुभवलं. खूप वेगळा अनुभव. दंग करणारा.

१९ ऑक्टोबर - गंगासागर पाहून आलो आज. पवित्र गंगा समुद्राला मिळते ते ठिकाण. सदा पवित्र गंगेचा मला आदर आहे पण तरीही , पुन्हा तेच चित्र. गर्दी आणि गरिबी. यापुढे मंदिरांची भेट कमी करायची असं ठरवलंय पण त्याशिवाय संस्कृती जवळून अभ्यासायला कशी मिळणार हाही प्रश्न आहे.

२२ ऑक्टोबर – आज दसरा. दुर्गापूजेचा शेवटचा दिवस. पण हे काय? प्रवासात मित्र बनलेल्या एका ब्राम्हण बंगाली तरुणाने मी त्याच्या घरी गेल्यावर सांगितलं की आज आम्ही प्रसाद म्हणून चिकन-मासे बनवतो. खरंच? पण देवाला मांसाहार चालत नाही ना ? मग ? बंगालमध्ये चालतो म्हणाला. मला कळत नाहीये.
म्हणजे देवाला चालत नाही आणि देवीला चालतो का? नक्की चालतो की नाही चालत? आणखी एक धक्का म्हणजे मांसाहारी की शाकाहारी हे जातीवर ठरतं हे माझं निरीक्षण कोलकात्यात चूक निघालं.

एकूणच भारतीय संस्कृती माझा गोंधळ वाढवत चालली आहे हे खरंय.

दिल्ली -

२९ ऑक्टोबर – ३ दिवसांत अक्खी दिल्ली पिंजून काढली. नान, कुलचे ,छोले ,बिर्याणी आणि चिकन तंदुरी मनसोक्त ओरपले. योगायोगाने आणखी एक लग्न जवळून पहायला मिळाले. हे मात्र हुबेहूब माझ्या अमेरिकेतल्या मित्राने वर्णन केल्यासारखे होते. मनसोक्त नाचलो. सर्वांनी छान आदरातिथ्य केले. मी कोणी मोठा स्टार आहे असंच वाटलं मला. इथे मात्र केरळच्या उलट परिस्थिती. लोक चमच्याचा वापर सर्रास करत होते. तुम्ही केरळ-तामिळनाडू मधल्या लोकांप्रमाणे हाताने खात नाही का यावर तिथे जे मिळालं तसंच उत्तर मिळालं.

ताजमहाल, फतेपूर-सिक्री पाहिलं. विलक्षण अनुभव. त्याबाबतचा माझं वेगळं ब्लॉग तुम्ही पाहू शकता.

दिल्ली -

१ नोव्हेम्बर – उद्या जाण्याचा दिवस. घरी जाण्याचे वेध तर लागलेत पण तरीही परत पाउल निघत नाहीये. “अजून काहीच पाहिलं नाही तुम्ही” असं एकजण मला परवा गाडीत म्हणाला. माझ्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे सगळं पाहता नाही आलं. खूप काही राहून गेलंय याची कल्पना आहे. पोट भरलंय पण समाधान होत नाहीये. मी पुन्हा येणार. पुढच्या वेळी जमलं तर सिंथियाला घेऊन येईन. पाहू.

भारतीय संस्कृती ही गोष्ट मात्र मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. प्रवासातला माझा धीर-गंभीर,शांत भारतीय मित्र मला “जेवढा विचार करशील तेवढा अजून गोंधळात पडशील” असं हसून म्हणाला. प्रश्नाला उत्तर न देता दुसरा प्रश्न ही त्याची खासियत. “भारतातले लोक शृंगार, लैंगिकता या बाबतीत इतके कर्मठ का?” असं विचारल्यावर “खजुराहो पाहिलंस?” असं त्यानं उलट विचारलं. नाही म्हणताच पुन्हा हसला. त्याचं ते हास्य केवळ मिश्कील नव्हतं. त्यात काहीतरी मोठा अर्थ दडलाय असं उगाचच वाटून गेलं. पण नंतर माझ्या चेहऱ्यावरील गोंधळ पाहून त्याने “हळू हळू समजत जातील गोष्टी” असं सांगितलं. पण जितक्या नवीन गोष्टी समजतील तितका मी या भूमीच्या प्रेमात पडेन की दूर जाईन हे मात्र कळत नाही.

परस्परभिन्नता मी पाहिलेली आधी वेगवेगळ्या देशांत. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच पाहिली नव्हती. मी इथली संस्कृती जितका समजण्याचा प्रयत्न करत गेलो तितकी ती मला अजून संभ्रमात टाकते आहे. नवनवीन प्रश्न निर्माण करते आहे. “अजून सर्व भारतीयांना तरी ती नीट समजली असेल का?” हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न.

आता निरोप घेतो. शुभरात्री.

********************************************************************************

एखाद्या (काल्पनिक) परदेशी पर्यटकाच्या वरवरच्या नजरेतून आपली संस्कृती समजून घेण्याचा आणि तिच्यातले बारकावे न कळल्यामुळे गोंधळून जाण्याचा प्रकार मांडण्याचा घाट मी का बरं घातला ? असा काहींना प्रश्न आहे. प्रश्न बरोबरच आहे. पण याचं उत्तर माझ्या नजरेतून देण्याचा प्रयत्न करत आहे. पाहा,
आपल्या देशाइतकी सांस्कृतिक विविधता जगात कुठेच नाही. पण विविधता आली म्हणजे गोंधळ आला. समज-गैरसमज आले. एकच ‘भारतीय’ नावाची वस्तुसदृश एक संस्कृती अशी अस्तित्वात नाही. तिची अनेक अंगे आहेत. हे आपल्यालाही माहित आहे पण अनेकदा ते आपल्यालाही जाणवत नाही. एक उदाहरण सांगतो. माझा एक उत्तर भारतीय मित्र तुमच्यात लग्नात काय काय करतात विचारत होता. मी म्हणालो की महाराष्ट्रीयन लग्न शक्यतो साधे असते. तुमच्याइतका झगमगाट आम्ही करत नाही. पण हे त्याला पटले नाही. असे का ? याचं उत्तर मी इतकं सांगूनही त्याला मिळालं नाही किंवा पटलं नाही. तुमची लग्ने खूप बोरिंग असतात मग असं म्हणून तो रिकामा झाला आणि मीदेखील हसत हो म्हणून मोकळा झालो. एका देशात राहून हा फरक.
मग बाहेरच्याला किती गोंधळल्यासारखं होत असेल?
हाच गोंधळ टिपण्याचा तो प्रयत्न होता. जर या वरवरील गोष्टींवर संस्कृती ठरवण्याचा अट्टाहास केला तर किती गैरसमज होऊ शकतो हे दाखवायचं होतं. जसा पिके मधला आमीर खान तसाच इथला एडवर्ड. तुलना नाही करत फक्त एक उदाहरण म्हणून.
म्हणजेच केवळ लग्न समारंभ , धर्म , जात-पात , खाण्यापिण्याच्या सवयी , सण-उत्सव,प्रथा-परंपरा हे म्हणजेच संस्कृती किंवा भारतीयत्व का ? तर नव्हे. उलट या तर अगदी किरकोळ बाबी आहेत.
भारतीयत्व वेगळं आहे.

गवि Sun, 13/03/2016 - 08:29

आणि भारतात असहिष्णुता..हम्म. ती निसटली वाटतं याच्या नजरेतून. गल्लीगल्लीत चाललेला तो इव्हेंट त्याला दिसू नये? खूप पूर्वी (दोन वर्षांआधी) आला असणार.

नितिन थत्ते Sun, 13/03/2016 - 08:35

हा भाग "भारतीय संस्कृतीचे" बाहेरच्याला घडलेले दर्शन या स्वरूपात आल्याने मस्तच झाला आहे.

वेगळ्या दृष्टीने विचार केला तर एडवर्डने (परस्परांपासून शेकडो किलोमीटर दूर असलेली) मुख्य शहरेच फक्त पाहिल्याने त्याला कल्चरल शॉक बसले असावेत.

शेवटचं "“अजून सर्व भारतीयांना तरी ती नीट समजली असेल का?” हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न." हे खास.
------------------------
पण हा ब्लॉग नक्की एडवर्डने लिहिला आहे का?

अरविंद कोल्हटकर Sun, 13/03/2016 - 10:37

'परस्परभिन्नता मी पाहिलेली आधी वेगवेगळ्या देशांत. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच पाहिली नव्हती. मी इथली संस्कृती जितका समजण्याचा प्रयत्न करत गेलो तितकी ती मला अजून संभ्रमात टाकते आहे. नवनवीन प्रश्न निर्माण करते आहे. “अजून सर्व भारतीयांना तरी ती नीट समजली असेल का?” हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न.'

'आमची संस्कृति' मलाहि नीटशी समजलेली नाही हे प्रांजळपणे मान्य करतो.

तरीहि ती समजून घेण्यासाठी कोणा एडवर्डच्या - जो भारतात प्रथमच एक महिन्यासाठी कसलीहि पूर्वतयारी न करता आलेला आहे - वरवरच्या अनुभवांचे मार्गदर्शन मला उपयुक्त ठरेल हे पटत नाही. काय अपेक्षेने हे परस्पर-असंबद्ध अनुभवांचे गाठोडे येथे आणून टाकले आहे ते समजून घ्यायची इच्छा आहे.

पहिल्या लेखामूळे उंचावलेल्या अपेक्षा येथे पूर्ण झाल्या नाहीत असे वाटते.

गवि Sun, 13/03/2016 - 10:43

In reply to by अरविंद कोल्हटकर

कोणा एडवर्डच्या - जो भारतात प्रथमच एक महिन्यासाठी कसलीहि पूर्वतयारी न करता आलेला आहे - वरवरच्या अनुभवांचे मार्गदर्शन

अशाच माणसाच्या नजरेतून पाहण्यात गंमत आहे.

"बॉलिवुड कॉलिंग" हा सिनेमा कोणीकोणी पाहिलाय?

दाह Sun, 13/03/2016 - 11:00

In reply to by अरविंद कोल्हटकर

असो.अपेक्षा ठेउच नयेत. कारण मी अपेक्षांचं प्रचंड दडपण घेणारा मनुष्य आहे.
एडवर्ड ही मी रचलेली काल्पनिक व्यक्तिरेखा आहे हे निदान काहीजणांना तरी समजेल असं वाटलेलं. मला याचं स्पष्टीकरण द्यावं लागतंय हाही अपेक्षाभंगच.
एक अर्धवट माहिती असलेला परदेशी मनुष्य भारतात आल्यावर
त्या संस्कृतीला कसं पाहतो आणि तिचे बारकावे न समजल्यामुळे कसा गोंधळात पडतो हाच उद्देश. बरेच परदेशी पर्यटक भारत म्हणजे एक आणि एकच संस्कृती हा समज घेऊन फिरायला येतात. मग त्यामध्ये अजून खोल शिरताना कोणते धक्के त्या व्यक्तीस बसू शकतात हेच मांडायचं होतं.
बाकी एडवर्ड हे फक्त पात्र आहे. असा कोणताही मनुष्य अस्तित्वात नाही.

गवि Sun, 13/03/2016 - 11:07

In reply to by दाह

पण गंमत म्हणजे असे असंख्य परदेशी लोकांचे "त्यांना दिसलेला भारत" या प्रकारचे ब्लॉग्ज असतात आणि त्यात भारताविषयी अगदी अस्संच संमिश्र चित्रण असतं. हीच निरिक्षणं असतात. त्यामुळे तुम्ही जरी काल्पनिक पात्र रचलं असलं तरी ते अशा ब्लॉगर्सशी खूपच साम्य असलेलं पात्र असल्यामुळे हे काल्पनिकत्व ओळखू येऊ नये यात काही विशेष नाही.

दाह Sun, 13/03/2016 - 11:23

In reply to by गवि

हां ते पण आहेच. त्यामुळेच अनेकांना हा एडवर्ड नामक सामान्य अमेरिकन माणसाने अभ्यास न करता वरवरच्या अनुभवांवरून लिहिलेल्या फुटकळ लेखाचा ढापुन केलेला स्वैर अनुवाद वगैरे वाटला असावा.तसा तो नाही.ती फक्त थीम आहे.
पण समजा कोणी मध्यमवर्गीय भारतीय नागरिक स्वीडनला फिरायला गेला,तर तो स्वीडनच्या स्वतःच्या अनुभवांवरून ब्लॉग लिहील की स्वीडनचा अभ्यास करून त्यावर लिहील? मला पहिली शक्यता जास्त वाटते.

गवि Sun, 13/03/2016 - 11:37

In reply to by दाह

मुळात भारतीय संस्कृती खोलवर शिकण्यासाठी अशासारखे ब्लॉग लिहीलेलेही नसतात आणि वापरणं अपेक्षितही नाही. फक्त एक वेगळी नजर इतकाच त्याचा उपयोग. आपण स्वतः इनसायडर असल्याने असंख्य गोष्टी फिल्टरआऊट करुन, गृहीत धरुन, महत्वाच्या किंवा तर्कदुष्ट न मानून इथलं आयुष्य जगतो. बाहेरुन आलेला मनुष्य आपल्याइथल्या नेमक्या कोणत्या गोष्टी सिग्निफिकंट समजून "नोट" करतो हे सुद्धा पाहणं आश्चर्यकारक आणि मनोरंजक असतं.

आदूबाळ Mon, 14/03/2016 - 01:47

In reply to by दाह

..हुकुम, हमसे कुछ भूल हुई हो तो हमें डंड दो, लेकिन ऐसे खेल ना खेलो हमारे साथ...

--------
पण तरीही - 'आपली' संस्कृती 'आपण' समजून घेताना 'ते' आपल्या संस्कृतीकडे कसं बघतात हे खरंच रिलेव्हंट आहे का?

हे म्हणजे स्वतःसाठी कच्छा घ्यायला जायचं आणि दुकानदारालाच "कोणत्या साईजची घेऊ हो?" हे विचारण्यासारखं झालं.

दाह Mon, 14/03/2016 - 09:42

In reply to by आदूबाळ

निदान मला तरी ते जरुरी वाटतं . कसं आहे ना दाढी उगाचच वाढवून फिरणाऱ्या मुलाला 'कार्ट्या दाढी वाढवून भूतासारखा दिसतोयस ' हे आईने सांगितल्यावर तिची चेष्टा करावीशी वाटते आणि ' शी , तो मुलगा बघ ना देवदास वाटतोय' असं एखादी मुलगी ऐकू जाइल अशा आवाजात म्हणते तेव्हा काय होतं हे सांगायला नको. म्हणून हा उपद्व्याप.

ऋषिकेश Sun, 13/03/2016 - 22:53

फारच छान.
भारतात अंतर्गत विरोधाभास इतका वेगळ्या प्रकारचा आहे की त्याला अन्य समांतर उदाहरण मिळू नये. आमच्या ऑफिसचा एक क्लायंट इथल्या ट्रॅफिकला 'हार्मनी एन केऑस' असं म्हणायचा, माझ्यामते हे ट्रॅफिकलाच नाही तर एकुणच देशाला लागू आहे.

(काही अभागी भडक उजवे व भडक डावे वगळले तर) देशातील विविधता इतकी खोलवर रुजली आहे की समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळी असणे ही आपल्या देशात सर्वात सामान्य व अ‍ॅक्सेप्टेड बाब आहे!

राजेश घासकडवी Mon, 14/03/2016 - 01:28

भारतीय संस्कृती नावाची एक काहीतरी गोष्ट आहे असं गृहित धरून ती हातात धरण्याचा प्रयत्न केला तर गोंधळ होणारच. इथे सहा आंधळ्यांची कथाही अपुरी पडते, कारण त्या कथेतही त्या सर्व अवयवांचं एकमेकांना जोडून काहीतरी मोठं पण एकसंध तयार होतं. इथे वैविध्य हाच स्थायीभाव आहे.

अशा परिस्थितीत राष्ट्रवाद जागा करणं, जिवंत ठेवणं, आणि त्याआधारावर चळवळ उभारणं हे प्रचंड कठीण काम आहे.

मेघना भुस्कुटे Mon, 14/03/2016 - 09:04

पुन्हा एकदा इंट्रेष्टिंग. पण सावध, संशयी आणि उत्सुक कायम. कोल्हटकरकाकांसारखा माझाही थोडा अपेक्षाभंग झाला. (पण ती माझी चूक. तुम्हांला तुमची भूमिका नीट स्पष्ट करण्याकरिता जो घाट आवश्यक वाटेल, तो तुम्ही वापरणार हे योग्यच.) बाहेरून लोक आपल्याकडे कसं पाहतात, त्यांना किती विसंगती, परस्परविरोध, विरोधाभास आणि सारखेपणा दिसतो हे इंट्रेष्टिंग आहे. पण त्याचा संस्कृती समजून घ्यायला एका पायरीच्या पलीकडे फारसा उपयोग नाही असं माझं वैयक्तिक मत. (त्यामुळेही मी आबा आणि कोल्हटकरकाकांच्या पक्षात गेले असेन.)
असो.
संस्कृतीचं जीवनचक्र समजून घेण्याबद्दल तुम्ही गेल्या लेखात जे आरंभलं होतं (आरंभणेला आपल्याकडे थोडे नकारात्मक अर्थ आहेत, ते इथे अभिप्रेत नाहीत.), ते पुढे कधी वाढवणार?

ऋषिकेश Mon, 14/03/2016 - 09:10

In reply to by मेघना भुस्कुटे

पण त्याचा संस्कृती समजून घ्यायला एका पायरीच्या पलीकडे फारसा उपयोग नाही असं माझं वैयक्तिक मत.

+ / -
"ओळख" हा एक प्रतिमेचा खेळ असतो. ओळखीच्या बाबतीत अ‍ॅबसोल्युट असं काहीच सत्य नसतंच. मग ती ओळख व्यक्तीची असो वा अख्ख्या समाजाची/संस्कृतीची.
तेव्हा बाहेरच्यांची आपल्याबद्दल झालेली प्रतिमा ही एक पायरी आहे हे खरंच पण ती एक महत्त्वाची पायरी आहे. एखादी संस्कृती समजून घेताना ती आतून बघणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ती बाहेरून त्रयस्थाच्या नजरेतूनही समजून घेणं महत्त्वाचा आयाम ठरतो.

अनु राव Mon, 14/03/2016 - 09:30

"आपली" संस्कृती, ह्यातील "आपली" ह्याच शब्दात गोंधळ आहे. भारतात शेकडो संस्कृत्या असाव्यात ह्या घडीला, लेख नक्की कोणत्या आणि कोणाच्या संस्कृती बद्दल आहे?

अनु राव Mon, 14/03/2016 - 13:56

In reply to by गवि

गवि- तुमचा मान ठेवुन सुद्धा म्हणावेसे वाटते की हे काही कळले नाही.

मला जो अर्थ लागला तोच घ्यायचा असेल तर "चलता है" तात्पुरता फायदा देऊन जाइल पण दुरगामी आणि कायमचे नुकसान करेल. आजुबाजुला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासुन ते जागतीक पातळीवरच्या अनेक प्रॉब्लेम ला त्या त्या वेळी घेतलेला "चलता है" हा अ‍ॅप्रोच आहे.

तत्वाला एकदा छोटीशी मुरड घालायची ठरली की ती मुरड मोठी होत होत सर्व तत्वच कधी खाऊन टाकते ते कळत नाही.

अनु राव Mon, 14/03/2016 - 14:13

In reply to by राही

अगदी निखळ नसतेच पण बराच काळ स्थिर तरी असते. काही काही तत्वे तर बर्‍यापैकी स्थिर असतात.

जागतिक उदाहरणे द्यायची तर

अमेरीकेनी फक्त रशियाला विरोध करायच्या आंधळेपणानी मुजाहिदींना कवटाळले नसते ( नक्कीच ते अमेरीकन जीवनपद्धतीच्या विरुद्ध होते ) तर.
पतदर्जा नसेल तर कर्ज द्यायचे नाही हे तत्व "चलता है" म्हणुन मोडले नसते तर

-----------
महत्वाचे म्हणजे "चलता है" जास्त चांगले आहे हे कुठुन आले आणि ते सुद्धा गविंकडुन? विमान कंपन्यांनी "चलता है" म्हणत मेंटेंनन्स ला कात्री लावली की काय होते ते गविंना माहीती आहेच.

गवि Mon, 14/03/2016 - 14:31

In reply to by अनु राव

अजून काही शब्द हवे होते वाक्यात.

"चलता है" याचा निगेटिव्ह छटेचा अर्थ = " काय वाट्टेल ते चालून जातं. कोणाला काही पडलेली नाही. दूरदृष्टी, सारासार विचार वगैरे गेले तेल लावत. मला काय त्याचं?"

चलता है याचा पॉझिटिव्ह छटेचा अर्थ = " रिजिडिटी कमी. विविधतेचा स्वीकार. "तुम्ही" तुमच्या पद्धतीने वागलात तरी "आम्हाला" चालेल. तुम्ही माझ्या नियमांनी वागला नाहीत तर तुमची गच्छंती होणार नाही. मी माझी विचारपद्धती तुमच्यावर लादणार नाही. रोजच्या आयुष्यातल्या वागण्याला एकच एक युनिफॉर्म नियमावली लागू नाही. जनरली इतरांना त्रास न होता काही केलं तर "चलता है"

यातल्या बेफिकीर छटेने नुकसान तर नक्कीच होतं. सिग्नल तोडला.. चलता है.. कचरा फेकला.. चलता है.

पण पॉझिटिव्ह भाग हा, की प्रार्थना केली न केली.. चलता है. देव माना न माना, चलता है (इथे किंचित कंप मान्य करावाच लागेल.. ).. कपडे कसेही घाला .. चलता है.. दाढी ठेवा/ ठेवू नका.. चलता है..

"नही चलेगा" संस्कृतीत याच्या अगदी उलट म्हणजे कडक नियमपालनाचे कदाचित फायदे, पण उलट बाजूने "अमुक एक आम्ही ठरवलेलं पाळलं नाहीत तर तुम्हाला इथे स्थान नाही".. ऊर्फ नही चलेगा.. यात तुलनेत तोटे जास्त आहेत.

आयडियल दोन्ही नाही.

अनु राव Mon, 14/03/2016 - 14:40

In reply to by गवि

मुळ थत्तेचाचांच्या प्रतिसादात "चलता है" हे "जुगाड" ह्या शब्दाबरोबर आले होते. तुम्ही एकदम सध्या भारभर माजलेल्या असहिष्णुतेवर असा आडुन आडुन प्रहार कराल असे वाटले नव्हते.

गवि Mon, 14/03/2016 - 14:44

In reply to by राही

बरोबर.

"चलता है" हे शब्द जसे "संस्कृती" म्हणून वापरलेत तसंच "नही चलेगा" हेही "संस्कृती" म्हणून वापरल्यास मग ते तितके सकारात्मक राहणार नाहीत अशाच अर्थाने थोडक्यात वाक्य टाकलं होतं.

राही Mon, 14/03/2016 - 12:12

ह्या कल्पित अनुदिनीतली निरीक्षणे फार वरवरची वाटतात. उदा.,मंदिरात मांसनैवेद्य नेणे किंवा मांस बाळगणे हे चालत नाही हे काही अंशीच खरे आहे. पुष्कळांकडे देवाला मांसाचा नैवेद्य असतो आणि काही देवळांत विशेष प्रसंगी मांसाचा नैवेद्य दाखवला जातो. बहुतेक देवळांची पूजाअर्चा ही तथाकथित मांस न खाणार्‍या वर्गाकडे असल्याने असे होते हे त्याचे कारण आहे.
'एक तत्त्व-एक भान, एक 'राष्ट्र-एक गान' हे इथे रुजत नाही. हिंदुधर्माची बहुविधता हेच त्याचे बलस्थान आहे हे समजून न घेता केलेले वरवरचे अवगाहन अंग कोरडेच राखणार.
'कुणाच्या खांद्यावर राष्ट्रवादाचे ओझे' हा १० मार्चच्या लोकसत्ताच्या संपादकीय पानावरचा लेख' इथे अवांतर असला तरी मूळ गाभ्याशी थोडासा समांतर वाटला.

दाह Mon, 14/03/2016 - 12:28

काशीतल्या ब्राम्हण संमेलनावर सावरकरांचा एक लेख आहे ज्यात त्यांनी आपले एक काल्पनिक वार्ताहर श्री मनकवडे यांना तिथे वार्तांकनासाठी पाठवले. साधारणपणे यासारखीच थीम मी इथे वापरली आहे.