भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
- इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
...४) साम्राज्य, राष्ट्र, संपत्ति व वीर्यशाली प्रजा प्राप्त व्हावी एतदर्श अश्वमेध यज्ञ करण्याचा प्रघात असे. यज्ञांत स्त्रीपुरुष असा सर्व प्रकारचा समाज जमे. अध्वर्यू, उद्गातृ, होतृ असे ऋत्विज् पुरुष असत व महिषी, यजमानपत्नी इत्यादि स्त्रिया असत. पैकीं वीर्यशाली प्रजा उत्पन्न व्हावी या कामनेच्या सिद्ध्यर्थ खालील नाटक केले जात असे. अश्वमेधातील घोडा मृत होऊन पडल्यावर तेथे राजपत्न्यांना बोलावून आणीत. राजपत्न्यांपैकी मुख्य जी पट्टराणी ती आपल्या आईला किंवा सपत्न्यांना उद्देशून म्हणे की, बायांनो! हा मेला घोडाच माझ्याशी निजेल. कारण मला अभिगमनार्थ दुसरा कोणीच की गे नेत नाही. पट्टराणीची ही तक्रार ऐकून, घोडा खडबडून जागा होतो व पट्टराणीला म्हणतो, ये, येथे हे क्षौमवस्त्र म्हणजे सोवळ्याचे वस्त्र अंगावर घेऊन आपण निजू. त्याला रुकार देऊन पट्टराणी म्हणते, मी तुजपाशी गर्भधारणार्थ ही आल्ये, तूही मजकडे गर्भ पेरण्यास ये. आपण पाय पसरून निजू. घोडा आणि पट्टराणी ही एकमेकांशेजारी पडल्यावर प्रतिप्रस्थाता म्हणतो की, हा घोडा रेतःसिंचन करो व तुझी योनी रेतोधारण करो. असा मंत्र म्हणून ऋत्विज घोड्याचे लिंग राणीच्या योनीजवळ आणी, आणि म्हणे की, मांडीवर मांडी ठेव, आणि लिंग योनीत घाल, स्त्रियांना लिंग जीव की प्राण आहे, लिंग भोकाला झवते, ते स्त्रियांना प्रिय असते कारण ते योनी कुटते, आणि स्त्रियांच्या काळ्या भोकातील दाण्याला हाणते. हे नाटक झाल्यावर राणी म्हणते, बायांनो! मला कोणीच झवत नाही, सबब, हा घोडा मजपाशी निजतो. त्यावर इतर स्त्रिया म्हणतात, रानात फाट्यांचा भारा उचलताना ढुंगण जसे पुढे करतात तशी तू आपली योनी पुढे उचल व तिचा मधला भाग वाढव. हे सर्व पट्टराणीने केले, तेव्हा घोडा निजला. मग, राणी इतर बायांना पुन्हा म्हणाली, बायांनो! मला कोणीच झवत नाही, सबब घोड्याजवळच मी निजत्ये. त्यावर एका बाईने खालील टीका केली: - हरणी रोजचे रानातले गवत टाकून शेतातले चोरून जव खाते, परंतु त्याने तिचे पोट भरलेसे तिला वाटत नाही; क्षुद्रस्त्री वैश्यांशी चोरून रमते, परंतु त्या रमण्याने तिचे समाधान होत नाही. या टीकेला राणी उत्तर देते की, घोडा माझ्याशी संग करतो, त्याचे कारण एवढेच की दुसरा कोणीच मला झवत नाही. त्यावर दुसरी एक स्त्री टीका करते की, तुझी ही योनी एखाद्या पाखरिणीसारखी हुळहुळून हलते आहे, तिच्यात रेत पडले आहे व ती गुलगुल वाजत आहे, मग तक्रारीला जागा कुठे राहिली. याही टीकेला राणी उत्तर करते की, तक्रार करू नको तर काय करू? मला कोणीच पुरुष झवत नाही. सबब मी घोड्यापाशी जात्ये, यावर तिसरी एक म्हणते, तुला घोडा सापडला हे नशीबच समज, तुझ्या आईला तोही लाभला नाही, तुझी आई व तुझा बाप झाडावर चढत आणि नंतर तुझा बाप योनी सोलून काढतो म्हणून, तुझ्या आईच्या योनीत आपल्या हाताची मूठच ठाशी. त्याहून घोडा बरा नव्हे? तैत्तिरिय संहितेतील मंत्राचा तपशील हा असा आहे. सायणाला या मंत्राचा अर्थ व पूर्वापार संबंध व शब्द बिलकुल काहीच कळले नव्हते.
५) कृष्णयजुर्वेदसंहितेतील नाटकाचा तपशील हा असा आहे. आता शुल्कयजु:संहितेतील याच नाटकाचा तपशील देतो. संज्ञपित घोड्यापाशी सर्व राजपत्न्या आल्यानंतर एकमेकींना म्हणतात की, बाई गे! मला रत्यर्थ कोणीच की गे धरून नेत नाही. हा घोडादेखील माझ्याशी न निजता कांपील नगरातील त्या सुभद्गिटलीशी रममाण झाला आहे. इतके म्हणून सर्व राजपत्न्या घोड्याचे एणेप्रमाणे आव्हान करतात, तू स्त्रीगणांचा पती आहेस. तू प्रियकरांतला प्रियकर आहेस, तू सुखनिधी आहेस, तेव्हा हे माझ्या वसो! मी तुझ्यापाशी येऊन गर्भधारण करत्ये, तू मजपाशी येऊन गर्भ घाल, आपण दोघेजणे चारी पाय पसरून वर पांघरून घेऊन, या स्वर्गासारख्या सुखकर स्थली निजू, तू रेत:संपन्न आहेस, तू माझ्या ठायी रेत घाल. राजपत्न्यांनी घोड्याची ही अशी प्रार्थना केल्यावर पत्न्यांचा पती जो राजा तो स्वतः घोड्याला कानगोष्ट सांगतो की, या माझी पट्टराणीच्या मांड्या वर उचलून त्यांच्यावर तू आपल्या मांड्यांच्या पाठीमागील भाग ठेव आणि तिच्या योनीत आपले शिस्न ढकल, कारण शिस्नावर स्त्रियांचा सर्व जीव व भोग अवलंबून असतो. यजमान जो राजा त्याचे स्वत:चे हे भाषण झाल्यावर व यज्ञाचा मुख्य ऋत्विज जो अध्वर्यू तो राजपत्न्यांपैकी कुमारी म्हणून जी पत्नी तिच्या योनीकडे बोट करून म्हणतो, चांगले आहळ, म्हणून ही तुझी योनी वसवसती आहे. सबब लिंग तुझ्या भोकात हाणतो, म्हणजे तुझी योनी रेताने भरून जाऊन गलगल शब्द करील. अध्वर्यूच्या या वक्तृत्वाला उत्तर म्हणून कुमारी म्हणते, म्हणून हे तुझे लिंग हलते आहे. हे तुझे सच्छिद्र लिंग तुझ्या तोंडासारखे दिसते आहे. सबब, फार तोंड करू नकोस, अध्वर्यू व कुमारी यांचे हे संभाषण झाल्यावर ब्रह्मा नामक याजक राजमहिषीला म्हणतो, तुझी आईबापे झाडावर चढत आणि मग तुझा बाप तुझ्या आईला म्हणे की, तुझी योनी माखून टाकतो आणि नंतर तिच्या योनीत आपले लिंग ठाशी. यावर महिषी ब्रह्माला उलट म्हणते, तुझी आईबापें झाडावर चढूनच क्रीडा करीत, तेव्हा फार तोंड वासू नकोस. गप्प बैस. ब्रह्मा व महिषी यांच्यानंतर उद्गाता नामक ऋत्विज व वावाता नामक राजपत्नी यांची सोंगे यज्ञभूमीवर येतात. यज्ञभूमीवर एक जवान होता. त्याला उद्गाता सांगतो, या वावातेला, दगडावर टेकून जशी मोळी उचलतात तशी उचल म्हणजे हिची योनी वार्यात धान्य पाखडताना जशी सुपली पुढे येते, तशी पुढे येईल. यावर यज्ञभूमीवर एक स्त्री उभी होती. तिला वावाता म्हणाली, या उद्ग्यात्याला दगडावर टेकून जशी मोळी उचलतात तसा उचल म्हणजे त्याचे लिंग वार्यात धान्य पाखडताना सूप जसे वर उचलले जाते, तसे वर उचलेल. नंतर चौथा जोडा होताे नामक ऋत्विज व परिवृक्ता नामक राजपत्नी यांचा रंगभूमीवर येतो. होता म्हणतो, हिच्या आखूड योनीत ठोले लिंग जेव्हा हा मनुष्य ठासतो तेव्हा गायीच्या पावलांभर पाण्यातील जशी माशांची जोडी न बुडता बाहेर राहते, तशी याच्या अंडाची जोडी हिच्या योनीबाहेर लोंबकळत राहते. त्याला उत्तर म्हणून, परिवृक्ता म्हणत्ये, अहो तुम्ही शहाणे लिंगपूजक हो! तुम्ही जेव्हा योनीत गुळगुळीत लिंग सारता, तेव्हा खरेच तुम्हांला सांगत्ये की, तुमच्या मांड्यांखालून योनी लिकलिकते. पाचवी जोडी क्षत्ता व पालागली यांची. क्षत्ता पालागलीला म्हणतो, हरीण रानातले गवत टाकून शेतातले जव जेव्हा चोरून खाते, तेव्हा त्याला पोट भरलेसे वाटत नाही. क्षुद्रीण जेव्हा वैश्यांशी चोरून रत होते, तिचे समाधान होत नाही. पालागली क्षत्त्याला उत्तर करते, खरेच आहे, हरीण चोरून जव खाते तेव्हा त्याला पोट भरलेसे वाटत नाही, क्षुद्र पुरुष वैश्य स्त्रीशी जेव्हा रममाण होतो, तेव्हा त्याची तरी तृप्ती कोठे होते?
६) असे हे एकंदर नाटक व नक्कल आहे. ही नक्कल क्षुद्र व बीभत्स आहे हे अश्वमेध करणारे राजे व ऋत्विज जाणीत. दधिक्राव्णो अकारिषम् या मंत्रात आपण केले ते नाटक बीभत्स होते, असे ते स्पष्टच कबूल करतात. परंतु हा बीभत्सपणा पूर्वपरंपरेला अनुसरून करणे अवश्य असल्यामुळे यज्ञपुरुष आपले बरेच करील, वाईट करणार नाही, अशी त्यांची खात्री होती. बीभत्स भाषणे केल्याबद्दल यज्ञ याजकांचा काय फायदा करीत असेल ते असो. समाजशास्त्रज्ञांचा मात्र या बीभत्स नाटकापासून एक निश्चित फायदा होतो. त्यांना वैदिक ऋषींच्या रानटी पूर्वजांच्या चालीरीतींचे ज्ञान होते व ही बीभत्स भाषणे नमूक करून ठेविल्याबद्दल संहिताकारांचे ते ऋणी बनतात…
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
समग्र साहित्य
खंड सात व आठ
समाजकारण आणि राजकारण
प्रकाशक : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
प्रतिक्रिया
विचित्र आहे. अश्वमेध यज्ञ
विचित्र आहे. अश्वमेध यज्ञ म्हणून अश्वाचे इतके उदत्तीकरण की काय? बीभत्स आहेच पण त्याहुनही निरर्थक परंपरा वाटते आहे.
राजवाड्यांनी जे वर्णन केले
राजवाड्यांनी जे वर्णन केले आहे ते वर्णन नसून केवळ नाट्यश्लोकांचा अनुवाद आहे. ही परंपरा किंवा नाटकातील संवाद असे असले तरी प्रत्यक्षात राणीचा संभोग घोड्याशी केला जात नसे ते सारे प्रतिकात्मक असे.
दि.बा.मोकाशींनी आपल्या एका पुस्तकात (बहुदहा लोकसंस्कृतीमध्ये) प्रत्यक्षात हे कसे होत असे याचे तपशीलात वर्णन केले आहे. एका चकतीवर राणीस झोपवले जाई, प्रतिकात्मक घोड्यास (व त्याही पुर्वीच्या काळी खर्या घोड्यास) राणीच्या शेजारी कुशीवर जबरदस्ती निजवले जाई. त्यांच्यावर रेशमी वस्त्र पांघरले जाई व हे श्लोक/मंत्र म्हटले जात. घोडा व त्याचे रेत हे 'प्रकृती'चे प्रतिक आहे. अधिक तपशीलात वाचायचे असेल तर मोकाशीच वाचा. ते वाचताना अजिबात बीभत्स वाटत नाही.
पण, बघा बघा पुर्वीच्या ग्रंथातही असे होते बरं, इतकंच सांगण्यासाठी असं जबरदस्तीने संदर्भरहित उतारे वाचायला दिले तर बीभत्सच वाटणार.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पण, बघा बघा पुर्वीच्या
सहमत, बहुतेकदा सदाशिवपेठी आड्यन्सला दचकवायला म्हणूनच असे उतारे टाकले जातात. बाकी पार्श्वभूमी वगैरे सांगण्याची काळजी कोण घेतो?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विश्लेषण होणे आवश्यक आहे त्याची पहीली पायरी म्हणुन तोंडओळख ठीक
वरील प्रकारच्या प्राचीन सर्व परंपरांचे यज्ञांचे आधुनिक उपलब्ध साधनांनी अभ्यास पद्धतींनी शास्त्रीय अधिकाधिक अ-भावनिक विश्लेषण होणे अत्यावश्यक आहे. त्यामागची समाजाची जीवनशैली प्रेरणा समजायला हव्या. मात्र होत काय की जर अभ्यास स्वकल्पनांच्या विरोधी वास्तव दाखवत असेल तर त्याचा सामना करणे अवघड होऊन बसते. सर्वसाधारण जो परंपरावादी वर्ग म्हणुया जो असतो त्यांना हे वास्तव पचवण जड जात. हितसंबंध गुंतलेले असतील तर आणखी अवघड. आता वरील अश्वमेध प्रमाणे अनुबंध्या गायीचा बळी देणारा गोमेध गोसव यज्ञ होता, पुरुषाला बळी देण्याचा यज्ञा होता. त्यात पुरुष कसा निवडावा त्याची लक्षणे इ. सर्व येते. यज्ञात लाकडी सोट्याने कुत्रा मारणारा "शमिता" होता. आता प्रत्येकामागे काही कारण असेल योजना असेल. त्यासाठी आधुनिक साधने व शास्त्रांचा जसे अॅथ्रोपॉलॉजी, आर्कीऑलॉजी, भाषाशास्त्र इ. वरील आधुनिक संशोधनाचा आधार घेऊन मुळ प्रत ग्रंथ शोधुन निश्चीत करुन त्यातील घुसडलेले भाग काढुन, कंम्पॅरीटीव्ह अॅनालिसीस जगातील इतर अस्तित्वात असलेल्या आदिम परंपरा समाज धर्माचा करुन, जे सर्वांमधुन तावुन सलाखुन निघेल असे निष्कर्ष काढण्यावर व त्याची सुसुत्र मांडणी करण्यावर भर असावा. डि डि कोसंबींचा अभ्यास उदा. अशा शास्त्रीय रीतीने व्हावा. पारंपारेक असे करत नाही. उदा. जिथे प्रत्यक्ष प्रथा अडचणीची वाटेल तिला प्रतिकात्मक आहे हे ठरवुन मो़कळे होतील. (वरीलप्रमाणे सखोल व्यापक संशोधनाला टाळत सोप्या रीतीने) उदा. आर्यसमाजी साहीत्यात वरील अश्वमेधाच्या प्रत्यक्ष होत असलेल्या विधींना त्या कशा प्रतिकात्मकच होत्या इ.इ. शैलीत समजावण्याचा आग्रह दिसतो. आणि जिथे प्रतिकात्मक अडचणीचे आहे उदा. शुद्र-ब्राह्मणाने चामडे ओढण्याचा लुटुपुटीचा खेळ जो अनेक अर्थांनी प्रतिकात्मक आहे त्याचा उलगडा न करता अहो एक साधी कृती आहे ती बिनमहत्वाची म्हणुन उडवुन लावणार. पुरुषाचा बळी शक्यच नाही आमच्या संस्कृतीत मानवी आदिम समाजाचा इतिहास बघितला तर एका आदिम काळी जगाच्या प्रत्येक कोपरयात आदिम संस्कृतित नरभक्षण सर्रास व सर्वत्र आढळते. मग तो आपल्याच संस्कृतीत शक्य नाही असे वाटणे तो आपल्या आदिम संस्कुतीचा जी एका विकासाच्या मागच्या टप्प्यावर कोणेकाळी असु शकते तिचा तो अवशेष असु शकतो हे मान्य होण्यात अडचण नेणीवेवरील घट्ट प्रभावांची धार्मिक पगड्याचीच असते. शास्त्रीय सत्याचा मुकाबला करणे फार अवघड आहे. एक अजुन समाज बदलत असतो नियम बदलत असतात धर्मात तर प्रचंड उलथापालथ नियम कायद्यात होत असते. मात्र जणु परंपरा व हा आज आमच्या हातात आलेला धर्म जणु उत्र्कांत झालाच नाही बदललाच नाही हे मानण्याकडे पारंपारीकांचा कल असतो.
वरील यज्ञसंस्थेचे शास्त्रीय विश्लेषण करण्याचा एक चांगला प्रयत्न विश्वकोषात दिसतो. राजवाडेंच्या ग्रंथात, कोसंबीच्या, इ. च्या ग्रंथात परंपरेच्या अगदी मुळापर्यंत जाऊन ती शोधण्याची जिगर दिसते. मतभेद चुका नक्कीच शक्य आहेत यांच्याही काही मर्यादा असतीलच प्रश्न सत्य शोधण्यासाठी तुमची मेथड प्रोसीजर काय आहे व हेतु कीती प्रामाणिक आहे.
वरील तुकडा मर्यादीत असल्याने घातकच जास्त आहे मात्र त्याला इलाज नाही एखादा विषय विस्ताराने मांडायचा असेल तर पहीली पायरी तोंडओळख असण्याचे असते. इथे नुसत्या ओळखीवरुनच भावनांची वादळे घोंघावु लागतात यावरुन सत्य पचवणे कीती अवघड आहे याची कल्पना येते.
बाय द वे अश्वमेध गोमेध ला पुढील काळात "कलिवर्ज्य" ठरव्ण्यात आले. ते का कसे त्यामागील प्रेरणा बघितल्या पाहीजेत.
एक लेख लिहुन बघतो कलिवर्ज्य वर
वर ऋषिकेशनं या माहितीच्या
वर ऋषिकेशनं या माहितीच्या प्रतीकात्मतेचा उल्लेख केला आहे. ते अध्याहृतच आहे. हा एक विधी होता. कोणताही विधी हा कायम प्रतीकात्मकच असतो. त्यात आपल्या भूतकाळामधली एखादी महत्त्वाची स्मृती गोठवून ठेवलेली असते. एका विशिष्ट प्रकारचं, पिढ्यानपिढ्या टिकणारं, वाहत जाणारं दस्तावेजीकरण, या अर्थी त्या विधीचं महत्त्व असतं. (म्हणूनच लाजा-होम हा इंट्रेष्टिंग विधी, तसाच कन्यादान हाही.) आजच्या संदर्भात तो कितीही निषेधार्ह वा अर्थहीन असला, तरीही तो विधी म्हणजे एखादा जीवाश्म असल्यासारखा असतो. त्यातून बहुमोल माहिती मिळत असते. अशी बहुमोल माहिती हाही तुकडा देतो. लैंगिक संकोच संस्कृतीच्या किती पुढच्या टप्प्यावर अवतरले असतील, ते यातून प्रत्ययाला येतं. नीतीनीतीच्या समकालीन विधिनिषेधांजवळ राजवाडे जणू एक मोठ्ठी रेघ आखतात आणि त्यांच्यातलं क्षणभंगुरत्व, स्थलकालसापेक्षता, क्षुल्लकपणा - बिनबोलता दाखवून देतात. संभोगाला अनाठायी संकोचांतून मोकळं करतात.
म्हणून हा तुकडा अंकात असणं अपरिहार्य होतं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन