एका फूलवेलीचे मनोगत
अगदी परवा परवा जरी मला कोणी सांगीतले असते की माझ्या जीवनातील सर्वोच्च भाग्याचा क्षण लवकरच येणार आहे, तर माझा विश्वास तरी बसला असता का? परंतु आता विचार करतेवेळी वाटते खरच, दैवी भाग्योत्कर्ष कधी आणि कसा होईल याचे भाकीत कोण करू शकते बरे? माझ्या पूर्वजन्मीच्या सत्कर्माचे फलच म्हणायची ती घटना. मागे वळून पाहता त्या सावळ्या, तेजस्वी वनकन्येच्या लोभस मूर्तीवरुनच मला हे आकळायला हवे होते की ती तिच्या सुकुमार पावलांनी या वनात दैवी संकेत आणि अनंत पुण्यराशी घेऊन प्रवेशली आहे. मला तो क्षण अजूनही लख्ख आठवतो ज्या क्षणी वार्यावर डोलता डोलता अचानक माझी नजर तिच्यावर स्थिरावली. माझे भान हरपून गेले आणि मी त्या अद्वितिय लावण्य आणि कोमलतेचे आकंठ रसपान करत राहीले. माझी समाधीच लागली म्हणा ना.शुभ्र वल्कले ल्यालेली ती कोमल वनकन्या , मला जणू माझ्या अंगावर खेळणार्या शुभ्र कलिकेसमान भासली. नक्कीच ऋषीकन्या नाही कारण इतकी सुकुमार मानव कन्य असणे शक्यच नाही. मग कोण असावी ही सुंदर देवता? कोणी वनदेवता अथवा गंधर्व, यक्ष अथवा नागकन्या तर नव्हे? पण आतापर्यंत मी पाहीलेल्या सर्व रुपगर्वितांचे सौंदर्य तिच्या सात्विक तेजापुढे फिकुटले होते. थोडे भानावर येताच माझ्या लक्षात आले की तिचे पाय काट्याकुट्यांनी , दगडांनी सोलवटून निघाले होते. प्रखर सूर्यतेजाने काया रापलेली कळत होती. पण एवढ्या कष्टांपुढेदेखील तिच्या मुखावर म्लानता नव्हती तर आगळेच तेज आणि निर्धार तिच्या डोळ्यात चमकत होता.
काय बरे करीत होती ती? तिने पानांच्या द्रोणात, जवळच्या नदीच्या पात्रातून जल भरुन आणले. आणि दर्भासनावर आसनस्थ होऊन, एकचित्ताने तिने मृत्तिकेच्या सुघड शिवलिंगाची स्थापना केली. काय बरे करणार ही आता, मी विचार करतच होते की ती माझ्याच दिशेने चालत आली व माझ्या अंगावरची शुभ्र फुले खुडू लागली. माझ्या फुलांचा जाडसर हार बनवून तिने तो शिवलिंगास अर्पण केला आणि ती दर्भासनावर आसनस्थ, ध्यानमग्न झाली. हा तिचा अविरत दिनक्रम होता. ध्यान तर ती अनेकानेक तासन तास करत असे. तिला ना ऊनाची पर्वा होती, ना थंडीची ना पावसापाण्याची. पहीले काही महीने ती खाली पडलेली पाने खाऊन राहात होती पण जसजसा ध्यानकालावधी वाढू लागला तसतसे तिने पडलेली पाने खाणेही सोडून दिले. मला कुतूहल वाटत असे ती इतक्या कोवळ्या वयात का बरे हा खडतर दिनक्रम आचरते आहे?
असेच दिवस जात होते, ऋतूमागून ऋतू जात होते, मी या गोष्टीनेच खूष होते की माझी बाळफुले तिच्या कामी येत आहेत. ती कधीकधी तिचे गूज मला सांगत असे.
आणि तो दिवस उजाडला जेव्हा ती पहाटेपासूनच विशेष आनंदी दिसत होती. आज ती नेहमीपेक्षा लवकरच ऊठली होती माझ्याजवळ येऊन ती म्हणाली "सखे, लते आज न जाणो मन का हुरहुरते आहे. आज मी सूर्योदयापूर्वीच ध्यानस्थ होईन म्हणते." मी देखील वार्यावर डोलून तिला माझा होकार कळवला. दुपारी कोण जाणे कुठुनसा पण ध्यानमग्न असताना एक देखणा, तेजस्वी विप्र तेथे प्रकटला. काय आश्चर्य कधीही कोणत्याही व्यत्ययाने विचलित न होणार्या तिचा त्याच्या नजरेने ध्यानभंग झाला. विप्र रोखून पहातो आहे हे जाणवून क्रोधाने किंचीत आरक्त होत ती ऊभी राहीली. विप्र, त्याची रोखलेली नजर न ढळू देता तिस विचारता झाला , "हे वनकन्ये तू कोणत्या उद्देशाने इतके प्रखर तप आचरीत आहेस? तुझी काया रापली आहे, हातास पडलेले घट्टे दृषमान आहेत, तू अतिरिक्त कृष झाली आहेस. अशी काय गोष्ट आहे या त्रैलोक्यात जिच्या ध्यासाने तू स्वतःची ही अवस्था करुन घेतली आहेस?" विप्रास नमस्कार करत ती उत्तरली, "हे अतिथी, आपण विचारले म्हणून सांगते. त्रैलोक्याचे नाथ , देवाधिदेव महादेव माझे नाथ व्हावेत या एकमेव संकल्पाने मी हे तप आचरीत आहे आणि मी आहे त्या स्थितीत अतिशय समाधानी आहे. आपण व्यर्थ चिंता करु नये." तिच्या या संयमित पण किंचीत रोषपूर्ण भाषणावर , मिष्कील हसत तो विप्र विचारता झाला "त्या बैराग्याकरता तू हे तप आचरीत आहेस? तो जो स्मशानवासी आहे, भूत-पिशाच्च ज्याचे गण आहेत, हत्तीचे जाड कातडे पांघरून जो अंगाला भस्म फासतो तर कधी क्षणात कोपायमान होऊन तांडवनृत्य करतो त्या भणंग जोग्याला वरण्यासाठी तू हे कष्ट उपसत आहेस? तू मनात आणले तर तुला इंद्रच काय प्रत्यक्ष नारायणाची प्राप्ती होऊ शकते मग हे कोमलांगे हे काय भलतेच तू मनात भरून घेतले आहेस? तुझे चित्त तर थार्याव आहे?"
विप्राच्या शब्दाशब्दागणीक क्रोधाने आरक्त होत चाललेली ती वनकन्या थरथर कापू लागली. तीक्ष्ण, कोपायमान कटाक्ष विप्रावर टाकून ती उद्गारली, "सर्व जगाचे स्वामी शंकर यांची महती तुझ्यासारख्या कपाळकरंट्याला ती काय कळणार? ज्यांच्या निवासस्थानी सर्व सिद्धी फेरा धरून नाचतात, ज्यांच्या तपोबलाने प्रत्यक्ष इंद्राचे आसन डळमळीत होते. स्वतः विरागी असूनही भक्तांना ऐश्वर्य देण्यास जे समर्थ आहेत त्यांचे महत्त्व मी तुला काय पटवणार आणि तुझ्यासारख्या मूढाला ते काय कळणार? तुझ्यापुढे महादेवांची स्तुती करणे म्हनजे अरण्यरुदनच आहे तेव्हा तू येथून निघून जावे हे उत्तम. अन्यथा माझ्या तोंडून आत्ताच्या आत्ता शापवाणी ....."
वनकन्या हे शब्द उच्चारत असतानाच काय आश्चर्य! विप्र अदृष्य झाला आनि त्याजागी त्रिनेत्रधारी, कोटीसूर्य प्रकाशमान ज्यांचे तेज आहे ते शिवशंकर प्रत्यक्ष प्रकटले. सस्मित मुखाने, मिष्कीलपणे पहात त्यांनी वनकन्येला प्रतिप्रश्न केला "बोल ऊमा थांबलीस का? शापवाणी उच्चारणार होतीस ना?" अन पहाता पहाता क्रोधायमान वनकन्येच्या चेहर्यावरील भाव प्रथम अविश्वास, नंतर आनंद व अंती लज्जा यामध्ये परावर्तित झाले. सलज्जा , अधोमुखा तिचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन, तिच्या नेत्रांतून घळघळा अश्रू वाहू लागले, शरीरास सूक्ष्म कंप सुटला, गालांवर ऊषेची लालीमा पसरली.
मी त्याक्षणी धन्य धन्य झाले.
From |
श्रेय अव्हेर - चित्र जालावरुन साभार
प्रतिक्रिया
क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते|
असे स्मरते की ह्याच प्रसंगावर कुमारसंभवात कालिदास म्हणतो-
अद्यप्रभृत्यवनताङ्गि तवाऽस्मि दास:
क्रीतस्तपोभिरिति वादिनि चन्द्रमौलौ।
निह्नाय सा नियमजं क्लममुत्ससर्ज
क्लेश: फलेन हि पुनर्नवतां विधत्ते॥
'हे नम्र स्त्रिये,आजपासून मी तुझा तपश्च्ररणाने विकत घेतलेला दास आहे' असे चंद्रमौलीने म्हणताच यमनियमांमुळे निर्माण झालेला थकवा टाकून ती पुनः प्रफुल्लित झाली. कारण फलप्राप्ति झाल्यावर मनुष्य श्रम टाकून नवा होतो.
शेवटची ओळ सुभाषितासारखी अनेक ठिकाणी वाचनात येते.
शिवप्रियेचे आराधन आवडले.
सारिका
तुमचे लेखन आवडले. नितांत सुंदर व निर्मळ भाव तुमच्या लेखनात प्रकटले आहेत.
शिवप्रिया उमेचे हे आराधन आवडले. वातावरण निर्मितीही छान जमली आहे.
तुमचे लेखन वाचल्यानंतर मला शुभांगी भडभडे यांच्या 'शिवप्रिया' या कादंबरीची प्रकर्षाने आठवण आली. त्यातही अशीच सौंदर्यस्थळे दाखवून देणारी भाषा लेखिकेने वापरलेली आहे. 'शिवप्रिया' कादंबरीत शंकर-पार्वती यांच्यातील सुमधूर संबंधांच्या अनुषंगाने अशीच सुंदर वातावरणनिर्मिती बघायला मिळते. खास करुन त्यातील वसंतोत्सवाचा प्रसंग.
या विषयावर अजून लिहा अशी माझी आपल्याला विनंती आहे.
"बोल ऊमा थांबलीस का? शापवाणी उच्चारणार होतीस ना?" अन पहाता पहाता क्रोधायमान वनकन्येच्या चेहर्यावरील भाव प्रथम अविश्वास, नंतर आनंद व अंती लज्जा यामध्ये परावर्तित झाले. सलज्जा , अधोमुखा तिचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन, तिच्या नेत्रांतून घळघळा अश्रू वाहू लागले, शरीरास सूक्ष्म कंप सुटला, गालांवर ऊषेची लालीमा पसरली.
मी त्याक्षणी धन्य धन्य झाले.
पुढे काय?
पुलेशु...
अष्टसात्त्विकभाव
'सलज्जा, अधोमुखा तिचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन, तिच्या नेत्रांतून घळघळा अश्रू वाहू लागले, शरीरास सूक्ष्म कंप सुटला, गालांवर ऊषेची लालीमा पसरली.'
अष्टसात्त्विकभाव हा शब्द आपण अनेकदा वापरतो. काय आहेत हे अष्टसात्त्विकभाव?
स्तम्भ, प्रलय, रोमाञ्च, स्वेद, वैवर्ण्य,वेपथु, अश्रु, वैस्वर्य हे ते भाव होत. सोप्या भाषेत सांगायचे तर हालचाल थांबणे, मूर्च्छा येणे, अंगावर काटा येणे, घाम फुटणे, पांढराफटक पडणे, अंग कापणे, अश्रु येणे आणि आवाज जाणे हे ते आठ सात्त्विक भाव.
सात्विक
ही सगळी तंतरल्याची, गांगरल्याची, हल्लीच्या भाषेत "टरकल्याची" लक्षणे आहेत.
ह्यात "सात्विक"पण कुठाय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अर्जुनाची तंतरलीच होती...
मनोबांचेहि बरोबरच आहे. अर्जुनाची अशीच स्थिति झाली होती. पहा गीतेचा पहिला अध्यायः
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति॥
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते।
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते॥
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन:
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव॥
अर्थ
ह्याचा अर्थ नीटसा समजला नाही. पण " माझे मन भ्रमित आहे, घसा/तोंड कोरडे पडले आहे" अशा अर्थाचे काहीतरी असावे.
"सात्त्विक " ह्याचा अर्थ आजच्या मराठीत "सोज्वळ" किंवा "सौम्य" किंवा "मंद/आल्हाददायक"(पण "पवित्र आल्हाददायक" ह्याच्या जवळ जाणारा) असा घेतात.
संस्कृतात त्याचा अर्थानं होता का हा शब्द अशी शंका आली.
शिक्षा, शासन हे शब्द हिंदीत आणि मराठीत पार वेगळ्या अर्थानं आहेत.
तिक्त आणि कटु हे शब्द संस्कृतात आहेत, मराठीतही आहेत.
पण मराठीत त्यांचीही अदलाबदल झालेली म्हणे.( "कडू" हे "कटु" चेच रुप मानले तर.)
तर शंका हीच की सात्विक हा शब्द सोज्वऴ ह्याच अर्थाने वापरत का तेव्हासुद्धा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मनाची स्थिति
माझाहि ह्याचा तितकासा अभ्यास नाही पण असे म्हणेन की भाव मनाच्या कोठल्याहि अवस्थेत असू शकतात. उदा. अश्रु रागानेहि येतील वा स्वेद (घाम) आणि वेपथु (अंग कापणे) भीतीतून उत्पन्न होऊ शकतील. मनाच्या स्थितीवरून त्यांना सात्त्विक म्हणायचे का राजस/तामस ते ठरेल.
भाव तीन प्रकारचे असू शकतात, जसे-
ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये|
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि|| (गीता ७.१२)
(सात्त्विक, राजस आणि तामस भाव माझ्यातून उत्पन्न होतात हे जाण. ते माझ्यामध्ये आहेत, मी त्यांच्यामध्ये नाही.)
वरती पार्वतीचे अष्ट भाव सात्त्विक आहेत असे दिसते पण अर्जुनाचे तेच भाव, वरकरणी सारखेच वाटले तरी, तामस आहेत.
सात्विकतेनं हे सगळं व्हावं
सात्विकतेनं हे सगळं व्हावं अशी ओरिजनल सात्विकता उरली नसेल अलिकडे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कोल्हटकर सर, फार सुंदर
कोल्हटकर सर, फार सुंदर प्रतिसाद आहेत आपले. नेहमीप्रमाणेच माहीतीपूर्ण आहेते. धन्यवाद आपल्याला.
सागर, आपले खूप खूप आभार. आपण मनकवडे आहात काय? लहानपणी वाचलेली "शिवप्रिया" ही कादंबरी माझ्या मनावर अजूनही भुरळ घालून आहे. खरोखर रम्य कादंबरी.
मन यांचा विनोदी प्रतिसाद खूप आवडला
खरोखर रम्य कादंबरी
आपण मनकवडे आहात काय? लहानपणी वाचलेली "शिवप्रिया" ही कादंबरी माझ्या मनावर अजूनही भुरळ घालून आहे. खरोखर रम्य कादंबरी.
सहमत आहे सारिका, खरोखर रम्य कादंबरी
तुमच्या लेखणीने मला त्या कादंबरीची प्रकर्षाने आठवण करुन दिली. शिवप्रिया - शुभांगी भडभडे ही कादंबरी खरेच सुंदर आहे. जिज्ञासूंनी ती अवश्य वाचावी.
शुभांगी भडभडे यांच्याबद्दल थोडी माहिती ३ दिवसांपूर्वीच्या सकाळ मधे आली होती. ही पहा
माझाच आहे पण तरीही वर काढते
माझाच आहे पण तरीही वर काढते आहे. अन हे चित्रही देते आहे. जे की वरती डिलीट झाले आहे.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
चित्र छान आहे. पण शिवलिंगाची
चित्र छान आहे. पण शिवलिंगाची पूजा करणारी पार्वती पाहून असा विचार आला की लिंगाचे नुसते कौतुकच नाही तर अगदी पूजाच करणारी स्त्री कोणत्या पुरुषाला आवडणार नाही?
ह्म्म. ते लिहीताना मलाही
ह्म्म. ते लिहीताना मलाही विचित्र वाटलं होतं पण मूर्ती लिहीवेना.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
तुंबाडचे खोत आठवलं.
तुंबाडचे खोत आठवलं.
खूप छान आहे शिव पार्वतीच
खूप छान आहे
शिव पार्वतीच चित्र फारच सुंदर आहे.
हरतालिका
हरतालिके निमित्त माझा हा लेख वर काढत आहे.
कथा आवडली.
कथा आवडली.
खरे तर पार्वती ही शक्ती
खरे तर पार्वती ही शक्ती रुपात पुजिली जाते आणि भक्ती, लीनता, समर्पण हे तिचे गुण असले तरी तिचे अन्य गुणही वाखाणण्यासारखेच आहेत जसे मनाचा निर्धार, अप्राप्य अशी गोष्ट प्राप्त करण्याची जबरी इच्छा व त्याकरता पडणारे परिश्रम घेण्याची तयारी. पण अन्य गुणांबद्दल पुन्हा कधीतरी. सध्या तरी समर्पणविषयक कविता सुचली आहे.
खुपच छान कविता आहे. आवड
खुपच छान कविता आहे. आवडलीये.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
कोणीतरी (बहुतेक बॅटमॅन यांनी)
कोणीतरी (बहुतेक बॅटमॅन यांनी) ही कविता मागे ऐसीवर टाकलेली होती. अतिशय मस्त आहे. ती तेव्हाच मी उतरवुन अघेतली होती. इथे देत आहे.
प्रभाकर.
हा कवि शके १६९१ मध्ये जन्मला व १७६५ त वारला. याच्या वडिलांचे नाव जनार्दनपंत असून आडनाव दातार होते. हा हर्णई-मुरुडचा रहाणारा. याने लावण्या, पवाडे वगैरे रचिले आहेत.
लावणी; लक्ष्मी-पार्वती-संवाद (हा विनोद पर आहे)
लक्षुमी गर्वे निंदा बोलुनी झिडकारिती पार्वती||
अहे ठाउक पुरुष्जार्थ तुझा तुज प्रीय असो पशु-पती||०||
स्मशान-वासी भुषण-भयंकर पिंगट मुकुटीं जटा||
भाळ-चंद्र ज्या तीन नेत्र भस्माचा कपाळीं पटा||
व्याघ्रांबर गज-चर्मांबर परि-धान शुद्ध कानफटा||
रुंड-माळा ती कंठी कुंडले भुजंग रुळती कटा||
त्रि-शूळ पाणि त्रि-पुंड्र भाळि लोह-कंकण मनगटा||
नंदी-वहन सर्पाचा सदोदित करि कमरे लंगुटा||
कसा आवडतो शं-कर गीरि-जे सांग तुला मजप्रती||
लक्ष जन्मीचे पातक म्हणवुनि पडलिस ऐशा हती||१||
भोळा माझा सांब ल्क्षुमी उगाच निंदूं नका||
अनाद्यंत ज्या अ-गम्य सुख ते अ-लभ्य ब्रह्मादिका||
सोळा सहस्र शत एक मुख्य तुम्हि आठ जणी नायिका||
कार्य-वादु तो कृष्ण कसा करि पूर्ण मनो-रथ सखा||
वक्रदंत शिशुपाळ कंसही कपटें मर्दुनि बका||
प्र-ताप बहु वर्णिता कशा भाळल्यात गो-रक्षका||
जरासंध-रिपु-भये वसवलीजळात द्वारावती||
तस्करास कसा श्वशूर जडला हा भीमक भू-पती||
मत्स्य कूर्म हा सूकर झाला सिंह वामन श्री-पती||
जन्म गेला पहा अशाखालि म्हणे लक्ष्मीला पार्वती||२||
भूप पिशाचे यक्ष ब्रह्म-राक्षस हे ज्याचे दुत||
श्वान सभोते मिळवुनि संगें फिरे भीक मागत||
भुंभुं वाजवी शंख मुखाने चिता-भस्म लावि नित||
शूर्प-कर्ण षण्मुख जयाचे नवल-परीचे सुत||
मना गने तिथे निद्रा करितो जिवंत पहाता भुत||
हिमालयाचे थोर असे असे प्रारब्ध पाहुन वि-स्मित||
धन्य तुझी पार्वती अशाची राखितसे चित-वृती||
दैव-दशा भर्तार तामसी कठीण ते तव गती||
लक्षुमि गर्वे निंदा बोलुनि झिडकारिती पार्वती||
अहे ठाउक पुरुषार्थ तुझा तुज प्रीय असो पशु-पती||३||
अनंत घेतो जन्म तुझा पति क्षीर-समद्रामधी||
शेषावर निद्रिस्त नाभिवर चार मुखांचा विधी||
वहन विहंगम दिले सु-दर्शन कळुन शंकरे अधीं||
सुरासुरी तुजसाठी मथिला पराक्रमे जल-निधी||
इच्चा करिती प्राणीमात्र तूं चंचळ नाहिंस सु-धी१||
शंख सहोदर२ तुझा लक्षुमी श्रीमंत झालीस कधीं||
कृपा-निधी हा सांब वसे अर्धांगि मी त्याची सती||
लिला तयाची वि-चित्र भासे विदीत सर्वांप्रती||
मत्स्य कूर्म हा सूकर झाला सिंह वामन श्री-पती||
जन्म गेला पहा अशाखालि म्हणे लक्ष्मीला पार्वती||४||
तप-सामर्थ्ये करुनि शिवाल अभस्मासुरें जिंकिले||
धरुनि तुला पार्वती त्वरेने स्कंधावर वाहिलें||
लपू लागला सांब तेव्हा मम पतीस पाचारिले||
मोहिनी-रुप प्रत्यक्ष धरुनी त्या राक्षसास मारिले||
गजेंद्र करिता धावा नक्रासह त्या उद्धरिले||
सुधन्व्यास तैलामधि तळता तैल थंड३ जाहले||
अशी घालितो उडी संकटी बघ माझा श्रीपती||
कोमलांग राजीव-नेत्र नव्हे शिवासारखा जती||
लक्षुमि गर्वे निंदा बोलुनि झिडकारिती पार्वती||
अहे ठाउक पुरुषार्थ तुझा तुज प्रीय असो पशु-पती||५||
नको सांगू बडिवार रिकामा लक्षुमि नाना-परी||
नंदाची गो-धने चारिली कुंजवनाभीतरी||
गवळ्याचे उच्चिष्ठ भक्षिलें नव्हे निर्मळ श्री-हरी||
श्याम-वर्ण सर्वांग, खोंवितो मयूर-पिच्छें शिरीं||
नवनित-चोरे कसे मर्दन केलें दैत्याचे तरी||
लग्न लाविले बसुन रिसा४शीं, कुब्जा होती दुती||
किती एकक गुण सांगूं ऐकतां दु:खित होशिल चितीं||
मत्स्य कूर्म हा सूकर झाला सिंह वामन श्री-पती||
जन्म गेला पहा अशाखालि म्हणे लक्ष्मीला पार्वती||६||
अनंत कोटि ब्रह्मांड निर्मिता जगांत जग-वेगळा||
चार वेद सा शास्त्रे धुंडिता कुंतठीत झाल्या कळा||
निराकार निर्गुण स-गुण मी पाहुनि पडले गळां||
जन्मोजन्मी हा असो पती मज घन-श्याम सावळा||
परम सु-शील निष्कलंक वनिं उद्धरलि अहल्या शिळा||
नाम-स्मरणे शीतळ झाला सांब-देह सागळा||
मुगुट-मणी वैकुंठ पीठ ज्या अ-मर सदा वंदिती||
प्राप्त व्हावे हे चरण म्हणुनि किती समाधि-स्थ बैसती||
लक्षुमि गर्वे निंदा बोलुनि झिडकारिती पार्वती||
अहे ठाउक पुरुषार्थ तुझा तुज प्रीय असो पशु-पती||७||
ताड-पत्र श्रूंगार म्हनुनि छलीले जरी-शंकरा||
प्रसन्न झाला महेश समजावी घेउनि करा||
शृंगाराचे पर्वत पदले अ-मोल एकक हिरा||
कुबेराची संपदा तुळेना अहा रे विश्वेश्वरा||
एक-रुप शिव विष्णू लक्ष्मी गौरी एक स्मरा||
लय लावुनि एकाग्र भजावें मृत्यं-जय-श्री-धरा||
लक्ष्मी-पार्वतीचा सं-वाद ऐसा गोड हा खरा||
भक्तिपुरस्सर जपुनि करावे प्रसन्न नित हरि-हरा||८||
१ सरळ स्वभावाची
२. देवांनी समुद्राचे मंथन करुन १४ रत्ने काढीली. त्यापैकी 'लक्ष्मी' व 'शंख' ही आहेत. म्हणुन शंखाला तिचा सहोदर म्हणजे सख्खा भाऊ म्हटले आहे. (चौदा रत्ने - लक्ष्मी, कौस्तुभ,पारिजातक,सुरा,धन्वंतरी,चंद्रमा,कामधेनु,ऐरावत,अप्सरा,सप्तमुखी अश्व,विष,हरिधनु,शंख आणि अमृत)
३.धर्माने अश्वमेधानिमित्त सोडलेला वारु हंसध्वज राजा (सुधन्व्याचा बाप) ह्याने धरिला, व त्याच्या संरक्षणार्थ आलेल्या पांडव सैन्याशी लढावयाकरितां आपल्या सर्व लोकांस (कोणी आड्न्याभंग केल्यास कढत तेलात त्यास तळूं असे भय घालून,) ताकीद दिली. तथापि त्याचा मुलगा सुधन्वा हा लढावयास आला नाही ह्यामुळे राजाने त्यासतापलेल्या तेलात टाकिले, तेव्हा तो मुलगा परम कृष्णभक्त होता, म्हणुन ते तेल थंड झाले अशी कथा आहे.
४.जाम्बवान नावाच्या अस्वलाची जांबवंती कन्या कृष्णाने वरिली; त्या गोष्टीस अनुलक्षुन लिहीले आहे.