मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय
खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.
पूर्वी हे नव्हते. एखाद्याने प्राचीन काळी एखाद्या विषयावर जे लिहीले होते तेच त्याचे/तिचे सार्वकालिक मत आहे असे गृहीत धरून चालत असे. त्यामुळे त्याच्या/तिच्या इतर विषयांवरच्या इतर मुद्द्यांना प्रतिक्रिया म्हणून ते पूर्वग्रह पुढे आणता येत असत. पण आता असे करणे अवघड होऊ लागले आहे. तर अशा मुद्देवंचितांकरिता येथे काही उपाय सांगितलेले आहेत. हे संक्षिप्त आहे. पूर्ण मुद्दे माझ्या आगामी पुस्तकात मिळतील. तुम्हाला अजून माहीत असतील. ते ही लिहा (म्हणजे ते मी माझेच मुद्दे म्हणून त्या पुस्तकात घालेन. त्यारून वाद निर्माण झालाच तर खालच्या एखाद्या उपायाचा वापर होईलच).
तर अशा सिच्युएशन मधे जर कधी अडकला असाल - की समोरच्याला जोरदार विरोध तर करायचा आहे, प्रत्यक्ष बोलताना जसे केवळ जोरात ओरडण्याने आपण बरोबर आहोत असा समज निर्माण करता येतो तसे काहीतरी लेखी करायचे आहे, पण त्याकरता योग्य मुद्दा सापडत नाहीये, किंवा आपण एकदा व्यक्त केलेला मुद्दा हेच एक सार्वत्रिक सत्य आहे, त्यापेक्षा वेगळे काही असूच शकत नाही असे तुम्हाला (कायमच) वाटते, त्यामुळे अजून काय लिहीणार असा प्रश्न पडतो - तर अशा वेळी केवळ मुद्दा योग्य वाटतो म्हणून दुसर्याचे म्हणणे मान्य करण्याची किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याची नामुष्की येण्याची गरज नाही. खालीलपैकी कोणतेही उपाय वापरा. आपली फुल परवानगी आहे.
१. स्ट्रॉमॅन आर्ग्युमेण्ट
हा सर्वात लोकप्रिय व जास्त वापरला जाणारा उपाय आहे. म्हणजे कोणी "खेड्यांत ग्रामीण निसर्गसौंदर्य टिकवले पाहिजे" असे म्हंटले की आपण त्यावर "म्हणजे खेड्यातील लोकांनी असेच राहावे?" असे विचारावे, किंवा त्याहीपुढे जाउन "म्हणजे खेड्यातील लोकांनी कायम उपाशीच मरावे काय?" असा गुगली टाकावा. आणि मग त्यानंतर तुमचा गुगली हाच मूळच्या व्यक्तीने लिहीलेला मुद्दा आहे असे धरून वाद घालावा. म्हणजे "खेड्यातील लोकांनी उपाशी मरावे" हे किती निरर्थक मत आहे यावर बरेच काही लिहावे. तुमचा प्रश्न निरर्थक असल्याने तुम्हाला तो सहज खोडता येतो. त्यामुळे मूळचा मुद्दा आपण खोडून काढला अशा थाटात वागावे. पाहिजे तर इतर एक दोन ठिकाणी जाउन ते जाहीर करावे.
- त्यावर मग तो पोस्टकर्ता मवाळ पक्षातील असेल तर "मला असे म्हणायचे नव्हते" वगैरे पडता पवित्रा घेतो. आता ऑलरेडी आपल्यावर फोकस आला आहे. एक हेतू सफल. त्यानंतर तुमच्यात व त्याच्यात पुरानी दुश्मनी किती आहे त्याप्रमाणे पुढचे पवित्रे ठरतील. 'अपना आदमी' असेल तर मग "कल्पना आहे, पण त्यातून असा अर्थ निघू नये..." वगैरेच्या दिशेने जावे. नाहीतर "प्रत्यक्ष लिहीले नसले तरी तुम्हाला तेच म्हणायचे आहे" अशा आक्रमक दिशेने.
- याउलट तो जहाल पक्षातील असेल तर डायरेक्ट तुमच्या बुद्धीवर शंका घेतो, मग तुम्ही त्याच्या बुद्धीवर किंवा आणखी कशाकशावर घ्यावी आणि मांजा काटलेल्या पतंगाप्रमाणे वाद जाईल तिकडे जाऊ द्यावा.
अशा वेळेस काही चतुर लोक किंवा कंपूवाले पोस्टकर्त्याला +१, अनुमोदन वगैरे द्यायला पुढे होतात, किंवा मूळ विषयावर काहीतरी मुद्दा लिहीतात (रिकामटेकडे कुठले!). वाद योग्य दिशेने जाण्याची भीती निर्माण होते. अशा वेळेस त्या लोकांच्या पोस्टमधला एखादा धागा पकडून तेथून हे पुन्हा चालू करावे. एखादा तरी बकरा मिळतोच.
येथे लक्षात घ्या की दोन्ही केस मधे वाद भरकटवण्याचे व तेथे स्वत:वर अटेन्शन ठेवण्याचे उद्दिष्ट सफल होते.
२. "हेच लोक" थिअरी
आपला समाजशास्त्रीय अभ्यास एवढा अचूक आहे की विविध मते असलेले लोक आपण मॉनिटर करत असतो, कोणत्या प्रसंगात कोणता गट कसा वागतो, त्या गटांत नक्की लोक कोणकोण आहेत याचे शास्त्रीय ज्ञान आपल्याकडे आहे व आपण ते वेळोवेळी नोंद करून ठेवत असतो, असा आभास निर्माण करणे. किंवा काही आयडींच्या गटाचा आपण गेली कित्येक वर्षे गट म्हणून अभ्यास व पाठपुरावा करत आहोत, व मधल्या काळात ते आयडी एक गट म्हणून तसेच राहिलेले आहेत अशा थाटात बोलणे.
उदा: "आत्ता 'अ' पक्षाच्या हिंसक आंदोलनाला विरोध करणारे हेच लोक त्यावेळी जेव्हा 'ब' पक्षाने हिंसक आंदोलन उभे केले तेव्हा त्याला सपोर्ट करत होते", किंवा "रेल्वेच्या भाववाढीला विरोध करतात. पण हेच लोक ३०० चा पिझा ३३० चा झाला तर अजिबात तक्रार करत नाहीत". यात एका बाबतीत विरोध करणारे व दुसर्या बाबतीत न करणारे - या "दोन्ही" गटांत तेच लोक होते हे आपल्याला अभ्यासावरून पक्के माहीत असल्याच्या थाटात बोलावे.
कवितांमधे जसे "धुंद धुंद आसमंत" वगैरे लिहीले तरी ४-५ लोक वा वा करायला सहज सापडतात. तसे अशा ढोबळ वाक्यांशी ताबडतोब सहमत होणारे ४-५ लगेच मिळतात. मिळाले नाहीतरी "अचानक सहज उभे करता येतात". त्यामुळे काहीतरी अॅनेलिटिकल मत लिहील्याचा आभास बरेच दिवस टिकतो.
३. पुडी सोडून देणे
राजकारणात एखादी जरा बर्यापैकी लोकप्रिय व्यक्ती असेल, नवखी असल्याने फारशी स्कॅण्डल्स त्यांच्या नावावर नसतील व त्यामुळे त्यांच्याबद्दल जरा काही लोक चांगले लिहीत असतील, तर काही दिवस सर्वांचे तसे चांगले मत होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्याला तर कोणाबद्दल कोणी चांगले बोलणे मान्य नसल्याने वैताग येतो. काळजी नसावी. यावरही उपाय आहे.
"XXX काय? ठीक आहे ठीक आहे. एवढे कौतुक करताय, दापोली प्रकरण तुम्हाला माहीत नसेलच, किंवा तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष केलेले दिसते".
असे काहीतरी सोडून द्यावे. अर्ध्या लोकांना उगाचच मग हे जे कोणी XXX आहेत त्यांचे काहीतरी दापोली प्रकरण आहे असे वाटते. आपला उद्देश साध्य. इतर कोणी मग 'दापोली' प्रकरण काय विचारले तर तेथून गायब व्हावे, किंवा पूर्ण दुर्लक्ष करून विषय भलतीकडे न्यावा.
४. "आत्ता वेळ नाही, नाहीतर तुम्हाला गप्प केले असते"
चालू चर्चेच्या विषयातील (किंबहुना कोणत्याही विषयातील) सर्व उपलब्ध ज्ञान आपल्याकडे आहे, त्यामानाने इतर अगदीच कालची पोरे आहेत. पण केवळ व्यापातून वेळ नसल्याने ते आपण सध्या लिहू शकत नाही. असे सांगावे, पण यासाठी टोन महत्त्वाचा आहे. नुसत्या टोन वरून लोकांना हे खरेच आहे असे वाटायला हवे. अशा वेळी "थांबा जरा वेळाने तुमचा याविषयावर क्लास घेतो", किंवा "मी त्याबद्दल लिहीले तर तुमची बोलती बंद होईल" असे म्हणावे, किंवा आपण इतरत्र कोठेतरी तुम्हाला पूर्ण गप्प केले होते असे ठोकून द्यावे. वाचणार्यांपैकी अर्ध्यांचा तरी तुम्ही या विषयातील तज्ञ आहात असा समज होईल.
- अशा वेळी ती दुसरी व्यक्ती पेचात पडते. सज्जन माणूस असेल तर "मला ती चर्चा लक्षात नाही. जरा लिन्क देऊ शकाल काय?" वगैरे सावध व नम्र पवित्रा घेते. त्यावर "बरोबर आहे, ते लक्षात नसेलच..." वगैरे अजून आक्रमक व्हावे किंवा सरळ गायब व्हावे. एक दोन दिवस त्या व्यक्तीला "हा आयडी काहीतरी भारी लिहून आपल्याला निरूत्तर करणार आहे" असे वाटत राह्ते.
- मात्र दुसरी व्यक्तीही पेटली असेल तर येथून सहसा व्यक्तिगत डिवचाडिवचीवर येते. आपल्याला काय फरक पडतो. नाहीतर फॉर अ चेंज संपादकांकडे तक्रार करावी. पाहिजे तर तेथेही खवचट टोन तसाच ठेवावा. "यावर कारवाई करणार नसालच, पण ऑन द रेकॉर्ड राहावे म्ह्णून लिहीतोय" वगैरे.
- नाहीतर अत्यंत वाईट शब्दांत, अंसंसदीय भाषेत समोरच्याला हिणवावे. यथावकाश ती पोस्ट उडवली जाईल. मग त्या विषयांवर आपली मते त्या साईटच्या मतांच्या विरोधी असल्याने आपल्या पोस्ट्स उडवल्या जातात असा कांगावा करावा. एकूणच आपल्या उडवलेल्या पोस्ट्स या त्यातील भाषेमुळे नसून त्यातील मतांमुळे उडवल्या जातात असा कांगावा कोठेही करायला सोयीचा आहे.
५. "तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म"
एखाद्याने व्यक्त केलेले विरोधी किंवा किमान चिकित्सक मत जर आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल, पक्षा बद्दल असेल (किंवा नसेलही, पण तुम्हाला भांडणाची खुमखुमी असेल) तर येथे हे उपयोगी पडते. अशा वेळेस लगेच तशी इतर उदाहरणे घेऊन "त्यावेळेस तुम्हाला असे मत द्यावेसे वाटले नाही का?" हे विचारावे. त्या व्यक्तीला ती घटना माहीत असेल्/नसेल, त्या वेळेस ती व्यक्ती सोशल नेटवर्क वर असेल/नसेल, त्याने काही फरक पडत नाही. किंबहुना त्या व्यक्तीने तसे मत तेव्हाही व्यक्त केले असेल, तरीही काही फरक पडत नाही. फार थोडे लोक स्वतःच्या लिंका ("पिंक लिंक") सेव्ह करून लागेल तेव्हा लगेच वापरू शकतात. तेव्हा चपखल जबाब मिळण्याची शक्यता एकदम कमी आहे. चिंता नसावी.
विरोधी/चिकित्सक मते व्यक्त करणार्यांनी एखादे क्षेत्र कायम "मॉनिटर" करत राहून अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीने त्यातील घटनांवर पक्ष वा व्यक्तिविरहीत मते व्यक्त करावीत असा आपला आग्रह आहे असा आभास निर्माण करावा.
मात्र आपण आपल्या नावडत्या गोष्टींवर तशीच मते देताना त्याचा स्वतःला विसर पडू द्यावा. लोकांना आयडी व त्यांची इतरत्र लिहीलेली मते यांचा ताळमेळ लावण्याएवढा इंटरेस्ट नसतो (ज्यांना इंटरेस्ट वा वेळ असतो त्यांच्याशी ऑलरेडी तुमचे भांडण चालू असतेच), त्यामुळे कोणाच्याही लक्षात येत नाही. बिन्धास्त लिहावे.
असो. तर सध्या हे पाच उपाय सुचवले आहेत. अजूनही आहेत. पण ते वापरले गेलेले दिसले तर या यादीत अॅड होतील याची खात्री बाळगा.
, मस्त...तसेच
:), मस्त...तसेच चकली/जिलबी(गोल-गोल बोलणे) आर्ग्युमेंट किंवा शब्दखेळ हे दोन प्रकार पश्चिम महाराष्ट्रात विशेष वापरले जातात. त्याचप्रमाणे काही मुद्दे इतर संस्थळांवर इतरांनी मांडलेले असतात ते उकरुन काढुन त्यावर वर्ख चढवून पेश करणे, अगदीच बोलणे खुंटले की विद्याचे हत्यार बाहेर काढणे हे प्रकारही प्रचलित आहेत.
लेख मस्तच यात वाद नाही. मात्र
लेख मस्तच यात वाद नाही.
मात्र वरील प्रतिसादातल्या काही शब्दप्रयोगांच्या अर्थच्छटेविषयी अंमळ असहमती व्यक्त करू इच्छितो. जिलबी म्ह. गोलगोल बोलणे असे नसून जणू घाण्यात जिलब्या पाडल्यागत भसाभस प्रतिसाद अथवा लेख (शक्यतो त्याच त्या विषयाबद्दलचे) टाकणे असा अर्थ किमान मिपावर प्रचलित आहे. ऑफलैन आयुष्यातही जिल्बी म्ह. तुम्ही म्हणता तो अर्थ कधी ऐकण्यात आला नाही.
बाकी पश्चिम म्हाराष्ट्रातही पुणे अथवा अन्य शहरांत हे विशेषेकरून वापरल्या जाते असे निरीक्षण आहे.
(प-द-म्हाराष्ट्रीय) बट्टमण्ण.
मान्य
मात्र वरील प्रतिसादातल्या काही शब्दप्रयोगांच्या अर्थच्छटेविषयी अंमळ असहमती व्यक्त करू इच्छितो. जिलबी म्ह. गोलगोल बोलणे असे नसून जणू घाण्यात जिलब्या पाडल्यागत भसाभस प्रतिसाद अथवा लेख (शक्यतो त्याच त्या विषयाबद्दलचे) टाकणे असा अर्थ किमान मिपावर प्रचलित आहे.
आता ऐसीवर असा अर्थ प्रचलित आहे(करुयात) असं म्हणुयात. ;)
कहर आहे!!!
हाहाहा
'अपना आदमी' असेल तर मग "कल्पना आहे, पण त्यातून असा अर्थ निघू नये..." वगैरेच्या दिशेने जावे. नाहीतर "प्रत्यक्ष लिहीले नसले तरी तुम्हाला तेच म्हणायचे आहे" अशा आक्रमक दिशेने.
=))
उदा: "आत्ता 'अ' पक्षाच्या हिंसक आंदोलनाला विरोध करणारे हेच लोक त्यावेळी जेव्हा 'ब' पक्षाने हिंसक आंदोलन उभे केले तेव्हा त्याला सपोर्ट करत होते", किंवा "रेल्वेच्या भाववाढीला विरोध करतात. पण हेच लोक ३०० चा पिझा ३३० चा झाला तर अजिबात तक्रार करत नाहीत". यात एका बाबतीत विरोध करणारे व दुसर्या बाबतीत न करणारे - या "दोन्ही" गटांत तेच लोक होते हे आपल्याला अभ्यासावरून पक्के माहीत असल्याच्या थाटात बोलावे.
हाण्ण तेजायला =))
निरुपयुक्त व निरर्थक धागा
वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.
व
तर अशा सिच्युएशन मधे जर कधी अडकला असाल - की समोरच्याला जोरदार विरोध तर करायचा आहे, प्रत्यक्ष बोलताना जसे केवळ जोरात ओरडण्याने आपण बरोबर आहोत असा समज निर्माण करता येतो तसे काहीतरी लेखी करायचे आहे, पण त्याकरता योग्य मुद्दा सापडत नाहीये, किंवा आपण एकदा व्यक्त केलेला मुद्दा हेच एक सार्वत्रिक सत्य आहे, त्यापेक्षा वेगळे काही असूच शकत नाही असे तुम्हाला (कायमच) वाटते, त्यामुळे अजून काय लिहीणार असा प्रश्न पडतो - तर अशा वेळी केवळ मुद्दा योग्य वाटतो म्हणून दुसर्याचे म्हणणे मान्य करण्याची किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याची नामुष्की येण्याची गरज नाही
असे म्हणत धागाकर्त्याने काय साधले आहे? या विधानांत आणि यांतील वर उपाय म्हणून दिलेल्या सुचनांत एक सत्कॄतदर्शनी विनोद दिसत असला तरी एक सूचक गंभीर उपदेशक भाव जाणवतो. त्याची इथे मांडणी करणे या निमित्ताने इष्ट वाटते.
१. मूळात धागाकर्ता लिखाणाला वाद म्हणतोय हेच चूक आहे. का हो महाशय, लोक लिहितात ते 'वाद' असते का? आपले 'वादनेत्र' वादकर्ण' आहेत? जनलेखन हे जनभांडण असत नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. संस्थळावर लोक आपली अभिव्यक्ति करतात. '९९% संस्थळे ही फडे* असतात' असे जे धागाकर्त्याने म्हटले आहे ते एक सरसकट विधान तर आहेच शिवाय ते जालतंत्रज्ञान जनसामान्यांसाठी नसावेच असे (अ)प्रत्यक्षरित्या सुचित करते.
* कुस्तीची
२. जालांवरील वादांबाबत त्रागा, उद्वेग, आणि या धाग्याप्रमाणे उपहास करणारे लोक नीट पाहिले तर आढळून येते कि हेच लोक दुसर्या ठिकाणी काही वाद नि काहीवेळा चक्क काही भांडणे केवळ जालाच्याच नव्हे तर एकूणच समाजाच्या स्वास्थ्यासाठी कशी उपयुक्त आहेत असे मत मांडत असतात. कधीकधी त्यात हिरीरीने भाग घेतात. अशा दुटप्पी फारेंडी लोकांचा निषेध तरी कसा करावा? आपले वर्तन परस्परविरोधी आहे याची कदाचित त्यांचे त्यांनाच जाणिव नसावी.
३. परवाच बी एफ स्किनर यांनी अल झझिरावर जालवाद हे खर्या समाजातील खरे ताण कमी करण्यासाठी कसे उपयुक्त आहेत यावर मुलाखत दिली. जगातल्या सर्वात श्रेष्ठ अशा या मानसशास्त्रज्ञानाचे मते जालीय ताणतणाव हे माणसाला प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय सक्षम बनवतात. लेखक म्हणतो तशी कोठली कृत्रिम युद्धशैली वापरायची गरज नाही. तुमचा इगो तुमच्याकडून योग्य तेच टायपून घेतो.
४. धागाकर्त्याच्या इतर अनेक धाग्यांत शुद्ध वा उपहासाच्या बहाण्याने पुढे केलेला 'सामान्य लोकांच्या सामान्य वृत्तींचा उपहास' प्रकर्षाने जाणवला आहे. विषय विस्तार टळावा म्हणून ते आपण नंतर चर्चू.
५. हे आपण वाचलं का? http://www.aisiakshare.com/node/2085#comment-32667 प्रतिसादाचे शीर्षकच खूप वादज्वरग्रस्त आहे. मी नेहमीच सर्वांच्या स्वातंत्र्यांचा, मतांतरांचा आदर करत आलो आहे. अर्थातच म्हणून फारएण्ड यांना असे विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहेच. पण त्यांना आज जालवादाचा असा उपहास करताना पाहून त्यांची विचारधारा इथे डकवलेला प्रतिसाद देताना कोठे गेली होती असे वाटणे साहजिकच आहे. म्हणजे हे विधान व्यक्तिगत नव्हे, उगाच गैरसमज नसावा. मी काय फारएण्ड वाटाण्याच्या सूंठेवर वाढलेले आहेत असे म्हणतोय का? अर्थातच नाही.
३. पुडी सोडून देणे राजकारणात
३. पुडी सोडून देणे
राजकारणात एखादी जरा बर्यापैकी लोकप्रिय व्यक्ती असेल, नवखी असल्याने फारशी स्कॅण्डल्स त्यांच्या नावावर नसतील व त्यामुळे त्यांच्याबद्दल जरा काही लोक चांगले लिहीत असतील, तर काही दिवस सर्वांचे तसे चांगले मत होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्याला तर कोणाबद्दल कोणी चांगले बोलणे मान्य नसल्याने वैताग येतो. काळजी नसावी. यावरही उपाय आहे."XXX काय? ठीक आहे ठीक आहे. एवढे कौतुक करताय, दापोली प्रकरण तुम्हाला माहीत नसेलच, किंवा तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष केलेले दिसते".
असे काहीतरी सोडून द्यावे. अर्ध्या लोकांना उगाचच मग हे जे कोणी XXX आहेत त्यांचे काहीतरी दापोली प्रकरण आहे असे वाटते. आपला उद्देश साध्य. इतर कोणी मग 'दापोली' प्रकरण काय विचारले तर तेथून गायब व्हावे, किंवा पूर्ण दुर्लक्ष करून विषय भलतीकडे न्यावा.
ते बी एफ स्किनर वेगळे!!!
(क्रमांक ३ या मार्गदर्शक तत्त्वाचे आम्ही इतकेच पालन करू शकलो असे नव्हे.)
वाह वाह!
वाह वाह! छान उपाय आहेत.
अजून दोन हुकमी उपाय आहेत,
१) तोंडावर विदा फेकावा: समोरच्याने काही प्रतिकूल लिहिले की आपण किमान सहा ते आठ विद्याचे दुवे द्यावेत. हे सगळे दुवे बरोबर असायलाच पाहिजेत असे मुळीच नाहीत. यातील काही दुवे "टकलावर हमखास उपाय" किंवा "हाऊ टू टेल युअर स्पाऊस इज चीटींग ऑन यू" किंवा कोलोनॉस्कॉपीचे विकी पेज असे कोठेही घेऊन गेले तरी काही बिघडत नाही. विरोध करणारे दुवे उघडणारच नाहीत पण तुम्ही खूप अभ्यासू आहात अशी ख्याती बनेल आणि विरोधक जपून रहातील. जोडीला दोन-चार आलेख, पाय चार्ट वगैरेंची चित्रेही द्यावीत..प्रत्येक वेळेला त्यावरचे टेक्स्ट बदलावे. हा थोडा धोकादायक मार्ग आहे आणि पकडले जाण्याची शक्यता आहे. असे पकडले गेल्यास थोडे अधिक गूगलावे आणि कोठूनतरी हवा तसा आलेख मिळावावा. मागणी तसा पुरवठा या तत्वावर सर्वत्र हवे तसे आलेख मिळतात, शोधा म्हणजे सापडेल.
२) सपशेल माघार घेणे: हा उपाय संस्थळांवर फारसा वापरला जात नाही असे निरिक्षण आहे पण अनेकदा दूरची लढाई जिंकण्याचा हा एक नामी उपाय आहे. विरोधक तावातावाने मुद्दे मांडत असताना आपण त्याचे सगळे मुद्दे मान्य करून त्याची माफी मागावी आणि त्याच्या शिडातली हवा काढून घ्यावी. असे करणे म्हणजे तात्कालिक माघार असली तरी अंतिम लढाई तुम्हीच जिंकाल कारण खुल्या मनाचा अशी तुमची ख्याती पसरेल, विरोधकाला विरोध करायला जागाच रहाणार नाही शिवाय प्रकरण निवळले की मग जुना राग आळवताना तुम्हाला अधिक पाठबळ मिळेल. कौटुंबिक कलहात जोडीदाराने हा उपाय अनेकदा यशस्वीपणाने वापरल्याने त्याच्या उपयुक्ततेबद्दल शंका नाही.
विदाशस्त्रे-
क्र. १ बद्दल सहमत!
विदा (हा शब्द आजकाल फार येऊन राहिलाय जीवनात) वगैरे देताना "अलीकडेच क्षयञ विद्यापीठात" किंवा " हळक्ष युनिवर्सिटीच्या संशोधनानुसार" हे नक्की जोडावं.
तसंच ज्या लिंक्स द्याल, त्यात pdf फाईल्स असल्या तर छान. जर त्यात LaTeX वगैरे वापरून लिहिलेला एखादा पेपर जोडता आला, तर तुम्ही जवळपास जिंकलात.
असले पेपर लिहिणारेसुद्धा नंतर ते वाचत नाहीत, तर सामान्य वाचक कुठले जातायेत तिथे?
आणखी काही विदापेच-
ज्याला buzzword bingo म्हणातात, तसला प्रकार करावा. म्हणाजे चर्चा जर "प्राणी आणि त्यांची पिल्ले" ह्याविषयी असेल तर जीवशास्त्रातील परिभाषा वापरावी -पिल्ले ऐवजी संतती, किंवा जगणं ऐवजी जीवनमान, पेशी,ऊती, इ.इ. म्हणजे आपलं एक "प्रभावक्षेत्र" निर्माण होतं.
आपल्यालाही न समजलेला एखादा उतारा तसाच डकवावा. आणि "मूळ गाभ्याला धक्का लागू नये" म्हणून आपण तो तसाच डकवल्याची नोंद करावी.आणि पुढे -"ह्यावर आपलं काय म्हणणं आहे" अशी पृच्छादेखील.
आता तो भयाण उतारा वाचून, त्याचा अर्थ काढून त्याला प्रत्युत्तर द्यायची जिम्मेदारी विरोधकाची आहे. आपण पुढली कब्बडीची म्याच खेळायला मोकळे.
आमच्या ट्रिका अशा उघड्यावर
आमच्या ट्रिका अशा उघड्यावर आणल्याबद्दल रुचीमावशींना काहीतरी कारण उकरून काढून सोळा लिंका आणि तीन आलेख द्यायचं मनोमन ठरवलेलं आहे.
असो. काही नवीन उपाय.
१. समोरच्या व्यक्तीला काका, मामा वगैरे वयोमानाची लेबलं लावावीत. स्त्रियांच्या बाबतीत तर ही ट्रिक फारच यशस्वी ठरते. त्यांना काकू, मावशी वगैरे म्हटल्यावर फार चटकन राग येतो. आणि ते वाचून त्या पुरेशा उचकल्या नाहीत तर त्यांच्याच एखाद्या जुन्या वक्तव्याची आठवण करून द्यायची. म्हणजे कोणी त्यांच्या हिप्सबद्दल तक्रार केलेली असेल तर 'काय मावशी, हिप्स काय बोलतायत?' असं संभावितपणेे विचारायचं. इतर वाचकांना आपण आस्थेने चौकशी करतोय असं वाटतंं, मात्र बाण बरोबर लागायचा तिथे लागतोच. मग त्या आणखीन उसळतात, आणि नेहेमीपेक्षा अधिक असंबद्ध बोलायला लागतात.
२. सर्वात प्रभावी उपाय म्हणजे प्रचंड मोठ्ठा प्रतिसाद लिहिणे. तो इतका मोठा असला पाहिजे की तो स्क्रोल करता करताच वाचकांच्या मनावर दडपण आलं पाहिजे. असे प्रतिसाद कोणी वाचत नाही. त्यामुळे शेवटचा निम्मा भाग सर्व प्रतिसादांत तोच तोच कॉपी पेस्ट करूनही चालतो. हे आणखीन परिणामकारक करण्यासाठी तुमच्या प्रत्येक प्रतिसादात किमान बारा तरी प्रश्न नंबर घालून द्यावेत. तुम्ही ज्यांना हा प्रतिसाद दिला आहे ते जागच्या जागीच गार होतात. कारण बारा उत्तरं कोण लिहिणार? आणि कोणी लिहिलीच तर प्रत्येक उत्तरासाठी ३ ते ४ प्रमाणे किमान चाळीस प्रश्न विचारावेत. तीनपत्ती खेळताना समोरच्याकडे जितके पैसे आहेत त्याच्या दहापट बोली लावली तर तो काय करेल? कितीही चांगली पानं असली तरी फोल्डच करेल ना? मग तुमच्या हातात वेगवेगळ्या रंगांचे दुर्री पंजी छक्की असली तरी पैसे तुम्हालाच मिळतात.
३. हा उपाय क्र. २ च्या बरोब्बर विरुद्ध आहे. समोरच्याने कितीही मोठा प्रतिसाद दिलेला असला तरी त्याला फक्त एक ओळीचा खोचक प्रश्न विचारायचा. हे प्रश्न तयार करण्यासाठी वरच्या लेखात दिलेल्या ट्रिका पहा. स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंट + एकोळी प्रतिसाद ही अत्यंत प्रभावी स्ट्रॅटेजी आहे. 'म्हणजे तुम्ही अबक म्हणताय. ते साफ चुकीचं आहे.' इतक्या प्रतिसादावर समोरच्याला दहा ओळी टंकून तो अबक कसं म्हणत नाहीये आणि तसंही अबक अगदीच चूक नाहीये हे सिद्ध करावं लागतं. मग 'हिटलरनेही अबक केलं होतं. तेव्हा तुम्ही हिटलरच.' असं म्हणायचं. ही स्ट्रॅटेजी यशस्वी होण्यासाठी तुमचं उत्तर ताबडतोब आलं पाहिजे. जितक्या रॅपिड फायर तुमच्या कॉमेंट्स येतील तितकं 'हा माणूस काहीही विचार न करता प्रश्न करतो आहे' असं वाटेल. आणि ते बरोबरच असेल. फक्त त्याने काहीतरी अशा स्वरूपाचं आधी बोलण्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजेत. मग 'कृपया वैयक्तिक प्रतिसाद टाळा.' वगैरे डोसही पाजता येतात.
या लेखाची आज आठवण झाली.
या लेखाची आज आठवण झाली.
>>>>>>>आपला समाजशास्त्रीय अभ्यास एवढा अचूक आहे की विविध मते असलेले लोक आपण मॉनिटर करत असतो, कोणत्या प्रसंगात कोणता गट कसा वागतो, त्या गटांत नक्की लोक कोणकोण आहेत याचे शास्त्रीय ज्ञान आपल्याकडे आहे व आपण ते वेळोवेळी नोंद करून ठेवत असतो, असा आभास निर्माण करणे.>>>>
या लेखाची आज आठवण झाली.
या लेखाची आज आठवण झाली.
>>>>>>>आपला समाजशास्त्रीय अभ्यास एवढा अचूक आहे की विविध मते असलेले लोक आपण मॉनिटर करत असतो, कोणत्या प्रसंगात कोणता गट कसा वागतो, त्या गटांत नक्की लोक कोणकोण आहेत याचे शास्त्रीय ज्ञान आपल्याकडे आहे व आपण ते वेळोवेळी नोंद करून ठेवत असतो, असा आभास निर्माण करणे.>>>>
(No subject)
=))