शांताराम - ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स
सध्या "ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स" या लेखकाचे "शांताराम" हे आत्मचरीत्रात्मक पुस्तक वाचते आहे, अर्धे झाले आहे. पहीली काही प्रकरणे, भारतातील अनुभवांबद्दल एखादी पाश्चात्य व्यक्ती इतके सकारात्मक लिहू शकते हे वाचून, आश्चर्यमिश्रीत आनंदाचा धक्का बसला. हातातून पुस्तक खाली ठेववेना. विशेषतः पुस्तकातील मराठी संवाद आणि मराठी पात्रांनी भुरळ घातली. लेखकाची नीरीक्षणशक्ती देखील अफाट, खरच अफाट आहे हे जाणवले. पण पुढे पुढे लेखकाची जीवनशैली, चरस, हशीश घेणे आदि सवयी बघता, मुंबईचे अतिरेकी कौतुक, लोकांची स्तुती सर्व अतिरंजित वाटू लागले. खरं तर पुस्तक काही काळ दूरच ठेवले. झोपडपट्टीच्या दादाशी अध्यात्मिक गप्पा करणे, शिवसेनेच्या राजकीय बळाचा उल्लेख, थोड्या पानांनंतर मुस्लीम समाजातील काही गुंड लोकांना दिलेला "लाईमलाईट" (प्रकाशझोत)- त्यांचे झोपडपट्टीची आग विझवण्याचे काम व त्या कामाची तोंड भरभरून स्तुती, वगैरे गोष्टी अगदी अगदी निखालस पेरलेल्या वाटू लागल्या.
एकंदर "फर्स्ट इम्प्रेशन" जबरदस्त होते पण ते हळूहळू मावळत चालले आहे. प्रसंग अतिरंजीत, काल्पनिक आणि मीठमसाला - फोडणी घालून "पेश" केल्यासारखे वाटत आहेत. तसे करायला काही हरकत नाही पण मग आत्मानुभावाचा आव कशाला?
बाकी काल्पनिक जॉनर मधील म्हणून वाचावयास उत्तम पुस्तक आहे. विशेषतः जीवनविषयक बर्याच टीप्पण्या मार्मीक आहेत. जसे - लेखक आणि लेखकाची मैत्रिण कार्ला गप्पा मारत असतात आणि विषय निघतो की "आत्ता या क्षणी तुम्हाला जर एखादा वर मिळाला तर काय मागाल?" कार्ला म्हणते "सत्ता (पॉवर) कारण सत्ता ही सर्वोत्तम गोष्ट आहे" त्यावर शब्दाने शब्द वाढत जाऊन वाचकाला तिचे म्हणणे कळते की "सेक्स हा मुख्यत्वे करून पॉवरगेम असतो." तर याउलट "प्रेम हे शरणागतीचे दुसरे रूप असते आणि म्हणून प्रेमात पडण्यास आख्खे जग घाबरते" वगैरे. अन्य टीप्पण्या मधेमधे पेरलेल्या आहेत आणि वाचण्याजोग्या आहेत.
"प्रबाकर खरे" हे पात्र लेखकाचा मित्र आहे. आणि या पात्राचे व्यक्तीचित्रणदेखील उत्तम झाले आहे. प्रबाकरचे तोंडभर , निखळ, निष्कपट स्मितहास्य या पुस्तकात वाचकाला वारंवार भेटत राहते. सर्वच पात्रे छान रंगवली आहेत.
पण एक सूचना - लेखक भारतीयांच्या हृदयास हात घालू पहातो आणि पहीली बरीच प्रकरणे त्याला यशही मिळते, पण ती एक "कॅल्क्युलेटेड" (धूर्त) लेखकी चाल असावी. तेव्हा थोडे डोके शाबूत ठेऊन हे पुस्तक वाचा.
मुंबईत राहूनही , मला काही माहीत नसलेल्या डार्क (अंधार्या) गोष्टी या पुस्तकरुपाने माहीत झाल्या उदाहरणार्थ - (१) मरणोन्मुख पण बेघर लोकांना आसरा देऊन त्यांच्या अवयवांचा चालणारा व्यापार (२) सतत उभे राहून चरस पीणारे साधू. उपयोग न केल्याने त्यांचे सडणारे पाय आणि त्यांचे चरसी भक्तगण.
या अर्धवट वाचलेल्या पुस्तकात भारतीयांबद्दल खूप चांगल्या गोष्टी वाचल्या. भारतीय असल्याचा परत एकदा खूप अभिमानदेखील वाटला.
एकंदर पुस्तक वाचण्याजोगे आहे. थोड्या दिवसात परत वाचायला सुरुवात करेन. ज्यांनी कोणी वाचले असेल त्यांनी आपापले मत जरूर या धाग्यावर नोंदवावे. धन्यवाद.
प्रतिक्रिया
योगायोग
काय योगायोग पाहा, नुकतंच मीही ते चारशे-साडेचारशे पानं वाचून सोडून दिलं.
फार रटाळ आणि वास्तवाला भलभलत्या गोष्टींचा मुलामा दिलेलं पुस्तक आहे. घोर अपेक्षाभंग झाला माझा. हृदयाला हात-बीत असं तर काहीही वाटलं नाही, उलट अब्दुल्ला आणि प्रभाकर या दोन भावासारख्या मित्रांचा लागोपाठ मृत्यु वगैरे खूप परिणाम करणार्या घटना सुद्धा अगदीच किरकोळीत आणि भावनाशून्य भाषेत लिहील्या आहेत.
वास्तवाला भलभलत्या गोष्टींचा
अगदी अगदी! भरकटलेलेच पुस्तक आहे. अर्धे वाचले आहे पुढे वाचायचा हिय्याच होत नाहीये
अर्धं पुस्तक = ४००-४५० पानं
अर्धं पुस्तक = ४००-४५० पानं ... एवढा जाड ठोकळा पाहूनच माझी वाचण्याची इच्छा मरून जाईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अत्यंत रटाळ पुस्तक!
अत्यंत रटाळ पुस्तक!
हातात घेतले आहे म्हणून कसेबसे पूर्ण केले होते. त्यानंतर काहि दिवस व्यायामही केला नव्हता (रोज ठोकळा उचलल्यावर काय गरज )
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मी विमानात वाचावयास घेतले.
मी विमानात वाचावयास घेतले. आणि काही प्रकरणे वाचतच गेले. म्हणजे अगदी घरी पोचल्यावर देखील पुस्तक हातातून सोडवेना. पण जेव्हा ते नागपूरचे आंधळे गायक, कादरभाईशी रंगलेला अध्यात्मिक गप्पांचा फड वगैरे वाचलं ना तेव्हा डोक्यातच गेलं. वाटलं हा माणूस नक्की "तारेत" लिहीतो आहे.
शांताराम
पुस्तक अर्धवट वाचले. मग वाटले, शिरवळकर लहानपणीच वाचले आहेत, आता पुन्हा कशाला? मग सोडून दिले.
अवांतरः हे पुस्तक भयंगर गाजलेले वगैरे, बेस्टसेलर ठरले होते म्हणे. यातून काय सिद्ध होते?
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
हा हा
शिरवळकरांनी इंग्रजीत लिहीले असते तर...ककोल्ड वगैरे
मला माझ्या ओळखीचे एक मित्र
मला माझ्या ओळखीचे एक मित्र म्हणाले की - पुस्तक फार छान आहे. भारतीय लोकांची सकारात्मक बाजू म्हणे फार उत्तम रंगविली आहे. पण मला वाचताना रटाळ तोचतो गोडपणा पणा, अतिरंजित नाट्यमयता आणि अंमली द्रव्याच्या सेवनाखाली येणारी "वास्तवापासूनची फारकत" फार प्रकर्षाने जाणवली.
"शांताराम" एक कादंबरी
मी पूर्ण 'शांताराम' वाचले आहे. एकतर धागाकर्ती म्हणतात तसे ते 'आत्मचरित्रात्मक पुस्तक' आहे असा कोणताही इशारा ना लेखकाने दिला आहे ना प्रकाशकाने.... ना पुस्तकाच्या ब्लर्बवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या झाडून सार्या प्रतिक्रियांमध्ये असा काही आत्मचरित्राचा उल्लेख आढळून येतो. "A novel of high adventure....'Shantaram is a novel of the first order.... 'Shantaram' is quite simply the Arabian Nights of the new century.... etc.etc. असे उल्लेख जर जगभरातील प्रतिसादकर्ते (मग त्याना 'अक्कल नाही...' असे म्हणण्याच्या इथल्या वाचकाला अधिकार असला तरी) म्हणत असतील तर 'शांताराम' या ग्रंथाकडे कादंबरी म्हणून पाहिले तरच लेखकासाठी ते न्यायपूर्ण होईल.
कादंबरीच्या शेवटी [पृष्ठ क्रमांक ९३५] वर ग्रेगरी रॉबर्टस लिहितो "शांताराम लिहिण्यास मला १३ वर्षे लागली. त्यातही एक धक्का असा की सहा वर्षाचे लिखाण - जे जवळपास सहाशे पानाचे होते - तुरुंगात नष्ट झाले....तुरुंगातून बाहेर पडून पुनश्च लिखाण सुरू केले आणि खरं सांगतो ही कादंबरी मी अक्षरशः रक्त आणि अश्रूने पूर्ण केली आहे...". आता दस्तुरखुद्द लेखकच या पुस्तकाला 'कादंबरी' म्हणून संबोधित असेल तर त्याचा तो अधिकार आपण मान्य करूनच जर 'शांताराम' वाचले तर एक चांगले पुस्तक वाचल्याचे समाधान नक्कीच मिळू शकेल. [हे पुस्तक मला आवडले, पण म्हणून ते डोक्यावर घेऊन नाचावे असे अजिबात नाही, हेही स्पष्ट करतो.)
चाळीसगाव तालुक्यातील प्रभाकरचे वडील कृष्णराव खरे आणि आई रखमाबाई यांच्या घरी.... एका छोट्या गावी सहा महिने राहून मराठी भाषा शिकून 'लीनबाबा' मुंबईत धारावी झोपडपट्टी रहिवाश्यांशी, टॅक्सीवाल्यांशी, पानपट्टीवाल्यांशी, फुटपाथवाल्यांशी अस्खलित मराठीत संवाद साधतो त्यावेळी मुंबईच्या लोकांना त्याच्याविषयी का प्रीती वाटते हे सहज समजून येते. सारी कारकिर्द महाराष्ट्रात व्यतीत करून अगणित पैसा आणि जगभर प्रसिद्धी मिळविणारे सो-कॉल्ड कलाकार "हम यूपी के है और हम यहाँ बम्बईमें हिंदीमेंही बात करेंगे" असे निर्लज्जपणे बेधडकपणे जाहीर सभेत सांगतात त्यावेळी महाराष्ट्रात राहायचे असेल तर प्रथम मराठी शिकलेच पाहिजे असे स्वत:ला बजावून पहिल्या काहीच महिन्यात जवळपास ६०० नित्यनेमाने लागणारी मराठी वाक्य आणि शब्द तोंडपाठ करणारा लिन्डसे वाचकाला का आपलासा वाटतो हे कादंबरी वाचताना पानापानातून जाणवत राहते.
"बैलाला कृपया चाबूक मारू नका असे तुझ्या वडिलांना सांग, प्रभाकर...." असे जेव्हा लिन बैलगाडीत बसल्याबसल्या सांगतो तेव्हा त्याच्याविषयी कुणाला ममत्व वाटणार नाही ? भले त्याचा प्रवास काळ्या धंद्यातून पुढे होत राहिला तरी त्याने मुंबईची ती एक बाजू रोखठोकपणे रंगविली आहे. आर्थर रोड प्रिझन असो वा धारावीतील वातावरण, लीओपाल्ड हॉटेल कल्चर असो वा बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री....गोवा असो वा काबूल....सगळीकडील परिस्थिती जशी दिसली तशी रंगविली अशाच धाटणीची असल्याने त्याबाबत त्याने सैलसर वर्णनाचे स्वातंत्र्य घेतले आहे, जे एक लेखक म्हणून मान्य व्हावे.
कादंबरीला 'रटाळ, बेकार, अजिबात आवडली नाही, फेकून द्यायच्या लायकीची...' अशा शेलक्या वाक्यांनी वाचकांनी हवेतर जरूर निकालात काढावे, तो वाचकाचा हक्क आहेच आहे... पण ती निदान पूर्ण वाचून तरी तसे म्हणण्याचे कष्ट घ्यावे इतकेच म्हणतो.
मराठी वाचकात 'जी.ए., रेगे, नेमाडे....' तत्सम लेखकांचे - ज्यानी लेखन प्रवासात पारंपारिक अर्थाने चोखाळलेली वाट कधी धरली नाही - साहित्य न वाचताच "...अमुक एक सांगतो म्हणजे त्यांचे लेखन भिकार असणारच..." असे सहज सुटणारे गणित मांडून त्याविषयी इथे (आणि अन्यत्रही) जालावर बेधडक त्या संदर्भातील टिपण्या प्रसवित असतात. या सवयीविरूद्ध काही बोलावे तर मग वापरून वापरून अगदी भेन्डी बुळबुळीत निसरडे झालेले ते वाक्य "विषाची परीक्षा पाहण्यासाठी बाटली तोंडाला लावणे गरजेचे नाही" इथे टंकले की काम झाले असाही अशा बर्चीबहाद्दरांचा होरा असतो.
"शांताराम' आवडो वा ना आवडो....काहीही शेरेबाजी असो....ती कादंबरी पूर्ण वाचूनच केली तर उलटपक्षी प्रतिसादकर्त्याचे साहित्यप्रेम उठून दिसेल.
अशोक पाटील
आपल्या प्रतिक्रियेबद्दल
आपल्या प्रतिक्रियेबद्दल सर्वात प्रथम धन्यवाद.
पुस्तक वाचता वाचता, माझी मनस्थिती द्विधा झाली आहे कारण - आपण वरती दिल्याप्रमाणेच अगदी तीच कारणे - या कादंबरीने माझ्या हृदयाला प्रथम हात घातला.कारण हा परदेशी माणूस मराठी शिकला, झोपड्पट्टी रहीवाश्यांमध्ये मिसळून राहू लागला, त्यांच्या सुखदु:खांशी समरस झाला.
अगदी याच कारणाकरता मलाही तो प्रिय झाला.
पण पुढे पुढे मला असे वाटले की - वाचकाला वैयक्तिक नफ्याकरता "मॅनिप्युलेट" केले जात आहे. अगदी मुद्दाम भारतीय वाचक डोळ्यासमोर ठेऊन लिहीलेली कादंबरी मला वाटू लागली.आणि जितका तो आवडला, जितकी ती कादंबरी आवडली होती तितकच फीयर्सली (तीव्रतेने) ती दूर ठेवली गेली. आणि आता मला ती हातात घ्यावीवीशी वाटत नाही कारण मेंटल ब्लॉक आला आहे.
अर्थात मग विचार करते कादंबरी लिहीतात तेव्हा ऑडीअन्स (वाचक) डोळ्यासमोर ठेवूनच लिहीली जाते मग मला राग कसला येतो आहे? डेअर आय से? - भारतातल्या दारीद्र्याचा, जातीबंधनाचा, माफीया सिस्टीमचा, साधू आदि चमत्कारांचा एका श्रूड (धूर्त) रीतीने कादंबरीच्या रुपात उठविलेला लाभ हा मला त्रासदायक वाटतो आहे. बरं तो लाभदेखील कसा तर भावनाप्रधान वाचकांच्या हृदयाला हात घालून. नाही पाटील साहेब मला नीट सांगता येत नाही पण वेल मला ती कादंबरी आवडत नाही. काहीतरी चूकीचे वाटते आहे.
भारतीय वाचक
"अगदी मुद्दाम भारतीय वाचक डोळ्यासमोर ठेऊन लिहीलेली कादंबरी मला वाटू लागली"....
~ चला, हीदेखील एक शक्यता मान्य करू या, सारिका. पण त्यामुळे त्या कादंबरीच्या शैलीला वा मांडणीला उणेपण कसे काय येऊ शकते ? लेखकाला जर लिखाणासाठी "मुंबई" हाच प्लॅटफॉर्म हवासा वाटत असेल (जेथील दहा वर्षाच्या वास्तव्यात जवळपास सार्या जगाचे भलेबुरे वाईटसाईट अनुभव पदरात घेतले....कुवतेप्रमाणे झोपडपट्टीवासीयांसाठी कामही केले) तर साहजिकच त्याच्या नजरेसमोर भारतीय वाचक येत असेल तर तो त्याच्या लेखणीचा दोष असू शकत नाही. उलटपक्षी त्याने ज्या पद्धतीने 'मुंबई'...अगदी महारोग्यांचाही बिझिनेस.... चितारली तीच जगभरच्या इंग्रजी वाचकांना भावली. त्यामुळे केवळ भारतीय वाचकाच्या उड्या या पुस्तकावर पडाव्यात या उद्देश्याने कादंबरीचे लेखन झाले नसावे असे माझे मत आहे.
"पण वेल मला ती कादंबरी आवडत नाही. काहीतरी चूकीचे वाटते आहे."
~ जरूर. जरूर तुम्हाला असे मत मांडण्याचा हक्क आहे. पण माझी इच्छा इतकीच क्षुद्र आहे की 'आवडली नाही....' हा शेरा पूर्ण कादंबरी वाचून झाल्यानंतरच दिला तर ते जास्त न्यायाचे होईल. मी स्वतः पहिल्या प्रतिसादात म्हटलेच आहे की मला कादंबरी डोक्यावर घेऊन नाचावे अशा योग्यतेची वाटली नाही. पण मी असे म्हणतो ते पूर्ण वाचनानंतरच.
जी.ए.कुलकर्णी यांच्या खास भाषेत सांगायचे झाल्यास, "झेब्रा तुम्हाला समजला नाही तर काही बिघडत नाही, पण तो समजला नाही म्हणून निदान त्याला पट्ट्यापट्ट्याचे मोठे मांजर तरी म्हणू नका."
अशोक पाटील
माझा स्टँड हाच होता की अर्धी
माझा स्टँड हाच होता की अर्धी वाचली आहे आणि ज्यांनी ती कादंबरी वाचली आहे, त्यांच्याकडून, अधिक इनपुट हवे आहेत.
मान्य!
मी हे पुस्तक पूर्ण वाचल आहे.
मी हे पुस्तक पूर्ण वाचल आहे. एका पूर्ण वेगळ्या जगाची ओळख यातून झाल्यामुळे ते आवडलं होतं. एका ट्प्प्यानंतर पुढे वाचायचा कंटाळा आला होता..पण नेटाने थोडं आणखीन वाचत गेल्यावर मग परत आवडलं होतं. पारायणं करावीत अस काही वाटलं नाही...पण वाचल्याचा आनंद झाला. यातली गोष्ट बर्यापैकी गुंतागुंतीची आहे, त्यामुळे उत्सुकता वाटत राह्ते पुढे काय होईल याची.तुम्हाला इतका कंटाळा आला वाचताना हे वाचून थोडं आश्चर्य वाटल.
अवांतरः जवळजवळ याच तोलाचं (आकार, वजन इ.) 'अ सुटेबल बॉय'(विक्रम सेठ) हे काही पूर्ण वाचणं जमलं नाही.
अपेक्षित
सुरूवातीला पुस्तक वाचतांना 'पॅपिलॉन' किंवा तत्सम पलायनकथांचा भास होतो. पलायनकथांमध्ये अपेक्षित असलेला सुरक्षित-भोळाटुरिस्टी चष्मा घालून शांताराम वावरतो. आता येथवर आलो तर वाचूनच सोडावे असा गल्लाभरू दृष्टीकोन ठेवल्यास पुस्तक पूर्ण वाचायला फारसे श्रम लागत नाहीत.
(प्रस्तावावरून नुकतेच अर्ध्याहून अधिक वाचल्यानंतर सोडून दिलेले प्रभाकर कुंटे यांचे पलायनपुस्तक 'नर्मदे हर हर' आठवले)
परत वाचावयास घेतलेले आहे.
परत वाचावयास घेतलेले आहे.
दूरच्या विमान,
दूरच्या विमान, रेल्वेप्रवासासाठी असेल.
पुस्तक न वाचता ठोकळ्याविषयी म्हणता येईल.
>>>दूरच्या विमान,
>>>दूरच्या विमान, रेल्वेप्रवासासाठी असेल.>>> How I wish ... bust alas!! नाही. इथेच ऑफिसात लंच टाइमत वाचते आहे.