अन् मग
या क्षणजीवी कवितेच्या शवपेटीवर
मी शेवटचा खिळा मारीन.
अन् मग
ही कविता
विस्मृतीच्या विस्कळखाईत कायमची दफनल्यावर
तिचं काळंशार मायाळू खत होईल
अन् मग
उपेक्षेच्या झळा सोसून,
दुर्बोधतेचे आरोप झेलून कोमेजलेली,
कुण्या प्रतिभावंताची अस्सल कविता
त्या खतावर
जीव धरून तरारेल
अन् मग
त्या बावनकशी कवितेचं असणं,
गारूड टाकणं,
अस्वस्थ करणारे
प्रश्न पाडणं,
सारं सारं
तुमच्यात
अनिर्बंध साथीसारखं
पसरत जाईल
प्रतिक्रिया
शुभस्य शीघ्रम्|
तूर्तास या कवितेच्या शवपेटीवर (शेवटचा!) खिळा तर मारा. मग पुढचे पुढे पाहून घेऊ.
की शेवटच्याअगोदरचे खिळे दुसऱ्या कोणीतरी मारावेत, म्हणून वाट पाहत आहा? जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला. (अर्थात, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.) तेव्हा, अपना हाथ जगन्नाथ, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.
(आणि तसेही, पहिलाच खिळा हा शेवटचा खिळा का होऊ शकत नाही? हादेखील एक विचारार्ह मुद्दा आहेच.)
इत्यलम्|
नबा
आपली अतिशीघ्र-प्रतिसादरूपी चूक चुकून खिळ्याइतकी मोठी झालीच.(न कंटाळता कळफलक बडवत राहण्याच्या आपल्या उपक्रमाचे हे फलित समजावे का?). मग तोच पहिला खिळा समजून माझा दुसरा (व शेवटचा) खिळा मारूनच टाकतो. पुढचे पुढे पाहून घेऊच.
शंका
बऱ्याच दिवसांपासून एक शंका आहे. दफन केलेले प्रत्येक शव ज्या तुकतुकीत पॉलिश केलेल्या शवपेटीत ठेवलेले असते, त्या शवपेटीचे बायो डिग्रेडेशन व्हायला किती वेळ लागत असेल? तुलनेने आंतल्या शवाची (या बाबतीतली) प्रगती फास्ट असेल. मग ते शव मातीत एकजीव व्हायला किती वर्षं लागत असतील?
तिमाजी
"मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार -" हा धागा जिवंत असल्यास आपली ही रास्त पण अस्थानी शंका तिथे विचारा असे सुचवतो. न जाणो तिथे उत्तर मिळाल्यास दफनप्रक्रियेची एखादी नवी बाजू आपणासह इतरांनाही कळेल.
बघा
बघा, म्हणजे मी तुम्हाला फुलटॉस दिला की नाही ?
संपादकांना विनंति आहे की माझी अस्थानी बोलून दाखवलेली रास्त शंका योग्य ठिकाणी नेऊन टांगावी.
फुलटाॅस पण
नोबाॅल
शंका अस्थानी कशी?
हे जर अंतिम ध्येय असेल, तर मग केवळ कवितेच्या डीकेचा एक्सपोनेन्शियल रेट जमेस धरून कसे भागेल? भले तो रेट शीघ्र असेलही, आणि म्हणूनच कवितेचे काळेशार खत झटपट बनेलसुद्धा. (किंबहुना, आतापावेतो कदाचित बनलेसुद्धा असेल.) मात्र, त्या खताभोवती जोवर शवपेटीचे निरोधक आच्छादन आहे, तोवर ते काळेशार खत त्या कोणा होतकरू प्रतिभावंताच्या कवितेच्या बीजापर्यंत पोचणार कसे, नि कधी? याचे गणित मांडताना, त्या शवपेटीचा रेट ऑफ डीके (जो तुलनेने बहुधा बराच कमी असावा; चूभूद्याघ्या.) हासुद्धा विचारात घ्यावा लागणार नाही काय?
कविता आवडली.
कविता आवडली.
मला फार आवडली !
मला फार आवडली !
माझे आकलन
अनंत यात्री
तुमच्या एखाद्या कल्पनाबीजावरील कविता चांगल्या असतात. पण जेव्हा तुम्ही काव्यलेखनाबद्दल काही लिहिता तेव्हा त्यात अनेक विसंगती दिसतात.
दुर्बोधता व विसंगती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
या आधीच्या प्रतिक्रिया वरकरणी दिसणाऱ्या विसंगतीकडे बोट दाखवत असल्या तरी त्यांचे मूळ मुद्याकडे म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही.
खत होणे म्हणजे विघटनादि प्रक्रियेने पदार्थाचे रुपांतरण होणे. त्यातील घटक वेगळ्या स्वरूपात दुसऱ्या अंकुरासाठी उपयोगी पडतात. शास्त्रीय संशोधन काय किंवा साहित्यसर्जन काय, पूर्वसुरींच्या कर्तृत्वाच्या प्रकाशातच वाटचाल करतात. नवी वाट धुंडाळणारे थोडे, पूर्वसुरींचा वसा पुढे नेण्याचे कार्य करणारे अधिक, आणि त्यांचेही मोल कमी नाही. खत ही उपमा थोडी त्या दिशेचा निर्देश करते.
शिवाय या काव्यातील क्षणजीवी, अचेतन विस्मृतीच्या विस्कळखाईत लोटली गेलेली कविता कशी उभारी देईल कोणा नव्या कवीला ?
प्रतिभावंतांच्या अस्सलतेची जाणीव जरूर गारुड होण्याइतकी, उपस्थित झालेल्या नव्या प्रश्नांनी अस्वस्थ करणारी, सर्वदूर पसरत जाणारी असेल. तरीही ती निर्दिष्ट क्षणजीवी कवितेत आपले उत्थान सांगू शकणार नाही.
आता दुर्बोधतेतील सौंदर्याकडे वळू.
जर “मी” आणि “कुणी प्रतिभावंत” या दोन अस्तित्वखुणा एकाच व्यक्तीत एकवटल्या असण्याची शक्यता पाहिली, किंबहुना आडवळणाने तेच सुचवले आहे, तर काय दिसते ? खतासाठी मायाळू हे विशेषण आंतरिक ऊर्जेकडे निर्देश करते. भविष्यकाळी हातून काहीतरी भव्यदिव्य घडण्याची आस व ते समजून घेणारे रसिक मिळतील का ही शंका पण ती निर्मिती बावनकशी असेल व त्यामुळे सर्व आतून हालतील हा आशावाद असे सर्व व्यक्त करणे हे या कवितेचे खरे मर्म आहे.
अशी निर्मिती तुमच्या हातून लवकर होवो.
कुणीतरी कुठला तरी टॅग बंद
कुणीतरी कुठला तरी टॅग बंद केलेला नाही. सगळीकडे हे खिळे सांडलेत!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.