लॉकडाउनचं वर्ष - अर्धा भरलेला ग्लास
मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउन सुरू झाला. चारेक महिने तरी कडक निर्बंधात लोकांनी घालवले. त्यानंतरही आयुष्य पूर्णपणे पूर्ववत झालं नाही. नोकऱ्यांचा, प्रवासांचा, सण-वार-उत्सवांचा, मुलांच्या शिक्षणाचा बोऱ्या वाजला. आणि आता जवळपास वर्षभराने पुन्हा लॉकडाउनच्या बंदुकीच्या बॅरेलमध्ये आपण डोकावून पाहात आहोत?
या वर्षभराच्या सिंहावलोकनाच्या पार्श्वभूमीवर माझे दोन प्रश्न आहेत.
१. तुम्ही या लॉकडाउनच्या काळात काय मिळवलंत? काय गमावलं, कसा त्रास झाला याबद्दलच्या चर्चा नको इतक्या झालेल्या आहेत. त्या पुन्हा गिरवण्याची इच्छा नाही. पण काही ना काही फायदा झाला असेलच ना? मुलांबरोबर किंवा जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवायला मिळणं असेल, प्रवास ऑफिस धकधकीपासून सुटका मिळणं असेल, किंवा स्वतःच्या दृष्टिकोनात, जीवनपद्धतीत काही सकारात्मक बदल झाले असतील.
चांगलं काय घडलं, ज्याला मुख्यत्वे लॉकडाउन जबाबदार ठरला?
२. लॉकडाउनच्या पहिल्या इनिंगचा अनुभव आल्यानंतर, पुढची इनिंग खेळावी लागली (आणि ती लागेल असं आत्तातरी दिसतंय) तर तुम्ही काय वेगळं कराल? या प्रश्नातही मला फोकस गेल्या वेळच्या चुका, हुकलेल्या संधी यांपेक्षा पुढच्या शक्यतांवर भर दिला गेलेला आवडेल.
माझी उत्तरं चर्चेचा भाग करण्याऐवजी स्वतंत्र प्रतिसाद म्हणून लिहीन.
लॉकडाउननंतर ऑफिसला सुट्टी
लॉकडाउननंतर ऑफिसला सुट्टी मिळाली व घरुन काम करण्यास परवानगी. तेव्हा, ट्रेनचा अर्ध्या तासाचा, निवांत प्रवास, बाहेरच होणारी कॉफी बंद पडली. तेव्हा चुकचुकल्यासारखे होत असे. (-)
पण पुढे पुढे घरुन गाणी ऐकत, मध्येच टिवल्याबावल्या करत किंवा एकीकडे उत्तमोत्तम लेख वाचत, काम करण्याची खुमारीही कळू लागली. (+)
माणूस आलेल्या परिस्थितीत ॲडजस्ट होतोच. बाहेरचा चहापाण्याचा खर्च वाचला.(+)
आकर्षक कपडे घालण्याचे निमित्त आता बरेच कमी झाले कारण मी घराबाहेरच पडत नव्हते. (-)
घरात साधे पण अर्थात ऑफिसला साजेसे कपडे चालतात, मग काही काळ असा आला की कॅमेरा ऑन ठेउन मिटींग्ज अटेंड करु यात. पण त्यातही हा धोका होता की मागे कोणी वावरत असेल तर ते कळते. त्यामुळे आता तेही बंद आहे.(-)
न्यु जर्सी, न्यु यॉर्क मधील गर्दी बरीच आटोक्यात आलेली आहे. त्यामुळे सकाळी बागेत फिरायला मजा येते. गेल्या उन्हाळ्यात रोज सरासरी ५००० ते ७००० पावले झाली.(+) यावेळेला पाहू काय होते.
पूर्वी हवे तेव्हा घराबाहेर पडायचो तेव्हा त्या गोष्टीची किंमत माहीत नव्हती. आता किंमत कळल्याने अजुनी मजा येते.(+)
जागतिक दृष्टीकोनातून - पर्यावरणाच्या दृष्टीने जे घडले ते उत्तम घडले. लॉक डाउन पश्चात, एका महीन्यात, 'ओझोन होल, बंद झाल्याच्या बातम्या यायला लागल्या होत्या.', मानवाव्यतिरीक्त अन्य जीवांना एक ब्रेक मिळाला जो अति गरजेचा होताच. (+)
मध्यंतरी जे पी मॉर्गनचे सी ई ओ म्हणालेले - लसीकरणामुळे, महामारीवरती विजय मिळवला जाइल आणि २०२१ पासून ते २०२३ मध्यापर्यंत इकॉनॉमी चांगलं बाळसं धरेल. - https://www.wsj.com/articles/jpmorgan-ceo-jamie-dimon-sees-goldilocks-mo... (+) हे वाचून फार छान वाटले.
इतक्या ऐतिहासिक काळातून आपल्याला याची देही जाता आले, याचि डोळा हा काळ पहाता, अनुभवता आला - हे अप्रुप आहे. याचा अर्थ जे लोकं बळी गेले, त्यांचे दु:ख नाही असा अर्थ अजिबात नाही. (+)
मला चार शब्दसुद्धा
सांगायला सुचत नाहीयेत...
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
लॉकडाऊन मुळे आत्मपरीक्षण करण्यासाठी खूप वेळ मिळाला.
न भूतो न भविष्यति अशी परिस्थिती मागच्या वर्षी आल्यामुळे एकूणच ज्या ज्या घटना आदळल्या गेल्या त्याच्याकडे सगळ्या बाजूने विचार करायला शिकवलं. सुरुवातीचा काही काळ आळसात घालवला. मात्र नंतर स्वयंशिस्त लावावी लागली. कारण एकच वाढलेलं वजन कमी करणं. नंतर आरोग्यविषयक नको इतके सोशिक झालो. लॉकडाऊनच्या सुरुवातीला सगळेच घरी असल्याने कस्टमाईझ्ड दिवेकर डाएटिंग चालू होते. दर दोन दोन तासांनी नुसते खाणे आणि सटरफटर चरणे. फिरणं अजिबातच होत नसल्याने वजन वाढणे स्वाभाविकच होते. नंतरच्या काळात मग सक्तीचे दिक्षित डाएटिंग करून काही प्रमाणात का होईना वजनाच्या काट्यावरचे आकडे खाली येऊ लागले. अर्थातच स्वयंशिस्त आणि मनोनिग्रह सोबत होताच. लॉकडाऊनमुळे चांगल्या घटना पण घडल्या वाईटही घडल्या. काय करू नये हे प्रामुख्याने शिकवलं मागच्या वर्षी.
पुन्हा लॉकडाऊनच्या फेऱ्यात अडकलो तर या विषयावर १५ मार्कांसाठी निबंध पण लिहिता येईल. मात्र काय वेगळं कराल यासाठी कोणताही आखीव रेखीव कार्यक्रम आखलेला नाही. मात्र मागच्या वर्षी चा बराच रिकामटेकडा वेळ सिनेमा, सिरिज पाहण्यात घालवला. यंदा मात्र चांगले वाचन करेन म्हणतो.
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
१५ मार्कांसाठीचा निबंधच
१५ मार्कांसाठीचा निबंधच वाचायचा आहे. लवकर लिहा.
बाकी 'कस्टमाइज्ड दिवेकर डायेट' हे आवडलं.
वजन कसं काय वाढतं?
मी सतत चरतच असतो पण दहा ग्रामही वाढत नाही. दिवेकरांचे शेजारी पण टिप्स देतात का?
मास्क
मास्क वापरल्यामुळे परागकणांच्या ॲलर्ज्या कमी होतात हे लक्षात आलं. बाहेर आवारात काम करताना, किंवा रस्त्यावर एकटीच असेन तरी मी मास्क वापरते.
घरून काम केल्यामुळे जाण्यायेण्यातला, डबे भरण्यातला वेळ वगैर वाचतो. आता दिवस मोठा व्हायला लागल्यावर आणि समर-टाईम सुरू झाल्यावर त्या वेळात बाहेर बागकाम करण्याचं सत्कृत्य करत आहे. कदाचित पुढच्या वर्षीसुद्धा ह्या दिवसांत घरून काम करेन आणि आवारात बाग बनवण्याचं सत्कृत्य सुरू ठेवेन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मलाही सिव्हीअर त्रास होतो
मलाही सिव्हीअर त्रास होतो ॲलर्जीजचा. फॉल आणि स्प्रिंग दोन्ही वेळा. काल ॲलर्जी स्पेशालिस्टना भेटले. त्यांनी बरेच म्हणजे ३२ एक प्रकारचे परागकण असे हातावर ठेचले. सगळ्याच परागकणाअंनी त्वचा लाल झाली पण , काहींमुळे त्या ठिकाणची त्वचा फारच लाल झाली. आता पुढची व्हिझिट लवकरच आहे.
_________________________
परागकणांची ॲलर्जी आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होणे याबद्दल - https://www.fox5dc.com/news/pollen-could-play-role-increased-covid-19-in...
दुहेरी फायदा...
तुम्हाला जशी परागकणांची ॲलर्जी असू शकते, तद्वत, परागकणांनाही तुमची ॲलर्जी नसू शकते कशावरून?
त्यामुळे, 'मास्क वापरल्यामुळे परागकणांच्या ॲलर्ज्या कमी होतात', हे विधान दोन्हीं अर्थांनी खरे आहे.
(म्हणजे, ते जैन साधू नाही का, मास्क लावतात, श्वासोच्छ्वासातून हवेतल्या जंतूंची हत्या होऊ नये म्हणून, असे सांगत? तद्वत, परागकणांना तुमच्या ॲलर्जीचा त्रास होऊ नये, म्हणून तुम्ही मास्क लावता, असे सांगत जा. बाकी काही नाही, तरी उगाचच उदात्त वगैरे वाटते.)
असो.
मिळवलं ,गमावलं?
रिटायरमेंट आयुष्य अगोदरपासूनच होतं. रिकामाच होतो. भटकंतीची आवड होतीच आणि चालू होती ती बंद पडली आहे. तरी फेब्र १(२०२१) ते परवापर्यंत म्हणजे मार्च (२०२१) दोन महिने लोकल ट्रेन्स अंशत: सर्वसामान्यांसाठी उघड केल्याने तेवढ्यात चार फेऱ्या माथेरानला मारल्या. इतर ठिकाणी ( उदाहरणार्थ कोकण) तिथल्या लोकांनाच कुणी बाहेरून येऊ नये अशी इच्छा त्यामुळे बाद. माथेरानला मात्र पर्यटन जागाच असल्याने त्यांना पर्यटक हवेच आहेत.
थोडक्यात फिरणे बाद झालं. स्थानिक फेरफटका चालू.
वाचन -
पुस्तकं ओनलाईन शोधून डाउनलोड करून बरीच वाचली, वाचतोय.
मुलांबरोबर किंवा जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवायला मिळणं असेल, ......
सोडा. हा कधी बाहेर कटतोय असा माहौल असतो.
मिळवले ---- बरंच काही
लॉकडाऊन लागल आणि काही सुचेना. तशी ऑफिस मध्ये Work from Home ची सुविधा २००८ पासुन आहे. एकदा वापरुन बघितली पण कधी जमलीच नाही.
कसे तरी ३१ मे पर्यन्त दिवस ढकलले, नशीबाने Bench वर नव्हतो Project हातात होत त्या मुळे २८ फेब्रुवारी पर्यन्त घरात बसण्याची चिडचीड सोडली तर काही त्रास झाला नाही (+/-)
Youtube आणि Google/Food Blogs वापरुन स्वयंपाक शिकलो (+)
घरी २५ लोकांचा स्वयंपाक करता येऊ लागला (+)
१५ मसाले (Spice-Mix) बनवुन दिवालीला १२ लोकांना Diwali Gift म्हणून दिले (+)
US मध्ये १० किलो नागपूरी सावजी मसाला Export केला (+)
सध्या येणाऱ्या Project करिता Redhat Ansible चा अभ्यास आणी Harmonium शिकणे सुरु आहे (+)
गॅलिलीओ, कोप्रर्निकस, डार्विन वगैरे...
वर उल्लेखलेल्यांनी मांडलेली सत्ये अनेकांना समज/उमजण्यात भरपूर काळ केला. ती सत्यं मांडल्यामुळे यांना त्रासही भोगावा लागला. पण कालांतराने ती सत्य घरोघरी झालीच आणि ती मांडणार्यांची नावं आपण आता आदरानं घेतो. कोव्हीड आधी "जगातील बहुसंख्य लोक गाढव* आहेत" या मी मांडलेल्या सत्याची अशीच हेळसांड झाली. कोव्हीड काळात मात्र अनेकांना** हे सत्य स्पष्ट होऊन पट्लेलं दिसत आहे. किमाना आतातरी मी सत्य मांडल्यावर माझ्याकडे खाऊकीगिळू नजरेने पाहले जाणार नाही अशी रिकाम्या ग्लासातल्या दोन थेंबाची आशा आहे.
*गाढव या प्राण्याचा या शब्दाने संबोधलेल्या गुणवैशिष्ट्यांची संबंध असेलच असे नाही. नबांनी काळजी करू नये.
**उपरोल्लेखित बहुसंख्याना मुळ 'सेट' मध्ये धरलेले नाही.
-Nile
अरे, सत्याची हेळसांड
अरे, सत्याची हेळसांड होण्याचेच दिवस आहेत. कालांतराने तुझंही नाव आदराने घरोघरी घेतलं जाईल. तू काळजी करू नकोस.
पिच्चर
पिच्चरमध्ये तर सत्याचा एन्काऊंटर झाल्याचे दाखवले आहे!
पण गाढवाएवढं
निरोगी किंवा शारिरिक स्थितप्रज्ञ होऊ ही इच्छा आहे.
पळणे
निव्वळ लॉकडाउनमुळे लांब लांब अंतरं, तास पळायला लागलो. पूर्ण लॉकडाउनमध्ये अर्धा डझन अर्ध्या आणि एक पूर्ण मॅरॅथॉन पळालो. हे म्हणजे एक रिच्युअलच झाले. पण पण मानसिक स्थिती (पहिल्या ४-६ आठवड्यानंतर) सततच पाळलेल्या हॅम्सटरसारखी एकाच परीघात घुटमळत राहिली. तेच ते आकडे पाहणे. आडाखे बांधणे. सामुदायिक शिस्तीच्या सांस्कृतिक सवयी रवंथणे.
४ महिन्याच्या लॉकडाऊनचा
४ महिन्याच्या लॉकडाऊनचा आमच्या व्यवसायावर परिणाम झाला. पण आमचे दोन्ही व्यवसाय (अन्न आणि पाणी तपासायची लॅबोरेटरी) आणि कनक गूळ हे अत्यावश्यक सेवांमध्ये येतात आणि आम्हाला घरून कामच करता येत नाही त्यामुळे मी प्रत्येक लॉकडाऊन मध्ये ऑफिसमध्ये येतच असते. आपल्याला काही ना काही काम मिळत राहतं आणि आपण असं क्षेत्र निवडलं याबद्दल वेळोवेळी कृतज्ञता वाटली. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी अनेक कर्मचाऱ्यांचे घराबाजूचे भाग प्रतिबंधित क्षेत्र व्हायचे. तेव्हा काही गोष्टी स्वतः लॅबमध्ये जाऊन कराव्या लागल्या. त्यामुळे काही गोष्टी अजून हातात आल्यासारख्या वाटल्या. काही कर्मचाऱ्यांना पिक अप आणि ड्रॉप केले त्यामुळे त्यांच्याशी थोडी जास्त ओळख झाली.
बागकाम करायची सवय लागली आणि त्यात आनंद वाटू लागला.
वाचन वाढलं. गेली ५ वर्षं काम+लहान मूल असणे+ सोशल लाइफ या सगळ्यामुळे वाचन कमी झाले होते. त्यातले सोशल लाईफ अगदी कमी झाल्यामुळे वाचन करायला वेळ मिळाला आणि मुलालाही खूप पुस्तकं वाचून दाखवता आली. काम चालू आणि डे केअर बंद अशी स्थिती होती तेव्हा माझे आई वडील आणि नवऱ्याची आई यांनी मदत केली. त्यानिमित्ताने त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवता आला.
(अवांतर)
बाकी सर्व ठीक, परंतु...
...अधोरेखिताकरिता मराठीत 'सासू' असा साधासोपा सुटसुटीत शब्द प्रचलित आहे, असे सुचवू इच्छितो.
अशा परिस्थितीत, 'नवऱ्याची आई' असा आडवळणी उल्लेख, बाकी काही नाही, तरी डोळ्यांस खटकतो. म्हणजे, कोणी जर 'माझे वडील/बाबा/डॅडी/डॅड/तीर्थरूप' (किंवा अगदी 'माझा बाप'सुद्धा१) म्हणण्याऐवजी 'माझ्या आईचा नवरा' असे म्हणू लागला, तर जसे खटकेल, तसाच.
(तरी बरे, 'माझे वडील' आणि 'माझ्या आईचा नवरा' यांतून किंचित वेगळ्या अर्थच्छटा प्रतीत होऊ शकतात. त्यामुळे, तसा वेगळा उल्लेख क्वचितप्रसंगी सकारण असू शकतो.२ ते आपल्या जागी ठीकच आहे; परंतु, या ठिकाणी तशीही काही शक्यता दृग्गोचर होत नाही. त्यामुळे, 'नवऱ्याची आई' अशा आडवळणी परंतु विशेष उल्लेखाचे प्रयोजन समजत नाही. नाही म्हणजे, एवढा सुटसुटीत शब्द असताना इतके अधिक शब्द टंकायचे कष्ट नक्की का घ्यायचे?)
असो चालायचेच.
==========
१ यावरून आठवले. आमचा एक कॉलेजकालीन सन्मित्र, स्वतःच्या वडिलांचा उल्लेख (अत्यंत प्रेमाने) एक तर 'माझा बाप' असा तरी करीत असे, नाहीतर (दुसऱ्या टोकाला जाऊन) 'माझे जन्मदाते' किंवा 'माझे तीर्थरूप' असा तरी. मराठीतील अन्य कोणताही पर्याय त्या सद्गृहस्थास पसंत नव्हता. (किंबहुना, त्याचा 'माझे तीर्थरूप' असा उल्लेख उगाचच euphemistic वाटून जाई.) मात्र, त्यानेसुद्धा कधी 'माझ्या आईचे यजमान' असा उल्लेख केल्याचे स्मरणात नाही. असो.
२ उदाहरणादाखल, येशूचा (आकाशातला) बाप आणि येशूच्या आईचा नवरा या दोन पूर्णपणे भिन्न एंटिट्या होत्या. किंवा, उलट बाजूचे उदाहरण द्यायचे झाल्यास, 'राष्ट्रपिता' म्हणजे 'राष्ट्रमातापती' नव्हे. त्यामुळे, हे दोन शब्द नेमके समानार्थी नाहीत, हे उघड आहे.२अ
२अ फॉर द रेकॉर्ड, लोक जेव्हा 'माझी बायको'ऐवजी उगाचच 'माझ्या मुलाची(/मुलांची) आई' असा उल्लेख करतात, तेव्हा तेही असेच खटकते. पण लक्षात कोण घेतो?
आमच्या 'आईसाहेब' असा उल्लेख
स्वत:च्या आईकरता, आमच्या 'आईसाहेब' असा उल्लेख करणारे लोक मला प्रचंड मानभावी वाटतात पण असेल ब्वॉ काही घरात आईला, आईसाहेब म्हणायची पद्धत.
नवऱ्याची आई
बरोबर मुद्दा आहे.
याचं कारण मला नेमकं सांगता येणार नाही. पण झालं खरं.
कदाचित आम्ही घरात हिंदी बोलतो आणि एकमेकांच्या आयांना तुम्हारी आई मेरी आई असं संबोधतो म्हणून असेल. म्हणून मी डोक्यातल्या विचारांचं थेट भाषांतर केलं असेल.
याहीपेक्षा भयानक भाषांतरं केली आहेत त्यामुळे हे पटकन खटकले नाही मला.
सुरक्षित अंतर राखा.
मी असं करते कारण थेट संबंध नाकारता येतो. सुरुवात 'बाबांची आई' इथपासून झाली होती, म्हणे. पण जाणतेपणी 'बाबांची बहीण' अशी सुरुवात केली होती. नातं काय हे महत्त्वाचं नाही, संबंध कसे आहेत हे महत्त्वाचं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
हे तुमचे म्हणणे (तथा कारणमीमांसा) ठीकच आहे. परंतु, या ठिकाणी प्रतिसादिकेचा तसाही काही उद्देश जाणवला नाही, म्हणून म्हटले.
(नॉट दॅट इट इज़ एनी ऑफ माय बिझनेस, परंतु तरीही. केवळ कुतूहल म्हणा, वाटले तर.)
डोळे उघडणे
असं करण्यामागे किती तरी शक्यता असू शकतात, आणि मी ते लिहिलं तर कदाचित आणखी कुणी त्यांची काही कारणं लिहितील. आणि मग माझे डोळे आणखी उघडतील म्हणून लिहिलं. अगदी जॉन्सन अँड जॉन्सनची लस सध्यापुरती थांबवण्यामागे एक विचार आहे, तसंच! अगदी फायजरच्या लशीची शप्पथ!!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नैराश्य येते काही दिवसा नंतर
माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे.सर्व सोयी नी युक्त घर असले तरी काही दिवसांनी घरात थांबायचं कंटाळा येतो.
बाहेर निसर्गात जावे,पहिल्या सारखे मनसोक्त भटकंती करावी ही इच्छा तीव्र होते.स्वतंत्र हिरावून घेतल्या चा फिल येतो.स्वतंत्र ची किंमत lockdown मध्ये च समजली.
जे सजा भोगत असतात तुरुंगात ते कसे आयुष्य ढकलत असतील लहान खोली मध्ये ह्याचा विचार मनात आला.
फाशी पेक्षा पण तुरुंगवास ही शिक्षा भयंकर आहे ह्याची जाणीव झाली.
निरपराध व्यक्ती च्या वाट्याला ते आले तर त्याची मनस्थिती काय होत असेल असा पण विचार आला.
जॉगिंग ची खूप दिवसापासून ची सवय आहे ती चालू च ठेवली.कधी बिल्डिंग च्या आवारात कधी रस्त्यावर चालू च होत जॉगिंग.
पण मास्क घालून जॉगिंग करणे खूप कष्टाचे काम आहे श्वास घेणे अवघड होते आणि मास्क ओला झाल्यावर अवघड स्थिती होते.
प्रतेक महिन्याला दोन दिवस तरी गावी जाण्याची सवय आहे.
पण वर्षभर गावी गेलो नाही.
मध्ये थोड प्रमाण कमी झाल्यावर चार दिवस जावून आलो.
पॉझिटिव्ह.
जवळच्या लोकांपैकी बहुसंख्य जिवंत आहेत.
माझी आणि ओळखीच्या बऱ्याच जणांची नोकरी शाबूत आहे.
पण २०२०पेक्षा २०२१ साल काहीच्या काही वाईट सुरू आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
सुदैवी
गेल्या वर्षभरात... आणि विशेषतः गेल्या काही आठवड्यात मी किती सुदैवी आहे याची जाणीव झाली. लॉकडाऊनमुळे धकाधकीच्या प्रवासी नोकरीचे घरबसल्या आरामाच्या नोकरीत रुपांतर झाले, आमच्या मुलीचा जन्म झाला, घरून काम असल्याने 24 तास तिच्यासोबत वेळ घालवता येतो, (कोविडमुळे बाळंतपणात कुणाची मदत झाली नाही... पण घरी असल्याने मी बायकोला मदत करु शकलो), 2020 मध्ये माझ्या कंपनीत झालेल्या ले-ऑफमधून वाचलो - आता किमान वर्षभर बऱ्यापैकी सुरक्षित आहे, माफक पगारवाढही झाली, अगदी किरकोळ त्रासानंतर लशीचा पहिला डोस मिळाला, दुसरा डोस पुढच्या आठवडयात. हे सगळं पाहून survivors guilt म्हणतात तसं वाटतंय.