नीतीमत्ता - उपजत की संस्कारित?
एक स्वयंचलित ट्रॉली रेल्वेच्या रुळावरून वेगाने येत आहे. त्यामुळे रुळाच्या मध्यभागी खेळत असलेल्या पाच मुलांच्या जीवाला धोका आहे. अपघात होऊन पाची मुलं मरण्याची शक्यता आहे. आरडाओरडा करूनही उपयोग होणार नाही. धोका टाळण्यासाठी ट्रॉलीला दुसऱ्या रुळावर ढकलू शकणाऱ्या झडप यंत्रणेपाशी आपण उभे आहात. दुसऱ्या रूळाच्या मध्यभागीसुद्धा एक मुलगी एकटीच खेळत आहे. जर आपण ट्रॉलीसाठी रूळ बदलल्यास त्या मुलीचा जीव जाईल. रूळ न बदलल्यास मुलं मरतील. अशा प्रसंगी आपण काय कराल? पाच मुलांचा जीव वाचविण्यासाठी एका मुलीला बळी देणार की पाच मुलांना तसेच वाऱ्यावर सोडून देणार?
आपल्यापैकी बहुतेकांचा कल पाच जीव वाचविण्यासाठी एकीचा जीव घेतला तरी चालेल, असा असेल.
एक सुदृढ व्यक्ती हॉस्पिटलच्या आवारात शिरताना बघून ड्यूटीवरील नर्स आपल्या वरिष्ठ डॉक्टरांना फोनवर सांगू लागली. "सर, आपल्या येथे आता अत्यावस्थेतील पाच रूग्ण आहेत. त्यांच्यातील निकामी अवयव काढून अवयवारोपण केल्याशिवाय त्यांना वाचवणे अशक्य आहे. एकाला, मूत्रपिंड, दुसऱ्याला लिव्हर, तिसऱ्याला पुफ्फुस.... असे लागणार आहेत. आताच आपल्या हॉस्पिटलच्या आवारात एक धष्टपुष्ट अशी व्यक्ती शिरत आहे. जर त्याला मारून त्याचे अवयव काढून या रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यास हे पाचही जीव वाचतील. कृपया आपण त्याला मारण्यास अनुमती ध्यावी. "
जर तुम्ही डॉक्टराच्या जागी असता तर तुमचे उत्तर काय असू शकेल? तुम्ही अशा प्रकारची अनुमती कधीच देणार नाही.
वरील दोन्ही प्रसंगामध्ये पाच जीव वाचण्याची शक्यता आहे. परंतु पहिल्या प्रसंगात एकाला मारून पाच (कोवळे!) जीव वाचवण्यासाठी आपली पूर्ण संमती असेल. दुसऱ्या प्रसंगात मात्र पाच जीव वाचवण्यासाठी एकाला जिवेनिशी मारण्यास आपला ठाम नकार असेल.
सामान्यपणे जगभरातील बहुतांश लोकांचा निर्णय आपल्यासारखाच असेल. धर्म, भाषा, संस्कृती, शिक्षण, वय, लिंग, सामाजिक वा आर्थिक स्तर, करत असलेला व्यवसाय, इ.इ. कुठल्याही गोष्टीचा या प्रकारच्या निर्णयाला अडसर येणार नाही. तसा विचार करू लागल्यास या प्रकारच्या निकालाला कुठलाही तार्किक आधार नाही. आपण असे का निर्णय देत आहात या प्रश्नाला आपल्यापाशी उत्तर नाही. कदाचित आपल्यात उपजतच असलेली नीतीमत्ता आपल्या वर्तनाचे नियंत्रण करत असावे.
Source: Moral Minds: How Nature Designed Our Universal Sense of Right and Wrong, Marc Hauser, 2006
नीतीमत्ता उपजत असू शकते यासाठी आपण आपल्यातील भाषाज्ञानाविषयीचा मागोवा घेणे इष्ट ठरेल. नोऑम चॉम्स्की या भाषातज्ञाच्या मते जगभरातील माणसं हजारो प्रकारच्या बोली बोलत असले तरी या सर्व बोलींचे मूळ माणसाच्या जनुकीय इतिहासात कुठे तरी असायला हवे. कालांतराने त्या भाषा वेगवेगळ्या झाल्या असतील. परंतु या सर्वाना बांधून ठेवणारे एखादे समान सूत्र असले पाहिजे. भाषेप्रमाणेच नीतीमत्तेसंबंधीसुद्धा अशाच प्रकारचे विधान करणे शक्य आहे. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हापासूनच - भाषाज्ञानाप्रमाणे - नैतिकतेचे व्याकरणसुद्धा त्याच्या मेंदूत भिनलेले असते. कदाचित ती एक वेगळी व्यवस्था असू शकेल. या व्यवस्थेत काही अबोध - सुलभपणे हाती येऊ न शकणारे - तत्त्व असून त्याचा संबंध नीतीमत्तेशी जोडता येईल.
नैतिकता भाषेसारखीच आहे असे ठामपणे म्हणता येत नसले तरी एक सदृशता (analogy) म्हणून त्याकडे बघता येईल. मुळात नीतीमत्ता ही एक सर्वस्वी वेगळी व्यवस्था आहे. हा काही प्राथमिक शिक्षणाचा विषय होऊ शकत नाही. केवळ संस्कारातून नैतिकतेचे धडे देता येत नाहीत. परंतु मुलांना जसा भाषेचा खजिना उपजतच मिळत असतो, तशाच प्रकारे नैतिकतेचा खजिना मिळत असावा. हा खजिना उपजतच नसता तर मात्र प्रत्येक नैतिक पेचप्रसंगातून बाहेर पडण्यासाठी त्याच गोष्टीचा विचार करत बसावा लागला असता. इतर काहीही करायचे नाही अशी अवस्था झाली असती.
सर्व मानवी प्राण्यांना सामावून घेणाऱ्या एखाद्या अबोध अशा तात्विक चौकटीत राहूनच आपली नैतिक वैचारिक पद्धती विकसित झाली असण्याची शक्यता आहे. त्यातूनच इतरांना मदत करायचे की त्रास द्यायचे हे ठरत असावे. मात्र प्रत्येक संस्कृतीचे काही स्वतंत्र नियम असून त्यानुसारच कुणाला त्रास द्यायचे व कुणाला मदत करायचे हे ठरवले जात असावेत. नीतीमत्तेसाठी म्हणूनच अशा तत्त्वांचे पालन होत असण्याची शक्यता फार कमी आहे. सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी व आपल्या अस्तित्वावरच गदा येऊ नये यासाठी म्हणून नीतीमत्तेकडून उसने घेतलेल्या या गोष्टी असावेत.
मुळात नैतिकता सामान्यपणे काय करते? जाणते-अजाणतेपणाने सामाजिक गटांचे नियम-प्रथा ठरवत समाजाला पुढे नेण्याचे काम करते. यात अजाणतेपणा कुठून आला? जसा भाषेत येऊ शकतो तसा तो येथे आला आहे. एक मात्र खरे की नैतिकतेतील ही लवचिकता मानवी समूहगटांना एकत्रितपणे बांधून ठेवण्यात काही मर्यादेपर्यंतच यशस्वी होऊ शकते.
चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट हा 'जशास तसे'चा नैतिक नियम कदाचित सर्व संस्कृतीत सापडेल. "तुमच्याशी कुणी चांगले वागत असल्यास तुम्ही पण त्यांच्याशी चांगले वागा" हा परस्पर सहकारभाव सगळ्या समाजगटात प्रकर्षाने जाणवतो. "मला कुणी त्रास देत असल्यास त्याचा सूड घेणे" ही प्रत्येकाची मानसिकता असते. दुसऱ्यानी काही चांगले केल्यास आपणही त्याची परतफेड करावी ही मानसिकतासुद्धा आपल्यात असते. कदाचित या गोष्टी माणूस उत्क्रांत होत असतानाच आलेल्या असावेत. 'दुसऱ्याना मारू नये' ही गोष्ट मग जनुकीय असेल का? निश्चितच नाही. कारण यासाठी काही अटींचे पालन करावे लागते. आपण काहीना मारतो. सर्वांना नाही. या प्रकारच्या अटींकडे प्रत्येक समाजगटाचे आंतरिक व वा बाह्य वैशिष्ट्य म्हणून बघितल्या जातात.
धर्माच्या पुरस्कर्त्यांना नेहमीच धर्म व नीतीमत्ता या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असे वाटत आले आहे. नास्तिकांना नीतीमत्ता नसते, ही त्यांची ठाम समजूत आहे. परंतु यात काही तथ्य नाही. या जगाच्या कल्याणासाठी नास्तिकांनी पण खस्ता खाल्या आहेत. त्यांचाही सहभाग फार मोठा आहे. यासंबंधात एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. धार्मिक व नास्तिक यांच्यातील नैतिकतेच्या आकलनाची पातळी वेगवेगळी असू शकते का? याचे उत्तर निश्चितच नाही असे असेल.
निती मत्ता ही जन्मजात असते
निती मत्ता ही जन्म जात च असते.गुणसूत्र ती ठरवतात .शुध्द बिजा पोटी फळ रसाळ गोमटी.
हे 100% खरे आहे
.त्या मुळे जाती मध्ये च लग्न हे अगदी योग्य आहे किती ही नाकारले तरी माणसं माणसं मध्ये भेद आहे.
धर्म हा माणसाने नैतिकता सोडू नये म्हणून जे नैतिक अनैतिक ह्यांच्या टोकावर असतात त्यांच्या वर दबाव ठेवतो.
तुलना चुकत्येय ईथे.
तुलना चुकत्येय ईथे. पहिल्या उदाहरणात एकतर पाच किंवा एक यातलं कोणीतरी एक मरणार हे निश्चित आहे. पण दुसऱ्या उदाहरणात सुदृढ माणूस की पाच अत्यावस्थेतले रूग्ण जीव ही तुलना आहे. हां आता असं काहितरी असतं ना की "पाच अत्यावस्थेतले रूग्ण महिन्याभरात मरणारेत हे निश्चित. हा सुदृढ दिसणारा माणूस सुद्धा प्रत्यक्षात कर्करोगाने ग्रस्त आहे आहे आणि वर्ष-दोन वर्षात मरणारे हे नक्की. मग आत्ताच त्याचे अवयव वापरून पाच रुग्ण वाचवावेत का?" तर जरा तरी सारखेपणा वाटला असता.
हे असं थिऑरीटिकल डिस्कशन आपण प्रत्यक्षातल्या परिस्थितीला वापरणं फोल आहे असं वाटतं. "लोकाना माझा निर्णय कळणारे की नाही" हा पण फार मोठा फॅक्टर असतो ज्यामुळे अशा प्रत्यक्ष परिस्थितीत आपण फार वेगळे निर्णय घेतो! असो.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
बरोबर, तुलना गंडतीये.
बरोबर, तुलना गंडतीये.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
गंडतेय खरी, पण कारणं ती नाहीत.
फक्त मिसळपाव ह्यांचं उदाहरण पाहिल्यास तुलना गंडत नाही. फार वरवरचं कारण त्याला दिलेलं आहे.
मृत्यू म्हणजे ट्रेन. आपण काही न केल्यास तो त्या ५ लोकांचा अटळ आहे. आपल्याकडचा दुसरा पर्याय म्हणजे येत असणारा मृत्यू एका स्वतंत्र (म्हणजे, हे असलं काही होत नसतं तर अगदी भलत्याच) जिवावर ढकलायचा. लहान मुलीचा मृत्यू अटळबिटळ नाही. त्या सुदृढ सद्गृहस्थाचाही नाही. त्यामुळे ते कॅन्सरबिन्सर जरा चुकतंय. त्या मुलीला कॅन्सर असता तर कोणाचाही तो झडप बदलण्याचा निर्णय अधिकच दृढ झाला असता.
तुलना गंडतेय भलत्याच कारणामुळे. त्या मुलीला आपला मृत्यू कुठलातरी खटका ओढल्यामुळे होणार आहे हे माहीत नाही. हे सगळं १० सेकंदात होऊन जाणार आहे. माणूस फारच निगरगट्ट किंवा अगदीच (स्वघोषित) सात्विक सद्सद्विवेकी असेल तर खटका ओढून विसरून जाईल, केलं ते चांगल्यासाठीच केलं अशी स्वत:ची समजूत घालेल. शिवाय हे करणारा माणूस प्रथम चिंता करेल परिणामांची. एक झडप बदलून, पटकन पाठ फिरवून निघून जाणं आणि ह्या सगळ्यातून अगदी निर्दोष सुटणं फारच शक्य आहे. ह्याउलट एका धडधाकट माणसाचा बळी घेणं, त्याचे अवयव (जे परत जिवंत असतानाच काढून घेतले तर जास्त उपयोगी असतात म्हणे!) ते काढून घेणं, त्या ५ जीवांच्या शरिरांत प्रत्यारोपण करणं, हे सगळं प्रचंड जिकीरीचं, वेळखाऊ आणि कष्टप्रद आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीत लागणारा वेळ, थोडक्यात 'करून मोकळं होणं' हा भलताच मोठा घटक आहे.
दुसरं, अकॉम्प्लिस! मूळ उदाहरणात तुम्हाला कोणीही पाहणार नाही, कोणा भागीदाराची गरज नाही, मदत नकोय. दुसऱ्या उदाहरणात भरपूर डॉक्टर, भूलतज्ज्ञ, नर्स ही अख्खी फौज भागीदार असावी लागणार आहे. ह्यातलं कोणीतरी पचकून सगळ्यांना तुरुंगात पाठवेल ही भीतीही एक घटक आहे.
ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे, उदाहरण थोडं सविस्तर करू. इस्पितळ म्हणजे अनधिकृत, अवयवांचा सर्रास काळाबाजार करणारं इ. आहे. तुम्ही डीन (की काय ते) आहात. सगळे नर्स, वॉर्डबॉय, डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सामील आहेत. तेच पाच रूग्ण मरताहेत, प्रत्येकाला एकेक वेगवेगळा अवयव हवा आहे. एकच धडधाकट बेरोजगार, जो मेला तरी काही कायदा अजिबात मागे लागणार नाही असा मनुष्य त्याच वेळी इस्पितळात येतो. ह्याचा प्रत्येक अवयव धडधाकट आणि मरणोन्मुख माणसांना साजेसा आहे. ह्याला कापून हवा तो आयटम बाकीच्यांना दिला तरी काहीही (कायदेशीरदृष्ट्या) फरक पडणार नाहीए. तुम्हाला फक्त त्या फोनवर 'करा' किंवा 'नका करू' इतकंच म्हणायचंय.
अब आयेगा डिलेम्मा.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
नीतीमत्ता
अगदी लहान वयांत म्हणजे नीतीमत्ता म्हणजे काय हे ही न कळण्याच्या वयांत, प्रत्येक मूल वेगळे वागते. काही मुले जात्याच शांत स्वभावाची, कमीतकमी त्रास देणारी असतात तर काही अत्यंत आक्रमक, हट्टी, मारकुटी आणि लाड करुन घेणारी असतात. एकाच घरांतही, हा भावंडा-भावंडांमधला फरक कित्येकदा दिसून येतो. बहुतेकवेळा, ही मुले मोठी झाल्यावरही त्यांचा हाच स्वभाव टिकून रहातो. याचे कारण काय असावे ?
गुणवत्ता ,निती मत्ता
गुणवत्ता ही पण जन्म जात असते.
तेज बुद्धिमत्ता ही पण जन्मजात असते.
माणसात असणारे सर्व चांगले ,वाईट गुण हे जन्मजात च असतात
विविध कौशल्य आत्मसात करण्याची कुवत पण जन्मजात च असते.
ठरवून कोणाला बुध्दीमान करता येत नाही.
ठरवून कोणाला कोणत्या ही क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवता येत नाहीं.
अगदी किती आयुष्य असेल हे पण जन्मजात असते .
तुम्ही काय आहार घेता,कसे व्यायाम करता ह्याच्या शी काही देणेघणे नाही.
म्हणून दारू ,पिणारे किती तरी वर्ष जगतात आणि अगदी नॉनव्हेज पण न खाणारे पण अकस्मात जातात.
सर्व क्लास लावणारे बेअक्कल च राहतात आणि कोणतेच क्लास न लावणारे सर्व परीक्षा सहज पास होतात.