ट्रॅश - दिवाळी अंक आवाहन

ह्या वर्षी हा धागा काढायला जरा उशीर झाला आहे, म्हणून तुम्ही कदाचित सुस्कारा सोडला असेल तर तो परत घ्या. ह्या वर्षीसुद्धा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे. सध्यातरी आहे.

नेहमीप्रमाणेच, दिवाळी अंकात दर्जेदार असणारं कुठलंही साहित्य चालेल. कविता, कथा, फोटो, व्हिडिओ, अललित, आणखी काही, काहीही. शब्दमर्यादा, चित्रमर्यादा नाही. अगदीच अडीच चारोळ्या किंवा महाकाव्य आल्यास 'मर्यादा नाही' या विधानाचा पुनर्विचार करावा लागेल.

लेखन पाठवताना -

  • साहित्य संकल्पनाविषयकच असण्याची काहीही गरज नाही. पण संकल्पनेबद्दल लिहायचं असल्यास, त्याबद्दल विचार करायचा असल्यास आदूबाळ, अदिती, चिंतातुर जंतू, वगैरे नेहमीच्या यशस्वी लोकांना व्यनि करा.
  • ऐसीच्या इमेल पत्त्यावर पाठवल्यास उत्तम - aisiakshare@gmail.com
    (हे इमेल साधारण विकेण्डला तपासलं जाईल, दोन आठवड्यांत काहीच उत्तर न आल्यास ३_१४ विक्षिप्त अदिती हिला ऐसीवरच व्यक्तिगत निरोप पाठवा.)
  • मजकूर युनिकोडात टंकून पाठवा. पीडीएफ, हस्तलिखित असे फॉरमॅट वापरल्यास पुढची प्रक्रिया करणं अवघड जातं; ते टाळावे.
  • साहित्य पाठवताना गूगल ड्राईव्हवरून शेअर करणार असल्यास, ऐसीच्या इमेल आयडीला editor access दिल्यास डिजिटल "कचरा" कमी होईल.
  • लेखन, किंवा काहीही साहित्य शक्यतोवर फेसबुकवरून पाठवू नका.
  • साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख - ३० सप्टेंबर.

संकल्पना - ट्रॅश

trash ट्रॅश

'अभिरुची' म्हणताच लोकांना उच्चभ्रू किंवा छानछान काही तरी असणार असं वाटतं. (संस्कृत शब्द वापरलाय म्हणून कदाचित तसं असावं.) तसं पाहिलं तर, कोणती गोष्ट उच्च अभिरुचीची हा विषय विवादास्पद होऊ शकतो. उदा. काहींना पुलं म्हणजे उच्च अभिरुची वाटते, काहींना जीए, तर काहींना नेमाडे, आणि काही लोक ह्या तिघांहीकडे तुच्छतेनं पाहतात. पण काही गोष्टी हीन अभिरुचीच्या निदर्शक असतात हे अगदी सहजस्पष्ट असतं. उदाहरणार्थ, सुहास शिरवळकर, बाबा कदम, किंवा चंद्रकांत काकोडकर आवडणारे (जुन्या पिढीतले!) पुष्कळ लोक सापडतात, पण आपली अभिरुची उच्च असल्याचं आपल्या या आवडीतून सिद्ध होतं असा दावा करताना ते सहसा आढळणार नाहीत. असंच त्या काळातल्या योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर वगैरे लेखिकांच्या चाहत्या वर्गाबद्दल म्हणता येईल. हे केवळ साहित्यापुरतं मर्यादित नसतं. दादा कोंडके यांचे सिनेमे जनमानसावर भुरळ टाकणारे होते, पण उच्च अभिरुचीचा आरोप त्यांना सहन झाला नसता. नंतरच्या काळात महेश कोठारे यांचे सिनेमे किंवा लक्ष्मीकांत बेर्डे - अशोक सराफ या जोडगोळीचे विनोदी सिनेमे यांच्याबाबतही तसंच म्हणता येईल. हिंदीत असंच आधी मिथुन चक्रवर्ती, रामसे बंधू, मनमोहन देसाई किंवा नंतर गोविंदा - करिश्मा कपूर वगैरेंच्या सिनेमाबाबत म्हणता येतं. थोडक्यात सांगायचं तर, कोणत्याही काळात, आणि विविध कलाप्रकारांत ‘हीन अभिरुचीच्या अभिव्यक्ती’ असं ज्यांचं सरळसरळ वर्गीकरण करता येतं अशा गोष्टी अस्तित्वात असतात.

एका काळानंतर मात्र अशा गोष्टींना काही एक मूल्य प्राप्त झालं. उदा. भाऊ पाध्ये यांनी मुंबईतल्या टपोरी पोरांच्या विश्वाचं चित्र ज्यात रेखाटलं ती ‘वासूनाका’ कादंबरी उच्च दर्जाचं साहित्य मानली जाते. हळूहळू काळ बदलला तसं आपल्याला काही गोष्टी आवडत होत्या याची कबुली देणं लोकांना लज्जास्पद वाटेनासं झालं. काही वेळा तर त्या ‘पल्प’ अभिव्यक्तींविषयी केवळ स्मरणरंजनच नाही तर जणू त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रकारही दिसू लागले. उदा. ‘पल्प फिक्शन’ या क्वेंटिन टारांटिनो दिग्दर्शित चित्रपटात जुन्या गुन्हेगारी कथांचे फॉर्म्युले वापरले आहेत, पण हा चित्रपट मात्र अनेक उच्च अभिरुचीच्या लोकांना प्रिय असतो.

विज्ञानातही ट्रॅश दिसतंच. नोबेलपारितोषिकविजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लायनस पॉलिंग क जीवनसत्त्व खूप प्रमाणात खात असे, रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हावी म्हणून. गायीच्या शेणामुळे किरणोत्सार रोखता येतो, हे संशोधन काही वर्षांपूर्वी प्रकाशात आलं होतं. Annals of Improbable Research नावाचं विनोदी नियतकालिक चालवणारं मंडळ दर वर्षी लोकांना हसवणाऱ्या आणि विचारात पाडणाऱ्या संशोधनाला इग्नोबेल पुरस्कार देतं.

तर अशा विविध काळांतल्या, विविध संस्कृतींतल्या आणि विविध कलाप्रकारांतल्या ‘पल्प’ किंवा ‘ट्रॅश’ अभिरुचीकडे गंभीरपणे (किंवा टारगटपणेसुद्धा!) पाहता येईल का? त्यांच्या लोकप्रियतेचं आकलन अधिक व्यापकपणे करता येईल का? नक्की कशामुळे त्या अभिव्यक्तींचा प्रवास ‘ट्रॅश’कडून अभिजाततेकडे किंवा दर्जेदार कलाकृतींकडे होतो (किंवा होत नाही), हे समजून घेता येईल का?

-- ३० सप्टेंबर. तारीख लक्षात ठेवा. --

field_vote: 
0
No votes yet

> नक्की कशामुळे त्या अभिव्यक्तींचा प्रवास ‘ट्रॅश’कडून अभिजाततेकडे किंवा दर्जेदार कलाकृतींकडे होतो (किंवा होत नाही), हे समजून घेता येईल का?

संकल्पना चांगली आहे. संपादक मंडळाला अंकासाठी शुभेच्छा. जाता जाता एक सूचना करावीशी वाटते. ह्या दिवाळी अंकासाठी जे टाकाऊ लेख येतील ते परस्पर ‘मिसळपाव’ कडे पाठवून द्यावेत. आणखी शंभरेक वर्षांनी (कदाचित) ते अभिजात आणि दर्जेदार मानले जातील, पण सुदैवाने तेव्हा आपण कुणी हयात नसू.

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

जाता जाता एक सूचना करावीशी वाटते. ह्या दिवाळी अंकासाठी जे टाकाऊ लेख येतील ते परस्पर ‘मिसळपाव’ कडे पाठवून द्यावेत.

का बुवा???

‘मिसळपाव’ या संस्थळाने तूर्तास आपले व्यक्तिशः आणि/किंवा प्रस्तुत संकेतस्थळाचे नक्की काय घोडे मारले?

(‘मिसळपाव’ या संस्थळाबद्दल कोणतेही प्रेम उतू चाललेले नाही, परंतु) या असल्याच आचरटपणाचा (संपादकीय/प्रशासकीय स्तरावरून (अर्थात पडद्याआडून)) अतिरेक हा एका एकेकाळच्या सन्माननीय तथा प्रथितयश संस्थळाच्या विनाशास कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांपैकी होता, याचे मी आपणांस स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे काय? (‘ऐसीअक्षरे’चीसुद्धा पुढेमागे तीच गत व्हावी, अशी आपली मनापासून इच्छा आहे काय?)

(१) आपण ‘ऐसीअक्षरे’च्या संपादनमंडळावर नाही, आणि (२) प्रस्तुत विधान आपण ‘ऐसीअक्षरे’च्या वतीने/अधिकृतरीत्या केलेले नाही, अशी मनापासून आशा. (तरीसुद्धा प्रस्तुत विधान निषेधार्ह आहे, असे मत प्रकट करू इच्छितो. ‘ऐसीअक्षरे’ या संस्थळास या पातळीवर उतरण्याची कोणतीही गरज दृग्गोचर होत नाही (चूभूद्याघ्या.), असे मनापासून वाटते. अगदी ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्या’च्या नावाखाली वाटेल ती घृणास्पद विधाने खपवून घेण्याची प्रस्तुत संस्थळाची पूर्वपरंपरा लक्षात घेतली, तरीसुद्धा प्रस्तुत विधान अप्रस्तुत वाटते. घृणास्पद नसले, केवळ माफक बदबूदार असले, तरीही. हा प्रघात/पायंडा प्रस्तुत संस्थळावर पडणे संस्थळाच्या दीर्घकालीन हिताकरिता पोषक असावे, असे वाटत नाही.)

(‘मिसळपाव’करिता नाही, तरी निदान) ‘ऐसीअक्षरे’करिता (तरी) असले प्रकार थांबवा, अशी कळकळीची विनंती!

अधिक काय लिहिणे?

आणखी शंभरेक वर्षांनी (कदाचित) ते अभिजात आणि दर्जेदार मानले जातील, पण सुदैवाने तेव्हा आपण कुणी हयात नसू.

त्यापेक्षा, ते येथेच प्रकाशित केले, आणि शंभर वर्षांनंतर (अनेक प्रथितयश वर्तमानपत्रे पूर्वी (केवळ आपण शंभर वर्षांहून अधिक जुने आहोत, याची टिमकी वाजविण्यासाठी – भले सद्यकालीन दर्जा कितीही भिकार असो!) जेणेकरुन ‘शंभर वर्षांपूर्वी’-छाप सदरे चालवीत असत, तद्वत) मागोवा म्हणून ते पुनःप्रकाशित केले, तर ते अधिक चांगले होणार नाही काय?

की ‘ऐसीअक्षरे’ हे संकेतस्थळ शंभर वर्षांपर्यंत टिकेल, याची आपणांस शाश्वती वाटत नाही?

(आणि, प्रस्तुत लेख हे ‘मिसळपाव’ किंवा अन्य संस्थळावर पाठविल्यास – आणि अर्थात त्या संस्थळाने ते प्रकाशित केल्यास – शंभर वर्षांनंतर यदाकदाचित जर ते दर्जेदार मानले गेले, तर त्याबद्दलचे सर्व ब्रॅगिंग राइट्स त्या संस्थळास प्राप्त होतात. त्याने ‘ऐसीअक्षरे’स नक्की काय फायदा?)

असो चालायचेच.

पुर्वी हा उल्लेख स्वस्तखाद्यनामधारी असा होत असे. Lol

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

या सूचनेमुळे ज्यांच्या अलवार, ऋजु व कोमल मनाला प्राणांतिक क्लेश झाले असतील त्यांच्यासाठी पर्यायी सूचना:

‘मिसळपाव’ ने त्यांच्याकडे आलेले उत्तम लेख इथे पाठवावेत अशी माझी त्यांना विनंती आहे. आणखी शंभर वर्षांनी कदाचित ते हीन अभिरुचीचे व टाकाऊ समजले जातील, पण सुदैवाने तेव्हा आपण कुणी हयात नसू.

दोन्ही दिवाळी अंकांना माझ्या शुभेच्छा.

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

या कट्टी ची कोणी मिपावर गांड. मारली आहे काय?
म्हणजे एवढं दुखायाच काय कारण असेल ?

लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम सुरुवातीला बनवणारा लिनस टोरवाल्डस क-जीवनसत्त्व खूप प्रमाणात खातो, रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हावी म्हणून.

नोबेलपारितोषिकविजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लायनस पॉलिंग हा (१) रोगप्रतिकारकशक्तीकरिता मोठ्या प्रमाणावर ‘क’ जीवनसत्त्व स्वतः खात असे, आणि (२) (विशेषतः सर्दीविरुद्ध) रोगप्रतिकारकशक्तीकरिता मोठ्या प्रमाणावर ‘क’ जीवनसत्त्वाच्या भडिमाराचा पुरस्कार करीत असे, इथवर ऐकून होतो. लायनस टोरवाल्ड्स हासुद्धा रोगप्रतिकारकशक्तीकरिता मोठ्या प्रमाणावर ‘क’ जीवनसत्त्व खातो, हे नवीन होते.

(अवांतर: लायनस टोरवाल्ड्सचे नाव लायनस पॉलिंगवरून ठेवण्यात आलेले होते, असे विकीपीडिया सांगतो. याव्यतिरिक्त या दोन लायनसांचा काहीही परस्परसंबंध – तथा, लायनस टोरवाल्ड्स हा रोगप्रतिकारकशक्तीकरिता मोठ्या प्रमाणावर ‘क’ जीवनसत्त्व खात असल्याचा कोणताही उल्लेख – आढळत नाही. (चूभूद्याघ्या.))

(परंतु, चालायचेच. हा लायनस काय, नि तो लायनस काय, सारखेच. लायनसला लायनस जुळल्याशी मतलब. इथे कोणाला पत्ता लागणार आहे? आणि, उल्लेख सापडत नसला, म्हणून काय झाले? खात असेलही खाजगीत, आपल्याला काय ठाऊक? आपल्याला सांगायला थोडाच येतो, की बाबा रे/बाई ग, आज मी ३००० मिग्रॅचा ‘क’ जीवनसत्त्वाचा डोस मारला, म्हणून? आणि, तसेही, इथे कोण मरायला तपासायला जाणार आहे? सबब, ठोकुन देतो/देते ऐसा/ऐसी जे…)

–––––

या अशाच प्रकारच्या भिकार लेखनाचे मूल्यमापन अपेक्षित आहे काय? (परंतु… याचा अद्याप अभिजाततेकडे प्रवास झालेला नाहीये, हो! आणि, समजा होणारही असला, तरी हे असले भिकार लेखन ‘मिसळपाव’ वा अन्य संस्थळाकडे नक्की का पाठवायचे, हेही समजत नाही. असो.)

नोबेलपारितोषिकविजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लायनस पॉलिंग

चूक दाखवून दिल्याबद्दल आभार. आता दुरुस्त केले आहे.

शुभेच्छा !

*********

उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभाए |
जनम मरन का मेल है सपना, ये सपना बिसरा दे |
कोई ना संग मरे ...

संपादक मंडळींचा रोष पत्करून हे लिहित आहे,
एक साधे दिवाळी अंकाच्या लेखांसाठी आवाहन ते काय पण ती संधी साधून मराठीतल्या
काही लेखकांवर कठोर टीकासत्र सोडण्यात आले आहे. चालायचेच. शेवटी गुरुवर्य बाघा
महाराजांनी म्हटले आहे ते खरेच आहे, "शेठली, जिसकी जैसी सोच!"
नवोदित लेखकहो तुम्हाला प्रोत्साहित करण्याऐवजी नाउमेद करणारा हा लेख मनावर घेऊ
नका.
ऐसीच्या इमेल आयडीला editor access दिल्यास डिजिटल "कचरा" कमी होईल.>>
तुमच्या लेखाला कचऱ्याचा दर्जा दिला गेला आहे. ठीक आहे पण निराश होण्याचे कारण
नाही.
अनेक सुप्रसिद्ध लेखकांच्या ज्या लिखाणाला संपादकांनी कचऱ्याची टोपली दाखवली होती,
ती पुढे जाऊन वाचकांनी डोक्यावर घेतली. अश्या काही कादंबऱ्या तर अभिजात म्हणून
गणल्या गेल्या.
उदा. "ड्युन" ही कादंबरी! विज्ञान कथांचा राजा म्हणून जाणली जाते. फ्रॅंक हर्बर्ट ह्या
लेखाच्या
215,000.शब्दांच्या ह्या कादंबरीला हात लावायला कोणी "संपादक" तयार नव्हता. लेखक
आणि त्याचा एजंट निराश झाले होते. शेवटी मोटारगाड्यांची रिपेअर मॅन्युअल छापणाऱ्या
--Chilton Publishing --प्रकाशकाने ही कथा प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले. त्या आधी
२३ "संपादकांनी" ही कथा नाकारली होती आणि trash केली होती. आज पर्यंत ह्या
पुस्तकाच्या २० मिलिअन प्रती खपल्या आहेत! बारा भाषेत ही कथा भाषांतरित झाली आहे.
शनी ग्रहाच्या टायटन नामक उपग्रहाच्या काही भागांना ह्या कथेतल्या कल्पित ग्रहाच्या
भागांची नवे दिली गेली आहेत.
"हॅरी पॉटर" J.K Rowling ही बारा "संपादकांनी" नाकारली होती. अखेरीस "ब्लूम्सबरी" च्या
संपादकाच्या आठ वर्षाच्या मुलीच्या आग्रहाखातीर ह्या कथेच्या पहिल्या भागाचे प्रकाशन
झाले. आता आपण असे म्हणू शकतो की आठ वर्षाची मुलगी, तिला काय अभिजात
साहित्याची जाण?
Joanne Harrisच्या Chocolat ची अशीच गोष्ट आहे. ही कथा इतक्या वेळा रिजेक्ट

झाली की त्या पत्राची एकावर एक रचून लेखिकेने एक शिल्प तयार केले.
James Joyceची Ulysses, ची ही हीच कहाणी आहे. ह्या कथेच्या पहिल्या आवृत्तीची
एक प्रत काही वर्षांपूर्वी £275,000 ला विकली गेली.
आता हा घ्या टी एस इलिअट-- जेव्हा ते फेबर आणि फेबर प्रकाशनाचा "संपादक" होता.
"संपादक" झाल्यामुळे त्याचे विचार बदलले. ह्यांनीच जॉर्ज ऑर्वेलचे "अनिमल फार्म" नाकारले
होते. जोसेफ हेलरचे कॅच-22 असेच कुणा अहंमन्य संपादकाने झादाकारले होते. आणि John
le Carréची पहिली वहिली हेर कथा "The Spy Who Came in from the Cold" एका
प्रकाशकाने दुसऱ्याला पाठवली, ".... ह्या लेखकात काही दम नाही."
हर्मन मेल्वील च्या मॉबी डिक चे नकारपत्र तर प्रसिद्ध आहे. संपादक लेखकाला लिहितो की
"ह्या कथेत देवमाशाची गरज आहे काय?"
तर माझ्या लेखक मित्रांनो तुमची कथा जरी कचऱ्याच्या डिजिटल टोपलीत गेली तरी
निराश होऊ नका.
काही असो मी माझी कथा पाठवणार आहेच. संपादक प्रसिद्ध करोत वा नाकारोत, वाचक
वाचोत वा न वाचोत. कारण डॉ. सर भवभूती ह्यांनी म्हटले आहेच की
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः ।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥

ऐसीच्या इमेल आयडीला editor access दिल्यास डिजिटल "कचरा" कमी होईल.>>

इथे उल्लेख केलेला डिजिटल कचरा म्हणजे संकल्पनेत वर्णन केलेलं ट्रॅश नाही; तर एकाच लेखाची एकापेक्षा अधिक व्हर्जन्स असू नयेत; यासाठी आहे ते तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं कसं वापरता येईल याचा उल्लेख आहे.

अनेक सुप्रसिद्ध लेखकांच्या ज्या लिखाणाला संपादकांनी कचऱ्याची टोपली दाखवली होती,
ती पुढे जाऊन वाचकांनी डोक्यावर घेतली. अश्या काही कादंबऱ्या तर अभिजात म्हणून
गणल्या गेल्या.

ह्याचा ऊहापोह तर अगदी संकल्पनेतच फिट्ट बसेल.

संपादक मंडळींचा ह्या प्रतिसादावर काहीही रोष नाही. आपली मतं, आणि विरोधी मतंही जरूर लिहा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसीच्या इमेल आयडीला editor access दिल्यास डिजिटल "कचरा" कमी होईल.>>
तुमच्या लेखाला कचऱ्याचा दर्जा दिला गेला आहे. ठीक आहे पण निराश होण्याचे कारण
नाही.

प्रतिसादाच्या ह्या भागाबद्धल "हघ्याहेवेसांन" दिसलं नाही म्हणून -

डिजिटल "कचरा" हे शब्दप्रयोजन एखाद्या लेखाच्या साहित्यमूल्याला उद्देशून नसून कोणत्याही डिजिटल ऑब्जेक्टला उद्देशून आहे.

---

गूगल डॉक्स ची editor access (आणि प्रसंगानुरूप view access) ही सुविधा खरंच चांगली आहे. अर्थात ती मूळची गूगलची कल्पना आहे का याची कल्पना मला नाही. ऐसीला या प्रकारे लिखाण पाठविण्याची कल्पना आवडली.

जाता जाता एक सूचना करावीशी वाटते. ह्या दिवाळी अंकासाठी जे टाकाऊ लेख येतील ते परस्पर ‘मिसळपाव’ कडे पाठवून द्यावेत. आणखी शंभरेक वर्षांनी (कदाचित) ते अभिजात आणि दर्जेदार मानले जातील, पण सुदैवाने तेव्हा आपण कुणी हयात नसू.

असल्या ट्रॅश विधानाची मांडणी ऐसीवर व्हावी हे पाहून एक ऐसीकर म्हणून खेद वाटला. एक ऐसीकर म्हणून मी मिपाकरांची क्षमायाचना करतो.

संपादक मंडळाला विनंती - सदर प्रतिसाद काढून टाकू नये, पण सदर प्रतिसादकास ऐसीवर प्रतिबंधित करण्यात यावे.

मागणी बरोबर आहे

हा प्रकार अस्तित्वात नाही .जे सुचते ते लिहावे.

प्रतेक माणसाची अनेक व्यक्तिमत्त्व असतात
दाखवण्याची वेगळी आणि खरी वेगळी.
उच्च अभिरुची चे व्याख्या करणारे च सेक्स स्टोरी चे वाचक असतात.
त्या मुळे जी तुमची प्रतिभा आहे जे तुम्हाला सुचते ते दिवाळी अंकात लिहावे असे मला वाटत.
फक्त समाज घटकात द्वेष निर्माण होईल असे सत्य असले तरी लिहू नका .

हे पुस्तक वाचायलाच हवं. काकोडकरांना माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीत टाकतो आहे. इतकं जबरी टायटल देणं हे सोप्प काम नाही. त्याला जब्री जिगर हवी.
----------------

ट्रॅश लिखाण असं काही नसतं ह्या मताशी संपूर्ण सहमत. "कालचं जेवण ही उद्याची बुरशी असते" असं बिभीषण सातपुते म्हणालेच आहेत. तद्वतच मी म्हणतो की आजचं उच्चभ्रू लिखाण हे उद्याचं ट्रॅश आहे आणि कालचं उच्चभ्रू लिखाण हे परवाचं

ट्रॅश लिखाण असं काही नसतं ह्या मताशी संपूर्ण सहमत. मी पण.
हे पहा स्टीफन किंग काय म्हणतो आहे.
“Writing isn't about making money, getting famous, getting dates, getting

laid, or making friends. In the end, it's about enriching the lives of those

who will read your work, and enriching your own life, as well. It's about

getting up, getting well, and getting over."
माझ्यासाठी ह्या व्याख्येत बसणारे सर्व "साहित्य." कृपया त्यात उच्च आणि हुच्च असा

भेदभाव कशापायी?
जाता जाता बाबुराव अर्नाळकरांंचा "झुंझार" माझा फेवरीट हिरो.

कुठेशी वाचलेलं विंदांचं वाक्य लक्षात राहिलं आहे

वाचकांचे अनेक थर आहेत , यातला कोणताही एक थर वंचित ठेवणे हे पाप आहे . अशी कल्पना करा की , वाङ्मय हे एक जंगल आहे . चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते . त्या बागेच्या रचानेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात . पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलंही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत . जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहिजेत .

जेम्स हॅडली चेस याच्या लेखनाला मी ट्रॅश मानत नाही. कारण इन्ग्रजी वाचनाची सुरवात तरी त्याच्यामुळेच झाली.

सहमत. त्याच्या मुळे माझ्या कित्येक लांब पल्ल्याच्या रेल यात्रा सुसह्य झाल्या आहेत.

रस्त्यावरच्या टपरीत मिळणाऱ्या वडा पाव ,हिरवीगार मिरची आणि कडक मीठ्या चहाची चव फाईवस्टार " अभिजात" हाटेलात मिळेल काय? किंवा एस टी स्टॅंड वरची कांदा भजी! अहाहा!

"सूचना
वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल."
मिपा वरील सद्यस्थिती!

जिथली धुणी तिथे धुवायची असतात. अर्थात, Common sense isn't common हे सिद्ध करण्याचा वसा घेतला असेल तर ती बाब निराळी.

माझा Common sense मला एवढेच शिकवतो की कमरेखालील प्रतिसाद देऊ नयेत. त्याच्या वर निधडी छाती असते , "मान" -सन्मान असते, बुद्धिमान डोके असते हे लक्षात असावे. हा सुसंकृत Common sense आहे.
एक कमरेखालील प्रतिसाद आला. त्याचा उगम शोधायला गेलो तर हे दिसले. निव्वळ serendipity.
आता तो आय डी ऐसी वरचाही असू शकतो अस माझा Common sense सांगतो.
Common sense झिंदाबाद!

आपल्याला कुणाचं लेखन आवडतं, आणि कोण ट्रॅश नाही, याची चर्चा इथे करण्यापेक्षा अशा लेखकांना आणि/किंवा त्यांच्या लेखनाला लोक ट्रॅश का म्हणतात, आणि ते आपल्याला ट्रॅश का वाटत नाही; याबद्दल अंकासाठी लेखन करा की! हेच खाद्यपदार्थांबद्दल! तेच रॅप किंवा 'पोरी जरा जपून दांडा धर' छाप गाण्यांबद्दल! तेच संस्थळांबद्दल... कुठल्याही अभिव्यक्ती, वस्तू, सेवा, कशाहीबद्दल.

लेखातून जे काही म्हणलेलं आहे ते मला किंवा कुणाही संपादकांना नाही पटलं तरी चालेल. फक्त साहित्यिक मूल्य, दर्जा असू द्या की झालं!

बाकी सगळ्यांचं सगळं बरोबर आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरोबर. उगाचच आपली शक्ती व्यर्थ जाण्यापेक्षा जे आपण लिहीले आहे त्यावर आलेल्या प्रतिक्रीया अंगावर न घेता आपले लिखाण चालू ठेवणे हितकारी असते.
अन ट्रॅशबाबत हे की, आज मला टाकाऊ वाटते तेच मला उद्या उपयोगी वाटेल किंवा त्याचे विरूद्धही होऊ शकते.
राहता राहिला तुमची शंका अन प्रतिसाद:
ज्याची तुम्ही अपेक्षा करतात ते केवळ एक माध्यम आहे. उद्या ते येथेही घडू शकते.

याहू गृप गेले, ऑरकूट गेले, उद्या फेबूही जाईल.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही