सहस्त्रचंद्रदर्शनाविषयी माहिती हवी आहे
पुढच्या शुक्रवारी २६ डिसेंबरला माझा मामा वयाची ७९ वर्षे पूर्ण करून ८० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. माझा मामा आमच्या सगळ्या विस्तारीत हत्ती परीवाराचा प्रमुख असल्याप्रमाणे आहे आणि त्याच्या शब्दाबाहेर कोणी नसते. त्याचा सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहळा करायचे मनात आहे. दरवर्षी १२ पौर्णिमा आणि अधिक महिना असेल तर त्या वर्षी १३ पौर्णिमा प्रमाणे जन्मापासून एक हजारावी पौर्णिमा असेल त्या दिवशी सहस्त्रचंद्रदर्शन करतात इतकेच माहिती आहे. ही हजारावी पौर्णिमा ८०-८१ व्या वर्षात कधीतरी येते. त्या व्यक्तीने जन्मल्यापासून एक हजार वेळा पौर्णिमेचा चंद्र बघितला आहे म्हणून तो सोहळा सहस्त्रचंद्रदर्शन.
ऐसीकरांकडून पुढील माहिती हवी आहे:
१. हा सोहळा नक्की एक हजाराव्याच पौर्णिमेला करायचा की थोडेफार इकडे-तिकडे चालते?
२. समजा हा सोहळा एक हजाराव्या पौर्णिमेलाच करायचा असेल तर मामाची जन्मतारीख २६ डिसेंबर १९४६ पासून आतापर्यंत किती पौर्णिमा झाल्या आहेत याची माहिती नक्की कुठे मिळेल?
३. या सोहळ्यात नक्की काय काय करायचे असते? आमचा हत्ती परीवार खूप मोठा आहे आणि आम्ही सगळे हत्ती म्हटल्यावर पुख्खे झोडणे होईलच. पण त्याव्यतिरिक्त काही करणे अपेक्षित असते का?
४. पूर्वी महत्वाच्या दिवशी महत्वाच्या व्यक्तींची सुवर्णतुला करायचे. सुवर्णतुला करता येणे शक्य नाही. पण मामाची गहू, तांदूळ, साखर वगैरे पदार्थांनी तुला करायची आहे आणि ते पदार्थ सामाजिक संस्थांना- अनाथाश्रम किंवा वृध्दाश्रम अशा ठिकाणी दान करायचे आहेत. सहस्त्रचंद्रदर्शनात अशी तुला नसली तरी आम्ही त्या दिवशी ते करायचा विचार करत आहोत. त्यासाठी लागणारा मोठा तराजू कुठे भाड्याने मिळू शकेल का? तराजू भाड्यानेच हवा आहे विकत नको कारण नंतर त्या तराजूचे करायचे काय हा प्रश्न होईल. आम्ही सगळे हत्ती खेळीमेळीने आणि कसलेही टेन्शन न घेता धमाल करत राहतो आणि सगळ्यांच्या तब्येतीही सुदैवाने चांगल्या आहेत त्यामुळे आम्ही सगळे सेंचुरी झळकाविणार याविषयी शंका नाही. आमच्या विस्तारीत परीवारात पुढचे सहस्त्रचंद्रदर्शन होईल माझ्या मेहुण्याच्या काकांचे. त्यालाही चार वर्षे आहेत. मग मामाचा शंभरावा वाढदिवस आणखी २१ वर्षांनी. तोपर्यंत त्या तराजूचे काय करायचे हा प्रश्न आहे.
५. सोहळ्यानिमित्ताने अहेर, मानसन्मान वगैरे सगळ्यांचे होतीलच. पण या दिवशी मानाच्या नातेवाईकांना कोणत्या भेटवस्तू द्याव्यात अशी कोणती प्रथा आहे का? मुलीच्या लग्नात मामाने पिवळी साडी घेऊन द्यायची असते अशी प्रथा आहे. त्याप्रमाणे सहस्त्रचंद्रदर्शनाच्या सोहळ्यात कोणा नातेवाईकाने काही भेट द्यायची किंवा दुसरे काही करणे अपेक्षित असते का?
याविषयी कोणाला माहिती आहे का?
१ आणि २: काय फरक पडतो?…
१ आणि २: काय फरक पडतो? दिर्घायुष्य लाभलंय त्याचा आनंद साजरा करताय ना? मग १०००, ९९८, ११०५ वेळा चंद्र बघून झालं तरी काय फरक पडतो? तसंही त्यानी १००० वेळा खरंच चंद्र बघितलाय का? !! आणि खरं म्हणजे आत्ताच्या काळात, वाढलेलं साधारण आयुर्मान लक्षात घेता, "१२०० (काहितरी वाढिव आकडा) चंद्रदर्शनाचा सोहळा" करणं जास्त संयुक्तिक नाही का होणार?
३. यज्ञ करायचा असतो, हजार हत्ती दान द्यायचे असतात, हजार सुवासिनीनी ओवाळायचं असतं .......... !! एकत्र जमा, खा-प्या, मजा करा, मामांच्या आठवणी सांगा, त्यांची मुलाखत घ्या, त्यांचं लहानपण कसं गेलं विचारा ....अशा अजून सतरा कल्पना मी तुम्हाला देऊ शकेन.
४. परत तेच. समजा बहात्तर किलो वजन असलं आणि तुम्ही सत्तर किंवा ऐंशी किलो पदार्थ दान केलात तर काय फरक पडणारे? आणि दान करणारात तर काचकुच न करता पाचशे किलोच दान करा की. फक्त पाचशे किलो गव्हाचं एखादा वृद्धाश्रम काय करेल, काही करू शकेल का? याचा विचार करा. खरं म्हणजे यातलं काही नको - रोख रक्कम द्या. अहो त्याना पोळ्या खात बसण्याऐवजी महिनाभर रोज कुल्फी खायचा आनंद जास्त महत्त्वाचा असला तर?
५. आहे तर. प्रत्येक नातेवाईकाने (आणि त्यानी नाही केलं तर तुम्ही) एकमेकाना अहेर (ज्याना याची काही गरज नाहीये) देण्याऐवजी अनाथाश्रमाला रोख पैसे द्यावेत. अहो आर्यक्रमाची आठवण म्हणून पुल, गदिमा, व्यंकटेश माडगुळकर, अनिल बर्वे, श्री ना पेंडसे, जिम कॉर्बेट, रिचर्ड फाईनमन वगैरे वगैरे मंडंळींची उत्तमोत्तम पुस्तकं भेट म्हणून द्या. अगेन, मी स्पेसिफिक नावं सुचवू शकेन.
तुमच्या मामाना शुभेच्छा. आणि जरा त्या 'सोहळा' मानसिकतेतून बाहेर येऊन उद्देश काय, आत्ताचा काळ काय आहे याचा विचार करून बघा - अजून बर्याच चांगल्या चांगल्या कल्पना सुचतील.
ता. क. खरडफळ्यावर तुमच्या हजार नोंदी झाल्या की "सहस्त्रहत्तीखरडदर्शनाच्या" कार्यक्रमाची माहीती विचारेन :-)))))
महिनाभर कुल्फी??????
अहो त्याना पोळ्या खात बसण्याऐवजी महिनाभर रोज कुल्फी खायचा आनंद जास्त महत्त्वाचा असला तर?
मालक, आपण वृद्धाश्रमांची गोष्ट करतोय, म्हटले! बोले तो, त्यातली अर्धी जनता मधुमेहग्रस्त असणार. त्यांना महिनाभर डोळे झाकून रोज कुल्फी जर दिली, तर… आनंद आहे.
आणि, मधुमेहग्रस्त अर्ध्या जनतेला जर कुल्फी दिली नाही, आणि त्यांच्यादेखत उरलेल्या अर्ध्या जनतेला जर ती दिली, तर… I hope you get my drift. You will end up inviting a bigger problem at hand.
एका अमेरिकन म्हणीची आठवण या निमित्ताने करून देऊ इच्छितो: No good deed goes unpunished.
असो चालायचेच.
खरं म्हणजे यातलं काही नको - रोख रक्कम द्या.
रोख रक्कम देता येईलही. परंतु, (त्या रकमेचे नक्की काय करायचे, याबद्दल तुम्ही काही विशेष सूचना दिल्याखेरीज) ती रक्कम वृद्धाश्रमाच्या जनरल फंडात जाणार. आणि, तिचा व्यय हा वृद्धाश्रमाच्या दैनंदिन खर्चांसाठी (यात कर्मचाऱ्यांचे पगार, विजेची बिले, किरकोळ दुरुस्ती, येथपासून ते सामान्य शिधाखर्च, येथपर्यंत सर्वच आले.) होणार. म्हणजे, एक तर त्या रकमेचे विशेष असे काही होणार नाही. (म्हणजे, ज्या वृद्धांसाठी म्हणून तुम्ही हे करीत आहा, त्यांना या रकमेचा tangible अतिरिक्त फायदा असा काही होणारच नाही. आणि, दुसरे (आणि त्याहूनही महत्त्वाचे) म्हणजे, दैनंदिन खर्चासाठी संस्थेला तुमच्या रकमेची गरज असेलच (पक्षी, दैनंदिन खर्चाकरिता तुमच्या रकमेवाचून संस्थेचे काही अडले असेलच), असेही नाही.
In which case, अशी रक्कम दिल्याने नक्की काय साध्य होते? (म्हणजे, तुमच्याजवळच्या अतिरिक्त पैशाची विल्हेवाट लावण्याची तुमची हौस फिटते, याव्यतिरिक्त?)
कुल्फी तेव्हा माझ्या डोक्यात आली
कुल्फी तेव्हा माझ्या डोक्यात आली म्हणून कुल्फी म्हंटलं हो नबा. त्याना दुसरं काही जास्त गरज असलेलं देता येईल हा मुद्दा.
आणि अगदी समजा "पोळ्याच करून खाणार" म्हणाले तरी ५०० किलो साठवायचे कुठे, गिरणीतनं दळून कधी/कसे आणायचे असे सुद्धा प्रश्न पडतील! "हत्तीराव ५०० किलो गहू/तांदूळ/साखर कचेरीत ठेउन चालते झाले आणि ते दान निस्तरताना चालकांच्या नाकीनउ आलं" असं होऊ नये एव्हढंच :-)
तसं तर मी पुस्तकं देण्याबद्दल लिहिलं ते
तसं तर मी पुस्तकं देण्याबद्दल लिहिलं ते सुद्धा सगळ्याना आवडेल / रुचेल असं नाही. कोणाकडे हि पुस्तकं असतील, वाचायचीच आवड नसेल, हापूस आंबा न आवडणारे लोकं आहेत तसा "बनगरवाडी" वाचून "भिकार पुस्तक आहे. छ्य्या, उगा वेळ फुकट गेला" म्हणून ते भिरकावणारा कोणी असेल .... पण आहेर देण्याला काही दुसरा पर्याय, अगदी १००% नेमका असेलच असं नाही, सुचला तर जरूर सांगा.
+/…
तसं तर मी पुस्तकं देण्याबद्दल लिहिलं ते सुद्धा सगळ्याना आवडेल / रुचेल असं नाही.
या मुद्द्यालासुद्धा मी स्पर्श करणारच होतो, परंतु, बरे झाले, तुम्हीच अगोदर केलात.
कोणाकडे हि पुस्तकं असतील, वाचायचीच आवड नसेल,
ते एक झाले. शिवाय…
हापूस आंबा न आवडणारे लोकं आहेत तसा "बनगरवाडी" वाचून "भिकार पुस्तक आहे. छ्य्या, उगा वेळ फुकट गेला" म्हणून ते भिरकावणारा कोणी असेल ....
हो, ते तर आहेच. परंतु त्याचबरोबर, फेनमन वाचून “छ्या! एक अक्षर कळेल तर शपथ!” किंवा “आता (या वयात) हे आणखी कोण वाचणार बुवा? नि कशाकरिता?” असे म्हणणारे अधिक आढळतील, याबद्दल खात्री आहे.
एक टिप: “अपात्री दान देऊ नये” असे आपल्यात म्हणतात बुवा. ते काही उगीच नाही.
पण आहेर देण्याला काही दुसरा पर्याय, अगदी १००% नेमका असेलच असं नाही, सुचला तर जरूर सांगा.
मुळात काही दान देण्यामागील impetus नक्की काय, असा मूलभूत प्रश्न मला पडतो.
हं, आपल्यात (म्हणजे हिंदू लोकांत), दान देणे हे पुण्यदायी, वगैरे आपण समजतो. तसे ते असेलही कदाचित. दान देण्याने तुमच्या खात्यातले पुण्य वाढत असेल, नि तुमची पापे धुवून निघून तुमच्या खात्यातून पुसली जात असतीलही. परंतु, याच्या दुसऱ्या बाजूचा विचार कधी केला आहेत काय?
(दान देणाऱ्याच्या दृष्टीने विचार केलात; आता) जरा दान घेणाऱ्याच्या दृष्टीने विचार करून पाहा. दान देऊन दान देणाऱ्याचे पाप धुवून निघाले खरे, परंतु, त्या पापाचे पुढे काय होते, असे वाटते? तर, ते पाप दान घेणाऱ्याच्या खात्यात जमा होते. दान देणारा दानाबरोबरच आपली पापेसुद्धा दान घेणाऱ्याच्या बोकांडी मारत असतो.
हं, दान घेणे हे कोणाकरिता necessary evil असू शकेलही. परंतु, it is, nevertheless, an evil, हेही त्याचबरोबर लक्षात ठेवले पाहिजे. (आणि म्हणूनच, गरजेशिवाय — किंबहुना, जीवनमरणाचा प्रश्न असल्याशिवाय — दान घेऊ नये, म्हणतात.)
पण लक्षात कोण घेतो?
(याचीच corollary म्हणून, कोणाला गरज असल्याशिवाय — किंबहुना, कोणाच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याशिवाय — केवळ द्यायचे म्हणून दान देऊ नये, असेही म्हणता येईल काय?)
whoa whoa, hold a sec!
whoa whoa, hold a sec! आहेर हा 'दान' नव्हे. प्रसंगाची काही आठवण रहावी म्हणून आहेर दिला/घेतला जातो. "धाकट्याच्या मुंजीत वन्सनी ह्या वाट्या दिल्या होत्या" वगैरे. त्यामुळे मीही पुस्तकं सुचवली खरी, पण त्यातल्या भानगडी लक्षात घेता कुठल्यातरी (योग्य अशा) संस्थेला पैसे द्यावेत कारण आठवण म्हणून हल्ली अशा प्रसंगात शेकड्यानी फोटो घेतले जातात. यजमानानी प्रत्येकाचा एखादा तरी नीटसा घ्यावा की झालं. नाहीच जमलं त्याना तर पाहुणे मंडळीनी आठवणीने घ्यावा. And my friend, with flourish, I now get to quote your lines here -
"पण लक्षात कोण घेतो?
असो चालायचेच." !!
बाय द वे, पापक्षालनार्थ दान / पुण्याचा बॅलन्स वाढवायला दान याला काही अर्थ नाही. आपल्याकडे आहे त्यातला थोडा वाटा ज्याच्याकडे नाहीये / कमी आहे त्याला द्यावं एव्हढ्याच उद्देशाने दान केलं तर त्याला अर्थ आहे. पण मला कोणी दान दिलं तर त्याच्या जोडीने पापाचा वाटा पण माझ्याकडे पोचता होतो ही चिंतेची गोष्ट आहे जी मला माहीत नव्हती!!
हा हा हा..
खरं आहे.
माझी आजी आणि तिच्या सगळ्या बहिणी अतिशय
खडूस होत्या. त्यांना वहिन्याही तितक्याच तोलामोलाच्या मिळाल्या होत्या. एका भाऊबीजेला माझ्या आजीच्या एका वहिनीने आजीच्या बहिणीला एक ब्लाऊज पीस पाठवलं. तर लगेच तिनं फोन करून "तुम्ही दिलेलं पोलक्याचं कापड मिळालं. त्यात माझं पोलकं बसत नाही" असं सांगितलं. त्यावर ती फाडकन म्हणाली "ते तुम्हीच मला दिलं होतं. त्यात माझा हातरुमालही बसत नाही".
वास्तविक मला जर कुणी ब्लाऊजपीस दिलं आणि त्यात माझं ब्लाऊज बसत नसेल तर मी डायटिंग करेन. पुढची पिढी फारच कमी सेल्फएस्टीम असलेली झाली.
‘अहेर’, ‘दान’, वगैरे… (अवांतर)
whoa whoa, hold a sec! आहेर हा 'दान' नव्हे.
अर्थातच नव्हे. हत्तीमंडळी सहस्रचंद्रदर्शनाला/वाढदिवसाला/अन्य कशाच्या निमित्ताने पुख्खे झोडायला जमली, आणि (१) जमलेल्या हत्तींनी उत्सवमूर्तीला, आणि/किंवा (२) उत्सवमूर्तीने जमलेल्या हत्तींना, स्वयंस्फूर्तीने/स्वेच्छेने काही भेटवस्तू देणे, यापैकी काही घडले, तर तो अहेर झाला; दान नव्हे. त्याचे dynamics आणि त्यामागील मनोभूमिका पूर्णपणे वेगळी आहे, हे अर्थातच मान्य आहे.
(उलटपक्षी, अशा एखाद्या उत्सवाच्या निमित्ताने एखाद्या हत्तीने रस्त्यातल्या येतील त्या हजार भिकाऱ्यांना (आमंत्रितांना नव्हे!) जर जेवणावळी घातल्या, तर ते दान होईल. त्यामागचे dynamics तथा मनोभूमिका वेगळी असेल, हे, मला वाटते, मान्य व्हावे.)
आपल्याकडे आहे त्यातला थोडा वाटा ज्याच्याकडे नाहीये / कमी आहे त्याला द्यावं एव्हढ्याच उद्देशाने दान केलं तर त्याला अर्थ आहे.
तर मग ते दान होऊ नये, मदत व्हावी. (दोहोंमधील सीमारेषा सूक्ष्म तथा धूसर आहे, हे खरेच; परंतु, ती तेथे कोठेतरी आहे, असा माझा अंदाज आहे. (चूभूद्याघ्या.))
(उलटपक्षी, दान/donation/charity वगैरे प्रकारांमागे, मनाच्या कोपऱ्यात कोठे ना कोठेतरी, (त्याबद्दल) आपल्याला कोणी चांगले म्हणावे/वाखाणावे/आपले (मनोमन का होईना, परंतु) आभार मानावेत/आपले नाव व्हावे/यातले बाकी काही नाही, तरी कोणाचे तरी ‘भले’ केल्याबद्दल आपले आपल्यालाच ‘बरे’ वगैरे वाटावे, अशी काही धारणा वा भावना असते, हे तुम्ही नाकाराल काय?)
दानाबद्दल ‘आपल्या संस्कृती’त कोणीसे असेही म्हणून गेलेले आहे, की दान असे द्यावे, की उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला कळू नये, म्हणून. माझ्या मते असे निरपेक्ष दान हे केवळ बेशुद्धावस्थेत (नपक्षी, vegetative स्थितीत) involuntarily घडल्यासच शक्य आहे. (पण मग, जाणीवपूर्वक जर केले नसेल, तर ते ‘दान’ कसे? किंबहुना, तो ‘आंधळे दळतेय, कुत्रे पीठ खातेय’मधला प्रकार ठरू नये काय?)
तर सांगण्याचा मतलब, कोणाला ‘मदत’ (तीसुद्धा, मागतोय म्हणून) अवश्य करा; ‘दान’ देऊ नका. (‘मदत’ हे एक विशुद्ध transaction आहे१. उलटपक्षी, ‘दान’ comes with a baggage, with strings attached.)
Ironically, दान हे एक पुण्यदायी महत्पाप आहे. (पाहा विचार करून.)
(काय मग? उद्या जर का बाबा, बुवा, वगैरे म्हणून करियर करायचे ठरविले, तर bearing जमतेय काय?)
१ तुला गरज होती, मला ती पुरविणे शक्य होते, तू विनंती केल्यावरून मी ती पुरविली; मामला खतम. आणखी कोठल्याही भानगडी त्यात नाहीत.
.
माझ्या सासरी गाय आणि डुक्कर हे दोन्ही प्राणी मनात येईल तिथे हुंदडत असतात. रोज सकाळी आमच्या बंगल्याच्या आजूबाजूच्या अग्रवाल तथा आणि कोणते कोणते वाल अशी आडनावं असलेल्या बायका त्यांच्या पोट्ट्यांना आधी डुकरं हाकलून लावायला सांगतात आणि मग खाली येऊन त्या भटक्या गायींना तूप लावलेली पोळी खाऊ घालतात.
आता चार कप्पी पोट असलेल्या सेल्युलोजवर जगणाऱ्या प्राण्याला पिठाचा पदार्थ लाटून भाजून तूप लावून देणे हे पुण्य आहे की पाप?
आणि मग डुकरांनी काय गुन्हा केला आहे?
मुंबईत तर घाटकोपर वगैरे भागात उजव्या हाताला एक गाय बांधून डाव्या हाताला गवताचा भारा ठेवतात. मधल्या मनुष्य प्राण्याला पैसे देऊन उजवीकडचं गवत (कारण ते विकत घेणाऱ्याच्या उजवीकडे येणार) डावीकडच्या गायीला द्यायचं. यानं पुण्य मिळतं. पण किमान इथे गायीने जे खायला हवं ते तरी तिला देत आहेत.
…
आणि अगदी समजा "पोळ्याच करून खाणार" म्हणाले तरी ५०० किलो साठवायचे कुठे, गिरणीतनं दळून कधी/कसे आणायचे असे सुद्धा प्रश्न पडतील! "हत्तीराव ५०० किलो गहू/तांदूळ/साखर कचेरीत ठेउन चालते झाले आणि ते दान निस्तरताना चालकांच्या नाकीनउ आलं" असं होऊ नये एव्हढंच :-)
अर्थात! (लग्नातल्या अहेरांचेसुद्धा अनेकदा हेच होते. म्हणूनच, शहाणे लोक (केलेच, तर) आयुष्यात एकदाच लग्न करतात.)
अवांतर: या अशाच अहेरांना (उदा. अर्धा टन गहू, वगैरे) ‘पांढरा हत्ती’ असे संबोधतात, नव्हे काय?
(प्रत्यक्षात ५०० किलो गहू/तांदूळ/साखर कचेरीत टाकण्याची काहीच गरज नाही. वृद्धाश्रम तसेही महिन्याला इतकेइतके किलो गहू/तांदूळ/साखर वापरीत असेलच. त्या हिशेबाने बाजारभावाने पैसे दिले (खर्च उचलला), की काम भागले. (परंतु, कशासाठी? हा प्रश्न उरतोच.))
लहानपणीची आठवण
माझ्या आजोबांचं केलं होतं, सहस्रचंद्रदर्शन. त्यांचा जन्म कोजागिरीचा, त्यामुळे महिनाभर आधीच करता आलं म्हणे!
तेव्हा १ रुपयाच्या ८० का १०० नाण्यांचा हार केला होता. १००० नाणी निश्चित नव्हती; त्याचं ओझं आजोबांना त्या वयात पेललं नसतं. ते तरुण वयात पैलवान होते, १०० जोर आणि ५०० बैठका काढायचे म्हणे; आणि ८८ वर्षांचे होईस्तोवर रोज किमान १२ सूर्यनमस्कार घालायचे. पण रुपयाची १००० नाणी जरा जास्तच वाटतात.
मुद्दा असा की एक रुपया म्हणजे १०-१२ महिने होतील.
त्यांना तराजूत बसवून तुला करण्याचे चाळे करायला त्यांनी किंवा आईनंच नकार दिला. हौस आईचीच होती; वडलांसाठी काही करण्याची, असं मला आठवतं. आमच्या घरात हौस तिलाच होती; आम्ही चौघे - आजोबा, बाबा, भाऊ आणि मी - बऱ्यापैकी रटाळ होतो; मी आई असेस्तोवर तिचं शेपूट असायचे. माझ्या दोन मावश्या - आईच्या चुलतबहिणी - तेव्हा हौशीनं या प्रकारात सहभागी झाल्या होत्या. लोकांनी चिकार मजा केली होती.
मला तो १ रुपयाच्या नाण्यांचा हार आठवतो. मी तेव्हा फार तर ८ वर्षांची असेन. मला तेव्हाही त्या हाराची गंमत वाटली होती. आणि आजोबांना या प्रकाराचं फार काही वाटलं नव्हतं, एवढंच आठवतं.
शंका/कुतूहल
१ रुपयाच्या नाण्यांचा हार कसा करतात? त्याकरिता नाण्यांना भोके पाडावी लागतात काय?
तसे असल्यास,
मला तेव्हाही त्या हाराची गंमत वाटली होती. आणि आजोबांना या प्रकाराचं फार काही वाटलं नव्हतं, एवढंच आठवतं.
अर्थात! शंभर रुपये भोके पाडून बाद करून वाया घालवायचे! त्या काळात शंभर रुपयांना किंमत होती, म्हटले!
मुद्दा असा की एक रुपया म्हणजे १०-१२ महिने होतील.
समजले नाही.
असो चालायचेच.
.
>>१ रुपयाच्या नाण्यांचा हार कसा करतात? त्याकरिता नाण्यांना भोके पाडावी लागतात काय?
तसं नसावं. नक्कीच कुणी नाण्यांना भोके पाडणार नाही. गुढी पाडव्याला ती एक साखरेची माळ असते तसं काही असेल. एका दोऱ्याला नाणी सिरीयली चिकटवली असतील किंवा प्रत्येक नाण्याला दोऱ्याची एक गाठ मारली असेल, जसं आपण फुलांची वेणी करताना करतो.
असो. मी रविवारी सकाळी ६ वाजता हा सगळा विचार करते आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.
नाण्यांचा हार... दोन सेलो…
नाण्यांचा हार...
दोन सेलो टेप्समध्ये नाणी चिकटवून हार करतात.
नोटांचा हार....खराच हार करतात. काम झाल्यावर तो इतर कुणाच्या मोठ्या वाढदिवसाला देतात. मुलांच्या व्यापार खेळासाठी खोट्या नोटा मिळतात शंभर, पाचशेच्या त्यांचा हार का करत नाही ही माझी सूचना धुडकावून लावली होती. तसा हार तुमच्याच ८०व्या वाढदिवसाला करू ... वाट पाहणे आलं.
एक रुपया म्हणजे १०-१२ महिने…
एक रुपया म्हणजे १०-१२ महिने होतील.>>
एक रुपयाची खरेदी शक्ती( महिन्यांचा खर्च भागवणे) म्हणायचं झालं तर शक्य होतं १९०० त्या आसपास. चांदीचा राणी छाप रुपया होता तेव्हा.
यावरून आठवलं... माझा मित्र नाणी जमवत होता(आता नाही जमवत) तो म्हणाला "आमच्यात( म्हणजे भंडारी लोकांत) नवीन जावई पाहुणा म्हणून प्रथम आल्यावर त्यास एक रुपया द्यायचा. तो चांदीचा रुपया(रुपये नाणी) बऱ्याच जणांकडे जपून ठेवलेली आहेत. पण आता त्याची काही किंमत( value) काही नाही. त्या काळी मात्र एक दोन गुंठे जमीन मिळत असे.
भोकं?
नाण्यांना भोकं! काय हे 'न'बा! काय समजलात काय तुम्ही माझ्या पितरांना! एका फितीला गोंदानं नाणी चिकटवली होती. नंतर ते रुपये कुणाला तरी दान दिले.
सहस्रचंद्रदर्शन म्हणजे हजार पौर्णिमा बघितल्या. एका पौर्णिमेसाठी एक रुपया - हे गणित मला फार अजब वाटलं नसतं. पण हजार नाण्यांचा हार कोण बनवणार होतं? हजार नाणी तेव्हा फार महाग वाटली नसतीलही. पण त्यांचं वजन किती झालं असतं! म्हणून बहुतेक ८० (हे वय वर्षं) किंवा १०० (गोळीबंद आकडा) नाण्यांचा हार केला असणार. जर १००० पौर्णिमांसाठी १०० रुपये, तर एका रुपया म्हणजे १० पौर्णिमा किंवा १० महिने झाले.
हा हा हा
>>>>नाण्यांना भोकं! काय हे 'न'बा! काय समजलात काय तुम्ही माझ्या पितरांना!
हे मीच लिहिणार होते. पण उगाच आगाऊपणा नको म्हणून नाही लिहिलं. अदितीताई मलाही खर्च करू नकोस त्यापेक्षा पोस्टात पैसे ठेव असा सल्ला वेळोवेळी देत असतात. नाण्यांना भोकं पाडणं हे अदितीच्या हृदयाला भोकं पाडण्यासारखं आहे.
तूच गं, तूच!
अगदी खरं आहे हे!
मी एवढी कंजूष आहे की आता शिशिरात पडलेली पानं गोळा करून तीही मी आवारात आणि कुंड्यांमध्ये झाडं लावताना वापरून टाकते. आंघोळ करण्याआधी शॉवरमधून आलेलं गार पाणी बादलीत गोळा करून ते झाडांना घालते, आणि झाडांना गरज नसेल तर फ्लश करायला वापरते. एक वेळ माझ्या हृदयाला भोक पडलेलं चालेल, पण नाण्यांणा भोक पडू देणार नाही मी!
चूक झाली!
चूक झाली, माझ्या पितरांची. मला माफ करा.
पण मी आता सईला नेहमी सांगत असते की तिच्या राजकुमारांसाठी तिनं पैसे पोस्टात ठेवावेत. स्टारबक्समध्ये कॉफी पिण्यापेक्षा पोस्टात पैसे ठेवावेत. पण जळ्ळी मेली भांडवलशाही! मैत्रिणीच्या सल्ल्यापेक्षा आणि राजकुमारांच्या भवितव्यापेक्षा तिला तत्कालीक आनंद महत्त्वाचा वाटतो! चांगली आहे हो माझी मैत्रीण एरवी; भांडवलशाहीनं बिघडवली तिला!!
तेवढी फाईट तरी का मारायची?
त्याहून सोपा मार्ग आहे. (आठवा: बाळगणपतीने आपल्या आईभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली होती. (आणि — हे कदाचित थोडे अवांतर असू शकेल, परंतु — आरशातला चंद्र साक्षात बाळश्रीरामास चालला होता.) आपला दिव्य वारसा विसरू नका, महाशय! Simplify, man, simplify!)
पौर्णिमेच्या रात्री, चंद्रोदयानंतर, गच्चीवर जा. मान वर करून चंद्राकडे पाहा. मग मुंडी खाली करा. पुन्हा मान वर करून चंद्राकडे पाहा. And rinse and repeat. असे हजारदा करा.
प्रत्येक आवर्तनास ५ सेकंद जरी धरले, तरी दीड तासाच्या आत सहस्रचंद्रदर्शन होईल. (त्यानंतर मान सॉलिड अवघडेल, तो भाग वेगळा.)
आणि, हे चीटिंग नाही! म्हणजे, असे बघा. समजा, आजच्या पौर्णिमेला (म्हणजे, आज पौर्णिमा आहे, असे गृहीत धरून. नाहीतर, येत्या पौर्णिमेला.) तुम्ही चंद्रदर्शन केलेत. त्यानंतर मग थेट त्यानंतरच्या पौर्णिमेला आणखी एक चंद्रदर्शन केलेत. दोन्ही वेळेस चंद्र तर तोच असणार आहे; दुसऱ्या वेळेस दुसरा कोठलातरी चंद्र तर उगवणार नाहीये! (पाहा: ‘तोच चंद्रमा नभात’.) मग, असे असताना, पुढचे चंद्रदर्शन पुढच्या पौर्णिमेला केले काय, नि आजच्याच पौर्णिमेला पाच सेकंदांनंतर केले काय, काय फरक पडतो? मग ‘तोच चंद्रमा नभात’बरोबर ’तीच चैत्र-(किंवा, सध्या जो कोठला मास चालू असेल, त्याची-)यामिनी’सुद्धा करून टाकाच की! तेवढेच काम सोपे होऊन जाईल.
पण लक्षात कोण घेतो?
असो चालायचेच.
याहीपेक्षा सोपे. म्हणजे मान अवघडणार नाही असे.
सहस्रचंद्रदर्शन असं म्हणलेलं आहे. म्हणजे हजार पौर्णिमेचे चंद्र बघायचे आहेत आपल्याला. त्यात हजार वेगवेगळ्या पौर्णिमांचे चंद्र बघा असं कुठेच लिहिलेलं नाही. मग एक चांगला कॅमेरा घ्यायचा. किंवा टेलिस्कोपला कॅमेरा लावून एकाच कोजागिरीला गोल मटोल चंद्राचा एकच फोटो काढायचा आणि जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा त्याच्या हजार कॉपी काढून कार्यालयात सगळीकडे लावून ठेवायच्या. अशा रीतीने सोळाव्या वर्षीदेखील हा कार्यक्रम करता येईल. किंवा मुंजीतही.
परवाच मी कुरुंदकरांच्या पुस्तकात वाचलं की मनु असं सांगतो की १० वर्षांचा ब्राम्हण असेल आणि १०० वर्षांचा शूद्र असेल तर १० वर्षांचा ब्राम्हण शूद्राचा गुरु ठरतो. त्यामुळे मुंजीत असे हजार चंद्र बटुला दाखवून तो अनुभवीही झाला आहे असं जाहीरही करू शकतात.
आता तंत्रद्न्यान आलं आहे. Chatgpt वापरुन जसे वेदांचे अर्थ शोधता येतात तसं टेलिस्कोपला कॅमेरा लावून १००० चंद्र का बघता येऊ नयेत?
वर कुणीतरी चौधवी का चांद आणि पौर्णिमेच्या चंद्राची तुलना केली आहे. तर चंद्रकोर जशी सुंदर नाजूक असते तशी स्त्री तिथे अभिप्रेत आहे. पौर्णिमेचा चंद्र कितीही मोहक असला तरी नाजूक नसतो. पण बॉडी शेमिंग काय आजचे नाही. किशोर कुमारची शेवटची पत्नी (नाव विसरले) पौर्णिमेचा चंद्र म्हणाल्यावर आठवते. जाड होती म्हणून नाही. तिचा चेहरा एकदम गोल होता. तिला म्हणे चंद्रानना म्हणायचे.
असो. जरा जास्त अवांतर झालं.
पूर्वजांची सौंदर्यदृष्टी आवडली.
1000 पौर्णिमेचे चंद्र पाहू शकणे ही आयु व्यतिरीक्त किंवा आयु मोजताना चे unit of measurement फार सुंदर आहे. चौदहवी का चांद हा पौर्णिमेच्या चांदपेक्षा उजवा कसा हा प्रश्न मला नेहमी पडतो. शायर कवी इत्यादींनी चौधवी का चांद" मार्केटिंग केलेला असला तरी मला पौर्णिमेचा चंद्रच अधिक सुंदर वाटतो नेहमी.
"सर्वत्रैव हि सौंदर्यं, न हि किञ्चिद् जगत्समम्। दृष्टिश्चैव हि कारणं, यद् यत्र तद् दृश्यते हि तत्"
श्री आलोक मांडवगणे यांनी एक…
श्री आलोक मांडवगणे यांनी एक सुरेख पंचांग app बनवलं आहे. Hindu Calendar
https://play.google.com/store/apps/details?id=com.alokmandavgane.hinduc…
यांनीच सहस्र चंद्रदर्शन जन्मतारखेप्रमाणे केव्हा हे त्यात सुरू केले तर उत्तम होईल.
संस्कृतिसंगम…
त्याच त्या ‘चौदहवी का चांद’-छाप हिंदी कवड्यांनी, ‘आपल्या संस्कृती’त, पहिल्या रात्री घूंघट उचलून ‘चंद्रदर्शन’ करण्याच्या कल्पनेचे स्तोम माजवून ठेवलेले आहे.
(अर्थात, नवपरिणीत वधूच्या चेहऱ्यास (मुख’चंद्रम्या’स) येथे चंद्राची उपमा दिलेली आहे. आणि, तिचा पती सर्वप्रथम तिचा घूंघट वर करून ‘चंद्रदर्शन’ करतो, अशी कविकल्पना आहे. (चांगली, की बकवास, ते सोडून द्या.))
याचे उदाहरण म्हणून हे चित्रगीत पाहा. कवी म्हणतो: ‘एक रात में दो-दो चाँद खिले, एक घूँघट में, एक बदली में।’ अर्थात, एका रात्रीत दोनदोन चंद्र उगवलेत, एक इथे घूंगटामागे, तर दुसरा बाहेर ढगांमध्ये. (पुन्हा: कल्पना सुंदर, की भिकार, हे ठरविणे मी तुमच्यावर सोडतो.)
अर्थात, हे गाणे ‘आपल्या संस्कृती’च्या परिप्रेक्ष्यातून झाले. आता, थोडा संस्कृतिसंगम करून पाहा.
कल्पना करा. समजा, याने तिचा घूंघट उचलून ‘चंद्रदर्शन’ करण्याऐवजी, त्या चावट बाईने जर अनपेक्षितपणे याला ‘मून’ करून ‘चंद्रदर्शन’ करविले, तर याची प्रतिक्रिया काय होईल? काही कविकल्पना स्फुरून हा असे काही म्हणेल का, की, ‘अरे वा! एक रात में दो-दो चाँद खिले, एक अंगण में, एक ढुंगण में’, वगैरे वगैरे?
पण लक्षात कोण घेतो? चालायचेच!
संस्कृती का संगम विकृती के साथ नहीं हो सकता.
Exhibitionism ही प्रमाणित विकृती आहे.
आमच्या 5000 वर्षे प्राचीन संस्कृतीचा हिच्याशी काय संबंध ?
तुम्ही जबरदस्ती एका विकृती ला एका संस्कृती बरोबर जोडण्याचा प्रयत्न करत आहात हे निंदनीय आहे.
आता तुम्ही आमच्या संस्कृतीतील frontal nudity चा दाखला देऊ नये कारण नैसर्गिकतेने नग्न असणे आणि कुणाला embarass करण्यासाठी नितंबदर्शन देणे यात मोठा फरक आहे.
उद्या तुम्ही दिगंबर जैन मुनी पण exhibitionism करतात असे म्हणाल . परवा तुम्ही नागा साधू exhibitionism करतात असेही म्हणायला धजावाल.
त्यानंतर तुमची मजल कदाचित लहान मुलांसमोर प्रदर्शन करणारा पाणीपुरीवाला आणि यात काय फरक आहे ?
दोघांनी मायनर मुले विचलित होऊ शकतात असे विचारण्यापर्यंत जाऊ शकते.
यात फरक करता यायला हवा.
.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे कदाचित इथे मिळतील.
https://www.lokmat.com/bhakti/why-see-bij-moon-every-month-find-out-wha…
"८० वर्षे आयुर्मान असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात ३२ अधिक मास येतात, त्यानुसार ८१ व्या वर्षात ८ व्या महिन्यात १००० चंद्रदर्शन पूर्ण होते, असे गृहित धरता येते."
या अधिकमासावर आणि एकंदर भारतीय कालगणनेवर संदीप देशमुख यांचे "काळाचे गणित" नावाचे सदर येते. काही लेख सुटले वाचायचे. पण पुस्तक रुपात आलं किंडलवर तर एकसंध वाचायला आवडेल. अधिकमास दिवाळीत येत नाही. नाहीतर अर्धी दिवाळी एक महिन्या नंतर साजरी करावी लागली असती, हेही मला नवीन होतं. एनीवे, त्रुटी असल्या तरी पाश्चिमात्य कालगणनेचा हा अधिकमासाचा ताप डोक्याला नाही.
https://www.niludamle.com/blog-post_28-6/
"येत्या शतकाच्या शेवटी माणूस दीडेकशे वर्षं जगणार आहे. तेव्हां दोन सहस्र दर्शन साजरं होईल."
निळू दामलेंच्या ब्लॉगवर त्यांनी लिहिलेले शेवटचे पॅरा आवडले. त्यात एक व्हिडिओ डॉक्यूमेंट्री पण आहे.