पुरेपुर कोल्हापुर
तीन दिवस कोल्हापुरमधे होतो. खास कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा व अजून कोल्हापुरी इतर वैशिष्ट्यां बरोबरच कोल्हापुरी खंग्री ऊनही अनुभवलं. कोल्हापुरी बार ने मात्र निराशा केली. ऊन अपघाताने अनुभवावं लागलं. मित्र म्हटला आज खारकांडाचा बेत करु या काय ? इथलं भारी असतंय. मी म्हटलं ओके. बीफ खाऊन मलाही महिना दिड महिना झाला होता. गंगावेशीतून रिक्षा केली. तो वडाप हिशोबाने तिथपर्यँत सोडत होता. पण आम्हाला स्टँडच्या पुढे जायचे होते. त्यामुळे त्याला मिटरची आँफर दिली. खुशीत त्याने आधी खालेल्या गुटक्याची उरली सुरली चोथा गोळी टाकून दिली आणि २० रुपये जादा पडतील म्हटला. कबूल झालो. मित्र चल म्हटला सदर बाजारला घे. नवा गुटखा खाऊन त्याने रिक्षा चालू केली. मित्राने काळी सँक घेतली होती. सदर बाजारात पोचल्यावर मी रिक्षातच बसून राहिलो. मित्र बाहेर पडला. रिक्षावाला म्हटला कुठे गेलेत दुसरे सायेब ? म्हटलं मित्राला भेटायला. तुमी का नाय गेले ? म्हटलं माझा वाद झालाय. पुढे मी पुण्यात काय करतो. तो पुण्यात किती वर्ष होता, जाँन आब्रामची बाँडी हाय का चेष्टा ? ऎशवर्यासारखी देखणी बायीच नाय ! अशा विविध विषयांवर चर्चा चालू असताना मित्र आला. मी म्हटलं किती ? तो म्हटला दिड किलो ! पुढे त्याने वाढीव माहिती दिली. मस्त नळ्या दिल्यात. भरपुर वसु ! रिक्षावाला म्हटला सायेब हितवरचे पैशे द्या. हितनं नवा मिटर टाकतो. मी म्हटलं राहू दे. तो म्हटला नको. ऎकायला तयारच नाही. म्हटलं च्यायला काय लावलय रे ? चल गपचूप. तर थेट रिक्षातून खाली येत गडी भांडणाला तयार. आस्लं माझ्या गाडीतनं मला न्ह्याचं नाही. वीस रुपय कमी द्या. खरं हितंच उतरा. म्हटलं तु खात नाहीस का ? म्हटला आस्लं खात नाही. गाडीतला फ़ोटू बगा.( दत्तप्रभूंचा देखणा फ़ोटो ! नृसिँहवाडी वगैरे असं कायबाय खाली लिहिलेलं.) मी म्हटलं आस्लं म्हणजे ? तो म्हटला हितं फक्त मोठ्याचंच भेटतंय मला म्हायीताय. वर म्हटला उगंच पाँश कापडं घालून हिंडता आन् गदळ खाता. सोबतं का राव ? देवादिकानी काय सांगितलय ? मी म्हटलं काय ? तोही म्हटला काय ? मी परत काय ? मग तो म्हटला गायीचं मटन खाऊ नाही ! मी म्हटलं हे बैलाचं आहे गायीचंच कशावरुन ? तो म्हटला काय तुमच्या समोर कापला काय बैल ? मित्र ख्या ख्या हसत म्हटला अरे हे बैलाचंच आहे. तुला कप्पुरा दाखवू काय ? तो म्हटला पैशे टाका आण हालू द्या. आयला भाव आस्ता तर ना...मीच हाय म्हणुन बरं . पैशे द्यावो सायेब उगंच वाद घालू नका. दिले त्याला पैसे आणि कडक कोल्हापुरी ऊन अनुभवत दिड किलो आळीपाळीने वागवत. त्याच्या श्रध्देचा हसून, मान राखून के.एम.टी चा. स्टाँप गाठला ! पुरेपुर कोल्हापुर..
प्रतिक्रिया
माफ करा पण किंचीत फेसबुक
माफ करा पण किंचीत फेसबुक स्टेटससारखं वाटलं. म्हणजे "लाइक" करा व पुढे चला. चर्चा करु शकत नाही की काल्पनिक ललीत वाटत नाही. वाचकाला विशेष काही बौद्धिक लाभही नाही. प्रकारचे.
अनुभव
लेखन आवडले
एक कुतूहल
भारतात (त्यातही कोल्हापुरासारख्या मुसलमानी किंवा ख्रिस्ती परंपरांचा बहुधा फारसा प्रभाव नसलेल्या ठिकाणी) बीफचे बरे, आवर्जून खाण्यासारखे असे नेमके कायकाय बनते / मिळते? (निहारी, कबाब वगैरे प्रकारांबद्दल ऐकून / खाऊन आहे, परंतु ती कोल्हापुराच्या बाजूची खासियत खाशी नसावी. अर्थात, त्या बाजूस कधी जाण्याची वेळ आली नाही, त्यामुळे नक्की कल्पना नाही, परंतु का कोण जाणे, असे वरकरणी वाटत तरी नाही.)
तर विचारण्याचा प्रश्न, कोल्हापुराचे बाजूस बीफची नेमकी खासियत काय? (सहज एक कुतूहल म्हणून.)
बाकी, आपणांस आलेल्या अनुभवाबद्दल बोलायचे, तर 'हिंदुस्थान आहे, नाइलाज आहे, चालायचेच, असे व्हायचेच' यापलीकडे काय म्हणावे?
पण एक शंका: पिशवीतील ऐवजाची तपशीलवार चर्चा थेट त्या रिक्षावाल्याच्या तोंडावर करण्याऐवजी त्याची वाच्यताही जर मुक्कामास पोहोचेपर्यंत केली नसती, तर कदाचित - केवळ कदाचित - काम फत्ते होण्याची शक्यता थोडी अधिक नसती काय? (म्हणजे, अशी चर्चा त्याच्या उपस्थितीत करण्यात नेमके काही गैर आहे, असा दावा नाही, परंतु तरीही - केवळ अडथळा शक्य तितका दूर करण्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून.)
'न'वी बाजू. मी कोल्हापुरमधे
'न'वी बाजू. मी कोल्हापुरमधे एखाद्या हाँटेलमधे बीफचे पदार्थ खाल्ले नाहीत. त्यामुळे खात्रीने सांगू शकत नाही. पण मित्राने मटण ठेचा हा अप्रतिम आयटम मिळतो असे सांगितलेय. पुढच्या वेळेस ट्राय करीन. रिक्षावाल्यासमोर अगदी नकळत संवादाच्य?ाओघात बोललो. बाकी तुमच्या विवेचणाशी सहमत !
धन्यवाद
मान्य. हॉटेलातच असे नाही, पण 'बीफ खाऊन मलाही महिना दिड महिना झाला होता' म्हणालात, त्यावरून अनुभव तर निश्चित असावा, असे वाटले, म्हणून विचारले. कुतूहल म्हणून. कारण भारतात बीफ खाण्याचा माझा स्वतःचा अनुभव अत्यल्प आहे, आणि जो काही एकदोनदा (अर्थात पुण्यामुंबईच्या बाजूस) खाण्याचा योग आलेला आहे, त्यात आवर्जून खाण्यासारखे असे काही मला जाणवले नाही. (अर्थात, मुसलमानी किंवा ख्रिस्ती परंपरांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असलेल्या विभागांत परिस्थिती याहून खूपच चांगली असणार, याची जाणीव आहे; फक्त, त्या विभागांत जाऊन असे पदार्थ चाखण्याचा योग कधी आलेला नाही. किंबहुना, बीफच्या आवर्जून खाण्यासारख्या उपखंडीय आवृत्तींची जी काही तोंडओळख आहे, ती पूर्णतः भारताबाहेरील हैदराबादी नि पाकिस्तानी रेष्टॉरंटांच्या कृपेने आहे. आणि अर्थात इतरदेशीय प्रकार आहेतच. भारतात मात्र तशी - म्हणजे, बीफचे पदार्थ आवर्जून खावेसे वाटण्याची - वेळही सहसा येत नाही (आवर्जून खावेसे वाटणारे इतर अनेक पर्याय पुष्कळ नि त्यामानाने सहज उपलब्ध असतात - देशी बोकड खूप आवडतो), संधीही येत नाही आणि भारतातील माझ्या मर्यादित परिघात क्वचित जी काही संधी पूर्वी आलेली आहे, तेव्हाचा अनुभव फारसा उत्साहवर्धक नाही.) भारताबाहेर अर्थात बीफचे वेगवेगळे प्रकार चाखलेले आहेत, एकंदरीत आवडतेही, पण भारतात याबाबतीत फारशा अपेक्षा ठेवत नाही.
आणि म्हणूनच, महाराष्ट्रात बीफचे आवर्जून खावेसे वाटण्यासारखे काही मिळू शकते, हे वाचून आश्चर्य वाटले, नि कुतूहल जागृत झाले, म्हणून प्रश्न विचारला.
धन्यवाद. नेमक्या अशाच प्रकारच्या माहितीची अपेक्षा होती. अर्थात, या माहितीचा उपयोग करण्याची वेळ अथवा संधी कधी उपलब्ध होईल, अथवा होईल किंवा नाही, कल्पना नाही, परंतु तरीही.
साहजिक आहे. नि त्यात काही गैरही नाही. परंतु भारतीय परिस्थितीत दुर्दैवाने याचे परिणमही असतात, नि त्यांना तोंड देत बसावे लागते, हे यातून लक्षात आले असेलच. परिणाम असायला नकोत, पण असतात. त्याला नाइलाज आहे.
बाकी, त्या रिक्षावाल्याने केवळ आपल्याजवळील थैलीत बीफ आहे या कारणास्तव आपणांस पुढे घेऊन जाण्यास नकार दिला, वाटेत उतरावयास लावले, हे योग्य वाटले नाही. एक तर आपण आपल्या उपभोगाकरिता ते बीफ घेऊन चालला होतात; त्याला ते देऊ केले नव्हतेत, खाऊ घातले नव्हतेत आणि खाण्याची सक्ती तर केली नव्हतीतच नव्हतीत. बरे, असे बीफ वाहनातून घेऊन जाणे हा (निदान माझ्या कल्पनेप्रमाणे तरी) कायद्याने गुन्हा नसावा. अशा परिस्थितीत, त्याची कृती योग्य वाटली नाही. (शिवाय कायद्यात कितपत बसावी, याबद्दलही साशंक आहे. अर्थात, कोणाबरोबर किती आणि कशासाठी हुज्जत घालणार, हा प्रश्न आहेच, पण तो अलाहिदा.)
'रिक्षा हे त्याचे खाजगी वाहन आहे; त्यात तो कोणाला नेईल, नि कोणाला नेणार नाही, नि कोणत्या कारणासाठी, हा त्याचा प्रश्न,' असाही एक दावा या बाबतीत केला जाऊ शकतो, परंतु या दाव्यात मला दम दिसत नाही. कारण, वाहन खाजगी असले, तरी ते सार्वजनिक वापराकरिता उपलब्ध आहे. ते अशा फ़िज़ूल कारणांकरिता नाकारण्याचा - आणि विशेष करून एकदा भाडे स्वीकारल्यावर अर्ध्या वाटेवर सोडून देण्याचा, त्याच्या वैयक्तिक श्रद्धेपायी इतरांस वेठीस धरण्याचा, अधिकार त्यास असू नये असे वाटते.
शिवाय, एखाद्या पाशिंजराने एखादे वेळेस कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता एखादी त्याला न आवडणारी वस्तू त्याच्या रिक्षातून नेण्याने जर त्याला त्रास होणार असेल, तर रिक्षाचा धंदा न करण्याचे स्वातंत्र्य त्यास आहेच. परंतु ठरलेले भाडे अशा प्रकारे मध्येच सोडून देणे, हे योग्य नव्हे. पाशिंजरांनाही काही हक्क असतातच.
बाकी, 'उगंच पाँश कापडं घालून हिंडता आन् गदळ खाता. सोबतं का राव ?' वगैरे ऐकवणे हेही उतारूच्या करारात बसू नये. आपण कसे कपडे घालावेत, काय खावे नि आपल्याला काय शोभावे, हा सर्वस्वी आपला प्रश्न असावा; तो त्याचा प्रश्न असण्याचे काही कारण नसावे, आणि असे ऐकवण्याचा त्याला अधिकार नसावा.
मात्र,
एकदा भाडे स्वीकारल्यावर वाटेत उतरावयास न लावण्याच्या नि ठरलेल्या मुक्कामापर्यंत नेण्याच्या अपेक्षेच्या हक्काकरिता भांडणे समजू शकतो. नव्हे ते योग्यच आहे. पण या अशा प्रकारच्या युक्तिवादाने साइडट्रॅक होण्यापलीकडे नेमके काय साध्य होते? त्यातून त्याचे मतपरिवर्तन होणे तर शक्य नाही, झालेही नाहीच. मग कशाला शक्ती व्यर्थ घालवायची? त्यात काय हशील?
असे कितीजणांचे मतपरिवर्तन करत बसणार? नि कशाकरिता? मटण बैलाचे आहे की गायीचे, या बाबीस या संदर्भात कितीसे महत्त्व आहे?
इथे मुद्दा हा आहे, की रिक्षा बोलीवर घेतलेली आहे, नि अर्धे अंतर काटून झालेले आहे, शिवाय रिक्षाचा वापर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी झालेला नाही अथवा होत नाही. याउपर आपल्या थैलीतून आपण काय न्यावे हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. अशा परिस्थितीत, नि खास करून या कारणाकरिता, अर्ध्या वाटेवर आपणांस उतरावयास लावण्याचा त्यास काहीही अधिकार नाही. भांडतानासुद्धा याव्यतिरिक्त कोणत्याही इतर मुद्द्यावर बोलणे म्हणजे केवळ फाटे फोडणे आहे, नि डाव त्याच्या हातात देणे आहे.
नक्की कल्पना नाही, (नि आता त्या परिस्थितीत नसताना इथे बोलणे सोपे आहे,) पण कदाचित 'ठीक आहे, रिक्षा इथून थेट पोलीस चौकीस घेऊन चल' म्हणून काही फरक पडला असता काय?
(अर्थात, अनेकदा अशा प्रकारच्या परिस्थितीत 'कुठे हुज्जत घालत बसणार' म्हणून सोडून दिले जाते, अनेकदा ते परवडते. परंतु असे अर्ध्या वाटेवर उतरवणे अगदीच खटकले.)
सिरियसली ?!
सिरियसली ?!
मस्त! अहो हित पुन्यात सदाशिव
मस्त!
अहो हित पुन्यात सदाशिव पेठेत बामनांनी मटन चिकन महाग केल म्हंतात. तुमी तिकड वशाट आनुन त्या रिक्षावाल्याची रिक्षा इटाळता काय!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
पुण्यातील ब्राह्मणांनी
पुण्यातील ब्राह्मणांनी अभक्ष्य महाग केल्याचं कायम सगळ्यांनी ऐकलेलंच कसं असतं? त्या क्वोटेशनचा नक्की गरीब धनी कोण हे गुपीत आहे काय?
पुण्यातील ब्राह्मणांनी अभक्ष्य महाग केलं
ही स्वानुभवाची गोष्ट आहे. त्यासाठी तुम्ही जुन्या पुण्यात अभक्ष्यभक्षण केलेलं असणं गरजेचं आहे. एकविसाव्या शतकात किंमतीबद्दल तक्रार केल्यावर तुमच्या जुन्या ओळखीतल्या मासेवाल्या बाया/बाप्ये मग तुम्हाला हमखास हे ऐकवतात. त्याचा दुसरा भाग ऐकायचा असेल तर श्रावणात किंवा संकष्टीला मासे विकत घ्यायला कुणी येतं का वगैरे विचारायला लागतं. मग बामणांना कशी रीतभात नाही वगैरे ऐकायला मिळतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दोन मुद्दे
ईन-मीन साडेतीन टक्क्यांच्या संयुक्त क्रयशक्तीने बाजारावर (नो पन इंटेंडेड) इतका फरक पडू शकतो, हे वाचून अतीव आश्चर्य जाहले. (कदाचित याकरिता शर्टाची बटने तटातट तुटावयास हवीत किंवा कसे, याबद्दल साशंक आहे.)
याचा निश्चित अर्थबोध झाला नाही. म्हणजे, श्रावणात किंवा संकष्टीला बामणे मासे विकत घ्यायला येतात, अथवा येत नाहीत, यांपैकी नेमका काय अर्थबोध होणे अपेक्षित आहे? आणि श्रा.त/सं.ला मासे विकत घेणे अथवा न घेणे यांपैकी नेमका कोणता पर्याय हे बामणांना रीतभात नसण्याचे द्योतक आहे?
या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यास मग पुढील प्रश्न.
त्या क्वोटेशनचा नक्की गरीब
रामदास फुटाणे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
प्रश्नाच्या निरसनातून उद्भवलेल्या शंकांच्या निरसनाचा अल्पयत्न
हा हा हा. पुणेरी ब्राह्मणांच्या भुकेचा केवढा हा अपमान. पेशवाईतले आकंठ भोजनांचे पुणेरी किस्से तुम्ही ऐकलेले दिसत नाहीत. शिवाय, पुण्यातली ब्राह्मणांची टक्केवारी निव्वळ साडेतीन टक्के की जास्त तेदेखील इथे पाहायवयास लागेल. असो. आमच्यापाशी विदा नाही. विक्रेते काय ऐकवतात ते आम्ही केवळ सांगितले. 'कोटेशनचा धनी कोण', असा प्रश्न वर आल्याकारणाने त्याचे निरसन करण्याचा आमच्या परीने केलेला हा अल्पसा प्रयत्न होता.
जे रीतभात पाळून अभक्ष्यभक्षण करतात, ते श्रावण/संकष्टी पाळतात; काळवेळ न पाहता जे खाखा करत सुटतात त्यांना रीतभात नाही हे त्यामागचे विचार आहेत. हे विचार विक्रेत्याचे आहेत; आमचे नाहीत (आम्ही श्रावण/संकष्टी पाळत नाही).
जाताजाता : कोल्हापुरातल्या रिक्षावाल्याने काय करायला हवे होते आणि त्याचे काय चुकले, कायदा कुणाच्या बाजूचा असावा वगैरे प्रकटन वाचून मोठी करमणूक झाली. ती का झाली असावी ह्याचे स्पष्टीकरण एखाद्या कोल्हापूरकराकडे मागावे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जाताजाता: +१००
जाताजाता: +१००
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जाताजाता शी सहमत (पकाऊ ही
जाताजाता शी सहमत
(पकाऊ ही श्रेणी अंतर्भूत करायच घ्याच राव मनावर)
हा हा हा
आताच अदितीच्या एका प्रतिसादात हा दूवा मिळाला. ह्यावरुन एक किस्सा आठवला. किस्सा सांगणार्याने तो पुण्यातील एक वकिल आणि एक राजा ह्यांच्यात घडल्याचे सांगीतले पण पुरावा नसल्याने येतेह नावे लिहित नाहीये.
ह्या राजांची आणि पुण्यातील वकिलाची एकदम घट्ट मैत्री. त्यांचे बरेचसे कोर्टकज्जे तेच सांभाळत असत. एकदा जेवताना गप्पा सुरु होत्या :-
राजे :- तुम्ही बामणांनी मटण महाग करून ठेवले आहेत बघा.
वकील :- खरे आहे ! आम्ही मटण महाग केले आहे आणि तुम्ही शिक्षण.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
( दत्तप्रभूंचा देखणा फ़ोटो !
मला संगीतकार आनंद मोडकांनी सांगितलेली कोल्हापुरातलीच गोष्ट आठवली. कोणत्यातरी पौराणिक सिनेमाचं शूटिंग चालु होतं. कुत्र्यांच्या घोळक्यातला दत्तगुरुं वरचा सीन शूट करायचा होता. पण काही केल्या दत्ताची कुत्री एके ठिकाणी थांबत नव्हती. शेवटी सेट्वरच्या कुणाला तरी भन्नाट आयडिया सुचली. बाहेर जाऊन गावातून किलोभर मटण मागवलं आणि ते दत्ताच्या झोळीत टाकलं.
...आणि ही मात्रा बरोब्बर लागु पडली. कुत्र्यानी परफेक्ट शॉट दिला.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
आयडिया मस्तच
पण नंतर त्या मटणाचं काय केलं ते मोडकांनी सांगितलं नाय का???
दत्तप्रभूंचा देखणा फ़ोटो !
दत्ताचे सर्व अवतार अतोनात देखणेच आहेत. याबद्दल दुमत नाहीच.
आपण बीफ (पण) खातो हे
आपण बीफ (पण) खातो हे दाखवण्याचा क्वेविलवाणा प्रयत्न.
पुलेशु