आजीआजोबा आणि नातवंडे (भाग २)
आधीचा भाग १ http://www.aisiakshare.com/node/2956
आजकालच्या अनेक आजीआजोबांची मुले गेली बरीच वर्षे परदेशात रहात आहेत किंवा तिकडेच स्थायिक झाली आहेत. अशा आजीआजोबांची नातवंडे तिकडेच लहानाची मोठी होत असतात. इथे राहणार्या आजीआजोबांना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घरबसल्या इंटरनेटवर पहायला मिळतात, त्यांचया बोबड्या बोलांचे किंवा चिवचिवाटाचे आवाज कानावर पडतात, पण हे म्हणजे ग्लासभर मलईदार दुधाच्या जागी चमचाभर पातळ पुचुक ताक पिण्यासारखे झाले. त्याने तहान भागत तर नाहीच, उलट ती जास्तच वाढते. परदेशात आपल्या मुलांकडे जाऊन त्यांना भेटायचे झाल्यास पासपोर्ट, व्हिसा वगैरे काढून घ्यावे लागतात. बहुतेक लोक एवढे काम उत्साहाने करतात. कधी कधी त्यातच काही अडचणी आल्या तर मग मात्र परदेशी जाणे अशक्य होते.
ही पूर्वतयारी करून ठेवल्यावरसुद्धा विमानाच्या तिकीटांची व्यवस्था करणे हे एक मोठे काम असते. परदेशी जाऊन येण्याच्या तिकीटांच्या किंमती डॉलर, पौंड स्टर्लिंग किंवा युरो या चलनांमध्ये सुद्धा हजारांच्या घरात असतात, रुपयांमध्ये त्या लाखांमध्ये होतात. आजीआजोबांनी त्यांच्या आयुष्यात रुपयांमध्ये कमाई करून त्यातून टाकलेल्या शिल्लकीचा विचार करता तिकिटांच्या किंमती फार जास्त वाटतात. परदेशात राहणार्या मुलांच्या कमाईच्या तुलनेतसुद्धा त्या अगदीच क्षुल्लक नसतात. शिवाय त्यांच्या घरातल्या सर्वांना ऑफीस आणि शाळांमधून एकाच वेळी सुटी मिळणेही कठीण असते. याचे आधीपासून नियोजन करता आले नाही तर आयत्या वेळी काढलेल्या तिकीटांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात. यापेक्षा आईवडिलांची विमानाची तिकीटे चार पाच महिने आधी काढून ठेवली तर ती किफायतशीर भावात मिळतात आणि त्यांच्याकडे पाठवून त्यांना तिकडे बोलावून घेणे जास्त सोयिस्कर वाटते.
ज्या आजीआजोबांनी आयुष्यात कधीच परदेशगमन केले नसते त्यांनीही तिकडच्या सुबत्तेबद्दल खूप वर्णने वाचलेली आणि ऐकलेली असतात. तिकडे एकदा तरी प्रत्यक्ष जाऊन ते सगळे पाहून येण्याबद्दल त्यांच्या मनात खूप उत्सुकता असते. "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" या गोष्टीमधल्या म्हातारीप्रमाणे ते लोकसुद्धा "लेकाकडे जाईन, छान छान खाईन, लठ्ठ होऊन येईन." असे मोठ्या उत्साहाने स्वतःला आणि परिचितांना सांगत असतात. तिकडे जाऊन पोचल्यानंतर तिथल्या विमानतळापासूनच तिकडची शहरे, रस्ते, त्यावरून धावणारी वाहने, रस्त्याच्या बाजूला दिसणारी सुबक घरे वगैरे पाहून प्रथम दर्शनी ते थक्क होतात. पण तिथे रहायला लागल्यानंतर हळूहळू त्यांचा प्रभाव कमी कमी होत जातो.
पुढे दिलेल्या तिसर्या उदाहरणातल्या आजीआजोबांनी असेच अमेरिकेकडे प्रयाण केले आणि ते आपल्या मुलाच्या गावी जाऊन पोचले. त्यांचा मुलगा आणि सून यांनी विमानतळावर त्यांचे खूप प्रेमाने स्वागत करून त्यांना घरी नेले. आपल्या नातवंडांना जवळ घेऊन कुरवाळण्यासाठी, त्याच्या गोबर्या गालांचे पापे घेण्यासाठी, त्यांच्या रेशमासारख्या मऊ केसांमधून बोटे फिरवण्यासाठी आजीआजोबा जास्त आसुसलेले होते, पण ती लहान बालके मात्र बिचकल्यामुळे त्यांच्यापासून जरा दूरदूरच रहात होती. त्यांच्या अंगाला हात लावू देत नव्हती. तो सगळा दिवस त्यांच्याशी ओळख करून घेण्यात गेला. खूप प्रयत्नांनंतर आणि वेगवेगळे छान छान खाऊ दिल्यानंतर अखेरीस ती दोघे त्या आजीआजोबांना 'बिग् हग्' द्यायला एकदाची तयार झाली.
दुसरे दिवशी सकाळी त्या आजीआजोबांचा मुलगा आणि सून आपापल्या गाड्यांमध्ये बसून आपापल्या ऑफिसांना चालले गेले. त्यांनी जाता जाता मोठ्या मुलाला त्याच्या शाळेत आणि धाकटीला तिच्या शिशुसंगोपनगृहात नेऊन सोडण्याची व्यवस्था केली. भारतातून आलेल्या आजीआजोबांना तिथली कसलीच माहिती नसल्याने ते यात काहीच करू शकत नव्हते. मुलांसोबत जाऊन त्या जागा एकदा पाहून ठेवायच्या म्हंटले तरी त्यांना घरी परत आणून सोडावे लागले असते, त्यात सकाळच्या गडबडघाईतला अमूल्य वेळ गेला असता. आपल्यापाशी मोटार असल्याशिवाय आणि ती चालवता येत असल्याशिवाय कुठेही जाणे येणे तिकडे शक्य नसते. यामुळे नंतरही मुलांना शाळेत पोचवण्याचे किंवा त्यांना घरी घेऊन येण्याचे काम ते करू शकणार नव्हते. या कारणाने नातवंडांच्या परत येण्याची वाट पहात ते घरी बसले. तिथल्या स्वयंपाकघरातली बरीचशी साधने त्यांच्या ओळखीची नव्हती. ती कशी चालवायची याची पुरेशी माहिती नव्हती. तिकडच्या टीव्ही चॅनेलवरचे कार्यक्रम समजत नसल्यामुळे त्यात मन रमत नव्हते. घराजवळच्या रस्त्यांवर सुसाट वेगाने धावणार्या मोटारीच मोटारी दिसत होत्या. काही ठिकाणी तर फूटपाथ दिसत नव्हते आणि त्यावर पायी चालणारे लोक दिसत नव्हते. अशा त्या अनोळखी प्रदेशातल्या घराबाहेर पडण्याचे त्यांचे धाडस झाले नाही. त्यामुळे ते एकमेकांकडे आणि घराच्या भिंती आणि छताकडे पहात बसले.
दुसरा, तिसरा, चौथा वगैरे दिवसही असेच गेले. या काळात हळू हळू नातवंडांशी घसट किंचितशी वाढत गेली, त्याचबरोबर तिकडची जीवन रहाणी समजत गेली. त्या आजीआजोबांचा मुलगा आणि सून रोज सकाळी कॉर्न फ्लेक्स, टोस्ट, फ्रूट ज्यूस वगैरेचा नाश्ता करून ऑफिसला जात आणि त्यांचे दुपारचे जेवण तिथेच करत असत. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली फूड पॅकेट्स बाहेर काढून ओव्हनमध्ये तापवली की त्यातून बरेच वेळा रात्रीचे वेळचे जेवण होत असे. रुचिपालट म्हणून कधी ते लोक घरी येतांना पिझ्झा, बर्गर, नूडल्स, फ्राइड राइस वगैरेंसारखे तयार पदार्थ घेऊन येत. आजीआजोबांसाठी ते एकाद्या इंडियन टेकअवे मधून काश्मिरी पुलाव, आलू पराठा, रवा मसाला डोसा वगैरे घेऊन आले. लहान मुलांसाठी पचायला सुलभ आणि पौष्टिक पदार्थांची वेगळी पॅकेट्स असायची. ती गरम पाण्यात किंवा दुधात मिसळली की त्यांचे अन्न तयार होत असे. स्वयंपाकघरात तवा, परात, पोळपाट लाटणे, कढई, पळी वगैरे वस्तू होत्या, पण त्यांचा रोज वापर होत नसे. हौस म्हणून कधी एकादा वेगळा खाद्यपदार्थ करावासा वाटला किंवा एकाद्या नव्या रेसिपीवर प्रयोग करून पहायचा असला तर तेवढ्यासाठी त्या वस्तू बाहेर काढल्या जात असत. भारतातून येतांना आणलेल्या प्रेशर कुकरचा व्हॉल्व्ह उडला होता तो तिथे बदलून मिळत नव्हता आणि प्रेशर पॅनची शिट्टी हरवली होती, ती ही मिळत नव्हती. त्यामुळे या वस्तूंचा उपयोग होत नव्हता.
शनिवार रविवारी घरातले सगळेजण मोटारीतून शहराच्या आजूबाजूच्या भागात फिरून आले, आजीआजोबांना तिथली खास सौंदर्यस्थळे दाखवली गेली, मुलेही औटिंगमुळे खूष झाली. मौजमजा करून घरी परत येतांना त्यांनी मॉल्समधून आठवडाभराचे सामान आणले. त्यात मुख्यतः.अनेक प्रकारची फूड पॅकेट्स होती. घरातल्या अवाढव्य आकाराच्या रेफ्रिजरेटरमध्ये ती रचून ठेवली गेली. पुढल्या आठवड्यातल्या रोजच्या आहारासाठी त्यांचा उपयोग करायचा होता. साधेच पण ताजे शिजवलेले अन्न रोजच्या जेवणात खायची सवय असलेल्या आजीआजोबांच्या तिकडचे अशा प्रकारचे भोजन पचनी पडले नाही. आता आपणच रोज ताजे अन्न शिजवून सर्वांना खाऊ घालायचे असे त्यांनी ठरवले. पटेल, शहा किंवा मेहबूब अली अशा कुणाकुणाच्या 'देसी' स्टोअर्समधून डाळ, तांदूळ, रवा, बेसन वगैरे पदार्थ आणले. गहू किंवा जोंधळे विकत आणून ते चक्कीमधून दळून आणणे तिकडे कल्पनेच्या पलीकडले होते. जवळच्या बाजारात जी कोणती तयार पिठे मिळाली ती आणून त्यांचेवर प्रयोग करायचे असे त्यांनी ठरवले. स्वयंपाकघरातली आधुनिक साधने वापरणे आजीआजोबांनी शिकून घेतले आणि त्यावर स्वयंपाकाचे प्रयोग करायला लागले.
स्वयंपाकाचा जन्मभराचा अनुभव गाठीशी असल्यामुळे नव्या ठिकाणी मिळतील ती उपकरणे वापरून वरणभात, पोळीभाजी वगैरे जेवण तर ठीकठाक तयार झाले, पण ते करतांना ढीगभर खरकटी भांडी साचली. ती कुणी घासायची? तिकडे अमेरिकेत केरवारा, धुणीभांडी वगैरे घरकामे करायला कामवाली (गंगू)बाई येत नसते. ती सगळी कामे ज्याने त्याने स्वतःच करावी लागतात. त्यासाठी यांत्रिक मदत उपलब्ध असली तरी ती सगळी यंत्रे चालवण्यासाठी माणसांची गरज असतेच. त्यासाठी थोडे तरी श्रम करावे लागतात, बराच वेळ द्यावा लागतो. रिकामटेकड्या आजीआजोबांनी आता ही कामे आपल्याकडे घेतली किंवा त्यांना ती घ्यावी लागली.
ऊन ऊन तूप मेतकूट मऊ भात, साजुक तुपातला बदामाचा शिरा, बेदाणे घातलेले बेसनाचे लाडू वगैरेसारखे खास पदार्थ करून ते आपल्या नातवंडांना आपल्या हातांनी भरवायचे असे आजींचे एक स्वप्न होते. पण त्या मुलांना त्यात फारसा इंटरेस्ट दिसला नाही. त्यांच्या कानावर थोडे मराठी शब्द अधून मधून पडत असल्याने कदाचित त्यांना ते कळत असावेत, पण त्यांना शाळेत आणि समाजात वावरतांना सोपे जावे म्हणून त्यांचे आईवडील त्यांच्याशी शक्य तोंवर इंग्रजीमध्येच बोलत असत. यामुळे नातवंडेही त्याच भाषेत मोडके तोडके बोलायचे प्रयत्न करत. त्यांच्या बोलण्यात फारसे मराठी शब्द कधी येतच नव्हते. नातवंडांच्या इंग्रजी भाषेतल्या बोबड्या बोलांचा अर्थ लावणे आजीआजोबांना जमत नव्हते आणि त्यांचे बोलणे त्या मुलांना कितपत समजत आहे याचा त्यांना अंदाज येत नव्हता. त्यामुळे काही दिवस उलटून गेल्यानंतरसुद्धा त्यांच्यात संवाद असा साधला जातच नव्हता. हावभाव आणि खाणाखुणांमधूनच थोडेसे बोलणे होत होते तेवढेच. शाळेतून घरी आल्यानंतर बहुतेक सगळा वेळ ते त्यांच्या आईवडिलांच्या आसपासच घुटमळत असत किंवा टीव्हीवर कारटून पहात बसत. त्यांच्या इवल्याशा जगात आजीआजोबांना शिरकाव मिळत नव्हता, किंवा तसे त्यांना जाणवत नव्हते.
काही दिवस, आठवडे, महिने गेल्यानंतर त्यांची भारतात परत येण्यासाठी निघायची तारीख जवळ आली. पण त्याआधीच ते तिथल्या राहण्याला कंटाळले होते. दिवसभर घरी बसून राहणे म्हणजे त्यांना स्थानबद्ध झाल्यासारखे वाटायला लागले होते. टेलिफोन, टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरे माध्यमांमधून बाहेरच्या जगाशी थोडासा संपर्क करू शकत होते, पण त्यांना मात्र इतर माणसांना प्रत्य़क्ष भेटणे आणि बोलणे हवे असायचे, ते फारच कमी झाले होते. त्यांची मुले आणि नातवंडे दिवसभरातला बहुतेक वेळ घराबाहेरच असल्यामुळे त्यांचा सहवासही म्हणावा तितका मिळत नव्हता. भारतात असतांना करावे न लागणारे कंटाळवाणे घरकाम तिथे करावे लागत होते. शिवाय त्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार होती. तिकडे जातांना त्यांनी आरोग्यविमा उतरवला असला तरी त्या विम्याच्या कलमांनुसार आधीपासून असलेल्या आजारांवर तिकडच्या डॉक्टर्सकडून उपचार होणार नव्हते. त्यावरील सगळी औषधे त्यांनी भारतातून जातांना त्यांच्यासोबत नेली असली तरी काही कारणाने आधीच्या व्याधी बळावल्या तर त्यावर तिथल्या रुग्णालयांमध्ये उपचार करून घेणे परवडण्यासारखे नव्हते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या उतारवयातल्या व्याधी त्यांनाही जडलेल्या होत्या आणि त्यांच्यामुळे इतर कुठली दुखणी कधी उद्भवतील किंवा डॉक्टर तसे म्हणतील ते सांगता येणार नाही. अशा कारणांमुळे ते आपले जीव मुठीत धरून आणि स्वतःला जरा जास्तच जपत एका अनामिक भीतीच्या छायेत जगत होते. कांही महिन्यांपूर्वी जेवढ्या प्रचंड उत्साहाने ते परदेशी जायला निघाले होते तो संपून गेला होता. यामुळे आता स्वदेशात परत जाण्याची वाट पहात ते दिवस मोजायला लागले.
नोकरी किंवा व्यवसायानिमित्या परदेशांमध्ये जाऊन राहिलेल्या एकाद्या मुलाला काही वर्षांनी तिकडचे नागरिकत्व मिळाले तर तो त्याच्या आईवडिलांनाही कायमचे तिकडे घेऊन जाऊ शकतो. काही आईवडील यासाठी आनंदाने एका पायावर तयार होतात आणि संधी मिळताच इकडचा गाशा गुंडाळून मुलाकडे परदेशात रहायला चालले जातात. आपले उर्वरित आयुष्य पृथ्वीवरील नंदनवनात घालवून एक दिवस तिकडूनच स्वर्गलोकाला प्रयाण करतात. काही मुलांच्या आईवडिलांना त्यांच्या उतारवयात आर्थिक, शारीरिक, मानसिक वगैरे सगळ्याच प्रकारच्या आधारांची अत्यंत गरज असते. आपला देश सोडून कायमचे परमुलुखात रहायला जाणे त्यांच्या मनाला पटत नसले तरी निरुपाय म्हणून तेही अनिच्छेने परदेशी जातात.
परदेशात रहायला जाईपर्यंत यातले बहुतेक लोक आजीआजोबा झालेले असतातच. त्यांना आपल्या मुलाच्या संगतीत आणि त्याच्या आधारावर राहण्याइतकेच नातवंडांच्या प्रेमळ सहवासाचे महत्व वाटत असते. पण त्यांची ही अपेक्षा पूर्ण होत असेल का? पाश्चात्य देशांमधल्या अनेक लोकांचे कौटुंबिक जीवन आज मोठ्या प्रमाणात उध्वस्त झालेले आहे. तिकडली कित्येक मुले सज्ञान होईपर्यंत त्यांचे आई आणि वडील एकमेकांपासून फारकत घेऊन वेगळ्याच जोडीदारांमसवेत किंवा एकट्याने निरनिराळ्या ठिकाणी रहात असतात. त्यातली काही मुले त्यांच्या आईसोबत, काही वडिलांबरोबर आणि काही आणखी कोणाच्या आधाराने रहात असतात. काही मुले अनाथ किंवा अनौरस असतात, ती सामाजिक सेवाभावी संस्थांच्या ताब्यात असतात. अशा प्रकारे यातल्या ज्या मुलांचा आपल्या सख्ख्या आईवडिलांशी संपर्क राहिलेला नसेल त्यांना त्यांच्याबद्दल काय वाटत असेल? आणि आजीआजोबा म्हणजे आईवडिलांच्या आईवडिलांबद्दल त्यांच्या मनात कितपत आदर किंवा प्रेमभावना वाटत असेल? त्यांना त्यांच्याबद्दल कितीशी माहिती असेल? आणि अशा मुलांच्या सहवासात वाढलेल्या 'देसी' नातवंडांवर त्यांच्या विचारांचा प्रभाव पडत असेलच ना? कदाचित असेही असू शकेल की इतर कोणाकडेही नसलेले 'ग्रँपा' आणि 'ग्रॅनी' आपल्याकडे असल्यामुळे आपण कोणी स्पेशल असल्याचा त्या मुलांना अभिमान वाटत असेल.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . .. (क्रमशः)
प्रतिक्रिया
हा लेख अधिकच नावडला. म्हणजे
हा लेख अधिकच नावडला. म्हणजे लेखाचा उद्देश वेगळा असता तर आवडलाही असता पण लेखाचा उद्देश ज्या नात्यावर प्रकाश टाकायचा आहे त्याची एकच बाजु (आजीआजोबांचीच) तीही एका ठराविक अंगानेच (त्यांना येणारे प्रश्न) उलगडत आहे असे वाटले.
अर्थात अजून भाग बाकी आहेत त्यात दुसर्या बाजुने (नातवंडांच्या) या नात्यावर तसेच दोन्ही बाजुच्या इतरही अंगांनी (जसे आजीआजोबांना नातवंडांकडून शिकायला मिळणार्या गोष्टी, आजीआजोबांना नातवंडांची होणारी मदत, नातवंडांच्या बदलत्या नितीमुल्यांमुळे आजीआजोबांना स्वतःत करावे लागलेले बदल, आजीआजोबांचे आजारपण व त्यावेळी नातवंडांची भुमिका, नातवंडांची आजारपणे व त्यावेळी आजीआजोबांची भुमिका, आईवडिल सोबत नसताना आजीआजोबा व नातवंडांतील संवाद, आजी व आजोबा या दोन वेगळ्या इन्टीटीज धरून पुन्हा हे सारे व इतरही अनेक अँगल्स) यावर अधिक प्रकाश टाकायचा प्रयत्न होईलसे वाटले.
स्पष्ट मताबद्दल क्षमस्व!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
भाग आवडला, निदान एक बाजू तरी
भाग आवडला, निदान एक बाजू तरी फारशा अभिनिवेशा शिवाय मांडली आहे हे आवडले.
ह्म्म्म
अभिनिवेश नी अश्या प्रकारच्या लेखनात नेहमी दिसणारी चिडचिड व/वा हताशपणा नाही हे ही खरेच.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
असेच म्हणतो. मात्र एक बाजू धड दाखवली तरी एकांगीपणाचा आरोप होणंही तितकंच रोचक वाटलं हेही जाताजाता नमूद करतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सध्या तरी एकांगीच
धन्यवाद. ही मालिका लांबवून आपण दाखवलेले मुद्दे त्यात समाविष्ट करावेत असे वाटायला लागले आहे.
लांबवा हो. त्याच साठी केला
लांबवा हो. त्याच साठी केला होता अट्टाहास!
ऐसी आहे घरचं होऊ दे ब्यांडविड्थवर खर्च!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वाचतेय.
वाचतेय.
अवांतर - परदेश
धागा प्रचंड सुंदर आहे. मी बुकमार्क केला आहे पुनःपुनः वाचायला.
विदेशात जावे वा नाही हे ठरवताना मी नेहमी ट्रेंड काय आहे, आर्थिक अॅंगल काय आहे वा करिअर काय आहे या पेक्षा भावनिक बाजू काय आहे याचाच जास्त विचार करतो. अशा विचाराअंती मी भारतात राहाणे मी पसंद करतो(अर्थातच इतरांचा निर्णय वेगळा असू शकतो.) किंबहुना खेड्यातून आलेल्या (माझ्यासारख्या) माणसाला शहरातलीच मूल्ये स्वीकारायला अवघड गेले आहे, तेव्हा परदेशात जाणे म्हणजे परग्रहावर जाण्यासारखे आहे. काही काही लोक, कोण्या का पार्श्वभूमीतून येईनात, अत्यंत सहजपणे स्वतःला कोणत्याही संस्कृतीत, सोशल क्लासमधे ढाळताना पाहिली आहेत, पण माझा तो प्रांत नव्हे हे स्पष्टपणे जाणवते.
पुढच्या पिढीबद्दल? या पिढीला माझ्यासारखे "शाकाहारी नाहीतर उपाशी" प्रकारचे बनवायचे नाही. त्यांना भारताबद्दल, भारतीयत्वाबद्दल, इथल्या जनरल इथोजबद्दल फारशी आस्था नसावी असे मला वाटते. वन्स यू आर इन कॅनडा अँड लाँग इन कॅड, यू शूड बी टोटल कॅनेडीयन.
माझे फोरसीएबल जीवन भारतात आरामात जाणार आहे हे दिसत असले तरी मला पुढच्या पिढीसाठी या देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थैर्याबद्दल मनात बरीच आशंका आहे. प्रगत देशांत कितीतरी पिढ्यांसाठी असे स्थैर्य एकदम ग्यारांटीड आहे. तेव्हा त्यांनी प्रगत देशात स्थलांतर करावे हे उत्तम. पुढची पिढी पूर्ण शहरी असल्याने "भावनिक बाजू" वैगेरे प्रकार इतका नसेल उलट बाहेर जाण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत त्यांना संधी मिळाली तर आपल्याला संधी मिळाली यासाठी ते ईश्वराचे प्रचंड ऋणी असतील. अर्थात हा सगळा गेस आहे, नक्की काय होते ते पाहायचे आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अतिअवांतर
मला तर वाट्टे आर्थिक अॅङ्गलनेही भारतात नेहमी राहणे अधिक सोयीचे असावे. परदेशात २-३ वर्षे काढून परत आलो की बास झाले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वेल, भारतात जगत राहण्यासाठी
वेल, भारतात जगत राहण्यासाठी कोणत्या आर्थिक कौशल्याची गरज नाही. पण जीवनमान उंचावायचे असेल (उच्च उत्पन्नासकट सतत जगायचे असेल तर) अवघड जागा आहे. शिवाय क्लालिटी प्रिमियम ऑफ गुड्स अँड सर्विसेस इज एक्सेसिव इन डेवलपिंग कंट्री. मंजे इथे चहा ६ रू ला, पण स्वच्छ जागी, पार्किंगला जागा नि मग चहा म्हटले तर सरळ ४० रू. प्रगत देशांत अशा बाबतीत अशी पट इतकी भयानक नसते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
काय की बॉ. भारताची
काय की बॉ. भारताची अर्थव्यवस्था पर्चेसिङ्ग पावर प्यारिटी की कायसासा निकष आहे त्यानुसार जगात बर्यापैकी टॉपला आहे म्हणे. तस्मात अन्य देशांच्या तुलनेने (युवरूप-आम्रविकादि) भारत बर्राच स्वस्त आहे. त्यात परत चीप लेबर अॅव्हेलेबल असतोच. सबब टेण्षण इल्ले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सध्या मासिक खर्च किती आहे?
This comment has been moved here.
चांगला लेख
लेख छान आहे. एक बाजू असली तरी चांगल्या पद्धतीने दाखवली आहे.
अप्रतिम!!! हा लेख खूप आवडला.
अप्रतिम!!! हा लेख खूप आवडला. पहीला वाचला नाही. आता वाचेन.
दोन्ही लेख सुंदर आणि नेमके
दोन्ही लेख सुंदर आणि नेमके आहेत. कुठ्ल्याही व्यवस्थेचे फक्त फायदेच वा फक्त तोटेच असतील असं नाहीच. लेखात अर्थातच आजी-आजोबांचीच बाजू असली तरी लेख समतोल आहेत. आतापर्यंत मोठ्यांच्या आज्ञेत राहिलेल्या आजीआजोबांना आता पुढ्च्या पिढीची दादागिरी (शब्द बरोबर नसेल पण दुसरा आठ्वत नाहीय) सहन करावी लागते हे सध्या तरी दिसणारं चित्र आहे खरं. याला कारण आहे ते म्हणजे मुलांवर असणारं अतिलक्ष. मुलांना प्रचंड फोकस मिळतो. आणि त्यावरून आजी-आजोबा वि. आई-बाबा हा सामना रंगतो. कधीकधी मुलंही याचा फायदा घेतात.
(१) मुलांना स्वत:ची कामं स्वतः करायला शिकवणं. ( खाणं, कपडे, वस्तू जागेवर ठेवणं वैगेरे)
(२) बोलण्या-वागण्याची किमान शिस्त लावणं
(३) मोठ्यांपैकी कोणाचीही बाजू पटत नसेल तरी मुलांसमोर बोल न लावणं रादर त्यातला सकारात्मक भाग किंवा त्या बाजूची काही बाजू असेल ती मुलांना समजावून सांगणं
अश्यासारखी काही पथ्य दोन्ही बाजूंनी पाळली तर नातवंडाना आजी आजोबांच्या संगतीत वाढण्यासारखं सुख नाही. बरेचदा आईवडिलही अतिरेक करतात. मागच्या पिढीनेही काही अनुभव घेतले आहेत आणि त्यांच्या खांद्यावर उभे राहिल्यानेच आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त व्यापक जग दिसतय ह्याची जाणिव ठेवायलाच हवी. आणि आपल्या मुलांनाही ती करून द्यायला हवी.
आजी-आजोबांनीही स्वतःच्या आरामाचा, वेळेचा पुर्ण त्याग करूच नये. स्वतःसाठी थोडा वेळ ठेवावा. आणि त्याच्या या वागण्याचा मुलांनीही आदर करायला हवा.
-१
लेख पटला नाही, पहीले एक-दोन परिच्छेद वाचेपर्यत पटत होते पण नंतरच सगळं अजिबातच पटलं नाही. लेख एक बाजु मांडत असला तरी खूपच एकांगी वाटतो. आजीआजोबांशी फोनमु़ळे आता स्काईप/फेसटाईमुळे नेहमी संवाद/संपर्क होत असेल तर नातवंडे इतकीपण बिचकणार नाही, अर्थात प्रत्येक मुल वेगळे असते आणि अॅडजस्ट करायला कमी अधिक वेळ घेऊ शकते. वरचा अनुभव खरा असु शकतो पण सरसकट असेच होते असे मी तरी म्हणणार नाही.
माझ्या संपर्कातले अनेकजण बहुतेक १-२ दिवसांचाच स्वयंपाक एकदम करतात यामध्ये बहुतेकदा संध्याकाळी मुलांचे वेगवेगळे क्लासेस असल्याने (उदा: सोम व बुध-स्विमिंग, मंगळ-पियानो/डान्स, गुरु - कराटे, किंवा शाळेतल्या एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याने त्या त्या टिमबरोबर १-२ दिवस प्रॅक्टीस किंवा १-२ दिवस काहीच नाही) असे किंवा यातले काही बरेचजण करतात. मग संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्यांना कडकडुन भुका लागल्यावर रोजरोज सोयीचे असले तरी फास्टफूड आणायला नको म्हणुन रविवारीही २ भाज्या करुन ठेवतात, पो़ळ्याही जमल्या तर करुन ठेवतात किंवा त्या तेवढ्या विकत आणतात, आयत्यावेळेस हवा असेल तर गरमगरम भात+आमटी करता येतो अजुन ५ मि. वेळ असेल तर कोशिंबीर अॅडवता येते. यातुनही एका पालकाने मुलांना ने-आण करायचे काम घेतले तर दुसरा पालक घरी येऊन चहा घेतल्यावर आरामात हे सगळे करु शकतो. तसेच पिझा आणि पास्ता आवडत असला सहज मि़ळत असला तरी या ब-याच मुलांना मोदकापासुन बासुंदीपर्यत, आणि कांदभजीपासुन मिसळीपर्यंत, किंवा वडापाव, इंडोचायनीज असे बरेच पदार्थ आवडतात असेही पाहीले आहे.
काही मुद्दे-
१. आजी आजोबा परदेशात जाउन हे सगळं स्वताच्या खुशीने जात आहेत का? जर उत्तर हो असेल तर मग त्यात काहीच तक्रार करण्यासारखं नाही. मुलांना सांभाळायला लागणं, चित्रविचित्र पदार्थ खावे लागणं, आजूबाजूच्या लोकांशी फारसे संवाद न होणं इ.इ प्रकार हे परदेशातील वेगळया रहाणीमानाचे साईड इफेक्ट्स आहेत. त्यांची आजीआजोबांना परदेशी जाण्याआधीच जाणीव करुन द्यायला हवी जेणेकरुन त्यांचा अपे़क्षाभंग होणार नाही.
शिवाय नातवंडांना वरण भात आवडत नाही किंवा त्यांना (आजी आजोबांच्या )आवडीचे पदार्थ खायला घालता येत नाहीत- हे पटलं नाही. आजी आजोबांनी नातवंडांना आवडणारे पदार्थ भरवून पाहिले का? तुम्हाला जे आवड्तं, ते त्यांना का आवडावं?
नातवंडांना मराठी ठीकठाक येत नसेल, पण त्या मोडक्या तोडक्या मराठीत किंवा इंग्रजीत ती बोलायला बघतात, हे थोडकं आहे का? भाषेअभावी संवाद साधला जात नाही हे अजीबात पटलं नाही.
२. आता दुसरी बाजू: आजीआजोबा केवळ नाईलाज म्ह्णून परदेशी येत आहेत. घरकाम आणि आपल्या मुलांच्या मुलांचा सांभाळ हेच जर आजी आजोबांच्या परदेश वारीचं एकमेव उद्दिष्ट असेल, तर ते नक्कीच अतिशय वाईट आहे. अशा वेळी वाटतं की परदेशी भारतीयांना परदेशी-देशी अशा दोन्ही ठिकाणचे फायदे फक्त हवे असतात. परदेशी कायमचं रहायचं ठरवल्यावर "आपल्या आईवडिलांनी घरी राहून आपल्या मुलांचा सांभाळ करावा" ही अपेक्षा थोडी विनोदी आहे! गंमत म्हणजे आजी आजोबांना त्यात काहीच चूक वाटत नाही, आणि ते बहुधा परदेशी येतात. अशा वेळी त्यांनी पोरांना खरं तर ठणकावून सांगायला हवं, की बाबांनो, सॉरी.... जर केवळ नातवंडांना सांभाळायला बोलावलं असेल तर जमणार नाही.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
लेखकाच्या प्रत्येक मुद्द्यात
लेखकाच्या प्रत्येक मुद्द्यात सॉलिड दम आहे. भारतात मागे राहिलेल्या पालकांच्या सोबत संवाद केला असता अशा प्रतिक्रिया येतात. वास्तवात यापेक्षा फार वाईट येतात, पण इथे एक सामान्य, साधारण उदाहरण देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच एन आर आय लोक हे मान्य करणार नाहीत. त्यांची स्वतःचीच मूल्ये बदललेली असतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
रोचक.
काही निरिक्षणे रोचक आहेत, विशेषत: मोटार चालवता येत नसल्याने घरी अडकून पडण्याबद्दलचे निरिक्षण अचूक आहे पण त्याला बहुतेक वेळा काही पर्याय दिसत नाही. इतर काही मुद्दे मात्र घाऊक वाटतात, जसे की नातवंडांशी जवळीक तयार व्हायला अडसर येतो...भाषेचा अडसर वगैरे ठीक आहे पण परदेशी संयुक्त कुटुंबात वाढलेली मुले आजी-आजोबांच्या प्रेमाला आसुसलेली असतात असा अनुभव आहे. आई-वडीलांच्या घाईगडबडीच्या वेळापत्रकामुळे त्यांना मुलांशी खेळायला, गप्पा करायला जी मोकळीक नसते ती आजी-आजोबांकडे असते आणि शिवाय 'दुधावरची साय' वगैरेमुळे त्यांच्याकडून रागावून घेण्याचीही शक्यता नसते त्यामुळे मुले त्यांना चांगलीच चिकटतात. भारताबाहेर रहाणार्या मुलांना इतर नातेवाईक फार भेटत नाहीत त्यामुळे कोणी घरी येऊन राहिले तर त्याचं फार अप्रूप असतं.
हे शेवटी व्यक्तिगत अनुभवांवर अवलंबून आहे पण तरी हे टंकताना हसू येतंय, शेजारी कन्या तिच्या आजी-आजोबांबरोबर झकास पत्त्यांचा खेळ मांडून बसली आहे. तिच्या लेखी आजोबांपुढे आई-बाबाला काही महत्व नाही :-), शाळा घराजवळ असल्याने आजोबा रोज न्यायला जातात, आजीच्या हातचा शिरा-पोहे पोटातून आवडतात. आजी-आजोबा परत जायला निघतील तेंव्हा कीती मोठा अश्रूपात होईल त्याची काळजी वाटतेय.
परदेशातली नातवंडे
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. परदेशांमध्ये स्थाईक झालेल्या कुटुंबांतील नातवंडांबद्दल मी तिसर्या भागात अधिक सविस्तर लिहिले आहे. प्रतिसादांमध्ये उपस्थित केलेल्या काही मुद्यांचे निराकरण त्यात होईल.
मी दिलेली उदाहरणे प्रातिनिधिक असतीलच असे मला म्हणता येणार नाही, पण माझ्या पाहण्यात आली आहेत. सोवळे नेसून आणि गंध लावून रोज देवाची पूजा करणारे भारतीयसुद्धा अमेरिकेत मिळतील. त्याचप्रमाणे रोजच्या जेवणात वरण भात, पोळी भाजी, चटणी, कोशिंबीर वगैरे डाव्या व उजव्या बाजूचे सर्व पदार्थ रांधून खाणारेसुद्धा असतीलही. पण तिकडच्या एकंदरीत परिस्थितीचा आणि उपलब्धतेचा विचार करता शॉर्ट कट मारण्याकडे कल असला तर त्यात नवल नाही. मुंबईतसुद्धा आम्ही ते करत असतो. त्यात मला काही आक्षेपार्ह वाटत नाही, माझ्या गोष्टीतल्या आजीला वाटले.
ललित लिहितांना थोडी अतीशयोक्ती केलेली चालते ना?