छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर

Kurundkar

आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.

'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यात शिवाजी महाराजांचा इतिहास, तारीखवार घटना, आकडेवारी यांना पूर्णपणे फाटा दिलेला आहे, जे नरहर कुरुंदकरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या थरारक आयुष्यातील अगदी मोजक्या पण अतिमहत्त्वाच्या घटनाक्रमांवर नरहर कुरुंदकरांनी प्रकाश टाकला आहे.

या सुरेख पुस्तकाला स.मा. गर्गे यांची सात पानी प्रस्तावना लाभली आहे तरी पुढची पाने कुरुंदकरांनी ज्या तर्कपद्धतीने व्यापली आहेत ती वाचताना वाचक थक्क होतो.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच कुरुंदकरांनी शिवाजी देवाचा अवतार मानला जातो या श्रद्धेचा वेध घेण्याचा परखड प्रयत्न केला आहे. कुरुंदकर म्हणतात "माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे."
"समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."

एवढे परखड आणि वस्तुनिष्ठ विचार वाचल्यावर मी खरे सांगायचे तर एकदम थक्क झालो. कुठे हे कुरुंदकरांचे २० व्या शतकातले वस्तुनिष्ठ विचार? आणि कुठे २१ व्या शतकाच्या विज्ञानयुगातील त्या 'फ्रान्सिस गोतिए'च्या बुरख्याआड तथाकथित धर्मवाद्यांनी पुण्यात १०० कोटी रुपये खर्चून उभारलेले छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदीर? असो.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नाट्यमय घटना मोजक्या ५-६ आहेत असे कुरुंदकर निदर्शनास आणतात. पैकी पहिली अत्भुत घटना ते अफझलखानाचा वध ही मानतात. तर या पहिल्या अत्भुत घटनेआधीची २९ वर्षे ही नाट्यशून्यतेची होती हेही ते परखडपणे दाखवून देतात. शिवाय "छत्रपतिंचे कर्त्तॄत्त्व समजून घेताना या रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिजे" अशी नेमकी जाणीवही ते करुन देतात.

"त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही" असे सांगताना कुरुंदकर पुढे ते सप्रमाणही वाचकाला समजावून देखील देतात. आणि मग वाचकाला आजचे राजकारणी वा तथाकथित धर्माचे रक्षणकर्ते चेव येतील अशी भाषणे वा लेख यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

वतनदारांविरुद्धचा लढा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील खूप कठीण लढा होता. कारण हे वतनदार म्हणजे नुसते त्यांच्याच धर्माची माणसे नव्हती तर नातेवाईक, सगे-सोयरसंबंधातील माणसे होती. प्रश्न दोन : उत्तर एक या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात "शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले, या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे"

शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष हिंदू विरुद्ध मुसलमान अशा स्वरुपात नाकारताना कुरुंदकर मार्मिकपणे म्हणतात - "परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच, त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्यामधील परस्परविरोधी संघर्ष समजणे हीच एक मूलभूत चूक आहे. मध्ययुगातील अनेक संघर्षांचा अर्थ यामुळे कळू शकणार नाही"

एक अनोखी घटना या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात - "औरंगजेब मैदानात उतरण्यापूर्वीच शिवाजीसारखा असामान्य नेता दिवंगत झालेला होता. ......"
जदुनाथ सरकारांचा दाखलाही कुरुंदकर देतात की "औरंगजेब लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या, पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता!"
"साधनसामग्री नसताना, असामान्य नेता नसताना, सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध जनता न थकता लढत होती. एखादे राज्य टिकवण्यासाठी फारसे मोठे नेतृत्त्व नसणार्‍या जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटनाच हिंदुस्थानच्या इतिहासात नवखी आहे, एकाकी आहे"

पान क्र. २२ वर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांना युवावस्थेत राज्यनिर्मितीची प्रेरणा कुठून मिळाली असेल याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जिजामातेने रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या असतील. विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याची हकीकत ऐकली असेल. दादोजी कोंडदेवांचे शासनचातुर्य पाहिले असेल. ज्ञानेश्वर-नामदेव साधुसंतांपासून प्रेरणा घेतली असेल. असे अनेक तर्क आहेत."पण या बाह्य सामग्रीतून लाखोंच्यापैकी एकालाच प्रेरणा का मिळते, इतरांना का मिळत नाही, याचे समाधानकारक उत्तर कोण, कसे देणार?" असा तर्कशुद्ध प्रश्नही कुरुंदकर उपस्थित करतात.

अफझलखान वधाचा वेध घेताना अफझल खान हा वाईचा सुभेदार होता तेव्हा शिवाजीचा नायनाट हे सुभ्याचा सुभेदार या नात्याने अफझलखानानेच करणे अपेक्षित होते. त्यासाठी आदिलशाही दरबारात शिवाजीचा नाश करण्याचा त्याने विडा उचलण्याची गरज नव्हती व ही केवळ कपोलकल्पित भाकडकथा आहे हेही कुरुंदकर वस्तुनिष्ठतेने निदर्शनास आणून देतात.

त्यानंतर सिद्दी जोहरचा वेढा , शाहिस्तेखानाला अचानक लाल महालात घुसून अचंभित करणे, औरंगजेबाच्या कैदेत असताना दिल्लीहून पलायन या घटनांतून शिवाजी महाराज हे केवळ धाडसीच नव्हते तर कल्पक देखील होते याकडेही कुरुंदकर लक्ष वेधतात. शत्रूच्या नेमक्या वर्मावर घाव कसा घालावा हे शिवाजी महाराजांना अवगत होते.

छत्रपतिंच्या नेत्तृत्त्वाच्या खर्‍या यशाचे मूल्यमापन करताना कुरुंदकर म्हणतात - " २७ वर्षांच्या प्राणघेऊ प्रदीर्घ झुंजीतून जे शिल्लक राहिले, ते मराठ्यांचे खरे राज्य आहे. शिवाजीने पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापति नसताना प्रचंड फौजांच्या विरुद्ध २७ वर्षे अखंड झगड्याला पुरु शकली, यातच त्याच्या नेत्तृत्त्वाचे खरे यश आहे"

गडांची डागडुजी व उभारणी याचबरोबर आरमाराकडे लक्ष हाही शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन कुरुंदकर दाखवतात. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज व फ्रेंच यांना धडकी भरवली होती. पुढील काळात मराठ्यांनी या आरमाराचा वापर केला असता तर कदाचित इंग्रज देशावर राज्यकर्ता झाला नसता. पुढे खुद्द नानासाहेब पेशव्यांनीच आरमार नष्ट करुन मराठी साम्राज्याचा पाया खिळखिळा करण्यात मोठा हातभार लावल्याचेही कुरुंदकर मोठ्या व्यथित मनाने लिहिताना दिसतात.

जनतेचे प्रेम शिवाजी महाराजांनी कसे मिळवले? याच्या मुख्य कारणांचा परामर्श घेताना कुरुंदकर म्हणतात - "शिवाजीने जिद्दीने घडवून आणलेला हा वतनदारीचा वध सर्वात महत्त्वाचा आहे" याच जोडीने सर्वसामान्यांच्या स्त्रियांची अब्रू वतनदारांच्या पुंडांपासून वाचवून तिला कुठेही निर्भयपणे फिरता येईल असे राज्य शिवाजीने निर्माण केले, हाही उल्लेख महत्त्वाचा आहे.

सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले (अनावश्यक) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे. कारण अलिकडच्या काळात या दिशेने खूप मोठे संशोधन झाले व अनेक पुरावेही समोर आले आहेत, येत आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. मी करुन देत असलेल्या पुस्तकाच्या परिचयाचा नव्हे. तेव्हा एवढे एवढे सोडले तर बाकीच्या पुस्तकात कुरुंदकरांनी जे विवेचन केले आहे ते खरेच अफलातून आहे.

छत्रपति शिवाजी महाराजांनी गरीब रयतेला वतनदारांच्या जाचातून मुक्त केले यातच त्यांच्या लोकप्रियतेचे आणि यशाचे रहस्य सामावले आहे असे वाचकाच्या लक्षात आणून देण्यास कुरुंदकर पूर्णतः यशस्वी झाले आहेत. आजच्या राज्यकर्त्यांनी केवळ छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या गुणांची अंमलबजावणी केली तर ते कृत्य खरे शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारे ठरेल.

नरहर कुरुंदकर यांचे हे छोटेसे पुस्तक वाचनीय तर आहेच पण छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्‍या प्रत्येक मराठी घरात असावेच असे आहे. शिवाय ऐतिहासिक संदर्भासाठीदेखील हे छोटेसे पुस्तक खूप मोठे काम करते.

नरहर कुरुंदकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य हे पुस्तक मी घेतले आहे. तुम्ही घेणार का? Smile

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

कुरूंदकरांचे 'जागर' वाचल्यापासून कुरूंदकरांबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला आहे. हे पुस्तकही यादीत टाकलं आहेच.

शिवाजीच्या जातपात न मानण्याबद्दल कुरूंदकरांनी काही लिहीलं आहे का? उच्चभ्रूंच्या संस्कृतमधे बंदिस्त असणारं गीतेचं तत्त्वज्ञान सामान्यांसाठी मराठीत सांगितलं म्हणून ज्ञानेश्वर अधिक महान वाटतात. तसेच माणसाला त्याच्या जातीप्रमाणे काम न देता योग्यतेनुसार पदरी बाळगणारे, रयतेला आपली मुलं म्हणून जपणारे म्हणून शिवाजी महाराज थोर वाटतात.

'जागर'मधे कुरूंदकरांनी लिहील्याप्रमाणे ७५ वर्षांत इस्लामचा प्रचार संपूर्ण अरबस्थानात झाला. त्या काळात माहित असणार्‍या जगापैकी हे साधारण १/३ जग. पुढे याच इस्लामला भारतात (आजचा भारत्+पाकीस्तान) गिळण्यासाठी काही शतकं लागली. इतिहासाकडे अशा पद्धतीने बघायला शिकवणारे कुरूंदकर आजही वाचनीय आहेत.

याच आठवड्यात 'प्रहार'च्या कोलाज पुरवणीत कुरूंदकरांचा एक निबंध संपादित स्वरूपात प्रसिद्ध झाला आहे. दुर्दैवाने आणीबाणीच्या काळात लिहीलेला तो निबंध आजही कालबाह्य ठरलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी जागर यादीत टाकलयं.

कुरूंदकरांबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला आहे

+१

शिवाजीच्या जातिपातीबद्दल कुरुंदकरांनी काही लिहिल्याचे वाचल्या सारखे आठवत नाही, पण त्यांचे मनुस्मृतीवरील विचार असलेला निबंध/पुस्तक/लेख आहे, तो शोधायचा प्रयत्न करतोय, त्यात बहूदा नविन दृष्टिकोन मिळेल असं वाटतं.

याच आठवड्यात 'प्रहार'च्या कोलाज पुरवणीत कुरूंदकरांचा एक निबंध संपादित स्वरूपात प्रसिद्ध झाला आहे. दुर्दैवाने आणीबाणीच्या काळात लिहलेला तो निबंध आजही कालबाह्य ठरलेला नाही.

ह्याबद्दल अनेक धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदिती

तू नेमका दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. हा निबंध आता निवांतपणे बसून वाचतो Smile

बाकी तुझ्या " कुरूंदकर आजही वाचनीय आहेत" याही मताशी तंतोतंत सहमत आहे.

कुरुंदकरांचे लेखन हे काळाच्या पुढचे असायचे. त्यामुळे कायमच वाचनीय आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशेषतः हा लेख आणीबाणीच्या काळात लिहीलेला असल्यामुळे तो आजही कालबाह्य ठरलेला नाही याचं अधिक वैषम्य वाटतं. समाज बदलत रहातो, सामाजिक मूल्य बदलत रहातात. सुंदर हस्ताक्षराचं कौतुक असलं तरीही दासबोधात लिहीलेलं आहे म्हणून मुद्दाम अक्षर घोटवण्याचे दिवस आता नाहीत. कुरुंदकरांचं लिखाण वाचता असं वाटतं की त्यांच्या हयातीत त्यांचे विचार कालबाह्य ठरले असते तर ते त्यांनाही आवडलंच असतं.

विज्ञानामधेही मांडलेल्या थिअरीज, निरीक्षणं खोटी पडलेली बघण्याचं भाग्य अनेकांना मिळतं. स्वतःच्याच थिसीसमधे मांडलेल्या गोष्टी स्वतःच खोडून काढण्यात जास्त मजा असते, असं ओळखीचे सगळे सिनीयर (अर्थात म्हातारे) संशोधक सांगतात ते आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अतिशय छान पुस्तक.

शिवाय "छत्रपतिंचे कर्त्तॄत्त्व समजून घेताना या रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिजे" अशी नेमकी जाणीवही ते करुन देतात.

ह्या आशयाचा एक धडा ९वी/१०वीत होता असे आठवते, तेंव्हा ऑफकोर्स ह्यातला आशय कळला नव्हता, पण मोठं झाल्यावर हे पुस्तक जेंव्हा वाचलं तेंव्हा तो धडा अभ्यासक्रमात असण्याचं महत्त्व कळालं.

छत्रपतिंच्या नेत्तृत्त्वाच्या खर्‍या यशाचे मूल्यमापन करताना कुरुंदकर म्हणतात - " २७ वर्षांच्या प्राणघेऊ प्रदीर्घ झुंजीतून जे शिल्लक राहिले, ते मराठ्यांचे खरे राज्य आहे. शिवाजीने पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापति नसताना प्रचंड फौजांच्या विरुद्ध २७ वर्षे अखंड झगड्याला पुरु शकली, यातच त्याच्या नेत्तृत्त्वाचे खरे यश आहे"

+१ हे वाचलं आणि वाटलं अशाप्रकारे इतिहास सांगायला पाहिजे, निदान शिवरायांचा इतिहास, ऑफकोर्स पुरंदर्‍यांचं शिवचरित्र जाज्वल्य अभिमानाने भरलेलं/भारलेलं आहे, पण हे पुस्तक वैचारिक मनाला पटणारं आणि शिवाजी हा नुसता जेत्यांचा इतिहास नसून त्यापलीकडे काहीतरी आहे हे जाणिव करुन देणारं वाटतं

शिवाजी + नरहर कुरुंदकर ह्यांच्याबद्दल अधिक वाचायचं असल्यास, २०११ चा मटाचा दिवाळी अंक पहा, नरहर कुरुंदकरांचा "शिवाजीवरील इतिहास लेखन" ह्या आशयाचा एक जुना लेख दिला आहे, लेख खरच उत्तम आहे. जरूर वाचा.

अवांतर - असंच काहीसं ज्ञानेश्वरांबद्दलपण लिहिलं गेलं पाहिजे असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी,

१ हे वाचलं आणि वाटलं अशाप्रकारे इतिहास सांगायला पाहिजे, निदान शिवरायांचा इतिहास, ऑफकोर्स पुरंदर्‍यांचं शिवचरित्र जाज्वल्य अभिमानाने भरलेलं/भारलेलं आहे, पण हे पुस्तक वैचारिक मनाला पटणारं आणि शिवाजी हा नुसता जेत्यांचा इतिहास नसून त्यापलीकडे काहीतरी आहे हे जाणिव करुन देणारं वाटतं

हे अगदी पटले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेष्ठत्वाला अद्भुताचं वलय देऊन सोयीस्कर असतं. कारण कर्त्या पुरुषाच्या कष्टांकडे अभ्यासक वृत्तीनै पाहून त्यातून शिकण्याऐवजी डोळे मिटून पूजा करणं सोपं असतं. त्यामुळे या पुस्तकाची तोंडओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

असंच काहीसं ज्ञानेश्वरांबद्दलपण लिहिलं गेलं पाहिजे असं वाटतं.

मी यांना शंभर टक्के अनुमोदन. रेड्याच्या तोंडून वेद वदवणं, भिंत चालवणं, पाठीवरती मांडे भाजणं वगैरे चमत्कारांचं वलय बाजूला सारून ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या भरीव कामगिरीवर लक्ष केंद्रित करता आलं तर उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असंच काहीसं ज्ञानेश्वरांबद्दलपण लिहिलं गेलं पाहिजे असं वाटतं.
मन यांना शंभर टक्के अनुमोदन. रेड्याच्या तोंडून वेद वदवणं, भिंत चालवणं, पाठीवरती मांडे भाजणं वगैरे चमत्कारांचं वलय बाजूला सारून ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या भरीव कामगिरीवर लक्ष केंद्रित करता आलं तर उत्तम.

राजेश,

प्रतिसाद आवडला. तुम्ही म्हणता ते खरे आहे. ज्ञानेश्वरांचे कार्य अद्वितीयच आहे. ते ज्ञानेश्वरी आणि अनुभवामृताच्या रुपाने लोकांनी लक्षात ठेवले तर जास्त उत्तम.
अगदी सहमत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले (अनावश्यक) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे.>

मला वाटते की असे काही वादग्रस्त मुद्दे पुस्तकात आहेत असे लेखाच्या लेखकाने वाचकांना स्वतःहून सांगितल्यानंतर त्यांच्यामधील मजकुराला लेखकाने पूर्णपणे अनुल्लेखाने वगळणे आणि ते 'अनावश्यक' आहेत असे आपले स्वतःचे judgement वाचकांना गृहीत धरावयास लावणे हे योग्य वाटत नाही.

वाचकांना ठरवू देत ते 'मुद्दे' अनावश्यक आहेत काय आणि असल्यास किती. त्यासाठी तुम्ही आता ते मुद्दे सांगायला हवेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंदजी,

निदर्शनास आणून दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे

पुस्तक वाचून ठेवले आणि लगोलग हा परिचय लिहिला. त्या आवेगात ही चूक लक्षात आली नाही.
ही माझी वैयक्तीक मते आहेत. मी ही व्यक्तीशः वाचकांनी स्वतःच त्यांची मते ठरवावीत या मताचा आहे.

वाचकांनी ही गोष्ट समजून घ्यावी ही नम्र विनंती.

पुन्हा एकदा आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला परिचय.
महाभारतासारख्या भल्याथोरल्या ग्रंथाकडे वेगळ्या नजरेतून बघायला लावण्याचे श्रेय 'व्यासपर्व' या छोट्याशा पुस्तकाला जाते.
तसेच परिचयातील ठ़ळक वाक्य वाचून बहुदा शिवचरित्राकडे वेगळ्या नजरेतून हे पुस्तक पहायला लावेलसे दिसतेय. आता मिळवून वाचलेच पाहिजे

बाकी, वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे, थोरांची चमत्कार, देवत्त्व आदींनी झाकलेली मुर्ती मुळस्वरूपात बघायला शिकवणारी अशी पुस्तके अधिक वाचावीशी वाटतात. महात्मा गांधींची 'एका गालावरची थप्पड' वरील टवाळी पासून 'दे दी हमे आझादी...' ही दोन टोकं, टिळकांच्या गणित, खगोल, गीतेवरील चिंतनात्मक लेखन आदिंवर दोन वाक्यात माहिती संपवून त्यांनी न उचलेल्या टरफलांचं आणि केवळ त्यांच्या जन्मसिद्ध हक्काच्या गर्जनेचंच पानपान कौतूक, सावरकरांची विज्ञाननिष्ठा, अस्पृश्यनिवारण वगैरे सोडून त्यांना 'हिंदू'नेता सॉरी हृदयसम्राट बनविण्याचाच अट्टाहास, आंबेडकरांची घटनासमितीतील भाषणे दुर्लक्षून केवळ चवदार तळ्याकाठी त्यांचा संपणारा परिचय.. ... खरंतर यादी संपणारच नाही..

समाजाने घातलेल्या पगडीच्या झिरमिळ्यांमागचा चेहरा जेव्हा अशी पुस्तकं दाखवतात तेव्हा एका दृष्टीकोनातून का होईना 'सत्य' पाहिल्याचा आनंद मिळतो हेच खरं

हे पुस्तक वाचुन तुझ्या दृष्टीत फरक पडला का? पडल्यास काय? कसा? कितपत? वगैरे इथे आले असते तर परिक्षण-परिचय-ओळख अधिक परिपूर्ण वाटले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी, वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे, थोरांची चमत्कार, देवत्त्व आदींनी झाकलेली मुर्ती मुळस्वरूपात बघायला शिकवणारी अशी पुस्तके अधिक वाचावीशी वाटतात. महात्मा गांधींची 'एका गालावरची थप्पड' वरील टवाळी पासून 'दे दी हमे आझादी...' ही दोन टोकं

या संदर्भात गांधींबद्दल बाकीच्यांपेक्षा जास्त चिकित्सक लेखन झाले आहे. एक तर त्यांच्या चाहत्यांसकटच उजव्यापासून कट्टर डाव्यांपर्यंत त्यांचे कडक टीकाकार होते, आणि स्वत: बद्दल चिकित्सक, आत्मशोधनपर लेखन गांधींनीच खूप केले हे ही एक कारण असावे, कदाचित. असे चिकित्सक चरित्र वाचायची आवड असेल तर डेविड आर्नळ्ड लिखित "Gandhi: Profiles in Power" मस्त आहे. गांधींच्या विचारांचे, ऐतिहासिक संदर्भांचे आणि गुण-दोषांचे सुरेख, सुवाच्य विश्लेषण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक आभार. चिकित्सक चरित्र (जर चिकित्सा एकांगी किंवा निश्कर्ष आधीच ठरवून लिहिलेले नसले तर) वाचायला आवडते. आता हे पुस्तक धुंडाळायला हवे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

टिळकांच्या गणित, खगोल, गीतेवरील चिंतनात्मक लेखन आदिंवर दोन वाक्यात माहिती संपवून त्यांनी न उचलेल्या टरफलांचं आणि केवळ त्यांच्या जन्मसिद्ध हक्काच्या गर्जनेचंच पानपान कौतूक,

डॉ. सदानंद मोरेंच्या 'लोकमान्य ते महात्मा'च्या पहिल्या खंडात "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा अग्रलेख न.चिं.केळकरांनी लिहील्याचा उल्लेख आहे. स्वतः टिळक अतिशय काळजीपूर्वक भाषा वापरत. अर्थातच 'केसरी' लोकमान्य चालवत असल्यामुळे केळकरांच्या लिखाणामुळेही शिक्षा टिळकांना झाली आणि त्यांनी ती भोगली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सागर,
पुस्तक परिचयाबद्दल आभार, ऋषिकेशनी म्हटल्याप्रमाणे व्यासपर्वाने जशी महाभारताकडे बघण्याची नवी दृष्टी दिली तसेच ह्या पुस्तकाबद्दल वाटते.
श्रीमान योगीची प्रस्तावना वाचताना नरहर कुरुंदकर म्हणजे कोणीतरी ऐतिहासिक ‘पुराणपुरुष’ अवतार असतील असे वाटले होते. पण प्रस्तावना लिहिताना त्यांचे वय ३० वर्षे होते. (संदर्भ : कुरुंदकर नावाचे लोकविलक्षण रसायन)

अवांतर –
आणि कुठे २१ व्या शतकाच्या विज्ञानयुगातील त्या 'फ्रान्सिस गोतिए'च्या बुरख्याआड तथाकथित धर्मवाद्यांनी पुण्यात १०० कोटी रुपये खर्चून उभारलेले छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदीर?

हे मंदीर पुण्यात कोठे आहे? माहित नाही म्हणून विचारतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>(संदर्भ : कुरुंदकर नावाचे लोकविलक्षण रसायन)<<

ह्यासाठी आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0