Skip to main content

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'

**********************************

किती वाकुडे बोल बोलून झाले
स्वत:च्याच सत्वास गाळून झाले

धरा सांगताहे कथा पावसाची
किती थेंब पदरात झेलून झाले ?

जरी भोवती 'माणसे' फार झाली
तरी एकट्यानेच 'खेळून' झाले

नको रोकडा, दागिनेही नकोसे
बियाण्यासवे सत्व तोलून झाले

जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले

कसा रे मुरारी तुझा हा अबोला?
सुरांवर तुझ्या आज भाळून झाले

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'
पुन्हा आरशालाच टाळून झाले

किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?

*********************************

विशाल

वामा१००-वाचनमा… Thu, 20/11/2014 - 19:27

वा!!! फार छान.

जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले

सुरेख.

ऋषिकेश Fri, 21/11/2014 - 14:25

व्वा! बर्‍याच दिवसांनी इतकी बांधेसूद रचना - गझल वाचली. आवडलीही. ('गणाधीश जो ईश'च्या चालीवरही म्हणायला मजा येतेय ;) )

जरी भोवती 'माणसे' फार झाली
तरी एकट्यानेच 'खेळून' झाले

जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले

किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?

हे तीन शेर तर फर्मास जमलेत!

असेच सकस नी शिवाय वृत्त/छंदबद्ध काही अजुन वाचायला आवडेल
=====

नको रोकडा, दागिनेही नकोसे
बियाण्यासवे सत्व तोलून झाले

बियाण्या की बियाणासवे?

बॅटमॅन Fri, 21/11/2014 - 14:46

In reply to by ऋषिकेश

बियाण्या की बियाणासवे?

बियाणे या शब्दाचे सामान्यरूप बियाण्या असे होते त्यामुळे श्लोकातला पाठ बरोबर आहे.

इरसाल म्हमईकर Fri, 21/11/2014 - 15:32

In reply to by बॅटमॅन

आभार्स ऋषिकेश आणि बॅटमॅन :)

महाराष्ट्राच्या अनेकविध बोली भाषांमध्ये शब्दांचे उच्चार निरनिराळ्या पद्धतीने केले जातात. बिया'णा'सवे आणि बिया'ण्या'सवे हे दोन्ही प्रचलित आहेत. :)

इरसाल म्हमईकर Sat, 22/11/2014 - 16:35

In reply to by बॅटमॅन

गझलेतील पहिल्या शेराला 'मतला' म्हणतात. 'मतला' म्हणजे उदय. शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात. मक्ता म्हणजे अस्त. गझलेत मतला आणि मक्ता आवश्यक असतात , जसे गाण्यात 'मुखडा ' महत्वाचा तसेच. :)

इरसाल म्हमईकर Sat, 22/11/2014 - 16:45

In reply to by ऋषिकेश

ओह्, मग "प्रभो" ?
मला वाटलं 'प्रभो' ला अवतरण केलंय तर तो मक्ता आहे
>>>>

ऋषिकेश, मला वाटतं, तुम्हाला ’तखल्लुस’ म्हणायचे आहे. गझलेतील शेवटचा शेर ज्यात शायराचे उपनाव ( तखल्लुस ) असते त्याला 'मक्ता' म्हणतात.

या गझलेच्या मक्त्यात वापरलेले 'प्रभो' हे ईश्वराला उद्देशून आहे. आयुष्यातले सगळे संघर्ष, आपत्ती पचवून झाल्यावर कंटाळलेला जीव त्या परमेशाला विचारतोय की 'बाबा रे, तुझे अजून किती डाव खेळायचे बाकी आहेत? म्हणजे जो माझी या सगळ्यातून सुटका करू शकेल तो मृत्यु कधी येणार आहे? त्यामुळे इथे त्या प्रभूचे वर्चस्व, त्याचे सामर्थ्य अधोरेखित करण्यासाठी ते अवतरण आहे. तो माझा 'तखल्लुस' नाही.

धन्यवाद मंडळी !