Skip to main content

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

3 minutes
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७

भगवंत म्हणतात:

१. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे
२. कर्मफळ माणसाच्या हातात नाही.
३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.

भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो. पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण. जर कर्माचे फळ मिळणार नसेल तर कर्म कशाला करायचे, असा प्रश्न मनात येणारच. मग भगवंतांनी गीतेत कर्म फळावर, कर्म करणार्याचा अधिकार नाही, हे का म्हंटले आहे? हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण पाहतोच मुलाने उत्तम अभ्यास केला तर त्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात. उत्तम अभ्यास = उत्तम गुण सहज सोपी नियम आहे. पण नेहमीच असे होत नाही. कुणी विद्यार्थी आजारी पडतो आणि पेपर देऊ शकत नाही. कुणाला अपघात होतो, परीक्षा केंद्रावर पोहचू शकला नाही. कुणाला पेपर तपासताना क्वचित होणाऱ्या चुकी मुळे ९० च्या जागी ०९ मार्क मिळतात. तो चक्क नापास होतो. SSCचा टायपिंगचा पेपरात नेहमीचेच आहे, प्रत्येक केंद्रात २-३ परीक्षार्थी केवळ टाईपरायटर खराब झाल्या मुळे अयशस्वी होतात. त्यांना सरकारी नौकरी मिळत नाही. त्यांची तैयारी व्यर्थ जाते. शेतकरी ही उत्तम बियाण्यांची पेरणी करतो, शेतात जातीने लक्ष देतो, खत, पाणी व मशागत सर्व उत्तम प्रकारे करतो, पिक ही भरपूर येते, पण कित्येकदा गारपीट, अवेळी पावसामुळे त्याचे अतोनात नुकसान होते. त्याला ही पाहिजे तसे फळ मिळत नाही.

वरील उदाहरणांनी एक बाब स्पष्ट होते, सर्वांनी उत्तम कर्म केले पण तरी ही त्यांना फळ मिळाले नाही. कर्म करणे माणसाच्या हातात आहे, पण आपल्या कर्मावर प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसते. देश, काळ, राजनीतिक परिस्थिती एवं इतरांच्या कर्मांचा प्रभाव ही आपल्या कर्मांवर पडतो. समर्थांनी या आपल्या कर्मांवर प्रभाव टाकणार्या इतर बाबींचे वर्णन, "अध्यात्मिक ताप" (देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने होणारे ताप - शारीरिक व मानसिक व्याधी इत्यादी ) आणि "आधिभौतिक ताप" ( सर्व पंचभूतांच्या संयोगाने जे त्रास होतात अर्थात सर्व प्रकारचे बाह्य कारणे - अपघात, सर्पदंश, चोरी, डकैती, आग, अतिवृष्टी, पूर, परचक्र, राजा एवं अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून छळ इत्यादी) [दशक ३, समास ६ आणि ७] असे केले आहे. या सर्व बाबींवर कर्म करणार्याचे नियंत्रण नसते, म्हणूनच भगवंतानी म्हंटले आहे, कर्मफळावर कर्म करणाऱ्याचा अधिकार नाही, केवळ कर्मावर त्याचा अधिकार आहे.

कर्मांचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो. आज ह्या मुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करतात, पेपर मध्ये नापास झाल्याने विद्यार्थी ही आत्महत्या करतात. किंवा लोक कर्म करणे सोडून देतात. मृत्युलोकाला 'कर्मलोक' ही म्हणतात, इथे कुणाला ही कर्म चुकलेले नाही. कर्म हे करावेच लागणार, त्या शिवाय या लोकात कुणी जगू शकत नाही. म्हणूनच भगवंतानी गीतेत म्हंटले आहे, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे. असे कर्म केल्याने आपल्या कर्माचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळाले नाही तरी ही आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही.

कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरी राजाला कळले, तर तो कुठल्या ही परिस्थितीत निराश होणार नाही. आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तैयारीला लागेल. विद्यार्थी ही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. हेच भगवंताना गीतेत सांगायचे असेल.

Node read time
3 minutes

वामा१००-वाचनमा… Mon, 08/12/2014 - 20:20

हेच तत्वज्ञान कोणी पाश्चात्य व्यक्तीने बरच जारगन वापरुन सांगीतलं की - ज्या बाबींवर तुमचे नियंत्रण (कंट्रोल) नाही त्या बाबींवर डोकेफोड न करता, उलटपक्षी ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण आहे त्या नियंत्रित करुन प्रयत्नांची कास सोडू नका. तर कदाचित लवकर पटेल. ते सेल्फ-हेल्प पुस्तक बरच खपेल ;)

विवेक पटाईत Mon, 08/12/2014 - 20:54

In reply to by वामा१००-वाचनमा…

ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण आहे त्या नियंत्रित करुन प्रयत्नांची कास सोडू नका. तर कदाचित लवकर पटेल

व्यवस्थित वाचा, ज्या गोष्टींवर नियंत्रण आहे, त्या पूर्णपणे केल्या अर्थात 'उत्तम अभ्यास' उत्तम शेती केली. तरी ही फळ मिळत नाही आणि माणूस निराश होतो. आणि त्यांनी निराश होऊ नये त्या साठी गीतेत भगवंतानी हा उपदेश अर्जुनाला दिला आहे. जय पराजय, लाभ-हानी यांच्याकडे समदृष्टीने पाहत आपण आपले नियत कर्म करत राहिले पाहिजे.

प्रकृतीला आपण नियंत्रित करू शकत नाही, भूकंप थांबवू शकत नाही, विजेला जिथे पडायचे असेल तिथे पडेलच. तसेच दुसर्यांचे कर्म ही थोड्याफार प्रमाणातच आपण नियंत्रित करू शकतो. त्यांच्या कर्मांचे फळ ही आपल्याला पुष्कळदा भोगावे लागतात. उदा: सरकारने कांद्याचा निर्याती वर बंदी आणली आणि कांद्याचे भाव पडले, व्यापारी आणि शेतकर्यांना नुकसान झाले.

वामा१००-वाचनमा… Mon, 08/12/2014 - 21:00

In reply to by विवेक पटाईत

प्रयत्न करणे हातात आहे (= आपले नियंत्रण आहे) असे म्हणायचे होते मला.

या विषयाशी संबंधीत पुढील गोष्ट वाचनात आली -

Duck
Your practice is like raising a duck. Your duty is to feed it and give it water. If it grows fast or slow, it's the duck's business. Not yours. Let it go and just do your own work. Your business is to practice. If it's fast or slow, just know it. Don't try to force it. This kind of practice has a good foundation.
- http://www.ajahnchah.org/pdf/tree-forest.pdf

गवि Tue, 09/12/2014 - 11:51

उत्कृष्ट विवेचन.

कर्मण्येवाधिकारस्ते या वचनाचा अर्थ "फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहा" असा चुकीचा बहुतांश ठिकाणी घेतला जातो.

"कर्मावर अधिकार आहे, फळावर नाही" अश्या अर्थाचं ते एक वस्तुस्थितीदर्शक वाक्य आहे हे सांगणं आवश्यक बनतं.

अगदी असंच नव्हे, पण ड्रायव्हिंग लायसेन्सवर लिहिलेलं वाक्य आठवतं: "Driving is a previlege, not a right"

तसंच (कर्माचे) फल इज अ प्रिव्हिलेज, नॉट अ राईट.. असं काहीसं म्हणता येईल.

ऋषिकेश Tue, 09/12/2014 - 11:58

प्रकृतीला आपण नियंत्रित करू शकत नाही

माझ्या स्वल्पज्ञानानुसार आधुनिक शास्त्र किंवा एकुणच विज्ञान हे प्रकृतीच्या नियमांना सुत्रात बांधण्याचा प्रयत्न करणे आहे.
एकेकाळी स्त्री-पुरूषाच्या (नर मादीच्या) मिलनाशिवाय / संभोगाशिवाय अपत्यनिर्मिती शक्य नाही वगैरे सांगितले जायचे. आता टेस्ट ट्युब बेबीज आहेत. स्पर्म बँकेतून ती मिळावताही येतात. (न जाणो उद्या स्पर्म्स कृत्रिम रित्या बनवता येऊ लागतील - आलेही असतील माहिती नाही) तेव्हा निसर्गाला नियंत्रीत करू शकत नाही हे कसे समजावे?

अजून निसर्गाचे सर्व नियम माणूस समजून घेऊ शकलेला नाही. किंवा समजूनही त्यांना "नियमांत" बांधु शकलेला नाही ,(प्रयत्न चालु आहेत) हे वाक्य अधिक योग्य ठरावे.

गवि Tue, 09/12/2014 - 12:27

In reply to by ऋषिकेश

त्यांचं ते वाक्य अगदी शब्दशः घेऊ नये असं माझं म्हणणं आहे. कितीही प्रगती केली तरी फार फार तर अनपेक्षित अडचणी कमी करता येतील. पण शेवटी अनप्रेडिक्टेबल योगायोगाने येऊ शकणारे अडथळे काही प्रमाणात शिल्लक राहणारच.

त्यामुळे सर्वकाही माझ्या हातात आहे असं नव्हे इतकाच मर्यादित अर्थ त्याचा घ्यावा असं वाटतं.

ऋषिकेश Tue, 09/12/2014 - 13:22

In reply to by गवि

प्रतिसाद सिंप्लीफाय करण्यासाठी मी वाक्याच्या परिघाबाहेर गेलो नाही. पण एकुणात मीही मथितार्थ लक्षात घेऊनच म्हणतोय.

कर्मण्यवाधिरस्ते वगैरे गोष्टी एक तत्त्व विषद करतात. त्याच्या मुळाशी "तुम्ही (माणसाने) कितीही कष्ट केलेत तरी एका मर्यादेपलिकडे तुमचे चालणार नाही" हे गृहितक आहे.

मनुष्याने ती मर्यादा कितीतरी विस्तारली आहे. कित्येक क्षेत्रांत हे विधान पुर्वी लागु असले तरी आता गैरलागू आहे. तेव्हा या तत्त्वाची व्याप्ती अधिकाधिक आकुंचन पावत आहे.

शेवटी अनप्रेडिक्टेबल योगायोगाने येऊ शकणारे अडथळे काही प्रमाणात शिल्लक राहणारच.

हे मान्य आहेच. शेवटी देव (किंवा या अशा गोष्टि, अज्ञान वगैरे) टेन्डस टु झीरो. ते पूर्ण शुन्य कधीच होऊ शकणार नाही.

पण प्रॅक्टिकली कित्येक बाबतीत ती अनिश्चितता, अज्ञान इतके नाममात्र आहे की समीकरण सोडवताना देव (किंवा अज्ञान, अनिश्चितता वगैरे) =शुन्य घेतले तरी पुरेसे ठरते व अशावेळी अमुक अशा परिस्थितीत अमुक हे कर्म केल्याने त्याचे अमुक असे फळ मिळेलच असे बर्‍यापैकी छातीठोकपणे सांगता येते - येऊ लागले आहे.

इतकेच सांगणे आहे.

गवि Tue, 09/12/2014 - 13:57

In reply to by ऋषिकेश

शेवटी देव (किंवा या अशा गोष्टि, अज्ञान वगैरे) टेन्डस टु झीरो

परफेक्ट... हेच वेगळ्या अँगलने म्हणत होतो.

पटले आहेच..

राही Tue, 09/12/2014 - 15:59

ह्या श्लोकाला असाच पण अधिक व्यापक असा अर्थही आहे. एक तर 'कर्म करणे हे इतकेच आमचे जूरिस्डिक्शन्,त्या पलीकडे आमचा अधिकार नाही', हा नेहमीचा अर्थ;
शिवाय,
कर्म हे जरी 'मी' करतो, किंवा 'अर्जुन' करतो, तेव्हा/तरी मी किंवा अर्जुन एकट्याने ते कर्म करीत नसतो. 'मी' हा समष्टीचा भाग आहे आणि 'मी' जेव्हा बल लावून (फोर्स) एखादे काम (वर्क) करत असतो त्याच वेळी तिथे समष्टीचे बलदेखील कार्यरत असते. हे म्हणजे केंद्रगामी आणि केंद्रोत्सारी प्रेरणा एकाच वेळी एकाच बिंदूवर कार्यरत असाव्यात तसे आहे. पदार्थाची गती ठरवणे हे या दोन बलांच्या खेचाखेचीवर अवलंबून असते.
अर्जुन युद्ध करीत असतो तेव्हा त्याच्यासाथीने त्याचा रथ असतो, सारथी असतो, घोडे असतात, मागे कुठेतरी रथाची देखभाल करणारा सुतार असतो, घोड्यांची निगराणी करणारा सईस असतो,आयुधे सुस्थितीत राखणारा लोहार आणि शिकलागार असतो. आजूबाजूला वावरणारे हत्ती, घोडे, रथी, पदाती असतात. या सर्वांचा ताळमेळ अर्जुनाच्या उद्दिष्टांशी जुळून आला तरच ते उद्दिष्ट साध्य होणार असते.
आजच्या काळाला साजेसे उदाहरण घेतले तर मी एका सकाळी मुंबईहून पुण्याला गाडीने साडेतीन तासांत पोचायचे ठरवले. मुंबईतले स्वच्छ हवामान, सकाळची गर्दी नसलेली वेळ निवडली. गाडीची देखभाल करून घेतली. पेट्रोल भरून घेतले आणि प्रयाण केले. चेंबूर नाक्यावर थोड्यावेळापूर्वीच एक अपघात झाला होता आणि वाहतूक अडकली होती. पुढे वाशीलाही टोलसाठी जरा जास्तच रांग होती. पुढे मात्र नवीन सुंदर रस्ता होता. गेलेला वेळ भरून काढण्यासाठी वेग वाढवला तर पुढे अचानक रस्ता ओला दिसला. कदाचित दव, कदाचित हिवाळी पावसाची भुरभूर. वेग कमी झाला. पनवेलजवळ वाहतूक अचानक वाढलेली दिसली. काही कारणाने जुन्या मुंबई-पुणे मार्गावरची वाहतूक एक्स्प्रेस-वेवर वळवली होती. पुढे फुड-मॉलवरही नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. वेळ गेला. लोणावळा सोडल्यावर जरा हायसे वाटले. पण हाय दैवा, चाकणफाटा एक्झिटवर कांदाशेतकर्‍यांचे रास्त भावासाठी रास्ता रोको चालू होते. शेवटी पोचायला साडेपाच तास लागले.
तर आपण सर्व हे समष्टीचा भाग असतो. आपले कर्म हे आपले एकट्याचे नसते. या सर्वांत ताळमेळ साधला गेला, एकतानता, हार्मनी साधली गेली तरच आपले काम आपण आखलेल्या तर्‍हेने तडीस जाणार असते. ही हार्मनी सामान्य जनांच्या बाबतीत सहसा साधली जात नाही कारण प्रत्येकाचे वेगवेगळे स्वारस्य, हितसंबंध हे सामान्य जन ओळखू शकत नाहीत. जो ह्या सर्वांशी तादात्म्य पावला, ज्याचे व्यवहार अविकारी, पारदर्शक झाले, ज्याची प्रज्ञा स्थिर झाली त्याच्या मार्गातले अडथळे कमी झाले असे खुशाल समजावे. म्हणजेच, दुसर्‍या अर्थाने ह्या सर्वांना (गृहीत) धरूनच जो आखणी करतो, अवास्तव अपेक्षा ठेवीत नाही, हितशत्रूंची संख्या नगण्य करतो, त्याच्या बाबतीत यशाची खात्री जास्त असते.

नितिन थत्ते Tue, 09/12/2014 - 16:37

साधा सरळ नागडा अर्थ.....

कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे = शेती करणे हा तुझा अधिकार आहे. तू शेती कर.
फळावर अधिकार नाही = शेतातले पीक खोत खेऊन जाणार आहे.
फळाच्या इच्छेने कर्म करू नकोस = पीक खोत नेणार आहे हे लक्षात ठेव (पीक तुला मिळावे अशी इच्छा धरू नको).
(पण) कर्म न करण्याकडे तुझा कल नको = तू शेतात राबतच रहा (नायतर खोताचं काय होईल?)

विवेक पटाईत Tue, 09/12/2014 - 19:56

सर्वांचे प्रतिसाद वाचले, राही ताई यांना श्लोकाचा अर्थ समजलेला आहे. सामान्यत: आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळतेच. पण आपल्या हातात नसलेल्या परिस्थिती मुळे कधी-कधी कर्माचे फळ मिळत नाही. अश्यावेळी माणसाने निराश होता कामा नये, आपले कर्म / प्रयत्न सोडले नाही पाहिजे.

अमोघ Tue, 09/12/2014 - 20:04

कर्मसिद्धांताच्या मुळाशी कर्माचे फळ मिळते'च' ही संकल्पना आहे. असे असताना ते कधी कधी मिळत नाही असे म्हणण्यात काय हशील? हा मूळ सिद्धांताला विरोधच नाही का?

अमोघ Tue, 09/12/2014 - 20:05

कर्मसिद्धांताच्या मुळाशी कर्माचे फळ मिळते'च' ही संकल्पना आहे. असे असताना ते कधी कधी मिळत नाही असे म्हणण्यात काय हशील? हा मूळ सिद्धांताला विरोधच नाही का?

राही Wed, 10/12/2014 - 13:06

In reply to by अमोघ

श्री पटाईत यांना बहुधा 'कधी कधी अपेक्षित फळ मिळत नाही' असे म्हणायचे असावे. त्यांनी मराठीत अभिव्यक्ती मोठ्या प्रयासाने संपादन (हासिल) केली आहे.
माझे मुद्दे हे माझेच मुद्दे असतात. त्यामुळे (समजा) ते इतर कुणाच्या विरोधी वगैरे असतील तर त्यात कमाल काय आहे?
ही चर्चा तर अगदीच छोटी आणि प्राथमिक पातळीवर आहे.
आपल्या धर्मात अनेक परस्परविरोधी मते अनेकवेळा अनेकांनी मांडली आहेत. आपल्या धर्मात मतमतांतराला आणि शब्दांचे वेगवेगळे अर्थ लावण्याला (इंटरप्रिटेशन्स) भरपूर वाव आहे. या वेगळ्या टीकांचा आदरही केला गेला आहे.

अमोघ Wed, 10/12/2014 - 13:51

In reply to by राही

तुमचे मुद्दे तुमचेच असतात ही आजच्या जमान्यात खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. एकाच गोष्टीबद्दल मते विरुद्ध वाटल्यामुळे माझ्यासारख्या अज्ञ माणसाला कमाल वाटली एवढंच. हिंदू धर्मग्रंथांबद्दल माझी माहिती फारच त्रोटक आण ऐकीव स्वरूपाची आहे. त्यामुळे खूपदा गोंधळ उडतो.
अवांतर: आपल्या धर्मात म्हणजे कोणत्या धर्मात?

अरविंद कोल्हटकर Wed, 10/12/2014 - 02:03

गीतेमधून वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळे अर्थ आपापल्या प्रवृत्तीनुसार लावून दाखविले आहेत. शंकराचार्य आपल्या प्रख्यात गीताभाष्यामध्ये गीतेचा अर्थ ज्ञानमार्गाने लावतात. आत्मा आणि ब्रह्म ह्यांमधील एकभाव म्हणजे ज्ञान. हे ज्ञान ज्याला मिळाले तो जन्ममरणाच्या फेर्‍यामधून सुटला आणि मोक्षास पावला. अशी मोक्षप्राप्ति हे प्रत्येकाचे अन्तिम ध्येय असले पाहिजे हा सोप्या भाषेत ज्ञानमार्ग. असे ज्ञान ज्याला झाले तो कर्मविपाकापासून सुटला.

पण असे ज्ञान ज्याला झालेले नाही त्याचे काय? तो कर्म करीत राहील आणि - वर अमोघ ह्यांनी सुचविल्याप्रमाणे - त्याचे फलहि ह्या किंवा पुढच्या जन्मात भोगत राहील. त्याची ह्या रहाटगाडग्यापासून सुटका कशी होईल?

ह्यावर शंकराचार्य गीताभाष्यामध्ये उत्तर सुचवितात. (हे उत्तर नीट समजण्यासाठी 'कर्मण्येवाधिकारस्ते...२.४७' ह्या श्लोकाबरोबरच त्याच्या मागचा 'यावानर्थ उदपाने...२.४६ आणि त्याच्या पुढचे 'योगस्थः कुरु कर्माणि...२.४८' आणि 'दूरेण ह्यवरं कर्म...२.४९' हेहि श्लोक वाचले पाहिजेत.) शंकराचार्यांच्या विवरणाप्रमाणे फलासक्ति धरून जर कर्म केले तर कर्मविपाकसिद्धान्ताप्रमाणे त्याचे फलहि ह्या जन्मी अथवा पुढच्या जन्मी भोगावे लागणार. हे जर नको असेल तर फलासक्ति न धरावी. अर्थात कर्मच केले नाही तर फलच नुरेल म्ह्णून कर्माचाच त्याग करावा काय? तर नाही, योगस्थः कुरु कर्माणि - योगस्थित राहून कर्म कर. योग म्हणजे काय? सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते, सिद्धि आणि असिद्धि, फलप्राप्ति आणि फल-अप्राप्ति ह्या दोहोंमध्ये समभाव म्हणजे योग.

कर्मच न करणे हे अयोग्य आणि अशक्यहि आहे. कसे ते अध्याय ३ मध्ये दाखविले आहे.

(शांकरभाष्य, अनेक टी़कांसहित, ज्यांना मुळामधून वाचायचे असेल त्यांनी ते येथे पहावे. शांकरभाष्याचे अल्लादि महादेव शास्त्री ह्यांनी १८९७ मध्ये केलेले इंग्रजी भाषान्तर archive.org येथे उपलब्ध आहे.)

mahindra Wed, 10/12/2014 - 17:27

॥३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.॥

नियत यावर बोला.

॥जर कर्माचे फळ मिळणार नसेल तर कर्म कशाला करायचे,॥

हा गोधळ मागचा. आधी, मी काय कर्म करावे हे मीच ठरवणार ना? कर्मच ठरवायचा अधिकार जर मला असेल, मग फळाची अपेक्षा सोडाच, फळसुद्धा धरण्याचा अधिकार मला येतो.

म्हणून वरचा सिद्धात नियतीवादी होतो. मग गीतेला हेही म्हणायला लागते की तुझी कर्मे जन्मजात आहेत.

त्याचे एक्सटेन्षन मग आपोआप वर्णवादाच्या पुरस्काराकडे जाते.

आजकाल लोक homo evolutus ची भाषा करतात. तेव्हा हा सिद्धात टाकाऊच नव्हे, हास्यास्पद ठरेल!

राही Wed, 10/12/2014 - 19:34

'कर्मफळाची आशा धरू नकोस' असे नव्हे. तर ते फळ काय मिळेल ते तू जाणू शकत नाहीस. कारण अपेक्षितच फळ मिळणे हे तुझ्या हातांत किंवा अधिकारात नाही. कर्म काय करायचे हे मी ठरवू शकतो किंवा ते मीच ठरवायचे. पण त्याचे परिणाम काय असतील ते ठरवणे किंबहुना तेच परिणाम असायला हवेत अशी मागणी अथवा अपेक्षा करणे हे योग्य नव्हे. कारण ते परिणाम घडणे हे पूर्णपणे माझ्या हातांत आहे असे नाही. परिणाम मी घडवू शकत नाही, परिणाम घडतो. हा दैववाद नाही. हे वास्तव आहे. 'कर्म करू नकोस' असे गीता कुठेही सांगत नाही. उलट अकर्मणि-काहीच कामात नाहीस असा तू राहू नकोस असेच म्हटले आहे. नियत म्हणजे नियमांनी बांधलेले. म्हणजे कर्म योग्य प्रयत्नांनिशी असावे. उगीच वेडेवाकडे, अफाट कर्म करू नये असा साधासोपा अर्थ. फळ तर मिळणारच. आणि ते मलाच मिळणार. आणि ते स्वीकारावेही लागणार.
इथे अधिकार म्हणजे हक्क नव्हे, तर अधिकार म्हणजे जूरिस्डिक्शन, मर्यादा. माझा अधिकार कुठवर चालतो? तर कर्म करण्यापर्यंत. पुढचे माझ्या हातात नाही.

mahindra Wed, 10/12/2014 - 21:59

In reply to by राही

राहीजी, मला वाटते की हा उपदेश फार गर्भित नाहीय. किंबहुना गीता ही थेट उपदेश करणारी आणि युद्धभूमीवर- देण्याइतपत क्वीक सल्ला देणारी आहे.
त्यातून तुम्ही इतके विचारसापेक्ष अर्थ जेव्हा काढता तेव्हा त्यालाच मर्यादा येतात. सरळ सरळ जो अर्थ प्रतीत होतो ते महत्त्वाचे आहे. "कर्मफळाची आशा धरू नकोस"
हे थेट भाषांतर आहे आणि त्यातून अत्यंत मूलगामी +टिव अर्थ काढणे मला वाटते गीतेला ओवर महत्ता देनारे आहे. जो प्रमुख धर्मग्रंथाच्या बाबत स्कॉलर मंडली करत असतात.
>>नियमांनी बांधलेले. म्हणजे कर्म योग्य प्रयत्नांनिशी असावे. उगीच वेडेवाकडे, अफाट कर्म करू नये असा साधासोपा अर्थ.
हा साधा सोपा अर्थ मला मूळ श्लोकातुन तर अजिबातच काढता येत नाही आहे..

राही Thu, 11/12/2014 - 00:16

In reply to by mahindra

'नियतं कुरु कर्म त्वम्' हे वाक्य 'कर्मण्येवाधिकारस्ते' या श्लोकाचा भाग नाही. पण गीतेत इतरत्र ते आहे. धागाकर्त्याने तसाच उल्लेख केला आहे. त्यामुळे आपण निर्देश केलेला 'साधा सोपा अर्थ' या मूळ श्लोकातून निघणे शक्यच नाही. आपल्या पहिल्या प्रतिसादाच्या पहिल्या ओळीत आपण 'नियत' शब्द जाड ठशात लिहून ठळक केला आहे. शिवाय 'नियत' यावर बोला असेही म्हटले आहे. म्हणून त्याविषयी लिहिले.
गीतेचा अर्थ मोठमोठ्या संतांनी, साहित्यिकांनी, योग्यांनी त्यांना जसा भावला तसा स्पष्ट केला आहे. गीतेचे ७०० श्लोक. पण स्पष्टीकरणासाठी ज्ञानेश्वरांनी त्यावर ९९९९ ओव्या लिहिल्या. गीतेच्या एकेका श्लोकात अर्थ ठासून भरला आहे. आपल्याला तो स्पष्ट करण्यासाठी अनेक शब्द खर्ची घालावे लागतात. गीतेची संस्कृत भाषा तशी सोपी आहे, पण त्यातले तत्त्वज्ञान फारसे सोपे नाही.
शेवटी, 'कर्मण्येवाधिकारस्ते' या श्लोकात आशा हा शब्द नाही. या श्लोकातल्या कुठल्याही शब्दाचा अर्थ 'आशा' असा होत नाही.
इत्यलम्.

वामा१००-वाचनमा… Thu, 11/12/2014 - 09:06

कशावरुन आपण सर्वजण घाण्याला जुंपलेले बैल नाही आहोत? कोणीतरी आपल्याला चालवतय अन आपण चाकोरीतून चालतोय....चालतोय....चालतोय .... काम करतोय!! मधेच चारा-पाणी मिळतं अन आपण आनंदी होतो अन दुप्पट जोमाने काम करु लागतो.

राही Thu, 11/12/2014 - 10:29

In reply to by वामा१००-वाचनमा…

बैल आणि माणूस यात एक मोठा फरक आहे. माणसापाशी विकसित बुद्धी आहे. प्रामुख्याने, ही बुद्धी सदैव धारदार आणि सतर्क कशी ठेवावी आणि त्याद्वारे योग्य कर्म कसे घडवावे याविषयीचेच विवेचन गीतेत आणि उपनिषदांत आणि एकूण तत्वज्ञानग्रंथांत आहे. प्रज्ञा स्थिर झाली तर षड्विकार निवर्ततात, नीरक्षीरविवेक येतो, सावधानता येते, आपल्या मर्यादांचे भान येते, आपण कोण आणि कसे आहोत ते आपल्यापुढे स्पष्ट होते. आपली आपल्याला ओळख पटते. सगळे भ्रम विरतात. केवळ आत्मभान उरते. समर्थांच्या 'पाहावे आपणांसी आपण' या वाक्याच्यामागे हा विचार आहे. यामुळे आपले वागणे आपोआपच 'नियत' होऊ लागते. यश-अपयश हा हेतू राहात नाही तर योग्य कर्म हाच हेतू उरतो. 'कारण-कार्य-परिणाम' या त्रिपुटीचा एक सुंदर मेळ साधला जातो. आयुष्य आनंदमय होते. कर्माची जबाबदारी माणसावर आहेच. कर्मापासून तो पळ काढू शकत नाही. गतानुगतिकाप्रमाणे घाणे ओढत राहाणे हे इतिकर्तव्य नसून योग, ज्ञान, भक्ती, कर्म, सांख्य इत्यादि मार्ग वापरून बुद्धी शुद्ध, लखलखीत करावी आणि अशी शुद्ध बुद्धी वापरून कर्म करावे हे आयुष्याचे प्रयोजन आहे; हीच शिकवण तत्त्वग्रंथांत आहे असे साररूपाने साधारणतः म्हणता येईल.

वामा१००-वाचनमा… Thu, 11/12/2014 - 10:30

In reply to by राही

:) आवडले.
माझा थोडा कल असा होता की - जसा बैल अन आपल्यात फरक आहे तसा आपण अन कोणा डिव्हाइन शक्तीत असेलच की.
जसा बैल घाणा ओढतो अन त्याच मार्गावरुन फिरत रहातो तसे आपण कदाचित जन्म-मृत्यु रुपी रहाट्गाडग्यात अडकलेलो असू.

राही Thu, 11/12/2014 - 10:59

In reply to by वामा१००-वाचनमा…

'डिवाइन' अशी कुठली वेगळी शक्ती नाही. आपण सर्व त्या शक्तीचा, प्रकृतीचा हिस्सा आहोत. या संपूर्ण सृष्टीत माणूसजातसुद्धा समाविष्ट आहे ना? आपण सर्व -जडचल,चराचर- मिळून हा सगळा पसारा चालवीत आहोत. तर आपल्यातल्या आणि इतर चराचरामधल्या त्या डिविनिटीला ओळखणे हेच ज्ञान आहे. 'तू माझा सांगाती' म्हणजे ती शक्ती आपल्याजवळ, आपल्याबरोबरच आहे, त्या शक्तीने आपला हात धरलाय, किंवा श्रेयस्कर म्हणजे आपण त्या शक्तीची साथ, हात धरलाय आणि त्या सर्वांबरोबर आपण एका लयीत चालतो आहोत. आपणही त्या शक्तीचा भाग आहोत, हे विश्व चालण्यात आपलाही सूक्ष्म सहभाग आहे. त्यामुळे ते योग्य रीतीने 'तैसेचि' कैसे राहावे, हे पाहाण्याची सूक्ष्म जबाबदारी आपलीसुद्धा आहे. तेव्हा चित्ती समाधान असो द्यावे, हे योग्य. ( व्यक्ती-समष्टी, आत्मा-परमात्मा या सर्वांचे अर्थ शेवटी इथे येऊन ठेपतात.)

नितिन थत्ते Thu, 11/12/2014 - 10:36

In reply to by राही

>>कर्माची जबाबदारी माणसावर आहेच. कर्मापासून तो पळ काढू शकत नाही.

कर्माची जबाबदारी बैलावर नसते का?

मनुष्य या जन्मात जे कर्म करतो त्यानुसार त्याला पुढचा जन्म मिळतो आणि त्या जन्मात केलेल्या कर्मानुसार त्यापुढचा जन्म मिळतो असे सांगतात ना? त्या अर्थी बैल जी कर्मे करतो त्याचे फळ म्हणून त्याला पुढील जन्म हत्तीचा किंवा झुरळाचा मिळणार ना?

ओव्हरऑल "काळा मठ्ठ बैल..." या सदस्याचे मत जाणून घ्यायला आवडेल.

सुनील Thu, 11/12/2014 - 09:10

कंपनीच्या वेळात, कंपनीची संसाधने वापरून मराठी आंजावर मनसोक्त उंडारण्याचे कर्म करीत रहावे ...

परंतु 'श्री'फळ मिळण्याची अपेक्षा मात्र धरू नये! ;)

आदूबाळ Thu, 11/12/2014 - 11:28

मला समजलं नाहीये.

... आपल्या कर्मावर प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसते.

हे जरी मान्य केलं तरी त्याने कर्म करतच रहावं हे कसं काय स्पष्ट होतं बुवा?

कर्म आणि इच्छित कर्मफळ यामधला कोरिलेशन कोइफिशियंट +१ असावाच असा आग्रह नाही. पण ० पेक्षा जास्त असावा ही अपेक्षा रास्त आहे. त्याच्या खाली गेला तर कर्म करत रहाणे ही रिसोर्सेसची नासाडी नाही का?

लॉरी टांगटूंगकर Thu, 11/12/2014 - 11:36

In reply to by आदूबाळ

कर्म असं निवडायचं की करतांना मजा आली पाहीजे. म्हणजे फळ मिळालच तर लै भारी. नाय मिळालं तर वैताग येणार नाही.

आदूबाळ Thu, 11/12/2014 - 11:39

In reply to by लॉरी टांगटूंगकर

नाय ना ... त्या केसमध्ये कर्मफळ हे कर्म करण्यात मिसळून गेलं. कर्म आणि कर्मफळ हे mutually exclusive आहेत असं गृहित धरायला पाहिजे.

वामा१००-वाचनमा… Thu, 11/12/2014 - 19:42

In reply to by लॉरी टांगटूंगकर

कर्म असं निवडायचं की करतांना मजा आली पाहीजे. म्हणजे फळ मिळालच तर लै भारी. नाय मिळालं तर वैताग येणार नाही.

हाहाहा. मस्त!!!

आडकित्ता Thu, 11/12/2014 - 21:59

गीतेमधे केलेल्या निष्फळ बडबडीपेक्षा नंतर दाखवलेल्या विश्वरूपदर्शनानेच अर्जुनाच्या डोक्यात उजेड पडला, हे त्यापाठीचे मुख्य कारण.

आपण म्हणता,

कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरी राजाला कळले, तर तो कुठल्या ही परिस्थितीत निराश होणार नाही. आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तैयारीला लागेल. विद्यार्थी ही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. हेच भगवंताना गीतेत सांगायचे असेल.

त्या भगवंतांच्या अपार कृपेनेच अखिल भारताचे कल्याण करण्यास्तव सत्तारूड झालेल्या (रूड. ढ नव्हे) भाजपा सरकारने, - चुकलो,- मोदी सरकारने, आत्महत्येचा प्रयत्न = गुन्हा नाही असे घोषित केले आहे.

तेव्हा, शेतकरी राजाने, वा नापास विद्यार्थ्याने न थकता, फळाची अपेक्षा न बाळगता, पुनःपुन्हा प्रयत्न करणे सुरू ठेवावे असे म्हणतो.

*

१ = इतके डीट्टेलवार शंकानिरसन करूनही अर्जुनाच्याने काही गांडीव उचलले गेले नाही. तेव्हा भगवंतांनी त्याला विश्वरूप दाखवले. त्यात अनेकानेक तेजस्वी सूर्य, ग्रहगोल, अन काय्काय दिसत होते. या घटनेचे आमचे पुरोगामी बुद्धीवादी इंटरप्रिटेशन म्हणजे, भगवंतांनी नाईलाजाने त्यांच्या शिष्याच्या एक मस्तपैकी श्रीमुखात भडकावली असणार. मग डोळ्यासमोर जे काय तारे चमकलेत सांगू मित्रा....

२ = प्रतिसाद न वाचता, नुसता लेखही अर्धवट वाचून लिहिलेला प्रतिसाद आहे ;) मुद्दा काय? तर श्रेणीची चिंता न करता प्रतिसाद टंकीत जावा..

आडकित्ता Thu, 11/12/2014 - 22:16

आतापर्यंतच्या मिनिटांत मला मिळालेल्या ३ विनोदी श्रेणींनंतर हेंच दिसतें, की भगवंतांनाही कर्मफल चुकले नाही बरें!
अहो, त्यांनी गीता सांगण्याचे कर्म केले. पण रिझल्ट पाहिजेत, तर नुसते निष्काम कर्म उपयोगी नव्हें. सकाम श्रीमुखात भडकावणे हाच उत्तम मार्ग. स्वतः भगवंतांनीही तोच आचरिला!

कडवा (अँटी-कर्मवि)पाकी आडकित्ता ;)

(हो. असे विचार मांडले की पाकिस्तानात जा, असे सांगण्याची सिस्टीम आहे सध्या भारतात. आय मीन हिंदूस्तानात.

वामा१००-वाचनमा… Wed, 17/12/2014 - 00:31

In reply to by आडकित्ता

प्रचंड हहपुवा करणारी ही "चालचलाऊ गीता" -

पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी
बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !
धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही
समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके
काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला
पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी
या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग
लेकांनो! होऊनिया रोग | मराना का!
लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी
कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'
कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा?
पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया
मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला!
मग आताच कोठे गेला | जोर तुझा मघाचा?
तू बेट्या! मूळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतो तुला;
परि आता तुझ्या बापाला | सोड्णार नाही बच्चमजी!
अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही;
बांगड्या भरा की रडूबाई | आणि बसा दळत!
कशास जमविले आपुले बाप? नसता बिचा-यांसी दिला ताप;
घरी डाराडूर झोप | घेत पडले असते!
नव्हते पाहिले मैदान | तोंवरी उगाच करी टुणटुण;
म्हणे यँव करीन त्यँव करीन | आताच जिरली कशाने?
अरे तू क्षत्रिय की धेड? आहे की विकली कुळाची चाड?
लेका भीक मागावयाचे वेड | टाळक्यात शिरले कोठुनी?'
अर्जुन म्हणे 'गा हरी! आता कटकट पुरे करी;
दहादा सांगितले तरी | हेका का तुझा असला?
आपण काही लढत नाही | पाप कोण शिरी घेई!
ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते.'
ऐसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनि धनुष्य-बाण,
खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला |
इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः |

अरविंद कोल्हटकर Wed, 17/12/2014 - 21:36

In reply to by वामा१००-वाचनमा…

ज.के.उपाध्ये नावाच्या विडंबन काव्ये लिहिणार्‍या कवींची ही कविता शाळेत असतांना मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये होती असे स्मरते.

हे नाव आठवणीमध्ये होते पण नाव गूगलमध्ये घालून शोध घेतल्यावर आणखीहि बरेच काही मिळाले. विशेष म्हणजे 'विसरशील खास मला, दृष्टीआड होता' हे भावगीत ह्यांचेचे आहे असे कळले.

त्यानंतर अधिक शोध घेता गं.दे.खानोलकरलिखित 'अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक - खंड १' येथे पृ. १०५-१०६ मध्ये ह्यांचयाबद्दल आणखी माहिती मिळाली. ह्यांचे आयुष्य १८८३-१९३७. जन्म नागपूरचा. दहाएक वर्षे संसार केला. तत्पूर्वी आणि नंतर विरक्त आणि भटके आयुष्य काढले. कविता लिहिल्या त्यांपैकी पुष्कळशा ढोंगीपणाचे विडंबन करणार्‍या होत्या. पोपटपंची नावाचा काव्यसंग्रह. टिळकभक्त असल्याने टिळकांचे ओवीबद्ध चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला पण तो अपूर्ण राहिला. उमरखय्यामच्या रुबायांचे भाषान्तर केले असे उल्लेख तेथे आहेत.

'विसरशील खास मला, दृष्टीआड होता' ह्या सुश्राव्य भावगीताचे ध्वनिमुद्रण केवळ अपघाताने कसे झाले ह्याचा किस्सा त्या गीताचे संगीतकार यशवंत देव ह्यांच्या शब्दांमध्ये येथे पहा.

वामा१००-वाचनमा… Wed, 17/12/2014 - 21:59

In reply to by अरविंद कोल्हटकर

'विसरशील खास मला, दृष्टीआड होता' ह्या सुश्राव्य भावगीताचे ध्वनिमुद्रण केवळ अपघाताने कसे झाले ह्याचा किस्सा त्या गीताचे संगीतकार यशवंत देव ह्यांच्या शब्दांमध्ये येथे पहा.

खूपच सुंदर लेख आहे. येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

मिसळपाव Wed, 17/12/2014 - 21:59

In reply to by अरविंद कोल्हटकर

विशेष म्हणजे 'विसरशील खास मला, दृष्टीआड होता' हे भावगीत ह्यांचेचे आहे असे कळले.

आणि तुमच्यामुळे आत्ता मला कळलं! बाय द वे, 'आठवणीतली गाणी' साईट तुम्हाला माहित नसायची शक्यता अगदी कमी आहे. पण जर नसली माहीती, तर त्या खजिन्याला जरूर भेट द्या.