Skip to main content

झुंज - अंधाराच्या राक्षसांशी

2 minutes

डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य दमलेला, ओजहीन दिसत होता. सूर्य अस्त होताच, थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय. हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य. काही दया-माया न बागळता हे राक्षस आपल्या शरीरातील सर्व उर्जा, तेज, शक्ती शोषून घेतात.

किती ही गरम कपडे घातले तरी ही बचाव होत नाही. रात्री बिछान्यावर पडल्यावर वाटू लागले शरीरातील जुन्या जखमा अंग वर काढू लागल्या आहे, नवीन जखमा ही भरभरून वाहू लागल्या आहे. असह्य वेदनांमुळे डोळा लागत नाही. हे अंधाराचे राक्षस व्याधीग्रस्त मानवांवर हिंस्त्र प्राण्याप्रमाणे तुटून पडतात. व्याधीग्रस्त माणसांना तडपवून मारण्यात राक्षसाना आसुरी आनंद मिळतो. किती ही डोक्यावर पांघरूण घेऊन त्यात दडले तरीही राक्षसांच्या भेसूर हास्य आणि डरकाळ्या सतत रात्रभर ऐकू येतात. बिछान्यावर कड बदलता -बदलता सारी रात्र निघून जाते. तेंव्हा कुठे जाऊन ब्राह्म मुहूर्तावर डोळा लागतो. सकाळी घड्याळाच्या गजरा बरोबर जाग येतेच (सवयच आहे ती). आधी शरीरला चिमटा घेऊन जिवंत असल्याची खात्री करतो, भिंतीवर लटकलेल्या घड्याळा कडे पाहतो, सकाळचे साडेपाच वाजलेले असतात. उठण्याची इच्छा नसते तरी ही देवाचे नाव घेऊन कसा-बसा उठतो. आता पुढचे दीड महिना तरी असेच हाल होणार. जनवरी महिन्यात संक्राती येईलच. सूर्याचे तेज पुन्हा वाढू लागेल. सूर्याच्या उर्जेने शरीरात नवचैतन्य येईल. तो पर्यंत तरी रोज जगण्यासाठी संघर्ष करावाच लागणार. ...शरीरात साठविलेल्या शक्तीने अंधाराच्या राक्षसांशी झुंज देत देत....आयुष्याची गाडी पुढे रेटावी लागणार.

Node read time
2 minutes

वामा१००-वाचनमा… Sat, 06/12/2014 - 19:31

प्रांजळ मनःकथन आवडले. ही बाजू कधी अनुभवली नव्हती. हिवाळा आवडतो अगदी बर्फासकट. उन्हाळ्यात फार मॅनिअ‍ॅक अन तारवटलेले अति उर्जेचा त्रास जाणवतो. हिवाळा अन पावसाळा हे आवडते ऋतु आहेत. विशेषतः ऑक्टोबर (दिवाळीचा) व डिसेंबर (ख्रिसमसचा) महीना.

वामा१००-वाचनमा… Wed, 17/12/2014 - 00:18

रात्री बिछान्यावर पडल्यावर वाटू लागले शरीरातील जुन्या जखमा अंग वर काढू लागल्या आहे, नवीन जखमा ही भरभरून वाहू लागल्या आहे. असह्य वेदनांमुळे डोळा लागत नाही. हे अंधाराचे राक्षस व्याधीग्रस्त मानवांवर हिंस्त्र प्राण्याप्रमाणे तुटून पडतात.

खलील जिब्रान याने रात्रीचे मोहवणारे दुसरेच रुप त्याच्या लिखाणातून मांडले आहे. मला ते रुप अधिक पटते, विशेषतः अधोरेखित केलेल्या ओळी -

खलील जिब्रान यांच्या "नाईट" या लेखातील एका उतार्‍याचे स्वैर रुपांतर -
जिने हाती भीतीरुपी तलवार धारण केलेली आहे, मस्तकी चंद्र ल्यालेला आहे आणि नीरव शांततेची वस्त्रे जिने परिधान केलेली आहेत अशी जीवनाच्या गूढर्भी लाखो नेत्रांनी पहाणारी रजनी, नि:शब्द मौनात हजारो कर्णांनी मृत्यूचे भयगीत ऐकते.हे रजनी समस्त कवी, प्रेमिक, गायकांचे विश्रामधाम अशी तू , तुझ्या गर्भात काळोख्या , गूढ सावल्या, आत्मे आणि चित्रविचित्र भासाभासांचा निवास आहे. लालगुलाबी, खुजे सायंकाळचे ढग आणि उषारुपी प्रसन्न वधू यांच्यामध्ये विस्तीर्ण पसरलेल्या हे काळोख्या रात्री तुझ्या श्वासामध्ये आम्हा चराचर जीवसृष्टीच्या स्मृती, आकांक्षा, इच्छा, कामना उमलून येतात.
हे मखमली निशे, तुझ्या अंधःकारामुळेच आम्हाला स्वर्गातील दिव्य प्रकाशाचे घडते. गर्वोन्नत प्रकाशमयरुपी दिवसाच्या तेजामुळे दीपून आंधळ्या झालेल्या मर्त्यसृष्टीतील आम्हा जीवसृष्टीला आपल्या अनंत, अगणित तारकदळांच्या भव्य मिरवणूकीच्या रुपाने अंतरात्म्यातील ज्योतीचे दर्शन तू घडवितेस. तुझ्या गर्भातील शांती अतिशय मनःशांतीदायक असून, तुझे मौन अनंताची गूढगुपीते खुली करण्याचे सामर्थ्य राखते. दिवसभराच्या वादळी महत्त्वाकांक्षा आणि सततच्या इच्छांच्या वेगवान , भरधाव टापांखाली चिरडल्या गेलेल्या मनावर मलमपट्टी करणारी तू, हे रजनी, अतिशय शांतीप्रदायक आहेस.
सर्व दीनदुबळ्या लोकांची दिवसभर उधळलेली स्वप्ने, आणि आकांक्षारुपी खिल्लारे गोळा करणारी जणू तू गोपस्त्रीच आहेस. तुझ्या जादूभर्‍या, कोमल अंगुलीस्पर्शाने , शीणलेल्या भागलेल्या लोकांचे नेत्र झाकून त्यांच्या हृदयाकाषात स्वप्नरुपी आनंदाचे नंदनवन फुलविणारी कल्पवृक्षच तू आहेस. तुझ्या काळ्या मखमली वस्त्रप्रावरणांच्या घडींत प्रेमिकांना मदनाचे धनुष्य सापडते तर दवबिंदूंनी चिंब झालेल्या तुझ्या पावलांपाशी कित्येक एकाकी हृदये मूकपणे अश्रू ढाळतात. अनंत प्रेमिकांच्या प्रेमाची साक्षी, एकाकी हृदयांची मैत्रिण तर बेघरांची आश्रयदाती तू आहेस.तुझ्या चंदण्या, मखमली अंधारामध्ये कवींच्या प्रतिभेस पूर येतो तर तत्त्ववेत्त्यांची हृदये उचंबळून येतात. तुझ्या गर्भातच अनेक कल्पनाविलास जन्मास येतात.

वामा१००-वाचनमा… Fri, 02/01/2015 - 20:55

In reply to by ॲमी

भारतात बॉडी-हगिंग थरमल्स मिळतात का गं? असतील तर त्यांचा छान उपयोग होतो. मस्त स्नग वाटतं. मला थर्मल्स फार आवडतात.

ॲमी Sun, 04/01/2015 - 06:33

In reply to by वामा१००-वाचनमा…

वर्तमानपत्रात झैराती पाहिल्या आहेत; मंजे मिळत असणार.
इकडे फार थंडी आहे आणि बोचरं वारं :-(. गेले दोन तीन दिवस पावसाळी वातावरण आहे.

ऋषिकेश Thu, 01/01/2015 - 15:12

मला हिवाळा खूप आवडतो. उन्हाळा सर्वात कमी.
बहुदा राक्षस गण असल्याने असावे काय? ;)

हिवाळ्यात योग्य ते व तितके कपडे घातले की थंडी वाजत नाही. उन्हाळ्यात सगळेच्या सगळे कपडे काढायचे जरी म्हटले तरी उकाडा नी लाही लाही पासून सुटका नाही :(

वामा१००-वाचनमा… Fri, 02/01/2015 - 21:10

In reply to by ऋषिकेश

उन्हाळ्यात सगळेच्या सगळे कपडे काढायचे जरी म्हटले तरी उकाडा नी लाही लाही पासून सुटका नाही Sad

खरय. फ्रिज-माठाचं थंड पाणी पिऊन काहीली कमी करत रहावं लागतं. पण वाळा-आंबे अन फॅन्/ए सी ची मजा उन्हाळ्यातच :)

बहुदा राक्षस गण असल्याने असावे काय? (डोळा मारत)

राक्षस गणाच्या लोकांना भुते दिसत नाही म्हणतात. माझ्या आईचा आहे. आम्ही क्वचित गंमत म्हणून प्लँचेट करायचो. तिच्या हाताने कधीच व्हायचे नाही.

लॉरी टांगटूंगकर Fri, 02/01/2015 - 21:58

In reply to by वामा१००-वाचनमा…

राक्षस गणाच्या लोकांना भुते दिसत नाही म्हणतात.
नाही नाही, त्यांना दिसतात पण त्रास देत नाहीत. अजय वगैरे देवगण लोकांना दिसत नाहीत आणि त्रास नाहीच, मनुष्यप्राण्यांना त्रास देतात म्हणे.

वामा१००-वाचनमा… Fri, 02/01/2015 - 22:00

In reply to by लॉरी टांगटूंगकर

हाहाहा ओह रिअली? देवगण वाल्याना दिसत नाहीत??? :)
बरय बुवा. सुटले!!!
मनुष्य गणाचे लोक गरीब स्वभावाचे असतात म्हणे.

नितिन थत्ते Sun, 04/01/2015 - 19:49

आमचा थंडीचा ठोकताळा म्हणजे दिवसाचे तापमान ३० च्या खाली गेले की फार थंडी. [त्यावेळी रात्रीचे तापमान १३-१४ हून कमी नसते].

उन्हाळ्याचा ठोकताळा म्हणजे रात्रीचे किमान तापमान २७ च्या वर राहिले की खूप उन्हाळा. [त्यावेळी बर्‍याचदा दिवसाचे तापनान ३४ हून जास्त नसते].