'देऊळ' चित्रपटाचं सामाजिक अंगानं केलेलं विश्लेषण (स्रोत: म.टा.)
आजच्या 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये 'देऊळ' या गाजलेल्या आणि पारितोषिकप्राप्त सिनेमाविषयी एक रोचक लेख आलेला आहे. टाटा समाजविज्ञान संस्था,मुंबई ('टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस') इथे काम करणाऱ्या माधुरी एम्. दीक्षित यांनी 'ऱ्हासाच्या चिंतेचं देऊळ' या लेखात 'देऊळ'मध्ये त्यांना जाणवलेल्या छुप्या जातीयतेविषयी काही चिकित्सा केली आहे. 'ऐसी अक्षरे'करांचा या चिकित्सेविषयीचा अभिप्राय जाणून घ्यायला आवडेल.
लेखाचा दुवा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12482985.cms
प्रतिक्रिया
सुमार
अतिशय सुमार लेख आहे. फुकाचा वाद उकरून काढला आहे. निगेटीव्ह पब्लिसिटी दुसरं काय. लेखाचं स्वरूप सामाजिक विषयांचा कळवळा असं आहे. पण लेखिकेला त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही हे दिसून येतं. हल्ली स्वतःला हुषार समजणा-यांनी ( इतराना मूर्ख समजणा-यांनी हा शब्दप्रयोग अचूक आहे ) कणव घेत खोलून मारायची स्टाईल सुरू केलेली आहे. अनिल अवचटांचा एक लेख युनिक फीच्रर्स वर उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांवर लेख आहे. त्यात महाराजांना त्यांनी एकेरी आक मारून मी कसा भक्त आहे हे दाखवले आहे. लेखाचा उद्देश महाराजांच्या वाढत्या लोकप्रियतेने पोटदुखी आणि त्यातून उद्भवलेली मळमळ बाहेर काढणे हा आहे. पण ती काढताना वाचकांना समजली आही ही त्यातली हुषारी. माझा गणेश असं म्हणून गणेशोत्सवाबद्दल तांनी लेख लिहून दाखवावा. वाट्टेल ते हारीन.
या अवचटाने ग्रेस गेल तेव्हां वाट्टेल ते तारे तोडले. आव पुन्हा जवळच्या मित्राचा. एक मोठा कवी नुकताच गेलाय त्याच दिवशी हा माणूस सांगतो कि ग्रेस आधी लिहीत मग अर्थ लावत बसत. याला कधी साहीत्य कळले नाही. या अवचटाच्या दाखल्याने ग्रेस यांच्याबद्दलची पोटदुखी अनेक ठिकाणी व्यक्त झाली. गंमत म्हणजे टीवीवर अनेकांनी ग्रेस यांच्या कवितांचा अर्थ उलगडून सांगितला. त्यांचे सर्वात चांगले मित्र पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी अतिशय सुंदर विश्लेषण केले. पण म्हणतात ना, द्वेष माणसाला आंधळे बनवतो. हा द्वेष अनेक ठिकाणी पहायला मिळाला. गूगल मधे ग्रेस सर्च दिला कि हे द्वेषपूर्ण लिखाणही पहायला मिळाले. उद्या जर अवचट प्रवृत्तींना सचिन वर लेख लिहायला दिला तर माझा सचिन मैदानावर उतरला कि माझा ऊर भरून येतो अशी सुरूवात करतील आणि मग पण तो स्वतःसाठी खेळला हे सत्य आहे असं म्हणतील. त्याने शतक केलेल्या सामन्यात भारत हरला ही वस्तुस्थिती आहे असं म्हणतील. पुलं वर लेख लिहायला सांगितला तर पुलं म्हणजे माझे दुसरे पिता अशी सुरूवात करतील. पण आंग्ल लेखक....... यांची शैली पुलंनी जशीच्या तशी उचलली हे खरं आहे. पुलंचा विनोद हा मूळचा इंग्लीश विनोद असून त्याचे श्रेय ब्रिटीश साहीत्यिकांना दिलं पाहीजे असंही म्हणतील..
देऊळचं परीक्षण याच कॅटेगरीतलं आहे. या लोकांना उद्योग नाही असं दिसतं.
....
मलाही उगाच उकरून काढल्यासारखेच वाटले
आणि अवचटांचे माहीत नाही पण सचिन ने १०० वे शतक मारले तेव्हा आलेल्या अग्रलेखांत लोकसत्तेतील अग्रलेख अगदी याच प्रकारचा होता. वरकरणी स्तुती पण मधेच हळूच "सचिनने आपली 'बिचारा' ही इमेज कायम टिकवून ठेवली (लोकांचा सपोर्ट मिळावा म्हणून)", किंवा "आपले यश लोकांना आपले यश वाटेल असे त्याने वातावरण त्याने बरोबर निर्माण केले" अशा अर्थाची अत्यंत खडूस व अनुदार वाक्ये त्यात आहेत. जणू काही १७ व्या वर्षी मॅकडरमॉट, इम्रान, अक्रम, अब्दुल कादिर, मार्शल वगैरेंना कसे खेळायचे याचा विचार करायचा सोडून सचिन टीव्ही सिरीयलमधल्या एखाद्या खाष्ट स्त्रीप्रमाणे देशात आपले चाहते कसे निर्माण करून २२ वर्षे त्यांना कसे झुलवत ठेवायचे वगैरे विचार करत बसला होता! आणि १९८९ मधे अब्दुल कादिरची, १९९८ मधे वॉर्नची, २००३ मधे अक्रम/शोएब्ची, व २०१० मधे स्टेन्/मोर्केल्ची यथेच्छ धुलाई करणारा सचिन लोकसत्ताकारांना कोणत्या कोनातून 'बिचारा' दिसत होता त्यांचे त्यांनाच माहीत
बाहेरून स्तुती व आतून टीका या बाबतीत तो लोकसत्तेतील अग्रलेख म्हणजे "येरकुंडवारांचा सत्कार म्हणजे साक्षात विद्वत्तेचा सत्कार" ला उत्तर होता
+१
+१ करताना १००% पाठिंबा...
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
लेख
लिखाणातील दृष्टीकोन रोचक आहे. काही सुचले ते मुद्दे मांडतो.
लेखात आलेला प्रमुख आक्षेप असा : गावात घडत असलेल्या घटनांबद्दल निरीक्षण करणारा आवाज ब्राह्मणी असल्याचं दाखवलेलं आहे. निव्वळ हाच एक विवेकवादी विचार करणारा घटक आहे आणि त्याची निर्भर आनंद घेण्याची वृत्ती आहे असं दाखवलेलं आहे. बाकी कुणी ब्राह्मणेतर व्यक्ती असा विवेकी दृष्टीकोन दाखवू शकत नाही - किंवा दाखवताना दिसत नाही -हा प्रमुख मुद्दा.
१. समजा, दिलीप प्रभावळकरांच्या व्यक्तिरेखेचं आडनाव बदलून "कुलकर्णी" ऐवजी खेडकर/साळुंखे/ढसाळ/नरके/कवाडे इत्यादिंपैकी काही केलं तर लेखिकेचा मूळ आक्षेप निघून जाईल का? मुद्दा र्हस्वदृष्टीतून केलेल्या बदलांचा, अशा र्ह्स्वदृष्टीतून केलेल्या तथाकथित विकासाच्या मॉडेल मधे असलेले विविधस्वरूपी धोके यांचा आहे, की असे धोके दाखवून देणार्या दृष्टीकोनाला चितारणार्या व्यक्तिरेखेच्या जातीचा आहे ? घटकाभर असं धरलं की प्रभावळकरांच्या व्यक्तिरेखेचं आडनाव उपरोल्लेखित यादीतील आडनावांपैकी एक आहे, तर लेखातला मुद्दा संपेल काय ?
२. लेखिका म्हणते : "हिंदू देवाची संकल्पना ज्यांना मान्य नाही, देवळाचा बाजार होणं पसंत नाही किंवा देवळापासून आथिर्क लाभ ज्यांना संभवत नाही अथवा अगदी कमी लाभ मिळाल्यामुळं ज्यांच्या पोटात दुखलं आहे, अशा अण्णांसारखं सांस्कृतिक भांडवल नसलेल्या लोकांचा विरोधी स्वर चित्रपटात कुठं आहे?"
इथे मी सहमती दर्शवतो. हा मुद्दा ग्राह्य मानायला हरकत नाही. कदाचित असं म्हणता येईल की गावाचं चित्रण करताना ते पुरेसं व्यामिश्र करता आलेलं नाही. अधिक दृष्टीकोन, अधिक वैविध्य आणता आले असते. मात्र इथे कदाचित कादंबरी आणि चित्रपट या कलाप्रकारातला फरक परिणामस्वरूपी दिसायला लागू शकतो. "वॉर अँड पीस" सारख्या कादंबरीमधे त्या त्या काळातील वेगवेगळ्या स्तरातील व्यक्ती/व्यक्तीसमूहांचं प्रदीर्घ, संगतवार चित्रण दिसतं तसं कुठल्या एकाच एका चित्रपटात कधी दिसलं आहे काय ? उपरोल्लेखित मुद्द्यामधे लेखिका चित्रपट या कलाप्रकाराच्या कक्षेबाहेर असलेल्या गोष्टींची मागणी तर करत नाही ना ?
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
हा सिनेमा
हा सिनेमा पाहिला तेंव्हा या अंगाचा विचार आमच्या मनाला सुद्धा शिवला नाही. सिनेमा फार काही ग्रेट आहे असे नाही. पण नसते वाद निर्माण करुन ते लोकांच्या मनांत भरवायचे असले शिक्षण या सोशल सायन्स संस्थेत कधीपासून मिळायला लागले ?
गांवात एखादे रुग्णालय असावे, अशी त्या सुधारक माणसाची रास्त अपेक्षा असते आणि ती खरी तर सरपंचाला देखील मान्य असते. पण झुंडशाहीपुढे त्याचे चालत नाही व खुर्ची टिकवण्यासाठी तो इतरांशी तडजोड करतो. यांत अमुकच जात चांगला विचार करु शकते असे कुठे दिसते ? देवाच्या नांवावर धंदा करणे हा तर आपल्या देशातला राजमान्य व्यवसाय आहे, त्यावर टीका केली तर ती योग्यच म्हणायला पाहिजे.
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ठोकळेबाजपणा आणि लोकप्रियता
'फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगर होतं. नगरात एक गरीब ब्राह्मण राहत असे. एके दिवशी...' अशी सुरुवात असलेल्या अनेक कथा वर्षानुवर्षं सांगितल्या गेल्या आहेत. अशा कथांत नक्की काय होतं? माझ्या मते वापरून वापरून अशा गोष्टींचा एक सर्वपरिचित फॉर्म्युला होतो. तो इतका परिचित होतो की मग त्याविषयी प्रश्न उकरण्याचं कुणाच्या मनातच येत नाही. इथे तसंच काहीसं झालेलं असावं. म्हणजे काय? पुष्कळशा गोष्टींमध्ये गावातले ब्राह्मण गरीब दाखवले जाण्याची पद्धत असेल तर 'त्या काळी सर्वसाधारणतः ब्राह्मण गरीब असावेत बहुधा' असं म्हणता येईल का? अर्थात हे सार्वत्रिक विधान नाही, पण त्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय अशा गोष्टींचे फॉर्म्युले सहसा होत नाहीत हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
तसाच विचार देऊळबाबत करून पाहिला तर काय आढळेल?
- ब्राह्मणांना शिक्षणाचा हक्क नेहमीच होता. त्यामुळे गावातला वयोवृद्ध शिक्षक ब्राह्मण असणं यात काहीच नवल नाही.
- त्याच परंपरेमुळे शिक्षणाचं महत्त्व जाणून आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्यावर ब्राह्मणांचा भर राहणार हेही साहजिक म्हणता येईल.
- गावातल्या मर्यादित संधी पाहता मग असा उच्चशिक्षित मुलगा पोटापाण्यासाठी शहराकडे जाणार हेही साहजिक म्हणता येईल.
- तरीही शहरात न जाता गावात मागे राहणारा असा शिक्षक आपल्या आदर्शवादामुळे किंवा गावाविषयीच्या स्मरणरंजक ओढीनं किंवा कळकळीनं तिथे राहील. ती ज्या कारणापायी आहे ते कारण हळूहळू नष्ट झालं तर त्याला गाव सोडावंसं वाटेल. नैतिक भूमिका म्हणून गाव सोडायला तो स्वतंत्र आहे कारण त्याच्यापाशी तो पर्याय आहे. गावातल्या इतरांना तो पर्याय असेलच असं नाही. त्यामुळे आहे त्या ठिकाणी तडजोडी करत टिकून राहणं त्यांना भाग आहे, किंवा त्याहून वेगळा निर्णय घेणं त्यांना अधिक महागात पडू शकतं.
- शिक्षणाच्या परंपरेमुळे विज्ञानवादी किंवा विवेकवादी भूमिका ब्राह्मण मास्तरानं घेणंदेखील साहजिक आहे. ज्यांचे हितसंबंध लोकांच्या देवावरच्या श्रद्धेशी जोडलेले आहेत अशा लोकांना तशी भूमिका घेण्याचं स्वातंत्र्य नसतं हेही साहजिक नव्हे का? देवळातला पुरोहितदेखील ब्राह्मण असेल, पण त्याला अशी भूमिका घेता येईल का?
पुष्कळदा असं दिसतं की एखादा सिनेमा लोकप्रिय होतो तेव्हा त्यामागे ठोकळेबाज व्यक्तिरेखांद्वारे सांगितलेली सहज पचण्याजोगी गोष्ट असते; म्हणजे 'आटपाट नगर होतं...' सारखाच कोणतातरी एक फॉर्म्युला असतो. नीट पाहता 'देऊळ'मध्येही हेच दिसेल. त्यात ब्राह्मणच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या लोकांचं चित्रण हे ठोकळेबाज आहे. म्हणजे राजकारणी ठोकळेबाज राजकारण्यांसारखे वागतात; टपोरी पोरं ठोकळेबाज टपोरी वागतात, वगैरे. अशा ठोकळेबाज व्यक्तिरेखा घेऊन निव्वळ 'अंनिस'वाल्यांना नाही, तर अगदी सश्रद्ध माणसांनासुद्धा भावेल अशी भ्रष्ट देवस्थानाची गोष्ट 'देऊळ'मध्ये सांगितलेली आहे. म्हणून ती लोकप्रिय होऊ शकते. असाच प्रकार उदाहरणार्थ 'स्वदेश'सारख्या सिनेमातही दिसतो. तिथे अखेर आदर्शवादाचा विजय होतो म्हणून ते अधिक भाबडं म्हणता येईल फारतर. इथल्या प्रतिसादकांना लेखिकेच्या विश्लेषणाचा इतका त्रास का झाला ते कळत नाही.
कदाचित हो, पण जोवर गोष्टीतला ठोकळेबाजपणा कमी होणार नाही तोवर अशा गोष्टीनं दिग्दर्शकाला किंवा प्रेक्षकाला फारसा फरक पडू नये. त्या ठोकळेबाजपणाचा कुठेतरी सिनेमा लोकप्रिय होण्याशी संबंध आहे असं वाटतं. म्हणजे कुणाला मास्तरांची भूमिका पटून सिनेमा आवडेल, तर कुणाला केशाची भावनाप्रधान भूमिका भावेल. दरवेळी ते जातिनिहाय असेलच असं नाही, पण अधिकाधिक प्रेक्षक खूष होण्यासाठी दोघांचीही गरज आहे.
माध्यमाविषयी सरसकटीकरण करणारा मुद्दा पटला नाही. असे चित्रपट पुष्कळ आहेत. उदाहरणार्थ, 'अपू ट्रिलॉजी'मधले गावकरी आणि बनारस/कलकत्तावासी आठवून पाहा. (बदलत्या भारतातला र्हास आणि केंद्रस्थानी संवेदनशील नायक त्यातही दिसेल म्हणून ते उदाहरण पटकन आठवलं.) किंवा 'त्रिकाल' (श्याम बेनेगल), साहिब, बीबी और गुलाम (गुरुदत्त) वगैरे उदाहरणंसुद्धा लक्षात घेता येतील.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
व्यवस्थापक
व्यवस्थापकांना जाहिर विनंती:- धागे वाचनखूण मह्णून साठवता येतात, त्यासारखेच प्रतिसादही वाखू म्हणून ठेवत यायला हवेत.
सदर प्रतिसादही संयत, संतुलित व टिपून ठेवण्यासारखा वाटला. इतर धाग्यांवरही कित्येकदा धागे फारसे उच्च वाटले नाहित, तरी काही प्रतिसाद खरोखर साठवून ठेवावेसे वाटतात. त्यामुळे आख्खा धागा साठवला आणि अशा धाग्यांची संख्या वाढली की कुठल्या प्रतिसादासाठी सामान्य दर्जाचा धागा साठवलाय हे लिखाणाच्या त्या भाउगर्दित कळेनासे होते.
तस्मात, प्रतिसादासही like करण्याची सुविधा हवी.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
एक उपाय.
या करता एक ढोबळ उपाय सुचवतो. सदस्याच्या खात्यात जाऊन मिळालेल्या श्रेण्या पहायच्या आणि भरपूर श्रेण्यामिळालेले प्रतिसाद उघडायचे. हां आता ह्या चिंतातूरांसारखे प्रत्येक प्रतिसादागणिक पाच-पाच सहा-सहा श्रेण्या ओढणार्यांच्या (सालं यांच्यामुळे अॅव्हरेज उगाच वर जातं, नाही तर आम्ही पण अधून मधून तीन चार श्रेण्या कमावतो हो पण त्याला कोणी विचारेल तर ना!) खात्यात जाऊन फारसा फायदा होणार नाही म्हणा.
-Nile
बाजारात उपलब्ध नसणार्या
बाजारात उपलब्ध नसणार्या गोष्टी पैसे असले तरी आणता येत नाहीत. सूचना आवडली तरीही प्रतिसादांच्या वाचनखुणा साठवण्यात सध्या हीच अडचण आहे. धाग्यांचे तारांकन करताना प्रतिसादांचाही त्यात विचार करता येईल.
मटातला लेख आणि जंतूंचा प्रतिसाद आवडले.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी चित्रपट पाहिलेला नाही. पण
मी चित्रपट पाहिलेला नाही. पण एक जाणवतं की टीका करण्याचा जसा एक साचा बनून गेला आहे; तसाच टीकेचा समाचार घेण्याचाही. समोरच्याने कसा विचार करावा हे आपल्या हातात अनेकदा नसतं; पण आपली विचार करायची पद्धत थोडी बदलून पाहिली तर गोष्टी वेगळ्या दिसतातही काही वेळा.
चिंतातूर जंतू यांचा प्रतिसाद या दृष्टिकोनातून खूप आवडला.
***
अब्द शब्द
+१
सहमत आहे. गुर्जींचा प्रतिसाद आवडला. लेख वाचल्यावर असाच विचार मनात आला होता. मला असं वाटतं की चित्रपट माध्यमांत अशा प्रचलित प्रतिमांचा उपयोग करणं फायद्याचंही ठरत असावं, कारण तिथे प्रतिमा उभं करायला फारसा वेळ(वाव) नसतो. कांदबंर्यांमध्ये अशा व्यक्तिचित्रणाला भरपुर वाव असतो.
-Nile