Skip to main content

“कुणीच नाही.”

2 minutes

त्याच्या कुशीत तिने डोकं ठेवलं . मान तिरपी करून विचारलं, “कोण आहोत आपण एकमेकांचे”? तो म्हणाला, “कुणीच नाही.” ती हसली. डोळे मिटले आणि झोपेच्या आधीन झाली. त्याच्या डोळ्यांसमोर गेल्या अनेक वर्षांचा पट तरळला.

आपलं एकमेकांशी नातं काय हे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी अनेकदा केलेला. पण त्यात त्यांना कधी फारसं यश आलं नाही. त्याला नेहमी असं वाटायचं की नात्यांना नावं देऊन आपण व्यक्तींना एखाद्या बंधनात अडकवतो. आयुष्यात येणारे लोक फक्त आपली सोबत करतात आपण त्या सोबतीला नात्यांचं लेबल लावतो आणि मग हळूहळू सगळं complicate होऊन बसतं.

सोबती वरून आठवलं, दोघानाही एकमेकांची सोबत आवडायची. पण या सोबतीला काही नाव द्यावं असं त्यांना कधी वाटलं नाही. आपल्याकडे नावं देण्याच्या आणि नावं ठेवण्याच्या बाबतीत आजूबाजूचे लोकच माहीर असतात. काही म्हणले, मित्र आहेत एकमेकांचे. काही म्हणाले, अफ़ेअर वाले आहेत. काही म्हणाले, थातुरमातुर आहेत हो. अर्थातच ह्यांनी लोकांना फारसं मनावर घेतलं नाही. त्यांना एकमेकांची सोबत जास्त महत्वाची वाटत होती, त्या सोबतीला कुठलंही नाव देण्यापेक्षा.

एक दिवस हाच प्रश्न त्यालाही पडला. नात्यांची एक एक नावं घेऊन त्याने तो सोडवायचा प्रयत्न केला. छान पटतं एकमेकांशी, चर्चा, वादविवाद होतात, भावनांचं शेअरिंग होतं. म्हणजे मैत्री असावी. पण मग शारीरिक आकर्षण, ते सुद्धा आहेच. म्हणजे मग मैत्रीच्या पुढचं काहीतरी असावं. पण ‘commitment’ नाहीये. म्हणजे फक्त ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ झालं. पण मग सोबतीत जर दुरावा आला तरी मनाची इतकी घालमेल का होते. म्हणजे नुसतं शरीरच नाही तर कुठेतरी मनही ‘involve’ आहे. त्याला वाटलं मनही involve आहे तर झटकन लग्न करून मोकळं व्हावं की पण मग जाणवलं, खरंच आपण नवरा आणि बायको या नात्याला न्याय देऊ शकू का ? आता तो पुरता blank झाला. वर्षानुवर्षांच्या त्यांच्या सोबतीला त्याला एखाद्या नात्याचं लेबलच सुचेना. मग त्याने ठरवलं आपण सोबत रहायचं, नात्याशिवाय. आज त्यांच्या सोबतीला बारा वर्षं झालीत.

त्यांच्या या मुक्तछंदी जगण्याला कुठलंही नाव नाही. नावासोबत येणाऱ्या आशा-अपेक्षा नाहीत. नात्यांची बंधनं नाहीत आणि उपकारांची ओझी नाहीत. कदाचित, कुठलंही नाव नाही म्हणून त्यांचं असणं अधिक सहज सोप्पं झालंय. लोकांना उत्तर देण्याच्या फंदात ते पडत नाहीत. त्यांच्यापुरता उत्तर त्यांना सापडलंय, “आम्ही एकमेकांचे कुणीच नाही. ”

– अभिषेक राऊत

Node read time
2 minutes

रेड बुल Sat, 18/04/2015 - 15:55

अंगावर कपडे नसताना अम्हीही हा प्रश्न हमखास विचारायचो... कोण आहोत आपण एकमेकांचे. एकत्र नांदायचे नाही हे आधीच ठरले असल्याने ते नातं पास... मग हेच उत्तर सापडायचे हे नातं म्हणजे सख्य.. म्हणजे सखा/सखी चे नाते आहे. हे करताना मी तिला युंगधर मधील रेफरन्स द्यायचो, खरं तर इरेलेवंट होता पण मला काँटेक्स्ट जुळवणे जमुन जायचे :)

नगरीनिरंजन Sat, 18/04/2015 - 16:45

रोचक आहे आणि वाचायला चांगलं वाटलं.

("आणि तो स्वप्नातून जागा झाला" असं वाक्य दिसतंय का ते शोधलं पण दिसलं नाही. इमोशनल पॉर्न आहे का हे?)

तिरशिंगराव Sat, 18/04/2015 - 17:49

पण ते जरी म्हणाले की,
प्यार को प्यारही रहने दो, कोई नाम न दो,
तरी ज्या समाजात ते रहातात ते ह्याला 'लिव इन' म्हणणारच. किंबहुना, उद्या काही कारणाने कोर्टात जावे लागले तर कोर्टही त्याला 'लिव इन' म्हणणार. 'ब्लू लगून' सारखं एका निर्मनुष्य बेटावर राहिले तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे.

शुचि. Mon, 20/04/2015 - 23:30

मला तर कधी कधी प्रश्न पडतो, "आत्ता आपण एकमेकांचे कोण आहोत" पेक्षा पूर्वजन्मी आपण एकमेकांचे कोण लागत होतो की तुझी इतकी ओढ वाटते, तुझ्याविषयी "ममत्व अन प्रेम" वाटते. तेव्हा काय dynamics होतं आपल्यात?
आजचे प्रियकर-प्रेयसी हे पूर्वजन्मीचे एकमेकांवर अतिशय प्रेम करणारे, आई-मूलही असू शकतातच की. अन ती छटा सबकॉन्शस पातळीवर जाणवते का?
आई-मूल नात्यातील जिव्हाळा उपभोगला, आता मित्र किंवा प्रियकर-प्रेयसी नात्याचे प्रेम अनुभवण्याकरता कित्येकजण परत जन्म घेतही असतील की.
___
हे विचीत्र विचार फारसे कोणाला सांगत नाही मी. :)