Skip to main content

पानिपतमागची लढाई

(आजच्या महाराष्ट्र टाइम्समद्धे प्रसिद्ध झालेली ही बातमी. मुळ लिंकः http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13121480.cms

संदीप शिंदे , ठाणे
ज्या लढाईत महाराष्ट्रातील घरटी एक बांगडी फुटली किंवा मराठी साम्राज्याचा कणा ज्या लढाईने मोडला अशा पानिपतच्या लढाईचा तर्कसंगत धांडोळा घेणारा आणि इतिहासाचे नवे अन्वयार्थ मांडणारा ग्रंथ ठाण्यातील संजय क्षीरसागर या तरुण इतिहास संशोधकाने लिहिला आहे . एट्रोपी या अत्यंत दुर्धर आजाराने पछाडले असताना अभ्यासाची आणि इतिहासाचा नव्याने शोध घेण्याची त्याची जिद्द कौतुकास्पद आहे .
महाराष्ट्राच्या इतिहासात पानिपतच्या रणसंग्रामाला अनन्यसाधारण महत्व असले तरी त्र्यं . शं . शेजवलकर यांचा संशोधनात्मक ग्रंथ , ना . वि . बापटांची ' पानिपतची मोहीम ', भारताचार्य चिं . वि . वैद्य यांची ' दुर्दैवी रंगू ' आणि रियासतकार गो . स . सरदेसाई , वि . गो . दिघे , रा . वा नाडकर्णी या लेखकांचे मोजके लेखन वगळता या संग्रामाचे सखोल विवेचन मराठीत कुठेही नाही . विश्वास पाटलांची ' पानिपत ' ही कादंबरी तुफान लोकप्रिय ठरली . मात्र , ती शेजवलकरांच्याच मांडणीचा कादंबरीमय विस्तार म्हणण्याजोगी आहे . भावनिक मुद्दे आणि जातीय संदर्भात गुरफटल्या लेखनामुळे पानिपतची कारणमीमांसा तटस्थपणे अभावानेच झालेली दिसते .
त्यामुळेच या रणसंग्रामाचे वास्तव धुंडाळताना संजयने ब्लॉगवर लेखन सुरू केले . त्याला अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्यानंतर हे लेखन ग्रंथरुपाने वाचकांसमोर येत असल्याचे संजय सांगतो . या ग्रंथात शेकडो संदर्भ देत पानिपत युद्धापर्यंतचा आणि नंतरचा प्रवास अत्यंत तटस्थपणेे नोंदवला आहे . पानिपतच्या पराजयाची नेमकी कारणं काय , सोबत नेलेल्या बुणगे आणि यात्रेकरूंमुळे मराठ्यांना पराभवाचा पत्करावा लागला का , या पराजयामुळे मराठ्यांचा उत्तरेतील प्रभाव खरोखरच कमी झाला का ... अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे ऐतिहासिक उपलब्ध साधनांच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न या ग्रंथातून केल्याचे संजय सांगतो . ' तत्कालीन सर्व पत्रे , बखरी , मराठी ते फारसी साधनांचा अभ्यास करून तर्कबुद्धीने आपले निष्कर्ष वाचकांसमोर ठेवले आहेत . माझे निष्कर्ष पटले नाहीत तर ग्रंथात ठिकठिकाणी दिलेल्या ऐतिहासिक साधनांमधील उद्धृतांच्या मदतीने वाचक आपले निष्कर्षही काढू शकतात ' असे संजयचे म्हणणे आहे .
इतिहास हा भावनिक नव्हे ; तर प्रसंगी क्रूर , काटेरी आणि घटनांचे व त्यामागील कारण परंपरेचे यथार्थ दर्शन घडवणारा असायला हवा . कुणाच्या रुष्टतेची किंवा मर्जीची पर्वा इतिहासकाराने करू नये अशी अपेक्षा असते . त्या कसोटीवर हा ग्रंथ पुरेपूर उतरल्याचे मत पुष्प प्रकाशनाचे प्रकाशक संजय सोनावनी यांनी ' मटा ' शी बोलताना नोंदवले आहे . येत्या १७ मे रोजी सायंकाळी ५ . ३० वाजता ठाणे पोलिस लाइन येथील सिद्धी हॉलमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन ' नवशक्ती ' चे संपादक सचिन परब यांच्या हस्ते होत असल्याचेही त्यांनी सांगितले .
ठाण्याच्या लुईसवाडी भागात राहणाऱ्या अवघ्या २९ वर्षीय संजयने इतिहास या विषयात ग्रॅज्युएशन केले असून , त्याचा अभ्यास दांडगा आहे . काही वर्षांपूर्वी एट्रोपी या दुर्धर आजाराने संजयला गाठले . शरीरातील एकापाठोपाठ एक अवयव निकामी करणाऱ्या या दुर्मिळ आजारावर रामबाण औषध जगभरात कुठेही नाही . अॅलोपॅथीत उपचार नसले तरी होमिओपॅथीची मात्रा काही प्रमाणात लागू पडत आहे . ' हळूहळू शारीरिक मर्यादा येत असल्या तरी , संजयचा मेंदू तल्लख आहे . ज्या जिद्दीने त्याने हे पुस्तक साकारले त्या जिद्दीला माझा सलाम ,' अशा शब्दांत संजयवर उपचार करणारे प्रख्यात डॉक्टर अनिल हब्बू यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली .

अरविंद कोल्हटकर Mon, 14/05/2012 - 19:49

संजय क्षीरसागरला आमच्या सदिच्छा कळवाव्यात.

माझ्या एका भाचीला हाच विकार १५ वर्षांपासून असून ती आता जवळजवळ १०० टक्के परावलंबी होत असल्याचे मी पाहात आहे आणि त्यामुळे संजयबद्दलहि सहानुभूति वाटते. तरीहि असे अभासपूर्ण पुस्तक लिहून तो आपली स्मृति कायम टिकेल असे काहीतरी करीत आहे ह्याचेहि कौतुक वाटते.

'मरावे परी कीर्तिरूपे उरावे' - रामदासस्वामी.

पूर्ण विजार Fri, 18/05/2012 - 07:32

सलाम !!

पानिपताचा वेगळा विचार करणारे हे पुस्तक वाचायला हवे. कदाचित त्यावर बंदीही येईल. मध्यंतरी १८५७ चा जिहाद या पुस्तकाच्या लेखकाबद्दल नेटवरची शाब्दीक हिंसा वाचनात आली होती. शिव्याशाप आणि गलिच्छ भाषेने या लेखकाचा उद्धार झाला होता. असे होऊ नये असं वाटतं. किमान या प्रकारांची तयारी ठेवावी. याच प्रवृत्ती इतरांच्या निंदानालस्तीचे समर्थन साळसूदपणे करताना दिसतात. अशा प्रकारचे वातावरण असतानाही सत्यशोधनाचे कार्य चालू ठेवणा-या सोनवणी सर आणि संजय क्षीरसागर यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम !

अशोक पाटील Fri, 18/05/2012 - 14:13

काल निश्चितच चांगल्या आणि आपुलकीच्या वातावरणात पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला असणार. तिथे या निमित्ताने झालेल्या अनुषंगिक चर्चेविषयी श्री.संजय सोनवणी यांच्याकडून वृत्तांत [इथेच] वाचायला आवडेल. वास्तविक कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे आवश्यक वाटत होते, पण कोल्हापूर ते ठाणे व परत असा एकटयाने प्रवास करणे शक्य नसल्याने [सागरचा होकार येईल असे वाटत होते, पण बंगलोर शेड्युलमुळे त्यालाही इच्छा असूनही येणे शक्य झाले नाही] मग ते राहिलेच.

तरीही श्री.संजय क्षीरसागर यांचे आत्ताचे वय लक्षात घेता इथून पुढील काळात त्याना साहित्यक्षेत्रातील नवनवीन क्षितिजे धुंडाळण्यास नक्कीच संधी उपलब्ध असल्याने पुढील अशाच एखाद्या स्नेहसोहळ्यास हजर राहीन, इतके तरी किमान म्हणू शकतो मी. [या साठी आवश्यक ती शारीरिक क्षमता आणि उत्साह श्री.क्षीरसागर याना लाभो हीच प्रार्थना.]

अशोक पाटील

सागर Fri, 18/05/2012 - 19:44

In reply to by अशोक पाटील

अशोक काका,

[सागरचा होकार येईल असे वाटत होते, पण बंगलोर शेड्युलमुळे त्यालाही इच्छा असूनही येणे शक्य झाले नाही] मग ते राहिलेच.

याबद्दल मलाही खरेच वाईट वाटते आहे. पण काही वैयक्तीक अडचणी होत्या ज्यामुळे इच्छा असूनही मला येणे शक्य झाले नाही.

फोनवर काल लेखक संजय क्षीरसागर व श्री.संजय सोनवणी दोघांशी रात्री १२च्या आसपास चर्चा झाली.

कार्यक्रम सोहळा उत्तम झाला. सर्वच वक्त्यांनी देखील प्रभावीपणे विचार मांडले. कामाचा दिवस असूनही व कार्यक्रम स्थळ आडबाजूला असूनही गर्दी खूप चांगली झाली होती.

पुण्यातही एका चर्चासत्राचे आयोजन करायचा विचार श्री. सोनवणी करत आहेत. (हे जमले तर त्यावेळी अशोक काका तुम्ही नक्की या )

बाकी लेखक व श्री. सोनवणी जसा वेळ मिळेल तसा या कार्यक्रमाचा वृत्तांत देतीलच.
या पुस्तकाचे लेखक संजय क्षीरसागर यांचा स्टार माझा या वाहिनीवर इंटरव्ह्यू देखील दाखवून झाला आहे.

अशोक पाटील Fri, 18/05/2012 - 21:35

In reply to by सागर

"पुण्यातही एका चर्चासत्राचे आयोजन करायचा विचार श्री. सोनवणी करत आहेत."

~ नक्कीच, मलाही सभागृहातील एक प्रेक्षक या नात्याने त्या चर्चासत्राला हजर राहणे आवडेलच, शिवाय श्री.संजय क्षीरसागर यानाही प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकताही आहेच.
फक्त २ आणि १४ जून या दोन तारखांना मी अनुक्रमे हुबळी आणि इचलकरंजी इथे लग्नानिमित्त जाणार असल्याने या दोन तारखा नसल्या म्हणजे मिळविली.

अशोक पाटील

सागर Sat, 19/05/2012 - 19:09

In reply to by अशोक पाटील

अशोक काका,

या दोन तारखांना नसेन हा कार्यक्रम.
अजून कार्यक्रमाचे नक्की नाहिये. झालाच तर बहुतेक जूनच्या शेवटाला किंवा जुलै मधे होईन.
नक्की झाल्यावर तुम्हाला अवश्य कळवेन.