मराठी साप्ताहिके आणि पाक्षिकांची सद्यस्थिती - राम जगताप
राम जगताप यांनी आपल्या ब्लॉगवर नुकत्याच प्रकाशित केलेल्या दोन लेखांत मराठी नियतकालिकांचा लेखाजोखा घेतला आहे. मराठी नियतकालिकांची सध्याची स्थिती ही सामाजिक-राजकीय विषयांवरच्या गंभीर विश्लेषणाला किंवा टीकाटिप्पणीला अनुकूल नाही असं ते म्हणतात. निव्वळ एकांगी आणि नकारात्मक लेखांपेक्षा वेगवेगळ्या विचारसरणींच्या मतांना जागा देणं आणि एक संतुलित, गंभीर, नि:पक्षपाती आणि उदारमतवादी अवकाश निर्माण करणं यात मराठी नियतकालिकं कमी पडताहेत असं ते म्हणतात. सखोल विश्लेषण करणं, गंभीर चर्चा घडवून आणणं यातही ती आपली कर्तव्यं निभावत नाहीत असं त्यांना वाटतं. या विवेचनासाठी त्यांनी 'चित्रलेखा', 'लोकप्रभा', 'साप्ताहिक सकाळ', 'साधना' आणि 'परिवर्तनाचा वाटसरू' यांसारख्या वेगवेगळ्या जातकुळीच्या नियतकालिकांकडे दृष्टिक्षेप टाकला आहे. अरुणा शानभाग (इच्छामरण), बिनायक सेन (नक्षलवाद) किंवा विकीलीक्स यासारख्या घटनांचं आणि त्यांमागच्या व्यापक मुद्द्यांचं वार्तांकन आणि विश्लेषण कसं झालं आणि कसं व्हायला पाहिजे होतं हे सांगत त्यांनी आपले मुद्दे मांडले आहेत. लेखाच्या दुसर्या भागात त्यांनी इंग्रजीत प्रकाशित होणारी 'फ्रंटलाईन', 'आऊटलूक' आणि 'इंडिया टुडे' ही नियतकालिकं तुलनेसाठी संदर्भ म्हणून घेतली आहेत. 'माणूस' हे एकेकाळचं प्रतिष्ठित नियतकालिक आणि त्याचे संपादक श्री. ग. माजगावकर यांच्याकडून आजच्या नियतकालिकांना काय शिकण्यासारखं आहे हेदेखील जगताप सांगतात.
लेखांचे दुवे :
भाग १ : http://ramjagtap.blogspot.in/2012/06/blog-post_5105.html
भाग २ : http://ramjagtap.blogspot.in/2012/06/blog-post_7959.html
(या पार्श्वभूमीवर मराठी संवादस्थळांवरच्या वाचक-लेखकांनी आणि चालक-संपादकांनी 'आपण इथे काय करतो' याकडेही थोडं अंतर्मुख होऊन पाहावं.)
+१
=)) =))
हेच सांगायला आलो होतो.
कसे काय तुम्हाला सापडतात हो असले वांझोटे दुवे ?
(या पार्श्वभूमीवर मराठी संवादस्थळांवरच्या वाचक-लेखकांनी आणि चालक-संपादकांनी 'आपण इथे काय करतो' याकडेही थोडं अंतर्मुख होऊन पाहावं.)
हे तर कहर आहे !
=)) =))
माझ्या डोळ्यासमोर एकदम काही संपादक आणि चालक गूगलवरती जाऊन 'अंतर्मुख'चा अर्थ शोधत आहेत, असे दृश्य आले.
प्रतिक्रिया
लेख आजच सकाळी वाचला होता. माहितगाराने इथे आवर्जून उल्लेख केला याबद्दल आनंद वाटतो.
जगताप टोकाची मते व्यक्त करतात आणि काही महिन्यांपूर्वी लिहिलेल्या एका लेखात त्यांनी साहित्यिकांना डझनांच्याच नव्हे तर जवळजवळ शेकड्याच्या भावाने रिटायर केलेले होते - नावे घेऊन. हे करायला धैर्य लागते मात्र या धैर्याची जातकुळी सम्यक् म्हणता येणार नाही. प्रस्तुत लेखाबद्दलही साधारण तसे झालेले आहे.
मात्र, मला स्वतःला जगतापांचे अशा स्वरूपाचे टोकाचे मतप्रदर्शन आवडते हे मान्य करतो. जगतापांनी महत्त्वाच्या मानल्या जाणार्या जवळजवळ सर्व प्रकाशनांना विचारात घेतलेले आहे. नुसत्या लोकप्रियच नाही तर विशिष्ट हेतूने, विशिष्ट वाचकवर्गाकरता चाललेल्या कामाचा आढावा ते घेतात. र्हस्वदृष्टीचा किंवा एकंदर आलोक ध्यानात न घेण्याचा दोष त्यांना देता येणार नाही.
लोकप्रभा, चित्रलेखा यांसारख्या प्रकाशनांच्या बाबत त्यांच्याशी असहमत होता येणे कठीण आहे. या दोन्ही प्रकाशनांनी क्रमाक्रमाने वाईट काम केले आहे असंच मला वाटतं आणि जगतापांची मीमांसा यथायोग्य आहे. काही इतर मुद्दे जगतापांनी विचारात घेतले असते तर आवडलं असतं.
१. "प्रहार" हे नारायण राणे यांच्या मालकीचं (किंवा त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या मालकीचं) मुखपत्र आहे हे आपण जाणतोच. इतकं ढळढळीतपणे हे खरं असेल तर संपादकीय कामात आणि वार्तांकनामधे राजकीय हस्तक्षेप होतो का ? असल्यास हा समतोल कसा साधला जातो? "प्रहार"ची रविवारची सांस्कृतिक पुरवणी - जी राम जगताप यांच्या अखत्यारीत येते - ती दर्जेदार मानली जाते. परंतु याचा अर्थ "सांस्कृतिक पुरवणीबद्दल बोला. बाकी मेन वृत्तपत्राबद्दल बोलायचं काम नाही" असं तर जगतापांना म्हणायचं नाही ना ? कारण तसं म्हणणं त्यांच्या एकंदर सर्वांगीण दृष्टीकोनाच्या पोझ् शी सुसंगत नाही.
२. मी केवळ राम जगतापांना अडचणीत टाकायला "प्रहार" चं उदाहरण घेत नाही. "सकाळ" "मार्मिक" या अन्य प्रकाशनांच्या बाबत हा मुद्दा लागू आहेच. जगतापांना एकंदर या मुद्द्याबद्दल काय म्हणायचं आहे ?
अगदी मुसु
अगदी मुसुस्टाईल प्रतिक्रिया आहे ही.
बासुंदी आहे. थोडी पातळ आहे. मलई जमण्याइतपत आटली असती तर बरं. किंचित फिकी असल्याने चव उत्तम. वेलदोडा थोडा अधिक हवा होता. चारोळ्या खूपच झाल्या आहेत. अर्थात, अशी बासुंदी मला आवडते. दूध कसं लिटर घेतलं हे पाहिलं पाहिजे. शिवाय, ते डेअरीचं आहे की रतिबाचं हेही पहावं म्हणतो.
:-)
उत्तर
तुम्हाला जगतापांचं लिखाण विनोदी वाटलं इतकीच टिप्पणी तुम्ही करता. तुम्हाला "यात नक्की काय विनोद आहे" असं कुणीतरी विचारतं त्याला उत्तर देणं टाळता. नंतर माझ्या शैलीबद्दल काही प्रच्छन्न मतप्रदर्शन करता. माझ्या प्रतिक्रियेबद्दल संभाव्य मतभिन्नता आहे (जी प्रच्छन्न टीकेमधे अभिप्रेत असते) ती नेमकी काय आहे ते सांगणं टाळता.
अधिक काय लिहिणें :)
अच्छा
अच्छा. :-)
तुम्हाला जगतापांचं लिखाण विनोदी वाटलं इतकीच टिप्पणी तुम्ही करता.
कारण त्यापलीकडे काही लिहिण्याजोगं नाही, हेच मला सूचित करायचं होतं. पण, ज्याअर्थी तुमच्याही ते लक्षात आलं नाही, त्याअर्थी ते असफल झालं. असो.
तुम्हाला "यात नक्की काय विनोद आहे" असं कुणीतरी विचारतं त्याला उत्तर देणं टाळता.
वर दिलेलं कारण लागू आहे. ते समग्र लेखनच विनोदी आहे. हे सापेक्ष आहे. जे मला विनोदी वाटतं ते तुम्हाला (किंवा इतर कोणाला) वाटलंच पाहिजे, असं नाही.
नंतर माझ्या शैलीबद्दल काही प्रच्छन्न मतप्रदर्शन करता. माझ्या प्रतिक्रियेबद्दल संभाव्य मतभिन्नता आहे (जी प्रच्छन्न टीकेमधे अभिप्रेत असते) ती नेमकी काय आहे ते सांगणं टाळता.
मतभिन्नता? तुमच्या समग्र प्रतिक्रियेचं (माझ्या मते) स्वरूपच मी एका दाखल्यातून व्यक्त केलं. तशी प्रतिक्रिया तुमच्याकडून अपेक्षीत नव्हती. माझी अपेक्षा चुकीची आहे, असं दिसतं. तसं असेल तर माझे प्रच्छन्न मतप्रदर्शन निरर्थक किंवा 'कै च्या कै' ठरतेच.
असो. :-)
जगताप यांनी उल्लेख केलेल्या
जगताप यांनी उल्लेख केलेल्या नियतकालिकांपैकी बरीचशी मी वाचत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल माझं काही मत नाही. पण लेखकाने दिलेली माहिती मान्य केल्यास तपशीलाचे मुद्दे मान्य आहेत. त्याहीपेक्षा या दोन लेखांमधून मला काय घ्यावसं वाटलं तर, काय वाचावं यापेक्षा कसं वाचावं याबद्दल असणारी त्यांची टिप्पणी. त्यामुळेच माहितगार यांच्या अंतर्मुख होण्यासंबंधीच्या टिप्पणीशीही (खेदाने का होईना) सहमत आहे.
जगताप यांच्या लिखाणात टोकाचं का होईना, पण प्रामाणिक मतप्रदर्शन असतं म्हणून ते मला आवडतं; अगदी विचार पटले नाहीत तरीही. टीका करताना ती बिनबुडाची वाटणार नाही याची काळजी जगताप घेतात. बेशिस्त लिखाण वाचताना येणारा कंटाळा जगताप यांच्या ब्लॉगवर येत नाही. त्याशिवाय ब्लॉगवरचं लेखन आणि छापील माध्यमातलं लेखन यांच्यात असणारा फरकही ब्लॉगवर 'दिसतो'.
दैनिकं आणि नियतकालिकं, हस्तक्षेप वगैरे
>>"सांस्कृतिक पुरवणीबद्दल बोला. बाकी मेन वृत्तपत्राबद्दल बोलायचं काम नाही" असं तर जगतापांना म्हणायचं नाही ना ?
ब्लॉग वाचून मला असं वाटलं की ते दैनिकांना या विश्लेषणात गणत नाही आहेत. त्यामागची कारणं ब्लॉगमध्ये आहेत :
मी स्वत: एका दैनिकात काम करत असलो तरी दैनिकांबद्दल मी बोलणार नाही, तसं आयोजकांना अपेक्षित नाही. ते मलाही गैरसोयीचं आहे. शिवाय निशिकांत भालेराव त्याविषयी बोलतील, ते जास्त उचितही आहे.
ही त्यांची त्याविषयीची स्पष्ट कबुली आहे आणि -
हल्ली वर्तमानपत्रांमध्ये 800 ते 1000 शब्दांपेक्षा जास्त मोठे लेख सहसा येत नाहीत. त्यामुळे चिकित्सक-विश्लेषणात्मक आणि सम्यक दृष्टीकोन देणारे लेखन वर्तमानपत्रांमधून येत नाही. या कारणांमुळे बरेचसे अभ्यासक हल्ली वर्तमानपत्रांमध्ये लिहायला नाखूश असतात. साप्ताहिकं-पाक्षिकांना वर्तमानपत्रांची ही मर्यादा आपलं बलस्थान करता येण्यासारखं आहे. कारण त्यांच्याकडून चिकित्सक-विश्लेषणात्मक आणि सम्यक दृष्टीकोन देणाऱया लेखनाचीच अपेक्षा आहे.
वृत्तपत्रांहून वेगळं स्थान नियतकालिकांना आपल्यासाठी निर्माण करता येईल असं यामधून ते म्हणत आहेत असं वाटलं.
>>मी केवळ राम जगतापांना अडचणीत टाकायला "प्रहार" चं उदाहरण घेत नाही. "सकाळ" "मार्मिक" या अन्य प्रकाशनांच्या बाबत हा मुद्दा लागू आहेच. जगतापांना एकंदर या मुद्द्याबद्दल काय म्हणायचं आहे ?
एखाद्या संघटनेचं मुखपत्र असणारी नियतकालिकं कशी त्यामुळे मर्यादित होतात, आणि चांगली नियतकालिकं कशी सर्व प्रकारच्या विचारांच्या लेखांना स्थान देतात, 'भलेही मग ते संपादकीय धोरणाच्या विरोधात असेल तरीही' वगैरे मुद्द्यांकडे पाहता असं वाटलं की जगताप आपल्या स्थानावर राहून राजकीय/संपादकीय हस्तक्षेपाविषयी जमेल तितकी(च, पण) टीका करताहेत.
जाताजाता : जगताप जिथे आहेत तिथला राजकीय हस्तक्षेप वगैरे लक्षात घेऊनच मोडकांना ते लिखाण विनोदी वाटलं असावं असा माझा अंदाज आहे. :-)
नाही
प्रतिसाद संपादित करून आता पूर्ण दिला आहे.
जाताजाता : जगताप जिथे आहेत तिथला राजकीय हस्तक्षेप वगैरे लक्षात घेऊनच मोडकांना ते लिखाण विनोदी वाटलं असावं असा माझा अंदाज आहे.
नाही. तिथं राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कसे याची मला माहिती नाही. असला तरी तो जगतापांचा दोष नाही. त्या राजकीय हस्तक्षेपाशी एक अरुंद चौकट म्हणून त्याच्या आत ते निश्चितपणे झगडत असणार याची मला त्यांच्या एकूण लेखनावरून खात्री वाटते. सांप्रत असं एक वृत्त-प्रकाशन मला दाखवावं कोणीही की जे राजकीयदृष्ट्या तटस्थ मालकाचे आणि म्हणूनच संपादकीय धोरणांतही तटस्थ आहे.
जगतापांचे ते लेखन विनोदी आहे, कारण त्यात हूं म्हणून पवित्रे घेतलेले आहेत. ते पवित्रे टिकणारे नाहीत.
न्यूजमॅगझीन म्हणून 'लोकप्रभा', 'चित्रलेखा', 'साप्ताहिक सकाळ', 'परिवर्तनाचा वाटसरू', 'साधना' वगैरेचा विचार करणं हेच मुळी हास्यास्पद आहे. ही प्रकाशने म्हणजे न्यूजमॅगझीन? मला माझीच न्यूजमॅगझीनची कल्पना तपासावी लागेल.
वर 'फ्रंटलाईन' आणि 'लोकप्रभा' ही तुलना खटकल्याचा एक प्रतिसाद आहे. त्यावर अदितीने "एकाच मापात तोलताना 'लोकप्रभा'ला जगतापांनी फार हलकं ठरवलं आहे" असं म्हणत त्या तुलनेचं समर्थन केलं आहे. हे तर आणखीनच उच्च आहे. गल्लीतल्या खेळाडूची प्रथम श्रेणीतल्या खेळाडूशी तुलना करायची आणि त्या तुलनेत गल्लीतल्याला हलकं ठरवलं आहे, असं म्हणणंच आहे ते. तरी बरं, 'फ्रंटलाईन'चे अगदी अलीकडेपर्यंतचे संपादक हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्डहोल्डर होते हा मुद्दा जगतापांनी चर्चेला घेतला नाही. तो घेऊन त्यात होणारे वृत्तांकन कसे वगैरेचे विश्लेषणही करता आलेच असते.
"सामान्य माणसांना स्वत:ची स्वतंत्र मतं नसतात, तसा त्यांचा अभ्यास नसतो. त्यांची मतं बनवण्याचं आणि भूमिका घडवण्याचं काम पत्रकारांचं आणि संपादकांचंच असतं" यासंदर्भात 'इंडिया टुडे' लोकानुनय करते याचा काय अर्थ असतो? 'परिवर्तनाचा वाटसरू' वगैरेचा "सामान्य माणसांना स्वत:ची स्वतंत्र मतं नसतात, तसा त्यांचा अभ्यास नसतो. त्यांची मतं बनवण्याचं आणि भूमिका घडवण्याचं काम पत्रकारांचं आणि संपादकांचंच असतं" यासंदर्भात कसा विचार करायचा, हा प्रश्न शिल्लक आहेच (कदाचित, या सगळ्याचा संबंध त्या नियतकालिकांच्या खपाच्या आकड्याशी जोडता यावा). तिथं विनायक सेन प्रकरणातील त्या नियतकालिकांची भूमिका प्रश्नचिन्हांकित करायची, असे जगताप करतात. म्हणजे, जगतापांना अभिप्रेत भूमिका या नियतकालिकांनी घेतलेली नाही, हे त्यांचे छुपे गाऱ्हाणे आहे का? असण्यास हरकत नाही. पण उघडपणे मांडावे. त्यासाठी मग त्या प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल (याविषयी पुढे लिहितोय).
अरूणा शानभाग आणि विनायक सेन यांच्यासंदर्भातील निकालांविषयी जगतापांच्या संपादकांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत असं दिसतं. पण त्या अपेक्षा काय आहेत? न्यायालयाच्या निकालांकडं कसं पहावं हे संपादकांनी सांगणं अपेक्षीत आहे, असे जगताप म्हणतात. यातील 'कसं' म्हणजे काय? त्याचा काही स्पष्ट खुलासा लेखनात कुठंही होत नाही. इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालय 'नाही' असं म्हणाले तेव्हा त्याला विरोध झाला. जगतापांना त्याचे समर्थन अपेक्षीत होते का या नितलकालिकांकडून? तसे त्यांनी स्पष्ट लिहिले पाहिजे. समर्थन का करायचे हेही सांगितले पाहिजे. उगाच उठून, संपादकांकडून अपेक्षा वगैरे लखु रिसबुडी लिहायला काय लागतं?
हे लेखन लखु रिसबुडी आहे, कारण विनायक सेन यांच्यासंदर्भात ते एक प्रश्न विचारतात. "विनायक सेन प्रकरणात एक प्रश्न माध्यमांनी स्वत:ला विचारला नाही की, भारतभरातून आणि जगभरातून एवढा दबाव येऊनही सरकार आपल्या निर्णयावर ठाम का आहे?" प्रश्नाचा सूर असा आहे की त्याचे उत्तर, सरकार योग्य करते आहे, असे येईल. मराठीतल्या नियतकालिकांवर टीकेची झोड उठवताना दूरवरून त्यांची तुलना ज्यांच्याशी केली जाते त्या 'फ्रंटलाईन', 'आऊटलुक' आणि 'इंडिया टुडे'ने त्यावेळी याविषयी काय भूमिका घेतली होती? हा प्रश्न म्हणजे जगतापांच्या मुद्याचा प्रतिवाद नाही. त्या तुलनेचा दाखला दिला तो फक्त जगतापांच्या लेखनाचा रिसबुडी अवतार स्पष्ट करण्यासाठी. जगतापांच्या मुद्याचा सर्वश्रृत अनेकांगी, सारा आलोक सामावून घेणारा प्रतिवाद त्याचवेळी झालेला आहे. आणि नुसताच नाही, तर ज्या न्यायव्यवस्थेला जगताप महत्त्व देतात त्यातील सर्वोच्च न्यायालयाकडूनही.
कळसाचा विनोद म्हणजे छत्तीसगड न्यायालयाचा 'तब्बल' ९० पानी निकाल हा त्यांच्यालेखी मूलगामी महत्त्वाचा दिसतो. त्यातील ९० साक्षीदारांपैकी ८० कोण आणि १० कोण हे ते लिहितात. त्यावरची त्यांची टिप्पणी हास्यास्पद आहे. ते दहा पत्रकार विनायक सेन यांच्या बाजूने साक्ष देतात म्हणजे ते नक्षलवाद्यांचे समर्थक असा निकाल देऊन जगताप मोकळे. ते ८० जण कोण आहेत? त्यांच्या साक्षी उचलून धरायच्या त्या कोणत्या आधारावर? त्या निकालातील भगदाडांचं काय करायचं? यावर ते काहीही बोलत नाहीत. आणि त्यासंदर्भात त्या नियतकालिकांनी केलेल्या विश्लेषणाला जगतापांनी फाट्यावर मारणं याला धैर्य मानून त्या नियतकालिकांची मोजमापे ठरवायची?
एरवी या नियतकालिकांचा बाजार कोणीही उठवावा. माझी ना नाही. पण रामशास्त्र्याचा आव आणत लेखन करत असू तर न्याय वाजवी रीतीने केला पाहिजे. अन्यथा तो विनोद असतो आणि तसले विनोद येथे आणून अंतर्मुखतेचा पवित्रा घेणे हा कहर असतो इतकेच. :-) या नियतकालिकांचा जीव किती? त्यात त्यांना काय-काय शक्य आहे, वगैरे बाबी मी इथं विचारात घेतच नाही. पण थोडा सेन्स ऑफ प्रपोर्शन असावा अशी अपेक्षा गैर ठरू नये.
एकूण, जगतापांचं गेल्या वर्षीचं भाषण आत्ता ब्लॉगवर येतं आणि ते इथं अंतर्मुख होण्याचा संदेश देत अवतरतं हा यातला आणखी एक विनोद. ढोल वाजवायला हरकत नाही, पण आवाज ढोलाचा यावा; टिमकीचा नको.
एक झाले, जगतापांच्या ब्लॉगचे शीर्षक एवढ्या चर्चेत सार्थ ठरले आहे. :-)
यापेक्षा अधिक माहितीपूर्ण
यापेक्षा अधिक माहितीपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा होती. विशेषतः इथल्या वाचकाचा छापील माध्यमांशी संबंध मुख्यत्त्वे ग्राहक म्हणूनच येतो त्यामुळे! जगताप यांच्या लेखनात काय त्रुटी आहेत त्यापेक्षा, या विषयासंदर्भात माझी मतं अशी आहेत, अशा प्रकारचे प्रतिसाद आवडले असते.
न्यूजमॅगझिनची व्याख्या:
डिक्शनरी.कॉम - a periodical specializing in reports and commentaries on current events, usually issued weekly.
मेरियम वेबस्टर - a usually weekly magazine devoted chiefly to summarizing and analyzing news
माझेही मत
न्यूजमॅगझीन म्हणून 'लोकप्रभा', 'चित्रलेखा', 'साप्ताहिक सकाळ', 'परिवर्तनाचा वाटसरू', 'साधना' वगैरेचा विचार करणं हेच मुळी हास्यास्पद आहे. ही प्रकाशने म्हणजे न्यूजमॅगझीन? मला माझीच न्यूजमॅगझीनची कल्पना तपासावी लागेल.
+१
र 'फ्रंटलाईन' आणि 'लोकप्रभा' ही तुलना खटकल्याचा एक प्रतिसाद आहे. त्यावर अदितीने "एकाच मापात तोलताना 'लोकप्रभा'ला जगतापांनी फार हलकं ठरवलं आहे" असं म्हणत त्या तुलनेचं समर्थन केलं आहे. हे तर आणखीनच उच्च आहे. गल्लीतल्या खेळाडूची प्रथम श्रेणीतल्या खेळाडूशी तुलना करायची आणि त्या तुलनेत गल्लीतल्याला हलकं ठरवलं आहे, असं म्हणणंच आहे ते. तरी बरं, 'फ्रंटलाईन'चे अगदी अलीकडेपर्यंतचे संपादक हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्डहोल्डर होते हा मुद्दा जगतापांनी चर्चेला घेतला नाही. तो घेऊन त्यात होणारे वृत्तांकन कसे वगैरेचे विश्लेषणही करता आलेच असते.
खटकल्याचा प्रतिसाद माझा आहे. फ्रंटलाईन आणि लोकप्रभा तुलना स्वनातही अशक्य आहे. फ्रंटलाईनच्या आर्टिकल्स वरती यूपीएसीत प्रश्न विचारले जातात. लोकप्रभा काही अपवाद वगळता निव्वळ मंनोरंजनात्मक आहे.लोकप्रभा आपल्या जागी ठीक आहे आणि फ्रंट्लाईन आपल्या जागी. परत सर्क्युलेशन वगैरे मुद्दे आहेतच
फ्रंटलाईनला मराठी पर्याय?
'लोकप्रभा' आणि 'फ्रंटलाईन' अशी तुलना करणं खरोखरच गल्लीतल्या खेळाडूची प्रथम श्रेणीतल्या खेळाडूशी तुलना करण्यासारखं आहे. पण मग 'फ्रंटलाईन'शी ज्याची तुलना करता येईल (महाराष्ट्रापुरती तरी) असं मराठी नियतकालिक आज अस्तित्वात आहे का? पूर्वी होतं का? (जगतापांच्या मते श्री. ग. माजगावकरांचं 'माणूस' एकेकाळी तसं असावं असं वाटतं.) आज तसं तुल्यबळ नियतकालिक असलं तर ते कोणतं? (जगतापांच्या मते कोणतंच नाही. म्हणूनच ते अशी निरर्थक तुलना करून त्यातला फोलपणा दाखवत असावेत का?) असं तुल्यबळ नियतकालिक आज जर अस्तित्वातच नसेल तर मग तोदेखील मराठी नियतकालिकांची सद्यस्थिती दर्शवणारा एक मुद्दा होईल का?
माझे मत
'फ्रंटलाईन'शी ज्याची तुलना करता येईल (महाराष्ट्रापुरती तरी) असं मराठी नियतकालिक आज अस्तित्वात आहे का?
नाही.
पूर्वी होतं का? (जगतापांच्या मते श्री. ग. माजगावकरांचं 'माणूस' एकेकाळी तसं असावं असं वाटतं.)
नाही. (किंचित अपवाद मानता येईल 'माणूस'चा. 'माणूस'मध्ये आलेले क्यूबा क्रांतीविषयीचे रिपोर्ताज हे क्यूबात जाऊन लिहिलेले होते का? असल्यास ते फ्रंटलाईनच्याही पुढे जाईल. एरवी 'माणूस'ने महाराष्ट्राविषयी केलेले लेखनही कितपत फील्ड रिपोर्टिंगच्या आधारावरचे होते, हेही पाहिले पाहिजे. पण 'माणूस'कडे तशी काही दृष्टी होती, असे अगदी सुरक्षीतपणे म्हणता यावे.)
आज तसं तुल्यबळ नियतकालिक असलं तर ते कोणतं? (जगतापांच्या मते कोणतंच नाही. म्हणूनच ते अशी निरर्थक तुलना करून त्यातला फोलपणा दाखवत असावेत का?)
कोणतंच नाही हे माझे उत्तर आहे. (फोलपणा दाखवत नाहीत. उलट बरेच पवित्रे आहेत त्यांच्या लेखनात.)
असं तुल्यबळ नियतकालिक आज जर अस्तित्वातच नसेल तर मग तोदेखील मराठी नियतकालिकांची सद्यस्थिती दर्शवणारा एक मुद्दा होईल का?
तो मुद्दा आहेच. जगतापांच्या लेखनात तो तसा आलेला नाही, असे माझे मत आहे.
या आठवड्याच्या लोकप्रभामधे
या आठवड्याच्या लोकप्रभामधे ‘भारतीय हवामान विभागा’चे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांची प्रज्ञा शिदोरे यांनी मान्सूनच्या विविध पैलूंसंदर्भात घेतलेली सविस्तर मुलाखत आहे, जी वाचनीय आहे. शास्त्र, त्याचा अभ्यास करण्याच्या पद्धती, त्यातल्या त्रुटी, त्या दूर करण्याचे प्रयत्न, सामान्यांच्या आयुष्याशी त्याचं असणारं नातं, संबंधित राजकारण या सर्वच बाजूंनी ही मुलाखत अतिशय उत्तम आहे.
हा मुलाखतीचा दुवा
विनोदी
असे विनोदी लेखन असणारे दुवे देत चला. करमणूक होते. :-)