Skip to main content

जयभिम माहात्म्य

4 minutes

मला कुणी जयभिम म्हटलं कि मी ही त्याच्या आवाजानुसार कधी खणखणीत, कधी हळुवार, कधी पुटपुटता जयभिम म्हणतो. जयभिमला प्रतिसाद देत नाही ते फक्त विद्यापीठात एकत्र शिकलेल्या एका मित्राला. २००० ते २००२ मध्ये पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात आम्ही शिकत होतो.
हा मित्र जयभिमबंधुच मुळचा मराठवाड्यातला. तो आता कोकणात एका सहकारी बँकेत नोकरी करतोय. एका चळवळीतही काम करतोय. हा आज स्थळा संदर्भात काँलेजमधे मला भेटायला आला.
जवळ जवळ पाच वर्षाने भेट होत होती.
त्याने जयभिम घातला आणि मी माझं पेटंट ख्या ख्या ख्या चालू केले. त्याला प्रतिसाद न देता मुद्यावर येऊन चर्चा चालू केली. काय, कसं काय, पुणे प्रवास ? बायका, पोरे या विषयावर बोलू लागलो. त्याच्या सोबतचा पाव्हणा गांगरला विचित्र बघू लागला. मला बोलता बोलता आणि त्याचं ऎकता ऎकता मराठी विभाग आठवू लागला.
आमचा मराठी विभाग म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून आलेल्या मुलांचा भरणा. त्यानंतर त्यांच्यामधे जिल्हावार , जातवार पडत गेलेले गट. या गटांमध्ये आपापले एक अंतर राखून, खेळीमेळीच्या लबाड वातावरणात असलेली स्पर्धा लपत नसायचीच कधी . एक गट ओँकार स्वरुपा सदगुरु समर्था म्हणु लागला कि दुसरा, हय पावलाय देव माझा मल्हारी म्हणायचा . तिसरा लगेच, वर ढगाला लागली कळ पाणी थेँब थेँब..चौथा गट लगेच, चला निळ्या निशाना खाली सर्वाँनी एक व्हारे चालू करायचा. दणक्यात एकमेकांचे आवाज दाबनं चालू व्हायचं. उत्तम नरड्याची पोरं , गोड गळ्याच्या ओँकार स्वरुपाला मागं टाकायची. वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा कलर पसरुन मराठी विभागात रंगीबेरंगी धुरळा दणक्यात उडायचा.
सदर मित्र उत्तम गाणारा. मला एक वर्षाने सिनियर याचं निसर्गराजा विभागात भलतंच फेमस झालेलं. या गाण्यात त्याला साथ करायची ओँकार ग्रुपची भयानक देखणी मुलगी. हा सुरुवातीला जयभिमची आरोळी जंगी ठोकायचा. पहिल्या आरोळीला प्रतिसाद दिल्यानंतर दिवसभरातल्या दुसर्या तिसर्या भेटीत परत जयभिम ? मी म्हटलं गडी दांडगा आंबेडकरवादी आहे. दोस्ती वाढवूच .चळवळ समजुन घेऊच. ह्याच्या बरोबर जास्त वेळ राहू लागलो. संघटनेच्या बैठकिला जाऊ लागलो. हाँटेलमधे, होस्टेलमधे, मुतारी मधे एकत्रच जाऊ लागलो.याराना वाढला. चळवळ सांगताना हा तल्लीन होऊ लागला ऎकताना मी गुंग होऊ लागलो. हाँटेलमधली वेटरं आमच्या बातुनी चळवळीला वैतागू लागली. गल्ल्यावरची मालकं आम्हाला बघितल्या बरोबर चरफडू लागली. एका आँमलेटवर दोन दोन तास बसणारी गाबडी म्हणुन चिडू लागली. चळवळ सांगता सांगता मागवलेलं आँमलेट टेबलवर आलं कि हा समजुन सांगण्यात जराही खंड पडू न देता , मला गप्पात गुंगवून माझ्या बाजूला आलेली आँमलेटची जाड बाजू , हा खूबीने त्याच्या बाजूला वळवून घ्यायचा. जर जाड बाजू त्याच्याच बाजूला आली तर तिप्पट उत्साहात चर्चेत रंग भरायचा.
आँमलेटने त्याचं आणि त्याने दिलेल्या उदाहरणाने माझं पोट भरल्याचं , मी पोटाला, फ्राईडच्या आवेशात बजावून चूप करायचो. वाटलं याला आँमलेट आवडत असेल. जाऊ द्या ! पण लवकरच प्रत्येक पदार्थातील याची भयकारी आवड यानं सक्रीय दाखवून दिली. निव्वळ कौतुकास्पद! मलई बर्फी घेतली कि मोठे तुकडे उचलण्यावर याचाच भर. श्रीखंडाचा पाव किलो डबा हा चार दोन काजू खावेत या सहजतेने संपवायचा. नाताळात एका मित्राकडे याला घेऊन गेलो तर तिथेही चिकण बिर्यानी खाण्यात हाच आघाडीवीर. कुशल नेतृत्त्वाचे विपूल गुण याच्या ठायी ठायी दिसुन आनंद होऊ लागला.
गँदरिँग नामक प्रकार जवळ आला.आणि याच्या जंगी तालमी चालू झाल्या. गाण्यात सोबत करणारी देखणी मुलगी याच्या सोबत चार गाणी पेश करणार होती. त्यांच्या तालमी बघताना वाटायला लागलं ह्यांचं गाणं फक्त ऎकावं बघू नये. रविंद्र महाजणी आणि रंजना यांनी स्वतःच्या अभिनयाला लाजून जावं इतके सुंदर खंग्री भाव हे दोघं चेहर्यावर आणून गाणं पेश करु लागले. न लाजता आम्हाला लाजवू लागले. आता ही जोडी निवांत झाली. दोघं फिरु लागले. हा स्त्रीवाद मांडू लागला ती दलित साहित्यवर बोलू लागली. न दमता एकमेकांची तळी उचलू लागली. आसंमत विसरली, अडचणी विसरली. हा चळवळ विसरला. निसर्गात गुंगला. चळवळ पोरकी झाली ती मला आणि मी तिला निव्वळ हसू लागलो. ती म्हटली जाते मी. म्हटलं आजच्या दिवस थांब.आज निकाल लावतोच. जयभिम बंधू मला आणि चळवळीला वेळ देइनासा झाला.देखण्या मुलीँबरोबरच्या चहाने पागल पागल झाला. टेबल मँनर्स शिकण्यात गुंग होऊ लागला. आबा म्हणुन भेटायला येणार्या धाकट्या भावावर चिडू लागला ओरडू लागला.तंबाखू चोरुन खाऊ लागला आम्हाला कटाक्षाने टाळू लागला. हा जयभिम बंधू चला निळया निशाणा खालीच्या गटातुन अलगद ओंकार स्वरुपात डेरेदाखल झाला.हा त्या गटातील मेँबरा बरोबर असला कि जयभिम आरोळी ठोकेनासा झाला. बाहेर आम्ही दिसलो कि कानकोँडा होऊ लागला.
ह्याचा खणखणीत जयभिम आता पुटपुटण्यावर आला. हा भलताच दैनंदिन पेचात अडकला. पण हा मुळचा हुशार. लवकरच नामी शक्कल ह्यानं शोधली. त्याला कुणी जयभिम घालायच्या आत नजरा नजर झाल्या बरोबर हा त्वरेने जयभिम गाळून , कुणाच्या लक्षात येणार नाही असे संभाषण करु लागला. चिक्कार प्रश्न विचारुन जयभिम साँलीड कट करु लागला. मी दिसलो कि सतीश इंधन वाचलीस का ? (जयभिम कट ) सतीश लायब्रीत गेला होता का ? (जयभिम कट ) सतीश मुग्धा दिसली का ? (जयभिम कट ) हा बिरबलाच्या पुढचा तयार झाला. हजरजबाबीच्या धर्तीवर हजरसवाली झाला. कुणी बरोबर नसलं कि परत खणखणीत जयभिम ! वर प्रतिसादाची अपेक्षा ! एकदा टाळक सटकलं . ह्यानं सवाल केला जयभिम गाळून. म्हटलं बाजूला ये . त्याला विचारलं काय च्यूतिया समजतोस का बे ? येडझव्या ! चल परत आपण तुला जयभिम घालत नसतो आणि तुझा घेतही नसतो. तो हे विसरला आज .मी आजही लक्षात ठेवलं. का ठेवलं हे त्याच्या पावण्याला सांगण्यात पाँईँट नव्हता. सदर मित्र आजही एका चळवळीत काम करतोय. त्याचा मटण खाण्याचा उरक दुपारी पाहीला आणि दंग झालो. त्याचे कार्यकर्ते डोळ्यासमोर तरळुन गेले. मनात म्हटलं चळवळीच्या नेतृत्वाची भूक दांडगी आहे. जबराट आहे.जाड बाजू वळवून घेण्यात नेतृत्व अधिक कुशल झालयं. पातळ झालेल्या कार्यकर्त्यांचा पोकळ बळाने नेतृत्वाच्या नावाचा जयघोष अजुन सुरुच आहे. चळवळीचं कुत्सित हास्य मला दिसतय. तुम्हाला ?

Node read time
4 minutes

आडकित्ता Sat, 15/12/2012 - 23:55

वाघमारे,
तुमच्याशी नीट ओळख झाल्यावर समजेल तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते.
पण जर कुणी, इन्क्लुडींग तुम्ही, कोणत्याही 'चळवळीची' निदर्शक अशी "जय" (कॉमन ठेवत) संताजी, जिनेंद्र, भीम, श्रीराम, श्रीकृष्ण इ. हाक विसरून समोर आलेल्या नुसत्या माणसाला 'ग्रीट' करीत असेल तर मला जास्तच आनंद होईल.
भलेही तो 'निसर्गामुळे' विसरला असेल, अन तुम्ही न विसरण्याची कारणे काहीही असतील..

गवि Mon, 17/12/2012 - 12:42

In reply to by आडकित्ता

आडकित्ता यांचा मुद्दाही पटतोय.

कोणत्याही कारणाने, त्यातल्यात्यात निसर्गसुलभ आकर्षणाने, कोणत्याही दोन "गटां"तले दोघे एकत्र आले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांची तळी उचलली (आणि तदनुषंगाने आपापल्या गटाचे "गटपण" हळूहळू विसरले), तर हे एक सुंदर मिलापाचं लक्षण आहे असं नाही वाटत?

की तसं न होणं म्हणजे चळवळीचं भवितव्य उत्तम असणं? चळवळीचा अंतिम उद्देश, दिशा एकत्रीकरणाची आहे की गटउन्नतीची?

बाकी तुमची लेखनशैली चांगली वाटली हेही आवर्जून सांगतो.

अनामिक Mon, 17/12/2012 - 19:29

In reply to by आडकित्ता

पण जर कुणी, इन्क्लुडींग तुम्ही, कोणत्याही 'चळवळीची' निदर्शक अशी "जय" (कॉमन ठेवत) संताजी, जिनेंद्र, भीम, श्रीराम, श्रीकृष्ण इ. हाक विसरून समोर आलेल्या नुसत्या माणसाला 'ग्रीट' करीत असेल तर मला जास्तच आनंद होईल.

नक्कीच! पण विसरणे आणि सोयीस्कररित्या विसरणे यातही फरक आहेच की! वरच्या लेखातला मित्र सोयीस्कररित्या विसरलेला असावा, कारण एरवी त्याचं (एकटा असताना) जयभिम चालू होतंच असं दिसतंय.

सतीश वाघमारे Sun, 16/12/2012 - 00:48

अडकित्ता भौ. मला ग्रीटचा भले ते काही असो..सोयीपुरता वापर करणं भलतंच तिरस्करणीय वाटतं. निसर्गापुढे दमन हे एका वयात मर्यादित बौद्धिक क्षमतेत मान्य करता येईल. माझ्या लेखातल्या पात्राच वय या मर्यादा ओलांडलेलं आहे. हे समजून सांगण्यासाठी आणि घेण्यासाठी कसली ओळख अपेक्षित आहे ? जरा ईस्कटून लिहा. मग बोलू.

सतीश वाघमारे Sun, 16/12/2012 - 00:53

अडकित्ता भौ नट क्रँक फिट करायच्या आधी तुमचे पाने व्यवस्थेच्या अभ्यासाने नीट चेक करा . निखळून नाहीतर निथळून जातील. फुका बळ कुठे लावू नका. वंध्या संभोग तो ! :-)

आडकित्ता Wed, 19/12/2012 - 23:45

In reply to by सतीश वाघमारे

तुम्हाला नक्की चळवळीच्या हानीबद्दल म्हणायचं होतं, की खाली परिकथेतील राजकुमार यांनी म्हटल्या प्रमाणे प्यारके साईड इफेक्ट बद्दल लिहायचं होतं, हे नुसता लेख वाचून समजत नव्हते. म्हणून तो माझा पहिला प्रतिसाद होता. हे तुमच्या पहिल्या प्रतिसादाचे उत्तर.

दुसर्‍या प्रतिसादाचे उत्तरः (हलके घ्या, विनोदाचा प्रयत्न आहे)
माझी स्वाक्षरी 'नट्स क्रॅक करून मिळतील' अशी आहे.
नट = कठीण कवच असलेले फळ अगदी आक्रोड बदामापासून सुपारीपर्यंत. आडकित्ता या अवजारास इंग्रजीत नट क्रॅकर असे म्हणतात. मराठीत तो सुपारी कातरायला वापरतात, इंग्रजीत आक्रोड फोडायला. इंग्रजीतील 'नट' चा दुसरा अर्थ माथे फिरू किंवा मराठीतील 'क्रॅक' असाही होतो. हे कडक नट्स आमचे कडे 'फोडून' मिळतात. नट्सचे 'इतरही' अर्थ इंग्रजीत अथवा मराठीतही मिळतील ;) त्यांनाही क्रॅक करण्याचे काम आमचेकडे माफक दरात करून मिळते.

पण, तुमचा तो क्रँक काहीकेल्या समजंना वो मला :(

केला प्रयत्न इस्कटुन सांगायचा. बगा जमलाय का?

सतीश वाघमारे Thu, 20/12/2012 - 00:17

In reply to by आडकित्ता

त्याच्या नैसर्गिक भावनेला माझा विरोध नाही.त्यामुळे प्यार के साईड ईफेक्ट ही मला महत्वाचे वाटत नाहीत. सोयीपुरता जयभिमचा वापर करणं मला तिरस्करणीय वाटतं. चळवळ प्रवाही असणं हे गरजेचं ती कुणामुळे हा प्रश्न गैरलागू.प्रोसेस महत्त्वाची.आणि हा पठ्ठ्या दुटप्पी वर्तणामुळे चळवळ बदनाम होतेय हे लक्षात घेत नाही.नेतृत्त्व भ्रष्ट झाल्यामुळे व्यक्त झालेली चिड आहे ही.
दुसर्या प्रतिक्रिये बद्दल माफ करा.माझी गफलत झाली.तुमची स्वाक्षरी समजण्यात.मला तो तिरकस शेरा वाटला. आणि अजुन एक महत्त्वाचे या सगळ्या तांत्रिक ज्ञानामधे मी खूप मागास आहे. त्यामुळे घोळ झाला.कृपया गैरसमज करुन घेऊ नका.

राजेश घासकडवी Sun, 16/12/2012 - 13:50

एखाद्या व्यक्तीची दोन परस्परविरोधी निष्ठा बाळगताना जी त्रेधातिरपिट होते तिचं चित्रण आवडलं. शैली छान आहे. जातवार गटांची वर्णनं मस्तच. सदर मित्राच्या वागणुकीतला बदलही बारकाव्याने टिपलेले आहेत.

ऋषिकेश Mon, 17/12/2012 - 10:48

म्हटल्या तर नेहमी दिसत आलेल्या पण म्हटलं तर आपणच त्याकडे बघायचे न ठरवलेल्या गोष्टी अश्या छोट्या लेखनातून समोर येतात तेव्हा धक्का बसत नाही पण डोळे विस्फारतात.
कोणत्याही कार्यकर्त्याची आपल्या नेत्याचे होणारे अधःपतन बघताना होणारी घालमेल अचूक टिपली आहे.. इथे तो नेता जयभीम चळवळीचा आहे पण बव्हंशी सामाजिक - राजकीय चळवळींत हे असेच होताना दिसत असते.

छान लेखन

तिरशिंगराव Mon, 17/12/2012 - 19:02

माननीय बाबासाहेबांचे नांव 'भीम' असे होते. आदराने ते भीमराव असे झाले. तरी जास्तीतजास्त लोक 'जय भिम' असे का म्हणतात ? 'जय भीम' असे का म्हणत नाहीत?
का यामागेही काही थिअरी आहे ?

आबा Mon, 17/12/2012 - 19:48

तुमची लेखणाची शैली आवडायला लागलिये

अरविंद कोल्हटकर Mon, 17/12/2012 - 20:07

वरचे 'जयभीम' सर्वत्र सापडतात.

मी शाळेत असतांना आमच्या पुढचा एक तालीमबाज संघिष्ठ मुलगा स्वामी शिवानंदांच्या प्रभावाखाली होता आणि आजन्म ब्रह्मचर्य पळण्याची शपथ त्याने घेतली होती. 'ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यु,' 'वीर्याचा एक बिंदु १०० रक्ताच्या बिंदूमधून तयार होतो म्हणून त्याचे स्तंभन करावे' असली वचने आमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न तो निष्ठेने करीत असे. मी एकदा 'नागीन' ('मन डोले मेरा'वाला) बघायला गेलो तर 'कसले हे अश्लील सिनेमे पाहतोस' म्हणून ह्याने माझी हजेरी घेतली.

काही वर्षांनंतर हा आमूलाग्र बदलला. हा एका परजातीय मुलीच्या प्रेमात पडला आणि दोन्ही घरच्या विरोधाला न जुमानता त्यांनी पळून जाऊन लग्नहि केले. आता तो संसारात पूर्ण बुडला आहे. दोन्ही बाजूंचे विरोध मावळले आहेत आणि आम्हीहि त्याला क्षमा केली आहे.

राजन बापट Mon, 17/12/2012 - 20:19

प्रसिद्ध मराठी कथाकार कै. जी ए कुलकर्णी यांची एक "वहाणा" नावाची एक कथा आहे. त्यांच्या सर्वच कथा मला आवडतात ; पण ही विशेष.

ही कथा आत्मकथनात्मक आहे. एका औषध-विक्रेत्याचे (मेडीकल् रीप्रेझेन्टीटीव्ह) हे एक निवेदन. या कथेची महत्ता समजून घ्यायला ती कथा मुळातूनच वाचायला हवी. त्या कथेच्या एका महत्त्वाच्या बिंदूपाशी निवेदक म्हणतो : "सार्‍या प्रवासभर टिकतील अशा वहाणा काही मला मिळाल्या नाहीत ! इतका प्रवास केला आणि इतक्या वहाणा बदलल्या , पण शेवटी माझे पाय अनवाणीच राहिले." परवा ही कथा वाचत होतो आणि हे वाक्य मनात राहून गेले खरे.

वर उधृत केलेले वाक्य केवळ पायातल्या "वहाणां"बद्दलचे नाही हे वेगळे सांगायला नकोच. इथे "प्रवास" जो आहे तो आपल्या आयुष्याचा आहे आणि "वहाणा" आहे एक रूपक : आपल्या तत्त्वांचे , जपलेल्या मूल्यांचे , बर्‍यावाईट श्रद्धांचे , विश्वासाचे , मतांचे. उराशी बाळगलेल्या भल्या-बुर्‍या , भाबड्या आणि बनेल कल्पना , आदर्शवादी आणि हिशेबी विचारांचे. ज्याचे आयुष्य प्रवासात आहे त्याला सतत आपल्या वहाणा बदलाव्या लागतात. त्याच प्रमाणे जी व्यक्ति तर्कांच्या , तत्वांच्या , सिद्धांतांच्या कसोटीवर येणार्‍या दिवसाला घासून पाहते , "सत्य-असत्याशी मन केले ग्वाही" अशी वृती ठेवते तिला आपले श्रद्धांचे , विश्वासाचे , मतांचे गाठोडे बर्‍याचदा उलगडून बघावे लागते ; जुनेरी काढावी लागतात आणि नवी वसने घालून पुढील मुक्कामाला जावे लागते.

कमी अधिक फरकाने आपण सर्वानी हा प्रवास केलाय्. आपल्यापैकी अनेकांचा हा प्रवास अजून चालू असेलच - कळत नकळत.

आपल्या (किंवा आपल्याला माहित असलेल्या कुणाच्या) प्रवासातील अनपेक्षित वाटा-वळणे आणि "बदललेल्या वहाणा" हा या चर्चेचा विषय होऊ शकतो.

स्वतःबद्दल सांगणे अवघड. त्यातून जर अनेक वर्षे लढलेला विचारांचा बालेकिल्ला कधी कोलमडला असेल तर त्याबद्दल सांगणे फारच कठीण , याची मला जाणीव आहे. पण जमेल तसे आपण सगळे लिहू शकू असे मला वाटते...

अजून विचार करू जाता अजूनही काही आठवेल. येथील अनुभवी लोकानी थोडे सविस्तर लिहीले तर आनंद वाटेल.

परिकथेतील राजकुमार Tue, 18/12/2012 - 12:10

एकूणच प्रतिक्रिया पाहता बर्‍याच लोकांना हे लेखन निटसे कळालेले नाही असे दिसते.

'प्यार के साईड इफेक्ट' असा लेखनाचा हेतू असताना, काही लोक उगाचच जात पात वैग्रे संदर्भ मध्ये आणत आहेत हे बघून एक ऐसीअक्षरेकर म्हणून शरम आली. आज मी शेळीचे दूध पिणार नाही आणि 'नमस्ते सदा..' देखील म्हणणार नाही.

जय श्रीकृष्ण !

अवांतर :- जो कोणी ह्या प्रतिक्रियेला वाईट श्रेणी द्यायच्या प्रयत्न करेल त्याचा तळपट होईल आणि त्याच्या घरादारावरुन गाढवाचे नांगर फिरतील.

सतीश वाघमारे Mon, 24/12/2012 - 00:27

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पा जोगळेकर वाचण्याची आवड जाहिर केल्याबद्दल आभार ! माझे अजुन ४ लेख आहेत इथे माझ्या एकूण प्रवासाचे काही तुकडे शोधता येतील आणि अंदाज बांधता येतील तुम्हाला. :-)