Skip to main content

दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते.

6 minutes

ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असा प्रचार ब्रिटीशांनी आणि स्वतंत्रता प्राप्ती नंतर ब्रिटिश धार्जिणी सरकारी तंत्राने ही सतत केला. त्यामागे समाजाला विभाजित करून फूट डालो राज करो हा राजनीतिक उद्देश्य ही होता. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधता येतात आणि सत्य समोर आणता येते. त्याच्याच संदर्भ घेऊन हा लेख उकेरला आहे. सुरुवात वैदिक काळापासून करतो. वैदिक काळात शूद्रांना शिक्षण मिळत होते की नाही.

शूद्रोऽपि विद्वान् भवति यद्यपि शूद्रजातः ।
विद्या हि सर्वं विश्वस्य संनादति ॥
(अथर्ववेद १९.६२.१)

शूद्रजन्म झालेलाही विद्वान होऊ शकतो, कारण विद्या सर्व विश्वात संनाद करते (सर्वांना उपलब्ध आहे).

वैदिक काळात शूद्र आणि अनार्य यांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार होता, ज्याचे ठोस पुरावे वेदांमध्येच आढळतात- ऋग्वेद ९.११२.३ मध्ये "ब्रह्मराजन्याभ्यां शूद्राय चार्याय च स्वाय चारणाय च" असा उल्लेख करून वेदवाणी शूद्र आणि अनार्य (स्वायचारण) यांच्यासाठीही आहे असे स्पष्ट केले; ऋग्वेद १०.५३.४ मध्ये "यद् विश्वा अश्विना... शूद्राय वा ददथुरार्याय वा" म्हणून शूद्र आणि आर्य यांना ज्ञानयान (शिक्षण) समान दिल्याचे सांगितले; अथर्ववेद १९.६२.१ मध्ये "शूद्रोऽपि विद्वान् भवति... विद्या हि सर्वं विश्वं संनादति" असे म्हणून शूद्रजन्म असलातरी विद्वान होऊ शकतो आणि विद्या सर्व विश्वात संनाद करते हे तत्त्व प्रतिपादित केले; तर यजुर्वेद (वाजसनेयी संहिता) २६.२ मध्ये "शूद्राय च परं ब्रह्म दत्तं भवति" असे सांगून शूद्रालाही परब्रह्मज्ञान प्राप्त होते असे नमूद केले. स्पष्ट आहे, वेदकाळात वर्ण जन्माने नव्हे, विद्येने आणि कर्माने ठरत होते, आणि शूद्र-अनार्य यांना वेदपाठ, यज्ञ, युद्धकला, वैद्यकी व नेतृत्व यांत समान सहभाग होता.

शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम् ।
क्षत्रियात् जातमेवं तु विद्वत्त्वात् सागरादयः ॥
(महाभारत अनुशासनपर्व १४३.४९-५०):

शूद्र ब्राह्मण होऊ शकतो, ब्राह्मण शूद्र होऊ शकतो. क्षत्रिय जन्म असलेलाही विद्वत्ता मिळवून (ब्राह्मण) होऊ शकतो. महाभारताचे रचियता महर्षि व्यास (जन्मानुसार हीन संकर वर्ण) पासून क्षत्रीय धृतराष्ट्र आणि पांडूचा जन्म झाला. शुकदेव ऋषी हे व्यासांचे पुत्र होते. त्यांनी वैदिक शिक्षण व आत्मसाक्षात्कार प्राप्त करून ब्राह्मणत्व प्राप्त केले.

जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते ।
वेदपठात् भवेत् विप्रः ब्रह्म जानाति ब्राह्मणः ॥
(मनुस्मृती १०.४ )

जन्माने सर्व शूद्र असतात म्हणजे जन्माने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य नसतो; सर्वजण सामान्य मानव म्हणून जन्म घेतात. व्यक्ति संस्काराने द्विज होतो. उपनयन व इतर धार्मिक संस्कारांमुळे तो द्विज (द्वितीय जन्म प्राप्त केलेला) होतो. वेदाध्ययन केल्याने तो विद्वान (विप्र) होतो. ब्रह्मज्ञानाने ब्राह्मण होतो. स्वामी दयानन्द अनुसार आपल्या अधिकान्श ग्रंथांमध्ये भेसळ झाल्याने काही विपरीत श्लौक मनुस्मृतीत मिळतात. भेसळ तपासण्यासाठी पूर्वीच्या ग्रंथांची मदत घेऊन भेसळ सहज ओळखल्या जाते. उदाहरणार्थ वाल्मीकि (शूद्र- रामायणकार ब्राह्मण) आणि विश्वामित्र ही नावे आपल्याला माहीत आहे. अधिक उदाहरणे: गदिवान ऋषी: मत्स्य पुराण (अ. १४५) मध्ये गदिवान (शूद्र जन्म) यांना वेदपाठाचा अधिकार दिला, ते ऋग्वेदाचे विद्वान झाले आणि यज्ञ करून ब्राह्मणत्व प्राप्त केले. जाबाली ऋषी: रामायण (अयोध्या कांड १००-१०८) मध्ये जाबाली (शूद्र/म्लेच्छ जन्म) रामाला नास्तिक दर्शन शिकवतात. महाभारत (शांति पर्व १८०) मध्ये जाबाली सत्यकाम (शूद्र मातेचा पुत्र) गौतम ऋषींचे शिष्य होऊन उपनयन घेऊन ब्राह्मण झाले. वेदव्यास: मत्स्य पुराण (अ. १४५) व महाभारत (आदि पर्व ६३) मध्ये व्यास (कोली/मत्स्यगंधा पुत्री सत्यवती + पराशर) शूद्र/मिश्र जन्म असूनही वेद विभागकर्ते झाले, कृष्णद्वैपायन म्हणून ब्राह्मण ऋषी. त्याकाळी कर्माने वर्ण बदलत होते.

शूद्र हे क्षत्रीय होऊन चक्रवर्ती सम्राट ही झाले उदाहरण- चंद्रगुप्त मौर्य (इ.पू. ३२१-२९७), जो मुरा दासी पुत्र असूनही तक्षशिला विद्यापीठात चाणक्य (कौटिल्य) यांच्याकडून अर्थशास्त्र, राजनीती आणि युद्धकला शिकून मौर्य साम्राज्य स्थापन केले. अर्थात तक्षशीला सारख्या विश्वविद्यालयात शूद्रना शिक्षणाचा अधिकार होता. अजातशत्रू (इ.पू. ४९२-४६०), बिंबिसाराचा दासी पुत्र (बौद्ध ग्रंथ 'महावग्ग' व जैन 'भगवती सूत्र' नुसार शाक्य कुळाने त्याला नीच समजून दासीशी लग्न लावले आणि मगधात हेर्यंका वंशाचा राजा होऊन त्याने कोसल, वैशालीवर विजय मिळवला. महापद्म नंद (इ.पू. ३८२-३२९), शूद्र दासी पुत्र (पुराणांनुसार महानंदीचा पुत्र) याने काशी, कोसल, कलिंग जिंकून नंद साम्राज्य वाढवले आणि चाणक्यसारख्या विद्वानांना आश्रय दिला. पुष्यमित्र शुंग (इ.पू. १८५-१४९), निम्न ब्राह्मण किंवा शूद्र वंशीय (मुद्राराक्षस नाटकात हीन वंशीय सांगितले), अशोकानंतर शुंग वंशाचा संस्थापक होऊन यज्ञ व शिक्षणाला प्रोत्साहन दिले; दिव्या (इ.पू. ५वे शतक), जलिया कैबर्त (निम्न मच्छीमार जाती)चा राजा, अवंती साम्राज्य विस्तारला आणि बौद्ध ग्रंथांमध्ये त्याच्या शिक्षणाचा उल्लेख आहे. अशी उदाहरणे दाखवतात की प्राचीन भारतात जन्म नव्हे, विद्या-कर्माने राज्य मिळत असे.

वैदिककाळापासून ते मुगल येण्यापूर्वी (इ.स. १५२६) भारतात शिक्षणाची समृद्ध परंपरा होती. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी, जगद्दल, सोमपुरी, काशी, नदिया, उज्जैन, मिथिला, तंजावूर, कांचीपुरम, पुष्पगिरी, श्रृंगेरी यांसारख्या ३२ प्रमुख विद्यापीठे आणि लाखो लहान गुरुकुले होती. वेद, बौद्ध-जैन दर्शन, गणित, खगोल, वैद्यक, कला इत्यादींचे शिक्षण सर्व वर्ण-लिंगांसाठी खुले होते. १८व्या शतकात ही ६ लाख+ गुरुकुले अस्तित्वात होती. साहजिकच शूद्र-दलित बहुसंख्य (७५-८०%) होते. गुरुकुलांत ७२ शिल्पकला (लोहारकी, विणकरकी, सुतारकी, कुंभारकी, रंगकाम, चित्रकला, वास्तुशास्त्र, धातुकाम, हस्तिदंतकाम, रत्नकाम, वाद्यनिर्मिती, कृषी यंत्रे, जहाजबांधणी इ.) शिकवल्या जात होत्या, ज्यामुळे गावागावांत स्वावलंबी अर्थव्यवस्था होती.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अहवालांनुसार (मुख्यतः विलियम अॅडमच्या १८३५-३८ च्या बंगाल-बिहार सर्वे आणि जी. डब्ल्यू. लिटनरच्या १८८२ च्या पंजाब सर्वे) आणि धर्मपाल यांच्या "द ब्यूटीफुल ट्री" पुस्तकात (१९८३) यांचा आधार घेऊन, बंगाल आणि बिहारमध्ये सुमारे १,००,००० गुरुकुल किंवा देशी पाठशाळा अस्तित्वात होत्या (प्रत्येक गावात किमान एक, एकूण १,५०,०००+ गावांप्रमाणे) तर पंजाबमध्ये लिटनरनुसार ५,०००+ पाठशाळा होत्या, ज्यात शूद्र व अन्य जातींचे बहुमत (७०%+) होते. प्री-कोलोनियल काळात भारताची जनसंख्या बघता आणि प्रत्येक गावांत एक गुरुकुल असल्याने जवळपास गांवतील सर्वांना प्राथमिक शिक्षण निश्चित मिळत असेल. मग अचानक असे काय झाले की शूद्र समाज शिक्षणापासून वंचित झाला.

1857 नंतर ब्रिटिश सरकारने भारतावर अधिकार केला. दंडुकशाही वापरुन गुरुकुल बंद केले. नवीन मेकाले शिक्षणाला सुरुवात झाल्याने, राजा महाराजा, जमीनदार यांनी ही गावोगावी पसरलेल्या गुरुकुलांना मदत करणे बंद केले. दुसरी कडे ब्रिटिश सरकारने गावो गावी शाळा उघडल्या नाही कारण त्यांना फक्त बाबू पाहिजे होते.

१९०१ मध्ये मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेच्या (इंग्रजी-प्रधान, पाश्चिमात्य अभ्यासक्रमावर आधारित सरकारी व सहाय्यित शाळा) अंतर्गत भारतात सुमारे ९३,६०४ प्राथमिक शाळा आणि ३,५००-४,००० माध्यमिक शाळा अस्तित्वात होत्या, ज्यात एकूण शाळांची संख्या ९७,०००+ होती (ब्रिटिश भारतासाठी, १९०१-०२ च्या आकडेवारीनुसार), जरी पारंपरिक गुरुकुले नष्ट झाल्याने एकूण शाळा पूर्वीच्या ६ लाखांपासून खूप खाली आल्या होत्या. १९०१ च्या ब्रिटिश इंडियन एम्पायरच्या जनगणनेनुसार (ब्रिटिश प्रांत + देशी राज्ये मिळून) भारताची जनसंख्या *२९४,३६१,०५६ ज्यात पुरुष १४९.९५ दशलक्ष आणि स्त्रिया १४४.४० दशलक्ष होते. शिक्षणाचे प्रमाण (साक्षरता दर) एकूण ५.३% (५३ प्रति १,०००) होते, ज्यात पुरुष ९.८% आणि स्त्रिया ०.७% होत्या. पूर्वीच्या (१८व्या शतकातील) १५-२५% शिक्षण प्रसारापासून मोठा घसरण झाली (हे ब्रिटिश आंकडे आहेत. पण देशांत 6 लक्ष गुरुकुल असल्याने प्राथमिक शिक्षण निश्चित 80 ते 90 टक्के असेल). त्यात ही बंगालचे उदाहरण: ब्राह्मण(उच्चवर्ण) साक्षरता ४६७ प्रति १,००० पुरुष, क्षत्रिय/राजपूत ३००-४०० प्रति १,०००, वैश्य/व्यापारी (जसे जैन, बनिया) ३६०-८१८ प्रति १,००० (उच्च), पण शूद्र व अन्य निम्न जाती (जसे चमार, महार, गोंड, कोली) ८-५४ प्रति १,००० (अत्यंत कमी). पूर्वी ७०-८४% शूद्र विद्यार्थी असताना आता १-२% पर्यंत घसरले); अनुसूचित जाती/दलित ८ प्रति १,००० (अनिमिस्ट/अस्पृश्यांसह). याचा अर्थ मेकाले शिक्षण व्यवस्थेने 50 वर्षांत भारतातिल बहुसंख्यक जनतेला अशिक्षित बनविण्याचे कार्य केले. ब्राह्मण समाज शहरांत भिक्षा किंवा दिवस लाऊन जेवण करून शिक्षण घेत होता, ज्यामुळे मॅकॉलेच्या इंग्रजी शिक्षण व्यवस्थेत त्यांना प्रवेश सोपा झाला. ते जास्त साक्षर झाले आणि सरकारी नौकरीत त्यांना जास्त स्थान मिळाले आणि दुसरीकडे दलित वंचित समाज गावांतच राहिला आणि अशिक्षित झाला.

निष्कर्ष: मॅकॉलेच्या धोरणाने उच्चवर्णांना फायदा झाला, तर शूद्र-दलितांचे शिक्षण ७०-८०% घसरले, कारण गावी-गावी गुरुकुले बंद झाली. शाळा शहरी-इंग्रजी झाल्या होत्या. ब्रिटिश शिक्षण व्यवस्थने शूद्रांना शिक्षणापासून वंचित केले, हेच खरे सत्य आहे. बाकी आजमोठ्या प्रमाणात गावोगावी शाळा आहेत आणि शिक्षणात आरक्षण, छात्रवृती इत्यादि मुळे शाळेत जाणार्‍या आणि दलितांची संख्या पुन्हा वाढली आहे.

जनसंख्या *२९४,३६१,०५६ ???

Node read time
6 minutes

सई केसकर Sat, 29/11/2025 - 14:08

एक असेच उपनयन वगैरे मानणारे कुटुंब होते. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव वेद ठेवले. वेद मोठा झाला. GRE देऊन अमेरिकेला गेला. तिकडे त्याला सगळे वेड म्हणू लागले.

'न'वी बाजू Sat, 29/11/2025 - 17:50

In reply to by सई केसकर

अनेक वर्षांपूर्वी इथेच अमेरिकेत माझा एक मद्राशी एक्स-कलीग होता. आता, वस्तुतः, तो काय, किंवा त्याची बायको काय, यांच्यापैकी कोणीही धार्मिक, हिंदुत्ववादी, अथवा हिंदुपरंपराभिमानी, यांपैकी काहीही नव्हते. (किंवा, नसावे. निदान, जाणवले तरी नाही. असो.) परंतु, बारश्याच्या वेळेस आपले नाव काय ठेवले जावे, ते आपल्या हातात थोडेच असते? (आता, पटाईतकाकांचेच पाहा ना. ‘विवेक’ आहे. ठेवणारे काय, मनाला येईल ते ठेवून देतात. असो.)

तर माझा हा (भूतपूर्व) सहकर्मी व्यवसायाने डीबीए (डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर) वगैरे होता. त्याची बायकोसुद्धा, आमच्या कंपनीत जरी कामाला नसली, तरी त्याच व्यवसायात होती.

तो जमाना आंतरजालाच्या अगदी बाल्यावस्थेचा जरी म्हणता नाही आला, तरीसुद्धा, फार फार तर तुलनात्मक कौमार्याचा म्हणता यावा. त्यामुळे, उदाहरणादाखल, सीक्वेलच्या सिंटॅक्सबद्दल किंवा एखाद्या नेहमीच्या वापरात नसलेल्या फंक्शनबद्दल काही शंका आली, तर चटकन ऑनलाइन तपासण्याची सोय नसे. छापील मॅन्युअलांवर काम भागवावे लागे.

तर असेच एकदा मी या सद्गृहस्थाजवळून काही कारणास्तव कसलेसे मॅन्युअल उसने घेतले. ते मॅन्युअल वस्तुतः त्याच्या बायकोचे होते. आणि, बाळबोध सवयीस अनुसरून, तिने स्वतःचे नाव मुखपृष्ठावर मोठ्ठ्या, सुवाच्य, कॅपिटल रोमन अक्षरांत लिहून ठेवलेले होते.

‘वेदा मधुसूदन’!

आता, तुम्हीच मला सांगा, माणसाने प्रामाणिक असावे खरे, परंतु किती? आणि, नवऱ्याचे वाभाडे कोणी असे चारचौघांत काढावे? कितीही झाले, तरी घरातल्या गोष्टी असतात ना या?

असो चालायचेच.

व्लादिमीर हत्ती Sat, 29/11/2025 - 19:15

In reply to by सई केसकर

अमेरीकेत सगळ्यात अडचण होते परीक्षित किंवा अक्षिता/हर्षिता अशी नावे असलेल्यांची. गुजराती लोकांमध्ये हार्दिक हे नाव असते. अशांची अवस्था फारच केविलवाणी होते. त्यांना आपले नाव काय हे पण धड सांगता येत नाही.
मला सगळे सॅटीश असे म्हणायचे. त्यांना क्षुब्धोन्मत्त हत्ती असे आयुष्यात कधीही म्हणता आले नसते.

'न'वी बाजू Sat, 29/11/2025 - 19:49

In reply to by व्लादिमीर हत्ती

गुजराती लोकांमध्ये हार्दिक हे नाव असते.

खरोखरच. फारच दुर्दैवी परिस्थिती आहे ही.

अमेरीकेत सगळ्यात अडचण होते परीक्षित किंवा अक्षिता/हर्षिता अशी नावे असलेल्यांची.

दीक्षितांना कसे विसरलात?

सई केसकर Sat, 29/11/2025 - 20:59

In reply to by 'न'वी बाजू

सुखदीप देखील.
खरंतर कोथरूड वगैरे भागांत राहणाऱ्या लोकांनी आता एकदम वेदांकडे टाईम ट्रॅव्हल करून आपल्या मुलांची नावं ठेवू नयेत. कारण या डेमोग्राफिकमधून बरेचजण अमेरिकेला जातात. आता इयन जोगळेकर, एम्मा कुलकर्णी अशीच नावे ठेवावीत. पण अलीकडे मुंज हा इव्हेंट इतका महत्त्वाचा झाला आहे की मुलगा झाल्यावरच मुंजीत शोभेल असं नाव ठेवतात. आई maternity gown मध्ये वावरत असतानाच मातृभोजनाची साडी निवडून ठेवते.
असो चालायचेच.

'न'वी बाजू Sat, 29/11/2025 - 22:42

In reply to by सई केसकर

कारण या डेमोग्राफिकमधून बरेचजण अमेरिकेला जातात. आता इयन जोगळेकर, एम्मा कुलकर्णी अशीच नावे ठेवावीत.

आमच्या आदल्या पिढीपर्यंत, अमेरिकेत जाणाऱ्या विविध डेमोग्राफिकांमधील आईवडिलांना असे मुद्दाम करण्याची गरज पडत नसे. कारण, त्या पिढ्यांतील अनेकजण, भले आईबापांनी पाळण्यात ठेवलेले नाव काहीही असो, परंतु, अमेरिकेत आल्याआल्या स्वतःच स्वतःचे (कागदोपत्री नाही, तरी व्यवहारात) पुन्हा बारसे करून घेत. (‘Assimilate’ वगैरे होण्याच्या नावाखाली. किंवा, किमानपक्षी, पांढऱ्या माणसांना नाव उच्चारणे सोयीचे व्हावे, म्हणून.) आणि मग तुम्हाला अनेक असे ब्राउन कातडीचे चार्ली (मूळचा ‘चंदनदास’) शाह, झालेच तर माँटी गांधी, वाल्टर पटेल, किंवा पॅडी (मूळचा ‘प्रद्युम्न’ किंवा तत्सम) करमरकर, झालेच तर रॉजर गोसावी, सॅली परांजपे (किंवा केसकर), जळीस्थळीकाष्ठीपाषाणी दिसू लागत.

आमच्या पिढीपर्यंत हा ट्रेंड नामशेष जरी झालेला नसला, तरी जाणूनबुजून/स्वेच्छेने बारसे करून घेण्याचे प्रकार बऱ्यापैकी कमी होऊन लयाला जाऊ लागले होते. आमच्या पिढीत हा प्रकार थोडाफार जो टिकून होता, तो बहुतकरून (अगोदर बी१वर आणि नंतरनंतर एच१बीवर येणाऱ्या) सॉफ्टवेअर-‘कन्सल्टन्सी’ ‘व्यावसायिकां’मध्ये, आणि तोही बव्हंशी जबरदस्तीने. बोले तो, आमच्या ज्या (बहुतांशी देशी) ‘कन्सल्टिंग कंपन्या’/बॉडीशॉपर/दलाल/भडवे वगैरे जे असत, ते वेगवेगळ्या प्रॉजेक्टांवर आम्हाला विकताना/भाड्याने ‘लावून देताना’, परस्पर बदललेल्या नावानिशी विकत/‘लावून देत’. आमच्या मर्जीचा विचार करण्याची पद्धत यात नसे. (म्हणजे, मूळ पुरवठादार कंपनीच्या खाती, झालेच तर व्हिसावर वगैरे, किंवा एकंदरीतच अधिकृत कागदपत्रांवर वगैरे, नाव पाळण्यातलेच असायचे, परंतु, गिऱ्हाइकाच्या खाती मात्र बदललेले नाव जाई. यामागील देण्याची तथाकथित कारणे बोले तो, एक तर (अर्थात) गिऱ्हाइकाच्या ‘गोऱ्या लोकांना’ उच्चारायला सोपे जावे म्हणून, आणि (खरे तर त्याहीपेक्षा) गिऱ्हाइकाला विकाऊ माल हा ‘स्थानिक उमेदवार’ वाटावा, म्हणून.)

आमच्या पुढच्या पिढ्यांत मात्र कधीतरी या पद्धतीचे पूर्ण उच्चाटन झाले असावे. बहुधा पुढच्या पिढ्या ऐकून घेत नसाव्यात (‘हुडूत्’, ‘आम्ही नाही जा!’ म्हणत असाव्यात); झालेच तर, (१) स्वतःला विकण्याकरिता स्वतःची ओळख बदलण्याची गरज नाही, आणि (२) पांढऱ्या माणसाला जर आपले नाव उच्चारता येत नसेल, तर ती पांढऱ्या माणसाची डोकेदुखी आहे, आपली नव्हे, या जागरूकता मूळ धरू लागल्या असाव्यात. चांगले आहे; प्रगती आहे. (तरी अधूनमधून एखादा स्वतःला ‘कॅश’ म्हणवणारा उगांडू गुजराती पटेल नाहीतर एखादी स्वतःला ‘निक्की’ म्हणवणारी बाटगी सरदारीण वगैरे आढळतातच. परंतु, क्वचित.)

असो चालायचेच.

(तरीसुद्धा, ‘राजाराम’ असे पाळण्यातले नाव धारण करणाऱ्या अनेक — बहुतांश! — देशी बांधवांना, लोकांना (विशेषेकरून पांढऱ्या लोकांना, परंतु त्याचबरोबर इतर देशी लोकांनासुद्धा) सांगताना, का, कोण जाणे, परंतु, आपले नाव ‘राज’ असे सांगण्याची आत्यंतिक इरिटेटिंग खोड असते, असे निरीक्षण आहे. असल्या नमुन्यांना, ‘तुझ्या मातुःश्रींस भेटावयास पंजाबी मनुष्य आला होता काय रे?’ असे विचारण्याची आत्यंतिक असुरी उबळ/सुरसुरी/खुमखुमी येते. तेही चालायचेच, म्हणा!)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 30/11/2025 - 02:28

एक कोरियन मित्र मला नेहमी विचारायचा, भारतीय लोकांची नावं आंग्लाळलेली का नसतात? त्याचं नाव जेसॉक आहे, पण तो त्याचं नाव जे असंच सांगायचा. 'न'बांमुळे माहितीत भर पडली.

मलाही आता अमेरिकेत राहून 'जे' म्हणायची एवढी सवय झाली आहे की आपल्या धनंजयला आणखी एका अमेरिकी मित्रासमोर मी जय नाही, जे म्हणते. 

ऑफिसात एक तरुण चिनी मुलगी आहे. तिचं नाव शिंगयांग. मी तिला चारचारदा विचारून घेतलं, मी तिच्या नावाचा उच्चार ठीकठाक करते का नाही ते. तिचं स्पेलिंग ती करते Xingyang. तिला बरेच भारतीय आणि अमेरिकी लोकही झिंगयांग म्हणतात. अमराठी भाषांमध्ये झिंग असा शब्द आहे का नाही, माहीत नाही. पण प्रयत्नही केला नसावा. शी जिनपिंगचं नावही या लोकांना माहीत असेल का नाही, कोण जाणे! 

विवेक पटाईत Sun, 30/11/2025 - 09:12

आजच सकाळी सकाळी एका वाचकाचा फोन आला. पटाईत साहेब तुमच्या लेखावर प्रतिसाद देण्याएवजी असंबंध चर्चा सुरू आहे. मी उत्तर दिले तसे नाही, इथे लिहणारे आणि वाचणारे सर्व शिक्षित आहेत. अनेक उत्तम लेख इथे असतात. पण काय आहे, शिक्षित असले तरी अधिकान्श पुरोगामी त्यात ही प्रगतिशील आहेत. मेकाले शिक्षणाचे मानसिक गुलाम आहेत. सत्य पाहण्याची क्षमता विसरून गेले आहे. माझे लेखन सत्य वाटत असले तरी ते पचवू शकत नाही. त्यामुळे असे प्रतिसाद येतात. बाकी मी आपले काम करणार. प्रतिसाद देणारे आपले काम करणार. यातच खरी मजा आहे.

सई केसकर Sun, 30/11/2025 - 09:44

In reply to by विवेक पटाईत

अथर्ववेदात दिलेल्या त्या ओळी खऱ्या झाल्याचा ब्रिटिश येण्याआधीच्या भारतात काही पुरावा आहे का?
मुळात माणसाला माणूस न म्हणता शूद्र का म्हणावं? ज्ञान संपन्न केल्याने माणूस उन्नत होतो हे खरं आहे. पण ज्या स्त्री किंवा पुरुषाकडे वेदांचे ज्ञान नाही त्यांना शूद्र का म्हणावं?

अनेकदा असं म्हणलेलं ऐकलं आहे की हे चार वर्ण म्हणजे केवळ त्यांना वाटून दिलेल्या कामामुळे झालेली समाजव्यवस्था होती. ठीक. पण तुमची मेलेली गाय घरी नेऊन तिची कातडी काढून स्वच्छ करून आणून पुन्हा तुम्हाला देणारा माणूस तुमच्याकरिता उपयुक्त नाही काय? मग त्याला शूद्र म्हणून का तुच्छ लेखावं? जर ही समाजव्यवस्था केवळ कामं वाटून देण्याने तयार झाली होती तर ती कामं करणाऱ्या सर्वांना समान आदराची वागणूक का मिळत नव्हती? अस्पृश्यता का होती?

ठीक आहे. पूर्वीचेही आपण सोडून देऊ.
आज स्त्रियांची परिस्थिती काय आहे? केवळ शिक्षण दिल्याने स्त्रीची उन्नती होते का? त्याच्या पुढची पायरी म्हणजे अर्थार्जन हीच आहे. आज कितीतरी तथाकथित चांगल्या घरातल्या स्त्रियांच्या माथी सक्तीचं गृहिणीपद येतं. कारण मुलाची काळजी घेणे ही सर्वस्वी आईची जबाबदारी आहे असं मत अजूनही रूढ आहे. या बाबतीत आपण पूर्वीच्या काळात डोकावून बघितल्यास असं दिसतं की मोठ्या कुटुंबातून मुलं "आपोआप" मोठी होत असत. कारण त्यांच्या मागे खपणारी स्त्रियांची (आज्या, काकवा, ताया) अशी फौज असायची. आजच्या काळात हे शक्य आहे का? कोथरूडमध्ये समजा आज्या काकवा वगैरे आणि त्यांचे आजोबे काके मावतील एवढं घर घ्यायचं असेल तर त्याची किंमत काय असेल? स्त्रीने अर्थार्जन केलं आणि मुलांचा सांभाळ स्त्री पुरुष दोघांनीही केला तर अधिक उन्नत आयुष्य जगता येणार नाही का?

समाजातल्या सगळ्याच घटकांचे उत्पन्न वाढले तर देशाची प्रगती वाढणार नाही का? तशा संधी निर्माण करून देणं हे खरंतर सरकारचं काम आहे. मध्यंतरी कुठेतरी लेख वाचला होता. त्यात चीन भारतापेक्षा अधिक पुढे का गेला यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की त्यांनी भरपूर उत्पादन करणाऱ्या व्यवस्था तर वाढवल्याच. पण त्यांच्या प्रत्येक कारखान्यात जवळपास ५०% स्त्रिया काम करतात. तिथे स्त्री पुरुष समानता अगदी शॉप फ्लोअर पर्यंत पोहोचली आहे. आपल्याकडे असं आहे का?

पुराणातल्या पुराव्यांनी वर्तमानात काय फरक पडणार आहे? तुम्ही सांगता ते खरं असेलही. पण ते तेव्हाही रोजच्या जीवनाचं सत्य नव्हतं आणि आताही नाही. जातीभेद समुद्र ओलांडून अमेरिकेतही पोहोचला आहे. हे आपलं वर्तमान आहे.

'न'वी बाजू Mon, 01/12/2025 - 01:09

In reply to by सई केसकर

तुमचे बाकी बरेचसे मुद्दे योग्य आहेत, परंतु…

‘शूद्र’ वायला, अन् ‘क्षुद्र’ वायला. तुमच्यासारख्या झंटलमन लेड्यान्ला एवढी शिंपल गोष्ट ठाऊक नाही?

(‘वैश्य’ आणि ‘वेश्या’ या दोन शब्दांमध्ये जितपत परस्परसंबंध आहे, साधारणपणे तितकाच (किंवा, त्याहूनही कमी) परस्परसंबंध ‘शूद्र’ आणि ‘क्षुद्र’ या दोन शब्दांमध्ये आहे. (पक्षी: अजिबात नाही. किंवा, कदाचित, त्याहूनही कमी.))

(उच्चवर्णीयांनी शूद्रांना परंपरेने क्षुद्र लेखून हीनतेची वागणूक दिली, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती न नाकारतासुद्धा, या दोन शब्दांमधील ध्वनिसाधर्म्य हा निव्वळ योगायोग आहे, एवढेच निदर्शनास आणून देऊ इच्छितो.)

(नाही म्हणजे, तुमच्या एरवी बऱ्यापैकी coherent प्रतिसादास हा न-मुद्दा गालबोट लावीत होता, म्हणून हा खटाटोप, इतकेच. बाकी काही नाही.)

असो चालायचेच.


बाकी,

ठीक आहे..आपण सुसंबद्ध चर्चा करू.

गरज काय होती? फुकट या प्रचारात्मक लेखाला legitimacy दिलीत.

अगोदर चालला होता, तो प्रकार अत्यंत सुयोग्य असा होता. त्यातून, हा लेख तितक्याच (आणि, दुर्लक्ष करण्याच्या) लायकीचा आहे, हा संदेश अतिशय व्यवस्थितपणे जात होता. उगाच या लेखाला (आणि, कदाचित, या लेखकालासुद्धा, झालेच तर, (असल्यास) या लेखकाच्या बाह्य हँडलरांना) याहून अधिक भाव देण्याची काहीही गरज नव्हती.

परंतु, लेखकाने bait दिले, आणि तुम्ही (आणि चिंतातुर जंतूंनी) ते (आतुरतेने) घेतलेत! याबद्दल तुमचा (आणि चिंतातुर जंतूंचा) करावा तितका निषेध थोडा आहे. (लेखकाचा निषेध मी करणार नाही, कारण लेखकाकडून याहून काहीही वेगळे मला अपेक्षित नाही.) चालायचेच.

(असो. आता तुम्ही आणि चिंतातुर जंतूंनी bait स्वीकारून लेखकाला (फुकटचा) भाव दिलेलाच आहे, तर मीही यथावकाश माझे हात धुवूनच घेईन, म्हणतो. Hang on.)

anant_yaatree Mon, 01/12/2025 - 05:58

In reply to by 'न'वी बाजू

.. सही पकड्या

शूद्र/क्षुद्र, वैश्य/वेश्या , कोश/कोष, साक्षेप/सापेक्ष....... लै लफड्याची कामं

सई केसकर Mon, 01/12/2025 - 06:21

In reply to by 'न'वी बाजू

>>तुमच्यासारख्या झंटलमन लेड्यान्ला एवढी शिंपल गोष्ट ठाऊक नाही?
:D
काही शब्दांच्या बाबतीत नेहमी गोंधळ होतो त्यातला हा एक. चेक वठवणे की वटवणे हा दुसरा. वादातीत शब्द कसा वापरायचा ते माझ्या कधीच नीट लक्षात येत नाही. मी तो हमखास चुकीचा वापरते.
अजूनही बरेच आहेत. लेख लिहिताना काळजीपूर्वक लिहिल्यानं आणि संपादन करून घेतल्यानं माझं अज्ञान सहसा उघड होत नाही.

>>परंतु, लेखकाने bait दिले, आणि तुम्ही ते घेतलेत!

वेल, एक तरी प्रतिसाद असा द्यावा. आपले कुठे मतभेद आहेत हे समोरच्याला समजलं तर कदाचित त्यांचं आणि कधीकधी आपलं मतपरिवर्तन होऊ शकेल या शक्यतेला जागा ठेवावी. फेसबुकसारख्या माध्यमांमध्ये ती आता राहिलेलीच नाही. लोक केवळ "आता याचीं कशी सगळ्यांसमोर अक्कल काढतो" याच हेतूने एकमेकांना उत्तरं देत असतात नाहीतर आपापल्या सायलोमध्ये बसून एकमेकांचं वारेमाप कौतुक करत असतात.
अर्थात मतपरिवर्तन वगैरे अगदीच अशक्य आहे हे मलाही माहिती आहे. पण एक प्रयत्न.

तिरशिंगराव Mon, 01/12/2025 - 07:38

In reply to by 'न'वी बाजू

Bait वरुन आठवलं. ' विच्छा माझी' या लोकनाट्यात दादा कोंडक्यांनी खुळ्या कोतवालासमोर मैनावतीचा गळ टाकलेला असतो. त्या गळाला कधीतरी कोतवाल लागेल याची ते वाट पहातात. त्यांचा शिपाई त्यांना ऐकवतो, " अवो, मासा बसेल गळाबरोबर खेळत, आन तुमी बसाल दोरी धरुन काठावर ! "
इथले मासेही तसेच तरबेज वाटतात.

विवेक पटाईत Thu, 04/12/2025 - 09:25

In reply to by सई केसकर

दुर्भाग्य तुमचा प्रतिसाद ही ब्रिटिश सर्वे ला धरून नाही. लेख पुन्हा वाचा. या लेखाचा सार आहे गुरुकुल बंद झाल्यानंतर बंगालमध्ये जिथे शूद्र 75 टक्के शिक्षित होते ते 1901 पर्यंत पाच टक्के शिक्षित राहिले. अर्थात ब्रिटिशांनी भारतीयांना आणि विशेष करून शूद्रांना शिक्षणापासून वंचित केले.

चिंतातुर जंतू Sun, 30/11/2025 - 10:58

शूद्र-दलित बहुसंख्य (७५-८०%) होते. गुरुकुलांत ७२ शिल्पकला (लोहारकी, विणकरकी, सुतारकी, कुंभारकी, रंगकाम, चित्रकला, वास्तुशास्त्र, धातुकाम, हस्तिदंतकाम, रत्नकाम, वाद्यनिर्मिती, कृषी यंत्रे, जहाजबांधणी इ.) शिकवल्या जात होत्या, ज्यामुळे गावागावांत स्वावलंबी अर्थव्यवस्था होती.

शूद्र-दलित एकत्र करणे हीच लेखकाची खरी चलाखी आहे. जर केवळ दलित (अस्पृश्य) पाहिले तर त्यांचे प्रमाण किती कमी होते हे हीच आकडेवारी दाखवेल. परंपरेने लोहार-सुतारकाम वगैरे करणारे लोक हे मैला उपसणाऱ्या किंवा कसाई लोकांच्या तुलनेत आजही कुठे असतात हे आपले आपण तपासावे. 

असे लोक गुरुकुलांत आपापल्या जातिनिहाय व्यवसायांचे शिक्षण घेत असत म्हणजे सर्वांना सर्व शिक्षण इच्छेनुसार घेता येत होते असा निष्कर्ष कुणी काढायला गेला तर तो त्याच्या बुद्धीचा प्रश्न झाला. 

असो चालायचेच.

'न'वी बाजू Mon, 01/12/2025 - 07:21

In reply to by चिंतातुर जंतू

असे लोक गुरुकुलांत आपापल्या जातिनिहाय व्यवसायांचे शिक्षण घेत असत म्हणजे सर्वांना सर्व शिक्षण इच्छेनुसार घेता येत होते असा निष्कर्ष कुणी काढायला गेला तर तो त्याच्या बुद्धीचा प्रश्न झाला. 

किंवा, अजेंड्याचा.

असो चालायचेच.


(अवांतर: बुद्धीचा प्रश्न एक वेळ परवडला. कारण त्यात काही निरागसतेचा अंश असण्याची किंचित का होईना, परंतु शक्यता असते. असो बापडी!)

चिमणराव Sun, 30/11/2025 - 12:23

वैचारिक सामाजिक संशोधन करणारा लेख.
समाजात शूद्रांना स्थान नव्हते ही खरी परिस्थिती पण पौराणिक दाखले मात्र शोधून दाखवलेत. ( विरुद्ध होते तिकडे दुर्लक्ष केलेत.)
आता काय करायचं?

विवेक पटाईत Sun, 30/11/2025 - 16:29

In reply to by चिमणराव

He सर्वे ब्रिटिश सरकारचे आहेत. तक्ते the beautiful tree हे पुस्तक डाउन लोड करून पाहू शकतात. वर्धमान जिल्ह्यात ६ शिक्षक चांडाळ जातीचे होते. तर मलबार जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेणारे ७० टक्के शूद्र होते.

अबापट Mon, 01/12/2025 - 09:01

पटाईत काका हिंदू विरोधी असावेत.
वस्तुस्थिती अशी आहे की ब्रिटिश आणि मुघल पूर्व भारतात फक्त आर्यहिंदूब्राह्मण अस्तित्वात होते. दलित नावाचे काही अस्तित्वातच नव्हते.
हिंदू धर्माची बदनामी करण्यासाठी सारखे दलित दलित लिहितात पटाईत. हे पटाईत नावाचे गृहस्थ नक्कीच फुरोगामी आणि librandu असावेत.
त्यांचा निषेध

बाय द वे, रामकृष्ण यादव नावाच्या एका धंदेवाईक माणसाच्या आश्रमात तयार केलेले पवित्र तूप काल पुन्हा एकदा quality नॉर्म्स मध्ये नापास झाले अशी बातमी काल वाचली काल. अर्थातच ती. खोटी असणार ने नक्की.

मनीषा Mon, 01/12/2025 - 09:42

यातील सर्व विदा तुम्ही आंतरजालावरून प्राप्तं केला आहे का?
तुमचे संस्कृत ज्ञान सुद्धा उच्च आहे .. भरपूर श्लोक अर्थासह दिले आहेत त्यामूळे लेख वाचायला चांगले वाटते आहे.

प्राचीन काळात जातीसंकर चालत असे हे खरे. वेद व्यास यांची माता कोळी जातीची असली तरी पिता ब्राम्हण ऋषी होते. प्रथेनुसार पुत्राला पित्याची जाती प्राप्तं झाली असणार. विश्वामित्र जन्माने शूद्र नव्हे तर क्षत्रीय होते असे वाचल्याचे स्मरते. तपश्चर्या करून त्यांनी महर्षीपद प्राप्तं केले होते. वाल्मिकी ॠषी हे कोळी (आणि वाटमारी करणारे ) होते आणि रामनामाचा जप केल्याने शुद्ध झाले अशी कथा वाचली आहे .. हे एक कोडेच आहे. वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केली त्यावेळेस महागणपतीने लेखनिकाची भूमिका निभावली होती अशीही कथा आहे.

शूद्र, विद्या प्राप्तं झाल्याने ब्राम्हण होतो असे लिहिले आहे ... म्हणजे ब्राम्हणाचा दर्जा शूद्रांपेक्षा उच्च्च होता असा अर्थ होतो ना? म्हणजे समानता नाहीच. त्याचाच अर्थ असा होउ शकेल की विद्याध्ययन न केल्यास शूद्रगती प्राप्तं होईल.
आजकाल मुलांना सांगतात ना, की आभ्यास केलास तर साहेब होशील नाहीतर खर्डेघाशी आहेच .. तसेच काही असेल का?

लंकेचा राजा रावणाचे पिता देखिल ब्राम्हण ॠषी आणि आई दैत्यकुळातील होती आणि. आपण ज्यांना पंचकन्या म्हणून पूजतो त्यातील आहिल्या हीच एकमेव ॠषी पत्नी म्हणजे ब्राम्हण आहे. द्रौपदी राजकन्या, क्षत्रीय (पण यज्ञातून उत्पन्न झालेली .. म्हणजे कोण समजायची?) सीता जमिन नांगरताना मातीखाली पुरलेल्या एका पेटीमधे सापडली, पण राजाला सापडली म्हणून राजकन्या, तारा ही (बहुतेक) वाली आणि सुग्रीव दोघांचीही पत्नी आणि मंदोदरी ही दैत्यराज रावणाची पत्नी पण तिची माता अप्सरा होती असा उल्लेख आहे. याचाच अर्थ वडिल/पिता (ते जन्मदाते असोत किंवा दत्तक घेणारे ) ज्या जातीचे असतील ती जात त्यांच्या आपत्यास प्राप्तं होत असावी. पूर्वीचा एक प्रघात वाचलेला आठवतो - पुरूषांना निम्नं जातीच्या स्त्रीबरोबर विवाह करणे मान्यं होते. विवाहापश्चात ती स्त्री पतीच्या जातीची गणली जात असे, परंतु स्त्रिया निम्नं जातीच्या घराण्यामधे विवाह करीत नसत कारण तसे केल्याने तिला तिच्या उच्चं जातीचा त्याग करावा लागत असे, तिला आणि तिच्या संततीला नीच जाती स्वीकारावी लागत असे.

वेदांमधे श्लोक आहे की विद्या प्राप्तं केलेला शूद्रं ब्राम्हण होतो (तुम्हीच ते लिहिलेले आहे, मी काही वेद वाचलेले नाहीत) म्हणून तुम्ही असा निष्कर्ष काढला आहे का की शूद्रांना विद्द्याध्ययनाचे अधिकार होते? पण तसे सरसकट नसावे आणि तुम्ही लिहीली तितकी मोठ्या संख्येने गुरूकुले अस्तित्वात होती का? कारण प्राचिन काळी सामाजव्यवस्थाच अशी होती की सरसकट सर्वजण शिक्षण (लेखन वाचन इत्यादी) घेत नसत. प्रत्येकाचा पिढीजात व्यवसाय असे आणि तेच शिक्षण त्यांना मिळत असे, जसे चांभाराचा मुलगा पादत्राणे तयार करणार, दुरुस्त करणार, तो गुरूकुलामधे जाऊन वेद का वाचेल?

-- तुम्ही ७२ कला की कौशल्ये असे काही लिहिले आहे .. ते काय आहे? मी १४ विद्या आणि ६४ कला आहेत असे वाचले आहे.

स्त्रिया विद्याध्ययन करीत नसत हे सत्य आहेत.. काही स्त्रिया उदा. गार्गी, मैत्रेयी किंवा काही ऋषीपत्नी या विद्वान होत्या पण त्या अपवाद आहेत असे मला वाटते आणि अपवादाने नियमच सिद्ध होतो. विद्वान स्त्रियांची उदाहरणे इतकी नगण्य आहेत , अगदी सर्वसामान्यच नव्हे तर राजघराण्यातील स्त्रियांनी देखिल विद्या प्राप्तं केल्याचे उल्लेख नाहीत. कैकई युद्धसमयी दशरथ राजाच्या रथाचे सारथ्य करीत होती अशी कथा आहे. पण ते एकमेव उदाहरण आहे .. त्यावरून परिस्थिती लक्षात यावी.

ब्रिटीशांच्या काळातील रमाबाई रानडे यांचे उदाहरण माहिती असेल. त्यांचे वडिल आणि ज्येष्ठ बंधु संस्कृत पंडित होते. त्यांनी रमाबाईंना शिक्षण दिले होते. परंतु एका स्त्रीला देवभाषा शिकवली म्हणून त्यांना समाजाचा रोष पत्करावा लागला होता. पतीनिधनानंतर रमाबाईंनी केशवपन केले नाही आणि त्या संस्कृत भाषेत प्रवचने करीत असत म्हणून त्यांच्यावर बहिष्कार घातला गेला, इतका छळ केला की त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. हा सत्य इतिहास आहे .. पुण्यातील स्.प. महाविद्यालयामधे लेडी रमाबाई हॉल आहे.

माझ्या अल्पज्ञानाच्या आधारावर मी लिहिले आहे. तुमच्यासारखा वेद आणि इतर संस्कृत ग्रंथांचा व्यासंग नाही माझा.

'न'वी बाजू Mon, 01/12/2025 - 12:48

In reply to by मनीषा

ब्रिटीशांच्या काळातील रमाबाई रानडे यांचे उदाहरण माहिती असेल. त्यांचे वडिल आणि ज्येष्ठ बंधु संस्कृत पंडित होते. त्यांनी रमाबाईंना शिक्षण दिले होते. परंतु एका स्त्रीला देवभाषा शिकवली म्हणून त्यांना समाजाचा रोष पत्करावा लागला होता. पतीनिधनानंतर रमाबाईंनी केशवपन केले नाही आणि त्या संस्कृत भाषेत प्रवचने करीत असत म्हणून त्यांच्यावर बहिष्कार घातला गेला, इतका छळ केला की त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिच्श्न धर्म स्वीकारला. हा सत्य इतिहास आहे .. पुण्यातील स्.प. महाविद्यालयामधे लेडी रमाबाई हॉल आहे.

त्या रमाबाई रानडे नव्हेत. रमाबाई रानडे या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी. तुम्ही या ज्या म्हणताय त्या पंडिता रमाबाई. (त्यांचे आडनाव बहुधा डोंगरे की कायसेसे होते. (चूभूद्याघ्या.)) त्या वेगळ्या.

असो.

मनीषा Mon, 01/12/2025 - 13:31

In reply to by 'न'वी बाजू

या पंडिता रमाबाई - आधी डोंगरे आणि विवाहापश्चात मेध्वी का मेधावी
त्यांची माहिती वाचताना कळले आनंदीबाई जोशी त्यांच्या नातेवाईक आहेत म्हणे.. त्यांचीही कथा अशीच संघर्षाची आहे.

धन्यवाद!

सई केसकर Tue, 02/12/2025 - 06:09

In reply to by मनीषा

>>>पूर्वीचा एक प्रघात वाचलेला आठवतो - पुरूषांना निम्नं जातीच्या स्त्रीबरोबर विवाह करणे मान्यं होते. विवाहापश्चात ती स्त्री पतीच्या जातीची गणली जात असे, परंतु स्त्रिया निम्नं जातीच्या घराण्यामधे विवाह करीत नसत कारण तसे केल्याने तिला तिच्या उच्चं जातीचा त्याग करावा लागत असे, तिला आणि तिच्या संततीला नीच जाती स्वीकारावी लागत असे

पहिल्या प्रकारच्या विवाहाला अनुलोम विवाह म्हणतात आणि दुसऱ्या प्रकारच्या विवाहाला प्रतिलोम.
आता कोणताही पेपर उघडून बघा. एखादी ऑनर किलिंगची बातमी असतेच. इथे तुमची वाक्य रचना थोडी सुधारते. स्त्रीने तथाकथित खालच्या जातीच्या पुरुषाशी लग्न केले असं तुम्ही म्हणता. पण तथाकथित खालच्या जातीच्या पुरुषाने वरच्या जातीतल्या स्त्रीशी लग्न करायची हिंमत केली असा त्याचा अर्थ घेतला जातो. कारण स्त्रीला लग्न ठरवायची अजूनही विशेष एजन्सी नाही.

मला असं फार पूर्वीपासून वाटतं की ही सगळी पुरुषसत्ताक व्यवस्था पुरुषाकडे संतती तयार करायचं पूर्ण इक्विपमेंट नाही आणि आपली बायको गरोदर असेल तर ते मूल आपलंच आहे हे खात्रीने सांगता येत नाही या इनस्क्युरिटीतून जन्माला आली आहे. कारण कुणा दुसऱ्याच्याच संततीला आपली संपत्ती मिळाली तर काय? आपला केवढा मोठा अपमान! आपण किती च्यू झालो वगैरे वगैरे. पण स्त्रियांना शिकू दिलं असतं आणि त्यांनी अर्थार्जन करून संपत्ती कमवली असती तर विरजण कुणाचे का असेना? मूल बाईचेच असले असते. एकदा मूल जन्माला आले की पुरुषाची विशेष गरजही नसते. बरोबरच्या अनुभवी बायकांना घेऊन ती बाई मुलाचे चांगल्या प्रकारे संगोपन करू शकते. बाईच्या हातात सत्ता असेल तर ती कधीही आपलं मूल स्वतःकडे ठेवून आपल्याला जा म्हणू शकते या भीतीने पुरुषसत्ता तयार झाली असावी का? आणि याच भीतीतून "लहानपणी वडील, तरुणपणी नवरा आणि म्हातारपणी मुलगा. स्त्रीला स्वातंत्र्य नाही" अशा अर्थाचे श्लोक लिहिले गेले असतील का? गीतेतही सतत वर्णसंकर होईल आणि भयानक परिस्थिती उद्भवेल असे श्लोक आहेत. वास्तविक वर्णसंकर न होऊ देण्याने अधिक जीव जातात. अधिक हानी होते. हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे.
शिवाय पुरुषाने बाहेर कितीही लफडी केली तरी त्याला पास असतो. बाईचं लग्न झालं की तिचे सगळे मित्र तिच्या मुलाचे मामा होतात! Wtf! मुळात आपल्याला मित्र होते हेदेखील लपवून ठेवावं लागतं. या बाबतीत हेमामालिनी, नसीरुद्दीन शाह आणि विनोद खन्ना यांचा एक चित्रपट बघण्यासारखा आहे (रिहाई). त्यात राजस्थानातल्या सुतारांच्या आयुष्याची गोष्ट आहे. ते अनेक दिवस बाहेर जातात आणि सबंध गावात प्रत्येक घरात केवळ बायकाच उरतात. पुढे काय होतं ते फार रोचक आहे.

मारवा Sun, 07/12/2025 - 08:01

In reply to by सई केसकर

चांडाळ हा शब्द शिवी सारखा दिला जातो अरे चांडाळा वगैरे.
चांडाळ हा फार तिरस्करणीय मानला जातो. कारण फार सोपं आहे.
प्रतिलोम विवाहातील सर्वात वाईट कॉम्बिनेशन जे मानले जात असत ते शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री त्यांची जी संतती होती तिचे नाव म्हणजे त्या कॅटेगरी ला चांडाळ हे नाव होते. कारण lowest पुरुषाने highest स्त्री बरोबर विवाह केला.
प्रत्येकाची वेगळी नावे आहेत जसे सूत , आपला सूतपुत्र कर्ण क्षत्रिय आणि ब्राह्मण. तसेच शूद्र आई आणि ब्राह्मण पिता असेल तर अशा संतती चे नाव. निषाद असे नाव होते. असेच अंबष्ठ ही संतती म्हणजे वैश्य आई ब्राह्मण पिता यांची..याचप्रमाणे सर्वांची नावे शास्त्रात दिलेली आहेत आणि त्या त्या समाजांचे तसे तसे स्थान आहे उच्च किंवा नीच. रोचक बाब म्हणजे मूळ वैदिक पूर्वकालीन ग्रंथात यापैकी काहीच नाही उत्तरकालीन धर्मसूत्र स्मृती इत्यादी मध्ये हा सर्व प्रकार आलेला आहे.
असे नुसते चांडाळ म्हटल्याने त्याची तीव्रता लक्षात येत नाही त्याला दृश्य रूप देऊन बघा. एखाद सुंदर गोंडस बाळ पण चांडाळ या संबोधनाला पात्र होऊ शकते तेव्हाच त्याची तीव्रता जाणवते.

मनीषा Mon, 08/12/2025 - 08:38

In reply to by मारवा

|| शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री त्यांची जी संतती होती तिचे नाव म्हणजे त्या कॅटेगरी ला चांडाळ हे नाव होते. ||

ही नविन माहिती आहे माझ्यासाठी. स्मशानात काम करणार्‍यालासुद्धा (चिता रचणे वगैरे) चांडाळ म्हणत असत ना? राजा हरिशचंद्राच्या कथेत आहे की राजाने स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्याकरता संपूर्ण राज्य दान केले. त्या दानावर द्क्षिणा देण्यासाठी त्याची पत्नी तारा आणि पुत्र रोहीत या दोघांना एका ब्राम्हणास विकले आणि स्वतः स्मशानातील चांडाळाचे कर्म पत्करले. त्यामुळे मी समजत होते स्मशानात काम करणार्‍यांनाच चांडाळ म्हणतात.

आणि "निषाद" शब्दाबद्दल सुद्धा -- त्याचा एक अर्थ फासेपारधी असाही आहे ना? क्रौच पक्षाच्या जोडीतील एका पक्षाला पारध्याचा बाण लागला आणि तो मृत झाला. ते पाहून दु:ख आणि संतापाने वाल्मिकींनी त्या पारध्याला शाप दिला की तुला कधीही शांती मिळणार नाही.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती: समा:|
यत क्रौश्र्च्मिथुनादेकमवधी: काममोहितम् ||

भारतीय संगीत सप्तकातील सातवा सूर सुद्धा निषाद आहे.

'सुत' या शब्दाचा अर्थ काय आहे? दास का? की सारथी?

'न'वी बाजू Fri, 05/12/2025 - 18:33

In reply to by मनीषा

पुण्यातील स्.प. महाविद्यालयामधे लेडी रमाबाई हॉल आहे.

या लेडी रमाबाई बोले तो रमाबाई रानडेही नव्हेत, नि (ख्रिस्ती झालेल्या) पंडिता रमाबाईही नव्हेत. या तिसऱ्याच रमाबाई होत.

  • स. प. महाविद्यालय बोले तो रशुरामभाऊ महाविद्यालय. मूळचे नाव न्यू पूना कॉलेज.
  • सर परशुरामभाऊ पटवर्धन बोले तो जमखंडीचे (तेव्हा (आणि, अर्थात, आताही) दिवंगत) चीफसाहेब (यानी कि संस्थानिक). त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या चिरंजीवांनी देणगी दिल्यामुळे न्यू पूना कॉलेजचे नामकरण स. प. महाविद्यालय असे करण्यात आले. (संदर्भ: (फोटो क्र. ३; फोटोवर टिचकी मारल्यास अधिक माहिती मिळावी.), .)
  • लेडी रमाबाई पटवर्धन बोले तो जमखंडीच्या राणीसरकार. (याबद्दल अधिक पुढील बंदूकगोळीबिंदूत.) त्यांनी हॉलच्या बांधणीकरिता देणगी दिली, म्हणून त्या हॉलचे नामकरण लेडी रमाबाई हॉल असे करण्यात आले. (वरील संदर्भ क्र. १ येथील फोटो क्र. ४वर टिचकी मारून पाहावे.)
  • लेडी रमाबाई या जमखंडीच्या राणीसरकार, बोले तो, उपरोल्लेखित सर परशुरामभाऊंच्या द्वितीय पत्नी. योगायोगाने म्हणावे, की कसे (पक्षी: नामअभियांत्रिकी, वगैरे?), ते समजत नाही, परंतु, सर परशुरामभाऊंच्या प्रथम पत्नीचे नावसुद्धा रमाबाईच होते. त्या (बोले तो, प्रथम पत्नी रमाबाई) बऱ्याच अगोदर निवर्तल्या. (संदर्भ: . पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथम पत्नी रमाबाईंचे वारसदार आणि या द्वितीय पत्नी उर्फ लेडी रमाबाई यांच्यात काही मालमत्तेवरून कोर्टात बऱ्याच हाणामाऱ्या झालेल्या दिसतात, त्यासंबंधीच्या जालावर उपलब्ध असलेल्या कागदपत्रांतून ही माहिती मिळाली.)

तर सांगण्याचा मतलब, तुमच्या प्रतिसादातल्या तीन रमाबाया (पक्षी: मिसेस रानडे, ख्रिस्ती पंडिता, आणि हॉलवाल्या) या तीन पूर्णपणे वेगळ्या, तीन स्वतंत्र रमाबाया होत. शिवाय, तुमच्या प्रतिसादात उल्लेख नाही, परंतु, दिवंगत चीफसाहेबांच्या प्रथमपत्नी रमाबाई, झालेच तर थोरल्या माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई, यादेखील (तुमच्या प्रतिसादातील तीन रमाबायांहून, नि एकमेकींहूनसुद्धा) वेगळ्या, स्वतंत्र अशा आणखी दोन रमाबाया होत. तुमच्या प्रतिसादात याही दोन रमाबायांची येनकेनप्रकारेण जर सांगड असती, तर अधिक बहार येती. किंबहुना, या शेवटच्या दोन रमाबायांची तुमच्या प्रतिसादातील अनुपस्थिती तीव्रतेने खटकली. (त्याबद्दल तुमचा निषेध!)

असो चालायचेच.

मनीषा Fri, 05/12/2025 - 20:49

In reply to by 'न'वी बाजू

उत्खनन करून माहिती शोधली आणि इथे दिलीत याबद्दल धन्यवाद!
माझा आजवर (गैर) समज होता ..
(पण मी इतकच लिहिले की स्.प. मधे लेडी रमाबाई हॉल आहे.. संशयाचा फायदा मला मिळायला पाहिजे.)

लेडी रमाबाईंच्या पतीदेवांनी सरकी स्वीकारली त्यामुळे त्या लेडी झाल्या असाव्यात .. त्यांच्याबद्दल काय लिहिणार?

पण रमाबाई पेशवे यांच्याबद्दल सांगता येईल ..
त्यांनी तरूण वयातच पती माधवराव पेशवे यांच्यासह परलोकी सहगमन केले ... त्या सती गेल्या.
पेशवे (भट) कुटुंब राज्यातील सामर्थ्यवान आणि धनवान कुटूंब होते. त्यांच्या इशार्‍यावर महाराष्ट्रातील राजकारण चालत होते. त्या कुटूंबातील एका स्त्रीला जी निपुत्रिक आहे, पतिनिधनानंतर मरण हवेसे वाटले हे विशेष. स्त्रियांचे समाजातील स्थान, त्यांचे अधिकार वगैरेंवर चर्चा करताना अशी उदाहरणे जरूर स्मरणात असू द्यावी.

रमाबाई रानडे या सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी कार्य केले आहे .. हुजुरपागा आणि सेवासदन
पंडिता रमाबाई आणि रमाबई रानडे या दोघींनी एकत्र इम्ग्लिश विषयाचे शिक्षण घेतले होते .. हा त्या दोघींमधला समान दुवा (मी सुद्धा माहिती शोधली )

तशा शोधल्या तर अनेक रमा आहे .. भगवान विष्णूंची पत्नी रमा म्हणजे लक्ष्मी ... या देवींचे अनेक प्रसिद्ध भक्तं आहेत.

पंडिता रमाबई यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर "मुक्ती मिशन" स्थापन केले आणि स्त्री शिक्षण आणि अनाथ स्त्रियांकरता कार्य केले हे मला गौरवास्पद वाटते. उच्चवर्णीय असूनही समाजाकडून स्वतः कटु अनुभव घेतल्यानंतर, त्यातून सावरून सामाजिक कार्य केले हे विशेष.

आनंदीबाई जोशी यांनी परदेशामधे जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले .. त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांचे वय ९-१० वर्षे इतकेच होते ... त्या काळी बालविवाहाची प्रथा होती परंतु पती गोपाळराव जवळपास तीशीचे होते. प्रथम पत्नीचे निधन झाल्याने द्वितीय विवाह केला होता. विधवाविवाह मान्य नसल्याने सत्तरीच्या वृद्धाला विवाह करायचा असला तरी वधु आठ नऊ वर्षाचीच असे. गोपाळरावांनी पत्नीला शिक्षण देण्यास सुरूवात केली तर अवहेलना, कुचेष्टा, तिरस्कार सहन करवा लागला होता.

अशी परिस्थिती उच्च्वर्णीय स्त्रियांची. खालच्या जातीच्या स्त्रिया निदान मोलमजुरी करून अर्थार्जन करू शकत असत.

'न'वी बाजू Sat, 06/12/2025 - 07:32

In reply to by मनीषा

रमाबाई आंबेडकरांना (बाबासाहेबांची प्रथम पत्नी) आपण सगळेच विसरलो. (चालायचेच.)


पेशवे (भट) कुटुंब राज्यातील सामर्थ्यवान आणि धनवान कुटूंब होते. त्यांच्या इशार्‍यावर महाराष्ट्रातील राजकारण चालत होते. त्या कुटूंबातील एका स्त्रीला जी निपुत्रिक आहे, पतिनिधनानंतर मरण हवेसे वाटले हे विशेष. स्त्रियांचे समाजातील स्थान, त्यांचे अधिकार वगैरेंवर चर्चा करताना अशी उदाहरणे जरूर स्मरणात असू द्यावी.

पेशवे कुटुंब राज्यात जरी सर्वात सामर्थ्यवान असले, तरी (विशेषेकरून माधवरावांच्या मृत्यूनंतर) त्यात गृहकलह, कौटुंबिक राजकारण वगैरे भानगडी बोकाळू लागल्या नव्हत्या काय? त्यात निपुत्रिक म्हटल्यावर त्याही बाजूने आधार नाही. (‘आधार’ अशासाठी की त्यात निदान मुलाला गादीवर बसवून मग Regent म्हणून सत्ता स्वतःच्या हातात/ताब्यात ठेवण्याची सोय असते. तीही नाही, म्हटल्यावर माधवरावांच्या पश्चात रमाबाईंना कोण कुत्रे विचारीत होते? अशा वेळी कावळे टपूनच बसलेले असतात! (कुत्र्यांची आणि कावळ्यांची बदनामी थांबवा!!!!!!) आणि, ‘आपल्या परंपरां’मध्ये, ‘आपल्या शास्त्रां’मध्ये garbage disposalची इतकी सुंदर, सुबक, कार्यक्षम सोय करून दिलेली आहे, म्हटल्यावर… जला दो!)

मरण हवेसे वाटले, की नाही म्हणायची सोय नव्हती, कोण पाहायला गेलेय! बाई जाते जिवानिशी, बघणारे म्हणतात मरण हवेसे वाटले! बोला साध्वी सती माता की जय! वाजवा रे वाजवा! लोक आपले उत्सवप्रिय असतात. कशाचाही उत्सव करतील! चालायचेच.

'न'वी बाजू Sat, 06/12/2025 - 19:50

In reply to by 'न'वी बाजू

बाकी, सतीप्रथा हा प्रस्तुत लेखाचा विषय नाही, याबद्दल कल्पना आहे. परंतु, यदाकदाचित पुढेमागे पटाईतकाकांनी या विषयावर लिहायचे मनावर घेतलेच, तर तो लेख बहुधा साधारणपणे पुढील धर्तीवर असेल. (असा आपला माझा अंदाज. चूभूद्याघ्या.)

  • ‘मुघल आक्रांता’ येण्यापूर्वी हिंदू समाजात किंवा भारतवर्षात सती किंवा त्याच्या जवळपाससुद्धा जाणारी कोठलीही प्रथा (किंवा संकल्पनासुद्धा) अस्तित्वात नव्हतीच.
  • ‘आपल्या प्राचीन ग्रंथां’त पुढे मोठ्या प्रमाणावर भेसळ झालेली आहे, आणि त्यामुळेच, उदाहरणादाखल, महाभारतात माद्री सती गेल्याचे वगैरे दाखले आढळतात. हे असले भेसळयुक्त दाखले एआयच्या सहाय्याने शोधून काढणे सहज शक्य आहे, आणि तसे ते शोधून काढून, प्रस्तुत ग्रंथांतून काढून टाकले पाहिजेत.
  • हिंदूंमध्ये सतीप्रथा ही ‘मुघल आक्रांता’, ब्रिटिश राज्यकर्ते, आणि राजा राममोहन रॉय या तिघांनी मिळून संगनमताने घुसडली. पैकी, ‘मुघल आक्रांता’ मंडळींपैकी अकबर याने ही प्रथा हिंदूंमध्ये सुरू करण्याचा सर्वप्रथम प्रस्ताव मांडला, ब्रिटिशधार्जिणा राजा राममोहन रॉय याने त्या प्रस्तावास अनुमोदन दिले, ब्रिटिश राज्यकर्त्यांपैकी लॉर्ड बेंटिंक याने कायदा करून ही प्रथा अधिकृत केली, तर लॉर्ड मेकाले याने ‘ही प्रथा हिंदूंमध्ये खूप अगोदरपासून होती’ असे पाठ्यपुस्तकांतून घुसडून दिले.
  • हाच खरा भारताचा ‘उज्ज्वल’ इतिहास आहे. याच्या विपरीत असे जर काही तुम्ही ऐकले वा वाचले असेल वा मानीत असाल, तर तो नेहरूंच्या काँग्रेसचा कांगावा आहे.

असो चालायचेच.


या अशा (तथाकथित) घुसडलेल्या कंटेंटकरिता ‘प्रक्षिप्त’ की कायसासा एक शब्द वापरण्याची पद्धत विद्वानांत असल्याबद्दल ऐकून आहे. परंतु, पटाईतकाकांना तो शब्द बहुधा ठाऊक नसावा.१अ त्यामुळे, तो शब्द ते वापरणार नाहीत, आणि त्याऐवजी ‘भेसळ’ म्हणत राहतील.

१अ यावरून, पटाईतकाका हे विद्वान नाहीत, असा निष्कर्ष मात्र कोणी काढू नये.१अ१ प्रत्येक विद्वानाला प्रत्येक गोष्ट ठाऊक असलीच पाहिजे, असे काही ‘आपल्या शास्त्रां’त वगैरे कोठेही लिहून ठेवलेले नाही.१अ२

१अ१ त्यांना आपण ‘सरकारी विद्वान’ म्हणून संबोधू शकतो, फार फार तर.

१अ२ उलटपक्षी, केवळ ‘प्रक्षिप्त’ हा शब्द ठाऊक आहे, म्हणून ‘न’वी बाजूंची गणना विद्वानांत होऊ नये. Merely knowing the ‘प्रक्षिप्त’ word doth not a विद्वान make. पण लक्षात कोण घेतो?

हिंदू बाई, विशेषेकरून (मृत) नवऱ्याच्या चितेवर जळताना प्रचंड उज्ज्वल दिसते, असे ऐकून आहे. (डिस्क्लेमर: सांगोवांगीची माहिती. विदा नव्हे. प्रत्यक्ष अनुभव नाही.) त्यामुळे, यास भारताचा ‘उज्ज्वल इतिहास’ म्हणून संबोधण्यास प्रत्यवाय नसावा. (चूभूद्याघ्या.)

'न'वी बाजू Sat, 06/12/2025 - 20:08

In reply to by anant_yaatree

तुमच्या प्रश्नात अनेक unsavory शक्यता गर्भित असल्याकारणाने, तूर्तास सोडून देऊ.

(बाकी, साधर्म्याबद्दलच म्हणाल, तर ते ‘काँग्रेस’ आणि ‘कांगावा’ या दोन शब्दांतदेखील आहे. मात्र, आम्ही त्यास निव्वळ योगायोग मानतो. चालायचेच.)

मारवा Sun, 07/12/2025 - 08:25

In reply to by 'न'वी बाजू

एकूण समजा 1 करोड स्त्रिया सती गेल्या.
त्यातील समजा 1 स्त्री
सत्य प्रेमाने जर सती गेली म्हणजे उत्कटतेने की हा विरह अशक्य आहे अशा अर्थाने
तर अशा अपवाद घटनेस कु परंपरे शी कसे विलग करावे.
हा सती या कु परंपरे संदर्भात नाही सर्वच कु परंपरांशी डील करताना हा अडचणीचा मुद्दा नेहमी उपस्थित होतो.
मला नेहमी हा प्रश्न पडतो.
की असे कधी होणे शक्यच नाही की हा कल्पनाविलास आहे.

'न'वी बाजू Sun, 07/12/2025 - 21:25

In reply to by मारवा

एकूण समजा 1 करोड स्त्रिया सती गेल्या.
त्यातील समजा 1 स्त्री
सत्य प्रेमाने जर सती गेली

उलटतपासणी (सैतानाच्याही सैतानाच्या वकिलाच्या भूमिकेतून):

या पृथ्वीतलावर पुरुषांची लोकसंख्या किती आहे?

पैकी, आजवरच्या इतिहासात किती पुरुष सत्य प्रेमाने सती गेलेत? (म्हणजे उत्कटतेने की हा विरह अशक्य आहे अशा अर्थाने?)

(पैकी अनेक पुरुष हे बहुविवाहितही असू शकतील. प्रत्येक पत्नीच्या मरणाच्या वेळेस ते सती कसे जाऊ शकतील, हा प्रश्न तूर्तास बाजूस ठेवू.)

काय सांगता? मुळात पत्नी मेल्यावर पुरुषाने सती जाण्याची प्रथाच नाही? बिंगो!

(नसेना का प्रथा! आजवर एकाही पुरुषास उत्कटतेने, असह्य विरहापोटी, नवा पायंडा पाडण्याची, नवी प्रथा सुरू करण्याची कल्पनासुद्धा मनात येऊ नये?)

म्हणजे, तुमची ती कोटीतली एक जी केस आहे, तीसुद्धा ‘सत्य प्रेमा’ची केस आहे, की सोशल कंडिशनिंगची? (मुळात नवरा मेल्यावर त्याच्या चितेवर स्वतःला जाळून घेता येते, ही कल्पना त्या बाईच्या डोक्यात कोणी भरविली?)

(दिली ढकलून (किंवा, गेला बाजार, दिले प्रवृत्त करून), झाले, नि मग दिली आवई उठवून, की कित्ती कित्ती थोर बाई ती! नवऱ्यावरच्या उत्कट प्रेमापायी नवऱ्याच्या चितेवर स्वतःस जाळून घेतलेनीत्, म्हणून.)

(याचा आणखी एक पैलू म्हणजे, आजवरच्या इतिहासात एकाही पुरुषाने मेलेल्या बायकोच्या चितेवर स्वतःला जाळून घेतले नाही, याचा अर्थ, पुरुष हे बायकोवर उत्कट प्रेम करण्यास एकजात अक्षम असतात, असा घ्यावा काय? मेलेल्या बायकोच्या नावे ताजमहाल बांधतील, परंतु त्या ताजमहालाच्या खालती स्वतःस जिवंतपणी गाडून घेणार नाहीत. Monument of Love, म्हणे! डोंबलाचे प्रेमाचे शिल्प! प्रेमाचे शिल्प, की (एकदाची) सुटका जगजाहीरपणे साजरी करण्याचे? असो. (तुम्ही काही म्हणा, मारवाशेठ, सर्व धर्मांचे पुरुष इकडूनतिकडून सारखेच. चालायचेच.))

(यावरून थोडे अवांतर. शिवाजीमहाराजांच्या इमानदार वाघ्या कुत्र्याने म्हणे मालकाच्या चितेत उडी मारली होतीनीत्. Now, if that was not a blatant case of animal cruelty, I wouldn’t know one if I did come across one personally! समजा, वाघ्या महाराजांअगोदर जर गचकला असता, तर महाराजांनी त्याच्या चितेत उडी मारली असती काय? पण लक्षात कोण घेतो?)

मनीषा Mon, 08/12/2025 - 08:57

In reply to by मारवा

सत्य प्रेमाने जर सती गेली तरीही त्याचे समर्थन करणे चूकच .. कारण ती एकप्रकारची आत्महत्याच आहे.
मी असे वाचले आहे की एखादी स्त्री सती जात असेल तर चितेच्या सभोवताली टोकदार पाती लावलेल्या काठ्या घेउन लोक उभे असत (म्हणे). समजा मरण समोर दिसल्यावर ती घाबरली आणि तिचा विचार बदलला तर?
दु:खभरात त्याक्षणी एखाद्या स्त्रीला वाटू शकते की आता जगणे अशक्य आहे, किंवा सती जाणे किती पवित्र वगैरे आहे असे समुपदेशन कुणी केले असणे अशक्य नाही. परंतु काही काळाने त्या विचाराची तिव्रता कमी होत असणारच.

२५-३० वर्षांपूर्वी राजस्थानात रूपकॅवर सती गेली ते आठवत असेल. दूरदर्शनवर त्या घटनेचे प्रक्षेपण करत होते. १७-१८ वर्षे वय असलेली ती मुलगी. विवाहानंतर काही दिवसात पतीचे निधन झाले म्हणून सती गेली. तिला साजशृंगार केला होता, फुलांच्या माळा घातलेल्या .. तिचे आई वडिल देखिल तिला नमस्कार करीत होते कारण ती आता त्यांची "लाडली बेटी" नव्ह्ती तर सती माता होती. ते दृश्य फार विदारक असेच होते .. मला अजूनही आठवते.

अशा प्रथांचा निषेध आणि विरोधच करायला पाहिजे.

'न'वी बाजू Tue, 09/12/2025 - 21:49

In reply to by मनीषा

विवाहानंतर काही दिवसात पतीचे निधन झाले म्हणून सती गेली. तिला साजशृंगार केला होता, फुलांच्या माळा घातलेल्या ..

बोकडाला विधीवत् कापण्यापूर्वी त्याच्याही गळ्यात फुलांच्या माळा वगैरे घालतात, म्हणतात. (सांगोवांगीची कथा. विदा नव्हे. मी पाहायला गेलेलो नाही. परंतु, असे ऐकलेले आहे.)

तिचे आई वडिल देखिल तिला नमस्कार करीत होते कारण ती आता त्यांची "लाडली बेटी" नव्ह्ती तर सती माता होती.

त्यापेक्षासुद्धा, कायमची माहेरी परत आली, तर तिच्यामारी आयुष्यभर पोसत बसावे लागेल, हा (व्यावहारिक) विचार असू शकतो. त्यापेक्षा, जाळून टाका (किंवा, जाळणारे जाळताहेत, तर त्यात सामील व्हा). आणि, जाळण्यापूर्वी पब्लिकदेखत नमस्कार करा. तेवढेच श्रद्धाळूपणाचे जाहीर लेबल चिकटते. (समाजात तेवढीच प्रतिष्ठा!)

ते दृश्य फार विदारक असेच होते ..

विदारक तर खरेच. परंतु, त्यापेक्षासुद्धा, त्याचे समर्थन नि उदात्तीकरण भयंकर आहे.

असो चालायचेच. (किंवा, चलता है, हिंदुस्तान है।)

'न'वी बाजू Tue, 02/12/2025 - 02:50

शूद्रजन्म झालेलाही विद्वान होऊ शकतो, कारण विद्या सर्व विश्वात संनाद करते (सर्वांना उपलब्ध आहे).

आमच्या अमेरिकेत, निदान एकदोन पिढ्यांपूर्वीपर्यंत तरी, ‘कोणीही मोठा होऊन अध्यक्ष होऊ शकतो’ (‘Anyone can grow up to be President’) असे प्रत्येक शाळकरी मुलाच्या मनावर बिंबविले जात असे.

असली लोकप्रिय मिथके, मला वाटते, प्रत्येक समाजात असतात. त्यांचा ground realitiesशी फारसा संबंध नसतो. चालायचेच.

जन्माने सर्व शूद्र असतात म्हणजे जन्माने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य नसतो; सर्वजण सामान्य मानव म्हणून जन्म घेतात.

”We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness.”

(अमेरिकन स्वातंत्र्याच्या उद्घोषणेतून उद्धृत. भले या उद्घोषणेखाली स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी अनेकजण कृष्णवर्णीय गुलामांचे मालक होते, ही बाब अलाहिदा. झालेच तर, अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा अधिकृतरीत्या बंद होण्याकरिता प्रस्तुत उद्घोषणेनंतर जवळजवळ नव्वद वर्षे तथा एक यादवीयुद्ध उलटावे लागले, याकडेही काणाडोळा करायचा. आणि, अमेरिकेत कृष्णवर्णीयांना तथा मूलनिवासींना कायद्यासमोर समान वागणूक मिळते, असे आजही म्हणवत नाही.)

(फार कशाला, अमेरिकेने ज्या ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळविले, त्या ब्रिटिश साम्राज्यातसुद्धा गुलामगिरीची प्रथा कायद्याने अमेरिकेच्या कितीतरी वर्षे अगोदर बंद झाली. भले त्यानंतरसुद्धा अनेक दशके वसाहतींना मिळणारी वागणूक तशीच राहिली, तरीही.)

बरे, तर, देशोदेशीच्या लोकप्रिय मिथकांबद्दल काय बरे म्हणत होतो मी?


तर मग, ही सगळी क्वोटे-अनक्वोटे फेकून नक्की कोणाला गंडवू पाहात आहात, राव? पु.लं.नीच कोठेतरी म्हटल्याप्रमाणे, (नेमके शब्द नाहीत, परंतु) ही सगळी बोधवाक्ये म्हणजे केवळ इतरांनी त्यातून बोध घ्यावा, याकरिता असतात. अर्थात, त्यांना गंभीरपणे घ्यायचे नसते. आणि, त्यांना फेस व्हॅल्यूवर (आणि त्यातसुद्धा, कशाचातरी दाखला म्हणून) जर घेऊ लागलात, तर तुमच्यासारखे येडे तुम्हीच. (म्हणजे, असे पु.ल. नाही म्हणाले. मी म्हणतोय. परंतु, तरीही.)

(ते भारताचे बोधवाक्य नाही काय, ‘सत्यमेव जयते’? म्हणजे काय भारतात सर्व व्यवहार सत्याने होतात, सचोटीने होतात, असा निष्कर्ष त्यातून काढायचा काय?)

(फार कशाला, साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणून गेलेत, ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥’ म्हणून. झालेच तर, तिकडे तो येशू ख्रिस्तसुद्धा बजावून सांगून गेलाय, ‘अगली बार आऊँगा, तो, याद रखना, देख लूँगा एक एक को।’ म्हणून. आता, या वचनांना फेस व्हॅल्यूवर घेऊन या दोन विभूतींच्या परत येण्याची वाट जर पाहात बसाल, तर, जगाच्या अंतापर्यंत वाटच पाहात बसाल, महाराजा, आहात कोठे! आणि, साक्षात देवाच्या नि देवदूताच्या वचनांची जेथे ही कथा, तेथे निव्वळ मर्त्य मानवांच्या वचनांचे काय घेऊन बसलात! (त्यांना कितीसे गंभीरपणे घ्यायचे?))


बाकी, पूर्वीच्या काळात सर्रास कोणीही काहीही होऊ शकत असे, याचा दाखला म्हणून वाल्मीकिपासून ते सत्यकाम जाबालिपर्यंत नि चंद्रगुप्त मौर्यापासून ते पुष्यमित्र शुंगापर्यंत बरीच वेडीवाकडी नावे फेकलीत. ठीक आहे, त्या संदर्भात कोठलीही शंका मी उपस्थित करणार नाही. परंतु, मला एक गोष्ट सांगा. श्रीमती इंदिरा गांधी यांना आपण ‘भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान’ म्हणून आजही ओळखतो. तसे श्री. जवाहरलाल नेहरू यांना ‘भारताचे पहिले पुरुष पंतप्रधान’ म्हणून ओळखतो का? भारतात (किंवा जगात) महिला जर सर्रास पंतप्रधान होत असत्या, तर आजमितीस श्रीमती गांधी या आपल्याला (जर लक्षात राहिल्या असत्याच, तर) केवळ ‘भारताच्या एक अत्यंत कार्यक्षम आणि/किंवा अत्यंत भ्रष्ट (Take your pick!) पंतप्रधान’ म्हणून लक्षात राहिल्या नसत्या काय?

किंबहुना, श्रीमती गांधी या भारताच्या पंतप्रधान झाल्या, ही बाब अनेकदा ‘म्हणजे भारतात महिला पंतप्रधान बनू शकतात’, अशा अर्थाने (अभिमानाने) सादर केली जाते. परंतु, नीट पाहायला गेले असता, ही बाब आपल्याला अशा अर्थाने सादर करावीशी वाटते (अथवा, अशा अर्थाने सादर करायला लक्षात राहाते किंवा सुचतेसुद्धा), ही गोष्टच मुळात भारतात (किंवा जगात) महिला सर्रास पंतप्रधान बनत नाहीत, हे अधोरेखित करीत नाही काय? (फार कशाला, श्रीमती गांधींनंतर भारतात आणखी अशा किती महिला पंतप्रधान झाल्या? मला तरी एकही आठवत नाही. (आणि, ‘मला आठवत नाहीत’ याचा अर्थ ‘म्हणजे पुष्कळ झाल्या असाव्यात’ असा घेता येईल, याबाबत (निदान प्रस्तुत संदर्भात तरी) साशंक आहे.))

तीच कथा गार्गी, मैत्रेयी, आणि कंपनीच्या बाबतीत. या विदुषींच्या विद्वत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अर्थातच कोठल्याही प्रकारे इरादा नाही. परंतु, ‘पूर्वीच्या काळी स्त्रिया सर्रास शिकून पंडिता बनत असत’ या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आज इतक्या शतकांनंतर आपल्याला ही (किंवा फार फार तर हातांच्या बोटांवर मोजता येण्याइतकी आणखीही थोडी) ठराविक नावे लक्षात येतात, हे खरे तर या सर्व rarest of rare cases असण्याचे द्योतक ठरू नये काय? (त्या काळात स्त्रिया खरोखरच जर घाऊक भावात उच्चशिक्षित होत असत्या, तर आजमितीस इतक्या शतकांनंतर त्यांपैकी एकीचेही नाव कोणास कशास झक मारावयास लक्षात राहिले असते?)

म्हणजे मग, त्या काळाबद्दल नक्की कशाचा अभिमान बाळगू पाहातो आहोत आपण? ते आपले आपल्याला तरी स्पष्ट आहे का? आणि, त्याबद्दल आपण प्रामाणिक राहाणार आहोत का? निदान स्वतःशी तरी?


आणि आता, आमचे अमेरिकान्योक्त्याख्यान मूळ पदावर आणायचे म्हटले, तर, ओबामा जेव्हा अध्यक्ष म्हणून सर्वप्रथम निवडून आले, तेव्हा (माझ्यासकट) अनेकांना ‘येस्स्स्स्स्स्!’ वगैरे झाले होते. (ओबामा हा, his failures notwithstanding, अत्यंत भला मनुष्य होता, असे मी आजदेखील म्हणेन. परंतु, ते एक असो.) परंतु, हा खरे तर अमेरिकेचा ‘मोठा होऊन कोणीही अध्यक्ष बनू शकतो’-क्षण नव्हता. किंबहुना, फार फार तर त्याला केवळ अमेरिकेचा ‘आजवर तिच्यामारी कृष्णवर्णीय अध्यक्ष कधी झाला नव्हता’-क्षण, इतकेच म्हणता येईल. त्यानंतर विविध राजकीय गोटांतून येत गेलेल्या (आणि काही अंशी आजही येणाऱ्या) प्रतिक्रिया हे पुरेसे स्पष्ट करतात. अमेरिकेत वर्णभेदाचे उच्चाटन वगैरे झालेले नसून, तो आजही समाजात (आणि राजकारणात) खोलवर रुजलेला आहे, हे (म्हटले तर) उघड गुपित ओबामांच्या निवडून येण्यामुळे धडधडीत उघड्यावर आले, इतकेच.

(अतिअवांतर: श्री. बाबू जगजीवनराम यांनी कधीतरी एकदा ‘इस कंबख़्त मुल्क़ में चमार कभी प्राइम मिनिस्टर नहीं हो सकता है’ अशा अर्थाचे विधान केल्याचे म्हटले जाते, ते या निमित्ताने उगाच आठवून गेले. (जाणकारांनी या विधानामागचा राजकीय संदर्भ ठाऊक असल्यास अवश्य पुरवावा.))

असो चालायचेच.

सैराट Tue, 02/12/2025 - 13:38

अरे विवेक काय चुत्या आहेस का काय ? तुझ्या बा ने तुझं लग्न कोणाशी लावलं हे सांग आधी आणि तुझ्या आजीची जात सांग आधी मग ये ही पालथी चोळटाचोळट करायला. annihilation of caste हे बाबासाहेबांचं एकच पुस्तक वाच मग कळेल काय प्रकार चालू होता भारतात. तीन संस्कृत श्लोकांच्या अगरबत्त्या लेखाच्या बोच्यात खोचल्या म्हणजे त्या गुवट लेखातून सुवास येईल असं वाटतं का भडव्या तुला.

विवेक पटाईत Thu, 04/12/2025 - 09:28

In reply to by सैराट

विद्वान माणसं लेख पुन्हा वाच. ज्या ब्रिटिश सर्वेत बंगालमध्ये जिथे वंचित समाजाचे लोक 75 टक्के शिक्षित होते ते गुरुकुल बंद झाल्यानंतर बंगालमध्ये फक्त पाच टक्के राहिले. सत्य पचवायला शिका. मला शिव्या देऊन इतिहासातले सत्य बदलणार नाही. मानसिक गुलामीतून मुक्त पहा आणि स्वतःच्या डोक्याने विचार करणे शिका

सैराट Thu, 04/12/2025 - 14:08

आरे कडू. मला जे सांगून राह्यला तेच तू स्वतः करून बघ ना. इथे ग्यान चोदत राहशील तर गांडीखालचा अंधार कसा दिसल तुला.

'न'वी बाजू Fri, 05/12/2025 - 18:35

In reply to by सैराट

‘दिव्याखाली अंधार’ अशी म्हण यापूर्वी ऐकली होती. हे नवीनच ऐकतोय.

असो चालायचेच.

धर्मराजमुटके Fri, 05/12/2025 - 20:59

पुर्वीचं सगळं चान चान होतं म्हणणारे आणि मनुस्मुतीचे दहन करणारे या दोघांनाही मनोरंजन मुल्याच्या बाबतीत मी १०० पै़की ११० गुण देतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 06/12/2025 - 22:29

आज डॉ. आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. दलितांसाठी त्यांना किती काम करावं लागलं (आणि तरीही चिकार बाकी आहे); याची संगती लावायची तर पटाईतकाकांचा भोंदूपणा सहज सिद्ध होतो.

'न'वी बाजू Sun, 07/12/2025 - 04:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुद्दा पूर्णपणे ग्राह्य आहे. परंतु, प्रश्न इतकाच पडतो, की, हे सिद्ध करण्याची खरोखरच काही गरज आहे काय? (किंवा, (किमानपक्षी, निदान या संस्थळावर अद्याप शिल्लक राहिलेल्या सदस्यांपैकी तरी) नक्की कोणाला गरज आहे?)

(‘पाणी ओले असते’, म्हणून बोंबलत तुम्ही इथे धावाल काय? ((आर्किमिडीजप्रमाणे) नागड्या, की कपडे घालून, ही बाब पूर्णपणे गौण आहे. ‘युरेका!’ हा परवलीचा शब्ददेखील वैकल्पिक आहे.) मुद्दा लक्षात आला असेल, अशी आशा आहे.)

(किंवा, मुद्दा लक्षात आला नसल्यास: It’s not exactly a (की an? असो.) Eureka moment, एवढेच सुचवायचे होते. असो. (आता तरी मुद्दा लक्षात आला असेल, अशी आशा आहे.))


बाकी, तुमच्या प्रतिसादाच्या शीर्षकाबद्दल बोलायचे झाले, तर डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूच्या संदर्भात ‘महानिर्वाण’ अथवा ‘महापरिनिर्वाण’ या संज्ञा वापरण्याची प्रथा आहे, हे तर खरेच. आणि, त्यामागील प्रेरणा, त्यामागील भावना हीदेखील पूर्णपणे समजण्यासारखी आहे. (बोले तो, भगवान बुद्धाच्या मृत्यूच्या संदर्भात या संज्ञा सामान्यतः वापरल्या जातात. डॉ. आंबेडकर हे (धम्मपरिवर्तनानंतर) बौद्ध होते. झालेच तर, त्यांचे अनुयायी हेसुद्धा (बहुतांशी अथवा मोठ्या प्रमाणात) बौद्ध आहेत. त्यामुळे, ‘भगवान बुद्धाच्या तोडीचा वा त्या उंचीचा महामानव’ अशा अर्थाने डॉ. आंबेडकरांबद्दल आदर दर्शविण्याप्रीत्यर्थ, बुद्धाच्या मृत्यूशी निगडित संज्ञा डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूच्या संदर्भात वापरण्याची प्रथा पडली असावी. ही भावना अर्थातच समजण्यासारखी आहे, आणि या भावनेप्रति आदर आहे.)

मात्र, हीच प्रेरणा लक्षात घेता, डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूच्या संदर्भात या संज्ञांचा वापर हा मला (डॉ. आंबेडकरांबद्दल पूर्ण आदर बाळगूनसुद्धा, किंबहुना, कदाचित त्या आदरापोटीच) अतिशय दुर्दैवी वाटतो.

भगवान बुद्धाच्या मृत्यूच्या घटनेमागील पार्श्वभूमी/आगापीछा/circumstances लक्षात घेतल्यास माझ्या म्हणण्यामागील रोख कदाचित लक्षात यावा.

असो चालायचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 07/12/2025 - 07:49

In reply to by 'न'वी बाजू

अनेक शब्दांचा अर्थ वापरानुसार बदलत जातो. 

जुन्या साहित्यात गे म्हणजे आनंदी. हल्लीच्या काळात गे म्हणजे समलैंगिक, बहुतेकदा समलैंगिक पुरुष.