Skip to main content

रांगणेकर

5 minutes

“२५ तारखेची डेल्टाची फ्लाईट कन्फर्म झाली. चला, म्हणजे, एक आठवडा आधी आला की त्याची सगळी खरेदी व्यवस्थित करता येईल. दोन तारखेच्या मुहूर्ताला सगळं सेट”. रांगणेकर काका बाबांशी फोनवर बोलताना मी ऐकलं.
विजय रांगणेकर बाबांचे अगदी जुने मित्र. बाबांनी आणि त्यांनी अनेक वर्षे स्टेट बँकेत एकत्र काढली. ते बाबांपेक्षा २-३ वर्षे आधी बँकेत लागले असावेत. पण बाबांची आणि त्यांची खार ब्रँचला जॉइन झाल्यावर पहिल्याच दिवशीच चांगलीच ओळख झाली आणि पुढे घट्ट मैत्री. ५:४७ च्या चर्चगेट स्लो लोकलने दोघांनी एकत्र अनेक वर्ष एकत्र प्रवास केला.
आज त्या गोष्टीला जवळ जवळ १३ वर्ष उलटली असतील. तेव्हापासून त्यांचे आणि बाबांचे सख्ख्या भावासारखे संबंध. रांगणेकर काका सरळ आणि भोळे. प्रत्येक मोठा निर्णय घेताना बाबांचा सल्ला घेत असत. बाबांची प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करण्याची सवय आणि आत्मविश्वास त्यांना आवडत असे.
“अग् प्रतिभा, रांगणेकरचा मुलगा येतोय नं अमेरिकेहून, त्याचंच तिकीट कन्फर्म झालंय हे सांगायला फोन केला होता. आपण सगळे जाऊ लग्नाला. शनिवारचा मुहूर्त आहे नं! चल मी जाऊन येतो जरा. येताना खाली अशोक पण आलाय का पाहतो .”
“बरं या, पण चावी घेऊन जा. तुम्ही तिघे भेटलात की काही नेम नसतो. जाताना ते ५-६ कपडे इस्त्रीला टाका.”
बाबांचे हे आठवड्याचे ठरलेले रूटीन असायचं. रांगणेकर काकांनी हल्लीच व्हीआरेस घेतली होती. ते माहीमला रहायचे. रात्रीचे जेवण आटोपले की स्कूटर वरून दादरला आमच्याकडे येत व बाबा आणि त्यांच्याशी गप्पा मारत एखादी चक्कर मारून येत. ते बहुदा इनस्टॉलमेंटचा चेक द्यायला खाली आले असावेत. काकांच्या मुलाने हल्लीच त्यांना माहीमला एक २-बेडरूमची जागा घेऊन दिली होती. रांगणेकर काकांचा मुलगा अमेरिकेत होता. एम.आय.टी. ला Computer Science मध्ये एम. एस. करून त्याला याहू मध्ये नोकरी लागली होती. काही वर्षे नोकरी करून आता तो लग्नासाठी भारतात येणार होता.
मी आणि आई गप्पा मारत बेडरूमच्या खिडकीतून पाहत होतो तोच रांगणेकर काका खाली दिसले. मध्यम बांधा, पिकलेले कुरळे केस आणि डोळ्यांवर बायफोकल चष्मा.
“काय म्हणतोस विजय? कशी चालली आहे लग्नाची तयारी?” रांगणेकर सुटकेचा निःश्वास टाकत म्हणाले, “हो. झालंय आता सगळं जवळजवळ. एकदा कॅटेररकडे जाऊन येऊया. त्यांनी खिशातून एक लिफाफा काढून बाबांना दिला आणि म्हणाले, “हा घे इनस्टॉलमेंटचा चेक.” बाबांनी आश्चर्याने पाहून म्हटले, “अरे, दोन दिवसांपूर्वीच नाही का दिलास! ”
“अं...अरे हो...बघ ना! एवढी बिलं, चेक लिहित असतो की लक्षात नाही राहिलं.”
“असू दे. होते गडबड कधीतरी”. बाबा म्हाणाले.
रांगणेकर काकांचे चौकोनी कुटुंब. एक मुलगा,मुलगी आणि पत्नी शैलजा.त्यांची परिस्थिती कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासारखी. सगळा जन्म गिरगावातल्या १०X१० च्या दोन खोल्यांमध्ये गेला.उपनगरात जागा घ्यायची चाललं होत पण एकट्याचीच नोकरी आणि नंतर श्रेयसला एम. एस. करायला पाठवायचे म्हणून लांबणीवर गेले.रिडेवलपमेंट च्या आशेवर राहिले पण पुढे काही होईना. शेवटी श्रेयसने माहिममध्ये पारिजात सोसायटीत टू बीएचकेचा फ्लॅट बुक करून टाकला. १ कोटी दहा लाख किंमत तेव्हा फार मोठी वाटली होती खरी .पण श्रेयसला आई बाबांना आता तरी जरा सुखसोयी मिळाव्यात अशी इच्छा होती. रांगणेकर काकांनी खूप नको नको केले होते पण श्रेयसने ऐकले नव्हते.
श्रेयस आठवड्याने आला. आमच्या घरी त्याला साग्रसंगीत केळवण वगैरे झाले.दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आई दुपारी जरा पेपर चाळत सिरीयल बघत बसली होती तोच दाराची बेल वाजली. सविता भांड्याला आली असणार असा विचार करून आईने दार उघडले तर दारात चक्क बाबा ! आई काळजीने म्हणाली, “तब्बेत बरी आहे ना ? मगाशी फोनवर काहीच बोलला नाहीत.”
“दार उघड आधी. आत तरी येऊ देत!”
बाबा ताडकन आत आले व व कपाटात काहीतरी शोधू लागले. आईने पाण्याचा पेला पुढे केला. बाबा घोट घेत म्हणाले, “ अगं, रांगणेकरचा पत्ता नाहीये.”
“म्हणजे ?”
“अगं, सकाळी साडेसातला वरळीला बहिणीकडे चांदीची भांडी घ्यायला गेला तो अजून आला नाही. बाबा सांगू लागले.
“तिथून परस्पर कुठे जाणार होते का? ”.
“नाही.”
“पावणेदहाच्या सुमारास बहिणीचा फोन आला होता की रांगणेकर मोबाईल इथेच विसरला. सव्वानऊ-साडे-नऊच्या सुमारास निघाला म्हणे.” बाबांनी फोनची एक जुनी डायरी घेतली व लगेच रांगणेकरकडे निघाले.
रांगणेकरच्या घरी गेले तर सर्वत्र शांतता व सर्वांचे चेहरे चिंतातूर.
“भाऊजी, काहीही सुचेनासे झाले आहे. हे नं सांगता असे कुठेच जात नाहीत.” शैलजा काकूंचा आवाज कातर झाला होता. डोळ्यांच्या कडा किंचित ओल्या..
“वहिनी, असा धीर सोडू नका. करुया आपण काहीतरी.” अशोक काका म्हणाले.
बाबा श्रेयसला म्हणाले, “चल, आधी आपण वरळी च्या बस स्टॉप ला जाऊन येऊ कुठे काही अपघात
वगैरे झाला होता का ते बघू, चौकशी करून येऊ”.
वरळीला जाऊन चौकशी केली, पण काही बातमी नव्हती. अशोक काकांनी घड्याळात पहिले. पावणेपाच. हे जरा संकोचत बोलले,”एक सुचवू का? “आपण नायर, के.ई.एम. व इतर ठिकाणी चौकशी केली पाहिजे”.
अशोक काका व रांगणेकर काकांचे मेहुणे नायरला गेले. बाबा आणि श्रेयस सायन व के.ई.एम. ला एकामागुन एक जाणार होते.नायरला कोणतीही अशी अपघाताची ची केस आज आली नव्हती. श्रेयस व बाबा नंतर के.ई.एम. ला गेले. तिथे casualty मध्ये श्रेयस ने पटापट वडिलांचे वर्णन केले. तेव्हा एक नर्स म्हणाली,
“ सकाळी एक माणूस आयसीयू मध्ये admit झालाय खरा. क्रिटीकल आहे. श्रेयसच्या काळजाचा थरकाप उडाला.पायातली शक्ती गेल्यासारखे झाले. तो झरझर त्या आयसीयू च्या रूम जवळ गेला व काचेच्या छोटया खिडकीतून आत पहिले पण लगेच सुटकेचा निः श्वास टाकला. दुसरेच कोणीतरी होते.
पुढे इतर अनेक हॉस्पिटल्स मध्ये चौकशी, नातेवाईकांना फोन झाले.पोलीस कम्प्लेंट पण केली.काहीच पत्ता नव्हता.
अशोक काका, रांगणेकरांचे मेहुणे त्यांच्या घरी परतले.श्रेयस व बाबा पण आता शिवाजी पार्क पोलीस स्टेशन हून माहीमला जायला टॅक्सी बघू लागले. अकरा वाजून गेले होते. ट्राफिकचा गजबजाटही आता कमी झाला होता. कधी नव्हे ती पटकन टॅक्सी मिळाली. दोघेही टॅक्सीत बसले व टॅक्सी निघाली. टॅक्सी वीर सावरकर रोड ला आली. ती रात्रीची शांतता आता भयाण वाटू लागली होती. श्रेयस च्या मनात कसले कसले विचार आले, “किडनॅपिंग, खून वगैरे तर नाही ना...”.तो विचारात होता तोच समोरून एका बसच्या होर्न ने लक्ष वेधले. बाबांनी सुद्धा सहज बसकडे पाहिले आणि नंतर स्टॉपकडे तोच अंगावर वीज पडल्यासारखे दोघे टॅक्सीवाल्याला म्हणाले “रुको !!”. आणि टॅक्सी थांबताच दरवाजे उघडून समोरच्या स्टॉपकडे धावत सुटले. समोर स्टॉप वर चक्क रांगणेकर काका उभे होते, बसमध्ये चढण्याच्या तयारीत. बाबा ओरडले, “रांगणेकर!!!”.रांगणेकर काकांनी आश्चर्याने वळून पहिले, सहजपणे, काहीही विशेष न झाल्यासारखे. श्रेयसच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे काहीश्या प्रश्नार्थक नजरेने.
श्रेयस बाबांना मिठी मारून रडू लागला होता. बाबांनी विचारले, “अरे, होतास कुठे इतका वेळ आणि या स्टॉप वर काय करतोयस?”
“घरी येत होतो.”
“आणि या स्टॉप वरून काय बस पकडतोयस ...वरळीला जाणारी ?”
“अरे हो ,की!” रांगणेकर काका म्हणाले. विचित्र वागणं होतं त्यांचं.
श्रेयसने पटकन घरी फोन करून बाबा सुखरूप असल्याचे कळवले.
“तुम्ही आता जा घरी. उद्या करतो मी फोन”, म्हणून बाबा थोडेसे गोंधळलेल्या मनस्थितीत घराच्या दिशेने जाऊ लागले.
दुसऱ्या दिवशी बाबांनी फोन केला तेव्हा श्रेयस नीटसे काही बोलला नाही. नंतर त्याचा २-३ दिवसांनी फोन आला होता. तो जरासा संकोचून म्हणाला, “त्या दिवशीचा बाबांचा वागणं विचित्र वाटला असेल तुम्हाला. त्यांची तब्बेत बरी नाही. आम्ही हा सर्व प्रकार मामांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही सायकॅट्रिस्टची भेट घ्यायला हवी. आम्ही एका सायकॅट्रिस्टला भेटलो.त्यांनी काउनसेलिंग नंतर सांगितले, “ह्यांनी कसलातरी जबरदस्त धसका घेतलाय. बहुदा त्या लोनच्या हफ्त्यांचा. त्याच्याबद्दल वारंवार सांगत होते. त्यातूनच आता हा भ्रमिष्टपणा, loss of touch with reality, trance behaviour वगैरे प्रकार होत असावेत. ”
सध्या रांगणेकर काकांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यांना घरातले आता कुठेही एकटे सोडत नाही. श्रेयसचे लग्न व्यवस्थित पार पडले. लग्नाहून घरी आलो तर हा सगळा प्रकार मला परत परत आठवत राहिला. मी मनात म्हटलं, त्या दिवशी काका स्टॉप वर पटकन उभे आहेत हे लक्षात नसते आले तर...!

Node read time
5 minutes

ऋषिकेश Mon, 14/11/2011 - 09:10

अनुभव-प्रसंग छान मांडलाय.
नव्या पिढीला कर्ज-हफ्ते वगैरे अनेक गोष्टीत 'वेगळे' काहिच वाटत नाहि. मात्र 'कर्ज डोक्यावर असणे' व ते दामदुप्पट फेडणे याचा आधीच्या पिढीतील बर्‍याच व्यक्तींना त्रास म्हणा - अस्वस्थता म्हणा वाटते.
त्यातही आर्थिक सुरक्षिततेमधे नोकरी केलेल्या व्यक्तींना ती अधिक जाणवते असेही वाटते.

असो. रांगणेकरांबद्दल वाईट वाटले तरी असे अनेक रांगणेकर आजुबाजुला दिसतात हेही तितकच सत्य आहे

शिल्पा बडवे Mon, 14/11/2011 - 12:58

अनुभव छान मांडलाय हेच म्हणेन. जर मुलगा लोनचे हप्ते वगैरे भरत असेल म्हणजे त्याने घर घेउन दिलंय या हीशोबाने म्हणतेय मी तर काकांना या गोष्टीचा धसका घ्यायची काही गरज नाही. जरा सबुरीने घ्यावे अन मुलावर विश्वास ठेवावा. तुम्हीसुद्धा त्यांना हे सांगु शकता. अर्थात ही सत्यकथा आहे हे मानुन सांगतिये.

अशोक पाटील Mon, 14/11/2011 - 21:35

"त्यातही आर्थिक सुरक्षिततेमधे नोकरी केलेल्या व्यक्तींना ती अधिक जाणवते असेही वाटते."

~ आय अ‍ॅम सॉरी, ऋषिकेश, बट आय मस्ट डिफर वुईथ धिस स्टेटमेन्ट ऑफ युवर्स.

मी स्वतः रांगणेकर यांच्यासारखेच एचडीएफसीचे कर्ज काढून घर घेतले होते. आणि मला तुम्ही म्हणता तशीच सरकारी नोकरीमुळे आर्थिक सुरक्षितता होती/आजही आहे. ज्यावेळी लोन घेतले जाते, त्यावेळी कर्ज देण्यार्‍या संस्थेची समोरील अधिकारी व्यक्ती आपले कार्डस क्लीअरली ओपन करते. तुमच्या पगारावर तुम्हाला किती कर्ज मिळू शकते याचा आकडा आणि तो १५-२० वर्षात फेडायचा असेल तर हप्ता कितीचा होईल हेही स्पष्ट सांगितले जाते. मी कर्ज हजार रुपयांचे घेतले आणि मला जर व्याजासह १०० रुपये हप्ता बसणार असेल (जो माझ्या पगाराच्या आकड्याला अनुसरून अ‍ॅफोर्डेबल असू शकेल) तर पुढच्या १५-२० वर्षात त्या हजाराचे कर्ज परतफेडीपोटी पाच हजार होणार हे मला पहिल्याच मीटिंगमध्ये समजते. इतपत जाण प्रत्येक कर्जदाराला असतेच असते (यात अतिशयोक्ती नाही, कारण एचडीएफसीचे कर्ज बहुतांशी नोकरवर्गच घेत असतो). मग जर याची जाणीव मला पहिल्याच दिवशी असेल तर मग मी 'कर्ज डोक्यावर बसले', "दामदुपटीने कर्जफेड करीत आहे" असे एक्सक्युजेस देणे मला शोभणारे नाही. एचडीएफसीने दिलेल्या रक्कमेत माझे घर होत नव्हते हे तर उघडच होते, पण चार मित्रांनी तातडीने आपुलकीने उरलेली रक्कम मला दिली. ती देखील मी नियमितपणे फेडली. मित्रांचे कर्ज फिटेपर्यंत मी घरी फ्रीज, टू व्हीलर, टेलिफोन, कूलर आदी कसल्याही सोयीच्या वस्तू घेतल्या नव्हत्या. टीव्ही होता तो अगदी भाड्याच्या घरात असताना घेतलेला, त्यामुळे ती नव्याने खरेदी म्हणता येत नव्हती.

मी गृहप्रवेश केल्यानंतर सुमारे आठ वर्षे मला बसलेला विहित हप्ता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बॅन्केत न चुकता भरत होतो आणि त्यानंतर मग महिन्याचा कौटुंबिक खर्च, त्याचा आढावा इ.इ.घेणे. ~ आठ वर्षानंतर माझ्या वेतनात लक्षणीय सुधारणा झाली आणि या ना त्या निमित्ताने केलेल्या बचतीही हाती आल्यावर उरलेले गृहकर्ज एक रकमी भरून घेण्याबद्दल एचडीएफसीला पत्र लिहिले व त्यांचेही लागलीच उत्तर येऊन मी शेवटचा हप्ता म्हणून किती रक्कम भरणे गरजेचे आहे याचेही पत्रक आले. जे मी फॉलो केले आणि झटदिशी ती रक्कम भरून घरच्या 'कर्जा'तून मुक्तही झालो. {घरातील मुलाचे शिक्षण, आईचे आजारपण, अन्य कौटुंबिक दगदगी याचा तर मी उल्लेखही करणार नाही)

श्री.रांगणेकर हे स्टेट बॅन्केत नोकरीला असल्याने तेथील कर्मचार्‍यांना बॅन्केच्याच गृहबांधणीसाठी कर्जयोजना असणार हे उघडच आहे. शिवाय बॅन्केतील कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या आसपासही सरकारी नोकर जावू शकत नाही हीदेखील एक वस्तुस्थिती (याचा अर्थ श्री.रांगणेकर याना अन्य विवंचना नव्हत्या असे मी म्हणत नाही, हे लक्षात घ्यावे) असताना निव्वळ लोन हप्त्यापोटी ते भ्रमिष्ट झाले असावेत हे विधान धार्ष्ट्याचे वाटते.

'सोनपरी' यांनी केलेले "रांगणेकर" व्यक्तीचित्रण भावपूर्ण झाले आहे यात दुमत नाही, पण (लिखाणातील घटना या सत्य असतील तर) त्यानीही थोडी अधिकची खोलवरची चौकशी केल्यास जे झाले ते केवळ लोन हप्त्यामुळेच झाले काय याचे उत्तर कदाचित मिळू शकेल.

अशोक पाटील

ऋषिकेश Tue, 15/11/2011 - 09:40

In reply to by अशोक पाटील

यात फरक असा आहे की ते कर्ज तुम्ही घेतले होते. प्रत्य्के जण जेव्हा स्वतःसाठी कर्ज घेतो तेव्हा ते साधारणतः स्वतःला पेलवेल इतकेच घेतो. वरील प्रसंगात कर्ज मुलाने घेतले आहे. घराची किंमत कोटीमधे आहे. अश्यावेळी या पिढीतील व्यक्तींना टेन्शन येणे मी स्वतः बघितले आहे.

माझ्या अनेक परिचितांनी त्यांच्या घरांच्या वेळेस कर्ज घेतली आहेत. व ती तुम्ही म्हणता तशी योग्य वेळी फेडलीही आहेत. मात्र आता त्यांची मुले जेव्हा घराच्या किंमतीच्या ८०-९०% रक्कम कर्ज म्हणून उचलतात तेव्हा त्यांच्या आर्थिक सिद्धांतात ते बसणे कठीण असते व त्यांना टेंशन येते.

यावरून बराच काळ डोक्यात असणारा एक चर्चाविषय आहे.. जरा नीट विदा जमवतो आणि मग चर्चेसाठी मांडतो

अशोक पाटील Tue, 15/11/2011 - 10:09

In reply to by ऋषिकेश

ओके ऋषि.....

तुझ्या प्रतिसादावर मी इथे प्रतिवाद घालू शकतो (वुईथ प्रॉपर प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स) पण नवीन धाग्यासाठी जो विषय आता तुझ्या डोक्यात आला आहे त्याला पूर्ण आकार दे आणि तो "घर" याच्याशीच संबंधित असेल तर मग तिथेच ही चर्चा पुढे नेऊ.

(तरीही घरासाठी मूळ कागदपत्रातील एस्टिमेटच्या आधारे ८०-९० टक्के कर्ज कोणती हाऊसिंग फायनान्स कंपनी देत आहे. हां...रांगणेकर कुटुंबियांनी त्यासाठी अधिकृत कर्ज + सावकारी कर्ज घेतले असेल तर मग मूळ धाग्यात असलेली भ्रमिष्टासम परिस्थिती उदभवू शकते, नो डाऊट.)

अशोक पाटील

विसुनाना Tue, 15/11/2011 - 12:48

In reply to by अशोक पाटील

रांगणेकरांना घराच्या हप्त्याच्या धसक्याने मानसिक आजार झाला असावा हे गृहितकच चुकीचे वाटते.

पण श्रेयसला आई बाबांना आता तरी जरा सुखसोयी मिळाव्यात अशी इच्छा होती.

-या वाक्यावरून तरी एमायटीत शिकलेला मुलगा आपल्या आईवडिलांची सोय पहात असल्याने हप्ताही भरत असावा असे वाटते.
खरे कारण काहीतरी वेगळे असणार असे वाटते. (एक कोटी दहा लाखाचा वीस वर्षांचा मासिक हप्ता एक लाखच्या आसपास असावा.(?)
पण युएसडॉलर्समध्ये फक्त २०००. एमायटी पोस्टग्रॅडला किमान ७०००/८००० डॉलर्स महिन्याला मिळत असावेत.) आता मुलाच्या नोकरीबद्दल (आधीच रेसेशन आणि त्यात याहू!) काही प्रश्न असतील तर मात्र धसका बसणे शक्य आहे.
***
गृहकर्जाबद्दलची चर्चा आली तर उत्तम आहे.

ऋषिकेश Tue, 15/11/2011 - 14:50

In reply to by अशोक पाटील

माझ्या डोक्यातील विषय घर-गृहकर्ज आदी विषयांवर नाही.. तो एका विशिष्ट 'जनरेशन' मधील गॅप बद्दल आहे. तेव्हा प्रतिवाद ऐकायला आवडेलच. (तेवढीच माझ्या अल्पज्ञानात भर!)

बाकी, गेल्या काहि महिन्यात ८०-९०% कर्ज मिळते की नाहि माहित नाहि मात्र दरम्यानच्या काळात (जेव्हा ८-९% व्याजदर होता) माझ्या काहि परिचितांनी (त्यावेळच्या) २० लाखांच्या फ्लॅट्ससाठी स्वतःचे केवळ २-४ लाख रुपयेच भरले आहेत (त्यापैकी काहिंना अ‍ॅक्सीस बँक, कोटक महिंद्रा आदींनी कर्जे दिली आहेत ही नक्की माहिती आहे)

सोनपरी Tue, 15/11/2011 - 20:42

In reply to by ऋषिकेश

प्रतेय्काचे मत इंटरेस्टिंग वाटते. आणखी थोडे सांगायचे झाले तर मुलाने घर पूर्ण calculation करून घेतले होते. भावनेच्या भरात किंवा अविचारातला निर्णय नव्हता. मला दोन्ही पिढ्यांमध्ये attitudes/'जनरेशन' गॅप इथे जाणवली. म्हणून ही कथा व चित्रण. दोन्ही पिढ्यांच्या विचारसरणीचे फायदे-तोटे आहेतच.

अशोक पाटील Tue, 15/11/2011 - 14:05

"आता मुलाच्या नोकरीबद्दल (आधीच रेसेशन आणि त्यात याहू!) काही प्रश्न असतील तर मात्र धसका बसणे शक्य आहे."

~ 'रेसेशन' चा मुद्दा असेल तर तो एमआयटीमधून एम.एस. झालेला मुलगा लग्नाची घाई करणार नाही (इतपत तो समंजस असतोच). पण ज्याअर्थी रितीरिवाजानुसार लग्न आणि तत्संबंधी गोष्टी सुरळीत पार पडल्या असल्याने चिरंजीवांच्यासमोर रेसेशन आणि याहू नसणारच...{असल्या तरी क्वालिफिकेशन जबरदस्त असल्याने अगदीच "निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी..." अशी स्थिती त्याच्याबाबतीत संभवत नाही). तशात एक कोटीचे घर घेऊन देणारा मुलगाच असल्याने त्यानेही काही कॅल्क्युलेशन्स केलेली असणारच.

त्यामुळे रांगणेकर यांच्या धसक्याचे कारण अन्यही असू शकते.

अशोक पाटील

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/11/2011 - 20:24

In reply to by अशोक पाटील

कदाचित अल्झायमर्स किंवा तत्सम मेंदूशी संबंधित आजाराची सुरूवात?

चिंता नसतानाही कामाचा विचार डोक्यात असताना अनेक लोकांचा विसरभोळेपणा वाढलेला दिसतो, माझ्याकडूनही हे होतंच. पैनपै साठवून घर घेण्याची स्वप्न बघणार्‍या मध्यमवर्गीय माणसाला, निवृत्तीनंतर आपण किंवा आपल्यामुळे एवढा खर्च होतो आहे हे मान्य करणं कठीण जातं हे सुद्धा आजूबाजूला पाहिलेलं आहे. रांगणेकरांवर या सर्वच गोष्टींचा परिणाम झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोनपरी Tue, 15/11/2011 - 20:46

प्रत्येकाचे मत इंटरेस्टिंग वाटते. आणखी थोडे सांगायचे झाले तर मुलाने घर पूर्ण calculation करून घेतले होते. भावनेच्या भरात किंवा अविचारातला निर्णय नव्हता. मला दोन्ही पिढ्यांमध्ये attitudes/'जनरेशन' गॅप इथे जाणवली. म्हणून ही कथा व चित्रण. दोन्ही पिढ्यांच्या विचारसरणीचे फायदे-तोटे आहेतच.

राजेश घासकडवी Tue, 15/11/2011 - 21:53

कथनशैली अतिशय आवडली. अनेक वेळा अगदी सहज येणाऱ्या बारक्याशा उल्लेखांमुळे रांगणेकरांच्या बाबतीत काहीतरी वेगळं चाललं आहे हे जाणवत रहातं. शेवटच्या काही परिच्छेदांमध्ये नक्की काय झालं याची उत्कंठा ताणलेली रहाते. तुम्हाला वर्णन करण्याची उत्तम हातोटी आहे. खरोखर काही कथा लिहावीत (याच धाग्याला पुढे धरून किंवा इतरही स्वतंत्र) ही विनंती.

राजन बापट Wed, 16/11/2011 - 00:10

कथा वाचली. शैलीबद्दल राजेश घासकडवींशी सहमत आहे. कथनशैली प्रवाही आहे आणि लिखाण वाचनीय झालेले आहे हे खरेच.

मात्र कथानक मला अपुरं वाटलं. रांगणेकरांची अशा स्वरूपाची अवस्था जी झाली तिचं काही वैद्यकीय निदान झालं का ? झालं नसल्यास का नाही ? हे जे घडलं ते एका आठवड्याभरात घडलं का ? या प्रश्नांची तड लागलेली नाही. बरं, कथा लिहिण्याचा उद्देश जर का वैद्यकीय स्पष्टीकरण देण्याचा नसेल , सामाजिक स्थिती, आर्थिक घडी किंवा मानसिक आंदोलने यांचं चित्रण करणं यापैकी काही उद्देश असेल तर हा प्रयत्न अपुरा वाटला. क्रमशः कथानक लिहिणार असाल तर स्वागत आहे :)

प्रियाली Wed, 16/11/2011 - 06:38

In reply to by धनंजय

कथा आवडली. शैलीही आवडली, ओघवती कथा झाली आहे.

रांगणेकरांना गृहकर्जाचे टेन्शन नसून अल्झायमर्सची सुरुवात असावी असं वर म्हटलं आहे तसंच मलाही वाटलं.