Skip to main content

पाकिस्तान किनार्‍यालगतच्या समुद्रातून वर आलेले बेट

समुद्र मंथनाची पौराणिक कथा बहुतेक सर्वांना ज्ञात आहेच. या कथेप्रमाणे एकदा देव आणि दानव यांनी समुद्र मंथन करून रत्नाकराच्या पोटात दडलेले अमृत, मंथन करून बाहेर काढण्याचे ठरवले या अमृताबरोबरच या मंथनातून लक्ष्मी, हलाहल या सारख्या अनेक गोष्टीही बाहेर आल्या असे या कथेत सांगितलेले आहे. आपल्या या समुद्र मंथनाच्या कथेप्रमाणेच ग्रीक पुराणांतील एका कथेत पॉसिडॉन या देवाचा मुलगा टारस याची नौका बुडलेली असताना त्याला एक डॉल्फिन मासा वाचवतो आणि टारस या डॉल्फिन माशावर स्वार होऊन समुद्रातून बाहेर येतो असा उल्लेख आहे. माझी खात्री आहे की कोणतीच सुशिक्षित व्यक्ती या असल्या पुराण कथांवर कधीच विश्वास ठेवणार नाही, समुद्र किनार्‍यावर उभे राहून जेंव्हा आपण समुद्राकडे बघतो तेंव्हा समोर दिसणारा अफाट आणि अथांग जलसंचय त्याचप्रमाणे किनार्‍याकडे झेपावणार्‍या आणि आदळणार्‍या महाप्रचंड राक्षसी लाटा बघताना किंवा एखाद्या जहाजाच्या डेकवर उभे राहून आजूबाजूला पसरलेल्या अथांग समुद्राकडे बघत असताना या अफाट जलविस्तारामधून मानवनिर्मित पाणबुड्या आणि जलचर या शिवाय आणखी काही वर काही येऊ शकेल यावर कोणाचाच विश्वास बसणे शक्य होणार नाही.

मात्र पाकिस्तानच्या नैऋत्येला असलेल्या माकरान किनारपट्टीवर रहात असलेल्या काही थोड्या लोकांसाठी, ही अशक्य कोटीतील बाब सत्यतेतील आहे, असे त्यांच्या डोळ्यासमोरच ती घडल्यामुळे, म्हणावेच लागते आहे. ग्वाडर हे एक बंदर आणि मध्यम लोकसंख्येचे एक गाव या किनारपट्टीवर वसलेले आहे. मंगळवार 24 सप्टेंबर 2013 या दिवशी या गावच्या पंचक्रोशींमध्ये भूकंपाचा एक जबरदस्त झटका बसला. 7.7 शक्तीच्या या भूकंपाचे केंद्र होते पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील आवारान या दुर्गम भागात! या भूकंपाच्या झटक्यातून ग्वाडर गावातील लोक सावरतात न सावरतात तोवर त्यांना न भूतो न भविष्यति! असे दृष्य गावाजवळच्या किनार्‍यासमोरील अरबी समुद्रामध्ये दिसले. किनार्‍यापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर, समुद्रामध्ये, एक नवीन बेट दिसत होते. भूकंप झाल्याच्या क्षणापासूनच्या पुढच्या फक्त 1 तासामध्ये हे बेट समुद्रातून वर आलेले होते. एक स्थानिक पत्रकार मिया बहराम बलोच म्हणतात: ” मी घराच्या बाहेर पडलो आणि आश्चर्याचा एक धक्का मला बसला. माझ्या नजरेसमोर, पाण्याच्या पृष्ठभागावर पोहणार्‍या एखाद्या व्हेल माशासारखे आणि ग्रे रंगाचे, समुद्रामध्ये काहीतरी दिसत होते आणि ही अशक्य गोष्ट अविश्वासू नजरेने बघत असलेली शेकडो मंडळी तेथे आधीच जमा झालेली मला दिसत होती.”

मिया बलोच आणि त्यांचे काही मित्र यांनी दुसर्‍या दिवशी (25 सप्टेंबर 2013) एक बोट भाड्याने घेतली व ते या समुद्रातून नवीनच वर आलेल्या बेटाकडे निघाले. बलोच यांच्या म्हणण्याप्रमाणे हे बेट लंबवर्तुळाकार आकाराचे आहे व लांबीला 250 ते 300 फूट व रुंदीला 60 ते 70 फूट असावे. त्याचा पृष्ठभाग कमालीचा खडबडीत आणि चिखलाने भरलेला आहे. काही भागात सूक्ष्म आणि जाडसर कणांची वाळू पसरलेली आहे. बेटाच्या एका भागात फक्त अखंड खडक आहेत. या खडकाळ भागात बलोच आणि त्यांचे मित्र बोटीने उतरले होते.

बलोच यांना बेटावर अनेक मृत मासे आढळले आणि एका बाजूच्या खडकातील फटीमधून गॅस बाहेर येताना करतो तसा आवाज येत असल्याचे आढळले. जेथून हा आवाज येत होता त्या खडकामधील फटीजवळ पेटलेली काडी नेल्याबरोबर बाहेर येणार्‍या गॅसने पेट घेतला व नंतर त्या ज्वाला विझवण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले. पाणी टाकूनही ज्वाला विझत नव्हत्या. अखेरीस त्यांनी बादल्या भरभरून पाणी टाकल्यावर ज्वाला विझल्या.

पाकिस्तानची माकरान किनारपट्टी ही पूर्व-पश्चिम अशी साधारण 700 किमी लांब आहे व येथे भूकंपासारख्या भूगर्भातील घटना नेहमीच घडत असतात. या भागातील अनेक टेकड्यांवर चिखल बाहेर टाकणारे ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखींच्या मुखाजवळ मिथेन गॅस बाहेर टाकणारी विवरे आहेत. ग्वाडर आणि ओरमारा या स्थानांमधील समुद्राखाली गोठलेल्या मिथेन वायूची विशाल भांडारे आहेत आणि हा वायू समुद्रतळातील फटीतून बाहेर येत असल्यामुळे निर्माण झालेले बुडबुडे अनेक वेळा पाण्यावर दिसतात.

मात्र समुद्रातून बेट बाहेर येण्याची ही घटना या भागात घडलेली पहिली किंवा एकुलती एक घटना आहे असे मानण्याचे काहीच कारण नाही. हे प्रकार या पूर्वीही घडलेले आहेत. 1945 सालापासून ग्वाडर जवळ निदान 3 बेटे तरी समुद्रातून वर आलेली आहेत. पाकिस्तानी शास्त्रज्ञ हे बेट म्हणजे प्रत्यक्षात चिखल बाहेर टाकणारा ज्वालामुखी आहे की काय? याची तपासणी करत आहेत. आहेत. याच्या आधीच्या कालात अशी समुद्रातून वर आलेली बेटे परत समुद्रातच गायब झालेली असल्याने हे बेट काही काळानंतर परत समुद्रात बुडण्याची शक्यता आहेच.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या सूचनेनुसार किनार्‍यापासून 3 मैल अंतरावर समुद्रातून उदय पावलेले हे बेट काही बिंदूंवर 30 फूटापर्यंत उंचीचे आहे. पाकिस्तानच्या नॅशनल इनस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेचे महासंचालक अली टाबरेझ म्हणतात की त्यांनी आपल्या सर्व्हे टीम्स या बेटावर त्याची मोजमापे घेणे, तेथील जमिनीचे व खडकाचे नमुने घेणे आणि या बेटाची नैसर्ग़िक वैशिष्ट्ये काय आहेत याची पाहणी करणे या साठी पाठवल्या आहेत. त्यांच्या मताने प्रथम दर्शनी तरी हे बेट 1999 आणि 2010 मध्ये समुद्रातून वर आलेल्या भूभागाप्रमाणेच दिसते आहे. पूर्वीच्या या दोन्ही घटनांत भूकंपासारख्या भूपृष्ठिय हालचालींनी समुद्र तळाखाली अडकलेले मिथेन वायूचे साठे मुक्त झाल्याने समुद्र तळावरील भूपृष्ठ वर उचलले गेले होते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे सध्या वर आलेल्या या बेटामधून अजूनही मिथेन वायूचे उत्सर्जन होते आहे आणि लोकांनी या बेटावर जाण्याचे टाळावे कारण समुद्र तळावर अजूनही भूपृष्ठिय हालचाल सुरू असण्याची शक्यता आहे. तसेच या बेटाच्या आसपास बोटी नेणे किंवा मासे पकडणे या गोष्टीही करू नयेत.

या रोचक घटनेमुळे एक गोष्ट मात्र सत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. समुद्रातून बेटे वर येण्यासाठी वर्षे किंवा शतके लागत नसून अशी बेटे काही मिनिटात समुद्रातून वर येऊ शकतात.

9 ऑक्टोबर 2013

ऋषिकेश Mon, 28/10/2013 - 16:07

या भूकंपाच्या झटक्यातून ग्वाडर गावातील लोक सावरतात न सावरतात तोवर त्यांना न भूतो न भविष्यति! असे दृष्य गावाजवळच्या किनार्‍यासमोरील अरबी समुद्रामध्ये दिसले.

यात न भूतो न भविष्यती असे काहीच नाही. इतरत्र सोडाच, सदर घटना अगदी त्याच भागात याआधीही घडल्या आहेत व बहुदा पुढेही घडत रहातील.
बर्‍याच बातम्यांत असे लिहिले आहे की:

The island that popped up near Gwadar is the fourth in this region since 1945, and the third during the last 15 years, he said.

(एक संदर्भ)

अर्थात तसे तुम्हीही लेखात नंतर म्हटले आहेच.

असे एखादे बेट कोणत्याही किनार्‍याहून दूर उगवले तर त्याचा ताबा जो देश आधी घेईल त्याच्या मालकीचे ते होते का?
समजा या बेटावर पाकिस्तानच्या आधी इराणी मासेमार/नुसैनिक पोचले असते तर काय?

चंद्रशेखर Mon, 28/10/2013 - 16:28

In reply to by ऋषिकेश

आजमितीला या गावात स्थायिक असलेल्या बहुसंख्य मंडळींसाठी हा असाच अनुभव होता. त्या दृष्टीने मी तसा उल्लेख केलेला आहे. ते भौगोलिक सत्य नव्हे.तसा खुलासा मी पुढे केलेलाच आहे. सामुद्रिक सार्वभौमत्त्वाच्या नियमानुसार माझ्या मते 20 मैलापर्यंतचा सर्व टापू त्या देशाच्या मालकीचा असतो.(चू.भू.द्या.घ्या.)

मन Mon, 28/10/2013 - 16:36

निसर्गात सत घटना घडतच असतील.
क्वचित दिसण्याइतपत घटना घडल्या तर त्यांची मानवी मनात नोंद होते.

शाहिर Mon, 28/10/2013 - 17:34

आपल्या कोकणामधेपण एक बेट असेच तयार झाले आहे ..सिंधुदुर्गच्या जवळ आहे ..सुनामी आयलंड असे म्हणतात ..

अरविंद कोल्हटकर Mon, 28/10/2013 - 19:09

ग्वादरबद्दल ही अजून अन्य माहिती.

अलीकडेपर्यंत, म्हणजे १९५८ पर्यंत, ग्वादर हे पर्शियन आखातापलीकडील ओमान ह्या देशाचा भाग होते. त्याचा परिणाम म्हणजे आजहि ओमानमध्ये जन्मलेले आणि नागरिक असलेले बरेच बलूची त्या देशात राहतात आणि बलूची हि एक वेगळी 'ट्राइब' (आपल्याकडचे आडनाव) ओमानमध्ये मानली जाते.

१९५८ साली काय विचार करून ओमानने हा भाग पाकिस्तानला दिला हे ठाऊक नाही पण भारताला ग्वादर ही भविष्यकाळात डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने चीनच्या मदतीने ग्वादर शहराची आणि बंदराची शिस्तशीर बांधणी केली आहे आणि बंदर चालविण्यासाठी चीनला दिले आहे. त्यामुळे चीनला अरबी समुद्रावर एक आधुनिक बंदर उपलब्ध झाले आहे. त्याचा उपयोग खनिजतेल आयातीसाठी चीन करू शकतो. भारताला पश्चिमेच्या बाजूने शह देण्यासाठीहि चीनला त्या बंदराचा उपयोग होऊ शकतो. अशा रीतीने भारताला सर्व बाजूंनी विळखा घालण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा तो एक महत्त्वाचा टप्पा आहे.

चन्द्रशेखर ह्यांनी वर्णिलेले 'चौकस' नागरिक लाकूडतोडयाच्या लाकडावर बसून त्यातील पाचर ओढून बाहेर काढणार्‍या उद्योगी 'कीलोत्पाटी'(संदर्भ पंचतन्त्र) माकडाप्रमाणे वाटतात. बाहेर पडत असलेल्या खनिज वायूवर जळती काडी टाकून काय होते हे बघण्याच्या उद्योगात वायूचा स्फोट होऊन बेटास़कट ते उडून गेले नाहीत हे त्यांचे सुदैवच म्हटले पाहिजे!

त्याच भागात खनिजतेल आणि वायु असण्याच्या शक्यतेमुळे भारताला त्या जागेपासूनचा धोका आणखीनच वाढला आहे

'न'वी बाजू Mon, 28/10/2013 - 21:30

In reply to by अरविंद कोल्हटकर

१९५८ साली काय विचार करून ओमानने हा भाग पाकिस्तानला दिला हे ठाऊक नाही...

हे म्हणणे काहीसे, 'नेमका काय विचार करून फ्रान्सने पाँडेचरी भारताला दिले हे ठाऊक नाही' असे म्हणण्यासारखे होत नाही काय?

अरविंद कोल्हटकर Tue, 29/10/2013 - 00:44

In reply to by 'न'वी बाजू

फ्रान्सने पाँडिचेरी परत देणे आणि ओमानने ग्वादर देणे ह्यामध्ये फरक आहे.

फ्रान्सने पाँडिचेरी परत दिली तेव्हा वसाहतवादाच्या इतिहासाच्या शेवटच्या अध्यायाच्या दिवसात तसे न करणे फ्रान्ससारख्या प्रगत राष्ट्राला परवडले नसते आणि शोभलेहि नसते. एकतर त्यातून भारतासारख्या मोठया राष्ट्राशी आणि एकुणातच सर्व तिसर्‍या जगाशी फटकून वागल्याचा दोष पदरी आला असता आणि पुढेमागे सैनिकी कारवाई झालीच तर भारताकडून पराभवाची नामुष्कीहि पत्करावी लागली असती. (पोर्तुगालच्या सालाझार राजवटीत हा पाचपोच नसल्याने त्यांनी तुटेपर्यंत ताणले आणि हाकलून दिले जाण्याची वेळ ओढवून घेतली. फ्रान्सने अधिक परिपक्वता दर्शविली.)

ओमान-पाकिस्तान-ग्वादर हा मामला थोडा वेगळा होता. ग्वादारला कोणीच ओमानची वसाहत मानत नव्हते आणि ओमान हा देश स्वतःहि अगदी अपरिपक्व होता. तेथील सुलतानाची आपल्या स्वतःच्या देशातहि सत्ता अनिर्बंध नव्हती. देशात शाळा-रस्ते-वीज अशाहि गोष्टी यायच्या होत्या आणि साधनसामुग्रीच्या अभावी देशहि दरिद्री होता. (तेल सापडणे अजून १०-१२ वर्षे दूर होते.) वसाहतींचे दिवस गेले, आता ग्वादर परत केलेलेच बरे असा विचार करण्याइतपत देशाचे नेतृत्व परिपक्व नव्हते. आगाखान ह्यांनी दिलेले ३ मिलियन डॉलर्स ह्यांचाच मोह सुलतानास पडला असला पाहिजे.

पाँडिचेरी आणि ग्वादर ह्यांच्या केसेसमधला हा फरक आहे.

मन Tue, 29/10/2013 - 09:22

In reply to by अरविंद कोल्हटकर

नुसतेच अंदाज आणि तर्क देत आहे:-
.
भौगोलिक सलगता आणि रक्तसंबंध्,नातेसंबंध,सांस्कृतिक साम्य इतका विचार केल्यास काय दिसते.
पाँडिचेरी फ्रान्स ह्यात भौगोलिक सलगता नाही. धार्मिक्,वांशिक एकता नाही. पर्यायाने रक्तसंबंध्,नातेसंबंध,सांस्कृतिक साम्य नगण्य. (अँग्लो इंडिअन्स जसे होते तसे आता कुणी फ्रँको-इंडिअन्स दाखवू नका प्लीझ.
टोटल भारत - पाँडिचेरीतले साम्य ह्यासमोर पाँडिचेरी-फ्रान्स साम्य नगण्य म्हणता यावे.)
.
ग्वादारमध्ये ओमानची सत्ता होती. कितीही नाही म्हटले तरी सांस्कृतिक समानता, इस्लामिक वारसा समान होता. प्लस समुद्र मार्गाने विचार केल्यास ग्वादार ते ओमान तितके काही दूर नाही.

'न'वी बाजू Wed, 30/10/2013 - 21:17

In reply to by धनंजय

(पाकिस्तानी मीडियामधील चर्चांमध्ये तरी) क्वचित कधी 'गवादर'कडे झुकत असल्यासारखा वाटला. (चूभूद्याघ्या.)

(अशाच प्रकारे, 'क्वेट्टा'चाही उच्चार काहीसा 'कोएटा'कडे झुकत असावा, अशी शंका आहे. पुन्हा चूभूद्याघ्या.)

धनंजय Wed, 30/10/2013 - 21:23

In reply to by 'न'वी बाजू

होय. कोएटा ऐकलेले आहे. (उर्दूत کوئٹہ को'अटह् = उच्चारी कोएटा, असे लिहितात. त्यामुळे आश्चर्य नाही.) गवादरही असावे बहुधा.

'न'वी बाजू Wed, 30/10/2013 - 21:53

In reply to by बॅटमॅन

ज्या अर्थी साहेबाने स्पेलिंग Ghwadar असे केलेले नाही, त्याअर्थी ते ग़वादर असण्याची शक्यता कमी वाटते.

तसेही, 'ग़वादर' असे ऐकल्याचे आठवत नाही. पुन्हा ऐकून खात्री करून घ्यावी लागेल.

'न'वी बाजू Wed, 30/10/2013 - 22:03

In reply to by धनंजय

धन्यवाद. (तशीच शंका होती.)

(अतिअवांतर: 'कोएट्या'तला 'क' कोणता असावा? बिगरनुक्तेवाला 'क', की नुक्तेवाला 'क़'?)