'मी तसे म्हटलेच नव्हते' - मनु यांचे घुमजाव
पाटलिपुत्र- (फाल्गुन वद्य ११, ख्रिस्तपूर्व ३०१७) - 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' या वादग्रस्त विधानामुळे नुकतेच वादाच्या भोवर्यात सापडलेले श्री. मनु यांनी आता 'आपण तसे बोललोच नव्हतो' असा पवित्रा घेतला आहे.
अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या 'मनुस्मृती' या श्री. मनु यांच्या नव्या पुस्तकात त्यांनी 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' ही व अशाच प्रकारची मुक्ताफळे उधळली होती. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मनु यांच्या 'त्या' विधानावर चांगलाच गदारोळ झाला. स्त्री संघटनांनी या विधानावर हरकत घेऊन मनु यांच्या आश्रमावर मोर्चा नेला. प्रख्यात विदुषी गार्गी व मैत्रेयी यांनी या विधानावर जाहीररीत्या आक्षेप घेतले. 'सर्व जगाचे आज नेतृत्व करणार्या पुरोगामी भारतवर्षात ख्रिस्तपूर्व तिसाव्या शतकात देखील अशा जुनाट अनार्य विचारांचे समर्थन करणारे विचारवंत असावेत ही गोष्ट लज्जास्पद आहे' असे उद्गार मैत्रेयी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काढले आहेत. तर गार्गी यांनी 'स्त्रीला स्वातंत्र्य असावे की नसावे' या विषयावर जाहीर वाद करण्याचे निमंत्रण मनु यांना दिले. 'वादात हार झाल्यास मनु यांनी माझे शिष्यत्व पत्करून माझ्याप्रमाणेच दिगंबर अवस्थेचा स्वीकार करावा. जर का ते जिंकले तर मी त्यांची शिष्या बनून आजन्म कटिवस्त्र व उत्तरीय परिधान करून राहीन' असे जाहीर आव्हान त्यांनी मनु यांना दिले.
या सर्व गदारोळानंतर गांगरलेल्या मनु यांनी आता कोलांटी उडी मारली आहे. 'माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. माझ्यावर टीका करणार्यांनी 'ते' विधान नीट वाचून पहावे. मी 'स्त्रीला स्वातंत्र्य "देऊ नये"' असे म्हणालो नव्हतो, तर बिच्चार्या स्त्रीला आधी बापाच्या, नंतर नवर्याच्या, त्यानंतर पुत्राच्या अधीन रहावे लागते, तिला स्वातंत्र्य कधीच "मिळत नाही", असे मला म्हणावयाचे होते, असा खुलासा त्यांनी आज बोलावलेल्या भूर्जपत्रकार परिषदेत केला. 'माझ्या हितशत्रूंनी माझी बदनामी करण्यासाठी रचलेले हे कारस्थान आहे', असा टोलाही त्यांनी धौम्य ऋषींचे नाव न घेता लगावला. मनु यांच्या खुलाशानंतर आतापुरते तरी हे वादळ तात्पुरते शमले आहे.
दरम्यान, मनु यांनी शूद्रांबद्दलही त्यांच्या पुस्तकात काही आक्षेपार्ह लिहिल्याने अखिल भारतीय दस्यू-शूद्र समाज संघटनेच्या (शंबूक गट) कार्यकर्त्यांनी या वेळी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. परंतु शिवाशिव होईल या भीतीने ते लांबवर उभे असल्याने त्यांचे नेमके काय गार्हाणे होते ते आमच्या प्रतिनिधीला समजू शकले नाही.
मस्त
छोटेखानी, पण गमतीदार लेख. त्याकाळी कांदा संस्थान होतं की नाही माहीत नाही, पण असतं तर तिथल्या पार्श्वभूमीवर फिट झाला असता. एकंदरीतच लेखाचा टंग इन चीक टोन आवडला.
ख्रिस्तपूर्व तिसाव्या शतकात देखील अशा जुनाट अनार्य विचारांचे समर्थन करणारे विचारवंत असावेत ही गोष्ट लज्जास्पद आहे
हे मस्तच. एका वाक्यात दोन वेगवेगळे विनोद साधलेले आहेत.
ख्रिस्तपूर्व तिसाव्या शतकातही साउंड बायटी, दोनशे शब्दी बातम्या देण्याची पद्धत होती हे पाहूनही गंमत वाटली.
याबाबतीत इतर काही संशोधन
याबाबतीत इतर काही संशोधन उजेडात आलेलं आहे. त्यानुसार सर्वात महत्त्वाचे शतक असल्यामुळे शून्यापासून सुरूवात होते. त्यामुळे ख्रिस्तपूर्व ० ते १०० वर्ष यांस ख्रिस्तपूर्व शून्यावे शतक असे म्हणत. त्यामुळे गणितीयदृष्ट्या 'न'वी बाजू यांचा मुद्दा योग्य असला तरी बाबा घासकडवी यांचा प्रतिसाद ऐतिहासिकदृष्ट्या योग्य आहे. एवढे महत्त्वाचे संशोधन अलिकडेच कांदा संस्थानात श्रीमती .... यांनी केले आहे. यात संशोधिकेचे नाव गुप्त ठेवण्याचा भाग नसून कांदा संस्थानातील ग्रंथालयात लागलेल्या आगीतून जी कागदपत्रं वाचली त्यात हे संशोधन आणि संशोधन करणारी व्यक्ती स्त्री होती एवढीच बाब समोर आलेली आहे. यात संशोधकाचे वैवाहिक तपशीलही उदा: कु. का सौ. हे ही लक्षात येण्यापलिकडे जळले आहेत.
लिबर्टी नाही.
लिबर्टी नाही. गार्गी दिगंबरावस्थेत रहात असे हे वाचलेले आहे. संदर्भ शोधून सांगतो.
_________
(update) - गार्गीचा फॅशन सेन्स हा माझ्या लेखी उहापोह करण्याइतका महत्वाचा मुद्दा नाही. पण एकदोन सदस्यांनी विचारणा केल्यामुळे संदर्भ द्यायचे उत्तरदायित्व माझ्याकडे येत आहे म्हणून काहीवेळ गुगलले. या जागी काहीसा(१) रेफरन्स मिळत आहे. अधिक शोध घेत बसण्याची गरज वाटत नाही, (कारण हेच- काय फरक पडतो?) जिज्ञासूंनी ह. भ. प. आसाराम बापू यांना विचारून पहावे :)
(१) - निदान लेखक मनचेच काही फेकत नाही हे दाखवण्याइतका. मला तेवढे पुरे.
फॅशन सेन्स! आसाराम बापू
फॅशन सेन्स! =)) =))
आसाराम बापू फेकत असले तरी फरक पडत नाही. अशा प्रकारच्या विडंबनांसाठी चांगला कच्चा माल मिळतो हे काय कमी आहे?
---
१. आज विकसित देशांत पाहिल्यास शिकलेले लोक, कमी किंवा न शिकणार्या लोकांच्या तुलनेत प्रमाणबद्ध शरीरं राखून असतात. अविकसित्/विकसनशील देशांमधे शिक्षण आणि स्वच्छता, स्वतःच्या शरीराची काळजी घेणे यांचा स्पष्ट संबंध दिसून येतो.
२. आज न्यूड मॉडेल्स म्हणून काम करणारे (अती?) प्रमाणबद्ध शरीर असणारे असतात, शरीर, त्वचेची व्यवस्थित काळजी घेणारे असतात.
३. नग्न चित्र, शिल्प ही भारतीयांसाठी नवीन नाहीत. शंकराच्या पिंडीपासूनच सुरूवात करता येईल.
४. तस्मात तेव्हाच्या काळातली विदुषीचा फॅशन सेन्स मिनिमॅलिझमकडे झुकणारा होता यात फारसं आश्चर्यकारक वाटत नाही.
कालाय तस्मै नमः
गार्गी याज्ञवल्क्याशी केलेल्या संवादामुळे माहिती होती (वाचून, ऐकून) - आता २१ व्या शतकात आंतरजालावर ती दिगंबरावस्थेत रहात होती की नव्हती यावर चर्चा होताना पाहून वाईट वाटल. समजा असली ती दिगंबरावस्थेत रहात, तरी त्यातून या लेखातल्या विडंबनाला बळ मिळण्याव्यतिरिक्त काय मोठी भर पडणार आहे आपल्या जीवनात?
असो. कालाय तस्मै नमः
तुमच्या माझ्या जीवनात काहीही
तुमच्या माझ्या जीवनात काहीही फरक पडणार नाही हे मान्य आहे
गार्गीबद्दल मला कमालीचा आदर आहे
तिच्या बुध्दीमत्तेचा पांडित्याचा हेवा वाटतो
तिच्या दिगंबराअवस्थेवरुन मला चर्चा सुरु करायची नव्हती
तिच्या जीवनाचा हा पैलू मला माहीत नव्हता
ती writer's liberty असावी अस मला वाटल त्यामुळे गार्गीबद्दलचा ऊल्लेख खटकला
अर्थात writer's liberty मलाही मान्य आहेच आणि तस मी वरती स्पष्ट केलय
आणि हे खरं असल्यास मी फक्त संदर्भ मागितला एवढच
बाकी आपल्या मताचा आदर आहेच
जाई, मी मूळ लेखकाने या
जाई, मी मूळ लेखकाने या विषयावर लिहिण्याबद्दल बोलत होते - तो प्रतिसाद नेमका तुमच्या प्रतिसादाखाली पडल्यामुळे मी तुमच्यावर आक्षेप घेतेय असं तुम्हाला स्वाभाविकच वाटलं असेल. चूक माझी आहे - संस्थळाचा अनुभव नाही - त्यामुळे प्रतिसाद कुठे गेला तो गेल्यावरच कळत. एकदा लेखकाने लिहिले आहे म्हटल्यावर तुम्ही संदर्भ मागणं योग्यच आहे. गैरसमज नसावा.
'गार्गी दि.अवस्थेत रहात असत
'गार्गी दि.अवस्थेत रहात असत किंवा कसे' याच्यावर कोणी चर्चा करत आहे, असे वाटत नाही. हा धागा गार्गीबद्दल नाही. काही वाचकांना ही 'फॅक्ट' वाचून आश्चर्य वाटले आणि तसे खरोखरच होते का, याविषयी त्यांनी विचारणा केली आणि मी ते खरे आहे, एवढे सांगितले.
गार्गीच्या दिगंबर असण्या-नसण्यावरून तिची विद्वत्ता इथे कुणी जोखत नाहिये.
काय 'भांडताय' गं उगाच?
आतिवास आणि जाई, काय 'भांडताय' गं उगाच? :)
आतिवासचा प्रतिसाद लेखावरचाच आहे. तो जाईच्या लेखनानंतरचा असल्यानं तिच्या प्रतिसादाखाली आला. त्यात काय विशेष? त्यावर जाईनं जे लिहिलं तेही सरळच आहे की. पण टोकदार वाटतंय खरं. एक स्मायली टाकायला कष्ट पडले तिला. छ्या... :)
त्या मैत्रेयी - गार्गीला काय वाटेल? जरा त्यांचा तरी विचार करा.
आता दोघीही माझ्याशी भांडू नका म्हणजे मिळवली. नाही तर... असो. :)
अवांतर पृच्छा
अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या 'मनुस्मृती' या श्री. मनु यांच्या नव्या पुस्तकात
मनु स्मृती? हा श्री. मनु यांच्या 'मेमोआर्स'सारखा काही प्रकार असावा काय?
वाचावयास घेतल्यास आत काही रसरशीत मालमसाला, स्क्यांडले वगैरे सापडावीत काय? कोणाची उघडी पाडलेली बिंगे वगैरे?
कृपया अभिप्राय त्वरित कळवावा. पुढेमागे कधी वाचण्याचे वगैरे कष्ट घेण्यालायक प्रकार आहे काय, ते ठरवण्याचा प्रयत्न करतोय.
कात्यायनी का क्या हूआ?
'सर्व जगाचे आज नेतृत्व करणार्या पुरोगामी भारतवर्षात ख्रिस्तपूर्व तिसाव्या शतकात देखील अशा जुनाट अनार्य विचारांचे समर्थन करणारे विचारवंत असावेत ही गोष्ट लज्जास्पद आहे' असे उद्गार मैत्रेयी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काढले आहेत
पत्रकाचे प्रुफरिडिंग याज्ञवल्क्याने केले असावे काय? तसेच कात्यायनीचे मत कळले असते तर जास्त बरे झाले असते, पण मैत्रेयी आल्यापासुन कात्यायनीला 'व्हॉइस' नसल्याचे याज्ञवल्क्य आश्रमात बोलले जात आहे.
कालमहिमा, अर्थात कालाय तस्मै नमः
डेटलायनीतील कालगणनापद्धती सूचक आहे.
ख्रिस्ताब्दानुसार उलटे कालमापन* करण्याची तत्कालीन पद्धती लक्षात घेता, तत्कालीन समाजाच्या एकंदरच प्रतिगामित्वाचे आश्चर्य वाटत नाही.
अवांतरः वरील बाबीच्या प्रकाशात या बातमीचा मथळा लक्षात घेता एक कुतूहल निर्माण होते. प्रस्तुत 'घुमजाव' केल्याने परिणामी मनु हा तत्कालीन पहिलावहिला पुरोगामी ठरावा काय?
* सिकंदर ३२७ साली हिंदुस्थानात आला, तर ३२३ साली मेला, वगैरे वगैरे. (या निरीक्षणाबद्दल श्रेयअव्हेर: प्रस्तुत निरीक्षण हे श्री. चिं वि. जोशी (दिवंगत) यांजकडून साभार ढापलेले आहे.)