Skip to main content

मराठीपणा : एक समस्या

मराठीपणा : एक समस्या


राहुल सरवटे 

 

Bhaiyyaji Joshi


(भय्याजी जोशी यांनी नुकतंच एक विधान केलं : मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक अभ्यासक डॉ. राहुल सरवटे यांनी या पार्श्वभूमीवर मराठीपणा म्हणजे काय याचा घेतलेला हा एक धांडोळा.)

भय्याजी जोशींचं काय चुकलं? मुंबई हे एक बहुभाषिक शहर आहेच की. पण तसं पाह्यलं तर बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता हीसुद्धा बहुभाषिक शहरं आहेत. पण कुणी असं सुचवत नाही की, या शहरांत राहणाऱ्या लोकांना कानडी, तमिळ किंवा बांग्ला येणं आवश्यक नाही. पण मराठीबाबत असं सतत सुचवण्यात येतं. त्यामागचं राजकारण आणि कारस्थानं उपसण्यात मला इथे रस नाही. माझ्या दृष्टीनं काहीशी लक्षवेधी (आणि इंग्रजीत क्यूरिअस म्हणतात तसं) बाब आहे ती म्हणजे, मुंबईत मराठी भाषा येणं आवश्यक नाही असे उद्गार मराठी भाषक जोशी इतर मराठी भाषकांशी मराठीत बोलताना काढताहेत. मराठी भाषा बिनमहत्त्वाची आहे अश्या आशयाचा संवाद हिंदी किंवा गुजराती भाषेत चाललेला नसून तो चक्क मराठीत घडतोय. असं उडिया किंवा मल्याळम किंवा इतर कुठल्याही भाषेत घडेल का? मग मराठीतच हे का घडतं? या घटनेची संगती लावण्याचा माझा प्रयत्न आहे.


भौगोलिक किंवा भाषिक प्रांत हे दीर्घकालीन ऐतिहासिक प्रक्रियांची फलितं असतात. प्रांत ही काही स्थिर किंवा अपरिवर्तनीय गोष्ट नाही. त्यांचे आकार-उकार, आशय आणि तपशील अस्थिर असतात आणि देश नावाच्या रचनेशी विविध प्रांतांचे असलेले संबंधही निरनिराळे असतात. दक्षिण भारतात आढळणारी भाषेबद्दलची तीव्र भावना भारतात इतरत्र अभावानेच दिसते. म्हणजे तमिळताई (तमिळ भाषेचा पुतळा) किंवा तेलगु टल्ली (तेलगु भाषेचा पुतळा) यांसारखा मराठी भाषेचा पुतळा पाहण्याची कल्पना आपल्या पचनी सहजासहजी पडणं अवघड आहे. खेरीज तमिळ राष्ट्रवाद भारतीयत्वाच्या जाणिवेशी काहीश्या संघर्षाच्या पावित्र्यात विकसित झाला. मराठीपणाची ऐतिहासिक जडणघडण पाहता त्यात भारतीय असण्याशी कुठलाही तणाव नाही. उलट, मराठी जाणिवेत महाराष्ट्रीय असणं आणि भारतीय असणं हे एकमेकांपासून कायमच अभिन्न मानलं गेलं. आपण काही उदाहरणं पाहू या. 


नोव्हेंबर १९२४ मध्ये विनायक दामोदर सावरकर आणि मौलाना शौकत अली यांची मुंबईत भेट झाली. त्यांच्या संवादात थोडासा ताण आल्यावर मौलाना जरा चिडूनच सावरकरांच्या मराठी असण्यावर घसरले. ‘तुम्हां मराठ्यांत हाच प्रांतिक अभिमान फार असल्यामुळे हिंदुस्थानचा राष्ट्रीय प्रश्न तुम्हांला समजावून देण्यात मला मोठीच अडचण पडते. हिंदुस्थान हे एक आपले राष्ट्र असे प्रेम तुम्हांस वाटतच नाही’


प्रत्युत्तरात सावरकर म्हणाले :  


“तुम्ही महाराष्ट्रीयांवर निष्कारण दोषारोप केलात. शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्ययुद्ध केले ते कांही केवळ महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रांस मुक्त करण्यासाठीच नसून उभ्या भरतखंडातील क्षेत्रांस मुक्त करण्यासाठीच होते. हे पाहा. आम्ही स्वतः वीस वर्ष्यांपूर्वी जो ध्वज उभारला तो केवळ महाराष्ट्राचा नसून हिंदुस्थानचा होता हे काय तुम्हांस माहित नाही? रानडे, गोखले, टिळक ह्यांनी केवळ महाराष्ट्रीय चळवळ केली? कोणती राष्ट्रीय चळवळ केली नाही? अहो, गेल्या पन्नास वर्ष्यांत महाराष्ट्रात ज्या काही मोठमोठ्या चळवळी झाल्या, त्यातली एकही प्रांतिक नव्हती. गेल्या पन्नास वर्ष्यांत महाराष्ट्रावर असा कोणताही विशेष आघात झालेला नाही. बंगालची फाळणी झाली, महाराष्ट्र बंगालइतकाच तिच्याविरुद्ध लढला. जालियनवाला बाग झाला, आज ज्या समितीकरता तुम्ही येथे आला तो बंगालचा ऑर्डीनन्स झाला, इतर प्रांतांवर पडलेल्या प्रत्येक आघातांच्या, त्या प्रांतांच्या खांद्याला खांदा लाऊन प्रतिकार करण्यातच महाराष्ट्राची गेली वीस वर्षे खर्ची पडली आहेत. हे हिंदू संघटन देखील महाराष्ट्रास पंजाब सिंध बंगाल इतके अवश्य नाही. महाराष्ट्रात हिंदूंची संघटना व शक्ती पूर्वीचीच अजून थोडीबहुत उरलेली आहे. महाराष्ट्राने हे इतर प्रांतांवर उपकार केलेले नाहीत. आम्ही दोन आहोत असे आम्हांस वाटतच नाही. त्यांचे दु:ख आम्हांस आमचेच वाटते. तरीही हिंदुस्थानच्या एकराष्ट्रीयत्वाच्या कल्पनेचा प्रभाव आणि संगोपन ज्या महाराष्ट्रात प्रामुख्याने झाले, त्याच महाराष्ट्रास राष्ट्रैक्याचा शत्रू म्हणणे नि तेही आजपर्यंत राष्ट्रीय सभेसारख्या संस्थेचाही द्वेष करणाऱ्या व जातवार प्रतिनिधीत्वासाठी हपापलेल्या मुसलमानांनी म्हणणे म्हणजे केवळ कृतघ्नपणा होय.”  


अखिल भारतीयत्वाच्या प्रेरणेतून साकारलेले दोन्ही राष्ट्रवाद – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत ‘हिंदी राष्ट्रवाद’ (इथे हिंदी म्हणजे भाषा नाही. हिंदी म्हणजे ‘हिंद’शी जोडलेला. “हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा!”) आणि सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वगैरेंचा हिंदू राष्ट्रवाद – यांचं बीजारोपण आणि विकास महाराष्ट्रातच झाला. या दोन्ही चौकटींतच महाराष्ट्राची प्रांतीय जाणीव आकाराला आली. पर्यायानं, मराठी असणं हे भारतीय असण्यापासून पृथक (भिन्न) असू शकलं नाही. महाराष्ट्रात ज्या इतर महत्त्वाच्या चळवळी झाल्या, उदाहरणार्थ फुले-प्रणित सत्यशोधक चळवळ, पुढच्या टप्प्यावरची ब्राह्मणेतर चळवळ, बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व केलेली दलित चळवळ, ह्यांच्या केंद्रस्थानी राष्ट्र किंवा प्रांत यापेक्षा निराळी मानवतावादी जाणीव होती. अशा रितीनं महाराष्ट्रीय राजकारणाची रचना ह्या प्रकारच्या व्यापक राजकीय जाणिवेतून आकाराला आली. संकुचित प्रांतवादी धारणा महाराष्ट्रात रुजू शकली नाही. उदाहरणार्थ, वैदर्भीय नेते रामाराव देशमुख यांचे १९४८ सालचे हे उद्गार पाहा : “आपला वारसा, आपली परंपरा, आणि आपला इतिहास हा देशाच्या धारणेत मिसळून जावा अशीच मराठ्याची इच्छा असते. मराठ्यांमध्ये प्रांतवाद नाहीच, असलाच तर तो अगदी किंचित!” 


भारतीय राजकारणाच्या दोन धृवांचे दोन अध्वर्यू – सावरकर आणि विनोबा भावे – यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विरोध होता ही अतिशय लक्षणीय बाब आहे. महाराष्ट्र हा भारतीय संस्कृतीरूपी समुद्रात विलीन होणाऱ्या अनेक नद्यांपैकी एक अशी विनोबांची कल्पना होती, तर सावरकरांना महाराष्ट्र भारताचा खड्गहस्त वाटत होता. या दोन कल्पनांमधली भिन्नता सोडली तरी समान धागा असा की, या दोघांच्याही दृष्टीनं महाराष्ट्राचं अस्तित्व भारतीय संदर्भातच समूर्त होत होतं. महाराष्ट्राची अनन्यसाधारणता त्याच्या भारतात विलीन होण्यातच मानली गेली. अगदी लालजी पेंडश्यांसारख्या मार्क्सवादी भूमिका मानणाऱ्या लेखकाचं म्हणणंही पाहण्यासारखं आहे. ‘महाराष्ट्राचे महामंथन’ या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा पहिला दीर्घ इतिहास मांडणाऱ्या ग्रंथात पेंडसे लिहितात की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भारताच्या एकात्मिक असण्याची जाणीव कधीही क्षीण झाली नाही. स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय विकासच इतका झाला होता की, देशाची एकता ह्या ध्येयापासून महाराष्ट्र कधीही ढळला नाही.   


हे देशाशी एकरूप होणं इतरही संदर्भात ठळकपणे दिसतं. भारतीय साहित्याला दिलेल्या मराठी भाषिकांच्या योगदानाचा विचार इथे प्रस्तुत ठरेल. दत्तात्रेय बेंद्रे हे कन्नड साहित्याचे मुकुटमणी ठरले. काका कालेलकरांनी गुजरातीत विस्तृत लिखाण केलं, प्रभाकर माचवे हे सुविख्यात हिंदी लेखक होते, गजानन माधव मुक्तिबोध यांनी हिंदीत एक विचक्षण प्रतिभेची कविता निर्माण केली, तर सखाराम देऊसकरांची देशेरकथा बांग्ला साहित्यात आजही जिवंत आहे. ही महाराष्ट्रीय मंडळी आपल्या विशिष्ठ स्थळकाळाशी तादात्म्य पावून भारतीय साहित्याचं दालन समृद्ध करत होती. गांधीवादी-समाजवादी धारणेच्या साने गुरुजींनी मांडलेली आंतरभारतीसारखी संकल्पना अशाच मूल्यांवर दृढ उभी होती. आत्माराम मोडक गुरुजींसारख्या काबाडकष्ट करून दक्षिण भारतात हिंदी भाषेचा प्रसार करणाऱ्या अनेकांचे श्रम भारतापायी रुजू केले गेले.    


एकंदर, मराठी प्रांतवाद – किंबहुना त्याचा अभाव – एका अश्या भूमिकेवर स्थिर झाला होता ज्यात त्याचं सांस्कृतिक आणि सामाजिक हितही डावललं गेलं तरी ते स्वीकरणीय होतं. त्यामुळे, भैय्याजी जोशींसारखा मराठी भाषक आपल्याच भाषेचं महत्त्व कमी लेखतो ही घटना अजिबातच आश्चर्यकारक नाही. मराठी भाषिकांच्या भारताशी असलेल्या नात्यात ही गोष्ट जणू अनुस्यूत असावी इतकी ती नैसर्गिक भासते. किमान आज महाराष्ट्राला वाटणारा सल तरी देशानं समजून घ्यायला हवा. त्यावर फुंकर घालायला हवी. 


महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्रीचक्रधर हे मूळचे गुजरातचे. पण त्यांनी त्यांच्या शिष्यांना संदेश दिला तो महाराष्ट्रात राहण्याचा. ते म्हणतात : “महाराष्ट्री असावे: महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र: महंत म्हणजे थोर”. त्यांच्या शिकवणुकीचा संग्रह “सूत्रपाठ” प्रसिद्ध आहे. पुढे तेराव्या शतकात त्यावरची एक टीका “आचारस्थळ” रचली गेली. त्यात महाराष्ट्राचे पुढील वर्णन आहे: “महाराष्ट्र सात्विक: तेथचे जड पदार्थ तेही सात्विक: तेथ असता शारीर मानसिक उपद्रव नुपजती: आणिक देशी शारीर मानसिक उपद्रव उपजला असे तो महाराष्ट्री शमे: तेथचा वारा: झाडे: पाऊस तोही सात्विक: तेणे सकळही उपद्रव समेती: आपण अनाचार न करी: आणिकाशी करू नेदी ते महाराष्ट्र: धर्म सिद्धी जाय ते महाराष्ट्र:” 
 

आजच्या महाराष्ट्रात काय सात्त्विक उरलंय हे एक चक्रधर जाणोत. पण महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांनी ह्या गुजराती भाषक संताप्रमाणे महाराष्ट्राला आणि मराठीला आपलं मानावं अशी अपेक्षा कधी महाराष्ट्र करू शकेल का?  

(राहुल सरवटे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत. ते अहमदाबाद विद्यापीठात प्राध्यापक आहेत.)

मूळ इंग्रजी लेखाचा दुवा 

Rajesh188 Sat, 15/03/2025 - 21:44

कोणत्या ही भाषेचे महत्व नष्ट होते ते फक्त आणि फक्त सरकारी धोरण मुळे म्हणजे कायद्या च्या आडून सक्ती केल्या मुळे किंवा.

 

स्व भाषेचे महत्व जो मूर्ख भाषिक गट समजत नाही त्या मुळे.

 

 

  महाराष्ट्र मध्ये ही दोन्ही कारण लागू होतात.

 

 

मी सातारा जिल्ह्यात राहतो माझ्या कडे 1910 चे  जमीन खरेदी केल्याचे  खरेदी खत आहे.

आणि ते मोडी लिपीत आहेत.

. म्हणजे महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा मोडी लिपीत तेव्हा लिहली जात होती.

तशीच आज पण मराठी मोडी लिपी मध्ये लिहली जात असती तर हिंदी नी महाराष्ट्र मध्ये घूस खोरी केलीच नसती.

1950 ला तेव्हा काँग्रेस सरकार च होते मोडी लिपी शिकवण्यास बंदी घातली.

काँग्रेस मराठी चीं पहिली मारेकरी करी आहे.

 

नंतर त्री भाषे च नाटक करून महाराष्ट्र मध्ये हिंदी शाळेत शिकवायला लागले.

परत काँग्रेस च मराठी चीं खरी मारेकरी आहे हे सिद्ध होते.

 

.

मराठी लोकांचा सर्वात मोठा अवगुण म्हणजे ह्यांना स्व भाषा च गर्व नाही.

.युद्धात पराभव झालेल्या लोकांची जी मानसिकता असते ती मराठी लोकांची मानसिक अवस्था आहे.

 

पण फरक एक च आहेत मराठी आणि महाराष्ट्र विजयी राष्ट्र आहे.

देशातील सर्वात प्रगत राज्य सर्व बाबतीत.

आर्थिक, सामाजिक, नैतिक. सर्व बाबतीत.

 

पण स्वाभिमान नाही.

त्ता मुळे भैया जोशी सारखे.

उनाड, अडाणी उत्तर भारतील लालूव, मुलायम सारखे, मूर्ख हिंदी news चॅनेल.

मराठी ला आव्हान देतात.

 

  एक दोन निर्णयमराठी लोक आणि महाराष्ट्र नी घेतले तर सर्वाना आपली लायकी समजेल.

त्री भाषा सूत्र महाराष्ट्र मध्ये लागू केले जाणार नाही.

फक्त मराठी आणि english.

 

महाराष्ट्र मधील सर्व मेडिकल कॉलेज मधील प्रवेश परीक्षा फक्त मराठी मधी च होतील.

 

राष्ट्रीय प्रवेश परीक्षा धोरण महाराष्ट्य नी नाकारले पाहिजे.

 

केंद्रीय कार्यालयात भरती कोठून पणा करा पण सर्वाना मराठी आलेच पाहिजे.

 

आणि ह्या साठी असाच विचार असणाऱ्या बंगाल,पंजाब, आणि दक्षिण भारतीय राज्य नी युती करून दबाव गट स्थापन केला पाहिजे 

'न'वी बाजू Sun, 16/03/2025 - 02:07

In reply to by Rajesh188

. म्हणजे महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा मोडी लिपीत तेव्हा लिहली जात होती.

तेव्हा (आणि त्यापूर्वीही) महाराष्ट्रात (/मराठीभाषक प्रदेशात) मराठी भाषा ही मोडी आणि बाळबोध (देवनागरी?) अशा दोन्हीं लिप्यांतून लिहिली जात असे, असे ऐकिवात आहे. (चूभूद्याघ्या.)

(हं, कोठली लिपी कोठल्या प्रयोजनाकरिता वापरावी, याबद्दल काही संकेत होते, बहुधा. परंतु, दोन्हीं लिप्या समाजात एकसमयावच्छेदेकरून प्रचलित असाव्यात.)

(सांगण्याचा मतलब, देवनागरी ही काही मराठीवर नव्याने लादलेली लिपी नसावी.)

(किंबहुना, माझी समजूत जर चुकीची नसेल, तर, मोडी लिपी ही हात फारसा न उचलता चटाचट लिहिता येण्याच्या सोयीकरिता बनविलेली एका प्रकारची शॉर्टहँड (खरे तर शॉर्टहँड म्हणण्यापेक्षासुद्धा कर्सिव) होती. त्यामुळे, लिखाणाशी मोठ्या प्रमाणात जेथे संबंध येत असे, अशा व्यवसायांत (नि गोटांत) ही लिपी अधिक प्रचलित असावी. (म्हणूनच कायदेशीर दस्तऐवज, झालेच तर पोथ्या, वगैरे मोडीत असावेत.) इतर ठिकाणी बाळबोध लिपीला (देवनागरीला) प्रत्यवाय नसावा.)

(आणि, हा फेनोमेनॉन मराठीपुरताच मर्यादित नसावा. माझ्या कल्पनेप्रमाणे, उत्तरेतसुद्धा, (हिंदी, मैथिली वगैरे भाषांकरिता) सामान्य वापराकरिता देवनागरी तर विशेष लिखापढी करणाऱ्या गोटांतून (सोयीकरिता) कैथी (कायस्थी?) अशा दोन लिप्या एकसमयावच्छेदेकरून प्रचलित असणे, हा प्रकार होताच. (चूभूद्याघ्या.))

तशीच आज पण मराठी मोडी लिपी मध्ये लिहली जात असती तर हिंदी नी महाराष्ट्र मध्ये घूस खोरी केलीच नसती.

(मोडी लिपीचे (शिक्षणातून) संपूर्ण उच्चाटन हे मलाही फारसे पटलेले नाही, परंतु) आपले हे वरील लॉजिक अजब आहे.

म्हणजे, भाषा वा लिपी ही ती वापरणाऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून असावी, की ‘बाहेरच्या’ लोकांपासून प्रतिकाराकरिता? (मग भले वापरणाऱ्यांची सोय-गैरसोय खड्ड्यात गेली, तरी चालेल?)

मुळात मोडी लिपीचे शिक्षणातून जेव्हा उच्चाटन केले गेले, तेव्हा मोडी लिपी ही तशीही व्यवहारात (असलीच, तर) अत्यंत मर्यादित वापरात होती. मग केवळ तेवढ्याकरिता आणखी एक लिपी शिकायचे ओझे विद्यार्थ्यांवर कशाला, म्हणून, तथा व्यवहारातसुद्धा सुसूत्रीकरण आणण्यासाठी, सर्वांनीच सर्वच व्यवहारांत (अगोदरच सर्वाधिक प्रचलित असलेली) बाळबोध (अर्थात देवनागरी) लिपी वापरावी, तथा शाळेत मोडी शिकविणे बंद करावे, अशी काहीशी त्या निर्णयामागची विचारधारा असावी. (चूभूद्याघ्या.)

(अर्थात, हीदेखील विचारधारा मला तितकीशी पटलेली नाही. म्हणजे, व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी (मराठीकरिता अगोदरच सर्वाधिक प्रचलित असलेली) देवनागरी लिपी ही सर्वच व्यवहारांत (ज्या थोड्या ठिकाणी सामान्यतः मोडी वापरली जाते, तेथेसुद्धा) वापरावी, हे म्हणणे एक वेळ समजण्यासारखे आहे. मात्र, (व्यवहारातून मोडी लिपीचे उच्चाटन जरी केले, तरीही) शालेय शिक्षणातून मोडीचे संपूर्ण उच्चाटन का करावे? त्याने खास महाराष्ट्राच्या अशा एका सांस्कृतिक वारश्यापासून विद्यार्थ्यांना आपण कायमचे वंचित करीत नाही काय? गेला बाजार काही प्राथमिक पातळीवरील तोंडओळख करून द्यायला नक्की काय हरकत आहे? फार फार तर त्यात उत्तीर्ण होणे हे वैकल्पिक ठेवता आले असते.

आणि, एकदा व्यवहारात निरुपयोगी ठरली, म्हटल्यावर शिकवायची कशाला, म्हणत असाल, तर मग, प्रत्येक गोष्ट ही व्यवहारात उपयोगासाठीच शिकायची असते (अथवा शिकली पाहिजे), असे थोडेच आहे? मग शाळेत संस्कृत नक्की कशाकरिता शिकवितात? शाळेत इतिहास शिकवितात, त्याचा व्यवहारात नक्की काय नि किती उपयोग होतो? फार कशाला, शाळेत मराठी शिकवितात; ठीक आहे, महाराष्ट्रात नि त्यातूनसुद्धा मराठी शाळेत नक्कीच शिकवायला पाहिजे, उपयोगी आहे. त्यामुळे, ‘छगन, कमळ बघ’ किंवा ‘पहाट झाली, भैरू उठला, बैलांना वैरण घातले, औताला जुंपले’ वगैरे शिकवायला कोणाची फारशी हरकत नसावी. (मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाचा व्यवहारात बैलाशी किंवा औताशी फारसा संबंध येत नसावा, किंवा वैरण म्हणजे काय नि ते कशाशी खातात हे त्याला ठाऊक असण्याचे काहीही कारण नसावे, वगैरे क्षुल्लक तपशील तूर्तास सोडून देऊ.) परंतु, मराठी विषयात जुन्यानव्या मराठी गद्यपद्यातील वेचे, झालेच तर मोरोपंतांच्या कविता, हे सर्व नक्की काय म्हणून शिकवायचे? त्याने व्यवहारात नक्की कोणाला नि काय उपयोग होतो? असे प्रश्न उद्भवू शकतातच. त्यामुळे, ‘व्यवहारात उपयोगी वा निरुपयोगी’ हा एखादी गोष्ट शिकण्यामागे वा शिकविण्यामागे निकष होऊ शकेलच, असे नाही. असो.)

(अवांतर: भारतात राष्ट्रीय एकात्मतेकरिता सर्व भाषांनी आपापल्या लिप्या त्यागून देवनागरी अंगीकारावी, अशा प्रकारचा एक प्रस्ताव महात्मा गांधींनी एकदा (आपल्या लिखाणातून) मांडला होता. भारताच्या सुदैवाने, त्या प्रस्तावाला फारसे कोणीच गंभीरपणे न घेता त्याकडे दुर्लक्ष केले. गंमत म्हणजे, पाकिस्तानाकरिता अशाच प्रकारचा एक प्रस्ताव साक्षात कायदेआझम जीनांनी आणि तोही भर ढाक्यात मांडला होता. (जीनांचा मुख्य प्रस्ताव संपूर्ण पाकिस्तानाने उर्दू ही एकमेव भाषा अधिकृत म्हणून अंगीकारावी, अशा प्रकारचा जरी असला, तरी, नपक्षी, (पूर्व पाकिस्तानात) बंगाली भाषादेखील पारंपरिक बंगाली लिपीत न लिहिता अरबी लिपीत लिहावी, असाही एक उपप्रस्ताव त्याबरोबर अंतर्भूत होता.) पूर्व पाकिस्तानातील भाषिक चळवळीची आणि पाकिस्तानाच्या भविष्यातील फुटीची ती नांदी होती.

महाराष्ट्रातील मोडीचे उच्चाटन हा मात्र तशातला प्रकार म्हणता येणार नाही. कारण, महाराष्ट्रात, मराठीकरिता देवनागरी ही तशीही अगोदरपासून नि सर्वाधिक वापरात होती; ती मराठीवर कोणीही लादलेली नव्हती. मोडी ही (देवनागरीबरोबरच) केवळ काही मर्यादित गोटांत नि मर्यादित व्यवहारांपुरती वापरात असलेली एक अतिरिक्त लिपी होती. त्यामुळे, देवनागरीबद्दल मराठीभाषकांत तरी कोणाला काही आक्षेप असण्याचे काहीच कारण नव्हते.)

(अतिअवांतर: महात्मा गांधी आणि कायदेआझम जीना हे दोघेही गुजराती नेते होते, हा एक तर निव्वळ योगायोग तरी असावा; नपक्षी, स्वतःला विश्वगुरू समजण्याची गुजराती नेत्यांची परंपरा ही तेव्हापासूनची असावी. चालायचेच.)

तर सांगण्याचा मतलब (नि हरदासाची कथा मूळ पदावर आणायची झाली, तर) महाराष्ट्रात मोडी शिकविणे बंद केल्यामुळे महाराष्ट्रात परप्रांतीयांचा लोंढा येतो, हे म्हणणे म्हणजे, अमेरिकेतील (सरकारी) शाळांमधून कर्सिव लिपी (मराठीत: रनिंग हँड) शिकविणे बंद केल्यामुळे अमेरिकेत स्थलांतरितांचा लोंढा येतो, असे म्हणण्याइतकेच अतार्किक आहे. असो.

1950 ला तेव्हा काँग्रेस सरकार च होते मोडी लिपी शिकवण्यास बंदी घातली.

काँग्रेस मराठी चीं पहिली मारेकरी करी आहे.

ठीक. (तत्कालीन) काँग्रेस सरकार हे वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ट!!!!!!, झालेच तर मराठीद्वेष्टे नि महाराष्ट्राघातकी होते, असे तूर्तास (वादाच्या सोयीकरिता) गृहीत धरू. (मला त्याबद्दल काहीही प्रत्यवाय नाही.)

मात्र, ही जुनी गोष्ट झाली. त्यानंतर, अलिकडच्या काळात भाजपची, झालेच तर शिवसेनेची अनेक सरकारे येऊन गेली. पैकी कोणी मोडी लिपीचे पुनरुज्जीवन (व्यवहारात नाही, तरी गेला बाजार शिक्षणात तरी) करण्याचे मनावर का घेतले नसावे, हे काही लक्षात येत नाही.

(वास्तविक, अयोध्येतील राममंदिराचे पुनरुज्जीवन करण्याच्या तुलनेत, महाराष्ट्रातील शाळांतून मोडीचे पुनरुज्जीवन करणे हे अधिक सोपे तथा कमी खर्चिक असावे, नाही काय?)

मराठी लोकांचा सर्वात मोठा अवगुण म्हणजे ह्यांना स्व भाषा च गर्व नाही.

आपल्याला बहुधा अभिमान म्हणायचे असावे.

हिंदीत ज्याला गर्व म्हणतात, त्याला मराठीत अभिमान म्हणतात, नि हिंदीत ज्याला अभिमान म्हणतात, त्याला मराठीत गर्व म्हणतात. मराठीतला गर्व/हिंदीतला अभिमान हा वाईट समजला जातो, तर मराठीतला अभिमान/हिंदीतला गर्व चांगला.

आपण मराठी आहात, अशी माझी समजूत आहे. आपल्यासारखी मराठी माणसेच जर मराठीची मोडतोड (नि तीदेखील हिंदीबरहुकूम) करू लागली, तर मग घुसखोर हिंदीभाषकांना तरी दोष नक्की कोठल्या आधारावर द्यायचा?

तर आहेत हे दिवस असे आहेत. आणि आता हे असेच चालायचे!

shantadurga Thu, 27/03/2025 - 21:03

In reply to by Rajesh188

आत्ताच्या सरकारने बालभारती अभ्यासक्रम रद्दबातल करून सीबीएसईचा अभ्यासक्रम पहिलीपासून मुलांवर लादण्याचा निर्णय घेतला आहे किंवा ते तसा विचार करत आहेत. मग शालेय शिक्षणापासूनच मुलं महाराष्ट्रीय इतिहास, भूगोलापासून दूर होणार! यापेक्षा काँग्रेस बरी म्हणायची की!

'न'वी बाजू Thu, 27/03/2025 - 22:13

In reply to by shantadurga

हे कधी घडले?

हे धक्कादायक आहे!

नाही म्हणजे, सीबीएसईचा अभ्यासक्रम हा बहुतांश राज्यशिक्षणमंडळांच्या तुलनेत कित्येक पटीने सरस असायचा, असे निदान आमच्या काळी तरी (काँग्रेसयुगात वगैरे) मानले जायचे. निदान त्या काळी तरी कदाचित ते बव्हंशी खरेही असावे. (आजकाल अभ्यासक्रमांचे भगवीकरण/उजवीकरण होऊ लागल्यापासून तेदेखील कितपत खरे आहे, याबद्दल अंमळ साशंकच आहे, परंतु तरीही.) विशेषेकरून स्पर्धात्मक परीक्षांत वगैरे, झालेच तर राज्याबाहेरील/राष्ट्रपातळीवरील prestigious वगैरे म्हणविणार्‍या उच्चतर शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशांत वगैरे सीबीएसईतून बाहेर पडलेले विद्यार्थी राज्यशिक्षणमंडळातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत लीलया बाजी मारायचे, अशीही एक धारणा होती.

(वर म्हटल्याप्रमाणे, कदाचित यात तथ्यही असावे. सीबीएसईचा अभ्यासक्रम राज्यशिक्षणमंडळांच्या अभ्यासक्रमांच्या तुलनेत थोडासा पुढच्या पातळीवरचा असावा, बहुधा. कारण, मला आठवते, त्याप्रमाणे, महाराष्ट्राबाहेर पडल्यावर विद्यापीठाच्या पहिल्या वर्षात जे कोर्सेस सामोरे आले, त्यापैकी बरेच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी बारावीपर्यंत बव्हंशी अगोदरच उरकलेले असायचे, नि विद्यापीठात आल्यावर ते त्यांच्याकरिता केवळ उजळणीस्वरूप असायचे. झालेच तर, सीबीएसईमध्ये आपल्या राज्यशिक्षणमंडळांइतके सढळ मार्कवाटपाचे धोरण नसावे. (महाराष्ट्र आणि (तत्कालीन) आंध्रप्रदेश यांची शिक्षणमंडळे याबाबत कुविख्यात असावीत. म्हणजे, कोठल्याही वर्षाच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये, या बोर्डांतील पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याच्या गुणांची टक्केवारी जर पाहिली, तर ती उच्चनव्वदीत वगैरे असे. (कदाचित अजूनही असेल.) सीबीएसईमध्ये हे होणे दुरापास्त. त्यामुळे, मार्कामार्काकरिता त्या विद्यार्थ्यांना लढावे लागत असावे, असा अंदाज आहे.) शिवाय, (निदान महाराष्ट्र बोर्डात तरी) अभ्यासक्रम वर्षानुवर्षे पाणी वाढवून पातळ करीत जाण्याकडे कल होता, असे (निदान मी शाळेत जात असतानाच्या काळात तरी) जाणवले.

तामिळनाडूसारख्या काही राज्यांत परिस्थिती थोडी वेगळी असावी. (तत्कालीन ऐकीव माहितीप्रमाणे) तेथे, राज्यशिक्षणमंडळाशी संलग्न असलेल्या शाळांबरोबरच, सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळाही भरपूर असाव्यात. ('केंद्रीय विद्यालये' नव्हेत, तर (केंद्रीय विद्यालयांबरोबरच) सीबीएसईशी संलग्न असलेल्या इतर खाजगी शाळासुद्धा. केंद्रीय विद्यालये या सीबीएसईशी संलग्न तथा जरा बर्‍यापैकी स्थितील्या शाळा असल्या, तरी, ती म्हणजे बव्हंशी सरकारी नोकरीतल्या (विशेषेकरून वारंवार बदली होणार्‍या सरकारी नोकरीतल्या) लोकांच्या पाल्यांची राखीव कुरणे असावीत; इतरेजनांना या केंद्रीय विद्यालयांत प्रवेश अपवादात्मक परिस्थितीतच दिला जात असावा. (चूभूद्याघ्या.)) मात्र, लोकांचा कल शक्यतो सीबीएसईशी संलग्न शाळांकडे अधिक असावा, असे वाटते.)

परंतु, एवढे म्हटल्यावरसुद्धा, महाराष्ट्राचे (किंवा कोठल्याही राज्याचे) सीबीएसईकरण करावे, किंवा, राष्ट्रात सरसकट एकच एक अभ्यासक्रम असावा, हे मला व्यक्तिशः पटत नाही. स्थानिक शिक्षणमंडळांचा दर्जा वाढविण्याकरिता प्रयत्नशील अवश्य असावे; मात्र, केंद्रीयीकरण होऊ नये, शिक्षण हे स्थानिक अधिकारांतच राहावे, असे राहूनराहून वाटते.

पण लक्षात कोण घेतो?

विवेक पटाईत Tue, 25/03/2025 - 12:02

मराठी आणि हिन्दी दोन्ही देवनागरीत असल्याने हिन्दी भाषिक लोकांना लिहलेली मराठी 80 ते 90 टक्के कळते. दिल्लीच्या सरकारी कार्यालयांत ही मराठी आमदार आणि खासदारांचे अधिकान्श मराठीतील पत्रांचे आंगल भाषेत अनुवाद करण्याची गरज भासत नाही.   महाराष्ट्रातील अधिकान्श मध्यम वर्गातील लोकांची मुले शाळेत मराठी भाषा शिकत नाही. जो पर्यन्त मेडिकल,वास्तुशास्त्र, इंजीनियर,  इत्यादि तांत्रिक  विषय मराठीत शिकविल्या जात नाही. मराठी मुलेच मराठी शिकणार नाही. 

माझ्या सारख्या दिल्लीकराच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मराठी पण म्हणजे, कधी दक्षिण भारतीयांचा द्वेष, कधी भैयांचा द्वेष आणि गुजराती लोकांचा द्वेष हा तर स्थायी भाव.  मजेदार म्हणजे सर्वात जास्त बांगलादेशी घूसखोर महाराष्ट्रात आहे, पण त्या बाबतीत अधिकान्श मौन बागळले जाते. 

बाकी मराठीपण जपण्यासाठी मराठी भाषेची आवड असली पाहिजे. सुरवातीचे काळात माझ्या लेखनात थोक भावात मराठीतील चुका दाखविल्या जात होत्या. पण मी कधीच त्याकडे लक्ष दिले नाही. मला माझ्या मराठीचा,  धेडगुजरी का होईना अभिमान आहे, तो मी नेहमी जपतो. पण तसे करताना मी इतर भाषी लोकांचा द्वेष करत नाही.  

स्वयंभू Wed, 26/03/2025 - 11:49

लेख आवडला. तार्किक पातळीवर मुद्दे बरोबर आहेत.

मराठी अस्मिता अणुकुचिदार होऊ शकत नाहीत दक्षिणेसारख्या. कारणं बरीच आहेत. त्यातही हिंदी आणि मराठी लिप्या देवनागरी असल्याने मराठी भाषा येणाऱ्याला हिंदीसाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. आपण सहजपणे मिसळून जातो हिंदी पट्टा जवळ असल्याने. आर्थिक बाबतीत भरपूर संधी उपलब्ध आहेत म्हणून येणाऱ्या स्थलांतरित लोंढ्यांमुळे इकडं स्थायिक झालेल्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात गेली. त्यामुळे सांस्कृतिक गोष्टी सहजगत्या लादल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ नवरात्र उत्सवात अस्सल मराठी भोंडला (हादगा) कधीकाळी खेळला जायचा. आताशा दांडियाच्या इव्हेंटबाजीने तालुका पातळीवर घुसखोरी केली आहे. दुसरं महत्त्वाचं भीमरूपी महारुद्रा म्हणणारी एक पिढी होती हनुमान जयंतीच्या काळात ती एकाएकी हनुमान चालीसा पठण वर आणली गेली. कधीकाळी तुरळक कुटुंबं छटपुजेदरम्यान दिसायची. गेल्या काही वर्षांत ट्रस्टच्या वतीने मोठमोठ्याने इव्हेंट सेलेब्रेशन सुरू झाले छटपुजेचे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. हे महत्त्वाचे पहिलं कारण सांस्कृतिक दृष्टीकोनातून.


दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रात बदलणारी भौगोलिकदृष्ट्या मराठी भाषा अन् बोली. कोकणी, खान्देशी, वऱ्हाडी, वैदर्भीय आणि मराठवाडा जास्त प्रभावशाली आहेत मराठी पणाच्या तुलनेत. यानंतर मराठी माणसाचे जातीपातीच्या भिंती उभ्या केल्यामुळे जे भेद आहेत त्यामुळे मराठीचा एकजिनसी ठशीवपणा येत नाही. दक्षिणेकडील राज्यात सरासरी दोन भाषांमध्ये बोलणारी मंडळी अधिक आहेत. तमिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम. तसं महाराष्ट्रात मराठी व्यतिरिक्त सहजपणे हिंदी भाषा सर्रास वापरण्याचा पायंडा पाडला आहे. महाराष्ट्रात गुजराती, सिंधी, मारवाडी समाज सहजपणे मराठी हिंदी आत्मसात करतो आणि मिसळून जातो. मात्र मराठी मराठी जयघोषात त्यांना उगाचंच वेगळं केलं जातं बनिया म्हणून.

दक्षिणेकडील विशेषतः तमिळी अस्मिता मला का कोण जाणे उगाचंच कोकणस्थांसरखी तुसडेपणाची वाटते. भले तमिळ भाषा संस्कृत पेक्षा जूनी असेल. मात्र संस्कृत भाषा पुरातन काळापासून संस्कारित केलेली आहे शिक्षणासाठी मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन म्हणून. त्यामुळे तिचा प्रचार, प्रसार अधिक झाला भारतात तमिळ पेक्षा. संस्कृत आणि तमिळ यावर एक वेगळी चर्चा होईल. मात्र अजूनही खूप लोकांना दक्षिणेकडील म्हणजे मद्रासी हेच डोक्यात भरलेले असते. माझ्यामते ब्रिटिशांच्या प्रेसिडेन्सी बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता अशा असल्याने खूप लोकांचा समज दक्षिणी म्हणजे मद्रासी हाच होता. नंतर तेलुगू अस्मिता सिनिअर एनटीआर वगैरे मुळं मेनस्ट्रिम मध्ये आल्या. असो.

दक्षिणेकडील अस्मिता आणि मराठी अस्मिता जमीन अस्मानी फरक आहे. महाराष्ट्रात तरी मराठीपणा हा जातीच्या कचाट्यातून सुटणार नाही.

Rajesh188 Wed, 16/04/2025 - 13:40

In reply to by स्वयंभू

हिंदी भाषिक दोन ते तीन राज्य मधील नालायक राज्य सरकार, फालतू राजनीती ह्या मुळे आलेलं मागास ले पण ह्या मुळे ह्या राज्यतून होणारे migration ते पण मोठ्या प्रमाणात त्या मुळे फक्त महाराष्ट्र अस्वस्थ नाही तर गुजरात, पंजाब सहीत पूर्ण दक्षिण भारत अस्वस्थ आहे.

खूप गंभीर प्रश्न आहे.
पण ब्रिटिश जसे बोलले भारतीय राज्य करण्यास नालायक आहेत.
तसेच आपण वागत आहोत.
इतक्या गंभीर प्रश्न चे गंभीर्य भारतीय राज्य कर्त्यांना कळत नाही.

shantadurga Fri, 28/03/2025 - 12:53

https://indianexpress.com/article/cities/pune/maharashtra-state-board-s…
टेक्स्ट बुक्स नक्की कशी तयार करणार हे कळत नाही. मराठी माध्यमातून शिक्षण चालू ठेवावेच लागेल. निर्णय घेण्यात  घिसाडघाई होते आहे बहुतेक.

'न'वी बाजू Fri, 28/03/2025 - 18:33

In reply to by shantadurga

त्या बातमीप्रमाणे, महाराष्ट्रातील शाळा सरसकट सीबीएसईशी संलग्न होणार नसून, राज्यशिक्षणमंडळाचा अभ्यासक्रम तथा पाठ्यपुस्तके ही टप्प्याटप्प्याने सीबीएसईच्या धर्तीवर तथा पातळीवर आणण्यात येणार आहेत. मात्र, राज्यातील शिक्षणव्यवस्थेचा ताबा हा बव्हंशी राज्यशिक्षणमंडळाकडेच राहणार आहे. यात नक्की वाईट काय आहे, ते कळत नाही.

राहता राहिली गोष्ट, ती माध्यमाची. त्याबद्दल बातमी काहीशी संदिग्ध आहे. म्हणजे, शिक्षणातील मराठीचे महत्त्व जसेच्या तसे राहील, तथा राज्यातील सर्व खाजगी तथा सरकारी शाळांना, मराठी शिकविण्यासंबधी सूचना देण्यात आलेली आहे, एवढेच म्हटलेले आहे. याचा अर्थ राज्यातील मराठी माध्माच्या शाळा जशाच्या तश्या चालू राहणार (आणि, तदनुषंगाने, नवीन अभ्यासक्रम तथा पाठ्यपुस्तके ही मराठीतूनसुद्धा उपलब्ध असणार) असा घ्यायचा, की नवीन अभ्यासक्रम तथा पाठ्यपुस्तके ही (केवळ) इंग्रजी माध्यमातून असणार (नि तदनुषंगाने राज्यातील सर्व शाळा या इंग्रजी माध्यमाच्या होणार), मात्र, मराठी हा एक अनिवार्य विषय राहणार, असा घ्यायचा, ते कळत नाही.

राज्यातील सर्व शाळा सरसकट इंग्रजी माध्यमाच्या करणे हे मला वाटते फारसे व्यवहार्य (किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने निश्चित फायद्याचेही) नसावे. शिवाय, त्यातून

(१) राज्यातून सरसकट घाऊक भावात इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्यास अशा शाळांतून शिकविल्या जाणाऱ्या इंग्रजीचा (तथा इंग्रजीतून शिकविल्या जाणाऱ्या इतर विषयांचा) दर्जा काय असेल,

(२) भले तुम्ही राज्यातील सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या कराल, नि त्याकरिता सर्व पाठ्यपुस्तकेही इंग्रजीतून छापाल; परंतु, राज्यभर सर्वत्र याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तेवढी संसाधने (मुख्यत्वेकरून मानवी संसाधने; पात्र तथा प्रशिक्षित शिक्षक) हाताशी उपलब्ध आहेत काय? ही (मानवी) संसाधने काही एका रात्रीत निर्माण होणार नाहीत,

(३) मराठी हा (अनिवार्य, परंतु) एकच विषय ठेवल्यास, शिक्षणातील मराठीच्या दर्जावर त्याने काय परिणाम होईल,

असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

उलटपक्षी, विज्ञान तथा (काही अंशी) गणितासारख्या परिभाषासंपृक्त विषयांमध्ये, परिभाषेचे ओढूनताणून मराठीकरण केल्याने काय बट्ट्याबोळ होतो, तेही पाहिलेले तथा अनुभवलेले आहे. (सावरकर be damned.) एकाच medulla oblongataला कधी लंबमज्जा म्हणायचे, तर (परिभाषा-अनुवादकांचे पीक बदलले, की) कधी पश्चमस्तिष्कपुच्छ. ठीक आहे, medulla oblongata यातून मराठी मुलाला काही अर्थबोध होणे कठीण आहे, हे समजू शकतो, परंतु, लंबमज्जा किंवा पश्चमस्तिष्कपुच्छ म्हटल्याने तरी त्याच मराठी मुलाच्या आकलनात अशी कोणती वाढ होते? (Medulla oblongata निदान आपल्या जागी (शतकानुशतके) स्थिर तरी आहे!) शिवाय, मराठी माध्यमातून शिकलेल्या नि पश्चमस्तिष्कपुच्छाच्या आहारावर वाढलेल्या विद्यार्थ्याने पुढे त्या (किंवा संबंधित) विषयात उच्च शिक्षण जर घेतलेच, तर तेथे त्याची गाठ medulla oblongataशीच पडणार आहे, आणि तेव्हा त्याला तिची माहिती असूनही तोंडओळख नसेल. झालेच, तर पुढे त्या विद्यार्थ्याने जर त्या क्षेत्रात व्यवसाय करायचा ठरवला, तर तेथे त्याला जी दुनिया भेटणार आहे, ती आख्खी व्यावसायिक दुनिया तिला medulla oblongataच म्हणणार आहे; लंबमज्जा किंवा पश्चमस्तिष्कपुच्छ नव्हे! थोडक्यात, शाळेतून बाहेर पडल्यावरच्या उर्वरित आख्ख्या आयुष्यात प्रस्तुत विद्यार्थी पश्चमस्तिष्कपुच्छ (किंवा लंबमज्जा) चुकूनही म्हणणार नाही; म्हणालाच, तर medulla oblongataच म्हणेल. मग मुळात medulla oblongataच का शिकवू नये? फुकाच्या अस्मितेपोटी (किंवा परिभाषा-अनुवादकांच्या खाजेपायी), कोणीही वापरीत नाही अशा शब्दांचे बुडबुडे कृत्रिमरीत्या निर्माण करून भाषा “समृद्ध” करण्याचा हा शेपटाने कुत्रा हलविण्याचा उद्योग नक्की काय म्हणून करायचा?

सांगण्याचा मतलब, विज्ञान तथा गणितासारखे विषय हे, मानवी संसाधने permitting, (निदान माध्यमिक पातळीवरील शाळांपासून तरी) इंग्रजी माध्यमातून शिकविलेले बहुधा अधिक उपयुक्त ठरावेत. बाकी, इतिहासासारखे विषय मराठी माध्यमातून शिकविण्यास प्रत्यवाय नसावा. (तेथेसुद्धा, ‘भूक! भूक! भाकरी द्या!’ असे ओरडत येणाऱ्या शेतकऱ्यांना, ‘चटणीभाकर मिळत नसेल, तर शिरापुरी खा!’ म्हणत सामोरी ठाकणारी मारी आंत्वानेत, झालेच, तर ब्रिटनमधील हुजूर आणि मजूर पक्ष, वगैरे भानगडी उद्भवतातच; परंतु, एक तर ते विनोद म्हणून चालून जाऊ शकतात, तथा, पुढील आयुष्यात त्याने फारसे नुकसान होत नाही. असो चालायचेच.)

shantadurga Thu, 17/04/2025 - 22:00

In reply to by 'न'वी बाजू

https://www.ndtv.com/india-news/maharashtra-rolls-out-nep-hindi-now-man…
हे प्रकरण वाटते तितके सरळ नाही. महाराष्ट्र सरकारने पहिली पासून सरसकटपणे हिंदीची सक्ती केली आहे. म्हणजे महाराष्ट्रात (मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील) मुलांना हिंदी इंग्रजी आणि मराठी ह्या तीनही भाषा शिकाव्याच लागणार. गेली
बरीच वर्षं CBSE मधे देखिल इंग्रजी आणि आणखी केवळ एका भाषेचा पर्याय (हिंदी/संस्कृत/इतर भारतीय भाषा/परदेशी भाषा) उपलब्ध होता. आता असं रहाणार नाही. हिंदीची सक्ती करून महाराष्ट्र सरकारने काय साधले आहे?! दिल्लीपुढे लोटांगण की हिंदी भाषिकांचे लांगूलचालन? या निर्णयावर बराच गदारोळ चालू आहे.

shantadurga Thu, 17/04/2025 - 22:31

In reply to by shantadurga

https://epaper.loksatta.com/article/Pune-marathi-Late-epaper?OrgId=174c…
ह्या बातमीप्रमाणे 'पाठयक्रम' निर्मिती NCERT आणि 'पाठ्यसाहित्य' निर्मिती बालभारती करणार असं म्हणत आहेत! म्हणजे काय शिकवायचं यावर केंद्राचं नियंत्रण येणार.

Rajesh188 Fri, 28/03/2025 - 14:20

जगात उगाचच युद्ध होत नाहीत.
धर्म संपला का त्या धार्मिक गटाचे अस्तित्व संपले.
(आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक )
त्याच प्रमाणे भाषा संपली की भाषिक गटाचे अस्तित्व पण संपेल.

वाटतो तितका हा विषय सोपा नही.

महाराष्ट्य च्या मूर्ख सरकार नी cbc अभ्यासक्रम चालू केल्या मुळे महाराष्ट्र आणि मराठी लोकांचे नक्की अस्तित्व संपणार आहे.

अमेरिका, ब्रिटन का english भाषेला कोणताच ऑपशन देत नाहीत कारण त्यांना चांगले माहित आहे.
English भाषेचे अस्तित्व आपल्या देशात नष्ट झाले की आपल्या देशाचे पण अस्तित्व नष्ट होईल.

चिमणराव Sun, 30/03/2025 - 06:09

आपल्याला आवडलेला इतिहास किंवा इतिहासातला आवडणारा भाग वाचणे ही मराठी माणसाची खोड आहे.
त्याला प्रकाशकांनाही सहाय्य केल्यावाचून गत्यंतर नसते. कारण तीच पुस्तके विकली जातात.
मुंबई कशी झाली, कोणी कशासाठी निर्माण केली, तिथे पहिले लोक कोण आले हे सांगणारी पुस्तकेही आहेत. तर हे वाचल्यावर कळेल की मराठीचा त्यात वरचष्मा होता का? एवढेच काय तर मुंबई म्हणायला अवघड जाते म्हणून ब्रिटिशांनी त्याला बॉम्बे म्हटले यावर मराठी माणसाचे ठाम { पण चुकीचे} मत आहे. ते आणि इतर समज तसेच चालू ठेवणे मराठीपणा आहे.

Rajesh188 Sun, 30/03/2025 - 18:55

In reply to by चिमणराव

अमेरिका, ब्रिटन.
ह्या देशाकडे बाहेर च्या देशातून आलेल्या लोकांनी फक्त कुजबुज जरी केली की आम्हाला.
हिंदी, मराठी, जपानी, उर्दू, etc भाषा अमेरिकेत पाहिजेत ट्रम्प जोडे मारून स्व देशात हाकलून देईल.
भारतात विविध भाषी राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याला आपली भाषा प्रिय आहे.
भाषा विवाद टाळण्यासाठी काळजी घेणे सर्वोच्च प्राधान्य नसेल तर कठीण स्थिती निर्माण होऊ शकते

'न'वी बाजू Sun, 30/03/2025 - 22:44

In reply to by Rajesh188

कर्नाटक सरकारने बेळगावात मराठीवर बंदी घालावी, की मराठीचा आग्रह धरणाऱ्या तेथील लोकांना जोडे मारून महाराष्ट्रात हाकलून द्यावे?

चिमणराव Sun, 30/03/2025 - 06:17

हुशार मुले सर्वच लवकर शिकतात. अभ्यासक्रम कोणताही असो, विषय कोणताही असो. कोणती गोष्ट कितव्या वयाला विद्यार्थी/ मुले सहज आत्मसात करू शकतात, एखादा विषय कोणत्या वर्गाला ( पहिलीत, पाचवीत, आठवीत वगैरे) शिकवला पाहिजे यालाही मर्यादा आहेत. अणुविघटन, ऊर्जा यांचे उदाहरण देता येईल. गणितातील त्रिकोणमिती हेसुद्धा आहे. काही गोष्टींचं तर व्यवहारात स्थान आणि उपयुक्तता तर समजतच नाही. तरीही घोकंपट्टीने शिकतात.
असो.