दहीहंडी
कालच संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे खास करून मुंबई, ठाणे आणि नाशिक येथे जोशात आणि भक्तिभावात दहीहंडीचा उत्सव पार पडला, म्हणजे साजरा झाला (पडला आणि पर्यायाने जखमी झाला तो गोविंदा)
काही वर्षांपूर्वी दिवसा उजेडी साजरा होणारा हा सण, आता उत्सव बनून संध्याकाळ, अगदी रात्र झाल्याशिवाय रंगातच येतच नाही (ढंगात तर तो केव्हाही नव्हताच). चमचमणारे लाईटस, एलइडी टीवीस आणि कमाई म्हणून मिळणारी भरगच्च रक्कम ह्याचं आकर्षण कोणाला नसणार.
वेगवेगळ्या चाळीतली, मंडळातली, शाखेतली, गडातली तसेच व्यायाम शाळेतली युवा शक्ती, अगदी रात्री उशिरापर्यंत भाड्याने घेतलेल्या (रेंटवर घेतलेल्या) ट्रक्स आणि बसेस भरभरून ह्या उत्सवात सामील झाली होती. आपलं कमावलेलं कौशल्य दाखवीत होती. त्यांच्यातल्या ह्या कौशल्याला, गुणांना प्रोत्साहन द्यायला चित्रपट सृष्टीतील आणि राजकीय पक्षातील नेते मंडळी उपस्थित होती.
आता ही पथके असणार तरी किती, त्यात मानाच्या आणि कमाई मिळवून देणाऱ्या हंड्या तरी असणार किती, तरीही जो उत्साह आणि जी रग त्या युवकांत होती ते पाहण्यासारखे होते. हा उत्साह अगदी सगळ्या न्युज वाहिन्यांवरून देखील ओसंडून वाहत होता.
काही प्रश्न -
इतर राज्यात खासकरून कृष्णाचे आणि त्याच्या लीलांचे आपल्या लोकांएवढे एवढे भक्त नाहीत ही बाब खरी आहे काय. अगदी कृष्णाचा जन्म जिथे झाला त्या राज्यातदेखील अशी भव्यदिव्य हंडी होत नाही. मग दहीहंडी महाराष्ट्रात उत्सव म्हणून एवढा प्रसिध्द होण्यामागे किंवा करण्यामागे काय मुख्य कारण असावे.
दहीहंडी हा जर सामाजिक बांधिलकीचा, भक्तीभावाचा उत्सव आहे इतर उत्सवांसारखा, तर मग ह्या उत्सवा दरम्यान जे अनेक (अ)पारंपरिक उद्योगधंदे होतात त्यासाठी मार्गदर्शक तत्वे / बंधने कोणी आखावीत आणि विशेष म्हणजे ती कोणी पाळावीत. ज्या वाईट पद्धतीने आपले हे सण साजरे होतात खासकरून दहीहंडी आणि गणेशोत्सव, दरवर्षी बहुतेक लोकांकडून ऐकायला मिळते - "हे बघा मराठी लोकांचे धंदे" हे वाक्य अगदी मराठी लोकांच्या तोंडून देखील ऐकलेले आहे.
होते काय की उत्सवात बेधुंद झालेल्या लोकांना हे वाक्य ऐकू येत नाही पण मला ऐकू येते. दरवर्षी वाटते की कदाचित ह्या वेळी असं काही ऐकू येणार नाही पण प्रत्येक वेळेला ते वाक्य आणि "ते धंदे" ह्याची पातळी खाली जात आहे.
ह्या पथकांची युवा शक्ती जो उत्साह आणि शक्ती प्रदर्शन दहीहंडी मध्ये करते तो उत्साह आणि व्यायाम शाळेत कमावलेली हि शक्ती बाकीच्या ३६४ दिवस कुठे असते.
समजा पुढच्या वर्षी दोन मानाच्या हंड्या बांधल्या आहेत, एक राजकीय पक्षाने प्रायोजित केलेली आणि दुसरी मी प्रायोजित केलेली, दोन्ही कडील बक्षिसांची रक्कम समान आहे. पण माझ्या हंडीचे बक्षीस जिंकण्यासाठी मानवी जीवाला धोका होईल असे थर लावण्याऐवजी तुम्ही वर्षभर केलेलं फक्त एक सामाजिक काम दाखवा ज्याचे मुल्य समाजाप्रती निदान एका लाखाचे आहे (उत्तीर्ण विद्यार्थांना वाटल्या जाणाऱ्या वह्या व्यतिरिक्त)
काय वाटतं काय होईल. किती गोविंदा पथके निदान सलामी जाउद्या, उपस्थिती तरी दर्शवतील.
अपघात झालेल्या गोविंदांची मलमपट्टी आणि जास्त नुकसानीची भरपाई सरकारने का करावी, त्या मंडळांनी का करू नये. जर कोणी मृत झालाच तर त्या मंडळावर किंवा प्रायोजकावर मनुष्य वधाचा गुन्हा का चालवू नये.
एक अवांतर प्रश्न -
अशा अनेक सणांसाठी दिली जाणारी प्रत्येक व्यक्तीमागील देणगी रक्कम आता जीवन विम्याच्या किंवा राष्ट्रीय बचत पत्रांच्या वार्षिक हप्त्यांएवढी किंवा जास्त झाली आहे.
आम्ही सामान्य जनतेने दिलेली ह्या देणग्या सामाजिक बांधिलकीने दिलेल्या आहेत अशा समजून सरकार ह्या देणग्या कर मुक्त करणार का? म्हणजे आम्ही आफिसात ह्या पावत्या दाखवून कर सवलत का मिळवू नये.
दहीहंडी
>>दहीहंडी हा जर सामाजिक बांधिलकीचा, भक्तीभावाचा उत्सव आहे इतर उत्सवांसारखा,
याविषयी साशंक आहे.
>>इतर राज्यात खासकरून कृष्णाचे आणि त्याच्या लीलांचे आपल्या लोकांएवढे एवढे भक्त नाहीत ही बाब खरी आहे काय. अगदी कृष्णाचा जन्म जिथे झाला त्या राज्यातदेखील अशी भव्यदिव्य हंडी होत नाही. मग दहीहंडी महाराष्ट्रात उत्सव म्हणून एवढा प्रसिध्द होण्यामागे किंवा करण्यामागे काय मुख्य कारण असावे.
माझ्या समजुतीनुसार दहीहंडी हा कोकणातील बाल्या* लोकांचा उत्सव आहे. हे लोक विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात गिरणीकामगार म्हणून आणि इतर घरकामासाठी गडी म्हणून मुंबईत स्थायिक झाले. त्यांच्या निमित्ताने हा उत्सव मुंबईत सुरू झाला आणि तेथून तो मराठी वस्ती असलेल्या उपनगरांत पसरला. त्यांच्या या कौशल्याला उत्तेजन देण्याच्या दृष्टीने हंड्या उंच लावून बक्षिसे ठेवण्याची प्रथा सुरू झाली. पुढे हिंदी चित्रपटांनी त्याचे ग्लॅमरस प्रदर्शन केले. आणि तो अधिक प्रसिद्ध झाला.
मुंबई उपनगरांबाहेर हा सण फारसा नव्हता. मी ८०-८४ काळात पुण्यात होतो तेव्हा दहीहंडी हा प्रकार पुण्यात ऑलमोस्ट नव्हताच. एखाद-दुसरी दहीहंडी असे आणि तीही एक-दीड मजल्याहून उंच नसे. टीव्हीच्या प्रसारामुळे आणि मुंबईतल्या सहा-सात थरांच्या हंड्यांमधून प्रेरणा घेऊन पुणे वगैरे इतर शहरांतही हा उत्सव पसरला. (मराठी संस्कृती** वगैरेची फोडणी त्याला मिळाली असावी).
*यामध्ये कुठल्या समाजगटाचा उपमर्द करण्याचा हेतु नाही. (हे लोक कुठल्या एका विशिष्ट जाती-जमातीतले असतात किंवा कसे याबद्दलही माहिती नाही).
** ठाण्यात नवरात्रोत्सव हाही पूर्वी नगण्य होता. मी गुजराती वस्तीत रहात होतो आणि तिथेही गरबा/दांडिया खेळणे हा तुरळकच प्रकार होता. जागोजागी देवी बसवणे आणि रस्त्यावर दांडिया खेळणे हा प्रकार ८४-८५ पश्चात हिंदू जनजागरण मोहिमेअंतर्गत ठाण्यात रुजवला गेला. पुढे त्यातली आर्थिक गणिते दिसल्यावर तो झपाट्याने वाढला.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दहीहंडी
दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र हे आता पूर्वीसारखे उत्सव राहिले नाहीत. तर ते स्थानिक संस्थानिकांचे 'गुंडोत्सव' झाले आहेत. लाखांचे पोशिंदे असलेल्या आमदार, खासदार वा नगरसेवकाने लुबाडलेल्या पैशातून अतिउंच हंडी बांधायची, त्यांत मालमसाला भरण्यासाठी नट, आयटेम साँग्सवर नाचणार्या बाया आणायच्या आणि फेटे बांधून स्वतःला भरपूर मिरवून घ्यायचे. या 'गोविंदांनी दिवसभर ट्रकमधून वा बाईकवर तीन तीन जणांनी बसून , यथेच्छ हुल्लडबाजी करत शहरभर, रहदारीचे सगळे नियम तोडून भटकायचे. हंडीसाठी मुख्य रस्तेही बंद करुन, बसचा मार्ग बदलायला लावून लोकांच्या हालात भर पाडायची आणि मर्दुमकी गाजवल्याचा आव आणायचा.
गणेशोत्सवात ही पुन्हा हुल्लडबाजीलाच प्राधान्य! नवरात्रात रासलीला! सगळ्या उत्सवांमधे शक्य तेवढा मोठा आवाज करुन स्वतः आनंद उपभोगायचा आणि सामान्य जनतेला त्रास द्यायचा हीच मुख्य वृत्ती दिसते. एखादा देश रसातळाला जातो तेंव्हा त्यानंतर तरी सुधारणेची आशा असते. पण तळच नसलेल्या या नैतिक घसरगुंडीला काही अंत नाही.
सुविधा
कुणीतरी सुविधा द्यारे प्रतिसाद वाचनखुणेसारखा साठवायची.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अधिक वाचन -
अधिक वाचन - http://www.health.harvard.edu/blog-extra/the-adolescent-brain-beyond-rag...
आणि त्यातलाच हा एक भाग -
Some critics, even if they welcome the Supreme Court decision for other reasons, have complained that this research stereotypes adolescents and provides a biological rationalization for irresponsible behavior.
गोविंदांसाठी विमा,
गोविंदांसाठी विमा, सुरक्षिततेच्या सोयी यासाठी प्रशासनाला नियमन करता येईल. निदान त्या दिवशी होणारे अपघात आपल्याला समजतात तरी, सरावाच्या वेळेस अपघात होत असतील तर ते आपल्यापर्यंत येतही नसतील. पण यात नियमन आणायचा प्रयत्न झाला की पुन्हा आमच्या धर्माचरणात प्रशासन आडवं येतं, "त्यांना का सांगत नाही तुम्ही कर्णे हटवायला" वगैरे मुक्ताफळं बहुदा उधळली जातीलच.
ठाण्यातलं दृष्य पहाता, राजकीय नेत्यांनाच प्रसिद्धीचा सोस असल्यामुळे असं काही नियमन आणण्यासाठी सरकार आपण होऊन काही करेल असं वाटतही नाही. पुन्हा अंनिस किंवा तशा संघटनांनाच यात पुढाकार घ्यावा लागेल.
तरीही या निमित्ताने शारीरिक कसरती, कौशल्याचा विकास होतो आणि ही चांगली गोष्ट नजरेआड होऊ नये. भारतात टाईप टू मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत; धर्माला हाताशी धरून व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा सण वापरता येईल.
ठाण्यात राजकीय पुढार्यांच्या आशीर्वादाने वर्षा मॅरेथॉन चालते, त्यामुळेही काही रस्ते बंद होतात. वर्षा मॅरेथॉनच्या नावाखाली जोरजोरात गाणी लावून किंवा टवाळ टोळकी रस्त्यातून फिरत सामान्य लोकांचा दिवस बरबाद करत नाहीत. धावपटूंनी खराब रस्त्यांबद्दल केलेली तक्रार मनावर घेतली तर ठाणेकरांचाही फायदाच होईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लोकांना समूहउन्मादाकडे वळवून
लोकांना समूहउन्मादाकडे वळवून आपले मूलभूत प्रश्न, विकास या गोष्टींपासून दूर ठेवायच. समूह उन्मादात विचार व विवेक नष्ट पावतो. समूहउन्माद गुन्हेगारीला निमंत्रण देतो. मागासलेल्या व कालबाह्य गोष्टींना प्रतिष्ठा व ग्लॅमर देउन सुशिक्षित लोकांना देखील त्यात ओढायचे. खाओ पिओ ऐश करो. कल क्या होगा किस को पता अभी जिंदगीका ले लो मजा!
नितिन थत्तेंच निरिक्षण रोचक आहे. आदितीने मांडलेल्या पॉझिटिव्ह मुद्द्याचा विचार देखील केला पाहिजे. धर्माच्या नावाने न करता धाडसी खेळ अशा अंतर्गत देखील त्याला स्वरुप देता येईल.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
गोविंदा रे गोपाळा.
गोविंदा रे गोपाळा.