Skip to main content

आजचे दिनवैशिष्टय

'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणार्‍या नावे आणि घटनांवरून अन्य धागे सुरू होतात. मीहि असे दोन धागे सुरू केले आहेत. असे वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदवीत केल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून हा धागा सुरू करीत आहे आणि त्यात आजच्या (२२ जानेवारी) दिनवैशिष्टयांपैकी 'संतवाङ्मयाचे अभ्यासक व कोशकार ह. श्री. शेणोलीकर (१९२०)' ह्यांचा जन्मदिवस ह्यावरून आठवलेली एक गोष्ट लिहितो.

बहुतेककरून १९६१ साल असावे. फर्गसन/फर्ग्युसन कॉलेजातील 'साहित्य सहकार' ह्या विद्यार्थिसंघटनेचा २५वा वाढदिवस साजरा होत होता. आमच्यासारखे उत्साही सदस्य उपस्थित होतेच पण काही जुने सन्मान्य सदस्यहि आवर्जून आले होते. प्रा. ह.श्री शेणोलीकर त्यांपैकीच एक होते. कार्यक्रमामध्ये काही वेळ जुन्या सदस्यांच्या आठवणीपर भाषणांसाठी ठेवला होता.

त्यात स्वतः रा.श्री.जोग बोलल्याचे आठवते. पण विशेष लक्षात राहिलेली आठवण आहे शेणोलीकरांबाबत. त्याच्याच एका सहाध्यायाने आपल्या आठवणी सांगतांना शेणोलीकरांवर त्या काळात कोणीतरी लिहिलेली 'असा हा शेणोलीकर हरी' ही कविता म्हणून दाखविली आणि चांगलेच हास्य पिकवले.

पण शेणोलीकरांना ते लागले असेहि आम्हांस जाणवले. ह्या सर्व तरुण पोरांसमोर आपली कुचेष्टा झाली असे त्यांना वाटले असावे.

ह्याच दिवशी जंबो जेट बोईंग ७४७ चे पहिले उड्डाण १९७० साली झाल्याचे नोंदविले आहे. तदनंतर लवकरच ही विमाने एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये दाखल झाली. परदेशी विमानसेवा देण्याचा मक्ता असलेली सरकारी एअर इंडिया तेव्हा मोठया तोर्‍यात होती. आजच्यासारखा poor relation चा दर्जा तिला मिळायला कैक वर्षे जायची होती. त्या ताफ्यातले पहिले विमान होते 'सम्राट् अशोक'. 'Your palace in the sky' अशी त्याची जाहिरात एअर इंडिया करीत असे. त्याच्या खिडक्यांना बाहेरच्या बाजूने राजवाडयातील वातायनांसारखे रंगविले होते आणि पहिले काही दिवस हे विमान मुंबई शहरावर अगदी खालून उडवून ह्या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले गेले होते हे चांगले आठवते.

८ वर्षांनंतर हेच 'सम्राट् अशोक' मुंबईहून दुबई ला जायला १ जानेवारी १९७८ ह्या दिवशी निघाले आणि चार मिनिटांतच विमानतळापलीकडे समुद्रात कोसळून नष्ट झाले. विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी आणि चालक वर्ग मृत्युमुखी पडले. मला वाटते आजतागायत ते विमान तेथेच समुद्रतळावर बसून आहे.

'सम्राट् अशोक' एक चित्र

श्रेय

निनाद Thu, 23/01/2014 - 06:58

'सम्राट् अशोक'. 'Your palace in the sky' चा ब्लॅक बॉक्स मिळवला गेला होता. त्यात वैमानिकाला आपण अवकाशात कोठे आहोत हे लक्षात आले नव्हते. उंचीचा आणि कलण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा असा निष्कर्ष काढला गेला होता. तसेच यात वैमानिक कक्षातील विमान कलण्याचा कोन दाखवणारी उपकरणे बिघडल्याचेही नमूद होते.

शहराजाद Thu, 23/01/2014 - 07:42

In reply to by निनाद

सम्राट कनिष्काच्या नावाच्या विमानालाही असाच अपघात झाला होता असे स्मरते.

पूर्वी एकंदरीतच ह्या विमानांना कलाकुसरीच्या पारंपारिक शाही नक्षीची सजावट करण्याची पद्ध्त होती का?

सुनील Thu, 23/01/2014 - 08:17

In reply to by शहराजाद

सम्राट कनिष्काच्या नावाच्या विमानालाही असाच अपघात झाला होता असे स्मरते.

कनिष्कला अपघात झाला नव्हता. ते विमान खलिस्तानी दहशतवाद्यांनी बाँबने उडवले होते.

सुनील Thu, 23/01/2014 - 13:19

In reply to by मन

नाही. नीरजा भानोत यांनी जे धैर्य दाखवले ते पॅन अ‍ॅम कंपनीचे विमान होते. कनिष्क एयर इंडियाचे.

कनिष्क भर अटलांटीक महासागरावरून खाली कोसळले.

राजेश घासकडवी Thu, 23/01/2014 - 08:13

कल्पना छान आहे.

रो विरुद्ध वेड हा निकाल अमेरिकन न्यायेतिहासात एक पताकास्थान म्हणून मानला जातो. एकेचाळीस वर्षांपूर्वी आज (२२ जानेवारी) हा निकाल लागला. स्त्री स्वातंत्र्यासाठी एक महत्त्वाची पायरी. 'मूल हे देवाघरचं देणं आहे' त्यामुळे पोटात त्याचा अंशही असेल तरी त्याला व्यक्तीस्वरूप देणं ही स्त्रीची जबाबदारी आहे, त्या जबाबदारीतून तिला गर्भपात करून मोकळं होण्याची सूट नाही अशी विचारसरणी अस्तित्वात होती. अजूनही ती पूर्णपणे गेलेली नाही. नीतिमत्तेचा प्रवाह कायद्याने बदलू शकतो याचं हे एक उदाहरण.

'न'वी बाजू Thu, 23/01/2014 - 11:58

एअर इंडिया वैट्ट्ट्ट्ट! वैट्ट्ट्ट्ट!! वैट्ट्ट्ट्ट!!! वैट्ट्ट्ट्ट!!!! वैट्ट्ट्ट्ट!!!!! दुष्ष्ष्ष्ट!!!!!! आहे. त्यांचे हँगर आपण उन्हात बांधू, हं!

हात् रे, एअर इंडिया!

सलील Thu, 23/01/2014 - 15:46

In reply to by 'न'वी बाजू

एअर इंडिया की त्यांच्या बॉसचे घर उन्हात बांधता बघा. साधारपणे ३-४ वर्षांपूर्वी एअर इंडिया मध्ये एक क्ष संगणक प्रणली योग्य ते काम करत होती. नंतर कुठूनतरी टूम आणि क्ष च्या आईवजी ज्ञ संगणक प्रणली वापरायची असा वरून आदेश निघाला. लगेच काम चालू झाले. ज्ञ संगणक प्रणली अत्यंत महाग आहे क्ष पेक्षा. पुन्हा एअर इंडियाला पाहिजेल तसे काम करण्यासाठी त्यात भरपूर बदल करणे आवश्यक आहे पण ते काम २ वर्षात होणारच नाही असे नविन प्रणालीच्या तज्ञांनी सांगितले मग काम बरोबर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना भरपूर मनस्ताप जो कधीही बाहेरच्यांना काळातच नाही. बर पगार पण वेळेवर होत नाही. ६-७ महिने पगाराच मिळत नाही. पण नविन संगणक प्रणलीच्या कंपनीला मात्र डायरेक्ट दिल्लीतून वेळच्या वेळी पैसे मिळतात. हे कोडेच आहे.
आता दुसरा प्रकार. ज्या मार्गांवर कधी कोणी गेले नाही तिथे सरकार पहिल्यांदा एअर इंडियाला कामाला लावते. नविन रूट जसा चांगला चालेल असे वाटले आणि एअर इंडिया जरा नफ्यात आली की लगेच सरकार प्रायव्हेट कंपनीच्या कोणालातरी तो रूट देवून टाकते मग पुन्हा एअर इंडियाचे कर्मचारी बसले बोंबलत बाहेरच्यांना फक्त इतकेच दिसते की हे लोक काम करत नाही.
गरज नसताना भारंभार लोक भरून ठेवले आहेत. तिकडे लोकांना नीट काढता पण येत नाही. आपले प्रफ्फुल पटेल आणि बाकीचे येत जाता कसेही नियम धाब्यावर बसवून मस्त मज्जा करून घेतात पण पैसे कोणीच भारत नाही. मग सगळे तोट्यात. असो बहुतांश सरकारी कंपन्यांची हीच अवस्था आहे. रोज मरे त्यास कोण रडे अशीच अवस्था.

अरविंद कोल्हटकर Fri, 24/01/2014 - 03:46

२३ जानेवारी १९१९ हा राम गणेश गडकरी ह्यांचा पुण्यतिथिदिन. माझे आजोबा चिंतामणराव कोल्हटकर ह्यांनी आपल्या 'बहुरुपी' ह्या आत्मचरित्रपर पुस्तकात दीडशेहून अधिक पाने गडकरी आणि त्यांच्या एकत्रित सहवासाच्या दिवसांबद्दल लिहिली आहेत.

दोघेहि जवळजवळ एकाच वयाचे असूनहि चिंतामणराव गडकर्‍यांना आपले गुरु मानत असत. दोघांचा एकत्र गेलेला काळ म्हणजे गडकर्‍यांच्या आयुष्याची अखेरची पाच वर्षे. वयाच्या केवळ ३२ व्या वर्षी गडकरी नागपूरजवळ सावनूरला आपल्या थोरल्या बंधूंच्या घरी वारले. ह्या पाच वर्षांमधील अनेक आठवणी चिंतामणरावानी आपल्या पुस्तकात अतिशय वेधक शब्दांमध्ये सांगितल्या आहेत.

ह्या पाच वर्षांत गडकर्‍यांनी आपली 'एकच प्याला' आणि 'भावबंधन' ही नाटके लिहिली. भावबंधनचा शेवटचा प्रवेश तर त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या रात्री लिहून संपविला आणि अंथरुणावर ते पडले ते शेवटचेच. शेवटच्या काही महिन्यात हातात लिहिण्याची शक्ति न उरल्याने ते कोणासतरी सांगून मजकूर लिहून घेत पण भावबंधनमध्ये त्यांनी स्वहस्ते लिहिलेले शेवटचे वाक्य चौथ्या अंकातील तिसर्‍या प्रवेशात लतिकेच्या तोंडी आहे आणि ते असे आहे:

प्रभाकरः लतिके, लता, हे काय? रडायला काय झाले असे एक्दम?
लतिका: आज हा रडका दिवस कोठून उगवला आहे कोणास ठाऊक?

ह्या वाक्यानंतर गडकर्‍यांनी स्वतः हस्तलिखिताला हात लावला नाही असा योगायोग चिंतामणरावांनी नोंदवून ठेवला आहे.

चिंतामणरावांची पहिली महत्त्वाची भूमिका म्हणजे 'पुण्यप्रभावा'तील 'वृंदावन' ही त्यांना गडकर्‍यांच्या आग्रहावरून मिळाली. तदनंतर 'भावबंधन' हे नाटक गडकर्‍यांनी चिंतामणराव-दीनानाथ-कोल्हापुरे ह्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या बलवंत संगीत मंडळीसाठीच लिहिले होते आणि चिंतामणराव त्यातील 'घनश्याम' ही हातखंडा भूमिका कित्येक वर्षे करत असत. गडकर्‍यांच्या 'राजसंन्यास'मधील 'साबाजी' ही अशीच त्यांची एक गाजलेली भूमिका.

१९१८ च्या डिसेंबरात पुण्यामध्ये गडकरी आजारी पडले आणि क्षयाचे निदान केले जाऊ लागले. त्या काळात क्षयरोगाला उत्तर असे नव्हतेच. बलव्ंत मंडळी नागपूरच्या दौर्‍यावर जायचे ठरत होते. म्हणून गडकर्‍यांनीहि सावनुरास हवाबदलासाठी यावे अशी सूचना त्यांच्या विनायकराव ह्या वडीलबंधूंनी केली. ते सावनूरस वकिलीचा व्यवसाय करीत असत. चिंतामणराव २५ जानेवारीस सावनूरास गडकर्‍यांना भेटण्यासाठी येतील अशा वचनावर गडकर्‍यांनी सावनूरास जायचे ठरविले. ठरल्याप्रमाणे २५चा प्रयोग संपताच पहिल्या गाडीने चिंतामणराव सावनूरास जाणार ह्यापूर्वीच गडकरी २३ला वारल्याची तार त्यांना २४ला मिळाली.

पूर्वी एकदा गडकर्‍यांनी चिंतामणरावांना असे सांगितले होते की आपल्या ट्रंकेत तळाशी आपले जन्मगाव नवसारी येथील माती एका पुडीत आहे. ती माती आपल्या चितेमध्ये टाकावी. गडकर्‍यांचे निधन झाले तेथे अन्य कोणासच ही त्यांची शेवटची इच्छा माहीत नव्हती. चिंतामणराव २५ तारखेस सावनूरला पोहोचले तेव्हा आपल्या गुरूची ही अखेरची इच्छा ते पूर्ण करू शकले

अक्षय पूर्णपात्रे Wed, 29/01/2014 - 22:51

दिनवैशिष्ट्याबद्दलच्या प्रासंगिकातल्या दोन संस्था (साहित्य सहकार आणि एअर इंडिया) आजकाल दीन झालेल्या आहेत. 'साहित्य सहकार' तर पंधरा-वीस वर्षांमागेच भलतेच टाकाऊ होऊन गेले होते.

अरविंद कोल्हटकर Thu, 30/01/2014 - 06:35

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

अगदी शक्य आहे. मराठी भाषाच हल्लीच्या फर्ग्युसन कॉलेजात दीनवाण्या चेहर्‍याने कोपर्‍यात उभी असते तेथे साहित्य-सहकार म्हणजे कौनसे पेडकी मूली! परदेशी ब्रँडच्या जीन्स, टी-शर्ट, शूज आणि बाइकवाल्या क्राउडमध्ये तिला भलतेच परके वाटत असणार.

आम्ही तेथे असतांना बहुतेक विद्यार्थी शर्ट्पँटमध्ये असायचे. काहीजण लेंग्यातसुद्धा. मुली बहुतेक पाचवारी. आमची एक वर्गभगिनी सनातनी वडिलांच्या आज्ञेमुळे काही दिवस नऊवारीत असायची. (एकदोन महिन्यानंतर तिला पाचवारीची परमिशन मिळाली.) सायकलपलीकडे वाहन कोणाकडेच नसे. अशा पब्लिकमध्ये तिला होमली वाटत असणार

मन Thu, 30/01/2014 - 10:26

In reply to by अरविंद कोल्हटकर

"मराठी भाषा मरते आहे तर मरु द्यावी " असलं काहीतरी तेंडुलकर बोलले होते म टा च्या मुलाखतीत्, ते आटह्वलं.
भाषा नेहमीच बदलती* असते, नदीचा प्रवाह वगैरे वगैरे पुराणकाळापासून जालावर आणि इतरत्र चालत आलेले वाद आठवले.
शिवाय नऊवारीवाले पाचवारीत आले तेव्हा काहिच झाले नाही, पण पाचवारीवाले पंजाबी ड्रेस आणि पंजाबी ड्रेसवाले जीन्स मध्ये आले तेव्हाच प्रॉब्लेम आला का वगैरे वगैरे जुनीच आर्ग्युमेंटे आहेत.
.
.
.
"बदलती" हा शब्द हिंदीतून जशास तसा घेतलाय काय? ( की "बदलत" की बद्-लत ;) )

सुशेगाद Sat, 22/03/2014 - 13:53

In reply to by अरविंद कोल्हटकर

फर्गुसनात मराठी भाषा कोपर्यात उभारण्याच कारण तिथली बथ्थड प्राध्यापक मंडळी आहेत अस वाटत. बाकी पुराणकाळात काही खास फरक असावा अस वाटत नाही. नाहीतरी कोसलामध्ये नेमाड्यांनी वर्णन केलेच आहे.
बाय द वे साहीत्य सहकार ही काय भानगड होती हे माहीत नाही

सुशेगाद Sat, 22/03/2014 - 13:57

In reply to by अरविंद कोल्हटकर

आणि एक गोष्ट कळाली नाही मुलींचे कपडे आधुनिक पाश्चात्य होणे आणि भाषेची आयबहेन होणे याचा काय संबंध?

अमुक Tue, 04/02/2014 - 09:22

'नॉर्मन् रॉकवेल्'चा आज जन्मदिन. या अमेरिकन चित्रकाराने त्याच्या चित्रांतून मला अमाप आनंद दिला. त्याचे कुठलेही चित्र कितीक वेळा पाहिले तरी समाधान होत नाही. बहुतेक सगळ्या चित्रांची एक खासियत म्हणजे चित्रात एक क्षण पकडलेला. जणु काही एखाद्या छायाचित्रकाराने चतुराईने अचूक क्षणी चित्र टिपावे, त्याप्रमाणे. तो क्षण पाहताच त्या क्षणापूर्वी काय काय घडून गेले असेल याची एक गोष्ट पाहणार्‍याच्या मनात चटकन तरळून जाते. बहुतेक वेळा ती गोष्ट आपल्या रोजच्या आयुष्यातली असल्याने, ते क्षण काही काळापुरते उजळून निघतात. अतिशय निर्मळ आनंद होतो. चेहर्‍यावर उबदार स्मित पसरते.
हे सारे घडून गेल्यावर मग हळुहळू चित्रातल्या एकेक गोष्टी सामोर्‍या येऊ लागतात. त्या चित्रात रंग कसे भरले आहेत, चौकट कशी पकडली आहे, छाया प्रकाशाचे खेळ कसे केले आहेत, चेहर्‍यावरचे भाव इतके अचूक कसे पकडले आहेत, अमेरिकी संस्कृतीतले बारकावे कसे मस्त पकडले आहेत, हाच नेमका क्षण पकडणे चित्रकारास कसे सुचले असेल, इ. इ. अनेक गोष्टी उलगडत जातात. पाहणारा गुंग होऊन जातो. मी तरी होतोच.

रॉकवेल उत्कृष्ट व्यक्तिचित्रकार होताच. शिवाय त्याने 'सॅटर्डे इव्हनिन्ग् पोस्ट' या द्वैमासिकासाठी तब्बल चाळीस वर्षे मुखपृष्ठ काढण्याचे काम केले. प्रत्येक चित्रात अमेरीकी जीवनाचा एक भाग, क्षण पकडलेला असे. आता हीच चित्रे अमेरिकी जीवनसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आहेत.

(आपल्याकडे एका चित्रकाराने तशी किमया काही प्रमाणात साधली. ते म्हणजे शि. द. फडणीस. मात्र फडणिसांची शैली, चित्रे आणि उद्देश कायमच व्यंगचित्रात्मक राहिले.)

नॉर्मनचे 'ट्रिपल-सेल्फ-पोर्ट्रेट' :

ऋषिकेश Thu, 06/03/2014 - 09:10

In reply to by अमुक

अनेक आभार, सदर प्रतिसादातील चित्र अत्यंत वेधक आहे.
या चित्रकाराने आपले पोर्ट्रेट हे प्रत्यक्षपणे त्रीमितीय बनवले आहे. चित्रकाराची मागील बाजु दिसतेच, आरशात पुढील बाजुही दिसते, त्याचे भावही दिसतात, डोळे मात्र दिसत नाहीत, नी ती कमी त्याने काढलेल्या रेखाचित्रात आली आहे! निव्वळ रोचक आणि कल्पक चित्र आहे!

पुन्हा अमुक यांचे आभार!

रोचना Sun, 23/03/2014 - 23:01

In reply to by अमुक

रॉ़कवेल यांची नात डेजी रॉकवेलही चित्रकार आहे. तिने हिंदी साहित्यात पी.एच. डी केली असून उपेन्द्रनाथ अश्क या हिंदी लेखकाच्या कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत.

बॅटमॅन Tue, 10/06/2014 - 11:14

In reply to by ऋषिकेश

साधी कॉपी अन भ्रष्ट कॉपी यात नक्की फरक काय असतो बॉ? समजा भ्रष्ट कॉपी असली तर बजाजी निंबाळकर स्टाईल शुद्धीकरण करून साधी कॉपी बनवण्यासाठी कुठली देवलस्मृती अस्तित्वात आहे काय ;)

अरविंद कोल्हटकर Thu, 06/03/2014 - 04:30

आजच्या ५ मार्चच्या दिनविशेषामध्ये जन्मदिवस ह्या सदरात ’मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासाचे अभ्यासक व कवी पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी (१८५६)’ असा उल्लेख आहे. तसेच पुण्यस्मरण ह्या सदरात ’लेखक आणि प्रवासवर्णनकार नारायण गोविंद चाफेकर (१९६८)’ असा उल्लेख आहे. ह्यांच्याबद्दल मजजवळची काही माहिती पुढे नोंदवीत आहे.

पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी ह्यांच्याबाबत थोडीच माहिती उपलब्ध आहे आणि मी लिहिलेल्या ’मुंबईतील काही रस्त्यांची आणि जागांची नावे - भाग १’ ह्या धाग्यात पुढील नोंद केली आहे:

शेपर्ड ह्यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी रावबहादुर पी.बी.जोशी आणि आणि आर.पी.करकारिया अशा दोन माहितगार हिंदुस्तानी व्यक्तींच्या माहितीचा हवाला दिला आहे. ह्यांपैकी रावबहादुर पी.बी.जोशी ह्यांच्याविषयक त्रोटक उल्लेखांशिवाय काहीच माहिती गूगलशोधात मिळाली नाही परंतु सिद्धेश्वरशास्त्री चित्राव ह्यांनी संकलित केलेल्या अर्वाचीन चरित्रकोशाच्या खंड २, पान २९९ येथे ह्यांच्याबाबत थोडीफार माहिती मिळते. पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी (१८५६-१९३०) हे मुंबईमधील एक अभ्यासू इतिहाससंशोधक गृहस्थ आणि मराठी लेखक होते. बर्‍याच अन्य संशोधकांनी त्यांच्याकडून मिळालेल्या साहाय्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याचे आढळते. ह्यांना एशिऍटिक सोसायटीने ’कॅंबेल मेडल’ देऊन गौरविले होते. ह्यांची स्वत:ची राहण्याची जागा ’बनाम हॉल लेन’ मध्ये होती असा उल्लेख शेपर्ड ह्यांनी त्या लेनच्या संदर्भात केलेला आहे हे पुढे ’बनाम हॉल लेन’शी संबंधित भागामध्ये येईलच.>

नारायण गोविंद चापेकर (नानासाहेब) (ह्यांचे दिनविशेषात नाव ’चाफेकर’ असे दिले असून ते ’चापेकर’ असे असावयास हवे.) हे आपल्या ’बदलापूर’ आणि ’पेशवाईच्या सावलीत’ ह्या पुस्तकांसाठी आज विशेष आठवणीत आहेत. १९४६ साली द.वा.पोतदार, कृ.पां.कुलकर्णी, शं.दा पेंडसे, दे.द.वाडेकर, चिं.ग.कर्वे आणि श्री.रा.टिकेकर अशा विद्वानांनी एकत्रितपणे ’चापेकर संस्मृति’ असा प्रबंधोपहार त्यांना अर्पण केला. त्यामध्ये त्यांचा जीवनपट दिला आहे त्यातील प्रमुख उल्लेख असे: जन्म मुंबई १८६९, बी.ए. १८९१, एल् एल् बी १८९४, ठाण्यात वकिलीस प्रारंभ १८९५, ’एडमंड बर्कचे चरित्र’. ’पैसा’, दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे ह्यांची छोटी चरित्रे अशी पुस्तके १८९७, सबजज्ज अशी सरकारी नोकरी प्रारंभ १९००, ’निवडक लेख’ १९२४, कार्याध्यक्ष, म.सा.प. १९२७-३७, सरन्यायाधीश, औंध संस्थान १९३१, ’आमचा गाव - बदलापूर’ १९३३, ’पेशवाईचे सावलीत’ १९३७, बदरीकेदार यात्रा १९३९, नेपाळ-गंगोत्री-जमनोत्री यात्रा १९४१, औंध विधिमंडळाचे अध्यक्ष १९४१, ’जीवनकथा’ आत्मचरित्र १९४३.

१९२५ सालापासून प्रतिवर्षी आपल्या मातोश्रींच्या श्राद्धदिनी आपल्या बदलापूरच्या घरात ते विद्वज्जनांचा वार्षिक मेळावा भरवत असत आणि त्यामध्ये चर्चा, प्रबंधवाचन असे उपक्रम केले जात ह्याची आठवण अजून टिकून आहे.

अमुक Sat, 08/03/2014 - 10:52

आज आरती प्रभूंचा जन्मदिवस.

पृथ्वीची फिरती कडा चाटून
कवितेची ओळ येते
आणि आयुष्यातील एक दिवस
दानासारखा मागून नेते.

असे म्हणणार्‍या या कवीच्या अनेक कवितांनी माझे दिवस मागून नेले आहेत.

येतील असेच शब्द सारे सोसल्यावर
आलेत जसे रंग पिकल्या फळांवर..

या त्यांच्या ओळी त्यांच्याचबद्दल बरेच काही सांगून जातात.

त्यांची एक फारशी प्रसिद्ध नसलेली कविता आठवणीतून देत आहे (कुठे वाचली होती तेही आठवत नाही)-

मी अशी सर्वकाळ तुझी कशी राहायचं ?
तुला पुरी पडेन का ? तुला काय काय म्हणून द्यायचं ?
प्रश्न केंव्हा केंव्हा घनश्याम कृष्णासारखा उभा
त्याला होकार देत देत रिक्त होत जायचं.
तू केवढा उंच आहेस, मी एक चिमणी सकाळ
तू तर माळरान, मी त्यावरील अर्धी संध्याकाळ
किती झालं तरी मी लाल स्वेटर घालणारी पोर
कुठे असे नकळे तुझा आदिअंत अनंत काळाभोर...

- आरती प्रभू.
----

कवी ग्रेस यांनी आरती प्रभूंवर एक कविता केली होती. तीदेखील आठवणीतून देत आहे -

यह मरतबा बलंद मिला जिसको मिल गया
हर मुद्दई के वासते दारो रसन नही

असे वाटते मृत्यू असतो सख्या रे
सतीच्या खुनासारखा पोरका
जळाच्या भयाने दुभंगून गेली
सुन्या स्वप्नपारावरी द्वारका

समुद्रावरी मी तुला एकदा रे
दुपारीच वाळूत ओवाळिले
मला शोधणारी रडे अंध विधवा
जिचे गर्भ माझ्या घरी वाढले

तुझा मंद पावा तुझी दीर्घ राने
तुझी ज्ञानदेवीय जी आर्द्रता
तिच्या सावलीचे निळे चंद्र माझी
पुन्हा मागती का मला संहिता

असा एक सूर्यास्त अंगावरी ये
मला वाटते मीही भारावलो
दिवेलागणीच्या तुझ्या खिन्न वेळीच
हा गाव सोडून मी चाललो

कुणाला म्हणावे तुझ्या मेघमाळा
मला चिंब होऊन रे दाखवा
जुन्या वैष्णवाने घरी आणल्याना
मला शैव समजून या पादुका

- ग्रेस

रोचना Sat, 08/03/2014 - 13:07

In reply to by अमुक

अनेक अनेक आभार! ग्रेस यांची कविता अतिशय आवडली.
एस्पे:

असा एक सूर्यास्त अंगावरी ये
मला वाटते मीही भारावलो
दिवेलागणीच्या तुझ्या खिन्न वेळीच
हा गाव सोडून मी चाललो

नितिन थत्ते Sat, 08/03/2014 - 18:16

In reply to by रोचना

मला आरती प्रभूंच्या "समईच्या शुभ्रकळ्या" आणि ग्रेस यांच्या "भय इथले संपत नाही" या गीतांचा मराठीतून अर्थ कोणी सांगू शकेल का?

चिंतातुर जंतू Sun, 09/03/2014 - 00:19

In reply to by नितिन थत्ते

समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायाशी पडते
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहिलेले माझे माहेर बापुडे
साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची
थोडी फुले माळून ये, डोळा पाणी लावून ये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये
हासशील हास मला, मला हासूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का जुना

दोन वेगळ्या जातकुळीच्या भावना इथे एकत्र आहेत. एक येऊ घातलेल्या सुखाची आणि उत्फुल्लतेची चाहूल आहे (शुभ्र कळ्या उमलताहेत, जाई केसात फुलते आहे, भिवया फडफडताहेत, पदराला उन शिवतंय) तर दुसरी काही तरी हरपल्याची जाणीव (माहेर मागे पडलंय, डोळ्यांत अश्रू दाटलेत, हसू सोसत नाहीए). माहेर दूर गेल्यामुळे दु:ख पण प्रियकर/पतीशी होऊ घातलेल्या मीलनाची उत्सुकता / सुखद भीती ह्यांचं ते मिश्रण आहे.

नितिन थत्ते Sun, 09/03/2014 - 10:54

In reply to by चिंतातुर जंतू

सारांश ठीक आहे. पण 'चंद्र होणार का जुना' म्हणजे काय ते कळले नाही.

पदराला उन शिवतंय असा साधा वर्तमान काळ आहे की शिवु शिवु ऊन ग ये असा आज्ञार्थ आहे?

आणि असाच भय इथले संपत नाहीचा सुद्धा अर्थ सांगावा.
विशेषत:
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
आणि
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

अमुक Sun, 09/03/2014 - 22:15

In reply to by नितिन थत्ते

चंद्र होणार का जुना
.............माझ्या आठवणीप्रमाणे त्य ओळी अश्या आहेत -
'हसशील, हास मला, मला हसूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा !'

.............चंद्र 'जुना' नसून 'दुणा' आहे. कवितेत प्रतिकात्मक अश्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सगळ्याचा अर्थान्वय (इन्टरप्रिटेशन्) सुगम असेल असे नाही. माझ्या मते चिंजंचा अर्थान्वय योग्य आहे.
नवे नवे लग्न झालेली, अजून माहेरची नाळ न तुटलेली आणि संसारातल्या नवलाईची, त्याकडून असलेल्या आशाआकांक्षांची चाहूल लागलेली ही स्वप्नील मुलगी. दोन काहीश्या विरूद्ध भावना तिला खेचत असताना या बावचळलेल्या स्थितीत ती 'मुलखाची विसराळू', वेंधळी झाल्याने तिचे तिलाच हसू येत आहे. माझ्या मते वरील आणि 'साचणार्‍या आसवांना पेंग येते चांदणीची' या दोन ओळींत विरूद्ध भावना सारांशाने एकत्रित येतात. अश्रू खोल होणे = माहेरची हुरहूर अधिक गडद होणे; चंद्र दुणावणे = संसाराची स्वप्ने वृद्धिंगत होणे (कदाचित 'दुणावणे' = मूल होणे असाही अर्थ असू शकतो* )
* असे म्हणण्यासाठी पहिल्या कडव्याचा आधार आहे असे वाटते. नवर्‍याशी नुकतेच मीलन होऊन ती आता 'प्रौढ' (वाती मोठ्या होणे, जाई फुलणे) झाली आहे.

-------
पदराला उन शिवतंय असा साधा वर्तमान काळ आहे की शिवु शिवु ऊन ग ये असा आज्ञार्थ आहे?
'पदराच्या किनारीला शिवायला ऊन येत आहे' असा साधा वर्तमानकाळ आहे.
१. शिवणे = 'धाग्याने१अ केलेले शिवणकाम' असा असा अर्थ नाही. 'भोज्ज्याला शिवतो' ते शिवणे.
१अ. धागा = दोरा. इथे 'संकेतस्थळाचा धागा' असा अर्थ नाही.

- 'न'मुक ;)

नितिन थत्ते Sun, 09/03/2014 - 22:31

In reply to by अमुक

आणखी/पुन्हा धन्यवाद....

चित्रकलेच्या कुठल्याश्या धाग्यावर गाण्यात एक नॅरेटिव्ह असतं म्हणून गाणं चित्रापेक्षा जास्त समजतं असं मत मी व्यक्त केलं होतं. पण इथे ते नॅरेटिव्हसुद्धा इतकं क्रिप्टिक आहे.

चिंजं आणि अमुक यांना हा अर्थ* कसा प्रतीत होतो हे कोडे आहे. त्यासाठी काही विशिष्ट (दवणीय ;) ) तालीम लागते का?

*म्हणजे नुकते लग्न झालेल्या स्त्रीचे हे मनोगत आहे आणि तिला असे असे म्हणायचे आहे हे कसे कळते?

ऋषिकेश Mon, 10/03/2014 - 09:59

In reply to by नितिन थत्ते

म्हणजे नुकते लग्न झालेल्या स्त्रीचे हे मनोगत आहे आणि तिला असे असे म्हणायचे आहे हे कसे कळते?

माहेराइतकी भावनिक गुंतवणूक असणार्‍या जागेहून, कोणत्याही स्त्री/पुरूषाला उपटून दुसरीकडे रु(उ)जवु पाहताना म्हणायचे गाणे म्हणता येईलही. (काही भावनोत्कट परदेशी स्थिरावणारे? ;) )पण भारतापुरते, नुकतेच लग्न झालेल्या स्त्रीशिवाय असा प्रसंग इतक्या उत्कटतेने कोणाला फारसा जगावा लागत नाही.

रोचना Wed, 12/03/2014 - 10:51

In reply to by नितिन थत्ते

*म्हणजे नुकते लग्न झालेल्या स्त्रीचे हे मनोगत आहे आणि तिला असे असे म्हणायचे आहे हे कसे कळते?

त्या साठी नुकते लग्न झालेले स्त्री असावे लागते. काही गत्यंतर नाही. ;-)

मिहिर Sun, 09/03/2014 - 11:44

In reply to by चिंतातुर जंतू

समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते

शुभ्र कळ्यांना उमलवणारे आणि स्वत: लवणारे नक्की कोण आहे? मी की जाई की माहेर? इथे कळ्या उमलत आहेत की उमलवल्या जात आहेत?

'न'वी बाजू Sun, 23/03/2014 - 02:01

In reply to by नितिन थत्ते

समईच्याच शुभ्र कळ्या काय म्हणून? ष्टोव्हच्या का नाही?

------------------------------------------------------------------------

प्रायमसचा नव्हे. वातीचा.

मणिकर्णिका Sun, 09/03/2014 - 23:01

In reply to by नितिन थत्ते

ग्रेसच्या कवितेचा फ़ॉर दॅट मॅटर कोणत्याही कवितेचा अर्थ सांगणे म्हणजे भयंकर कठीण काम. एकतर ती तशी का लिहीली हे फ़क्त कवीच सांगू शकतो आणि आपण वाचणारे फ़क्त अंदाज लावू शकतो. आता यातले अंदाज बरे-वाईट असतात आणि त्यांचं बरे-वाईटपणही आपल्याला अर्थ जसा कळला आहे किंवा कळू पाहतो आहे तसाच असण्यावर ठरत असावं. कवितेचं फ़ार फ़ार तर आपल्या पद्धतीने रसग्रहण करता येतं आणि ’समईच्या शुभ्र कळ्या’चं मला आवडलेलं रसग्रहण इथे वाचता येईल.

अरविंद कोल्हटकर Sun, 09/03/2014 - 05:33

आज ८ मार्चच्या दिनविशेषात हा दिवस विश्वनाथ नारायण मंडलिक ह्यांचा जन्मदिवस आणि साल १८८९ असे दाखविले आहे.

८ मार्च हा त्यांचा जन्मदिवस होता पण तो १८३३ साली. त्यांचा मृत्युदिन मे ९,१८८९ हा आहे.

अमुक Wed, 12/03/2014 - 08:26

कवी मनोहर ओक (मन्या ओक) हा आयुष्यभर जगाची चाकोरी सोडून जगलेला कवी. प्रस्थापितांमध्ये गणती न होणारा. फारसे कुणाचे लक्ष न गेलेला असा. 'मनोहर ओकच्या ऐंशी कविता' हा एक कवितासंग्रह नावावर.
त्यांच्या स्मरणार्थ, त्यांचीच एक कविता नमुन्यादाखल -


जे दिलं जातं ते घे - घेता आलं तर. मागू नको.
मागण्यात माणसं अवघडतात.
आणि इथे खोटेपणाला वाव आहे.
करता आलं तर कर - साधलं तर, मुद्दामहून नको.
लादण्यात परस्पर दु:ख येतं
आणि इथे फसगतीला शिरकाव आहे.
सुख हे असं अनायास सरगळतीत आहे, असतं
throw yourself in the oblivion, care not.
आग्रह आणि निग्रहात दरवाजे बंद होतात,
हे ध्यानात धर - सुटे भाग कुठं बाहेर पाहू नको.
आशीर्वादाचे फणे, भिकेची उघडी तोंडं;
भलं करण्याचे भलते फंद नाहक छंद समज.
चांगलं करण्याचे उपद्व्याप फशी पडतात;
एवढंच नाही, अंगलटीस येतात हे जाणून वाग.
आहेस तसा कुठेही जा, इतरांच्या पळवाटा बंद होतात.
उसण्याची मागणी बरी नाही;
ह्यांना आंतरिक हेतू आडवसा होतात, आडोसे घेतात.
एकांताचाही आडोसा नको, तोही एक शृंगार आहे.
पश्चात्तापाची भरपाई लांच्छनास्पद.
गुन्हा चूक; कबूली, दुजोरा देऊ नको

- मनोकर ओक.

मणिकर्णिका Wed, 12/03/2014 - 08:50

In reply to by अमुक

मनोहर ओक हे मन्या ओक नावानेच ओळखले जायचे. त्यांनी कविता केल्या, स्वतःच्या आनंदाखातर केल्या. जगले ते स्वत:च्या टर्म्सवर आणि गेलेही स्वत:च्या टर्म्सवर. त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर कितीतरी वर्षांनी प्रसिद्ध झाला. इलियट म्हणूनच गेलाय की आपण जोपर्यंत आपण त्यांना विसरत नाहीत, तोवर मरणारे मरत नसतात. त्यांच्या स्मरणार्थ ’मन्या ओक’ने लिहीलेली ही एक कविता-

मला माहित्ये

मला माहित्ये दुर्बीण लावून जाणारा एक आंधळा
मला माहित्ये साखरेची चिमूट तोंडात ठेवून आत्महत्या करणारा
मला माहित्ये आयुष्यभर फ़ूल न खुडणारा
मला माहित्ये कलेकलेने अस्वस्थ होणारा पूर्णचंद्रात ठार वेडा
मला माहित्ये पायाच्या अंगठाबोटात ब्लेड-धाक दाखवून महारोगी
लुटणारा

मला माहित्ये वांद्रा हायवेवर रात्री दीड वाजता रॉकेलमध्ये
काळजी तळून बाजूच्याच दगडावर डोकं ठेवून झोपणारी
’हवा मां’ जख्खड म्हातारी
मला माहित्ये इरकली नेसून वेणी माळून पान खाऊन जाणारी कोडी बाई
हसतमुख
मला माहित्ये उगाचच्या उगाच काही गोष्टी
एरवेळी कब्जा घेणारया..

-मनोहर ओक

रोचना Wed, 12/03/2014 - 11:53

अमुक यांनी "आजची कविता" म्हणून एक नवीन धागा काढावा ही विनंती. आठवणीतल्या कवितांचा साठा सर्वांबरोबर शेअर करावा. रोज नाही झाले तरी आठवड्यातून एकदा-दोनदा धाग्यात जाणकार मंडळींनी आपल्या आवडत्या कवितांचा भर घालावी. बसून ठरवून पुस्तकभर कवितांचे वाचन होत नाही. पण मधेच एखादी वाचली की खूप आवडते, त्या कवीच्या अन्य कविता शोधून काढाव्याशा वाटतात. कविता किती निराळ्या पद्धतींनी 'वाचता येते' याची कल्पना येते.
(लेकिन कॉपीराइट के मामले बद्दल माहित नाही)

ऋषिकेश Wed, 12/03/2014 - 11:56

In reply to by रोचना

आजचा दिवस +१ करण्यात जाणारसे दिसते.

अमुक यांना केलेल्या विनंतीला पुरवणी अशी की नुसते आजची कविताच नाहीत तर चित्रेही द्यावीत. त्यांच्या स्मरणातील/आवडती चित्रेही अनेकदा अत्यंत रोचक असतात असा अनुभव आहे!

अमुक Wed, 12/03/2014 - 23:23

In reply to by रोचना

कल्पना उत्तम आहे पण प्रताधिकाराबद्दल नीट विचार करणे आवश्यक आहे.
प्रकाशकाची परवानगी न घेता कविता देताना सोबत कवितासंग्रहाचे नांव, प्रकाशन वर्ष, आवृत्ती, पृष्ठ क्र. इतकी माहिती दिली तर प्रताधिकार भंग होतो का ते माहित नाही. त्यावर निर्णय झाल्यास धागा काढण्यास प्रत्यवाय नसेल. मागे एकदा याविषयी थोडी चर्चा झाली होती पण फलित काही नव्हते, असे आठवते.
दुसरी गोष्ट - मी दिलेल्या कविता या दिनवैशिष्ट्याच्या अनुषंगाने वा निमित्ताने आल्या आहेत. अनेकांना मनोहर ओक फारसे ठाऊक नाहीत त्यामुळे त्यांबद्दल लिहीणे उचित वाटले. आरती प्रभूंबद्दल निव्वळ प्रेमाखातर, ऋणाखातर लिहावेसे वाटले.
वेगवेगळ्या कवींचे काव्य वाचायला हवे असेल तर 'सध्या काय वाचताय'ला समांतर 'ही कविता वाचलीत का ?' असा एखादा कायम धावणारा धागा काढता येईल. मग ते केवळ दिनवैशिष्ट्याशीच संबंधित राहणार नाही. तसेच या धाग्यावर प्रतिसाद देताना कवितेसोबत त्यातले काय वैशिष्ट्य उल्लेखण्यासारखे वाटले हे जोडले तर अधिक उत्तम. निर्णय व्यवस्थापकांवर सोपवित आहे.
(पुढले काही दिवस मी बर्‍यापैकी कामात असेन. त्यामुळे धागा सुरू करायचे ठरलेच तर माझ्यासाठी थांबू नये, ही विनंती.)

अमुक Mon, 17/03/2014 - 18:52

'राजकुमारी दुबे' ही माझी आवडती गायिका. मला त्यांच्या आवाजाची प्रत आकर्षक वाटते.
या गायिकेचे 'महल'(१९४९) चित्रपटातले 'घबराके जो हम सिर को टकराएं तो अच्छा हो' हे गाणे मुखपृष्ठावर दिल्याबद्दल अनेकानेक आभार. माझे अतिशय आवडते गाणे आहे हे. 'बावरे मैन' (१९५०) या चित्रपटातले 'सुन बैरी बलम सच बोल रे, इप क्या होगा' हे दुसरे एक प्रसिद्ध गाणे. लता-आशा यांचे पर्व आल्यावर त्यांना कामे मिळेनाशी झाली. नौशाद यांनी त्यांना 'पाक़िज़ा'(१९७२)च्या गानवृंदात गाताना पाहिले आणि त्यांना धक्काच बसला. मग त्यांनी त्याच चित्रपटात 'नजरिया की मारी मरी मोरी बैयाँ' हे गाणे गायला दिले. हे गाणे ऐकताना त्यांचा आवाज प्रत २२ वर्षांनंतरही किती शाबूत आहे ते कळते.
गुलज़ारच्या 'किताब' (१९७७) या चित्रपटातले 'हर दिन तो बिता शाम हुई' हे गाणे त्यांचे शेवटचे ध्वनिमुद्रण. २००० साली हालाखीच्या परिस्थितीत त्यांचे निधन झाले.

राजकुमारी या व्यक्ती म्हणून कश्या मिश्किल होत्या याची एक खुमासदार झलक 'सारेगम' या जुन्या कार्यक्रमात (सोनू निगम संचालक होता तेंव्हा) दिसते. संगीतकार अनिल-बिश्वास यांच्यासोबत केलेली एक 'वेगळी' जुगलबंदी' (१० मि.) केवळ पाहण्या-ऐकण्याजोगी.

राजकुमारी यांचे स्मरण ठेवल्याबद्दल व्यवस्थापकांचे आभार.

चिंतातुर जंतू Mon, 17/03/2014 - 23:01

In reply to by अमुक

'महल'मध्येच राजकुमारी यांनी गायलेली आणखी गाणी -
हाए मेरा दिल
ये रात फिर ना आएगी (सहगायिका - झोहराबाई अंबालावाली)
मै वो दुल्हन हूं

आणि 'बावरे नैन'मधून -

क्यूं मेरे दिलमे
मेरे रूठे हुए बलमा
मुझे सच सच बता (सहगायक - मुकेश)
घिर घिर के आसमां पर (सहगायिका - आशा भोसले)

मी Mon, 17/03/2014 - 21:22

>>'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे' ही घोषणा टिळकांना सुचवणारे जोसेफ बाप्टिस्टा.
ह्याचा संदर्भ कुठे मिळू शकेल?

चिंतातुर जंतू Mon, 17/03/2014 - 22:48

In reply to by मी

  1. तुमच्या पसंतीच्या गूगल पानावर जा.
  2. 'joseph baptista'वर शोध घ्या.
  3. पहिल्या पानावर इंग्रजी विकीपीडिआचा दुवा मिळावा.
  4. दुव्यावरून उद्धृत -

His ideas deeply influenced Tilak and the two became close associates. He assisted Tilak by launching the Sarvajanik Ganpati (public Ganpati celebrations) to raise nationalistic feelings. In addition, Baptista coined the phrase "Swaraj is my Birthright", that was later made popular by Tilak. In 1916, along with Tilak, Annie Besant founded the Home Rule Movement, with Baptista opening the Belgaum unit. He was also the legal advisor to Lokmanya Tilak.

अनुप ढेरे Mon, 17/03/2014 - 21:27

१९९२ : वंशभेदाचे धोरण (apartheid) ठेवावे का, याविषयी दक्षिण आफ्रिकेतील श्वेतवर्णीयांत जनमत चाचणी. ६८.७% लोकांनी धोरणाच्या विरोधात मतदान करून वंशभेदाची अखेर निश्चित केली.

ही जनमत चाचणीसुद्धा फक्तं श्वेतवर्णीयांसाठी होती? रोचक !

चिंतातुर जंतू Mon, 17/03/2014 - 22:56

In reply to by अनुप ढेरे

सुधारणांचं धोरण दोन वर्षांपूर्वी चालू झालं असलं आणि मंडेला तुरुंगातून सुटले असले तरी apartheid दरम्यान कृष्णवर्णीयांना हक्कच मर्यादित होते. अधिक माहिती इथे मिळेल. दुव्यावरून उद्धृत -

While the Conservative Party claimed that the government did not have the mandate to negotiate with the ANC after its defeat in Potchefstroom, State President F. W. de Klerk announced 20 February, that a national referendum for the white electorate would be held to test the government's—and his own—support: if the referendum's outcome had been negative, de Klerk would have resigned and general elections held. When de Klerk initially announced the referendum, many were critical of the fact that only whites had the right to vote in the referendum.

अरविंद कोल्हटकर Wed, 19/03/2014 - 04:52

'बॉस्टनच्या इजाबेला स्ट्यूअर्ट गार्डनर वस्तुसंग्रहालयात चोरी. रेम्ब्रॉ, व्हर्मीर, देगा, माने अशा मोठ्या चित्रकारांच्या कलाकृति चोरीस गेल्या.' अशी आजच्या दिनविशेषात नोंद आहे.

ह्या वस्तुसंग्रहालयाबद्दलची एक चांगली डॉक्युमेंटरी येथे आहे.

वस्तुसंग्रहालयाबद्दलचे विकीपेज येथे आहे. त्यानुसार ५० कोटि डॉलर्स इतकी १३ चित्रांची ही चोरी जगातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी चोरी आहे.

अमुक Fri, 21/03/2014 - 22:02

१९३५ : पर्शियाचे इराण हे अधिकृतरीत्या नामकरण.
..............इरा हवे. पर्शियन भाषेत 'ण' अस्तित्वात नाही. (आंतरराष्ट्रीय कारणासाठी नांव इंग्रजीत दिले असे धरून चालले तरी इंग्रजीतही 'ण' नाही.)

मणिकर्णिका Fri, 21/03/2014 - 23:23

In reply to by अमुक

इरान हा पर्शियन भाषेतून आलेला शब्द असल्याने तो तद्भव शब्द ठरतो आणि तद्भव शब्द मराठीत लिहीताना त्याला पर्शियन किंवा इंग्रजीचे नियम लागू का करावेत?
आपल्या 'रामायण'ला किंवा 'नारायण'ला बाहेर ’रामायन’ किंवा 'नारायन' म्ह्णतात कारण त्यांच्याकडे 'ण' हा उच्चार नाही. आपल्याकडे आहे.
इराणला इराणच का म्हणतात हे मला माहित नाही, मी माहिती काढायचा प्रयत्न केला पण मी संदर्भ घेते त्या मराठी विश्वकोशासारख्या विश्वासार्ह साईटवरही ’इराण’ असाच उल्लेख आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/03/2014 - 23:39

In reply to by मणिकर्णिका

अमेरिकेचे माजी अध्यक्ष, जॉर्ज बुश यांनी इराक या देशाचं नाव 'आयरॅक' असं उच्चारलं तेव्हा मला फळ्यावर नखांनी ओरखडलं तर कसा शहारा येईल, तसा आला होता. माझ्या समोरच घडलेला प्रसंग, काही अमेरिकन लोकांनी पारशी/पर्शियन लोकांना (तिथली माणसं पारशी, इरानी) तुमच्या देशाचा उच्चार "आयरॅन" असा होतो का, असं विचारलं तेव्हा या इरानी लोकांची तीव्र प्रतिक्रिया आली. त्या-त्या देशाच्या लोकांना आपल्या देशाचं नाव इरान (किंवा ईरान) आहे, आणि त्यावर प्रेम आहे. (तसं भारताचा उल्लेख हिंदुस्थान असा केला तरीही मला वैताग येतो. भारताचं अधिकृत नाव भारत किंवा इंडीया आहे म्हणून.)

माझं नाव अदिती याच्या जागी काही भलताच उच्चार कोणी केला, उदा: आदिती, तर ते ही वैतागवाणंच. माझ्या एका पंजाबी मैत्रिणीचं नाव आहे रमन. मी तिला मराठी सवयीप्रमाणे रमण म्हणायचे, पण तिचं नाव ते नाही. मला न चा उच्चार जमतो, तर तिचं नाव आहे तसंच म्हणावं.

मग आपल्या भाषेचे नियम आहेत म्हणून आपण लोकांच्या देशांची नावं, उच्चार जमत असूनही बदलावीत का?* इरान हा शब्द भारतीय भाषेत आलेला नसून, ते विशेष नाम आहे. फारसीतून आलेले अनेक मराठी शब्द आपण आपल्या पद्धतीनेच उच्चारतो, वापरतो. पण विशेष नामांची अशी मोडतोड करावी का? इरान/इराण हा शब्द मराठीतला म्हणायचा का?

माझ्यासाठी परदेशी भाषांमधले शब्द मराठी आहेत का नाहीत, हे शोधायचा रस्ता म्हणजे शब्दाचं सामान्य रूप (बरेच लोक) करत असतील तर तो शब्द मराठी. विशेष नामांचं सामान्य रूप तेच राहतं.

---

इरान या शब्दाचा मराठी उच्चार इराण असा होण्यात काही संस्कृत नियम असेल काय? 'देव' या शब्दाचं कोणतसं रूप 'देवानाम्' होतं, पण 'राम' या शब्दाचं तेच रूप 'रामाणाम्' होतं. असं काही?

अवांतर - आत्तासुद्धा हाताने, नेहेमीच्या सवयीने इराण असं लिहीलं, मग ण खोडून न लिहीला.

* भ या अक्षराचा उच्चार पाश्चात्यांना जमतच नाही, त्यामुळे बारत, बहारत वगैरे होण्यापेक्षा इंडिया ही सोयीस्कर पळवाट शोधली गेली असावी.
अतिअवांतर - माझ्या ओळखीतल्या एकाही गोऱ्याला मराठी हा शब्द उच्चारता येत नाही. ते मराखी असा उच्चार करतात. मलाच हौस आली तर मी, त्यातल्यात्यात "मराटी" असं बोलायला शिकवायचा प्रयत्न करते.

'न'वी बाजू Sat, 22/03/2014 - 00:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या संदर्भात, यापूर्वी एक उद्बोधक चर्चा अन्यत्र इथे होऊन गेलेली आहे.

'न'वी बाजू Sat, 22/03/2014 - 07:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(सॉरी, तो वर ज्या चर्चेचा दुवा दिलेला आहे, त्यातलेच उगाळून परत मांडतोय. नाइलाज आहे.)

मुंबईत फोर्टात एक चष्म्याचे दुकान आहे. इंग्रजी नावांचे. इंग्रजाच्या जमान्यापासून चालत आलेले.

मुंबईत मराठी पाट्यांची सक्ती करणार्‍या कायद्यामुळे दुकानावर देवनागरीतील एखादी पाटी लावणे त्यांना प्राप्त आहे.

तर मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे, ही देवनागरी पाटी लिहिताना त्यांनी ती मूळ इंग्रजी नावे त्या नावांच्या मूळ उच्चारांबरहुकुम लिहावीत किंवा कसे? याबद्दल तुम्हाला काय वाटते? (मुंबईत धंदा करण्याची या दुकानाच्या सध्याच्या चालकांची बहुधा प्रामाणिक इच्छा असावी.)

ऐकीव माहितीनुसार, तूर्तास ही देवनागरी पाटी 'लुंड अँड ब्लॉकली' अशा चुकीच्या उच्चारांकनासहित तेथे विराजत आहे. हे योग्य की अयोग्य? तुम्हीच सांगा.

-----------------------------------------------------------------------------------------------------

युरोपातील या भूतपूर्व विमानकंपनीची आपल्या अस्तित्वकाळात भारतात कोणतीही सेवा नव्हती, तसेच, या कंपनीच्या (फॉर्म्युला-वन-पटू) संस्थापकाचा हिंदुस्थानाशी कधीही संबंध (बहुधा) आला नसावा (चूभूद्याघ्या), हे तमाम मराठी पत्रकारजगताचे परमसुदैव आहे.

मणिकर्णिका Sat, 22/03/2014 - 09:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मग आपल्या भाषेचे नियम आहेत म्हणून आपण लोकांच्या देशांची नावं, उच्चार जमत असूनही बदलावीत का?*

फ्रँकली, मला माहित नाही. विचार करते तेव्हा मी आतापर्यंत इराणी, अफगाणी असंच म्हणत आले हे माझ्या लक्षात येतं. इराण हे इराणच आहे की इरान याबद्दल मी ब-याच लोकांना विचारलं पण त्यांनीही 'इराण'च इन्सिस्ट केलं. मराठी विश्वकोश हे माझ्याकरता आणि अनेकांकरता बायबल सारखं आहे, त्यांनी इराण लिहीलंय तर त्याला मी फाटकन मोडीत काढणार नाही, त्यामुळे सध्या त्या प्रश्नाचं उत्तर 'हो' असंच आहे. त्यामागे काहीतरी कारण असणारच, त्याचा शोध घेते आहे. आणि काय बरोबर, काय चूक हे आपापल्या सोयीने, आपल्या धारणांनुसार बदलतं. तुझा प्रश्न समजला आणि त्यामागचा विचारही.

मिहिर Sat, 22/03/2014 - 18:13

In reply to by नितिन थत्ते

अलेक्झांडरचे अलक्षेंद्र असे रूप मराठीत रूढ आहे का? (बॅटमॅनच्या अलक्षेंद्र ग्रीष्मबलाचे उदाहरण नको) माझ्या मते मणिकर्णिका ह्यांनी मांडलेला मुद्दा, आज मराठीत रूढ रूप कोणते असा आहे.

नितिन थत्ते Sat, 22/03/2014 - 20:44

In reply to by मिहिर

तसे असेल तर बहुतांश उत्तर भारतीयांनी बंबई, पूना आणि थाना हीच नावे वापरायला हवीत असा अर्थ होतो. [सर्व ठाकर्‍यांनी इकडे लक्ष द्यावे]

अवांतर: चूक रूढ झाली आहे तेव्हा आता सुधारायचीच नाही असेही सूचित होत आहे.

अवांतर दोन: र अक्षरानंतर न आल्यास त्याचा ण होतो असा काहीसा नियम संस्कृतात आहे. त्यानुसार इराण झाले असू शकेल.
अवांतर तीन: मराठी विश्वकोश हा बायबल समजणे मराठी बाबींमध्ये ठीक आहे पण बाहेरच्या देशांच्या नावांच्या बाबत मराठी विश्वकोशाला बायबल का समजावे?

चिंतातुर जंतू Sat, 22/03/2014 - 23:13

In reply to by नितिन थत्ते

वरच्या अनेक प्रतिसादांत प्रमाणभाषेविषयी काही गोंधळ दिसतो. थत्त्यांचा प्रतिसाद शेवटचा म्हणून केवळ त्यातले मुद्दे निवडले आहेत.

>>तसे असेल तर बहुतांश उत्तर भारतीयांनी बंबई, पूना आणि थाना हीच नावे वापरायला हवीत असा अर्थ होतो. [सर्व ठाकर्‍यांनी इकडे लक्ष द्यावे]

जर प्रमाण हिंदीबद्दल आपण बोलत असू, तर तिथे बंबई, पूना आणि थाना हे प्रमाण असू शकेल. त्यावर कुणाही मराठी माणसाला मत असू शकतं पण त्यानं प्रमाण हिंदी बदलत नाही. पूर्णपणे वेगळं उदाहरण द्यायचं तर मध्यपूर्वेशी आपले शेकडो वर्षं घनिष्ट संबंध होते. त्यांच्या भाषांत ते भारत किंवा इंडिया म्हणत नसतील, आणि हिंद किंवा हिंदोस्तां म्हणत असतील तर त्याला मोठा इतिहास आहे आणि तो त्यांच्या संस्कृतीचा आणि प्रमाण भाषेचा आहे. फ्रेंच लोक इंडिया, इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, रशिया ह्यापैकी कोणताही शब्द वापरत नाहीत, कारण त्यांच्या प्रमाण भाषेत प्रत्येक भूभागाला वेगळे शब्द आहेत. ह्याच न्यायानं, अख्खं जग काहीही म्हणत असलं तरी प्रमाण मराठीत 'इराण' असाच शब्द आहे.

>> अवांतर: चूक रूढ झाली आहे तेव्हा आता सुधारायचीच नाही असेही सूचित होत आहे.

चूक कशाला म्हणायचं त्यावर ते अवलंबून आहे. 'न्यू ऑर्लीन्स' हे मूळ फ्रेंच 'ओर्लेआँ'वरून आलं आहे. मग आपण फ्रेंचांप्रमाणे नूव्हेल ओर्लेआँ म्हणायचं की इंग्रजांप्रमाणे न्यू ऑर्लीन्स? पुढे जाऊन,
स्पॅनिश लोक स्पेनला एस्पान्य, जपानी लोक जपानला निप्पॉन आणि जर्मन लोक जर्मनीला डॉइश्लँड म्हणत असतील, तर आपण का स्पेन, जपान आणि जर्मनी म्हणायचं? केवळ आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं म्हणून? तर, आता त्यांचं राज्य नसलं तरीही आता प्रमाण मराठीत हे सब्द आहेत म्हणून.

>>अवांतर तीन: मराठी विश्वकोश हा बायबल समजणे मराठी बाबींमध्ये ठीक आहे पण बाहेरच्या देशांच्या नावांच्या बाबत मराठी विश्वकोशाला बायबल का समजावे?

विश्वकोश प्रमाण मराठीत असतो, आपण प्रमाण मराठीबद्दल बोलतोय आणि प्रमाण मराठीत हे शब्द असे आहेत म्हणून.

अमुक Sun, 23/03/2014 - 02:00

In reply to by चिंतातुर जंतू

इराण/न बाबत एवढी मोठी प्रतिक्रियांची (अवांतर) माळ लागेल असे वाटले नव्हते. हवे असल्यास ही चर्चा 'दिनवैशिष्ट्य' धाग्यातून हलवून 'मनातले छोटे विचार' धाग्यात हलवावी, ही विनंती.
----
जाता जाता -
जपान/निप्पॉन किंवा स्पेन/एस्पान्य चे लेखी वा उच्चारी जपाण/निप्पॉण किंवा स्पेण/एस्पाण्य होत नाही. इराणबाबतच असे का व्हावे हे कळत नाही. असो. मला इतकेच म्हणायचे होते, की 'इराण' असे जरी आपण बोली/लेखी वापरत असू तरी 'ऐसी..' च्या 'दिनवैशिष्ट्या'त तपशीलात उणीव नको म्हणून IRAN (आंतरराष्ट्रीय नांव) असे लिहीले तर योग्य ठरावे. मग अमेरिकावासियांना ते 'आय्रॅन' वा मराठी लोकांना 'इराण' उच्चारावेसे वाटले तर वाटू देत. या चर्चेत मी इथेच थांबतो आहे. :)

चिंतातुर जंतू Sun, 23/03/2014 - 09:16

In reply to by अमुक

>> 'इराण' असे जरी आपण बोली/लेखी वापरत असू तरी 'ऐसी..' च्या 'दिनवैशिष्ट्या'त तपशीलात उणीव नको म्हणून IRAN (आंतरराष्ट्रीय नांव) असे लिहीले तर योग्य ठरावे.

हा मुद्दा योग्यच आहे, कारण तो इराणने केलेल्या स्वत:च्या नामकरणाविषयी आहे. Maharashtra government renames Bombay to Mumbai मध्ये Mumbai लिहायला हवं त्याप्रमाणे.

नितिन थत्ते Sun, 23/03/2014 - 10:35

In reply to by चिंतातुर जंतू

>>जर प्रमाण हिंदीबद्दल आपण बोलत असू, तर तिथे बंबई, पूना आणि थाना हे प्रमाण असू शकेल. त्यावर कुणाही मराठी माणसाला मत असू शकतं पण त्यानं प्रमाण हिंदी बदलत नाही.

जर आम्ही प्रमाण हिंदीत मुंबई आणि प्रमाण इंग्रजीत Mumbai लिहिण्याचा आग्रह धरीत असू. आम्हाला Bombay लिहिण्याचीच सवय आहे आणि "ऑक्सफर्ड डिक्शनरी किंवा तल्सम काहीतरी हे इंग्रजीसाठी बायबल आहे म्हणून आम्ही सहजासहजी ते बदलणार नाही" असा दावा करण्याची संधी आपण त्यांना देणार नसू.... पक्षी "तुमची प्रमाण हिंदी/इंग्रजी बदलून घ्या" असं म्हणत असू तर इराण ऐवजी इरान/ईरान* हा बदल करून घ्यायला हवा.

*इराण (किंवा अजून काहीही) म्हणायला माझी व्यक्तिशः काही हरकत नाही. फक्त त्याचे जस्टिफिकेशन "आमची प्रमाण भाषा/आमचा विश्वकोश" या पायावर होऊ नये एवढेच.

मणिकर्णिका Sun, 23/03/2014 - 10:55

In reply to by नितिन थत्ते

इराण (किंवा अजून काहीही) म्हणायला माझी व्यक्तिशः काही हरकत नाही. फक्त त्याचे जस्टिफिकेशन "आमची प्रमाण भाषा/आमचा विश्वकोश" या पायावर होऊ नये एवढेच

झालं तर मग.
विश्वकोशाला 'मी' बायबल मानते. तुम्ही मानावंच असा आग्रह नाही, माझ्या म्हणण्यात तसे अध्याह्रतही नाही.

चिंतातुर जंतू Sun, 23/03/2014 - 12:53

In reply to by नितिन थत्ते

>> जर आम्ही प्रमाण हिंदीत मुंबई आणि प्रमाण इंग्रजीत Mumbai लिहिण्याचा आग्रह धरीत असू. आम्हाला Bombay लिहिण्याचीच सवय आहे आणि "ऑक्सफर्ड डिक्शनरी किंवा तल्सम काहीतरी हे इंग्रजीसाठी बायबल आहे म्हणून आम्ही सहजासहजी ते बदलणार नाही" असा दावा करण्याची संधी आपण त्यांना देणार नसू.... पक्षी "तुमची प्रमाण हिंदी/इंग्रजी बदलून घ्या" असं म्हणत असू तर इराण ऐवजी इरान/ईरान* हा बदल करून घ्यायला हवा.

अशा आग्रहामागे आपले गंड किंवा आपण जोपासलेले सांस्कृतिक दहशतवादी आहेत का, हे तपासणं गरजेचं आहे. फ्रेंचांनी किंवा जर्मनांनी 'इंग्लंड'साठी आपल्या प्रमाणभाषेत कोणता शब्द वापरावा हे इंग्लिश लोक ठरवत नाहीत.

नितिन थत्ते Sun, 23/03/2014 - 16:23

In reply to by चिंतातुर जंतू

>>फ्रेंचांनी किंवा जर्मनांनी 'इंग्लंड'साठी आपल्या प्रमाणभाषेत कोणता शब्द वापरावा हे इंग्लिश लोक ठरवत नाहीत.

याविषयी कल्पना नाही पण आपापल्या प्रमाण भाषांतून उत्तर/इतर भारतीयांनी, तसेच इंग्लंड अमेरिका यांनी मुंबई/Mumbai असा बदल केलेला दिसत आहे. तेव्हा असा बदल करणे त्यांना मान्यही असल्याचे दिसत आहे. [पक्षी ज्या गंडांचा आणि जोपासलेल्या सांस्कृतिक दहशतवाद्यांचा उल्लेख आहे त्यांचा परिणाम इंग्लंड अमेरिकेवर व्हायचे काही कारण नव्हते.

परत एकदा सारांश .... आपल्या प्रमाण भाषेत योग्य शब्दानुसार बदल करण्यास प्रत्यवाय नसावा.

चिंतातुर जंतू Sun, 23/03/2014 - 17:11

In reply to by नितिन थत्ते

>> ज्या गंडांचा आणि जोपासलेल्या सांस्कृतिक दहशतवाद्यांचा उल्लेख आहे त्यांचा परिणाम इंग्लंड अमेरिकेवर व्हायचे काही कारण नव्हते.

आपण आग्रहच धरला, तर त्यांनी मान तुकवणं हे त्यांच्या वसाहतकालोत्तर, वंशभेदोत्तर सहिष्णुतेच्या धोरणामुळे असू शकतं. म्हणजे दोन्ही बाजूंना गंडांचा अभावच आहे असं ठामपणे म्हणता येत नाही.

'न'वी बाजू Sun, 23/03/2014 - 05:02

In reply to by नितिन थत्ते

अवांतर दोन: र अक्षरानंतर न आल्यास त्याचा ण होतो असा काहीसा नियम संस्कृतात आहे.

ऋ, र किंवा ष. (पण षच. श नव्हे.)

अजो१२३ Sun, 23/03/2014 - 17:29

In reply to by 'न'वी बाजू

काहीच दिवसांपूर्वी होळीच्या धाग्यावर आपण मला फार काही संस्कृत येत नाही म्हटले होते. हा नियम इतका चांगला माहित आहे तुम्हाला.

'न'वी बाजू Sat, 22/03/2014 - 21:13

In reply to by नितिन थत्ते

...दोन्ही चूक!

('अलेक्सान्द्रोस' हे (बहुधा) बरोबर.)

- एवढेच बोलून मी नम्रपणे आपली रजा घेतो, आणि खाली बसतो.

बॅटमॅन Sun, 23/03/2014 - 00:46

In reply to by 'न'वी बाजू

'आलेक्सान्द्रॉस' हेच रूप आमच्या होमरने यावनी भाषेत वापरले होते. तेच रूप पुढे त्या अर्धबर्बर माकिदॉनियन राजाने स्वतःस लावोन घेतले.

'न'वी बाजू Sun, 23/03/2014 - 00:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(तसं भारताचा उल्लेख हिंदुस्थान असा केला तरीही मला वैताग येतो. भारताचं अधिकृत नाव भारत किंवा इंडीया आहे म्हणून.)

तर मग त्याच भारताचे सरकार 'हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड', 'हिंदुस्तान अँटिबायोटिक्स', 'हिंदुस्तान मशीन टूल्स', 'हिंदुस्तान कॉपर लिमिटेड', 'हिन्दुस्तान केबल्स', 'हिंदुस्तान पेट्रोलियम' अशा अधिकृत नावांनी अनेक संकीर्ण कंपन्या चालवते, त्यांनाही जरा सुनावून या जा.

(पैकी, 'एचएमटी'चे अधिकृत नाव 'हिंदुस्तान मशीन टूल्स'वरून बदलून फक्त 'एचएमटी' झाले म्हणे. पण ते एक असो.)

'जय हिंद' या घोषणेच्या अधिकृत सरकारी वापरास आपला काही आक्षेप आहे काय?

'न'वी बाजू Sun, 23/03/2014 - 05:11

In reply to by 'न'वी बाजू

श्री. झिया उल हक यांच्या पाकिस्तानी अध्यक्षपदावरील कारकीर्दीच्या काळात, ऑल इंडिया रेडियो उर्दू सर्विसवरील बातमीपत्रांत भारताचा उल्लेख सहसा 'हिंदुस्तान' असा होत असे; याच काळात रेडियो पाकिस्तानवरील उर्दू बातमीपत्रांत मात्र भारताचा उल्लेख आवर्जून 'भारत' असाच होत असे, असे आठवते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/03/2014 - 19:21

In reply to by 'न'वी बाजू

देशाचं नाव हिंदुस्थान/हिंदुस्तान असं वाचून वैताग येतो. इतरत्र, अन्य आस्थापनांना असं नाव देताना, जुन्या नावाची लेगसी वापरली तरी मला काही फरक पडत नाही. भारताच्या सरकारने देशाचं नाव हिंदुस्तान/हिंदुस्थान (असंही) असेल असा काही अधिकृत बदल घडवून आणला तर मग मूळ आक्षेपही नाहीसा होईल.

(मी भारताचा उल्लेख मराठीत बोलताना 'भारत' असाच करत असले तरीही, काही काळ 'आयरॅक'च्या चालीवर 'आयण्डाया' असाही करून झालेला आहे.)

अरविंद कोल्हटकर Sat, 22/03/2014 - 08:44

खुशवंत सिंग ह्यांचे आज निधन झाल्याची वार्ता वाचली. ६०-७०-८० च्या दशकांमध्ये त्यांचे लिखाण पुष्कळ वृत्तपत्रांमधून येत असे. त्यांचा With Malice Towards One and All हा साप्ताहिक स्तंभ, बरेच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या पण एकेकाळी महत्त्वाचे साप्ताहिक मानल्या गेलेल्या इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया ह्याचे संपादक असतांना त्यांनी घडवून आणलेली हिंदुस्थानातील वैशिष्ट्यपूर्ण समाजगटांवरील मालिका खूप गाजली होती. (तिच्यामध्ये चित्पावन आणि महाराष्ट्रातील कायस्थ ह्यांच्यावरहि लिखाण होते. शीख धर्म आणि इतिहास ह्यांवरील त्यांचे लिखाण सर्वमान्य आहे.

त्यांचे वडील सर शोभा सिंग हे नव्या दिल्लीच्या 'बिल्डर्स'पैकी एक होते. दिल्लीतील नॉर्थ-साउथ ब्लॉकची बांधणी त्यांनी केली असे वाटते.

अरविंद कोल्हटकर Sat, 22/03/2014 - 08:51

'१९१६ : युआन शिकई या चीनी राजाने गादी सोडल्यावर लोकांचं राज्य स्थापन' अशा आजच्या दिनदर्शिकेतील माहिती बरोबर नाही. त्यांच्या 'राजा'असण्याबद्दल खरी माहिती येथे पहा.

'न'वी बाजू Sun, 23/03/2014 - 04:30

१९८९ : कादीयान, पंजाब इथे अहमदिया मुस्लिम पंथाची स्थापना मिर्झा गुलाम मुहम्मद यांनी केली.

१९८९???

प्रकाश घाटपांडे Sun, 23/03/2014 - 13:12

आज शहीद दिवस. क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना २३ मार्च १९३१ ला फाशी दिले. भगतसिंग हे विचारांनी नास्तिक होते. http://maharashtraatheist.com/registration-2/ इथे आज नास्तिक दिवस म्हणुन कार्यक्रम आहे.पुण्यात एस एम जोशी सभागृहात दु.३ ते ६ आहे. फक्त नास्तिकांनाच कार्यक्रमाचे भगतसिंग विचारमंचा तर्फे निमंत्रण आहे. असे फेसबुकावरुन समजते. संदर्भ https://www.facebook.com/photo.php?fbid=430400177063351&set=a.174606722…

ऐसि पाहुणा Sun, 23/03/2014 - 18:36

तत्त्वज्ञ यू. जी. कृष्णमूर्ती (२००७)

या गृहस्थांचे विडियोज मी पाहीलेले आहेत. त्यात तत्त्वज्ञान आहे असे वाटले नाही. खरे तर त्यांच्या बोलण्यात काय आहे? हेच कळले नाही. त्यांचे नेमके तत्त्वज्ञान समजू शकेल काय?

मन Mon, 24/03/2014 - 12:49

२३ मार्च १९५६ : पाकीस्तानचा प्रजासत्ताक दिन, पाकिस्तान जगातलं प्रथम मुस्लिम प्रजासत्ताक बनलं.
.
.
हे असं दिनवैशिष्ट्य वाचलं आणि लागलिच बाह्या सरसावून "१९२० च्या दशकात प्रागतिक प्रजासत्तक राब्वणार्‍या टर्की/तुर्कस्थानला विसरलात काय रे " असे म्हणत प्रतिसाद टंकणार होतो. पण तेवढ्यात लक्षात आले.
टर्की/तुर्कस्थान हे जगातील मुस्लिम बहुसंख्या असलेल्या देशातील पहिले व एकमेव सेक्युलर प्रजासत्ताक आहे.
पाकिस्तान पहिले इस्लामिक प्रजासत्ताक असणे आणि तसे लिहिणेच बरोबर आहे.
तस्मात ह्यावेळी दुरुस्ती सुचवून अक्कल मिरवायची संधी हुकली.

अरविंद कोल्हटकर Mon, 24/03/2014 - 23:55

जगातील सर्व भाषांमध्ये पोहोचलेला आणि लिहिलेल्या/उच्चारलेल्या शब्दांमध्ये सर्वात जास्त वेळा वापरला जातो असा 'ओके' हा शब्द २३ मार्चला १७५ वर्षांचा झाला असा उल्लेख आमच्या येथे Breakfast TV नावाची जी अखंड बडबड सकाळी तीन तास चालू असते तिच्यात आज सकाळी ऐकला. उत्सुकतेने ताडून पाहता विकिपीडियावर आणि मजजवळील मेरिअम-वेब्स्टर कोशामध्ये त्याला दुजोरा मिळाला. 'Boston Morning Post' ह्या वृत्तपत्रामध्ये २३ मार्च १८३९ च्या अंकात सध्याच्या प्रचलित अर्थाने हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला आहे. विकिपीडियाचा लेख असे सांगतो:

"The scholarly consensus, based on Allen Walker Read, identifies the earliest known use of O.K. in print as 1839, in the March 23 edition of the Boston Morning Post (an American newspaper). The announcement of a trip by the Anti-Bell-Ringing Society (a "frolicsome group" according to Read) received attention from the Boston papers. Charles Gordon Greene wrote about the event using the line that is widely regarded as the first instance of this strain of okay, complete with gloss:

The above is from the Providence Journal, the editor of which is a little too quick on the trigger, on this occasion. We said not a word about our deputation passing "through the city" of Providence.—We said our brethren were going to New York in the Richmond, and they did go, as per Post of Thursday. The "Chairman of the Committee on Charity Lecture Bells," is one of the deputation, and perhaps if he should return to Boston, via Providence, he of the Journal, and his train-band, would have his "contribution box," et ceteras, o.k.—all correct—and cause the corks to fly, like sparks, upward."

मेरिअम-वेब्स्टरचा उल्लेख अधिक त्रोटक आहे. ह्या शब्दाचा पहिला वापर १८३९ मधील इतकेच तेथे लिहिले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/03/2014 - 00:20

In reply to by अरविंद कोल्हटकर

मी गेल्याच विकेण्डला सकाळी लवकरच, पण माहितीचे छोटे तुकडे देणाऱ्या कार्यक्रमात ही गोष्ट ऐकली. All Correct याचं लघुरूप Oll Korrect - OK - असं कोणी वृत्तपत्राचा संपादक करेल हे पटलं नाही म्हणून तपासून पहायचं ठरवलं पण पुढे विसरून गेले. तुम्ही सगळेच कष्ट वाचवलेत. दिनवैशिष्ट्यात भर घातली आहे. (सगळी पानं कधीही शोधता येतील अशी सोय करण्याचं काम सुरू आहे, त्यात हे दिसेलच.)

अरविंद कोल्हटकर Tue, 25/03/2014 - 03:39

"कागदी चलनाचे जनक समजले जाणारे थॉमस रुझवेल्ट (१७९३)' असे आजच्या दिनविशेषातील जन्मदिवसाखाली दाखविले आहे. ह्याचा स्रोत काय? 'Thomas Roosevelt paper currency'अशी विचारणा गॉगलकडे केल्यावर काहीच हाती लागले नाही.

माझ्या समजुतीनुसार स्कॉटिश उलाढाल्या मनुष्य जॉन लॉ हा डयूक ऑफ ऑर्लीन्स पाचव्या लुईचा रीजंट असतांना फ्रान्सचा Controller General of Finances होता. अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्सची वसाहत चालविण्यासाठी कागदी पैसा ही कल्पना जॉन लॉ ह्याने निर्माण केली. अधिक माहितीसाठी येथे पहा

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/03/2014 - 17:55

In reply to by आदूबाळ

बहुदा नाही. आता हे कुठून शोधलं असावं हे नेहेमीच्या स्रोतांमधे हुडकलं, तिथे मिळालं नाही. म्हणजे चूकच असणार.

---

त्यावरून आठवलं:
एक मित्र HSBC बँकेत सॉफ्टवेअर लिहीतो. ते लोक तिथे लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम वापरतात. ही ज्यांनी वापरली असेल त्यांना चटकन समजेल, पण बाकीच्यांनाही समजेलसं लिहीण्याचा प्रयत्न करते. लिनक्समधे, कमांड प्रॉंप्ट वापरताना, समजा एखाद्या फाईल किंवा डिरेक्टरीचा पत्ता लिहीत असू, तर नावातली पहिली दोन-तीन अक्षरं लिहून टॅब ही कळ दाबली की नाव पूर्ण होतं. त्यात एकाच्या जागी दोन-तीन पर्याय असतील तर अर्थात ते होत नाही, पण तरीही टायपिंग थोडं कमी. या लोकांना सॉफ्टवेअर लिहीताना हे टॅब-कंप्लिशन वापरता येत नाही. भलतं काही चिकटलं तर (लोकांच्या) पैशाचा प्रश्न आहे. बाकी ठिकाणी भलतं काही चिकटलं तर, "चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार" मानता येतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/04/2014 - 20:31

In reply to by निनाद

माहिती इथून उचलली.

रवि शंकर यांच्या नावाच्या संकेतस्थळावर, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम ७ एप्रिलला आहे असं दिसतंय. विकीपीडीयावरही ७ एप्रिल अशीच माहिती आहे. त्यामुळे तोच दिवस योग्य वाटतोय.

अरविंद कोल्हटकर Tue, 01/04/2014 - 22:36

आजच्या दिनवैशिष्टयातील '१९५७ : बीबीसीने स्पगेटीच्या झाडाची अफवा प्रसारित केली' ही टीप वाचून जालावर शोध घेतला तेव्हा ही माहिती हाती आली.

अमुक Wed, 02/04/2014 - 08:51

श्री. हरिंद्रनाथ चटोपाध्याय यांचा आज जन्मदिवस. श्रीमती सरोजिनी नायडू यांचे हे कनिष्ठ बंधू.

अनेकांना कदाचित हे चित्रपटांतील वावरामुळे चेहर्‍याने माहित असतील पण नांवाने नसतील. उदा. हृषिकेश मुखर्जींच्या 'बावर्ची' चित्रपटातील वृद्ध कुटुंबप्रमुख म्हणजे हे हरिंद्रनाथ. यांची 'आशीर्वाद' या चित्रपटातील लहान मुलांसाठीची दोन गाणी मला फार आवडतात. विशेषतः नादपुनरावृतीमुळे.
१. नीना के नानी की नाव चली
२. रेलगाडी रेलगाडी यातले पहिले कडवे लक्षवेधी आहे.
गाडीतून जाताना एकामागोमाग एक वस्तू/आकार नजरेसमोरून जातात त्याचे वर्णन मस्त आहे. (हे गाणे कदाचित भारतीय चित्रपटसंगीतातले आद्यरॅप गाणे ठरावे) कुणाला पाठ करून मुलांना म्हणून दाखवायचे असेल तर येथे देत आहे :) -


रेल गाडी ....

रेल गाडी - रेल गाडी
छुक छूक छुक छूक - छुक छूक छुक छूक
बीच वाले स्टेशन बोले
रुक रुक रुक रुक - रुक रुक रुक रुक
​ध​डक - फडक लोहे की सडक
​ध​डक - फडक लोहे की सडक
यहाँ से वहाँ - वहाँ से यहाँ
यहाँ से वहाँ - वहाँ से यहाँ
छुक छूक छुक छूक - छुक छूक छुक छूक

छाती फुलाती - पार कर जाती
बालू - रेत , आलू के खेत
बाजरा - धान, बुढ्ढा किसान
हरा मैदान, मंदीर मकान , चाय की दुकान...
फुल, पगडंडी, टीले पे झंडी,
पानी का कुंड, पंछी का झुंड
झोपडी - झाडी - खेती - बाडी
बादल - धुँआ, मोट - कुँवा
कुँवे के पीछे बाग़ बगीचे
नदी का घाट, मंगल की हाट
गाँव में मेला, भीड़ - झमेला
टूटती दीवार, टट्टू सँवार ......

रेल गाडी - रेल गाडी
छुक छूक छुक छूक - छुक छूक छुक छूक
बीच वाले स्टेशन बोले
रुक रुक रुक रुक - रुक रुक रुक रुक
​​
धरमपुर-भरमपुर, भरमपुर-धरमपुर
​मैं​गलोर-​बैं​गलौर, ​बैं​गलौर-​मैं​गलोर
​​​​​मांडवा-खांडवा, ​खांडवा-मांडवा
रायपुर-जयपुर, जयपुर-रायपुर
​तलेगांव-मालेगांव, मालेगांव-तलेगांव​
​नेल्लुर-वेल्लुर, वेल्लुर-नेल्लुर​
शोलापुर-कोल्हापूर , कोल्हापूर-शोलापुर
उत्कल-डंडीगल , डंडीगल-उत्कल
मछलीपक्कम-इमलीपक्कम, इमलीपक्कम-मछलीपक्कम
उंगोल-नंदिगोल​, नंदिगोल-उंगोल
कोरेगाव-गोरेगाव, गोरेगाव-कोरेगाव
महमदाबाद-अहमदाबाद​, अहमदाबाद-महमदाबाद
​शोथरूड-कोथरूड, कोथरूड-शोथरूड​

छुक छूक छुक छूक - छुक छूक छुक छूक
​ध​डक - फडक लोहे की सडक
यहाँ से वहाँ - वहाँ से यहाँ
छुक छूक छुक छूक - छुक छूक छुक छूक
कूssssss

ऋषिकेश Wed, 02/04/2014 - 09:03

In reply to by अमुक

या गाण्याचे गीतकार कोण आहेत? पुण्याचे दिसताहेत कोथरूड, कोरेगाव ;)

बाकी हे गाणं वाचल्यावर मला कशासाठी पोटासाठी आठवलं
इथे आठवणीतून देतो आहे, चुभुद्याघ्या

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळु आगगाडी,
झोका कोण उंच काढी?
बाळु नीट कडी धर
झोका चाले खाली-वर
ऐका कुक् शिटी झाली
बोगद्यात गाडी आली
खड् खड् भक् भक्
अंधारात लखलख
इंजिनाची बघा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

कशासाठी पोटासाठी...

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्हासाची
दो डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटेदाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तार खांब हे वेगात
मागे मागे धावतात
:
:
:
(मधल्या ओळी विसरलो कोणाला पाठ/लक्षात/माहिती आहेत?)
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी
कशासाठी? पोटासाठी!

अरविंद कोल्हटकर Wed, 02/04/2014 - 18:34

In reply to by ऋषिकेश

मधल्या चार ओळी अशा आहेतः

तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात

माधव जूलियन् - ते आपले नाव असेच लिहीत - ह्यांच्या 'स्वप्नरंजन' - त्यांच्या लिखाणशैलीप्रमाणे 'स्वप्नरञ्जन' - ह्या संग्रहामध्ये ही कविता आहे असे 'छंदोरचना'वरून कळते. कविता म्हणजे लयबद्ध रचना हे छंदोरचनेमधील प्रामुख्याने मांडलेले तत्त्व स्पष्ट करण्यासाठी पहिलेच असे उदाहरण म्हणून ह्या कवितेचा उल्लेख तेथे पान १६ वर येतो.

त्याच संग्रहामध्ये आगगाडी ह्या विषयावर त्यांची अजून एक कविता आहे असेहि छंदोरचनेमधील उल्लेखावरून कळते पण ती पुरेशी प्रख्यात नसावी. छंदोरचनेमध्ये तिच्या काही ओळी मिळाल्या त्या अशा:

धडाड धडाड
खडाड खडाड
धावते ही गाडी
केवढी धडाडी
खाऊन रगड
काजळी दगड
पाण्याचे रांजण
पोटात पिऊन
फुस्फुसे नागीण
वार्‍याची बहीण
(पान ५२८)

स्वप्नरंजन माझ्यापाशी नसल्याने पूर्ण कविता देऊ शकत नाही.

मन Mon, 07/04/2014 - 14:05

नेताजी सुभाषचंद्र बोस व जपानी फौजा इशान्य भारतात कोहिमापर्यंत पोचल्या.
त्यांचे ब्रिटिशांशी युद्धही झाले आपल्याला ठाउक असतेच.
ते इशान्य्तील कोहिमाचे युद्ध ४ एप्रिल ते २२ जून १९४४ इतके चालल्याचे दिसते.
पुढील वेळी ४ एप्रिलला दिनवैशिष्ट्यात ह्याचा समावेश करता यावा.
.
.
८-९ एप्रिलसाठी :-
१९४२ :- हॅम्बर्ग ह्या जर्मन कारखानदारी केंद्रावर, मोठ्या शहरावर दोस्तांकडून तूफानी बॉम्बफेक.
त्यावेळपर्यंतचा हा सर्वात मोठा हला.
ह्या हल्ल्यात तब्बल २७२ (!!!) विमानांनी भाग घेतला.
ही बॉम्बिंग पुढे काही महिने चालूच होती. इतकी, की आख्ख्या शहराची शब्दशः राखरांगोळी झाली.
हिरोशिमा - नागासाकी इथला महासंहार ठाउक असतो; कीम्वा battle of britain सुद्धा कधीकधी
मिडियात वगैरे चर्चेत दिसते. पण ह्या शहराची लागलेली वाटही तशीच comparable आकाराची आहे; पण
तरी ही घटना कमी चर्चित दिसते.
.
.
एप्रिल ६ , १९१७ :-
ह्या दिवशी अमेरिका पहिल्या महायुद्धात उतरली.
त्यावेळी जर्मनी - ऑस्ट्रिया -ऑटोमन कसे का असेना, युद्ध रेटित होते ब्रिटन् - फ्रान्स - इटली - जपानविरुद्ध.
१९१७ मध्ये अंतर्गत क्रांती/यादवीमुळे रशिया हा इंग्लंड्-फ्रान्स ह्यांची साथ सोडून युद्धातून बाहेर पडत होता.
ह्याचा जर्मनीला मोठा फायदा होउ शकत होता. पण तो फायदा अमेरिका प्रवेश ह्या संकटापुढे क्षुल्लक ठरला.
शेवटी अमेरिकेचा युद्धप्रवेश निर्णायक ठरला.

अरविंद कोल्हटकर Wed, 09/04/2014 - 03:36

In reply to by प्रकाश घाटपांडे

'रामनवमी'सन्दर्भाने मी आजच एका नव्या धाग्यात काही लिहिले आहे ते पहावे. ते सर्व येथेच लिहिण्याने हा धागा भरकटला असता असे वाटले म्हणून नवा धागा सुरू केला.

बॅटमॅन Wed, 09/04/2014 - 12:45

In reply to by प्रकाश घाटपांडे

रामनामाची इतकी अ‍ॅलर्जी का असावी ते कळालं नाही. वरील प्रतिसादात खोडसाळ काय आहे? की अशी श्रेणी दिल्याने आपण हुच्चभ्रू ठरतो असा समज आहे?

अरविंद कोल्हटकर Fri, 11/04/2014 - 23:41

१९३० : पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे साडेचारशे दालने असलेले प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.>

शंकेखोर स्वभावानुसार 'साडेचारशे दालने' ही फारच अतिशयोक्ति असावी असे वाटले. जालावर शोध घेतला पण दालनांचा नक्की उल्लेख कोठेच मिळाला नाही. त्याचबरोबर साडेचारशेहि कोठे दिसले नाहीत. खरे असते तर नक्कीच तो एव्हाना सर्वज्ञात असा चर्चाविषय झाला असता.

विकिपीडियामधील आनंद भवनाचे चित्र पहा:

ter;">

घर प्रासादतुल्य आहेच पण तरीहि ४५० जरा जास्तच वाटते! रेल्वे डब्यातल्या शौचकूपाइतक्या आकाराच्या असल्याखेरीज ह्यात ४५० खोल्या मावतील असे वाटत नाही.

धनंजय Sat, 12/04/2014 - 01:04

In reply to by अरविंद कोल्हटकर

वरील चित्र "आनंद भवन" नावाच्या वास्तूचे आहे खरे, परंतु ही १९३०मध्ये राष्ट्राला अर्पण केलेली वास्तू नव्हे.

१९३०मध्ये "आनंद भवन" नावाची वास्तू राष्ट्राला अर्पण केली, तिचे नामांतर "स्वराज भवन" असे केले गेले. त्यानंतर मोतीलाल नेहरूंनी आणखी एक महाल बांधला, त्या नव्या वास्तूचे नाव "आनंद भवन" ठेवले, त्याचे चित्र वर दिलेले आहे.

गूगल नकाशांमध्ये असे दिसते, की हे आताचे आनंद भवन आताच्या स्वराज भवनापेक्षा (१९३० मध्ये अर्पण केलेल्या आनंद भवनापेक्षा) बरेच लहान आहे. (नकाशात बघता) स्वराज भवनाचे भूमिक्षेत्रफळ साधारण १००*२०० फूट = २०,००० चौरस फूट असावे. दोन-तीन मजले म्हटले, तर फरशी क्षेत्रफळ ~४५,००० चौ फूट असू शकते. याचे समसमान ४५० कप्पे केले तर प्रत्येक कप्प्याचे क्षेत्रफळ ~१०० चौ फूट येऊ शकते. म्हणजे शौचकूपापेक्षा मोठे. पण अर्थातच समसमान कप्पे नसणार - काही मोठी दालने असतील.

थोडी अतिशयोक्ती असेल, पण खूप अतिशयोक्ती नसावी असे वाटते.

अरविंद कोल्हटकर Sat, 12/04/2014 - 03:00

In reply to by धनंजय

तुम्ही लिहिल्यानुसार मी माझी समजूत दुरुस्त केली आहे.

पहिले आनंद भवन - सध्याचे स्वराज भवन - इंग्लंडमधल्या country estate च्या धर्तीवर होते असे त्याच्या विकिपेजवर दिले आहे. म्हणजे त्याच्या २०,००० चौ.फू.जमिनीचा मोठा भाग आसपासची मोकळी जागा, ड्राइव-वे, शोभेचे कारंजे, बगिचा इत्यादींना जाणार. प्रत्यक्ष इमारतीला एकूण क्षेत्रफळाचा काही भागच मिळेल.

ह्याखेरीज मला असा प्रश्न पडतो की मोतीलाल कितीहि धनवंत आणि प्रतिष्ठित असले तरी ४५० खोल्या कशाला बांधतील? इतक्यांचा उपयोग कसा करणार? राष्ट्रपति भवनात ३४० खोल्या असून त्याचा विस्तार ३२० एकर आहे असे विकिपीडिया सांगतो. राष्ट्रपति भवनात राष्ट्रपति कार्यालयहि आहे आणि परदेशी पाव्हण्यांचीहि सोय आहे.

मला तरी ही १८ अक्षौहिणी सेना आणि ८४ लक्ष योनींच्या जातकुळीची मोजणी वाटते.

धनंजय Sat, 12/04/2014 - 03:19

In reply to by अरविंद कोल्हटकर

नव्हे, इमारतीचे क्षेत्रफळ २०,०००. कारंजे बगीचा वगैरे बाजूला दिसतो - या क्षेत्रफळात नाही.

असो. स्वराज भवनाच्या इतिहासाबाबत एक माहितीपूर्ण दुवा (गंमत म्हणून देत आहे, या दुव्यात खोल्यांच्या संख्येबाबत काही नाही, म्हणजे प्रस्तुत चर्चेकरिता अवांतर आहे.)

अरविंद कोल्हटकर Sat, 12/04/2014 - 04:24

In reply to by धनंजय

माझे काही नातेवाईक अलाहाबाद-लखनौकडचे आणि मदनमोहन मालवीयांच्या परिवारातील आहेत. त्यांचे एक नेहरू-इंदिरा गांधींबरोबरचे घरगुती छायाचित्र खाली जोडत आहे.

पार्श्वभूमीवरील खांबाचे वगैरे काम पाहता हे घर आनंद भवन-स्वराज भवनपैकीच एक असावे. नेहरू अगदी घरगुती वेषात म्हणजे धोतरात असून त्यांच्या पायात काहीहि नाही. सर्व स्त्रिया उत्तर हिंदुस्थानी रीतीप्रमाणे डोक्यावर पदर घेतलेल्या आहेत - इंदिरा गांधींसकट.

मागे एक सेवकहि दिसत आहे.

अरविंद कोल्हटकर Sun, 13/04/2014 - 05:35

आजचा दिवस हा जैन धर्मसंस्थापक महावीर (४९९)ह्यांचा जन्मदिवस असे लिहिले आहे. इ.पू.असे लिहिण्याचे राहिलेले दिसते.