नव्या दृष्टीकोनाच्या मिमचे लागणदार
"डाऊन वुइथ नॉस्टॅल्जिया" वर विचार करता करता माझा मेंदू मिम्सच्या ( मराठी मनुके?) बाबतीत विचार करू लागला. ज्याप्रमाणे जनुके व्हायरससारखी असतात आणि स्वतःच्या प्रतिकृती तयार करून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतात त्याप्रमाणे विचारांचे हे मिम्सही व्हायरससारखे असतात आणि एका डोक्यातून दुसर्या डोक्यात स्वतःच्या प्रतिकृती तयार करून स्वतःचे अस्तित्व टिकवू पाहतात.
देव, धर्म, पाप, पुण्य, कला वगैरे प्रकार ही अत्यंत यशस्वी अशा मिम्सची उदाहरणे. अशा अनेक कल्पनांचे मिम्स आपापल्या मेंदूच्या स्मृतीसारणीत आपण साठवलेले असतात आणि ते संक्रमितही करत असतो.
एखादा मिम यशस्वी होण्याची अनेक कारणे आहेत आणि एखादा जनुक यशस्वी होण्याच्या कारणांशी ती जुळतात. ज्या मिम्समुळे अंतत: शारीरिक वा मानसिक दृष्ट्या फायदा होईल असे मिम जास्त टिकणार हे स्वाभाविक आहे. नॉस्टॅल्जिया हा ही अशाप्रकारचा एक मिम म्हणता येईल. झपाट्याने बदलू लागणार्या जगात बदलांच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी स्मरणरंजन करून जुन्या काळाची क्षणिक अनुभूति घेण्यासाठी हा मिम तयार झाला असावा आणि पुढे फोफावला असावा.
या धाग्यात मला अशाच आणखी एका मिमबद्द्ल चर्चा व्हावी असे वाटते. हा मिम म्हणजे नव्या दृष्टीकोनाचा मिम. म्हणजे काही तरी नवीन दृष्टीकोन (मराठी पर्स्पेक्टिव्ह) असला/मिळाला पहिजे असे वाटणे.
या मिमचे स्वरूप एखाद्या संहारक व्हायरससारखे आहे असे मला वाटते. आधीच्या मिम्सचे मेंदूत तयार झालेले सुखकारक पण सवयीने निरस झालेले आकृतीबंध हा व्हायरस तोडतो आणि त्यापासून मिळणार्या संवेदनांनी मेंदू सुखावतो. या संवेदना मुख्यतः स्वतःचा अहं सुखावणार्या संवेदना असाव्यात किंवा उजव्या हाताच्या ऐवजी डावा हात वापरल्यावर मेंदू गोंधळतो तशा काहीतरी असाव्यात. या संवेदनांसाठी हा मिम आधीचे मिम तोडत सुटतो आणि ते तोडण्यासाठी नवे नवे मिम तयार करतो. हे नवे मिम अर्थातच स्वतंत्र असे मिम असतात आणि ते स्वतःचे अस्तित्व टिकवायला बघतात. ज्या मेंदूमध्ये "नव्या दृष्टीकोनाचा" मिम नाही तो मेंदू कदाचित हे नवे मिम स्विकारणार नाही. अशा लोकांना नव्या दृष्टीकोनवाले सनातनी म्हणणार. परंतु ज्या मेंदूंमध्ये नव्या दृष्टीकोनाचा मिम तयार झाला आहे ते लोक हे नवे मिम स्वीकारणार आणि अर्थातच कालांतराने ते मिम जुनाट म्हणून तोडणार आणि स्वतःचे नवे मिम तयार करणार.
या मिमच्या विद्रोही रुपातूनच नवनिर्मिती होत असते पण सध्या त्याचा अतिरेक झाला आहे की काय असा विचार मनात येतो.
अतिरेक म्हणण्यापेक्षा आपल्याला नवे काय हवे हे माहित नसतानाही काहीतरी नवे हवे असे बर्याच लोकांना वाटू लागले आहे काय?
जुन्या वळणाच्या कवितांवरही तिरकस प्रतिसाद देणे आणि नव्या हरवलेल्या जहाजातील कवितांचीही टर उडवणे ( हे केवळ उदाहरण आहे) या मिमच्या बेबंद होण्याची लक्षणे आहेत काय?
जवळच्या भूतकाळात आलेल्या काही कादंबर्या वाचल्या असता त्यातले विषय बर्यापैकी ताजे आणि वर्तमानातले वाटले, शिवाय शैलीही जुनाट वाटली नाही. मग मराठी साहित्यात नवं काहीच होत नाही असं म्हणणार्यांना नवं म्हणजे काय अभिप्रेत आहे?
मला स्वतःला या मिमचाही अतिरेक झाला आहे असं वाटतं. कोणतीही कलाकृती आपण निरपेक्षपणे बघत नाही. कलाकृतीचे मूल्यमापन म्हणजे जुन्या एखाद्या कलाकृतीशी किंवा कलाकाराच्या शैलीशी तुलना करणे आणि थोडेजरी साम्य आढळले तर नव्या कलाकाराला थंडा प्रतिसाद देणे असं बर्याचदा घडतं (माझ्याकडे विदा नाही).
मुख्य म्हणजे नवेपणा या शब्दाची व्याख्या कलाकॄतीच्या बाबतीत पूर्णपणे केली गेलेली नाही असेही मला वाटते. नव्या वर्तमानातल्या विषयावर लिहीलेल्या कथेतली शैली जुन्या लेखकासारखी वाटली तरी ती कथा नवी आणि वेगळी कलाकृती ठरते की कसे ते कळत नाही.
त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात पुरेशी नवनिर्मिती होत असूनही या मिमच्या लागणदारांमुळे नव्या लोकांना पुरेसा प्रतिसाद मिळत नाही आणि आजकाल नवं काही होत नाही अशी तक्रार ऐकायला मिळते असं मला वाटतं. तुम्हाला?
मस्त!
पहिला परिच्छेद जाम आवडला.
नंतर नंतर थोडास्सा कंटाळा आला.
मुख्य म्हणजे नवेपणा या शब्दाची व्याख्या कलाकॄतीच्या बाबतीत पूर्णपणे केली गेलेली नाही असेही मला वाटते.
दैनंदिन जीवनातल्या जवळजवळ सर्वच गोष्टींची काटेकोर व्याख्या केली गेलेलीच नाही.तशीच ती नवेपणाचीही केली गेलेली नाही.
दातृत्व,कर्तव्य्,प्रेम्,मैत्री,शत्रुत्व... सगळेच निव्वळ शब्द. सगळ्यांचीच आपल्यापुरती आपणच केलेली व्याख्या.
"जुने जाउ द्या मरणा लागुनी" म्हणणार्या केशवसुतांच्या ओळिंना शतक उलटून गेल्याने नाविन्याची आस धरणारी ही जुन्या काळातली कविताच हल्ली कुणाला नॉस्टॅल्जिया वाटू लागली आहे.
त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात पुरेशी नवनिर्मिती होत असूनही या मिमच्या लागणदारांमुळे नव्या लोकांना पुरेसा प्रतिसाद मिळत नाही आणि आजकाल नवं काही होत नाही अशी तक्रार ....
म्हणजे नाविन्य जाणवण्याची क्षमता गमावून बसणे असे होते आहे काय?
सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते वन्दिनस्ताः कथाः
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
म्हणजे नाविन्य जाणवण्याची
बहुधा असेच. नवीन म्हणजे नक्की कसे हवे ते माहित नाही पण जुन्याचा कंटाळा आलेला आहे अशा अवस्थेत असल्यासारखे होत आहे असे वाटते.
रोचक
रोचक लेख. प्रतिसादाकरता जागा राखून ठेवत आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
रोचक
रोचक लेख.
नक्की काय म्हणायचे आहे ते समजण्यासाठी दोन-तीनदा वाचावा लागला. (दोष अर्थात आमच्या आकलनशक्तीचा, लेखकाचा नाही) सुरुवातीला 'नॉस्टाल्जिया' चा मीम वि. 'अँटी-नॉस्टाल्जिया' चा मीम असे काहीसे आहे असे वाटले. दुसर्या-तिसर्यांदा हा मनुका चघळला तेव्हा 'नव्या दृष्टीकोनाचा मिम' (खरे तर नव्या दृष्टीकोना(च्या विरोधा) चा मिम) किंवा या दोघांची थोडीशी मिसळ, हे कळले.
'कॉन्झर्वेटिव्हिझम' आणि 'लिबरलिझम' या नेहमीच्या खेचाखेचीचा हा एक उप-प्रकार, असे मला वाटते. 'जुने ते सोने' म्हणून जुन्यातच मश्गुल असलेले, आणि सतत नवे काहीतरी शोधत असणारे, या दोघांनाही असे प्रश्न पडत नाहीत. या दोघांच्या मध्ये असलेल्या बहुसंख्यांची मात्र गोंधळलेली अवस्था होऊ शकते. त्या दृष्टीने यात नवे काय? असा प्रश्न पडला आहे. मर्ढेकरांना 'कवडा' म्हणणारे पु.ल. नंतर त्यांच्याच कवितांचे जाहीर वाचन करतात. केवळ साहित्यातच नाही तर सर्वच क्षेत्रात हे होत असतेच. आज आपण 'जुने अवीट गोडीचे' म्हणून जे सिनेसंगीत गुणगुणतो त्यावर त्या काळात टीका झालेली असते. एखादी अचाट फॅशन आल्यावर सुरुवातीला ती स्वीकारणार्यांची चेष्टा होते, हळूहळू इतरांच्याही अंगावर ती दिसू लागते आणि काही दिवसांनी तिचा पार 'बेलबॉटम' होतो. आता जीन्सची चेष्टा करणे सुरू होते.
यामागची कारणे दोनच असावीत आणि आपण ती वर मांडलेली आहेतच. 'या संवेदना मुख्यतः स्वतःचा अहं सुखावणार्या संवेदना असाव्यात किंवा उजव्या हाताच्या ऐवजी डावा हात वापरल्यावर मेंदू गोंधळतो तशा काहीतरी असाव्यात'. 'आहे ते बरं आहे की!' या समाधानी अवस्थेत असणारे एक, आणि कुठल्याही नव्या गोष्टीला 'विरोधासाठी विरोध' करून स्वतःचा अहंगड कुरवाळणारे 'अंतू बर्वे' या दोन प्रकारात तुमच्या 'लागणदारांना' बसवता येईल, असे वाटते.
त्या दृष्टीने यात नवे काय?
जुन्याच मुद्यावर नवी चर्चा व्हावी अशी इच्छा हे नवे आहे.
जुन्याच्या पुनःप्रत्ययाच्या आनंदातच मश्गुल असलेले पुन्हा 'तसे' काही होणे शक्य नाही या विचारावर ठाम असले आणि नवं 'काहीतरी' पाहिजे असं म्हणणारे 'छ्या, हे काय, सगळं डबकं झालंय' असं म्हणत असले तर नवं काही घडणार कसं किंवा घडलंय ते नवं आहे हे तरी कळणार कसं?
या दोन टोकांच्या मध्ये गोंधळलेल्यांचा गोंधळ कसा कमी करायचा? या गोंधळामुळेच नवीन काही कलाकृती करायची काहींची इच्छा तर मरत नाही ना?
नॉस्टॅल्जियाचा मिम आणि नव्या दृष्टीकोनाचा मिम दोन्ही एकत्र सुखाने कसे नांदवायचे?
आवडले. विचार करावयास लावणारे
आवडले. विचार करावयास लावणारे लेखन.
उत्तम विषय
मीम किंवा मनुक याचा अर्थ असं काहीही जे आपल्या मनात, मेंदूत घर करून बसतं. जे मुख्यत्वे आपण कुणाकडून तरी किंवा कुठूनतरी शिकलेलं असतं. 'टू मिमिक' या शब्दापासून तो बनलेला आहे. नक्कल, अनुकरण करण्यासारख्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं एकक. एखादी धुन, एखादा चुटका, किस्सा ही मनुकं असू शकतात. जनुकांप्रमाणेच मनुकांचा देखील प्रसार होण्यासाठी एका मेंदूला ती स्वीकारण्याची क्षमता असायला हवी. त्याचबरोबर ते स्वीकारल्यावर काही ना काही कारणामुळे पसरवण्याची इच्छा व्हायला हवी. कोलावेरी डी हे गाणं आपण ऐकतो. कर्णपिशाच्चाप्रमाणे ते कानात, मनात वाजत रहातं. त्याचबरोबर ते आपल्याला गुणगुणण्याची इच्छा होते. किंवा कोणाला तरी ते मुळातून ऐकवून दाखवण्याची इच्छा होते. म्हणून ते गाणं, किंवा ती चाल याला आपण मीम म्हणू शकतो. किंवा
पठेत्गणपतीस्तोत्रं षड्भिर्मासै फलं लभेत,
संवत्सरेण सिद्धीं च लभते नात्रसंशयः
मध्ये अनेक मीम आहेत. या स्तोत्राची नादमयता हा एक मीम आहे, देवापुढे नतमस्तक होण्याच्या भावनेला पोषण करणारा भक्तिभावाचा मीम आहे, धर्माच्या जगड्व्याळ मीम-समूहात सामावलं जाणाऱ्या स्तोत्राचा मीम आहे. शिवाय यात स्वतंत्रपणे स्वतःची पुनरावृत्ती करण्याची, स्वतःची एक कॉपी पाठांतराने घट्ट व्हावी यासाठी लालुच देणाराही मीम आहे.
धर्म, संस्कृती वगैरेंना मीम-समूह म्हणता येतं. मात्र नवीन दृष्टीकोनाचा मीम ही कल्पना नीट कळली नाही. मीम हे सहसा मेंदूतल्या, किंवा मनातल्या (माइंड मधल्या) काही 'जागां' ना सहज चिकटून बसतील, कुठल्यातरी तयार खबदाडींमध्ये फिट्ट बसल्यामुळे घट्ट अडकून बसतील अशा संकल्पनांना म्हटलं जातं. ते तिथे फिट बसल्यामुळे त्यांना नवीन काय चिकटून बसेल किंवा त्यांच्या आधारे काही नवीन अडकून बसू शकतील असा माइंडचा आकार बदलतो हे खरं आहे. पण एखादा दृष्टिकोन हे मेंदू-मन-माइंडच्या अंगभूत आकाराचा भाग वाटतो. विचारसरणी, किंवा इझम हे शिकता येतात. पण दृष्टिकोनाचा मीम म्हणजे काय हे नीट समजत नाही. या कल्पनेचा थोडा विस्तार करावा.
नवीन दृष्टीकोनाचा मिम म्हणजे
नवीन दृष्टीकोनाचा मिम म्हणजे एक असा विचार की "हे आज जे चाललं आहे (कोणत्याही क्षेत्रात) ते जुनाट झालं आहे. त्यात नाविन्य काही नाही. मला एक ताजा, वेगळ्या अंगाने विचार करणारा दृष्टीकोन हवा आहे."
हा कोणताही इझम नाही, फक्त एक विचाराची आकृती (किंवा रेणू म्हणा हवं तर) जी कोणाच्याही मेंदूत 'तयार' होऊ शकते आणि त्या माणसाने दुसर्याकडे व्यक्त केल्यावर दुसर्याच्या मेंदूत संक्रमित होऊ शकते. कारणे अनेक असतील पण आधीच्या पठडीतल्या विचारांना धक्का दिल्याचे एक बंडखोर आणि अहं सुखावणारे समाधान हा विचार देत असल्याने कदाचित, हा मिम रुजत आणि वाढत असेल असे मला वाटते.
हे मला पूर्णपणे बरोबर वाटत नाही. ज्याप्रमाणे जनुकांचे रेणू ऑपॉप तयार होऊ शकतात तसे विचारांचे रेणूही कोणाच्याही मेंदूत ऑपॉप तयार होऊ शकतात. असाच हा एक प्रस्थापितांच्या आणि स्पर्धकांच्या गर्दीत स्वतःचे वेगळेपण दाखवणारा आणि स्वतःकडे थोडंसं नियंत्रण आणून देणारा हा "नव्या दृष्टीकोनाचा" (म्हणजे नवा दृष्टीकोन पाहिजे असा) विचार प्रसवला आणि इतरांनी मिमिक करून तो पसरला असावा असे मला वाटते. अन्यथा साधारणतः माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती चार-चौघे करतील ते करण्याची असते.
हे तुमचे म्हणणे बरोबरच आहे. पण "आता मला नवा दृष्टीकोन हवा आहे" असे वाटणे हा मनाच्या अंगभूत आकाराचा भाग नाही असे मला वाटते. आपल्या मनात घट्ट झालेल्या काही संकल्पनांना उकरून काढून त्या टाकून देण्याची किंवा त्यांचे स्वरूप बदलण्याची प्रेरणा देणारा हा विचार मनाच्या अंगभूत आकाराचा भाग असता तर सगळीच माणसे वैचारिकदृष्ट्या लवचिक झाली असती. पण ज्यांना आपण सनातनी म्हणतो ते लोक या विचाराचा स्वीकार आणि प्रसार करताना दिसत नाहीत; त्यांना त्यांच्या मनाला आकार येताना शिकवलेल्या संकल्पनांना ते घट्ट धरून बसलेले दिसतात.
नाजुक विणकाम
हे तर मेंदुचे शिक्षणाचे तंत्र - नविन गोष्टी शिकताना नव्या चेतासंधी(वाटा) बनविणे, त्यांना जुन्या वैचारिकजाळात विणणे, ह्या विणकामात तसे अनेक भाग कार्यरत असतात, पण प्रामुख्याने निओ-कॉर्टेक्स आणि अम्यिगडला ही जोडी महत्वाची मशागत आणि पेरणी करते, नविन विचार आले कि हा अम्यिगडला घाबरतो आणि विरोध करतो, विचारांचा फोर्स जेवढा जास्त तेवढा विरोध जास्त, आणि मग 'हे' फार अवघड आहे असे म्ह्णून त्या मेंदुचा मालक त्या विचारांचा त्याग करतो,त्याच धर्तिवर जुन्या विचारांचे उदात्तिकरण झाले की अम्यिगडला सुखावतो आणि मग सनातनी हे लेबल चिकटत जाते, पण हे मग असे अवघड तर कायमच वाटत रहाणार कि, त्यावर काय उपाय? तर अगदी सोपा असा वाटणार उपाय आहे - लहान मुलांना पोहायला शिकवताना पहिल्यांदा ट्युब्/डबे/भोपळे लाउन पाण्यात उतरवतात, पाणी काय चिज आहे समजल्यावर मग सपोर्टशिवाय पोहायला जमते/मजा येते, त्याच प्रमाणे नविन विचारांचे धागे हळूहळू ह्या मेंदूला दिले पाहिजेत,हे विणकाम फार नाजुक आहे, थोडा अतिरेक झाला तर पळा-अथवा-झोडा ह्या सनातनी मार्गाचा अवलंब मेंदू करतो.
हे नव्या दृष्टीकोनाचे मेमे देखिल रुजतिल जर ते प्रभावी आणि हळूवार असतिल तर.
तसेच काही बंडखोर मेंदू जुने विचार स्विकारायला तयारच होत नाही, नविन शालीत जुन्या पध्द्तिची विण जरी दिसली तरी त्याची हेटाळणी होते, ज्याक्षणी त्या विचारांचा स्त्रोत (जेनेसिस) जुन्याच विचारात आहे हे कळते तेंव्हा तो विचार जुनाटच म्हणुन नाकरला जातो. (The subject's mind can always trace the genesis of the idea. True inspiration is impossible to fake - Inception )
हे एकिकडे होत असतानाच दुसरीकडे माहितीचा प्रचंड मारा सातत्याने होतोय, ह्या माहितीच्या ट्रॅफिकजाममधे नविन नक्की ते काय हे ओळखण्याइतपत विचार करण्याच वेळच मिळत नाहिये, किंवा ह्या प्रचंड सागरातून आपल्याला नक्की काय हवयं हेच समजत नाही, कदाचित "आजकाल नवं काही होत नाही अशी तक्रार" त्यामुळेच ऐकायला मिळत असावी.
पुरेशी हा शब्द कदाचित थोडा आक्रमक वाटतो, तसेच पुरेसा प्रतिसाद का पुरेशा वेळानंतर मिळेलच ह्याची खात्री वाटते.
धन्यवाद
प्रतिसाद आवडला आणि पटला.
अतिरेक?
असा मीम अस्तित्वात असला तरीही त्याचा अतिरेक झाला आहे असं अजिबातच वाटत नाही. मराठीपुरतं बोलायचं तर आंतरजालावर किंवा लिखित माध्यमांमध्ये स्मरणरंजक लिखाण जितक्या प्रमाणात दिसतं तितक्या प्रमाणात जुन्याला तुच्छ लेखणारं लिखाण दिसत नाही. उदा: 'सकाळ'मध्ये रविवारच्या पुरवणीत प्रवीण दवणे प्रभृती जे लिहितात ते लिखाण किंवा 'मुक्तपीठ' या सदरात वाचकांचं जे लिखाण प्रकाशित केलं जातं त्यात स्मरणरंजनाचा भाग मोठा असतो. पुलं/आंबेडकर/शिवाजी वगैरे लोकप्रिय व्यक्तींवर टीका करणार्या लिखाणापेक्षा त्यांची स्तुती करणारं लिखाण जास्त सापडतं. काही विभूतींवर टीका केली तर फार वाईट परिणाम भोगावे लागतात असा उलटा प्रघात आहे. त्याऐवजी जुन्याविषयी स्मरणरंजक किंवा विभूतीपूजक लिखाणामुळे वाईट परिणाम भोगावे लागतात असा प्रघात असता तर कदाचित तुम्ही म्हणताय तसा अतिरेक झाला आहे असं म्हणता आलं असतं.
मराठीबाहेरच्या जगात पाहता मेंदू आणि भावना यांवरच्या संशोधनात स्मरणरंजनाची पुष्कळ दखल घेतली गेली आहे. गूगलवर 'नॉस्टाल्जिआ' आणि 'न्यूरोसायन्स' वर शोधलं असता अनेक दुवे मिळतात. मासल्यादाखल http://veryevolved.com/2009/02/neuroscience-and-nostalgia/ हे पाहा. नव्याच्या आकर्षणाविषयीही काही अभ्यास झालेला दिसतो. उदा: http://www.huffingtonpost.com/russell-poldrack/multitasking-the-brain-se... हे पाहा. पण मराठी आंतरजालावर किंवा लिखित माध्यमात नव्याचा सोस आणि जुन्याविषयी तुच्छता यांचा अतिरेक झाला आहे असं वाटत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अतिरेक नाही
हे पटलं आणि त्या दृष्टीने अतिरेक नाही हे मान्य आहे. खरं म्हणजे इथे मी अतिरेक हा शब्द वापरायला नको होता (मला कदाचित नीट मांडता येत नाहीये), पण समजा वाचकांचे थर आहेत; वाचकांच्या सगळ्यात वरच्या थरात, जिथे दांडगे वाचन असलेले आणि साहित्यक्षेत्रात क्रियाशील असलेले लोक आहेत, हा नव्या दृष्टीकोनाचा विचार चांगलाच बळावला आहे आणि तो त्या थरातून खालच्या थरांमध्ये संक्रमित होत आहे. सामान्य माणसाच्या थरात अजून हा विचार पोचलेला नसल्याने ते अजूनही स्मरणरंजक आणि विभूतिपूजक लेखनाची तारीफ करत आहेत. तरीही वरच्या थरातून हा नव्या दृष्टीकोनाचा विचार पसरण्याचा वेग साहित्यात नवनिर्मिती होण्याच्या वेगापेक्षा जास्त आहे का? आणि हा वेग जास्त असल्याने नवे काही तरी घडत असूनही नवे काही घडत नाहीये अशी भावना उरत असेल का असे मला विचारायचे आहे.
बाकी तुम्ही दिलेले दुवे रोचक आहेत. विशेषतः नॉस्टॅल्जिया डिप्रेशन पासून रक्षण करण्यासाठी वापरला जात असेल तर एखाद्या विशिष्ट समाजसमूहात नॉस्टॅल्जिया खूप जास्त असण्याने निर्देशित होणारे अनुमान रोचक आहे.
पहीला दुवा उघडला नाही दुसरा
पहीला दुवा उघडला नाही दुसरा उघडला व आवडला, विशेषतः सेल्फ-कंट्रोल या विषयाशी निगडीत असल्याने.
एकदम पटलं.
पण मराठी आंतरजालावर किंवा
नक्की अतिरेकाचा थ्रेशोल्ड काय असावा याचा इच्यार करतोय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
रोचक
अतिशय रोचक लेख...अभिनंदन...संकल्पना समजून घ्यायला वेळ लागेल, पण लढेन असं वाटतंय..डॉकिन्सचं 'सेल्फिश जीन' अनेक दिवस रांगेत आहे. संग्रहात येऊन बरेच दिवस झाले, पण जिज्ञासेहून आळस प्रबळ असल्याने अजून हात लागला नाही.
'मला स्वतःला या मिमचाही अतिरेक झाला आहे असं वाटतं. कोणतीही कलाकृती आपण निरपेक्षपणे बघत नाही. कलाकृतीचे मूल्यमापन म्हणजे जुन्या एखाद्या कलाकृतीशी किंवा कलाकाराच्या शैलीशी तुलना करणे आणि थोडेजरी साम्य आढळले तर नव्या कलाकाराला थंडा प्रतिसाद देणे असं बर्याचदा घडतं'..हे मान्य.
'रॅटटुई'या अप्रतिम अॅनिमेशनपटातील एका पात्राचे (हा एक food critic आहे) हे म्हणणे वाचण्यासारखे आहे....
In many ways, the work of a critic is easy. We risk very little, yet enjoy a position over those who offer up their work and their selves to our judgment. We thrive on negative criticism, which is fun to write and to read. But the bitter truth we critics must face is that in the grand scheme of things, the average piece of junk is probably more meaningful than our criticism designating it so. But there are times when a critic truly risks something and that is in the discovery and defence of the new.The world is often unkind to new talents, new creations. The new needs friends. Last night, I experienced something new; an extraordinary meal from a singularly unexpected source. To say that both the meal and its maker have challenged my preconceptions about fine cooking is a gross understatement. They have rocked me to my core. In the past, I have made no secret of my disdain for Chef Gusteau's famous motto, "Anyone can cook". But I realize — only now do I truly understand what he meant. Not everyone can become a great artist, but a great artist can come from anywhere. It is difficult to imagine more humble origins than those of the genius now cooking at Gusteau's, who is, in this critic's opinion, nothing less than the finest chef in France. I will be returning to Gusteau's soon, hungry for more.
(ज्यांनी चित्रपट पाहिला आहे त्यांना वरील उतार्यातील नावाचे सन्दर्भ लक्षात येतील...)
धन्यवाद
रॅटटूई पाहिलेला नाही पण हा उतारा आवडला आणि आता पाहीन म्हणतो.
यात नवीन ते काय?
पण हे तर नेहमीच आणि सर्व कलाक्षेत्रांत होत आलं आहे. त्यात नवीन काही नाही. उदा: 'इम्प्रेशनिझम' ही नवी चित्रशैली जेव्हा एकोणिसाव्या शतकाअखेरीला जन्माला आली तेव्हा पॅरिसमधल्या 'अॅकॅडमी ऑफ फाईन आर्टस'तर्फे वास्तववादी चित्रशैलीची भलामण होत होती. मोने आणि सेझानसारख्या चित्रकारांना तेव्हा सामान्य जनतेकडून आणि समीक्षकांकडून चेष्टा स्वीकारावी लागली, पण एमिल झोलासारखे काही लोक यांच्या मागे उभे राहिले. आज इम्प्रेशनिस्ट चित्रं चांगलीच लोकप्रिय आहेत आणि मोने आणि सेझान प्रतिभावान मानले जातात. अधिक माहिती इथे आणि इथे मिळेल. मराठी साहित्यातलं उदाहरण म्हणजे दलित साहित्य. पुण्याच्या शुद्ध मराठीच्या भोक्त्यांनी सुरुवातीला त्यावर टीका केली, पण पुलंसारख्यांनी त्याची भलामण केल्यामुळे दलित साहित्याला प्रतिष्ठा मिळाली. शिरा ताणून केले गेलेले तेव्हाचे वाद आज हास्यास्पद वाटतात इतके कालबाह्य झालेले आहेत आणि दलित साहित्य मुख्य प्रवाहात आलेलं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
यात नवीन ते काय?
यात नवीन ते काय? हेच नवीन आहे. दलित साहित्याला विरोध कसा आणि कोणत्या भाषेत झाला ते मला नक्की माहित नाही. पण काय काहीही शिवराळ, भडक लिहितात असा सूर असावा. लेखन कसं नीटनेटकं असावं याच्या कल्पना ठाम असाव्यात तेव्हा.
तेच आता कोणी काही लिहीलं की "त्यात नवीन ते काय?" असं आधी बघितलं जातं असं वाटत नाही का? म्हणजे पूर्वी प्रस्थापित पद्धतीने लिहीलेलं असावं अशी अपेक्षा असेल तर आता प्रस्थापित पद्धतीने लिहीलेलं नाविन्यविहीन वाटतं आणि नवीन म्हणजे कसं तेही माहित नसतं असं होतंय का?
नावीन्य
रोचक लेख व चर्चा. सुचले तसे काही विचार...
आवडी-निवडींची वैयक्तिक-न्यूरॉन्स वगैरेची पातळी असतेच. पण प्रत्येक भाषा-साहित्यात-संस्कृतीत "नावीन्या"ला ओळखण्याची, समजून घेण्याची, नावीन्याला देण्याच्या महत्त्वाची, नवीन कल्पनांना परंपरेतच समावून घेण्याची विशिष्ट परंपरा सामाजिक पातळीवरही तयार होत असावी. वर कोणीतरी म्हटले की झपाट्याने सगळे जग बदलत चालल्याने नव्या गोष्टींचा एकीकडे गाजावाजा होतो - मग जुनाट राहून चालणार नाही असे विचार मांडले जातात, काही का असेना, "३३% न्यू अँड इम्प्रूव्ड" सतत हवेहवेसे वाटते. प्रत्येक क्षेत्रात तसे व्हावे असा अट्टाहास होतो, आणि जाहीरातींसारखेच वरवरच्या "नावीन्या'चा शोध होतो. पण बदलत्या जगाला एकाचवेळी विरुद्ध प्रतिसादही नॉस्टाल्जियाच्या स्वरूपात मिळतो - जुन्यात सुखावणे, त्यावर टीका सहन न होणे. ही टोकाची विधाने झाली, पण यांच्या ओढाताणीमध्येच नावीन्याशी वेगवेगळ्या सांस्कृतिक क्षेत्रात कलेक्टिव्ह नाते जोडले जात असावे असा अंदाज आहे.
ही ऐतिहासिक प्रोसेस आहे, आणि साहित्यिक चर्चा-समीक्षेच्या प्रवाहालाही लागू होऊ शकते. भारतीय भाषांची आधुनिक घडणच "यांच्यात नवीन काहीतरी आणले पाहिजे" या धोरणाने झाली. इंग्रजीशी त्यांच्या साहित्याचे सदैव स्पष्ट किंवा अव्यक्त तुलना होत आली आहे, आणि नवीन विदा, रचनाप्रकार तयार होत असताना परंपरेच्या कल्पनेलाही एक वेगळेच नवीन महत्त्व मिळालेले दिसते. म्हणून "आपल्यात नवीन काही आहे का नाही?" आणि "गेले ते दिन गेले" हे देशी भाषांच्या साहित्यिक क्षमतेच्या या ऐतिहासिक चिंतेच्याच दोन बाजू वाटतात. उदा. बंगाली साहित्यचर्चेत हेच चालू असते. नवनिर्मिती भरपूर होते, पण ती होतेय की नाही, जुन्यातच आडकलो आहोत का, याबद्दल कायम शंका-चिंता व्यक्त होतात. मग "गोल्डन एज" सारखे आज कोणीच नाही, आणि नाही झाले तरी काय झाले, गोल्डन एज सगळ्या काळांना पुरून उरण्यासारखे आहे, अशी विरुद्ध टीका होते. मग इंग्रजीच्या/युरोपच्या पातळीशी तुलना होते, कोणी "ते पहा तिथे किती नवीन प्रयोग चालू आहेत, आणि इथे आपण त्याच जुन्या कविता घेऊन बसलोय" असे म्हणते. आणि त्याला मग युरोपीय समीक्षकांनीच बंगाली साहित्य किती समृद्ध आहे हे सांगितल्याचे पुरावे देऊन त्यांना गप्प करते. बॅक टु स्टार्ट. प्रयोगशील लेखक-रचना मार्जिन्स वरच राहते, आणि आता "मार्जिनल = सृजनशील" आणि "मेन्स्ट्रीम = रटाळ" अशी आनंददायी सांगड घालून काही लेखक त्यातच सुख मानतात. सगळे काही चालू राहते.
मराठी पुरते सांगायचे झाले तर या कंटाळा/स्मरणरंजनाच्या चक्रातून बाहेर पडायचे असेल तर उगीच "नवीन काहीतरी हवे!" आणि "जुन्यात काय वाइट हो?" या भूमिकांपलिकडे चर्चा विस्तारायला हवी. 'नावीन्या' च्या छटांवर, पदरांवर, दीर्घ चर्चा व्हायला हवी (तसेच नॉस्टॅल्जिया धाग्यात लिहील्याप्रमाणे "आठवणीं" वर ताजा विचार करायला लावणारा दिवाळी अंकातला लेख याच कारणामुळे मला आवडला होता). मग, परस्पर विरोधी आणि काहीशा असंबद्ध का असेनात, यां कल्पनांना एक स्पष्टता, एक वजन येईल - एखाद्या नवीन प्रयोगात मग नेमके काय नवीन आहे, हे ओळखण्यास सोपे जाईल. त्याचे रसग्रहण ही जास्त रोचक होईल. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, नवनिर्मिती होतच असते - त्याची दखल या दोन टोकांच्या कर्कश्श भूमिकेपेक्षा सूक्ष्मरित्या घेता येईल का?
बहुमतात कोण?
स्मरणरंजन आणि नावीन्याचा हव्यास या दोन टोकांमध्ये बहुमतात कोण आहे याविषयी मतभेद आहे. यात नवीन ते काय? असं म्हणत नाकं मुरडणारे अल्पमतात आहेत असं मला वाटतं. नाहीतर संदीप खरे - सलील कुलकर्णी सारखे लोक इतके लोकप्रिय का झाले असते*? अजूनही शिवाजी सावंत, पुलं लोकप्रिय का आहेत*?
* संदर्भः http://www.bookganga.com वरची बेस्टसेलर्सची यादी.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आताच वाचला पूर्ण
लेख आताच वाचला पूर्ण.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सतत नावीन्याचा शोध - हा
सतत नावीन्याचा शोध - हा सद्गुण आहे की इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन चे चटावलेपण? खरच!!!
संगीत जितक्या वेळा ऐकाल त्याची नशा चढत जाते पण संकल्पनांचे (कन्सेप्ट) तसे नाही. संकल्पनांचे नाविन्य ओसरते.
________
लेख थोडाफार कळला. आवडला.