सर्व काही संपल्यावर

I am translating Girish Karnad’s Kannada book Agomme Igomme which is a collection of his articles written over span of many years. The translation is into Marathi language. I had published one article related to origin of theatrical arts earlier on this blog. Today, I am posting the translation of the story which he had written in decade of 1990. Hope you like it.

‘अळीद मेले'(अर्थ: सर्व काही संपल्यावर)
मूळ कन्नड: गिरीश कर्नाड
मराठी अनुवाद: प्रशांत कुलकर्णी
पूर्वप्रकाशन: https://ppkya.wordpress.com

माझ्याकडे पाहत असलेल्या रिझवीच्या डोळ्यात मला मिश्कील भाव जाणवले. रिझवीच्या ते लक्षात आले असावे. त्याच्या त्या स्मित हस्यामागील कारण मी विचारेन की काय असे वाटून, बहुधा त्याने आपली नजर दुसरीकडे फिरवली आणि दिग्दर्शनाच्या कामात मग्न झाला. काही वेळानंतर त्याने त्याचे ते मिश्कील भाव ‘स्वीच ऑफ’ करून गंभीरपणे तो म्हणाला, ‘डायलॉग रेडी आहेत का रे? उर्दू फार कठीण वाटत असेल तर मला सांगा’

ही रिझवीची पद्धत होती: एखादी महत्वाची बातमी सांगायची असल्यास, त्याचे ते अर्थपूर्ण आणि सूचक मौन, ‘मला…’, अशी उद्वेग्पूर्ण दीर्घ पूर्वपीठिका असे. त्यानंतर शब्दाच्या अथवा वाक्यांच्या मध्ये श्वास न घेता, भडभडा बोलून टाकायचा. शिवराम कारंत यांच्याकडून पहिले पत्र आल्यादिवशी तर त्याचा हा सर्व अवतार एक डोकेदुखीच झाली होती. आता, आज त्याचा उत्साह पाहून त्या मागचे काय कारण असावे हे जाणून घेण्यास थोडी वाट पहावी लागणार हे मी ताडले होते.

‘लंच ब्रेक’ मध्ये आम्ही सर्व जेवताना त्याने घरून आणलेला मटण दो प्याजा माझ्या आणि भूषणच्या ताटात वाढला आणि म्हणाला, ‘हे घ्या, गिरीश, माझ्या बायकोने केले आहे. “अळीद मेले” ला फायनान्स मिळाले आहे. आता काम सुरु. डब्यात काही ठेवायचं नाही हं, नाही तर ही आकाश-पाताळ एक करते. भूषण, तुम्ही हे संपवून टाका’ असे तो सगळे एका दमात बोलून गेला.त्याच्या ह्या तोऱ्याला बळी न पडता त्याचे मी अभिनंदन केले.

‘अभिनंदन! मार्व्हलस!’ रिझवी खुश झाला.

‘के. पी. प्रोडक्शनने होकार दिला आहे. म्हणजे आता शूटिंगची तयारी करायला पाहिजे. गम्मत अशी आहे की ह्या वेळेस कारांताकडूनही पत्र आले आहे. हे शेड्यूल संपल्यानंतर, शाली-ते कुठे आहे? शा-‘

‘शालीग्राम’

‘हो. तेच. शालीग्रामला जाऊन यावे लागेल. त्यांनी मला बोलावले नाहीये, मीच त्यांना म्हणालो होतो की मी येवून भेटेन असे.’

‘रिझवीजी, कारंत हे सहजगत्या तृप्त होणारे गृहस्थ नाहीत. तुम्ही म्हणाल त्यावर ते माना डोलावतील, होकार भरतील असे समजून घेऊ नका. मीच स्क्रिप्ट लिहितो असेसुद्धा म्हणतील.’

‘असे का वाटते? त्यांच्याकडून तीन पत्रे आली आहेत आतापर्यंत. त्यांनी त्यात काहीही अटी घातलेल्या नाहीत’, असे वाद जिंकल्याच्या अविर्भावात रिझवी बोलून गेला. ‘त्यांना भेटल्यावर त्यांचे चित्रीकरण कसे करायचे ह्याची आयडिया येईल म्हणून चाललो आहे झाले’ असे बोलून त्याने स्मित केले.

‘मला त्यांच्या बद्दल माहित आहे. तुम्ही काळजी करून नका’, तो पुढे म्हणाला.

रिझवीची कारांतांच्या प्रती किती भक्ती होती हे सांगायचे म्हणजे-‘काय कादंबरी आहे ती जनाब! आतूनच यायला हवे!’ माझ्याकडे सहेतुक नजरेने पाहत म्हणाला.

रिझवीचा मोठा भाऊ(जो आता संवाद लेखकही आहे) हा प्रसिद्ध अनुवादक आहे. त्याने कुठल्यातरी प्रकाशनासाठी ‘अळीद मेले’ कादंबरी उर्दू भाषेत भाषांतरित केली होती. रिझवीला ती वाचून वेड लागले होते.

‘गिरीश, खरे सांगायचे म्हणजे ह्या कादंबरीचा चित्रपट होईल. किती अद्भूत कथा आहे ही! असे असूनही हिंदी मध्ये कोणी वितरक त्याला हात लावील तर शपथ. सगळे हरामी लेकाचे! त्यामुळे आत्ता ही टेलीफिल्म करायला घेतली’ असे नाटकी हावभाव करून बोलला.

मी रिझवीला भेटलो ते १९९० मध्ये. तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. त्या दिवशीच टोयोटा रामरथातून सोमनाथ वरून अयोध्येला जाण्याऱ्या एल. के. अडवाणी यांना बिहार मध्ये लालू प्रसाद याने त्यांना अडवले होते.

रिझवी माझ्याकडे आलेला ते एका detective मालिकेत काम करण्याबद्दल विचारायला.पाच मिनिटात मी होकार दिला. त्यामुळे मला वाटले तो आता निघेल. पण कसले काय. इकडच्या तिकडच्या गोष्टी करत राहिला. लालू प्रसादांच्या विषयी म्हणाला, ‘मुस्लीम आणि बहुजन समाजाने एकत्र झाल्याशिवाय तरणोपाय नाही. नाहीतर हे हिंदू लोक मुस्लिमांना खाऊन टाकतील. त्याच्या कुटुंबियांनी पाकिस्तानात जावू असे सुचवल्यावर, त्यांना त्याने ‘तेथे जाऊन काय लाथा खायच्या आहेत?’ असे सांगून कसे समजावले या वर एक छोटेखानी व्याख्यानच दिले. त्याच प्रवाहात एका कन्नड कादंबरीबद्दल बोलायला त्याने सुरुवात केली. मला त्याचे उर्दू भाषांतरीत नाव माहित नव्हते. त्याला मूळ कन्नड कादंबरीचे नाव माहित नव्हते. पण थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले की तो ‘अळीद मेले’ या कारांतांच्या कादंबरीबद्दल बोलत होता. त्याच्या बद्दलचे माझे कुतूहल वाढत गेले.

कारांतांच्या घरचा पत्ता काय आहे? ते होकार देतील का? त्यांना किती रॉयल्टी द्यावी लागेल? ‘चित्रपटात कारांतांची भूमिका तुम्ही करावयास हवी. यशवंतरायच्या भूमिकेसाठी अनंत नाग’ असे त्याने घोषित केले, आणि वर प्रामाणिकपणे असे मान्य केले की detective मालिका हे निमित्त होते, ‘अळीद मेले’वरील चित्रपटासंबंधी चर्चा करणे हा मूळ हेतू होता.तिथल्या तिथे माझा कडून अनंत नाग यांना फोन करवून त्यांच्याकडूनही होकार मिळवला.

ह्या सगळ्या भानगडीत, मध्ये मध्ये शिवराम कारंत होकार देतील की नाही हा प्रश्न डोके वर कधीत होता. ज्याने कर्नाटकात कधी पाय ठेवलेला नाही, ज्याला कन्नड साहित्य, साहित्यिकाबद्दल काही माहित नाही आणि उत्तर प्रदेशातील कुठल्यातरी कोपर्‍यात असलेल्या एका खेड्यातून मुंबईला आलेल्या आणि तिसऱ्या दर्ज्याचे गल्लाभरू हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या ह्या रिझवीला चर्चा करण्यास आणि भेटण्यात कारंत होकार देतील असे मला वाटत नव्हते.

पण रिझवीच्या पत्रातून त्याची व्यक्त झालेली भक्ती आणि निर्धार पाहून, त्यांनी होकार भरला असावा. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. एक दिवस ‘तुम्ही ह्या कादंबरीवर एखादी कलात्मक चित्रपट बनवाल नाही? तसे झाले तर मी काही तरी करून फायनान्स उभा करेन’. त्या प्रश्नाला उत्तरादाखल मी म्हणालो, ‘माझा मित्र बि. व्ही. कारंत याने ‘चोमन गुडी’ हा चित्रपट बनवला आहे यावर’.

‘ओहो, पहिला आहे मी तो’

रिझवी सगळे कन्नड कलात्मक चित्रपट पाहत असे. त्यांच्यावर टिप्पण्या तयार करत असे. त्यात त्याला रुची होती म्हणून नव्हे तर, ‘अळीद मेले’ चित्रपटासाठी काही कल्पना सुचतील का ते तो शोधात होता. ‘घटश्राद्ध’ पहिल्याच्या दिवशी तर उत्साहात त्याने फोन केला.

‘गिरीश,ब्राह्मणात विधवा स्त्रियांचे मुंडण करतात. आपल्या चित्रपटातही असण्याऱ्या दोन विधवांचे डोके मुंडण करायला हवे.’

‘जाऊ दे, ते अवघड आहे. आपला हिंदी प्रेक्षकाना ते रुचणार नाही’, मी म्हणालो.

तो उत्तरला, ‘त्या ‘घटश्राद्ध’ मध्ये विधवा मुलीचे केस कापलेले होते की, अशी authenticity हवी’

माझ्या उत्तरात त्याला रस नव्हता. ‘कोण सिनिअर हिंदी अभिनेत्री असे केस कापून घेईल’ असे म्हणून फोन ठेवून टाकला.

ब्राम्हण विधवा कशी असावी हा प्रश्न रिझवीच्या दृष्टीने फक्त अभिनेत्री कोण असावी एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. तो त्याच्या टेलीफिल्मचा आत्मा होता, कारण कादंबरीच्या मध्यावर पोहचल्यावर रिझवी परत परत त्याच विषयाकडे येत असे.

‘काय प्रसंग आहे तो! कारंत त्या गावी येतात. त्यांच्या मित्राच्या म्हणजे यशवंतराय यांच्या मानलेल्या आईला पहिले. त्या वृद्धेच्या इच्छेखातर मंदिराचा जीर्णोद्धार करतात. त्याचा परिणाम असा होतो की एकमेकांच्या वारी असलेल्या त्या एकाच गावातल्या दोन वृद्ध स्त्रिया परत एकत्र येतात! लाजवाब!’ रिझवीचा स्वर गदगदित होता.

हे मी अर्ध्या डझन वेळा आधी ऐकले होते. वैतागून मी म्हणलो, ‘रिझवीजी, तुम्ही कादंबरीचा पूर्वार्धच फक्त सांगता आहात. अजून बरेच कथानक आहे, बरीच पात्र पुढे इत. कारंत यशवंतरायच्या पत्नी, मुलांना सुद्धा भेटतात. त्याच्या बद्दल तुम्ही काही बोलतच नाही की!-‘

रिझवी माझ्याकडे एकदा कटाक्ष टाकून, आणि डोके खाजवून, ‘अब्दुल-‘ अशी हाक मारतो. Production Manager आल्यावर त्याला बरेच काहीबाही बोलतो. मी, भूषण तेथे आहेत हे तो विसरून गेलेला असतो. त्यानंतर भूषणकडे वळून, ‘तुम्हाला ती कथा माहीत आहे का? यशवंत राय नावाची व्यक्ती एकट्यानेच जीवन जगून, आप्त मित्र नसलेल्या जागी, मरून जातो. कारांताना अस्थी विसर्जन करण्याची विनंती करतो. ते काही त्याचे मित्र नव्हते. असे असून सुद्धा ते यशवंतरायच्या कुटुंबियांचा शोध घेतात. गावी आल्यावर यशवंत राय च्या मानलेल्या आईचे, पार्वत्म्मा-‘

अचानक बोलणे थांबवून, त्याने त्याच्या पिशवीतून स्क्रिप्टचा कागद बाहेर काढला आणि भूषण समोर ठेवला.

‘ग्राफ पाहिलात का. सुरुवातीला यशवंत राय मरण पावला आहे. एकाकी, बेवारस. त्या विधवेच्या खातर, कारांतांच्या नशिबी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे आले, इतर पत्रे आहेत, कुठेतरी adjust करू. पण चित्रपटाचा केंद्रबिंदू तो आहे, भूषण. मंदिराचा जीर्णोद्धार. मनुष्याच्या spiritual जागृतीचा सिम्बॉल.’

नंतर माझ्याकडे पाहून तो म्हणाला, ‘आपल्या फिल्मचा शेवटचा सीन. Imagine करा. त्या मोडक्या तोडक्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. दोन वृद्ध स्त्रिया एकमेकांना बिलगून अश्रू ढाळीत आहेत. तुम्ही-म्हणजे कारंत-गाव सोडून जात आहात, आणि सहज मागे वळून पाहत आहा. तुमचा मित्र यशवंत राय हा नास्तिक आहे. तुम्ही सुद्धा नास्तिकच. मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुमचे जीवन कृतार्थ झाले! तुमच्या डोळ्यातही अश्रू. मित्राच्या प्रती कृतकृत्य झाल्याची भावना. काय वाटते भूषणजी? कसा आहे क्लायम्याक्स?’

‘तुम्हाला माझा खरेच माझा अभिप्राय हवा असेल तर सांगतो’, भूषण कुठल्याही नटाने दिले असते ते उत्तर देतो. ‘तुम्ही ह्या वेळेला पुढच्या भागाचे पैसे देणार असेल तर ठिक आहे. यशवंत रायाच्या भूमिकेसाठी मीच योग्य आहे!’

रिझवी जोरात हसला. तोच signal समजून सहनिर्देशकही आला आणि म्हणाला, ‘लायटिंग रेडी आहे’. रिझवीने ती स्क्रिप्ट पिशवीत कोंबत, ‘पहिला शॉट तुमचा, भूषणजी’ असे म्हणत, त्या सहनिर्देशकाकडे न पाहता निघून गेला.

‘खूप बोलतो हा’, असे मान हलवत म्हणाला, ‘मी याच्या चित्रपटात काम करण्याचे कारण म्हणजे त्याच्या बायकोने बनवलेले नॉन-व्हेज जेवण!’ आणि, मेकअप रूम कडे निघून गेला.

पुढे पंधरा दिवसातच रिझवीचा मृत्यू झाला.

मी सिंगापुरात चित्रीकरणासाठी गेलो होतो. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणाला, ‘चित्रीकरण काश्मीर मध्ये व्हायला हवे होते. पण काय करणार, काश्मीर मध्ये अतिरेकी. काशिमीर गुंडांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या मुळे स्वित्झर्लंड, सिंगापूरला जावे लागते. या देशाला सध्या, त्या अतिक्रेकीना नीट धडा शिकवणारे सरकार हवे आहे’ असे म्हणून, ह्या अतिरेक्यांमुळे त्याच्या चित्रपटाला झाल पोहचत आहे असे सुचवून पुढे म्हणाला, ‘आपल्या स्टार्सनादेखील तेच हवे आहे! स्वित्झर्लंड, सिंगापूर! इंडस्ट्री ची चिंता कोणाला आहे?’

परत आलो तेव्हा अयोध्या प्रकरण झाले होते. राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनंतनागला फोन केला, त्याने वेगळीच माहिती दिली.

‘रिझवी बेंगळुरूमध्ये येऊन मला भेटून गेला होता. अडवान्स पैसेही दिले. न थांबता बोलत होता. त्याच रात्री शिवराम कारंत यांना भेटण्यास उडुपीची बस पकडून गेला. मुलकी जवळ अपघात झाला, आणि डोक्यावर ट्रंक पडून त्याचा मृत्यू झाला असे कळले. अख्ख्या बसमध्ये तो फक्त मरण पावला म्हणे. त्याचा प्रेत तीन दिवस तेथेच पडले होते!’

मी त्या दिवशी संध्याकाळी रिझवीच्या घरी गेलो. बंद्र्यापासून पालीहिल ला जाताना कोपऱ्यावरील एका गल्लीत त्याचे जुनेसे घर होते. रिझवी १९६० च्या सुमारास मुंबईला आला तेव्हा त्याने ते घर भाड्याने घेतले होते. आता त्या घराची किमत गगनाला भिडली आहे. घरमालकाने घर खाली करण्यासाठी तगदा लावला होता. बदल्यात प्रशस्त सदनिका देतो असे म्हणत होता, पण रिझवी त्याला दाद देत नव्हता.

‘घर म्हजे घर पाहिजे. सदनिका नाही’, असे म्हणत वाद घालत असे.

रिझवीची पत्नी बाहेर येवून सोफ्यावर एका कोपऱ्यात बसली. काहीच बोलली नाही. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. त्यांची मुलगी कोठेतरी बाहेर गेली असावी. मुलगा याकुब हसन, वय २०-२२ असेल. त्याने एक तांब्या भरून पाणी आणून माझ्यासमोर ठेवले आणि त्याने माहिती दिली.

अपघातात रिझवी मरण पावला. त्याच्या पाकिटातील पत्ता वाचून मुलकीच्या पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा त्याचा भाऊ, ज्याने ‘अळीद मेले’चा अनुवाद केला होता, उडपीला निघाला. तितक्यात तेथे काही मुस्लिमांना ही गोष्ट कळली, की कोणी मुस्लीम व्यक्ती मरण पावली आहे. त्यांनी दफन करण्यासाठी मृतदेह मागितला. पण त्यांचा भाऊ येईपर्यंत पोलिसांना काही करता येत नव्हते. त्यामुळे मृतदेह तीन दिवस तसाच बेवारस पडला होता. मुलकी गावापर्यंत जाऊनही त्यांच्या भाऊ कारंत यांना न भेटता परत आला.

याकुब सावकाश बोलत होता. त्याच्या बोलण्यात बापासारखी घिसाडघाई नव्हती.त्याचे चेहरा आई सारखा होता-गोल चेहरा आणि पसरट तोंड. त्याचे बसणेदेखील रिझवी सारखे नव्हते.

‘अंकल, तुमची मला एक मदत हवी होती’, तो म्हणाला. ‘या फिल्मसाठी त्यांनी फायनान्स घेतला होता, एक लाख अडवान्स घेवून, तो खर्च केला आहे. आता आपण ती फिल्म पूर्ण करूयात’

रिझवी असे स्पष्ट, संक्षिप्त बोलला नसता. त्याची काहीही लक्षणे मुळात नव्हती. कशामुळे तरी मन विषण्ण झाले.

‘बजेट किती असेल याचा काही करार झाला होता का?’, मी विचारले.

‘दाखवतो’, असे म्हणत तो उठून आत गेला.

त्यानंतर रिझवीची पत्नी बोलू लागली.

‘मुलीचे वय झाले आहे, लग्न केले पाहिजे. त्यासाठी मी त्यांच्या मागे लागले होते. पण हा कन्नड चित्रपट झाला तर त्यातून लग्नाचा खर्च भागेल असे म्हणत. तीस वर्षापासून ह्या industry मध्ये काम करून काय मिळवले? कसे तरी घर चालले, भागले. मुलीच्या लग्नासाठी हवे तेवढे पैसे बाजूला राहिलेच नाहीत. हा सिनेमा झाल्यावर हाती बरेच पैसे राहतील असे म्हणत होते’ आणि बोलायचे थांबली. काही वेळाने उद्वेगाने, ‘असे त्यांचे बोलणे एकूण एकूण मी निराश होत असे. आता तर तेच निघून गेले’ म्हणाली.

भाभीजी माझ्याकडून जेवढे होईल तेवढे करेन’, असे म्हणालो.

याकुब फाईल घेवून आला. त्यातील हिशोब पाहून मी स्तंभित झालो. दोन तासाची टेलिफिल्म सोळा मिमी निगेटिव्ह वापरून चित्रीकरण करायचे होते. ते अकरा लाखात होईल असे रिझवीने मान्य केले होते. कोठे तरी काही तरी चुकले असावे असे मला वाटत होते, म्हणून मी तो हिशोब पुन्हा पुन्हा तपासून पाहत होतो. काहीच हाती लागले नाही. उलट दोन गाणी ही त्यात होतील असे रिझवीने कबुल केल्याचे समजले.

‘याकुब, के. पी. प्रोडक्शन यांच्याबरोबर एकदा बोलायला हवे’

‘मी त्यांचा नंबर देतो. मी ही यायला हवे का?’ मला त्यातले काही कळत नाही. पप्पा कधी मला शुटींग जवळ फिरकूही देत नसत’, याकुब उत्तरला.

‘आता शिक’, मी म्हणालो.

रिझवीची पत्नी मान करून मुलाकडे पाहू लागली. मी विचारले, ‘तुम्हाला काही हरकत नाही ना?’

ती म्हणाली, ‘रुकसानाचे लग्न व्हायचे आहे ना, अजून एकदा प्रयत्न करायला हरकत नाही’

‘अंकल, कादंबरी लेखकालाही कळवायला हवे नं’

‘ते मी पाहून घेतो’, मी म्हणालो.

त्याच दिवशी शिवराम कारंत यांना फोन केला. ‘मला काही हरकत नाही. मी आधीच अनुमती दिली आहे. रिझवीच्या कुटुंबियांनी हे काम पुढे नेल्यास आणि दुसऱ्या कोणी दिग्दर्शकाने केल्यास काही हरकत नाही’, ते म्हणाले.

त्यानंतर के. पी. प्रोडक्शन यांच्या बरोबर भेटण्याची वेळ ठरवली.

जीवन चक्र फिरण्यास सुरुवात झाली होती. यशवंत रायासारखाच रिझवी, आपल्या आप्त-मित्रांपासून दूर ऐकतात मरण पावला होता. त्याच्या विधवेच्या मनोरथ पूर्ण व्हावयाचे होते. वास्तवातही मी शिवराम कारंत यांचे कादंबरीतील भूमिका वठवत होतो.

रौप्य, सुवर्ण महोत्सव साजरे केल्याचे फोटो, चांदीचा, सोन्याचा गिलावा दिलेल्या ट्रॉफीज, त्याच्या मागे लपलेले प्लास्टिक ट्रॉफी असे सर्व मांडून ठेवेले होते. अर्धनग्न नायक-नायिकांच्या पोस्टरच्या मधोमध ओमकाराचे चिन्ह, त्रिशूल आणि ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा दिसत होती. हे याकुबच्या लक्षात आले की नाही कळले नाही.

‘बजेट वाढवायचा प्रश्नच नाही. इम्पोसिबल!’ के. पी. प्रोडक्शनचे कैलाश प्रसादने आपली असमर्थता नमूद करून दोन्ही हात पसरले.

‘अकरा लाखात फिल्म होणार नव्हती तर त्याने मान्यच का केले?’

दीनपणे याकुब माझ्याकडे पाहत होता.

‘मला माहीत नाही’, असे मी म्हणालो खरा, पण मला काय कारण असावे हे समजून चुकले होते.

ह्या धूर्त आणि व्यवहारात पक्का असलेल्या कैलाशने रिझवीच्या असहायतेचा फायदा घेतला होता. रिझवीला ही टेलिफिल्म काहीही करून करायची होती. त्यामुळे मुलीचे लग्नही त्याने पुढे ढकलेले होते. लग्नाचा खर्च निघेल असे पत्नीला खोटे सांगितले होते. रिझवीचा उत्साह पाहून, तो कुठल्याही बजेटला तयार होईल हे कैलाश प्रसादने ताडले होते. रिझवीने, याउपर ३-४ लाखाचे कर्ज घेतले होते-वैयक्तिक कर्ज. याचा अर्थ मुलीचे लग्न आणखी लांबणीवर पडणार होते.

मी उठलो.

‘अकरा लाखात फिल्म होवू शकत नाही. क्षमा करा. आम्ही येतो. चल याकुब’.

‘असे असेल तर मी दिलेल्या अडवान्स चे काय?’

‘ते रिझवीने स्वतः खर्च केले नाहीत. फिल्मसाठी काम करणाऱ्याना दिले आहेत. मलाही दिले आहेत. विचार करून सांगा, नाही तर ते पैसे गेले समजा. अठरा लाखात मी करून देतो’

मी सोळा म्हणार होतो. लग्नासाठी २ लाख त्यात वाढवले. पण हे इथेच संपणार नाही हे माहीत होते.

याकुब दिग्मूढ झाला होता. कैलाश प्रसादने केलेल्या अन्यायामुळे विव्हळत झाला होता. मी स्क्रिप्ट आणि बजेटची फाईल त्याच्या हातात सोपवून म्हणालो, ‘तो खादिम जर हो म्हणाला तर ठीक. नाहीतर बहिणीच्या लग्नासाठी दुसरीकडून व्यवस्था कर. अकरा लाखात फिल्म करण्याच्या भानगडीत पडू नकोस.’

मी रिक्षा पकडून घरी निघालो. रिझवीच्या मूर्खपणाची मला कल्पना होती. नाहीतर, असा अव्यावाहीरिक उद्योगात पडलेल्या व्यक्तीला काय म्हणावे? अडमुठा? वेडा? कन्नड मध्ये त्याला समर्पक असा शब्द दिसत नाही. अरबी भाषेत-मजनू!एका कादंबरीच्या ६० पानामुळे भ्रांत झालेला मनुष्य.

६ डिसेंबर. अयोध्या येथे बाबरी मशीद पाडली गेली.

दुसऱ्याच दिवशी भूषणचा फोन आला. ‘बरे झाले, त्यांना तसाच धडा शिकावयाला हवा होता. त्याशिवाय त्यांना समजणार नाही’ असे म्हणाला.

माझे कुटुंबीय, आप्त-मित्र सर्व जण त्याच प्रमाणे मन डोलवत होते. माझा परिसर हिंसेमुळे

साधारण एक आठवड्यानंतर.

चहा पीत असताना याकुब रिझवीचा फोन आला.

‘अंकल, तुम्ही अजून अर्धा तास घरी आहात का?’

‘आहे ना, आज दुपारी शुटींग शिफ्ट…’

‘तसे असेल तर आत्ताच येतो…अर्ध्या तासात’

याकुबने फोन ठेवला. विसाव्या मिनिटाला दारावरची घंटी वाजली. दारात काही क्षणासाठी रिझवीच उभा आहे असे वाटले.

‘ये ये, बस’, असे म्हणत असतानाच एक प्रश्न सतावत होता. मागच्या वेळेला मला याकुब आणि त्याच्या वडिलांमध्ये काही साम्य दिसले नव्हते. आज मला रिझवीची का बरे आठवण आली असावी.

‘काय विशेष?’, मी विचारले.

‘थांबा जरा, अंकल. आधी तोंड गोड करा. नंतर बोलू!’ असे बोलून पिशवीतून मिठाईचा बॉक्स काढला. हसत माझ्या कडे पाहत होता. मी ते हास्य ओळखले. रिझवीचा ट्रेडमार्क होता तो!

‘मिठाई कशासाठी?’

‘आईने तुमच्या साठी पाठवली आहे. ही हैदराबादी स्पेशल मिठाई आहे. शाही तुकडा. तुम्ही तो खाल्यानंतर बोलायचे असे तिने मला सांगितले आहे.’

शाही तुकडा गोड होता. मी विचारले, ‘काय बहिणीचे लग्न ठरले की काय?’

‘नाही, पण आता ते ठरेल हे नक्की’

‘म्हणजे?’

‘अंकल, के. पी. प्रोडक्शनने “अळीद मेले” साठी सतरा लाख देण्याचे कबुल केले आहे. कालच संध्याकाळी फोन आलेला’

एका मागोमाग शब्द आले. मी काही बोललो नाही.

‘लवकरात लवकर सुरु करा असे ते म्हणाले’

‘याकुब, ते आता शक्य नाही’

बापासारखेच मुलानेही मी काय म्हणतोय याकडे लक्ष न देता पुढे म्हणाला, ‘तुमची कमिटमेंट आहे हे मी त्यांना सांगून टाकले आहे’

‘याकुब, मी ही फिल्म करत नाही आहे’

ह्या वेळेला त्याच्यापर्यंत माझे म्हणणे गेले. तो ते ऐकून हडबडला. इतका वेळ उभा असलेला, मटकन खुर्ची वर अर्धवट हसत बसला.

‘का अंकल? तुम्ही आधी हो म्हणाला होता ना. ते सतरा म्हणतात, पण जर अठराच हवे असतील तर…’

त्याचा आवाज खाली आला होता. उत्कर्षाच्या उंबरठ्यावर उभे राहून, भविष्याविषयी ऐकून ऐकून दमलेल्या त्याच्या आई सारखा त्याचा आवाज झाला होता.

ह्याला काय सांगावे बरे. मी विचारात पडलो.

‘हे पहा, तुझ्या वडिलांना ही कथा अतिशय आवडली होती म्हणून. चित्रपटाच्या शेवटी मंदिराचा जीर्णोद्धार आहे म्हणून.ते त्याच्या दृष्टीने मानवीयतेचे प्रतिक वाटले म्हणून. आता ‘मंदिर बांधा’, मंदिरचा पुनरुद्धार करा’ ह्या घोषणेचा अर्थच बदलला आहे.

‘म्हणजे?’

याकुब समजून घेण्याचा प्रयत्न करत होता की दुसरयाच विचारात गढलेला होता हे समजले नाही.

‘बाबरी मशीद पडून तेथे आता मंदिर बांधायचे आहे असे चालले आहे, तुला माहीत नाही का ते?’

‘ते कोणाला माहीत नाही, अंकल, त्याच्याशी ह्याचा आणि तुमचा काय संबंध?’

मी उठून खिडकीपाशी गेलो आणि बाहेर पाहू लागलो. असे करायला नको असे वाटून गेले. टेलीव्हिजनवर प्रत्येक मालिकेत घरातील ज्येष्ठ व्यक्ती असेच उठून खिडकीतून बाहेर पाहू लागते.

‘संबंध आहे, सगळीकडे तो येतो. अयोध्ये मधील विध्वन्सानातरची निर्माणाची कल्पना भ्रष्ट होते आहे. त्या विध्वंसात एक अनाथ शव तसेच पडले आहे-हिंदू संस्कृतीचे’, मी आरंभिले.

मेलोड्रामाटिक न होता, माझे म्हणणे पूर्ण करावे म्हणून, मी पुढे बोलू लागलो, ‘माझ्याकडून तर ही फिल्म शक्य नाही’.

याकुब माझ्याकडे पाहतच राहिला.

मी रिझवी सारखा बोलू लागलो, विचार करू लागलो की काय असा मला भास झाला. मुख्य विषय सोडून वेगळेच, पाल्हाळ लावतोय की काय असे वाटू लागले. बाबरी मशीद विध्वंसासारखी घटना काहीही परिणाम न करता विलग राहू शकत नाही. ती आपली संस्कृती कलुषित केल्याशिवाय राहत नाही. ३० वर्षापूर्वी लिहिली गेलेली कन्नड साहित्यकृतीही त्यातून बचावू शकत नाही-इत्यादी.

‘अंकल’, याकुब बोलू लागला, पण थोडा थांबला. ‘मी हे सांगणार नव्हतो, पण सांगतो आता. ही फिल्म झाली तर माझ्या बहिणीचे लग्न होईल. तुम्ही हा चित्रपट डायरेक्ट करण्यास होकार दिला यामुळे, मी सांगू नये, पण, माझे सर्व कुटुंब तुमचे किती आभारी आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे’

काही क्षण मी थांबून, बोलून गेलो, ‘आता तुम्ही पाहून घ्या’

ह्याला मी कसे समजावू. उद्या हा चित्रपट टेलीव्हिजन आल्यावर सर्वाना हेच वाटणार की मी कन्नड मधील ह्या कादंबरीचा उपयोग ह्या अशा लज्जास्पद घटनेच्या समर्थनासाठी करतोय. त्यांना कुठे समजणार आहे की रिझवी साठी, ह्याच्या बहिणीच्या लग्नासाठी हा खटाटोप केला आहे ते.

‘बाबरी मशीदच फक्त पुसून गेली नाही, याकुब. त्याबरोबर, तुझ्या वडिलांचे स्वप्नही विखुरले गेले’, असे सांगायचे होते, पण न सांगताच सांगून मी बाहेर पाहू लागलो.

बराच वेळ शांतता होती. कोणीच बोलले नाही.

‘तुमची मर्जी’, असे म्हणत याकुब उठला. ‘तुम्हाला भीडेस पाडणे मी करणे बरोबर नाही’

मी किती वेळा तेच तेच सांगू? अथवा न सांगताच जे सांगायचे आहे ते किती वेळा सांगू?

‘ठिक आहे, येतो मी आता’, असे म्हणत तो दरवाज्याकडे गेला.

मेजावर मिठाईचा बॉक्स होता, त्याच्या बाजूला फिल्मची स्क्रिप्ट होती.

‘याकुब, ते घेवून जा’, मेजाकडे बोट दाखवत मी म्हणालो.

‘ते आईने तुमच्यासाठीच स्पेशल पाठवले होते’

मी हडबडून म्हणालो, ‘मिठाई नाही, स्क्रिप्ट’

याकुब माझ्याकडे पाहू लागला. क्षणासाठी त्याच्या डोळ्यात मला आनंद दिसला.

‘राहू दे, त्याचा काय उपयोग आता आम्हाला? येतो मी’, असे म्हणत निघून गेला.

[पूर्व-प्रकाशित: कन्नड प्रभा दिवाळी अंक १९९७]

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)