आसामी आतिथ्य , बस प्रवास वगैरे .....
आतिथ्य
निसर्गरम्य आसाममध्ये ढेमाजी नावाच्या एका गावातल्या घरी रहायाची संधी असल्याने जायचे नक्की केले. गुवाहाटी ,काझीरंगा ,माजुली ( ब्रम्हपुत्रा नदीत असलेलं जगातलं सगळ्यात मोठं बेट) आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर असा एकाच आठवड्यात प्रचंड प्रवास केला.बोचरी थंडी ,डोळ्यांचं पारण फेडणारा निसर्ग आणि शाकाहारी साध, रुचकर जेवण जेवून तृप्त झाले.
उबदार शेकोटीजवळ बसून त्यात भाजलेली रताळी आणि स्थानिक कंद, आलं किंवा दालचिनी घातलेला काळा चहा, तसेच पीठा नावाचा गोड पदार्थ,तिळाचा लाडू अशी न्याहारी होती.घरचीच भरपूर भाजी,घरच्या शेतातला भात,घरच्याच सरसोचे तेल,तलावातले मासे, पाळलेली कोंबडी ,अंडी आणि गोधन सुद्धा घरचेच ! त्या कुटुंबाला सरसोचे तेल वर्षभरात फक्त 3/४ लिटर लागतं हे ऐकून मी चकितच झाले. गावातल्या लोकाना राई वगळून पंच फोडणीचे साहित्य (जिरं,शोप, मेथी दाणे, कलौन्जी),मीठ आणि मुग,मसूर डाळी इतक्याच गोष्टी विकत घ्याव्या लागतात. आसामी लोकं तुरीची डाळ खात नाहीत. झटपट चहा वगैरे करायचे असेल तर बहुदा गॅस वापरतात त्यामुळे तो ५/६ महिने पुरतो. चूल /शेकोटी पेटवायला थोडेसे रॉकेल लागते.वीज बिल, टीव्ही वगैरे धरून चार लोकांच्या कुटुंबाला महिन्याला दोन हजार रुपये सुद्धा लागत नाहीत हे ऐकून मी आश्चर्याच्या पलीकडे गेले.
काशाच्या जड थाळीत दोन /तीन भाज्या ,कोशिंबीर, काश्याचा मोठा वाडगा भरून वरण आणि भरपूर भात आल्यावर,आधी एक रिकामी थाळी मागून त्यात अर्ध्याहून जास्त भात काढल्यावर मगच जेवणे शक्य झाले. तिथल्या आठवडाभराच्या वास्तव्यात महिन्याभराचा भात खाऊन झाला असावा.
बहुतेक भाज्या उकडून केलेल्या किंवा थोडेसेच तेल वापरलेल्या होत्या. वरणाला वरून फोडणी दिली होती .उकडलेल्या बटाट्यात किंचित कच्चे सरसोचे तेल,कच्चा कांदा, मीठ आणि कोथिंबीर घालून कोशिंबिरी सारखं वाढलेलंअसतं.शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणातही लाल तिखट, मसाले नसतात आणि तेलही नावाला असतं. तिखटपणासाठी भाजीत ,कोशिम्बिरीत थोडे मिरचीचे तुकडे घातलेले असतात. आलं-लसूण ठेचून भाजीला शेवटची वाफ देताना वरून घालतात आणि मग कोथिंबीर घालतात.
मोठ्या हिरव्या बांबूच्या पोकळीत शिजवलेला अत्यंत रुचकर भात खाऊन ब्रम्हानंदी टाळी लागली.
सगळीकडे प्यायला गरम पाणी मिळत होते.
तांदळाची रुचकर वाईन चाखायला मिळाली. काहीही खाल्लं की तामुल म्हणजे सुपारी आणि पानाला किंचित चुना लावून खातात. यजमानाचा मान ठेवायला एकदा तामुल खावे लागले.ओल्या सुपारीची नशा येते. तंबाखू आणि तामुल खाऊन सगळ्यांचे दात खराब दिसत होते.
आम्हाला प्रेमाने खाऊ घालताना अखंड बडबड करणाऱ्या कष्टाळू घरमालकीणीला तिच्या बोलण्यातले एक अक्षरही आम्हाला समजत नसून काहीही फरक पडला नाही.तिने विणता यायला लागल्यापासून नेहेमी स्वतः विणलेली मेखला-चादोर नेसली आहे.
कितीही शिकलेली असली तरी आसामी स्त्रीला धानाच पिकं कापण, मागावर वस्त्र विणता येण अपेक्षित असतं. तिथे प्रत्येक घरी माग होता.आमच्यासाठी घराच्या अंगणात बिहू नृत्याचा छोटासा सुंदर कार्यक्रम झाला.मला दिसलेली आसामी मंडळी आतिथ्यशील ,बडबडी आणि प्रेमळ होती.
बस सेवा
बोचऱ्या थंडीत सकाळी ,सुदूर आसाममधल्या 'ढेमाजी' नावाच्या गावातून आमचा लखीनपूर गावाकडे प्रवास सुरु होता.पिवळीधमक सरसोची पिकं डुलत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुपारीची उंच उंच झाडं, बांबूची ,केळ्याची भरपूर झाडं आणि त्यात बांबूच्या कुंपणानी रेखलेली, गवताने शाकारलेली, माती लिंपलेली मोहक घरं पाहून डोळयांच पारण फिटलं. बसमध्ये 'गजब का है दिन सोचो जरा' वगैरे आध्यात्मिक गाणी सुरु होती.लवकरच आसामी प्रेमगीतं सुरु झाली. त्यात गायक सतत लखीनपूर -ढेमाजी गावांचा गजर करताना आढळल्याने बुचकळ्यात पडले. आसामी मैत्रिणीला विचारले की, बाई ग , हे सरकारी प्रचार गीत सुरु आहे का ?
तिने सांगितले की ,प्रियकर म्हणतो आहे , हे प्रिये सरकारने २०१७ मध्ये लखीनपूर -ढेमाजी पूल देण्याचे आश्वासन दिले होते तो पूल आता २०१९ मध्ये होणार आहे ,मग मी तुझ्या भेटीस लवकर येऊ शकेन !
महाराष्ट्रात गावोगावी ,'फायर ब्रिगेड मंगवादे तू अंगारोपर है अरमां.... ओ बल्मा.. पासून थेट 'चांदीकी सायकल सोनेकी सीट , आओ चले डार्लिंग चले डबलसीट' असली रोमांचक गाणी कानावर पडत असल्याने आसामी प्रेमगीतातला विकसनशील आशावाद ऐकून गहिवरून येऊ लागलं.
* लखीनपुरला जाताना एका ठिकाणी एक कुटुंब सामानसुमान घेऊन निर्वाण प्राप्त झाल्यागत समाधिस्त बसले होते. आमच्या बसच्या दूरदृष्टी ,अंतर्ज्ञानी कंडक्टरने बसमधून उतरून रस्ता क्रॉस करून जात,त्यांना जागृतावस्थेत आणि मर्त्य जगात वापस आणले. त्यांना अजून लखीनपुरला जाऊन जीवनाची इतिकर्तव्ये पूर्ण करायची आहेत याचे भान आल्यावर ते कुटुंब निमूट बसमधून प्रवासाला निघाले.भरकटलेले प्रवासी मार्गस्थ करणारे कर्तव्यदक्ष वाहक पाहून मी आनंदाच्या डोहात तरंगू लागले.
* गुवाहाटीहुन काझीरंगाला जाण्यासाठी बसचे तिकीट बुक केले होते. आम्ही बसस्थानकावर आलो आणि आसामी मैत्रिणीने बसची चौकशी करताच तिथला कर्मचारी खुर्चीवरून उठून आस्थेने आम्हाला बसमध्ये बसवून देताना पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला.असे कर्मचारी महाराष्ट्रात कुठे आढळत असतील या विचारात मी गढून गेले.
* काझीरंगाची सफर आटोपून आम्ही मिळेल त्या बसने गुवाहाटीकडे निघालो होतो.बस मंदगतीने निघाली होती. बससाठी दहा रुपये पर प्रवासी अशी गिर्हाईके गोळा करणारे दोन तरुण अखंड ग्वाटी sss ग्वाटीsss ग्वाटीsss अशा आरोळ्या देत होते. त्यांची ग्राहक शोधण्याची तळमळ पाहून लवकरच आम्हीही ग्वाटी sss ग्वाटीsss ग्वाटीsss अशा ललकाऱ्या देत प्रवासी शोधायला लागू असे आम्हाला वाटू लागले.
एक देखणी, गॉगलधारी ललना निवांत बसली होती. आमचा वाहक तिला बसमधून उतरून ,आमच्याच बसमधून चालण्याचा आग्रह करू लागला. तिने तिकीट बुक केलेले असावे .तिने हाकलूनही याने तिची बराचवेळ अयशस्वी मनधरणी केली. दरम्यान बस चौकातच निवांत उभी होती. पोलीस आला आणि त्याने चालकाकडून पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये घेतले. इतक्यात वाहकाला एक संभाव्य प्रवासी सायकल रिक्षातून उतरताना दिसला.तो होतकरू प्रवासी रिक्षाभाडे चुकते करायच्या आत वाहकाने शिताफीने त्याने सामान उचलून बसमध्ये विसर्जित केले. प्रवासी मंतरलेल्या मांजरागत बसमध्ये येऊन बसला.बस कुठेही,कधीही,कितीही वेळ थांबत होती.एकदा व्हीआयपी त्या रस्त्यावरून जाणार म्हणून एके ठिकाणी बस अंतहीन थांबल्याने आम्ही चक्क रस्त्यालगतच्या एका घरी जाऊन त्यांच्या अंगणातल्या, आंघोळीसाठी केलेल्या बांबूच्या आडोशाचा सुलाभ घेऊन मोकळ्या झालो आणि घरमालकांना पत्ताही लागला नाही.
आमची आसामी मैत्रीण बसल्याजागेवरूनच वाहकाला पैसे देऊन पाण्याच्या बाटल्या ,अननस इत्यादी खरेद्या उरकून आम्हाला विस्मयचकित करून सोडत होती.
आपल्याकडे प्रवाशांची इतकी सेवा करणारे ,प्रेमळ, तत्पर वाहक कधीतरी मिळतील का या विचारात आमचा बस प्रवास कधी संपला कळलंच नाही.
प्रतिक्रिया
ये बात! आसामी लोक एकंदरच भारी
ये बात!
आसामी लोक एकंदरच भारी असतात. माझा एक आसामी मित्र "आसामी म्हणजे एक नंबरचे आळशी" म्हणत असे. (तो स्वतःही रोज चौदा तास झोपणे, शेवटच्या तारखेपर्यंत बिलं न भरणे वगैरे सद्गुणांनी युक्त असल्याने या त्याच्या मतावर कधी अविश्वास दाखवला नाही.)
तो उकडलेला बटाटा मॅश करून केलेला कोशिंबीरसदृश प्रकार एक नंबर लागतो.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
भारी लोक्स आहेत राव. सरकारचा
भारी लोक्स आहेत राव. सरकारचा वर्षात मिनिमम ६ सिलिंडरचा रुल ह्यांना लागू होत नाही दिसते. इथे मात्र लगेच डॉक्युमेंटस मागतात रिन्यु करायला. पब्लिक मात्र हेल्पिंग नेचरवालं दिसतंय.
जेवणाचे वर्णन मात्र एक लंबर. असले जेवण आवडेल रोज जेवायला.
लैच जबराट !
लैच जबराट ! आता आसामात जाऊन तेच नेहमीच कुत्रबित्रं खाण्याची, नक्षल्यांची वर्णन येतात की काय असे वाटून धास्तावलो होतो पण बचावलो. आभार !
संपादक मंडळींसाठी प्रश्न : लैच दिवसांनी इथे येणं झालयं. ते प्रत्येकवेळी पेज रिफ्रेश केल की इचीभन (सॉरी गमभन) गॅडगेट लोडेड चा मेसेज का बरं येऊन राहलाय ?
गमभनचे जोशी साहेब सॉरी बर्का, तुमच्या उत्पादनाच्या नावावर फालतू विनोद केला म्हणून. सांभाळून घ्या नायतर उडवून टाका. हाकानाका !
आता आसामात जाऊन तेच नेहमीच
हाहाहा
???
हं??????
नाही नाही, ते तसलं तर नागाल्याण्डबद्दल वाचलं होतं१... आसामातले लोक बांबू खातात, इतपतच आपलं आसामबद्दलचं असामान्यअज्ञान मर्यादित आहे. असो.
..........
१ हे जे काही वाचलं होतं - खरंखोटं एक तो लिहिणारा जाणो नि दुसरा तो एक विधाता जाणो - तो एक अतिशय भारी प्रकार होता. तत्त्वत: त्याला 'कुत्रं खाणं' म्हणता येईल किंवा कसे, याबद्दल साशंक आहे. बोले तो, एखादं जिवंत कुत्रं घ्यायचं, त्याला पोटभर खाऊ घालायचं, नि मग ते अन्न त्या कुत्र्यास पुरतं पचलेलं नसताना, ते अन्न अजून कुत्र्याच्या जठरातच असताना, त्या कुत्र्याचं पोट कापून, त्या कुत्र्याला तोंडही न लावता फक्त त्याच्या जठरातलं ते अर्धवट पचलेलं अन्न तेवढं खायचं. म्हणजे, 'कुत्रं जातं जिवानिशी, नि खाणारा म्हणतो ब्यॉक' म्हणतात, तशातली गत म्हणायची की हो! पण... असो.२
२ वरील किस्सा हा मिठाच्या पोत्याबरोबर - यानी कि राजवाड्यांच्या 'भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा'तले किस्से जितपत गांभीर्याने घ्यायचे असतात, साधारणत: तितपतच गांभीर्याने घ्यावा. लवणस्फटिकन्याय हा आपला मित्र आहे.
ते तसलं तर नागाल्याण्डबद्दल वाचलं होतं
असेल असेल, आसाम काय किंवा नागालँड काय, उर्वरित भारतातील सुशिक्षित जन्तेच्या मते ते सगळे चीनी नायतर नेपाळीच असतात. पण ते एक असोच.
अवांतर : आसामातले लोक बांबू खातात हे वाक्य देखील पुर्णपणे बरोबर नव्हे. आमच्या इकडे महाराष्ट्रदेशीही लोक पोकळ बांबु खातात. फक्त खाण्याची जागा तोंडाऐवजी दुसरी कुठला तरी अवयव असतो.
फोटो दाखवा!
एखादी सर्जनशील बाई असती तर महाराष्ट्र आणि आसामी बसचा तौलनिक अभ्यास असा एक चारेक हजार शब्दांचा निबंध वाचायला मिळाला असता! पण बसच्या नशीबी उसंत सखू आली!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छान वर्णन आहे. फारच छान.
छान वर्णन आहे. फारच छान.
मस्त लेख
खूप आवडला.