Skip to main content

इतर

कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य!

दिनांक- 27/02/2050
वार- रविवार!
वेळ- सकाळी चार!

मुंबईत अंधेरी येथे "के. के." हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता!
"सी.एम. डब्ल्यू" कार ताशी 80 च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत! सृष्टीचे चक्र बिघडल्याने आता सरासरी रोज पाऊस पडायचाच!!

त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता. त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "विक्रम, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?"

ललित लेखनाचा प्रकार

व्यथा एका कठपुतळी राजाची

कठपुतळीचा खेळ सर्वांनाच आवडतो. मलाहि आवडतो. विशेषकरून राक्षसाच्या तावडीतून सुंदर राजकुमारीची सुटका करणारा राजकुमार. हा खेळ बघताना सर्व खरेच वाटायचे. स्वप्नात हरवून जायचो. असे वाटायचे, राजकुमारीची सुटका करण्यासाठी मीच त्या राक्षसाची युद्ध करतो आहे. पण कधी-कधी जोरात वारा आला कि परदा हवेत उडायचा आणि कठपुतलीनाचविणार्याचे हात दिसायचे. क्षणात स्वप्नभंग व्हायचे, हे काही खर नाही, याची जाणीव व्हायची.

ललित लेखनाचा प्रकार

चिंतामणरावांच्या आठवणी.

चिंतामणराव कोल्हटकर हे माझे चुलत आजोबा - माझ्या आजोबांचे - हरि गणेश (तात्या) ह्यांचे धाकटे भाऊ. १९५९ साली चिंतामणराव वारले तेव्हा मी १६ वर्षांचा होतो. त्या काळापर्यंतच्या त्यांच्याविषयीच्या माझ्या वैयक्तिक आठवणी येथे नोंदवत आहे. ’बहुरूपी’ ह्या चिंतामणरावांच्या आत्मचरित्राच्या चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने लिहिला गेलेला डॉ. प्रतिभा कणेकरांचा ’ललित’च्या फेब्रुअरी २०१५ च्या अंकातील लेख माझ्या वाचनात आला. ’लेख उत्तम आहे’ असा त्याबद्दलचा माझा अभिप्राय त्यांना फोनवर कळविला असता त्यांनी अशी सूचना केली की माझ्या लहानपणच्या चिंतामणरावांच्या आठवणी मी लिहून ’ललित’कडे पाठवाव्यात.

चिंतामणराव हे माझ्या वडिलांचे काका आणि माझ्या आजोबांचे धाकटे बंधु. त्यामुळे आम्ही घरात त्यांना ’काका’ म्हणत असू कारण त्यांचे हेच घरगुती नाव सर्वत्र - त्यांच्या स्वत:च्या मुलांतहि - वापरात होते. काकांच्या मला असलेल्या सर्व आठवणी माझ्या लहानपणच्या असल्याने त्यांमध्ये त्यांच्या नाटयविषयक कार्याविषयी विशेष काही नाही कारण मला त्यातले काही कळण्याचे माझे वय नव्हते. ह्या सर्व आठवणी घरगुती वातावरणाशी संबंधित आहेत.

माझी सर्वात पहिली आणि अतिशय अंधुक आठवण म्हणजे माझ्या हातात काठी देऊन आमच्या सातार्‍यामधील घराच्या पडवीत काका मला चालायला शिकवीत होते अशी आहे. (ही आठवण असलीच तर माझ्या वयाच्या पहिल्या-दुसर्‍या वर्षाचीच असणार. इतक्या लहान वयातील आठवणी शिल्लक उरतात काय ह्याविषयी माझ्या मनात शंका आहे. अशीहि शक्यता आहे की ही आठवण माझ्या स्वत:च्या आयुष्यातील नसून कोणा अन्य धाकटया भावंडाला चिंतामणराव चालायला शिकवीत आहेत असे मी पाहिले आणि ती माझीच आठवण आहे असे मला आता वाटत आहे. चिंतामणराव कोणाला तरी असे चालायला शिकवीत होते हे निश्चित.) त्यानंतर ३० जानेवारी १९४८ च्या घटनांमुळे जे जळित प्रकरण झाले त्यात आमचेहि घर जळाले. त्यावेळी काका माझ्या आजोबांबरोबर घरासमोरच्या एका दगडावर बसून चाललेला विध्वंस पहात होते हेहि मला आठवते. (ह्या सर्व दिवसाचे मला आठवते ते वर्णन मी http://dadinani.com/capture-memories/read-contributions/major-events-pr… येथे लिहिले आहे. ज्यांना औत्सुक्य असेल त्यांनी ते अवश्य वाचावे.)

आमच्या घराजवळील आनंद सिनेमा थिएटरात काकांनी काम केलेला कोणतातरी चित्रपट लागला होता आणि तो पहायला आम्ही घरातील लोक गेलो होतो. (विश्राम बेडेकरांचा ’वासुदेव बळवंत’ निश्चित नाही, त्यात काकांनी वासुदेव बळवंतांचे आजोबा, जे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते, ह्यांचे काम केले होते.) पडद्यावर काका दिसताच मी मोठयाने ’काका, काका’ अशी हाक मारली असे माझ्या ऐकिवात आहे!

काकांची वर्षदोन वर्षांनी सातार्‍याला चक्कर असे. ते आले म्हणजे आमच्या पेठेतील गुरवांच्या मावशी, तसेच गंगूबाई शिंदे अशा म्हातार्‍या, ज्या काकांना लहानपणापासून ओळखत, आमच्या घरी येऊन जुन्या आठवणी काढत. एकदा काकांनी लहानपणची आठवण म्हणून गुरवांच्या पत्र्यावर दगड मारले. त्यामुळे गुरवांच्या मावशी ’चिंतामणि, इतका मोठा झालास तरी लहानपणच्या सवयी काही तुझ्या सुटत नाहीत’ असा खोटा ओरडा करीत आमच्या अंगणात आल्या.

सुरुवातीच्या काळात काकांनी लांब केस राखले होते असे आठवते. त्यांना जेवणात उडदाचे घुटे, वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी फार आवडायची आणि ते आले म्हणजे ह्या गोष्टी घरात हमखास व्हायच्या. १९५६ किंवा १९५७ साली सातार्‍यात नाटयसंमेलन झाले. वि.स.खांडेकर अध्यक्ष आणि काका स्वागताध्यक्ष होते. त्या प्रसंगाने खांडेकरांना काकांनी आमच्या घरी संध्याकाळी जेवण्यास बोलावले होते तेव्हा हाच बेत केला होता. त्यावेळी केशवराव दाते आणि के.नारायण काळे (बहुधा) उपस्थित असल्याचे स्मरते.

माझे आजोबा आणि काका दोघेहि विडया ओढत पण एकमेकासमोर विडी न ओढण्याचे जुने पथ्य दोघेहि पाळत. काकांची एक खास डनलोपिलो मऊ उशी होती. ती प्रवासातहि त्यांच्याबरोबर असे. ती उशी मांडीवर घेतलेले काका आणि माझे आजोबा समोरासमोर गादीवर बसून गप्पा मारत आणि आम्ही मंडळी आसपास बसून त्या गप्पा ऐकत असू. अशाच गप्पा काका आणि त्यांचे मित्र मामा वरेरकर ह्यांच्या ६४ कृष्णनिवास, १ली गल्ली, हिंदु कॉलनी ह्या काकांच्या राहत्या जागेत चालत असत. उशीवरून आठवले. माझी एक आतेबहीण उषा लहान असतांना एकदा काका तिला ’उशा, गाद्या, गिर्द्या, तक्के, लोड’ असे म्हणत खेळवत होते.

काका आणि बाबूराव पेंढारकर हे दोघे मिळून ५०च्या दशकात काही नाटके आयोजित करत असत. त्यामध्ये ’झुंझारराव’हि होते. त्यात झुंझारराव - स्वत: बाबूराव आणि कमळजा - स्नेहप्रभा प्रधान अशी पात्रयोजना होती. स्नेहप्रभाबाईंचा आणि आयोजकांचा काही वाद असावा असे वाटते. सातार्‍यात एका रात्री हत्तीखान्याजवळील चित्रा टॉकीजमध्ये हा प्रयोग चालू असतांना रात्रीचे १२ वाजले. स्नेहप्रभाबाईंच्या कराराचा तो शेवटचा दिवस होता. कराराची मुदत संपताच मेकअप उतरवून नाटक चालू असतांना बाई कोणास न सांगता निघून गेल्या. इकडे उरलेले नाटक शिल्लकच आणि नायिकाच गायब! मोठीच आपत्ति उभी राहिली. नाटक अर्धा-पाऊण तास खोळंबून राहिले. अखेर कमळजेचा खून झालेला आहे येथे एकदम उडी मारून आणि बिछान्यावर पांघरुणाखाली एक बाहुली ठेवून उरलेले नाटक पार पाडण्यात आले. ह्या वेळी मी वडिलांबरोबर प्रेक्षक म्हणून उपस्थित होतो म्हणून मला हा सर्व प्रसंग चांगला आठवत आहे. लगोलग उषा कर्वे (ह्यांना ’लावण्यवती’ अशी उपाधि होती) ह्यांची योजना स्नेहप्रभाबाईंच्या जागी करण्यात आली. त्यांच्या काही तालमी आमच्याच घरी मधल्या खोलीत झोपाळ्यावर बसलेले काका घेत आहेत असे चित्र मला आठवते.

काकांची पुण्यप्रभावमधली ’वृंदावन’, भावबंधनमधली ’घनश्याम’ अशी गाजलेली कामे पाहण्याची संधि आम्हाला मिळाली नाहीच कारण ही नाटके करणारी आणि कोल्हटकर-मंगेशकर-कोल्हापुरे ह्यांच्या मालकीची बलवंत मंडळी माझ्या जन्माआधीच बंद पडलेली होती आणि आर्थिक चिंता, कोर्टकचेर्‍या काकांच्या मागे लागल्या होत्या. पण १९५५-५६ च्या सुमाराला विलेपार्ल्यामध्ये एका उत्सवी प्रयोगात त्यांची गाजलेली राजसंन्यासमधील ’साबाजी’ची भूमिका पाहिल्याचे स्मरते. मंडळी बंद झाल्यावर कधीकधी काका इतरांच्या नाटकांच्या तालमी घेत असत. त्याची एक आठवण माझे काका नाटककार बाळ कोल्हटकर (बाळकाका) ह्यांनी मला अनेकदा सांगितली आहे. आपल्या उमेदवारीच्या काळात बाळकाका नाटयक्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत होता आणि कोठेतरी त्याला भावबंधनातील कामण्णा करण्याचे निमंत्रण आले. तालीम घेत होते काका. त्यांनी बाळकाकाचे बोलणे आणि अभिनय दोनतीनदा पाहिला आणि त्याला म्हणाले, "बाळ, तू माझ्या आवाजात बोलतो आहेस. तसे करू नकोस, तुझ्या स्वत:च्या आवाजात बोल!"

काकांच्या ’बहुरूपी’चे ह,वि.मोटे ह्यांनी प्रथम प्रकाशन १९५७ मध्ये केले तेव्हा समीक्षकांकडून पुस्तकाचे फार कौतुक झाले. आत्मचरित्र म्हणजे ’आपण कसे बरोबर आणि इतरांचे काय चुकले ह्याचा काथ्याकूट’ हा मार्ग काकांनी सोडला. त्यांच्याहि आयुष्यात वादाचे प्रसंग आलेच होते पण त्यातील एकाचाहि उल्लेख न करता काकांनी आपल्या नाटककारांचे स्मरण करवीत आपला नाट्यप्रवास वाचकांपुढे उभा केला ह्यामुळे पुस्तक प्रशंसेला पात्र ठरले. दि.धों.कर्वे संपादित ’The New Brahmins: Five Maharashtrian Families' हे पुस्तक University of California, Berkeley ह्यांनी प्रकाशित केले त्यात काकांच्या ’बहुरूपी’मध्ये दिसलेल्या कोल्हटकर कुटुंबाचाहि आढावा घेण्यात आला. आपल्या थोरल्या बंधूंना - म्हणजे माझ्या आजोबांना - काकांनी आपल्या स्वाक्षरीने भेट म्हणून पाठविलेली ह्या पुस्तकाची प्रत अजून माझ्या संग्रहामध्ये आहे. ह्या पुस्तकाला १९५७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यासाठी काका दिल्लीस गेले होते. त्यावेळी त्यांनी समारंभासाठी म्हणून उत्तर हिंदुस्तानी पद्धतीची घट्ट तुमान आणि लांब कुडता शिवून घेतला होता असे मला आठवते. ह्याच्या पुढच्याच वर्षी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून ललित कला अकादमीचे पदकहि राष्ट्रपति राजेन्द्रप्रसाद ह्यांच्या हस्ते मिळाले. तदनंतर काही दिवसांतच वयाच्या ६८व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

सातारा गावात जुन्या म्युनिसिपालिटीकडून शाहू रंगमंदिराकडे जाणार्‍या रस्त्याला काकांचे नाव देण्यात आले होते आणि तशी पाटीहि लावण्यात आली होती. माझ्या आठवणीनुसार ते नाव आता अडगळीतच गेल्यासारखे आहे. इतकेच नव्हे, तर ह्या गोष्टीची विस्मृति झाल्यामुळे दुसर्‍याच कोणाचे नावहि त्याच रस्त्याला दिले गेले आहे असे वाटते.

ललित लेखनाचा प्रकार

मुसव्वीर सब्जवारी यांच्या एका गझलेचा भावानुवाद

मुसव्वीर सब्जवारी यांची एक गझल वाचनात आली. बराच वेळ चिंतन करून मला लागलेला अर्थ खाली देते आहे. अन्य कोणास दुसरा अर्थ लागला तर तो वाचायलाही आवडेल. चिंतन करताना, सहज आणि प्रकर्षाने एक जाणवलेली गोष्ट ही की "थ्री इडिअटस" मधील "बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो" या व्यक्तॆचित्राच्या विपरीत पण तितकेच विस्ट्फ़ुल (हुरहुर लावणारे) व्यक्तीचित्र या गझलेत उतरले आहे. थ्री इडियटस मधील गाण्यात जिथे "वो बस आज का जश्न मनाता, हर लम्हें को खुलके जीता था वो" असे सकारात्मक आणि vivacious व्यक्तीमत्व डोकावते, तिथे सब्जवारी यांच्या गझलेतील तरुण अति भावूक (To the fault ) व हळवा आहे.

ललित लेखनाचा प्रकार

रजनिनाथ हा नभी उगवला

आत्ताच कोजागिरी पौर्णिमा आहे असे चन्द्राकडे पाहून जाणवले आणि त्यावरून शूद्रकाच्या ’मृच्छकटिकम्’ मधील पुढील सुंदर श्लोक आणि त्याचे तितकेच सुंदर गो.ब. देवलकृत ’रजनिनाथ हा नभी उगवला’ हे मराठी भाषान्तर आठवले.

श्लोक आणि भाषान्तर असे आहे.

उदयति हि शशाङ्क: कामिनीगण्डपाण्डु:
ग्रहगणपरिवारो राजमार्गप्रदीप:|
तिमिरनिकरमध्ये रश्मयो यस्य गौरा:
स्रुतजल इव पङ्के क्षीरधारा: पतन्ति||

(कामिनीच्या भालप्रदेशासारखा गौर आणि ग्रहगणांनी वेढलेला असा चन्द्र उगवत आहे. चिखलामध्ये दुधाच्या धारा पडाव्या तसे त्याचे शुभ्र किरण अंधारामध्ये पडत आहेत.)

देवलकृत भाषान्तर:

रजनिनाथ हा नभी उगवला
राजपथी जणु दीपचि गमला।
नवयु्वतीच्या निटिलासम किती
विमल दिसे हा ग्रहगण भवती।
शुभ्रकिरण घनतिमिरी पडती
पंकी जेवि पयाच्या धारा॥

हे नाटयपद कोठल्यातरी खाजगी कार्यक्रमामध्ये गायले गेलेले येथे ऐका.

ललित लेखनाचा प्रकार

उदास वाटलं म्हणून मांडलं

मी फार पूर्वीच शिकले, हातात आहे ती गोष्ट सोडायची नाही म्हणजे नाही, खेकड्या-मुंगळ्याची वृत्ती, शिर तोडलं तरी नांगीत पकडलेलं सुटणार नाही. खेकड्याच्या या वृत्तीमुळेच त्या रोगाला कर्करोग नाव आहे का न जाणो. अर्थात ते अवांतर झालं. मुख्य मुद्दा हा आहे की ज्या एन्टिटीमध्ये आपण वेळ, उर्जा, भावना इन्व्हेस्ट केल्या त्या अशा सोडून कशा द्यायच्या. मला नाही ब्वॉ जमणार. आज काही बॅड पॅच असू शकतो, आपला मूड्/मनस्थिती सगळं सोडून देण्याची असू शकते पण उद्या तीच मनस्थिती रहात नाही. मन हे वहाणार्‍या जळासारखं असतं. कधी याचं प्रतिबिंब कधी त्याचं. जॉब, नाती या दोहोत माझी ही पकड मलाच प्रकर्षाने जाणवते.

ललित लेखनाचा प्रकार

नात्यातले लहान मोठे

कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल. आणि तेव्हा मग जर का मोठ्यांनी लहानांसारखे वागले तर त्यांना पुन्हा ऎकून घ्यावे लागते की "लहानांना मोठे होऊन मोठ्यांना समजवावे लागते आणि कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते"

ललित लेखनाचा प्रकार

तिश्नगी अर्थात तृष्णा

लोग दर्या पे क्युं जान दिये जाते है,
तिश्नगी का तो तआल्लुक नही पानी से

वा! काय चपखल , सुरेख वर्णन आहे तहानेचे. तृष्णा पाणी पिऊन थोड्या काळाकरता मिटते पण परत जागृत होते, त्रास देते. मग काय संबंध काय तहानेचा आणि जलाचा? काय संबंध आहे तृष्णेचा आणि अमर्याद पसरलेल्या अथांग सागराचा? जितका समुद्र अथांग तितकीच तहानही असीम नाही का?
.
"तृष्णा" हा शब्द कोणाला काय आठवण करुन देइल तर कोणाला काय. या शब्दाने मला मात्र आठवतो तो दुसरा शब्द - "द्वैत." वेगळेपण, भिन्नत्व. जर द्वैतच नसते तर कुठुन आली असती अमर्याद तडफड, व्याकुळ तहान?

ललित लेखनाचा प्रकार

तुलनेचा तराजू

सततची आणि अंधपणे केलेली स्वतःची इतरांशी आणि इतरांच्या जीवनाशी केलेली तुलना द्वेषाचे आणि नाशाचे कारण बनते. आपण इतर दोन व्यक्तींमध्ये केलेली तुलना सुद्धा हेवा आणि लोभाला जन्म देते आणि त्या दोघांचीही अधोगती करवते.
तुलनेमुळे स्वतःचे दोष आणि इतरांचे गुण आपल्याला दिसत नाहीत.
तुलना केल्याने आपण स्वतःचा वेगळेपणा आणि स्वतंत्र अस्तित्व नकळत नाकारत असतो.
तुलना ही नेहेमी हक्काची केली जाते पण कर्तव्याची आणि कर्तृत्वाची केली जात नाही.
इतरांपेक्षा मी कसा चांगला होईन, इतरांपेक्षा मी स्वतःच्या स्वभावात जास्त बदल कसा घडवेल अशी तुलना दुर्दैवाने होत नाही. अशी तुलना लाभदायक ठरते.

ललित लेखनाचा प्रकार