आपल्याला संकल्पनांची गरज आहे का ?
प्रस्तुत संस्थळावर धर्म आणि आध्यात्मिकता या दोन गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभ्या करणारे चर्चाविषय अलिकडे लिहिले गेलेले आहेत. त्यांमधे उलटसुलट मते मांडली गेलेली आहेत. या दोन चर्चांशी थेट साधर्म्य नसलेली परंतु ( माझ्यामते) प्रस्तुत विवेचनाकरता याच्याशी संबंध जोडता येईल अशी आमीरखान च्या कर्यक्रमाबद्दलची चर्चा इथे झाली आहे/ होत आहे.
सुरवातीला मी एक डिस्क्लेमर देतो : मी स्वतःला धार्मिक प्रवृत्तीचा मानत नाही किंवा आध्यात्मिक प्रवृत्तीचा समजत नाही.
मला जाणवलेली एक गोष्ट अशी आहे की "इहपारलौकिक" अशा स्वरूपाची आयुष्याची कल्पना सर्वसामान्यतः अस्तित्त्वात होती/आहे. काही धर्मांमधे पुनर्जन्म आहेत; काहींमधे नाहीत , परंतु ख्रिश्नन/मुस्लिम/हिंदू धर्मांमधे किमान पाप-पुण्य - पर्यायाने पारलौकिक अस्तित्वाचं विवेचन आहेच. जसजसे अधिकाधिक लोक या पारलौकिक तत्त्वांच्या अस्तित्वाबद्दलच्या श्रद्धाविश्वासांपासून दूर जात आहेत तसतसं हे स्पष्ट होतंय की बुवा "यू लिव्ह ओन्ली वन्स" , "वात संपल्यावर दिवा विझतो आणि मग मागे काही उरत नाही तसंच आपलं आहे" अशा स्वरूपाच्या धारणांना अधिकाधिक लोक स्वीकारत असणार.
इथे काही अधिक शक्यता घडताना जाणवतात. या सर्वसमावेशक आहेत किंवा सर्वथा नव्याने मांडलेल्या आहेत असा दावा नाही. यातल्या काही परस्परविरोधी आहेत :
धर्माने घालून दिलेले नियम आणि रूढीपरंपरा , पारलौकिक अस्तित्व आणि त्याचे यमनियम या निव्वळ संकल्पना असतील आणि मुख्य म्हणजे त्या संकल्पना टाकाऊ/निरुपयोगी/त्याज्य असतील तर एकंदर संकल्पना हे प्रकरणच आपल्या काही फायद्याचे आहे काय ? असा विचार मनात डोकावू शकतो. जर का एकंदर सर्व काही ऐहिकच असेल तर ऐहिक आयुष्यात फायदा करून देणार्या माहितीवजा/तांत्रिक गोष्टी - किंवा आज नाही तर निदान भविष्यात ऐहिक आयुष्य सुधारू शकतील अशा स्वरूपाच्या तांत्रिक गोष्टी यांचा अभ्यास एकवेळ करण्यात हशील आहे. बाकी ज्या संकल्पनांचा या ऐहिकतेशी संबंध नाही अशा संकल्पना त्याज्य मानाव्यात काय ? देश , भाषा , समाज , कुटुंब या संकल्पनांची गरज काय ? किंवा त्या संकल्पनांचं पालन कायद्याच्या कक्षेत येईल इतपतच करावं, (उदा, परदेशाकरता हेरगिरी न करणे, सामाजिक स्वच्छता आणि सभ्यतेचे नियम पाळणे इत्यादि.) बाकी ऐहिकतेशी संबंध नसलेल्या या संकल्पनांमधल्या गोष्टी गाळसाळच की. देशाच्या विकासासाठी, समाजाच्या उन्नयनासाठी, भाषेच्या अस्तित्वासाठी आणि तिच्या जोपासनेसाठी, कुटुंबातील इतर व्यक्तींच्या हितासाठी वेगळे प्रयत्न करण्याची, किंबहुना त्याचा विचार करण्याची काय गरज आहे ?
आता, धार्मिकता/आध्यात्मिकता या संकल्पनांचा त्याग आणि उपरोक्त विचारांची दिशा यांमधे काही तर्कागत संगती आहे का ते मला पुरते समजलेले नाही. परंतु धार्मिकता/आध्यात्मिकता यांनी व्यापलेली विचारविश्वाची स्पेस मोकळी झाली की अन्य संदर्भातले दुवे निखळल्याचा आभास होतो खरा. "सकलजनहिताय" , " न हि ज्ञानेन सदृषं पवित्रमिह विद्यते" या वचनांबद्दलची प्रश्नमंजूषा उघडते. (आध्यात्मिकता आणि धार्मिकता यांची ही वकिली नव्हे, प्रस्तुत व्यक्ती स्वतःला धार्मिक/आध्यात्मिक प्रवृत्तीची समजत नाही.)
थोडक्यात, अशा स्वरूपाचे तुटलेपण काही धूसर स्वरूपात अनुभवास येणे ही नास्तैक्याची, ज्याला स्थूलमानाने विवेकवाद म्हण्टलं जातं त्याची तर देणगी नव्हे ? किंवा , पर्यायाने , "शेवटी फक्त सर्व्हायव्हल महत्त्वाचं, मी जिवंत असेस्तोवर सुख मिळालं की झालं आणि त्या दृष्टीने जे आवश्यक असेल तितपत खरं अणि तेच महत्त्वाचं" असा , काहीसा कोता, एकारलेपणाचा विचार तर आस्तिक्य आणि आध्यात्मिकतेच्या नकारातून जन्माला येत नाही ना ? नकळत हा प्रवास संकल्पना, शुद्ध विज्ञान , कला यांच्या मुळावर येण्याकडे तर होत नाही ना ?
लेख कळला नाही
लेख काही समजला नाही. जास्त चिकित्सेत न पडता दोन शंका मात्र उपस्थित करतो.
> बाकी ज्या संकल्पनांचा या ऐहिकतेशी संबंध नाही अशा संकल्पना त्याज्य मानाव्यात काय ? देश, भाषा, समाज, कुटुंब या
> संकल्पनांची गरज काय ?
या सगळ्या संकल्पना ऐहिक (म्हणजे इहलोकातील जीवनातील संबंधित अशा अर्थाने) अाहेत. भाषा इहलोकात बोलली जाईल नाहीतर कुठे? कुटुंब (म्हणजे सासूसासरे, नवरेबायकामुलं इत्यादि) इहलोकातच नसतं का?
> पर्यायाने , "शेवटी फक्त सर्व्हायव्हल महत्त्वाचं, मी जिवंत असेस्तोवर सुख मिळालं की झालं आणि त्या दृष्टीने जे आवश्यक
> असेल तितपत खरं अणि तेच महत्त्वाचं" असा, काहीसा कोता, एकारलेपणाचा विचार तर आस्तिक्य आणि आध्यात्मिकतेच्या नकारातून जन्माला येत नाही ना ? नकळत हा प्रवास संकल्पना, शुद्ध विज्ञान, कला यांच्या मुळावर येण्याकडे तर होत नाही ना ?
यात काहीतरी गफलत होते अाहे असं वाटतं. कलेच्या उपासनेतून किंवा अास्वादातून सुख मिळत नसेल तर ते कोणी करणार नाही. उदाहरणार्थ, शास्त्रीय संगीत न अावडणारा ते ऐकायला कशाला जाईल? त्याचप्रमाणे, 'शुद्ध विज्ञानात संशोधन करणं' हा बराच कष्टाचा मामला असतो. त्यातून अानंद मिळत नसूनही ते करतो अाहे असा संशोधक निदान माझ्या पाहण्यात नाही.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
प्रतिसाद
प्रस्तुत टिपणातले विचार विस्कळित आहेत; त्यांच्यात तर्कागत संगती नसण्याची शक्यता वर नोंदवलेली आहेच.
>>>>या सगळ्या संकल्पना ऐहिक (म्हणजे इहलोकातील जीवनातील संबंधित अशा अर्थाने) अाहेत. भाषा इहलोकात बोलली जाईल नाहीतर कुठे? कुटुंब (म्हणजे सासूसासरे, नवरेबायकामुलं इत्यादि) इहलोकातच नसतं का? <<<<<
होय, ज्यांच्याबद्दल ममत्व वाटावे त्या व्यक्ती इहलोकीचेच हे खरे. परंतु "ममत्व वाटणे" यावरच प्रश्नचिन्ह उमटावे असे काही माणसामाणसांमधले संबंध होत नाहीत ना, अशा स्वरूपाचा प्रश्न होता.
>>>>>>यात काहीतरी गफलत होते अाहे असं वाटतं. कलेच्या उपासनेतून किंवा अास्वादातून सुख मिळत नसेल तर ते कोणी करणार नाही. उदाहरणार्थ, शास्त्रीय संगीत न अावडणारा ते ऐकायला कशाला जाईल? त्याचप्रमाणे, 'शुद्ध विज्ञानात संशोधन करणं' हा बराच कष्टाचा मामला असतो. त्यातून अानंद मिळत नसूनही ते करतो अाहे असा संशोधक निदान माझ्या पाहण्यात नाही.
<<<
मूळ प्रश्नामधे एकारलेपणाच्या, कोतेपणाच्या प्रवृत्तीचा उल्लेख आहे. प्रश्न सुखाच्या शोधाचा नसून आनंदाच्या संकल्पनेचा लोप होण्याचा आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
उदाहरण
डेन्मार्कचं उदाहरण घ्या. ह्या देशाची परंपरा ल्यूथेरन ख्रिश्चनिटीची असली तरी सद्यकाळी बहुसंख्य लोक निरीश्वरवादी अाहेत. देव, परलोक, मुक्ती मिळण्यासाठी काय करावं, मेल्यानंतर अापण कुठे जातो या असल्या विषयांत तिथे फार कमी लोकांना गम्य असतं. सार्वजनिक किंवा वैयक्तिक जीवनातही धर्माचा प्रभाव नगण्यच म्हणावा लागेल.
पण तरीही डॅनिश समाजातल्या परस्परस्नेहसंबंधांचं विसर्जन झालेलं अाहे, अाणि तो कोत्या, अप्पलपोट्या माणसांनी तुंबून गेला अाहे, हे मुळीच खरं नाही. हे लोक अापल्या कुटुंबांवर प्रेम करतात, शेजाऱ्यांना मदत करतात, पर्यावरणाबद्दल अास्था बाळगतात, डॅनिशमध्ये कादंबऱ्या लिहितात, युनिव्हर्सिट्यांमध्ये संशोधन करतात इत्यादि सगळं काही करतात. त्या समाजापुढे प्रश्न नाहीत असं नाही, पण ते जगातल्या बहुतेक देशांच्या मानाने किरकोळ अाहेत. तो एक सुसंस्कृत समाज म्हणण्यासारखा अाहे, अाणि एकूण त्याचं तसं बरंच बरं चाललेलं अाहे. जर मी अपघात होऊन रस्त्यात बेशुद्ध पडणारच असेन, तर वाराणसीपेक्षा कोपनहेगनमध्ये पडायला लवकर तयार होईन. (हे विधान फार सीरियसली घेऊ नका.)
एखाद्या समाजाला अध्यात्मात रस नसेल तर तिथले लोक जीवनातला अानंद गमावतील किंवा अापल्या संकुचित स्वार्थाकरता एकमेकांच्या उरावर बसतील, ही भीती मला तरी वाटत नाही.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
प्रतिसाद
चांगलं प्रतिपादन. मूळ लेख डेव्हिल्ज् अॅड्व्होकेट् या भूमिकेतून लिहिलेला आहे. कुठवर नेता येतं ते पहावं म्हणतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
चर्चेचा आवाका फारच मोठा
चर्चेचा आवाका फारच मोठा ठेवलाय. इतर प्रतिसादांतून चर्चेला दिशा मिळाल्यावर मत देईन
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
न-ऐहिक संकल्पानांवरील मुक्तक
न-ऐहिक संकल्पानांवरील मुक्तक आवडले, एक प्रकारचे लाऊड थिंकींगच. माझे लाऊड थिंकींग - गरज कशी ठरवणार? मॉस्लोच्या गरज सारणी(उतरंडी) प्रमाणे माणसाच्या गरजा परिपक्वतेप्रमाणे बदलत जातात, अन्न-वस्त्र-निवार्यापासून ते स्व-अस्तित्वाच्या जाणिवेपर्यंत गरज बदलत जाते, हे फार सामन्यिकरण आहे. पण सुखाचा कायम शोध घेणार्या माणसाला "What's Next" हा प्रश्न न-ऐहिकतेकडे घेऊन जात असावा, उतरंडीतील खालच्या गरजेपासून वर जाताना खालच्या गरजेशी प्रतारणा केल्याची भावना निर्माण होत नसावी त्यामुळे नक्की श्रेष्ठ काय ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत जात असावे.
सुखाचा शोध, संकल्पनांचा लोप वगैरे
'लौकिकदृष्ट्या ज्याचा फायदा होऊ शकतो अशाच गोष्टी कराव्यात' असं म्हणणं हे एपिक्युरसच्या 'आनंदात वाढ आणि दु:खात घट' करण्याच्या तत्त्वज्ञानाकडे आणि अंततः उपयुक्ततावादाच्या दिशेनं जात आहे असं वाटतं. पण वास्तवात बर्याचशा माणसांचा (काही अपवाद वगळता*) असा अनुभव असतो की ज्यात आपला लौकिकार्थानं कोणताही फायदा नाही अशा गोष्टी केल्यानं(सुद्धा) सुख मिळतं. कुणासाठी हे सुख कामात असतं; कुणासाठी ते संगीत ऐकण्यात, एखादा खेळ खेळण्यात किंवा टी.व्ही.वर मॅच पाहण्यात असतं; कुणासाठी ते इतरांकरता झटण्यात असतं - यात घरी आलेल्यांना हौशीनं खाऊपिऊ घालणार्या एखाद्या सुगरणीपासून ते बाबा आमट्यांपर्यंत अनेक पातळ्या असू शकतात.
मानवी मेंदूचा अभ्यास करणारे काही शास्त्रज्ञ आता असं म्हणू लागले आहेत की उपयुक्तता नसलेल्या गोष्टींमधून आनंद मिळणं हे मेंदूतच 'प्रोग्रॅम्ड' असतं. शिवाय इतरांच्या सुखदु:खात समरस होण्यासाठीचे 'मिरर न्यूरॉन्स' मेंदूत असतात. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते मनुष्याच्या प्राथमिक मानसिक गरजा या सक्षमता, स्वातंत्र्य आणि परिसर/व्यक्तींशी संबद्धता अशा असतात. त्या भागवण्यासाठी विविध गोष्टींचा आधार घेतला जातो.
हे जर खरं मानलं तर : निदान काही बाबतींत देव/धर्म अशा गरजा भागवत होते असं दिसतं, पण देव/धर्म असो नसो, मनुष्याला त्या गरजा भागवाव्या लागतात आणि त्या भागवण्याचे मार्ग आपल्यापुरते शोधावे लागतात. कदाचित तेवढी गरज भागली की बाकी संकल्पना वगैरे झूठ असं म्हणता येऊ शकेल, पण काहींना त्या संकल्पना बनवण्या/मोडण्यात आनंद मिळू शकत असेल. त्यामुळे त्या कुणालाच अजिबात नकोत असं म्हणता येत नाही. असाच युक्तिवाद इतर गोष्टींविषयी केला जाऊ शकेल. त्यामुळे 'संकल्पना, शुद्ध विज्ञान, कला यांच्या मुळावर येण्याकडे हा प्रवास होतो आहे का?' याचं उत्तर 'नाही' असं आत्ता तरी म्हणता येईल.
* बर्याचदा हे अपवाद म्हणजे मानसिक संतुलन ढळलेली माणसं असतात. त्यामुळे ती बहुतांश लोकांसाठीचा नियम सिद्ध करतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
यातील बहुतेक संकल्पना ऐहिक आहेत
पण देश, भाषा, समाज, कुटुंब या सर्व संकल्पना ऐहिक आहेत, असे मला वाटते. त्यामुळे मुद्दा नीटसा समजलेला नाही.
मला वाटते, की ऐहिकता आणि मूर्ख-स्वार्थ यांच्यात सरमिसळ होते आहे. खरे तर ऐहिकता आणि दूरदर्शी स्वार्थाची सुद्धा सरमिसळ करू नये. पण वरच्या यादीतील सर्व कलमे दूरदर्शी स्वार्थाच्या अंतर्गत येतात :
(१) देशाचा विकास : सहकार्यामुळे असहकारापेक्षा अधिक फायदा होतो, ही दूरदर्शी जाणीव
(२) समाजाचे उन्नयन : सहकार्यामुळे असहकारापेक्षा अधिक फायदा होतो, ही दूरदर्शी जाणीव
(३) भाषेची जोपासना : संपर्क आणि संवादमाध्यम म्हणून उपयोग होणारे अवजार अधिक काळ टिकावे आणि अधिक सक्षम व्हावे - संपर्क आणि सवादातून कलम-१ प्रकारचा फायदा होतो
(४) कुटुंबातील व्यक्तींचे हित : सहकार्यामुळे असहकारापेक्षा अधिक फायदा होतो, ही दूरदर्शी जाणीव
(१) (३) आणि (४) मध्ये फक्त तरतमतेचा फरक आहे. ज्या व्यक्ती अधिक भेटतात त्यांच्याशी एकमेकांचे हित बघण्याचे प्रसंग अधिक येतात, आणि अलिखित कंत्राट अधिकाधिक गुंतत जाऊ शकते.
पण तरी "दूरदर्शी स्वार्थ" हा मुद्दा काहीसा अवांतर आहे. "ऐहिक" म्हणजे "या-इथले" ("परलोका"तले नव्हे). देश, समाज, भाषा, कुटुंब, इत्यादि गोष्टी या इथल्याच आहेत. परलोकातल्या नव्हेत.
यास मी क्षणिक स्वार्थ म्हणेन. "सर्व्हाइव्हल महत्त्वाचे" बाबत दूरदर्शी विचार केला तर "सहकार पुष्कळदा फायद्याचा" हे कळून येतेच. "मी जिवंत असेस्तोवर"ची मर्यादा बरीच अविवक्षित आहे, कारण मरणाचा काळ जवळजवळ कोणालाच ठाऊक नसतो. त्यामुळे सहकारात घट्ट मर्यादा नसावी, हा विवेकी विचार वाटतो. त्यामुळे आस्तिक्य किंवा पारलौकिकतेच्या (?आध्यात्मिकतेच्या?) नकारातून जन्माला येते, असे काही पटत नाही.
धनंजय यांच्याशी सहमत आहे.
धनंजय यांच्याशी सहमत आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सेल्फिश जीन
हा थोडा उलटा विचार झाला. आपण उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे सर्व्हायव्हलसाठी आवश्यक तेवढ्याच गोष्टी करणं हे खरं तर सहज समजण्यासारखं आहे. सर्व्हायव्हलसाठी (वरकरणी) अनावश्यक गोष्टींच्या नकारासाठी, खरं तर उत्क्रांतीतून जन्मलेल्या प्राण्यांमध्ये त्या गोष्टी मुळात का दिसून येतात याचं आधी उत्तर दिलं पाहिजे. उत्क्रांतीवादाला अनेकांनी याच पायावर विरोध केला. स्वतःचा जीव तेवढा खरा हे मानलं तर अनेक प्राणी स्वार्थत्याग करताना दिसतात. पोळ्याचं रक्षण करताना काही प्रकारच्या मधमाशा डसतात तेव्हा आपला जीव गमावतात, आपल्या पिलांचं रक्षण करण्यासाठी अनेक पक्ष्यांच्या आया भक्षकाचं लक्ष वेधून घेऊन आपला जीव धोक्यात घालतात, कधी गमावतातही. मग हे सर्व 'फक्त सर्व्हायव्हल' म्हणणाऱ्या थियरीत कसं बसतं? त्याचं थोडक्यात उत्तर आहे, की आपल्या पिलांचं रक्षण करण्याची ऊर्मी असलेली जनुकं (जीन) वाचलेल्या पिलांवाटे पुढच्या पिढ्यांमध्ये जातात. अशा रीतीने समाजाच्या सर्व्हायव्हलसाठी मदत करणाऱ्या पण त्या एका प्राण्याला मारक अशा वर्तणुकीच्या ऊर्मी देणाऱ्या जनुकांचा प्रसार झालेला दिसतो.
स्वार्थत्याग, कुटुंबप्रेम, देशप्रेम, भाषाप्रेम, छंद या अशाच ऊर्मींची रूपं आहेत. प्रत्येकामध्ये त्या वेगवेगळ्या प्रमाणात आढळून येतात. उंची वेगवेगळी असावी तशी. त्यात संस्कारांमुळे त्यांची वाढ कमीअधिक होते. पोषण चांगलं मिळाल्या अगर न मिळाल्यामुळे काहींचे स्नायू बळकट होतात, काहींचे होत नाहीत; तसंच. त्यामुळे या ऊर्मींच्या नकारातून सर्व्हायव्हलकेंद्रित विचार जन्माला येतात हे विधान गाडीमागे घोडा लावण्याप्रमाणे वाटतं. स्वार्थीपणा-निस्वार्थीपणा असं काळंपांढरं द्वैत नसून कितपत स्वार्थ आणि कितपत स्वार्थत्याग यांचं अंशतः बदलत जाणारं गुणोत्तर असतं. हे प्रत्येकात किंचित वेगळं असतं इतकंच.
या ऊर्मी का निर्माण होतात हे बघितलं की मग त्यांची गरज काय हा प्रश्न निकालात निघतो.
रिचर्ड डॉकिन्सचं 'द सेल्फिश जीन' हे पुस्तक वरील मांडणीचा सखोल ऊहापोह करतं. जरूर वाचा.
डेव्हिल्स अॅडव्होकेट
'सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट'हे तत्त्व उत्क्रांतीमधे प्रत्येक जीवापेक्षा प्रत्येक प्रजातीला (काहितरी समान धागा असणार्या समुहाला) लागू करावे लागेल. जेव्हा पिलांचं रक्षण करण्याची उर्मी पक्षिण दाखवते तेव्हा ती तिच्या प्रजातीला / समुहाला वाचवायचा प्रयत्न करत असते. जर ती तत्क्षणी हल्लेखोराच्या प्रजातीपेक्षा अधीक 'फिट्' ठरली तर ती सर्व्हाईव्ह होतेच आपल्या पिलालाही सर्व्हाईव्ह करते. आपली प्रजाती टिकवण्यासाठी अजून बळ आलेले नसल्याने-तितके 'फिट' नसल्याने- पिलु काहिच करू शकत नाही, त्यामुळे सर्व्हायव्हलची जबाबदारी मोठ्या-सक्षम- जीवांवर येते.
तेव्हा, बाकी स्वार्थत्याग, कुटुंबप्रेम, देशप्रेम, भाषाप्रेम, छंद या अशाच ऊर्मींची रूपंदेखील 'सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट'हे तत्त्व समुहाला लावल्यास फिट्ट बसतात. यासर्यात वैयक्तीक स्वार्थत्याग हा समुहाच्या स्वार्थासाठीच असतो. तेव्हा हे सारे करणे म्हणजे स्वार्थ नाही हा युक्तीवाद काहिसा तकलादू वाटतो.
तेव्हा मुक्तसुनीतांचा युक्तीवाद, अध्यात्मिकतेच्या अभावामुळे वैयक्तीक स्वार्थ वाढीस लागून समुहाचा (चर्चेत मनुष्यांच्या समुहाचा- मग तो देश असेल, राज्य असेल, समभाषिक असेल किंवा एका गावचा असेल) स्वार्थ मागे पडतो का? असा घ्यावा लागेल असे वाटते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बाकी कशासाठी नाही तरी ‘समाज’
बाकी कशासाठी नाही तरी ‘समाज’ या संकल्पनेच्या बांधणीसाठी इतर संकल्पनांची उभारणी झाली असावी. प्रचंड विविधतेने युक्त असलेल्या मनुष्य प्राण्यांना एकत्र ठेवणे अन एकमेकांचे हित जपणे त्याशिवाय शक्यच झाले नसते. काही एक समानतेची बैठक असल्याशिवाय समुदाय तयार होऊन विधायक कार्ये घडली नसती. ‘धर्म’ अन संस्कृती या संकल्पनांचा उगम यातूनच झाला असावा. यातूनच समाजाची उन्नती होत होत आज आपण हे विचार करू लागलो आहोत.
पण अजुनी समाजाचे सर्वच घटक इतका अन यासारखा विचार करण्याइतका सक्षम झालेला नाही. त्यांच्यासाठी संकल्पनांची व त्या टिकवण्याची आवश्यकता आहे.
एक सर्वांगाने आदर्श समाज बनला की संकल्पना आपोआपच गळून पडतील. तोपर्यंत तरी त्यांची आवश्यकता आहे.