जे.रॉबर्ट ओपेनहाइमर, अ‍ॅटम बॉंब आणि भगवद्गीता.

जे.रॉबर्ट ओपेनहाइमर ह्या पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रख्यात प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली न्यू मेक्सिको राज्यातील लॉस अलामोस येथील ’मॅनहॅटन प्रॉजेक्ट’मध्ये पहिला अ‍ॅटम बॉंब बनविण्यात येऊन न्यू मेक्सिकोमधीलच अलामोगोर्डो-स्थित ट्रिनिटी चाचणी केन्द्रामध्ये त्याची यशस्वी चाचणी १६ जुलै १९४५ ह्या दिवशी करण्यात आली. ह्या पहिल्या बॉंबबरोबरच Little Boy आणि Fat Man अशी सांकेतिक नावे दिलेले दोन बॉंब बनविण्यात आले होते. पैकी Little Boy चा स्फोट हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ ह्या दिवशी टाकण्यात आला. त्यानंतर तीन दिवसांनी ९ ऑगस्टला Fat Man नागासाकी शहरावर टाकण्यात आला. दोन्ही स्फोटांमध्ये अपरिमित हानि झाली. परिणामत: शरणागति पत्करण्याशिवाय जपानजवळ अन्य मार्ग उरला नाही आणि दुसरे महायुद्ध अखेर संपले. हा इतिहास आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे.

चाचणीच्या वेळी जी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि सहस्र सूर्यांचे तेज प्रकट झाले (दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता। यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन:॥ गीता ११.१२) ती पाहताच ओपेनहाइमर ह्यांना डोळ्यासमोर उभे राहिले ते म्हणजे गीतेतील कृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश, दाखविलेले विश्वरूपदर्शनाचे चित्र आणि कृष्णाचे शब्द - Now I have become Death, the Destroyer of worlds. (कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्ध: लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त: - गीता ११.३२) (ओपेनहाइमर ह्यांच्या स्वत:च्या शब्दांमध्ये हे वर्णन येथे पहा.)

असे विनाशकारी शस्त्र बनविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतांना त्यांची मन:स्थिति कशी होती, त्यांच्या मनामध्ये कोणते द्वन्द्व चालू होते आणि भगवद्गीतेने त्यातून त्यांना मार्ग कसा दाखविला हे पुढील लेखनामधून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

’मॅनहॅटन प्रॉजेक्ट’चे प्रमुख शास्त्रीय मार्गदर्शक (Scientific Director) असलेल्या ओपेनहाइमर ह्यांना ह्या प्रयत्नाला यश मिळायला हवे होतेच पण त्याचबरोबरच त्यांच्या मनामध्ये दोन परस्परविरोधी विचार उभे रहात होते. प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून अंगीकृत प्रयत्न अयशस्वी ठरू नये अशी त्यांची साहजिक इच्छा होतीच पण त्या प्रयत्नाच्या यशामधून पुढे जी परिस्थिति निर्माण होईल तिच्या उत्तरदायित्वाचीहि भीति त्यांना वाटत होती. ह्या प्रयत्नाच्या यशातून मानवाच्या हातामध्ये पूर्ण मानवजातीच्या संहाराचे साधन आपण सोपवत आहोत असे त्यांना वाटत होते. चालू युद्ध संपले तरी त्यानंतरहि अणुशक्तीचा वापर संहारक कार्यासाठी करण्याचे प्रयत्न चालूच राहतील आणि त्यांना वाढते यश मिळत जाईल ही भीति त्यांना अस्वस्थ करीत होती.

त्यांचे पूर्वायुष्य ’मॅनहॅटन प्रॉजेक्ट’मध्ये प्रमुख शास्त्रज्ञ ह्या त्यांच्या उत्तरायुष्याच्या उलट वाटावे असे होते. त्यांचा जन्म एका सधन ज्यू घरामध्ये १९०४ साली झाला. त्यांचे वडील ज्यूलिअस ओपेनहाइमर आणि आई एला हे वंशाने ज्यू असले तरी यहुदी धर्माचे कट्टर पुरस्कर्ते नव्हते. त्याऐवजी फेलिक्स अ‍ॅडलर ह्यांच्या Society for Ethical Culture ह्या धर्मतत्त्वांपेक्षा मानवी मूल्यांवर आणि परस्परकल्याणावर भर देणार्‍या चळवळीशी ते दोघेहि संबंधित होते आणि त्यामुळे त्या चळवळीच्या शाळेमध्ये जे.रॉबर्ट ओपेनहाइमर ह्यांचे शालेय शिक्षण झाले आणि त्या शिकवणुकीचे बाळकडू त्यांना शालेय काळामध्ये मिळाले. नंतर हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असतांना इंग्रजी भाषान्तरांमधून वाचनात आलेल्या हिंदु विचारांचा मागोवा घेण्यामध्येहि त्यांना रुचि निर्माण झाली.

गॉटिंगेन विद्यापीठामधून पदार्थविज्ञानशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवून परतल्यावर कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली आणि कॅल्टेक येथे १९२९ साली पदार्थविज्ञानशास्त्र विभागात शिक्षकाचे काम त्यांना मिळाले. तेथेच त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले आणि पहिल्या रांगेतील शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याति होऊ लागली. पुढे १९३६ साली त्याच विद्यापीठांमध्ये प्राध्यापकाचे स्थानहि त्यांना मिळाले. ह्याच वेळेत बर्कलीमध्ये आर्थर रायडर हे संस्कृत भाषेचे एक गाजलेले विद्वान पौर्वात्यविद्या विभागामध्ये प्राध्यापक होते. त्यांच्याशी परिचय होऊन ओपेनहाइमर ह्यांनी आपल्या विस्तृत विचारविश्वाचा भाग म्हणून रायडर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मूळ संस्कृतमधून गीता वाचली आणि ह्या वाचनाचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. अन्य संस्कृत वाङ्मयहि त्यांनी वाचले असे दिसते कारण नंतर पुढे १९६३ साली Christian Century ह्या मासिकाला मुलाखत देतांना गीता आणि भर्तृहरीची शतकत्रयी ह्या दोन पुस्तकांचा आपल्या मनावर सखोल परिणाम झाला आहे असे त्यांनीच सांगितले होते आणि आपल्यावर सर्वाधिक परिणाम करणार्‍या दहा पुस्तकांमध्ये त्या दोन पुस्तकांना त्यांनी पहिले आणि दुसरे स्थान दिले होते. त्याच मुलाखतीमध्ये गीता आणि शतकत्रयीबरोबरच त्यानी टी.एस. ईलियट ह्यांच्या The Waste Land ह्या दीर्घ कवितेचा उल्लेख केला होता आणि ही कविताहि भारतीय उपनिषदांचे ऋण मानते. तिची अखेर ’दत्त दयध्वं दम्यत’ आणि ’शान्ति: शान्ति: शान्ति:’ ह्या औपनिषदिक शब्दांनी झाली आहे. ओपेनहाइमर ह्यांच्या कार्यालयात जवळच सहज हाती येईल अशा पद्धतीने गीतेचे पुस्तक दिसे असे त्यांच्या परिचितांनी नोंदवले आहे. ह्या सर्वावरून असे दिसते की ओपेनहाइमर ह्यांच्या विचारांच्या जडणघडणीमध्ये भारतीय तत्त्वज्ञान आणि विशेषत: गीतेची शिकवण ह्यांचा मोठा प्रभाव होता.

१९२५ साली केंब्रिजमध्ये शिकत असतांना युद्धविरोधी Pacifist चळवळीच्या सभांमध्ये त्यांची उपस्थिति असे. मॅनहॅटन प्रॉजेक्टच्या यशस्वी कार्यानंतर आणि हिरोशिमा आणि नागासाकी स्फोटांनंतर अणुशस्त्रे आणि अणुयुद्ध ह्या दोन्हींच्या विरोधकांमध्ये ते प्रमुख होते. त्यांची ही विरोधातील भूमिका माहीत असल्यानेच नंतरच्या काळात १९५४ साली Atomic Energy Commission समोर त्यांना चौकशीला तोंड द्यावे लागले आणि चौकशीचा परिणाम म्हणजे त्यांची गुप्तता पातळी - Security Clearance - काढून घेण्यात येऊन गोपनीय कार्यांमध्ये त्यांना भाग घेता येणार नाही असा निर्णय झाला. अशा रीतीने स्वभावत: शान्तिप्रेमी आणि अणुशस्त्रविरोधी अशी ही व्यक्ति बॉंबनिर्मितीच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकली हा मोठाच परस्परविरोध आहे. ह्या विरोधातून मार्ग काढतांना ओपेनहाइमर ह्यांना गीतेचे मार्गदर्शन कसे मिळाले असेल?

कुरुक्षेत्रावर युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वी कृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला. आपल्या विरोधात आपलेच पितामह, गुरु, बंधु आणि अन्य आप्त उभे आहेत हे पाहिल्यावर युद्ध करण्याची अर्जुनाची इच्छा नष्ट होऊन त्याची जागा नैराश्याने, क्लैब्याने आणि वैराग्याने घेतली. तो म्हणाला:

दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥ १-२८॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ १-३०॥
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१॥
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२॥
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ १-३३॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामह: ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ १-३४॥
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ॥ १-३६॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ १-३७॥

असे निराशेचे उद्गार काढून धनुष्यबाण टाकून देऊन दु:खी अर्जुनाने रथातच बसकण मारली.

एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ १-४७॥

त्याची ही शोकमग्न आणि भ्रान्त वृत्ति पाहून कृष्णाने त्याला केलेला उपदेश आणि त्याच्या संशयाचे निराकरण थोडक्या शब्दांमध्ये असे. हा उपदेश देतांना कृष्ण कर्तव्य, नियति आणि श्रद्धा ह्या तीन गोष्टींचे विवरण करतो.

१) कर्तव्य - ’क्षत्रियत्व’ हा तुझा धर्म आहे आणि हा धर्म तुला समाजस्थितीमधून मिळालेला आहे. तस्मात् युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे.

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २-३१॥
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥ २-३२॥
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ २-३३॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३-३५॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ १८-४७॥
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ १८-४८॥

२) कर्तव्यावर पूर्ण विश्वास - एकदा नियत कर्तव्य ठरले की त्याच्या प्राप्तीसाठी नि:शंक मनाने कार्य करावे, तसे करतांना काही पापकृत्य घडले तरी त्यातून पापाचा दोष लागत नाही असे गीता सांगते.

अपि चेदसि सर्वेभ्य: पापेभ्य: पापकृत्तम:।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि॥ ४.३६॥
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्।
साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स:॥ ९.३०॥
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच;॥ १८.६६॥

३) नियति - युद्धामध्ये आपल्या विरोधकांची आपल्या हातून हत्या झाली तर तो दोष आपल्याला लागेल ह्या अर्जुनाच्या भीतीचे निराकरण करण्यासाठी कृष्ण त्याला सांगतो की प्रत्येकाचे - तुझे आणि तुझ्या प्रतिपक्षाचे - भविष्य ठरलेले आहे. मारणारा तू नाहीस, मीच आहे. त्यांचे मरण जर यायचे असेल तर ते तुझ्यामुळे येणार आहे हा तुझा भ्रम आहे. त्यांच्या अटल मृत्यूचे तू केवळ निमित्त असशील.

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ११-३२॥
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ११-३३॥

इतकेच नाही तर दोन्ही बाजूचे योद्धे आधीच आपल्या विनाशाच्या मार्गावर निघालेले आहेत हेहि अर्जुनाला दाखविले जाते कारण अर्जुन म्हणतो:

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ ११-२६॥
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ ११-२७॥

जो संहार व्हायचा आहे तो अगोदरच निश्चित आहे, तो तुझ्या कर्माचे फल नाही म्हणून तुझे नियत कर्म तू करत राहिले पाहिजेस आणि फलाविषयी चिन्तित राहू नकोस हे कृष्ण अर्जुनाला पुन:पुन: बजावतो.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७॥
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२०॥
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ ५-१२॥

कर्मफल कसे असेल, ते कसे मिळेल वा मिळणार नाही अशा चिन्ता व्यर्थ आहेत हा संदेश भर्तृहरीनेहि नीतिशतकामधून पुढील श्लोकाद्वारे दिला आहे. तो म्हणतो:

मज्जत्वम्भसि यातु मेरुशिखरं शत्रूञ्जयत्वाहवे
वाणिज्यं कृषिसेवनादिसकला विद्याः कलाः शिक्षतु |
आकाशं विपुलं प्रयातु खगवत्कृत्वा प्रयत्नं परम्
नाभाव्यं भवतीह कर्मवशतो भाव्यस्य नाशः कुतः ॥ ४८॥

(मनुष्याने पाण्यामध्ये बुडी मारली, मेरुपर्वतावर आरोहण केले, युद्धामध्ये शत्रूंना जिंकले, वाणिज्य, कृषि, सेवाभाव अशा नाना विद्या आणि कला आत्मसात् केल्या, मोठा प्रयत्न करून आकाशामध्ये उड्डाण केले. असे काहीही केले तरी कर्मवशतेमुळे जे न होणारे आहे ते होणार नाही आणि जे होणारे आहे ते टळणार नाही. यदभावि न तद्भावि भावि चेन्न तदन्यथा!)

मनुष्याच्या हातून केल्या जाणार्‍या कार्याच्या फलावर जर त्याचा कसलाच ताबा नसेल आणि त्याच्या कार्याचा परिपाक आधीच ठरलेला असेल तर त्याने निहित कार्याकडे तटस्थतेने आणि संन्यस्त दृष्टीने पाहावे अशी गीतेची शिकवण आहे.

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ २-३८॥
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ १८-२॥

एकीकडे शास्त्रज्ञ म्हणून पार पाडायचे कर्तव्य आणि दुसरीकडे हे कर्तव्य पार पाडले तर त्यातून निर्माण होणार्‍या भावी घटनांची आणि संहाराची भीति ह्या अन्तर्द्वन्दामधून गीतेची ही तीनपेडी शिकवण ओपेनहाइमरना मार्गदर्शक ठरते. शालेय जीवनामध्ये फेलिक्स अ‍ॅडलर ह्यांच्या Society for Ethical Culture ह्या धर्मतत्त्वांऐवजी मानवी मूल्यांवर आणि परस्परकल्याणावर भर देणार्‍या चळवळीचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्या संस्कारांच्या पूर्णपणे विरुद्ध अशा अणुशस्त्रासारख्या गोष्टीची निर्मिति हे शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे कर्तव्य ठरले होते. हे कर्तव्य शान्तिप्रियतेच्या त्यांच्या श्रद्धांनाहि छेद देणारे होते. येथे गीतेने त्यांना सांगितले की तुझे शास्त्रज्ञ म्हणून नियत कर्तव्य अणुशस्त्रनिर्मिति हेच आहे. त्या अणुशस्त्रांचा पुढे कसा सदुपयोग वा दुरुपयोग होईल हे ठरविण्याचे कर्तव्य हे तुझ्या शासकीय वरिष्ठांचे आणि राजकारणी पुरुषांचे आहे, त्या क्षेत्रामध्ये तुझा काही अधिकार नाही. तेव्हा त्याचा विचार न करता तू तुझे नियत कर्तव्य निर्मम बुद्धीने करावेस. त्याच्या परिणामांची चिन्ता करण्याचे तुला कारण नाही.

गीतेची शिकवणूक अशा पद्धतीने कामी आणून आपले शास्त्रज्ञाचे नियत कर्तव्य पार पाडल्यानंतर ओपेनहाइमर ह्यांचा अणुशस्त्रविरोध पुन: डोके वर काढू लागला. त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून असे दिसते की अणुशस्त्रनिर्मितीमधील सहभागामुळे नंतरच्या वर्षांत त्यांना खंत वाटू लागली होती. हायड्रोजन बॉंबनिर्मितीच्या विषयामध्ये त्यांचे मत विचारले गेले असता त्यांनी आपल्या चिंतेला उघड वाच्यता दिली.

शास्त्रज्ञ ओपेनहाइमर गीतेचे मार्गदर्शन घेऊन बॉंब बनविण्याच्या कार्यात मग्न असतांना हार्वर्ड विद्यापीठाचा एक अन्य स्नातक, टी.एस. ईलियट, गीतेचेच शब्द वापरून लिहीत होता:

And do not think of the fruit of action.
Fare forward.
...
...
So Krishna, as when he admonished Arjuna
On the field of battle.
Not fare well,
But fare forward, voyagers.

(Four Quartets, Quartet No. 3, The Dry Salvages.)

('The Gita of J. Robert Openheimer' by James A. Hijiya ह्या निबंधावर आधारित.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

बाप रे. विषय फारच भेदक आहे. लेख तसेच लेखामागील भावना, तो इथे देणं - स्तुत्य वाटले. या लेखावरती विचार व्हायला हवा. काय मनःस्थिती असेल त्यांची खरच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुकर्माच्या नैतिक जबाबदारीतून मुक्त व्हायला केलेली शुद्ध लुच्चेगिरी! नीतिअनीतीच्या प्रश्नांतून इतकी सहज सुटका नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

नीती अनीती केव्हा जगलो वाचलो तरच ना. जपानने अजुन मिर्‍या वाटायच्या आत बंदोबस्त करणे गरजेचे असेल तेव्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग तुमच्या कृतीचे समर्थन तसे करा ; जपान, हिटलर, सोविएत युनियन इत्यादी दुरितांपासून जगाला वाचविण्यासाठी मी हे केले . (जपान अणु बॉम्बच्या वापराशिवायच शरण येण्याच्या मार्गावर होता .ते असो!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

नीतिअनीतीच्या प्रश्नांतून इतकी सहज सुटका नसते.

अती प्रचंड सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ मिलिंद --
संबंधित चर्चा हिरोशिमा नंतर ७० वर्षे ह्या धाग्यावर झालिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात मनोज बाजपेयी एक विकृत खुनी दाखवलेला आहे. त्या तो अनेकांना मारतो त्याचा एखाद्याला मारण्या अगोदर एक फेमस डायलॉग आहे.
" ना कोइ मारता है ना कोइ मरता है ये मै नही कहता गीता मे लिखा है "

औरंगजेबाची एक सवय होती असे वाचलेले आहे. अगोदर तो एखाद्याला हवी ती शिक्षा जाहीर करीत असे. नंतर हाताखालच्या पगारी मौलवींना या शिक्षेला कुराणात काय आधार आहे ही कशी योग्य आहे हे शोधण्याचे फर्मान बजावत असे.

स्वकृत्यास नैतिक धार्मिक आधार शोधणे ही मेंदुची गरज आहे. अन्यथा कॉग्नीटीव्ह डिसोनन्स का काय ते म्हणतात तो प्रॉब्लेम होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Most sociopaths are not demonstrably psychotic; they can readily distinguish right from wrong, but such ability has minimal effect on their behavior.[312] They are devoid of feelings of guilt or remorse,[311] a point readily admitted by Bundy himself. "Guilt doesn't solve anything, really", he said in 1981.

सं - https://en.wikipedia.org/wiki/Ted_Bundy

खूनी आदि लोकांचा गिल्ट थ्रेशोल्ड अनलिमिटेड असतो.
.
अर्थात आपण एका शास्त्रज्ञाबद्दल बोलत आहोत ना की खून्याबद्दल. पण एकंदर गिल्ट थ्रेशोल्डवरती अवलंबुन आहे. नैतिक अधिष्ठान , प्रत्येक व्यक्तीस गरजेचे भासते असेही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अर्थातच आवडला.

स्वकृत्यास नैतिक धार्मिक आधार शोधणे ही मेंदुची गरज आहे.

+१

- एकदा नियत कर्तव्य ठरले की त्याच्या प्राप्तीसाठी नि:शंक मनाने कार्य करावे, तसे करतांना काही पापकृत्य घडले तरी त्यातून पापाचा दोष लागत नाही असे गीता सांगते.

कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख संस्कृत आहे की मराठी!
गीतेतील श्लोकांचा समजेस अश्या मराठीत अनुवाद दिल्याशिवाय या लेखातील काहीही कळणार नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गीतेतील श्लोकांचा अंपूर्ण अर्थ दिलेला नाही त्याची कारणे अशी:
१) सर्व अर्थ दिले असते तर लेख फार लांबला असता आणि आधीच कंटाळवाण्या विषयावरचा कंटाळवाणा लेख आणखीच कंटाळवाणा झाला असता.
२) गीतेतील बहुतेक श्लोक तसेहि अनेकांच्या वाचनात आले असतील असेच आहेत. त्यांचे संस्कृतहि सुबोध आहे. त्यामुळे बहुतांश वाचकांना अर्थ न देताहि तो अंदाजाने ओळखता येईल अशी कल्पना.
३) सर्व श्लोकांचा संक्षिप्त सारांश दाखविला आहेच.
४) त्यातूनहि ज्याला शाब्दिक अर्थ हवा आसेल त्याच्या सोयीसाठी श्लोकांचे क्रमांक दिले आहेत. ते वापरून जालावरील सहज उपलब्ध स्थानांवरून अर्थ सहज पाहता येतो.
५) भर्तृहरीचा 'मज्जत्वम्भसि...' हा श्लोक सर्वपरिचित नाही आणि तो जालावर शोधणेहि गीता शोधण्याइतके सुकर नाही. त्याचा पूर्ण अर्थ दिला आहे.

तरीहि गीतेच्या श्लोकांचा अर्थ हवाच असेल तर तसे सांगा, लिहून देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे अर्थ पुरेसा स्पष्टतेने मांडलेलाच आहे.
मात्र मला आपले या विषयावरील नेमके मत काय आहे ? ते हा लेख वाचुन कळलेले नाही. आपले स्वतःचे या विषयावरील मत्/भुमिका आपण स्पष्टतेने मांडली तर वाचावयास नक्कीच आवडेल.
उत्सुक मारवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्जुन कारण मागत होता आणि भगवंत त्याला परिणामांची चिंता करू नकोस असे सांगत होते. शेवटी प्रश्नकर्ता आणि उत्तरकर्ता वेगवेगळ्या ध्रुवांवर होते आणि प्रश्नकर्ता हरला किंवा स्वतःचा प्रश्न विसरला किंवा भगवंत फार चलाख निघाले असे माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्नकर्ता हरला

तेच बरोब्बर आहे एकदम.
<शुचि मोड ऑन>
.

प्रश्नकर्ता हा भगवंतांच्या प्रेमात इतका पडलेला होता की इस प्यार की बाज़ी में हँस कर जो दिल हारा वो सब जीताम्हणून तो मुद्दाम हरला.

<शुचि मोड ऑफ>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वत:च्या कृतिला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी शोधलेल्या पळवाटा आहेत. मी तोच देव मानतो जो मला डायरेक्ट फायदे देतो. बाकी धर्म कर्म वगैरेंवर माझा विश्वास बसत नाही :+

गीता तर लोकांना सांगितलेली सुध्दा नाही एकाने ती अशी ऐकली असे दुसर्यानेच लिहलेले तत्वज्ञान या इतके बेभरवश्याचे काय असू शकेल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

एकाने ती अशी ऐकली असे दुसर्यानेच लिहलेले तत्वज्ञान या इतके बेभरवश्याचे काय असू शकेल ?

वा! छानच प्रतिसाद. कम्युनिकेशन गॅप्स्/ब्लंडर्स किती असतील त्याची कल्पना केलेलीच बरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनलाइक अदर धार्मीक स्टफ, गीता (वाचनाची) फलश्रुती सांगत नाही. कोणत्याही देवाला प्रसन्न करायचे विशेष मार्ग त्यात नाहीत. ती जिवन मृत्यु सारख्या मुलभुत प्रश्नावर तर्कशुध्द भाष्य रचुन मनाला दिलासा द्यायचा प्रयत्न जरुर करते. पण वर्तमान काळ व परिणामी त्यावर अवलंबुन भविष्यकाळ बदलण्याचे सामर्थ्य गितेमधे नाही. उद्या मी बाजारात जाता जाता कृष्ण मला भेटला अन गिता सांगुन व अनुभुती देउन निघुन गेला( असं कल्पुया) तरी पुढील क्षणाला मी बाजारातुन आणलेली भाजी चिरत असणे(च) अपेक्षीत आहे. गितेचे श्लोक/अनुभव मनात घोळवुन त्यावर चिंतन करत असणे न्हवे. गिता फक्त मानवी वर्तनाचे तिन भाग करते त्याप्रमाणे आपल्याला फळे मिळतात असे सामजावते. पण प्रत्यक्ष विचार केला तर कर्मयोग आचरणे अशक्य आहे कारण त्यासाठी कर्मच थांबवावे लागेल. गिता मोक्ष विषयावर चिंतन करण्यास भाग तर पाडते पण ज्याचा( मोक्ष स्थितीचा) चालु मानवी अस्तित्वाशी काडीचाही संबंध दुरुनही निर्माण होउ शकत नाही हे सोयिस्करपणे विसरते की काय अशी शंका मनात येते.

जितके समजुन घ्यायचा प्रयत्न करु तितका जास्त गोंधळ माझ्या मनात गिता निर्माण करते. कदाचीत एखादा तयारीचा कोणी मला अजुन भेटला नसावा Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

(किंचितच अवांतर)
कॅथोलिक धर्मशास्त्र्यांमध्ये "न्याय्य युद्ध" (just war) विषयाबाबत बराच ऊहापोह होतो.
https://en.wikipedia.org/wiki/Just_war_theory

माझ्या मित्रमंडळीपैकी कोणी जालचर्चेत मुद्दा मांडला, की या "न्याय्य युद्ध सिद्धांता"च्या संदर्भात ख्रिस्ती लोक भगवद्गीतेचा संदर्भ हवा तितका घेत नाहीत - भगवद्गीतेत न्याय्य युद्धाबाबत प्राचीन चर्चा मनन करण्यालायक आहे." माझा प्रतिवाद असा होता, की भगवद्गीतेत कर्तव्य-युद्धाची (dutiful war) चर्चा झालेली आहे, युद्ध न्याय्य आहे की अन्याय्य हा मुद्दा भगवद्गीतेत फारसा येत नाही.

(महाभारत प्रचंड आहे, आणि कृष्णशिष्टाई, कर्ण-कृष्ण संवादात, भीष्माच्या तोंडून वगैरे अशी चर्चा झाली असेलही. पण भगवद्गीता या भागात "न्याय" हा मुद्दा प्राथमिक काय, दुय्यम म्हणून सुद्धा आलेला नाही.)

या धाग्यात लेखकाने पुढे आणलेले तीन मुद्दे पटण्यासारखे आहेत. मी सारांश केलेले तीन मुद्दे तपशिलात वेगळे आहेत :
१. युद्ध हे क्षत्रियकर्तव्य आहे (अध्याय १, २[सुरुवात], १८)
२. युद्धाने शरिराला इजा होत असली, तरी आत्म्याला (नैनं छिन्दन्ति शस्त्राणी, वगैरे) इजा होऊ शकत नाही, त्यामुळे कर्तव्यातून घडलेल्या पापाबद्दल भीती नको. (अध्याय २)
३. कर्ता-करविता विश्वरूप/परमेश्वर असल्यामुळे मनुष्याची जबाबदारी अशी काही नसतेच. (अध्याय ११)

काही का असेना - समाजात ठरवून दिलेले काम करताना स्वतः न्याय-अन्यायाबाबर सदसद्विवेकबुद्धी वापरण्यास तीन्ही (माझ्या वा कोल्हटकरांच्या सारांशातील तीन्ही/तीन्ही) मुद्द्यांचा विरोधच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कळला लेखाचा विषय.थोडक्यात छान मांडलंय.मुळात गिता हे एक अठरा धान्यांचं थालीपीठ आहे त्याला सोपी करायला जाणं कोणालाच जमलेलं नाही - ज्ञानेश्वरांनाही.सोपी गोष्ट आणखी सोपी करणं हे सरळ रेषा आणखी सरळ करण्याचा उपद् व्याप आहे.कारण सरळ रेषा ही चौकटी आधारीत असते.चौकटच बदलली की वक्र रेषा हीच खरी सरळ ठरते.
आपणच दिलेला शोध त्याचा वापर यास आपणच जाबदार आहे असं ओपनहाइमरला वाटणं साहजिकच होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0