तुटो वाद संवाद तो हीतकारी...!
मराठी माणसांच्या पुष्कळ खासियतींपैकी एक खास खासियत म्हणजे वादविवाद ! वाद घालण्यात व छिद्रान्वेषी पणातून नवनवीन वाद निर्माण करण्यात मराठी माणसाचा हात कुणी धरू शकणार नाही. मात्र पाय नक्कीच धरावे लागतील __ वाद थांबविण्यासाठी अन वादात शिष्यत्व पत्करण्यासाठी. त्यातही वादाचा वितंडवाद कसा करावा यात पी. एच. डी. करण्यासाठी इच्छुकांनी मराठी माणसालाच गाईड करावे. मराठी माणसाची भांडणे यावरची वपुंची कथा सुपरिचितच आहे. समर्थ रामदास स्वामींनी ही आपल्या माणसांची मेख बरोबर ओळखून सल्ला दिला होता __’ तुटो वाद संवाद तो हीतकारी’.
पण अजूनही हा सल्ला मराठी माणसाने फारसा मनावर घेतल्याचे दिसत नाही. वादाची अधिकृत स्थळे__ एसटी स्टँड, रहदारीचे रस्ते, रेल्वेचे डबे, कार्यालये अशा सार्वजनिक स्थळांपासून ते घरदार , सायबाची केबिन अशा खाजगी स्थळांपर्यंत वादविवाद सुखेनैव चालू आहेत. अनेकदा वादाचा मुद्दा सोडून भलत्याच विषयावर वाद घसरतो. पुष्कळदा वादी व विवादी दोघांनाही समोरच्याचे म्हणणे मनातून पटलेले असते. पण वादासाठी वाद हा बाणा सुटत नाही.
या पार्श्वभूमीवर, वादाचा प्रसंग केवळ थोडेफार सामंजस्य आणि योग्य ठिकाणी मौन या साधनांमुळे वाद तुटून संवाद बनल्याचा एक सुखद अनुभव.
स्थळ : मायबाप सरकारची यष्टी बस. पुण्यनगरी.
वेळ : भर दुपारची.
मी मुंबईहून कोल्हापूरला निघाले होते. थेट बस न मिळाल्यामुळे मुंबई-पुणे-कोल्हापूर असा प्रवास करावा लागला. निगडी येथे एक पन्नाशीचे गृहस्थ बसमध्ये चढले. त्यांनी स्वारगेटचे तिकीट मागितले व १०० रु. ची नोट दिली. झाले ! कंडक्टर महाशयांचे पित्त खवळले.
‘८ रु. सुटे द्या ना राव ?’
‘सुटे नाहीत.. असते तर दिले नसते का ?’
‘तुमाला यष्टीत घ्यायलाच नको होतं राव.. घेतलं तेच चुकलं माझं ! आता हे तिकीट घ्या अन सुटे घ्या स्वारगेटला....’ कंडक्टर.
गृहस्थांचा चेहरा रागानं अन अपमानानं लाल झाला. पण काही बोलले नाहीत.
‘आता होणार सुरुवात वादाला...’ मी मनात म्हटलं.
पुढे वल्लभनगरला १०० रु ची मोड मिळाली अन कंडक्टरने उरलेले पैसे परत केले.
शांतपणे गृहस्थ म्हणाले , ‘मास्तर, लक्षात असू दे. ही बस आपल्या तीर्थरुपांची मालमत्ता नसून सरकारी मालमत्ता आहे ! आणि सरकार जनतेचे आहे तेव्हा मीसुद्धा या गाडीचा थोडासा मालक आहे. तेव्हा यापुढे कुणाला गाडीत घ्यायची अन न घ्यायची भाषा काढू नका. आपण जनतेचे सेवक आहोत तेव्हा आपली पायरी सांभाळून बोलावं ! अहो, मीसुद्धा एक सरकारी कर्मचारीच आहे. रोज दहा ग्राहक माझ्याकडे कामासाठी येतात. पण मी अशी भाषा नाही वापरत कधी ! सौजन्य काय फक्त सप्ताहातच दाखवायचं नसतं ! अशानं कधीतरी तक्रार होईल मग समजेल !’
कंडक्टर चपापला. पण तरी उसनं अवसान आणून बोलला ‘कोण तुम्ही करणार आहात तक्रार माझी ? खुशाल करा. मीपण बघून घेतो...’
अन तरातरा सीटवर जाऊन बसला व पॅडवर पेनने खरडू लागला.
काही वेळानं कंडक्टर उठला अन गृहस्थांजवळ जाऊन त्यांना एक कागद दिला . ‘हे घ्या.. हा माझा बिल्ला नंबर अन हे नाव ! करा खुशाल कुठं तक्रार करायची आहे ती !’
गृहस्थांनी शांतपणे तो कागद वाचला अन फाडून टाकला. ‘कशाला उगा डोकं फिरवून घेता ? तसं तर मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतला. पण आली लहर अन केला कहर असं नाही करत मास्तर. माणसानं माणसाला सौजन्यानं अन मानानं वागवावं एवढीच अपेक्षा. ‘
कंडक्टरची बोलती बंद !
मग त्याला काय वाटलं कुणास ठाऊक ! तो त्यांच्या शेजारी बसला. साध्या सुरात बोलू लागला.
‘तुम्हाला काय वाटलं साहेब, आम्ही सौजन्य सोडलंय ?’
‘----?’
‘अहो बारामतीत जाऊन विचारा डेपोत, सौजन्याबद्दल प्रशस्तीपत्रक मिळालाय मला.’
‘हं...’
‘अहो बारामतीचं सरदार घराणं आमचं ! पूर्वजांनी गावंच्या गावं दान दिली आहेत लोकांना ...’
‘असं का ?’
‘परिस्थितीनं नोकरी करावी लागतेय काका . कधी कधी डोकं आउट होतं या धावपळीने. मग कायतरी वेडंवाकडं बोललं जातं बघा ! ‘
‘चालायचंच हो...’
आणि मग स्वारगेट येईपर्यंत दोघांच्या गप्पा जे रंगल्या म्हणता ! मी ऐकतच राहिले....
प्रतिक्रिया
आई शप्पत!!! काय मस्त रंगवलाय
आई शप्पत!!! काय मस्त रंगवलाय प्रसंग
सुरेख
किस्सा वाचला. सूक्ष्म निरीक्षण, खुसखुशीत शैली आणि सहज गप्पा मारल्यासारखं निवेदन. लेखन आवडले. "फार लवकर संपले" असे वाटणे म्हणजे लिखाणाच्या यशाची पावती म्हणायला हरकत नाही.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
हुडुत....
एवढ्याशा बोलण्याने मुजोरी बंद करणारा आधीचाच भयग्रस्त,मनोरुग्ण वगैरे असावा.
आमच्याकडे तर पन्नासची नोट देउन वीसचे तिकिट मागितले तरी गोष्ट हाणामारीवर येते. आतिशयोक्ती वातेल, पण आतिशयोक्ती वाटतील अशी उदाहरणेच भारतात खरोखर प्रत्यक्षात घडतात हे दुर्दैव.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
छान
छान.
एका शब्दपेक्षा दोन बरे.
छान किस्सा
आवडला.
वाहक चांगलाच असणार
आपण नमूद केलेल्या प्रसंगात निगडीचा उल्लेख आला आहे म्हणून लिहीतो. मी निगडी येथेच राहतो. निगडी ते स्वारगेट अशा अंतराकरिता सहसा वाहक प्रवाशाला बसू देत नाही. या शॉर्ट रूटकरिता तुमच्या महापालिकेच्या गाडीने (पीएम्पीएमएल) प्रवास करा असाच सल्ला देतात. या वाहकाने प्रवाशाला बसू दिलं शिवाय शंभर रुपयांची नोट स्वीकारून उरलेले सुटे परत केले म्हणजे तो सौजन्याने वागला असेच म्हणावे लागेल.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
किस्सा आवडला.या बाबतीत
किस्सा आवडला.
प्रवासीकाका पक्के बिलंदर होते. हातात सुट्टे येई पर्यंत मुग गिळुन बसले.
आणि वाहक पक्का फट्टु निघाला. प्रवसी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतला आहे हे कळताच एकदम नरम झाला.
या बाबतीत (एकंदर प्रवास आणि सौजन्य) मुंबईची 'बेस्ट' बेस्ट आहे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा
छान लिहीले आहे
छान लिहीले आहे
निगडी ते स्वारगेट अशा अंतराकरिता सहसा वाहक प्रवाशाला बसू देत नाही.>>> म्हणजे एस टी च्या नियमात बसू देत नाहीत पण कंडक्टर च्या डिस्क्रीशन वर काही गोष्टी असतात तसे का?
तसेच असावे
शहरी भागात जिथे स्थानिक परिवहन सेवा उपलब्ध आहे तिथे जवळच्या अंतराकरिता एस्टीचा वापर करू द्यायचा असा (लिखीत आहे की अलिखीत ठाऊक नाही) वाहकांचा नियम आहे. परंतु एखाद्या वाहकाने जर प्रवाशाला असा प्रवास करु द्यायचे ठरविलेच तर तो त्यास अंतराच्या टप्प्यानुसार तिकीट देऊ शकतो.
तेव्हा ते तुम्ही म्हणता त्या प्रमाणे << कंडक्टर च्या डिस्क्रीशन वर >> (म्हणजे गाडीत गर्दी किती आहे, इत्यादीवर) अवलंबून असावे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
किस्सा आवडला. आणि "फार लवकर
किस्सा आवडला. आणि "फार लवकर संपले" अशी तक्रार माझीही आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जशास तसे म्हणजे चांगल्यास चांगले या अर्थाने दोघांनी घेतले
दुसरे कोणी भांडत असेल तर पाहण्यास मजा येते आहे. परंतु आपण स्वतः त्या भांडणाचा हिस्सा असू तर हे भांडण लवकर संपावे अशीच इच्छा असते. नसता मनस्ताप (बसमध्ये काय किंवा संकेतस्थळावर काय) कोणालाच नको असतो. आता समोरच्याने आवरते घेतले नाही तर काही जण स्वतःहून माघार घेतात.
माझा स्वभाव असा आहे की समोरचा जोरात भांडू लागला तर मीही तितक्याच जोराने तुटून पडतो (प्रकरण अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्याचा गुण माझ्याही अंगात आहे. आजवर दोनदा असं केलंय). पण समोरच्याने सौम्य भूमिका स्वीकारली तर त्याबाबतीतही त्याच्यावर कुरघोडी करून आपण त्यापेक्षा जास्त सौजन्य शील आहो हे मी दाखवून देतो. सदर प्रवासीही नेमका ह्याच प्रकारातला (कदाचित निगडीतला असल्यामुळेच) असल्याने बहुदा हे भांडण थोडक्यात आटोपले असणार.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
छ्या छ्या छ्या...
अहो, भांडण सुरू होता होताच संपलं यात कसली आली आहे गंमत? असं समजुतीने थोडंच घ्यायचं असतं? आपले असलेले नसलेले हक्क काढून दाखवायचे. बसमधून धक्के मारून उतरवण्याच्या गोष्टी करायच्या, मग अरे जा जा, मुख्यमंत्र्यांपर्यंत वट आहे आपली तुलाच नोकरीतून काढून टाकायला लावेन असं काहीतरी म्हणायचं. मग दोघांनी बा-चा-बा-ची करायची. योग्य तितके * आणि सूचक अक्षरं लिहून नक्की कोणत्या शिव्या घातल्या गेल्या याचं यथास्थित वर्णन करायचं. प्रकरण हातघाईपर्यंत आणायचं. मग एकदोन खरे फटके झाले की नाईलाजाने इतर प्रवाशांनी मध्ये पडायचं. मग 'सोडा मला, तुम्ही धरलंय म्हणून, नाहीतर... आरे **व्या बारामतीला ये मग बघून घेतो तुला...' वगैरेपर्यंत न्यायचं.
एवढं सगळं सोडून अशी निवळानिवळीची भाषा वाचल्यावर एकदम मराठी संस्थळांवरून उठून एखाद्या सायकीऍट्रिस्टच्या ऑफिसमध्ये चालू असलेल्या समुपदेशनात आल्यासारखं वाटतं...
तुम्हाला सेंचुरीचे धागे लिहायला जमणार नाही असं आत्ताच भविष्य वर्तवून ठेवतो.
उनके लेखन की सौम्यताको उनको कमजोरी मत समझो!
<< एवढं सगळं सोडून अशी निवळानिवळीची भाषा वाचल्यावर एकदम मराठी संस्थळांवरून उठून एखाद्या सायकीऍट्रिस्टच्या ऑफिसमध्ये चालू असलेल्या समुपदेशनात आल्यासारखं वाटतं... >>
अहो त्यांचं खरं नाव देखील लीना (म्हणजे नम्र) आणि त्यांनी लेखना करिता घेतलेलं नावही स्नेहांकिता (म्हणजे पुन्हा स्नेह, आपुलकी अशा सौम्य शब्दांशी संबंधित) असताना तुम्ही दंगामस्तीच्या धाग्यांची त्यांच्याकडून अपेक्षा का करावी?
<< तुम्हाला सेंचुरीचे धागे लिहायला जमणार नाही असं आत्ताच भविष्य वर्तवून ठेवतो. >>
हे काय भलतंच? सौजन्यपूर्ण लेखन भडक लेखनापेक्षा कमअस्सल असते की अशा लेखनाला लोक प्रतिसाद देत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे? म्हणजे जास्त प्रतिसाद येण्यासाठी जास्त मसाला असा 'चीप' मार्ग लेखकांनी चोखाळावा असाच तुमचा संकेत स्थळ चालक (चीप एडिटर) या नात्याने छुपा संदेश तर नव्हे?
याउलट माझं तर असं मत आहे की त्यांनी जास्तीचा मसाला न टाकता असंच वास्तवदर्शी लेखन करावं. इतर कुणी प्रतिसाद दिले नाही तरी मी नक्कीच देईन. (लिहीलंय तसंच करूनही दाखवलंय - या धाग्यावर आताच माझे चार प्रतिसाद आहेत)
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
तुम्हाला एकंदरीतच माझ्या
तुम्हाला एकंदरीतच माझ्या प्रतिसादातला विनोद लक्षात आलेला दिसत नाहीये. तुम्ही खालील वाक्य लिहिलं नसतंत तर दुर्लक्ष करणार होतो.
सेंचुरीच्या धाग्यांबद्दलच्या विधानात सदर लेखिकेची छुपी स्तुती आहे. वाद पेटवणं खूपच सोपं असतं. अशा भडकाऊ विषयांचे वडवानल पेटवणाऱ्या सेंचुरी धाग्यांची मी नुकतीच थोडीशी चेष्टा केली त्याचा इथे संदर्भ आहे. 'वाद पेटवण्याऐवजी वाद निवळण्याचं वर्णन करण्याची हौस असेल तर तुमचं लेखन अशा चीप विषयांच्या पलिकडचं आहे' असा मतितार्थ आहे. समजा एखाद्या मराठी नाटकातल्या कुटुंबाबद्दल बोललं की 'हे कसलं कुटुंब? यात सगळे गुण्यागोविंदाने नांदतात, हसतखेळत रहातात, कोणी कोणाचा दर तीन मिनिटाला अपमान करत नाहीत... या लेखकाला मराठी सीरियल लिहिणं अजिबात शक्य होणार नाही असं मी भविष्य सांगतो.' यामध्ये तुम्हाला तिरकसपणा दिसत नाही का? ती खरी तर मराठी सीरियल्सची चेष्टा आहे. आणि त्यापेक्षा वेगळं नाटक बघितल्याचं समाधान व्यक्त केलेलं आहे.
असो. 'चीप एडिटर' ही कॉमेंट फारच चीप वाटली म्हणून हा समजावून सांगण्याचा उपद्व्याप.
अपवाद
भडकाऊ विधानांशिवायही उत्तम प्रकारे वाद होऊन सेंच्युर्या होऊ शकतात. 'सध्या काय वाचताय' प्रकारच्या धाग्यांच्याही सेंच्युर्या होऊ शकतात. इतःपर राजेशशी सहमती.
'पाय'च्या धाग्यावर राजेश आणि धनंजय या दोघांनाही भांडताना मजा येत असेल याची खात्री आहे. सगळीच भांडणं बा-चा-बा-ची प्रकारची नसतात.
माझी तक्रार "लवकर संपले" हे लेखनासंदर्भात होती; भांडणासंदर्भात नाही. मुक्तसुनीत यांच्या आधीच्या प्रतिसादात जो उल्लेख होता, तोच मी पुन्हा केला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भांडा सौख्य भरे!
<< 'पाय'च्या धाग्यावर राजेश आणि धनंजय या दोघांनाही भांडताना मजा येत असेल याची खात्री आहे. >>
पायच्या धाग्यावरील भांडण पुढील पायर्यांमध्ये इतके क्लिष्ट गणितीय झाले आहे की त्या दोघांशिवाय त्या भांडणात इतर कुणाला क्वचितच मजा येत असेल.
<< सगळीच भांडणं बा-चा-बा-ची प्रकारची नसतात. >>
हो पण इतरांची भांडणं त्रयस्थपणे आपण बघत असू तर ती बा-चा-बा-ची या प्रकारात असतील तरच खरी मजा येते. हंगामा चित्रपटात दोन नायक भांडू लागतात आणि नायिका ते बघू लागते तेव्हा त्या दोघांमध्ये चांगलीच हातापायी होईल अशी तिची अपेक्षा असते. पण ते दोघे (अक्षय खन्ना व आफताब शिवदासानी) पांढरपेशांसारखे नुसतेच बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात करतात. ते पाहून नायिकेची (रीमी सेन) घोर निराशा होते.
<< माझी तक्रार "लवकर संपले" हे लेखनासंदर्भात होती; भांडणासंदर्भात नाही. >>
भांडणच संपले तर लेखनही संपणारच की हो. हां आता त्यांनी अशा एकाहून अधिक भांडणांचे एकत्रित संकलन करून एकाच धाग्यात टाकले असते तर जास्त मजा आली असती हे खरे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
समजावण्यापेक्षा समजून घ्या.
@ राजेश घासकडवी,
<< तुम्हाला एकंदरीतच माझ्या प्रतिसादातला विनोद लक्षात आलेला दिसत नाहीये. >>
<< यामध्ये तुम्हाला तिरकसपणा दिसत नाही का? >>
तुम्हाला खरंच असं वाटतं? असो. या थेट प्रश्नाखेरीज तुमच्या शंकांना अधिक स्पष्टीकरण देण्यात काही अर्थ नाही.
<< 'चीप एडिटर' ही कॉमेंट फारच चीप वाटली म्हणून हा समजावून सांगण्याचा उपद्व्याप. >>
उगाच इतका उपद्व्याप केलात. तुमच्या प्रतिसादाप्रमाणेच माझ्याही प्रतिसादात तिरकसपणाच भरलेला होता. तुम्हाला समजला नाही याचं सखेदाश्चर्य वाटतं, निदान हिंदी सिनेमास्टाईल असलेल्या माझ्या प्रतिसादाच्या शीर्षकावरून तरी हे लक्षात यायला हवं होतं.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
धन्यवाद
खुलाशाबद्दल धन्यवाद. मी गैरसमज करून घेतल्याबद्दल क्षमस्व.
मस्त किस्सा!
खरं तर त्या कंटक्टरने नरम होण्याआधी एक प्रश्न विचारायला पाहिजे होता,
"तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतले म्हणता ते कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या? गेल्या वर्षीच्या, या वर्षीच्या की पुढल्या वर्षीच्या?"
दोन्ही पक्ष
स्नेहांकिता त्या बसमधील एक प्रवासी आणि त्यानी त्रयस्थपणे तो संवाद ऐकला, टिपला. साहजिकच त्या दोन व्यक्तींपैकी कुणा एकाची त्या बाजू घेत नाहीत हे लेखातील भाषेवरून स्पष्टच आहे. पन्नाशीचे ते प्रवासी गृहस्थ सरकारी कर्मचारी होते, कंडक्टरच्या आक्षेपार्ह वर्तनावर त्यानी वापरलेली भाषाही नम्रतेची दिसत असल्याने त्याना सामाजिक संभाषण तसेच व्यावहारिकपणाचे भान निश्चित आहे असे जाणवते. हे मान्य असेल तर इतका समंजसपणा असलेल्या व्यक्तीला निगडी ते स्वारगेट बस भाडे आठ रुपये आहे/असणार याची माहितीही असणे स्वाभविक मानले पाहिजे. जर ते मानले तर मग स्वतःजवळ दहाची एक सुटी नोट न ठेवण्याचा निष्काळजीपणा ते कसे करतील या प्रश्न उभा राहतो. ८ रुपयांचा व्यवहार केल्यावर तिथे १०० ची नोट दिली तर कंडक्टरच काय पण रिक्षावाला, भाजीवाला, हमाल "सुट्टे द्यावो साहेब !" असा हाकारा करणारच.
रा.प.म. ची चालक-वाहक मंडळी सौजन्याने (अगदी सौ.स.काळातही) वागतीलच याची हमी खुद्द त्या खात्याचा मंत्रीही देवू शकत नाही. सबब कंडक्टरमहोदय निगडीकरांना जे काही बोलले ते उद्धटपणाचेच लक्षण ठरेल असे समजू नये. चूक प्रवाशांचीही असू शकतेच.
(मी स्वतः नेहमी कोल्हापूर-पुणे व परत असा प्रवास एस.टी.ने, तसेच स्वारगेट ते सांगवी पीएमटी प्रवास करतो. दोन्ही आस्थापनांतील वाहक महोदयांशी तिकिट संदर्भात वाद घालून विकतची डोकेदुखी नको म्हणून सातत्याने नेमके सुटे पैसे जवळ बाळगतो. हा व्यवहार दोन्ही पक्षाकडून सुखाचा ठरतो.)
अशोक पाटील
किंचित सुधारणा
<< हे मान्य असेल तर इतका समंजसपणा असलेल्या व्यक्तीला निगडी ते स्वारगेट बस भाडे आठ रुपये आहे/असणार याची माहितीही असणे स्वाभविक मानले पाहिजे. >>
निगडी स्वारगेट : अंतर २५ किमी : भाडे १८ रुपये (आठ नव्हे)
साधारणतः हा प्रवास पीएम्पीएमएल (महापालिके तर्फे दिली जाणारी स्थानिक परिवहन सेवा - पूर्वाश्रमीची पीएमटी) ने केला जातो जिथे प्रवासी सर्रास ५०/१०० रुपयाची नोट पुढे करतात आणि वाहक उरलेले सुटे ३२/८२ रुपये परत करतात. याचे कारण निगडी स्वारगेट हा प्रवास पीएम्पिएमएल च्या दृष्टीने बराच मोठा ठरतो, बाकीचे प्रवासी आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, इत्यादी जवळच्या अंतरावरचे असतात ज्याचे भाडे ५ रुपये ते १५ रुपयापर्यंत असू शकते. यामुळे वाहकाकडे बरीच चिल्लर व लहान (१० व २० च्या) नोटा जमा होतात. ज्यांचा सांभाळ करणे त्याला कटकटीचे ठरते. त्यामुळे स्वारगेट साठीच्या प्रवासाकरिता कुणी १०० रुपयाची नोट दिली तर तो सहज उरलेले सुटे पैसे परत करून स्वतःचीही सोय भागवतो. नेमक्या याच कारणामुळे बेस्ट मध्ये देखील मला वाहकाने स्वतःहून १०० / ५०० चे सुटे हवेत का? अशी विचारणा केल्याचाही अनुभव आला आहे.
असो. परंतु हाच प्रवास जेव्हा एस्टीतून होतो तेव्हा खरी सुट्याची अडचण होते कारण त्या वाहकाकडे एवढी सुटी रक्कम नसते. बहुदा याच कारणामुळे हे वाहक महापालिका क्षेत्रात जवळच्या अंतराचे प्रवासी सहसा घेत नाहीत. ग्रामीण भागातील प्रवासी गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे लहान नोटा असतात व तिथे अशी अडचण येत नाहीत.
असो. सदर घटनेत वाहक सौजन्यानेच वागला हे पुन्हा अधोरेखीत होत आहे. तरीही प्रवास सुखद होण्याच्या दृष्टीने पाटीलसाहेबांनी दिलेला सल्ला मोलाचा आहेच. शक्यतो बसप्रवासात नेमके व सुटे पैसे बाळगावे. मी स्वतःही तसेच करतो. शंभर / पाचशेची नोट पुढे करुन सुटे पैसे परत मिळण्याची अपेक्षा माणसाने पेट्रोल पंप अथवा उपाहारगृह अशा ठिकाणीच ठेवणे उचित आहे. बसप्रवासात ही अपेक्षा बाळगणे व्यवहार्य नाही.
अवांतर :- पाटीलसाहेब, आपण नेहमी कोल्हापूरहून सांगवीला येत असल्याबद्दल लिहीले आहे. सदर प्रवासात अजून १० किमीची भर घातलीत तर निगडीला याल. आपण माझ्या घरी येण्याचे अनेक दिवसांपूर्वीच (छे दिवस कसले? कित्येक महिने झालेत त्या गोष्टीला) कबुल केले होते. मी अजुनही आपल्या येण्याची वाट पाहत आहे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
प्रश्न दोन रुपयांचा
निगडी ते स्वारगेट = ८ नव्हे १८.
मान्य. मूळ लेखात ८ चा उल्लेख आल्याने तेच मनी आणि बोटात उतरले. पीएमटी 'कात्रज ते काटेपुरम चौक' १८ रुपये आकार आहे. एकदा वीसची नोट दिली, तिकीट घेतले आणि वाहकाने २ रुपये परत दिले नाही, तसाच पुढे जाऊन अन्य प्रवाशांना तिकिटे देऊ लागला. तसे पाहिले तर दोन रुपयांसाठी वाद घालणे योग्य मानले जाणार नाही, पण ज्या बेपर्वाईने तो "ते दोन रुपये माझे हक्काचेच आहेत' अशा आविर्भात आपल्या सीट्कडे गेला हे पाहिल्यावर मला साहजिकच संताप आला. संताप वाढण्याचे कारणही असे की नेमक्या त्या काळात श्री.अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण ऐन भरात आले होते आणि सारा देश त्या घटनेकडे सकाळसंध्याकाळ नजर लावून बसला होता; आणि तसल्या भारलेल्या वातावरणात त्या बसमधील पुणे विद्यापीठाकडे जाणारी २५-३० तरुण-तरुणींनाही त्या कंडक्टरने एक दोन रुपये जे परत देणे गरजेच होते, दिले नव्हते....त्याची फिकीर अण्णांचा जयघोष करण्यार्या त्या पिढीला नव्हती [नंतर मुलाच्या स्थानिक मित्रांकडून समजेल की, हा दोन रुपये परत ने देण्याचा प्रघात 'हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' या चालीवर पीएमटीत रुजलेला आहे]. मी माझ्या सीटवरून उठून कंडक्टरकडे जाऊन माझे हक्काचे दोन रुपये परत मागितले तर ते महाशय, "सुट्टे ठेवायला पायजे होते, माझ्याकडे नाहीत." मी त्याला त्याच्या आवाजापेक्षा मोठ्या आवाजात म्हटले, "कात्रज डेपो असल्याने तिथे सुट्टी नाणी नसतील हे पटते, पण आता विद्यापीठाचा स्टॉप जवळ आला असूनही तुमच्याकडे दोनचे कॉईन नाही, ही सबब पटणारी नाही...." वाद अजूनही वाढला असता, पण कंडक्टरने स्वतःशीच काही पुटपुटत मला दोनचे नाणे दिले. कोल्हापूर-पुणे २५० किमी चा प्रवास छान, पण गावातील हा २५ किमीचा प्रवास नकोसा झाला. दोन रुपये घेऊन सीट्कडे परतताना ती उद्याच्या भारताचा आधारस्तंभ समजली जाणारी २५ पोट्टी माझ्याकडे 'एलिएन' कडे पाहावे अशा नजरेने बघत होती...जणू काही मी दोन रुपये मागून श्रीयुत कंडक्टर पुणेवाले यांचा घोर अपमान केला आहे.
त्या अनुभवातून चेतनजी शिकलो ते इतकेच की, प्रवासाचे नेमके पैसे आपल्याजवळ ठेवूनच सीट पकडणे. मनस्ताप खूप वाचतो.
[निगडी-पिंपरी-चिंचवड भेट जरूर होणार आहे, तेही अन्य दोन सदस्यांसमवेत. नंतर मेलमधून लिहितोच.]
अशोक पाटील
लेखन आवडले
मूळ लेखन आवडले. अलीकडे या संकेतस्थळावर अस्सल, सढळ हाताने लिहिलेले बरेच धागे दिसू लागले आहेत. 'प्रॉडक्ट लाईफ सायकल' च्या नियमाप्रमाणे हे स्थळ तसे लवकरच वयात आले म्हणायचे. त्यामुळे मुद्दाम शेकोट्या पेटवण्याची आवश्यकता नाही. जुनी उपमा वापरायची तर 'घटस्फोट घेऊन प्रसिद्धी मिळवलेल्या नटीप्रमाणे' वागण्याची गरजच नाही. 'प्रॉडक्ट' चांगले असले की त्याला कसल्याही 'प्रॉडॉक्ट' सवंगपणाची गरज असत नाही.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
कंडक्टर हुषार दिसतोय.
कंडक्टर हुषार दिसतोय. मुख्यमंत्री कोणी का असेना, 'बारामती'च प्रमाणपत्र जास्त महत्त्वाच इतकी त्याला जाण दिसतेय.
पण तुमच निरीक्षण पटलं. एक बाजू शांत असली तर भांडण पेटत नाही, दुसरीही बाजू शांत होते काही काळाने. इथं ते प्रवासी थोडी त्यांची चूक असताना (जवळच्या अंतराच्या प्रवासासाठी सुट्टे पैसे न देण - लांबच्या प्रवाशाला कंडक्टर प्रवासाच्या दरम्यान कधीतरी सुट्टे पैसे होतात ते देऊ शकतो, प्रवासी जवळचा असला की तेवढा वेळ मिळत नाही त्यालाही) शांत बसले हे स्वाभाविक; पण अनेकदा स्वतःची चूक नसतानाही कमीपणा घेत शांत बसणारी माणसं पहायला मिळतात. समोरचा आक्रमक बरेचदा त्यामुळे शांत होतो हेही पाहिले आहे.
***
अब्द शब्द
गमतीदार
गमतीदार प्रसंग. बसमध्ये रेल्वेत इ. ठिकाणी असे प्रसंग नशिबी यायचं सुख फक्त भारतातच! आमच्या इथे हाय हेलो किंवा एकदम ठोसेच!! हमरीतुमरी बघायलाच मिळत नाहीत हो!
-Nile
हा हा! नेहमीचं असलं तरी
हा हा! नेहमीचं असलं तरी मजेशीर!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नमस्कार मंडळी आणि धन्यवाद !
नमस्कार मंडळी आणि धन्यवाद ! इतक्या लहानशा धाग्याला (माझ्या लेखी) भरपूर प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती. धागा लिहिताना प्रतिसाद वगैरे विचार डोक्यात नव्हता. शतकी प्रतिसाद इ. चा मानस तर बिलकुल नव्हता. नेहमीच्या प्रवासात दिसलेला एक वेगळा प्रसंग म्हणून सांगावासा वाटला. ‘बा’चा अन ‘बा’ची तर नेहमीच पाहायला मिळतात. पण हे थोडेसे वेगळे. थोडे सामंजस्य, थोडे मौन यांच्यामुळे प्रसंगाला काय कलाटणी मिळू शकली हे सांगण्याचा प्रयत्न.
लेख छोटा वाटला हे साहजिकच आहे .मी लिहिताना लेखात दोन प्रसंग लिहिले होते. दोन्ही वेगवेगळे पण मुद्दा एकच. पण मौजमजा सदरात जास्त लांबलचक धागा लिहिणे प्रशस्त वाटले नाही म्हणून काटछाट केली.
यावरील अभिप्रायांमधून बरेच प्रबोधन झाले. यापुढचे लेख प्रकाशित करताना या लेखाचे अभिप्राय उपयुक्त ठरतील.
वाह
मजा आली वाचून
पण खरी बाचाबाची प्लस मारामारी बघायच असेल तर मुंबईच्या लोकल्सना पर्याय नाहीच्च
लगेच इथे मूंबै पुणे वाद सुरु करु नयेत
.