मंत्र दिला राम कॄष्ण हरि
आज माघ शुद्ध दशमी. वारकरी सांप्रदायात या तिथीला विशेष महत्व
दिले जाते. कारण या दिवशी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना गुरुकॄपा
होवून "राम कॄष्ण हरि" या महामंत्राची प्राप्ती झाली.
खुद्द तुकाराम महाराजांनी आपला अनुभव कथन केला आहे तो असा-
सत्यगुरुरायें कॄपा मज केली । परि नाहीं घडली सेवा कांही ॥१॥
सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥२॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥
काय कळे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा झाली ॥४॥
राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण माळीकेची ॥५॥
बाबाजी आपुले सांगितलें नाम । मंत्र दिला राम कॄष्ण हरि ॥६॥
माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥७॥
तुकाराम महाराज सांगतात-
गुरुमहाराजांनीं माझ्यावर कृपा केली, हे खरे आहे. गुरुरायांनी माझ्यावर
सत्य कॄपा केली. तसेंच ज्या गुरुनें माझ्यावर कॄपा केलीं, ते गुरुराज
सत्य आहेत. परंतु माझ्याकडून कांही त्यांची सेवा घडली नाहीं.
मी स्वप्नामध्यें गंगेचे स्नान करण्याकरितां जात असतांना श्रीगुरुंनी मला
वाटेत सापडविलें म्हणजे गाठले आणि दर्शन दिले. मी नमस्कार
केल्याबरोबर माझ्या मस्तकावर त्यांनी अभयकॄपा हस्त ठेवला, असें
तुम्ही जाणून घ्या.
त्यांनी भोजनासाठी माझ्याजवळ पावशेर तूप मागितले. परंतू मला त्याचा
विसर पडला. हे सर्व स्वप्नात घडले. माझ्याकडून सेवेत कांही अंतर
पडले कीं काय? कोण जाणे, म्हणून त्यांनी जाण्याची त्वरा केली. राघव
चैतन्य, केशव चैतन्य अशी आपल्या गुरु परंपरेची खूण त्यांनी मला
सांगितली. स्वत:चे नाव बाबाजी असे सांगून त्यांनी मला "राम कॄष्ण हरि"
हा मंत्र दिला. या दिवशी माघ शुद्ध दशमी, गुरुवार हा पुण्यदिवस होता.
तो पाहूनच त्यांनी माझा स्विकार केला. ( योगायोगाने यावर्षी माघ शुद्ध
दशमी ही तिथी गुरुवारी आली आहे.)
तुकाराम महाराजांनी ज्या गंगेच्या स्नानाला जाणारी वाट असा उल्लेख
केला आहे ती गंगा कोणती? ग्रामीण भागात आजही आपल्या गावा
जवळील नदीला आदराने आणि प्रेमाने गंगा असेच म्हणतात. गोदावरी
काठावर रहाणारे लोक गोदावरीला गंगाच म्हणतात. संत जनाबाई म्हणतात-
भीमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणीच्या गंगा ॥
म्हणुन देहू जवळील नदी इंद्रायणी हिच नदी ही गंगा असावी असे
मानतात.
श्री. वा. सी. बेंद्रे यांच्या मते हा गुरुपदेश तुकोबांना ओतुर या गावी
गंगावाट नावाच्या वाटेस तुकोबा असताना झाला. सद्गुरुंच्या स्पर्शाने
तुकोबांना भावावस्था प्रप्त झाली असावी असाही स्वप्नाचा अर्थ
त्यांनी केलेला आहे. या भावानंदात तुकोबा पुर्णपणे मग्न झाले
असल्यामुळे खूप वेळ झाला तरी त्यांना जाग आली नाही. एवढ्यात
बाबाजी चैतन्य निघून गेले. मग सावध झाल्यानंतर तूप द्यायचे
विसरून राहून गेले म्हणून तुकारामबुवांना वाईट वाटले. साधु,
संन्याशी, बैरागी यांना तुप देण्याची प्रथा असे. तुकोबांचा हा
गुरुपदेश इंग्रजी कालगणनेप्रमाणे २३ जानेवारी १६४० या दिवशी
झाला असल्याचे बेंद्रे यांनी म्हंटले आहे.
डॉ. प्र. न. जोशी यांचे प्रतिपादन असे -
राघव चैतन्यांचे मूळचे नांव रघुनाथ. गिरिनारच्या एका भागात
शौर्यकुळात यांचा जन्म झाला. वडिलांच्या आज्ञेवरून रघुनाथाने
श्रीदत्ताची उपासना केली. दत्ताच्या अनुग्रहानंतर त्यांच्याच
प्रेरणेवरून हे जुन्नर जवळच्या ओतुरच्या डोंगरात व तपोवनात
अनुष्ठान करु लागले. पुष्पावती नदीच्या तीरावर शिवाची कडक
उपासना यांनी केली. शेवटी व्यासांनी यांना दर्शन दिले व
यांचे नाव राघव चैतन्य असे ठेऊन ’ॐ नमो भगवते वासुदेवाय’
हा मंत्र दिला. दत्तानेही चतु:श्लोकी भागवताची शिकवण देऊन
संप्रदाय वाढविण्यास सुचविले. त्यांचा संचार महाराष्ट्र, उत्तर
हिंदुस्थान, तेलंगण इत्यादि भागात नेहमी असे.
केशव चैतन्य हे राघव चैतन्यांचे प्रमुख शिष्य होत. यांचा जन्म
राजर्षी कुळात झाला. हा मोठा राजकारणी व शुर असून यांस
राघव चैतन्यांच्या सहवासांत वैराग्याचे महत्व पटले. राघव
चैतन्यांकडून गुरुदीक्षा मिळाल्यानंतर यांचे नांव केशव चैतन्य
म्हणून प्रसिद्ध झाले. सन १५६२ च्या सुमारास राघव चैतन्यानी
जिवंत समाधी घेतली. त्यानंतर केशव चैतन्य हे ओतुर परिसरात
राहत असत व तेथे गंगावाटेवर त्यांचा मठ असे. त्यांना मोठा
शिष्य परिवार लाभला. सन १५७१ मध्ये त्यांनी समाधी घेतली.
राघव चैतन्य यांनी ब्रह्मस्वरुप, योगनिद्रा, त्रिगुणलीला इत्यादि
अनेक ग्रंथांची रचना केली. तर केशव चैतन्य यांनिही भक्तिप्रकाश,
वैकुंठपद, गीताभागवतसार अशा ग्रंथांची रचना केली आहे.
बाबाजी चैतन्य हे केशव चैतन्य यांचे प्रमुख शिष्य होत. यांचा
मान्यहाळीसही एक मठ असे. यांची उपासना भक्तीप्रधान होती. मुख्य़
म्हणजे या तिघांनाही अनेक हिंदू मुसलमान शिष्य मिळाले. मुसलमान
परंपरेत राघव चैतन्यांना हजरत लाडले मकायकही उर्फ राघव दराज
आलंद शरीफ या नावाने, केशव चैतन्यांना हजरत ख्वाजा बंदे नवाज
व बाबाजी चैतन्यांना हजरत शेख शहाब्बुद्दिन साहेब मान्यहाळ अशा
नावांनी प्रसिद्धी होती, असे डॉ. प्र. न. जोशी म्हणतात.
निरंजन बुवांनी लिहिलेल्या ’चैतन्य कल्पतरु’ या ग्रंथात तुकोबांची
गुरु परंपरा श्रीविष्णु-ब्रम्हदेव-नारद-व्यास-राघव चैतन्य-
केशव चैतन्य-बाबाजी चैतन्य-तुकोबा चैतन्य अशी सांगितली आहे.
अभंगातील काही शब्दांचा परंपरेत पारमार्थिक भावार्थ सांगण्यात येतो
तो असा -
ज्या गंगेचा उल्लेख अभंगात आहे ती गंगा म्हणजे भक्तिगंगा
किंवा ज्ञानगंगा होय. तिच्यात स्नानाला जायची वाट सापडली नाही
तर संत कॄपेने सापडविली म्हणजे संतांनी दाखविली. या वाटेवरून
महाराज चालले होते यावरून गुरुकॄपेपूर्वी तुकाराम महाराज काय
साधना करत होते व याच मार्गावर त्यांना सद्गुरुची कशी प्राप्ती झाली
हे स्पष्ट होते.
गुरुदेवानी तुप मागितले म्हणजे स्नेहयुक्त अंत:करण मागितले.
अंत:करणाचे चार भाग मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. यातील पाव
भाग म्हण्जे परमार्थाचे मुख्य साधन चित्त तेच मागितले.
माघ म्हणजे मा=नाही अघ=पाप म्हणजे पवित्र आणि दशमी म्हणजे
पंच कर्मेंद्रियांचा व पंच ज्ञानेंद्रिये अशा दहा इंद्रियांचा हा पवित्र
देह पाहून गुरु कॄपेस योग्य समजून बाबाजी चैतन्यांनी तुकाराम
महाराजांना गुरुपदेश केला. गुरुंनी शिष्याच्या मनातील भाव जाणून
त्याला सोपा आणि आवडिचा मंत्र सांगितला. तोच तुकाराम महाराजांनी
सर्वांसाठी खुला केला - राम कॄष्ण हरि.
- देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१
प्रतिक्रिया
धन्यवाद
चांगला लेख. माहिती आवडली.
आवडले. गुरुदेवानी तुप मागितले
आवडले.
होय चित्त्/हृदय हीच मौल्यवान गोष्ट असते.
स्नेहयुक्त अंत:करण असे म्हणून
स्नेहयुक्त अंत:करण असे म्हणून मागितल्यास कळले नसते का? अन तूप म्हटल्यावर कळले ?
उद्या कोणी वरणभातावर स्नेहपूर्ण अंत:करण वाढ गं जरा असं म्हणाला तर त्याची माऊली अथवा सुविद्य पत्नी असली तरी नेमकं काय वाढेल?
जे हवेय ते मागावे नेमके असे आमचे मत.
जे हवेय ते मागावे नेमके असे
प्रेमात व अध्यात्मातही असं रोखठोक थोडीच असतं ते कोर्टात असतं अन प्रेमाची/अध्यात्माची तीच तर गंमतय
पण इथे भोजनाला मागितलेय हो
पण इथे भोजनाला मागितलेय हो तूप ऊर्फ अंत:करण..
बाकी काही हाटेलांत अंत:करण फ्राय झकास मिळते हो..
(No subject)
पुढे असेही म्हणता येईल की
पुढे असेही म्हणता येईल की कशाला पाहिजे ते पद्य. उगीच रुपक अलंकार वृत्त भानगडी. डायरेक गद्यात बोला आन थेट बोला. अस केल तर साहित्यातील बराच भार कमी होईल. काव्य आल की त्याला चाल म्हणजे गाणी पण कमी होउन जातील.मग संगीत.
शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी .. काही तरी थापा मारतोय कवी. शुक्र काय तारा आहे का? उगीच काही तरी अवैज्ञानिक गोष्टी पसरवताहेत.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
नाय ओ .. तसं नव्हे.. कविता
नाय ओ .. तसं नव्हे..
कविता वगैरे आवडीने वाचतोच की. एकाच ओळीचे वेगवेगळे अर्थ लागण्यातच खरी मजा असते..पण जेव्हा ती रचना जाणूनबुजून सटल ठेवलेली असते तेव्हा.
बस का घाटपांडेकाका..
जाऊ दे.. कामकाजातून काढावे म्हटलंय ना वर.. दिलगिरी व्यक्त करतो..
दादा कोंडकेंनी त्याला एक
दादा कोंडकेंनी त्याला एक लोकप्रिय आयाम दिला खर. बर्याचदा काव्यातील गेयते मुळे कवीला अभिप्रेत असलेला अन्वयार्थ हा गौण ठरतो. अभंगात कधी कधी प्रक्षिप्त भागही असतो. गेयतेमुळे मौखिक परंपरेत भर पडते व ते पिढ्यान पिढ्या सरकत राहते. एक खर की अन्वयार्थ लावण्यात बराच काळ खर्च होतो व वाचकांचा गोंधळ वाढतो.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
अगदी अगदी. शास्त्रज्ञांनी
अगदी अगदी. शास्त्रज्ञांनी सुद्धा आपले शोध सामान्य लोकांना सुगम्य भाषेत लिहायला हवेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उत्तम आध्यात्मिक लेख
आध्यात्मिक विचार ज्यांना पटतात वा आवडतात अशांना हा लेख निश्चित आवडेल.
आणि काय हो गवि, येथे ही आध्यात्मिक सात्त्विक चर्चा चालू असता हॉटेलातल्या अन्तःकरण फ्रायच्या उल्लेखाची काय आवश्यकता होती? कोणाच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेस बोलावले तर तेथे जाऊन अन्धश्रद्धेवर भाषण देणे अनौचित्यदर्शक नव्हे काय?
बरोबर आहे तुमचं. ..ती चूक
बरोबर आहे तुमचं. ..ती चूक झाली.
पण भोजनासाठी तूप असा स्पष्ट उल्लेख असतानाही तुपाचे निरुपण पटले नाही. ..बाकी खानपानाचे माझे उल्लेख कामकाजातून वगळावेत ही विनंती..
.सत्यनारायणाला गेल्यावर शिर्याची अपेक्षा करणे हे तरी चालावे. सरळसाधा शिरा..उगीच बेदाणे म्हणजे सत्य, रवा म्हणजे संकट अन तूप म्हणजे हृदय असे तिथे नसावे अशी अपेक्षा..
यक्झ्याक्टली!
म्हणून तर आम्ही सरळसरळ तूप असाच अर्थ घेतला, नि म्हटले, अरारारारारारा! लाइन चुकली रे यांची! पावशेर तूप पाहिजे, तर विठ्ठलाची (किंवा, फॉर द्याट म्याटर, राम किंवा कृष्णहरीची) उपासना करून काय उपयोग आहे? त्याकरिता हनुमानाची उपासना करायला पाहिजे. एकदा त्याला चांगले प्रसन्नबिसन्न करून घ्यायचे, नि मग म्हणायचे, "माकडा, माकडा, हूप! तुझ्या शेंडीला शेरभर तूप! त्यातले पावशेर मला काढून दे ना प्लीज!" म्हणून. एक मुळी मागितली तर आख्खा पर्वत आणून देणारा तो, पावशेर तूप मागितले, तर पावशेरच कशाला, आख्खा शेरभर काढून नाही देणार? म्हणजे पावशेर झाले गुरूला, नि वरचे पाऊण शेर आपण ओपन मार्केटमध्ये विकायला मोकळे! (नाहीतर किराणा मालाचे दुकान काय दिवाळे काढायला काढले आहे?)
पण मग अधिक विचाराअंती यातल्या प्र्याक्टिकल अडचणी लक्षात येऊ लागल्या, आणि "रामकृष्णहरि" मंत्राचे महत्त्व पटले.
१. तुकारामबुवा नि इतका प्र्याक्टिकल विचार, स्वप्नात तरी (आणि त्यात पुन्हा तुकारामबुवांच्या!) शक्य आहे?
२. एक मुळी मागितल्यावर आख्खा पर्वत उखडून आणून देणारा हनुमान, (शेंडीतले) पावशेर तूप मागितले, तर आख्खी शेंडी (स्वतःची!) उखडून देणार नाही कशावरून? (शेवटी दुसर्याच्या बायकोसाठी तिसर्याची लंका जाळण्याकरिता स्वतःची शेपूट पेटवून घेणारा तो, स्वतःची शेंडी उखडताना एवढेसे दुखेल म्हणून घाबरेल?)
३. म्हणजे तुपात केस! तेही माकडाचे!! ईईईईईईईईईई!!!!!!!!!!
४. पण शेवटी ते तूप स्वतः थोडेच खायचे आहे? गुरूने ऑर्डर सोडून मागवले आहे फुकटात खायला (च्यायची या ट्याक्सवाल्यांच्या!), त्याच्याच नरड्यात तर ओतायचे आहे ना पावशेर? नि उरलेले पाऊणशेर प्रॉफिटकरिता गिर्हाइकांच्या गळ्यात मारायचे आहे. काय फरक पडतो?
५. पण पुन्हा, दुसर्या एखाद्या वाण्याने (बोले तो, क्यापिटालिष्टाने) असा विचार नुसता केलाही असता नव्हे, पण कदाचित तो अमलातही आणला असता. हे पडले तुकारामबुवा! इतकी प्र्याक्टिकल कल्पना यांच्या डोक्यात चमकणे शक्य तरी आहे? छ्या:! काहीतरीच काय?
६. बरे, तुपात केस आहेत (आणि तेही माकडाचे!) म्हटल्यावर, गुरूला काय किंवा गिर्हाइकाला काय, असेच क्रूड तर विकता नाही ना येणार! (बोले तो, विकायला हरकत नाही, पण खपणार नाही. च्यायला, ट्याक्सवाले काय नि गिर्हाइके काय, इतके पण येडे नसतात.) म्हणजे रिफायनरी टाकणे आले. यानी कि नसता खर्च. बॉटमलाइन, प्रॉफिट मार्जिन वगैरे सगळेसगळे बोंबलले. मरो! हनुमानभक्ती क्यान्सल. काही राम नाही त्या धंद्यात!
७. अरे हो, रामावरून आठवले. हनुमानाबरोबर डील करायचा जरी म्हटला, तरी तो पडला रामाच्या कॉण्ट्र्याक्टखाली. आपल्या कामाच्या वेळी नेमका रामाच्या डेप्युटेशनवर गेलेला असायचा. प्लस त्याचा रामाशी काही नॉन-कॉम्पीट वगैरे साइन केलेला असल्यास कल्पना नाही. म्हणजे रामालाही डीलमध्ये सामील करून घेणे आले. अँड देअर कम्स द 'राम' पार्ट ऑफ द 'रामकृष्णहरि' ईक्वेशन इण्टू द पिक्चर.
८. बरे, हनुमानाचा डील स्क्र्याप करायचा म्हटला, तर मग एवढे तूप स्वस्तात आणायचे कुठून? अरे हो, तो कृष्णहरी म्हणून होता ना कोणीतरी डेअरी फार्ममधून लोणी लंपास करणारा? 'कन्हैया माखनचोर' या नावाने कुप्रसिद्ध होता तो? काहीतरी ईव्हटीज़िंगच्या, झालेच तर बायकांचे कपडेबिपडे पळविण्याच्या केसिसही दाखल होत्या म्हणे त्याच्याविरुद्ध... कशा दडपल्या, कोण जाणे! तर ते असो, त्याला गाठला पाहिजे, नि ब्ल्याकमेल केले पाहिजे, की बर्या बोलाने शेरभर लोणी फुकटात दे, नाहीतर "मैं नही माखन खायो" म्हणून खोटेच सांगितलेस म्हणून तुझ्या "मैया मोरी"ला सांगेन म्हणून. कितीही निर्ढावलेला असला, तरी "मैया"चे नाव घेतले, की इमोसनल होईल - हो, संकेतच आहे तसा! याला कित्येक हिंदी पिच्चर साक्षी आहेत. - नि शेरभरच काय, दहा शेरसुद्धा देईल. नि तेसुद्धा केस नसलेले, विनाभेसळ, शुद्ध बेळगावी!१ मग ते कढवून, त्याचे तूप बनवून, त्यातले पाव शेर ओतता येईल गुरूच्या घशात, नऊसाडेनऊ शेर विकता येईल खुल्या बाजारात डबल भावाने, नि उरलेले (बेरी, खरवड वगैरे) 'दानधर्मा'साठी बाजूस काढून ठेवता येईल - त्या म्हातारीला२ लेकीने तूपरोटी खाऊ घातली नसेलच - कशाला घालेल ती? उगाच थेरड्यांच्या भलत्या अपेक्षा! - तिला देऊन टाकता येईल. तेवढेच पुण्य!
९. पण मग त्याकरिता त्या कृष्णहरीचे पाय धरणे आले! (नाहीतर तो काय खाटल्यावर आणून थोडाच देणार आहे?) अँड देअर कम्स द सेकण्ड पार्ट ऑफ द मन्त्रा इण्टू दि पिक्चर.
अवांतर: एकदा 'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हटल्यावर खानपानाचे उल्लेख - नि तेही ऑफ ऑल थिंग्ज़ अध्यात्मविषयक प्रतिसादातले - कामकाजातून वगळणे काही झेपले नाही. असो, ज्याचीत्याची मर्जी, (आध्यात्मिक) समज, वगैरे वगैरे.
__________
१ ती 'शुद्ध कानडा' म्हणून काहीतरी भानगड असते म्हणून ऐकून आहे (चूभूद्याघ्या.), तिचा शुद्ध बेळगावी लोण्याशी काही संबंध असावा काय?१अ
१अ तसा तो असल्यास, 'शुद्ध कानडा' ही संज्ञा 'बेळगाव कर्नाटकाचेच!' याचा 'दाखला' म्हणून मुद्दाम कोणीतरी वै.वै.वै.वै.वै.वै.दु.!!!!!!!ने घडवून आणली असावी काय? (असावी, अशी आमची अटकळ आहे.)
२ 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' फेम.
बर्याच वर्षांनी गतस्मृतीत
बर्याच वर्षांनी गतस्मृतीत गेलो. गावी घरी वारकरी संप्रदायाचेही वातावरण होते. हरिपाठात हे सगळ यायच. ओतूर माझे जन्मगाव पण मी वाढलो बेल्ह्यात. मारुतीच्या देवळात सप्ता भजन प्रवचन पोथी असायचीच. वातावरण भारलेल असायच.
सत्यगुरुरायें कॄपा मज केली । परि नाहीं घडली सेवा कांही ॥१॥
सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥२॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥
काय कळे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा झाली ॥४॥
राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण माळीकेची ॥५॥
बाबाजी आपुले सांगितलें नाम । मंत्र दिला राम कॄष्ण हरि ॥६॥
माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥७॥
अस लिहिलेली पोस्टकार्ड खूप छापून घेतली होती थावरे गुरु़जींनी. प्रवचनाला ती वाटायची.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
माहिती आणि दोन्ही आवडले.
माहिती आणि दोन्ही आवडले.
हा लेख वाचुन "कुठे नेउन
हा लेख वाचुन "कुठे नेउन ठेवलीस पुरोगामी ऐसी माझी" असा टाहो फोडावासा वाटला.
देवदत्त, लेख आवडला, नाथ
देवदत्त,
लेख आवडला,
नाथ संप्रदायाचे प्रसिद्ध गुरु महावतार बाबाजी आणि तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य बाबाजी जे एकच आहेत का ?
महावतार बाबाजी हे अजुन ह्या जगात वावरत असतात, त्यांच्या खास शिष्यांना ते दृष्य स्वरुपात मार्गदर्शन करत असतात अस काही खास शिष्य सांगतात. बाबाजींच वय
काहीच्या मते ५०० -६०० वर्ष असाव. बाबाजींच्या शिष्य परीवारात बरेच प्रसिद्ध झालेले मुसलमान शिष्य आहेत.
जर महावतार बाबांजी बद्दल जाणुन घ्यायच् असेल तर " अॅप्रेंटीस ऑफ हिमालयीन गुरु अॅन ऑटॉबायोग्राफी ऑफ अ योगी" हे पुस्तक वाचा !
माझा जुना प्रश्न
वरची प्रतिमा तुकारामबुवांची म्हणून आपल्या मनामध्ये स्पष्ट बसलेली आहे, इतकी की खाली नाव दाखविले नाही तरीहि हे तुकारामबुवा आहेत असे कोणीहि समजेल.
हे उघड आहे की ही प्रतिमा छपाईची कला आपल्याकडे आल्यानंतर कोणीतरी निर्माण केली आणि तिने जनमानसाची पकड घेतली. हेच एकनाथ, ज्ञानेश्वर इत्यादींच्या प्रतिमांबद्दल म्हणता येते. तुकारामबुवा असतांना कोणीतरी त्यांचे चित्र - पोर्ट्रेट - काढले असा काही दावा माझ्यातरी ऐकण्यात नाही. अशी चित्रे काढण्याची पद्धति आपल्याकडे नव्हती आणि त्यामुळे शिवाजीसारख्यांचीहि जी पोर्टेट्स उपलब्ध आहेत ती युरोपीय चित्रकारांनी काढलली आहेत. तीहि शिवाजी राजपुरुष असल्याने. तुकारामबुवांचे पोर्ट्रेट काढायला कोणी युरोपीय चितारी देहूला जाऊन पोहोचेल अशी सुतराम शक्यता नाही.
तर मग प्रश्न असा उद्भवतो की तुकाराम-एकनाथ-ज्ञानेश्वरादिकांची जी चित्रे आपणास आज दिसतात त्यांचा उगम कोठे असावा?
रोचक प्रश्न
प्रश्न अत्यंत रोचक. प्रतिसादांतून अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा.
आनुषंगिक अवांतर १ - तुकारामचे खरे नाव काय, ह्या प्रश्नाचे उत्तर 'विष्णुपंत पागनीस', असे दिले जात असे, असे म्हणतात!
आनुषंगिक अवांतर २ - असाच एक प्रश्न मी मागे मिपावरील एका कौलात विचारला होता - येशूचे जे चित्र आपल्याला कायम दिसते (गौरवर्ण, सोनेरी केस इत्यादी), तसा येशू खरेच होता असे वाटते काय? माझ्या मते नाही, कारण ती येशूनंतर दीड-एक हजार वर्षांनंतर इटालियन चित्रकारांनी केलेली कल्पना होती. येशू तर मध्यपूर्वेतील होता (गोरा-पण युरोपीय गोरा नव्हे, काळे (बहुधा दाट-कुरळे) केस, मध्यम आणि दणकट बांधा इत्यादी)
तुकाराम
संपूर्ण नाव - तुकाराम बोल्होबा आंबिले
आंबिले नै मोरे ना म्हणे ?
आंबिले नै मोरे ना म्हणे ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मोरे हे कुळ टाईप काही तरी आहे
मोरे हे कुळ टाईप काही तरी आहे. वळसे पाटील अशी दोन आडनावे असतात तसेच आंबिले मोरे असे तुकोबांचे आडनाव होते.
...
आंबिले की आंबिये? (चूभूद्याघ्या.)
तुकाराम हे
तुकाराम हे आंबिले.
सोहिरोबा(नाथ?) आंबिये हे एक कोकण प्रांतातील संत होते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ओह, ठीक.
या आंबिल्यांचा त्या आंबियांशी गोंधळ झाला खरा.
(सोहिरोबा गोमंतकीय ना?)
बहुतेक, होय. अदमासे
बहुतेक, होय. अदमासे कोकणप्रांतातील आहेत असे विधान केले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
किशोरी अंबिये नावाची लिव्हिंग
किशोरी अंबिये नावाची लिव्हिंग संतीण आहे.
!
अहो 'संतीण' नका म्हणू हो प्लीज! त्याने काही भलभलते संकेत डोळ्यांसमोर उभे राहतात.
(त्यापेक्षा 'स्त्री संत' किंवा अगदी 'मिस (किंवा मिसेस) संत'सुद्धा परवडेल.)
काही भलभलते संकेत डोळ्यांसमोर
अगदी अगदी. कॉलेजात एका कुंटे आडनावाच्या मुलाच्या प्रेमात असलेल्या मुलीला "कुंटीण" म्हणायचो त्याची आठवण झाली!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
... (अवांतर)
असो. आम्हांस आठवली, ती आळंदीच्या वाटेवरील तरारलेली गव्हाची शेते. (येथे आलटूनपालटून काट्यांचेही पीक घेतले जाते, अशी किंवदंता आहे.)
संतीण शब्दामागे काय आहे ते
संतीण शब्दामागे काय आहे ते माहीती नाही. :O
...
पुणे परिसरातील पौगंडावस्थेतील (विशेषेकरून मराठी माध्यमातील) शाळकरी मुलांमध्ये परंपरेने प्रचलित असलेल्या काही (दुर्दैवाने अमुद्रणीय) गीतांचा संदर्भ आहे त्यामागे. त्यात संत-संतिणीचे संवाद आहेत.
इत्यलम.
व्यनि
व्यनि कराल का नविशेठ ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आंबिले
आंबिले. आंबिले नावाचे अनेक लोक पुण्याच्या आसपास भेटतात. आंबिये हे एका मराठी हिरविणीचे आडनाव आहे वाटते.
किशोरी आंबिये?
किशोरी आंबिये?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हो बरोबर
.
...
('...आणि आंबियेतै कुठे भेटतात?' या जिभेवरील प्रश्नास बगल देऊन.)
हो बरोबर. वर म्हटल्याप्रमाणे, तुकोबांत आणि सोहिरोबांत गोंधळ झाला.
बाकी, हल्लीच्या मराठी नटींशी आमचा परिचय नाही. (बोले तो, पूर्वीच्या मराठी नटींशी घरोबा होता, अशातलाही भाग नाही, परंतु तरीही.)