माझिया मना.....
बऱ्याच वर्षांपूर्वी, एकदा, माझ्या हातावरच्या बारीक बारीक रेषांचे जाळे पाहून, एका ज्योतिषी बाईंनी, “ तुम्ही एवढा विचार का हो करता, “ असे विचारले होते. त्यांनी तसे म्हटल्यावर मला पण जाणवले की, आपण खरंच, जास्त विचार करतो. पण, स्वभावाला कधी औषध असते
का ? त्यानुसार मी विचार करतच राहिलो. नोकरी-धंद्यात असताना मोकळा वेळ कमी मिळायचा. तरीही, सकाळी चालताना, लांबच्या प्रवासांत हे विचारचक्र वेग घ्यायचं. त्यांत विषय कुठलेही यायचे. पुढे पुढे, पाऊण निवृत्त, अर्ध-निवृत्त असे करता करता, एके दिवशी मी पूर्ण निवृत्त झालो. आता वेळाचा काही प्रश्नच नव्हता.
आयुष्यातील अनेक बरे-वाईट प्रसंग आठवून, त्यावेळेस कोण कसे वागले, हे आठवून पहाण्याची माझी संवय जुनीच आहे. त्यांतही, न्यायाधीशाची भूमिका स्वत:कडेच असल्याने, बहुतांशी केसेसमध्ये, निकाल माझ्या बाजूनेच लागायचा. मग दोषी व्यक्तींना, उदारपणे माफ करून टाकत केस हातावेगळी केली जायची. या दोषी व्यक्तींमध्ये, ऑफिसातले बॉस, सहकारी, अनेक आप्त, आयुष्यात भेटलेल्या वल्ली, असे गुन्हेगार असायचे. अन्याय फक्त, माझ्यावरच झाला असल्याने, जजसाहेबांची सहानुभूती माझाकडेच असायची.
निवृत्त झाल्यावर मात्र, (वय वाढल्यामुळे असेल कदाचित) जजसाहेब अचानक पूर्णपणे नि:पक्षपाती झाले. साऱ्या केसेस पुन्हा नव्याने चालवण्याची कोर्ट ऑर्डर निघाली. त्यामुळे फारच उलथापालथ झाली. बऱ्याच केसेसमधले, पूर्वी न तपासलेले, अनेक पैलू उजेडांत आले. अनेक दोषी लोक्स, पुनर्सुनावणीत चक्क निर्दोष ठरून बाइज्जत सुटले, काही पुराव्याभावी सुटले तर काहीजण, हेतू सिद्ध झाला नाही, म्हणून सुटले. मला मात्र, घाईघाईने निष्कर्ष काढण्याबद्दल ताकीद मिळून, कोर्ट उठेपर्यंत, बसून रहाण्याची शिक्षा मिळाली.
तेही ठीक होते. पण पुढे पुढे जजसाहेबांचे माझ्याविषयी इतके वाईट मत झाले की त्यांनी माझी झोपच कमी करून टाकली. रोज सकाळी, चार वाजताच कोर्ट भरायला लागले. कधी ते रात्री अकरा वाजता चालू होऊन, रात्री एक वाजेपर्यंतही चाले. माझ्या सर्व व्यक्तीगत केसेस ओपन करून, मी आत्तापर्यंत कोणाकोणावर अन्याय केला आहे, याची सखोल तपासणी सुरू झाली. माझ्या वागण्याचे असे धिंडवडे निघतील, असे कधी वाटले नव्हते! सुनावणी चालू असताना माझ्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रु वाहायचे. आयुष्यात, आपण जवळच्या किती लोकांना दुखावले, याची जाणीव व्हायची आणि त्यातल्या कित्येक व्यक्ती आता हयातही नसल्यामुळे, केवळ हळहळ व्यक्त करण्याखेरीज, माझ्याकडे दुसरा काही उपायही उरला नव्हता. वेळी-अवेळी, मला असे सदगदित झालेले पाहून आमची ही चिंतेत पडली. जे घडत होते, ते सर्व तिला सांगून टाकले. मग तर ती, आणखीनच काळजी करू लागली. माझ्या वागण्यातही आमूलाग्र बदल झाला. स्वत:ची चूक कबूल करायची संवय लागली. हिच्या मते, त्याचाही अतिरेक व्हायला लागला. कारण, एक दिवशी सकाळी, नळाला पाणी आलं नाही म्हणून ही तक्रार करत होती. क्षणाचाही विलंब न करता, मी माझी चूक मान्य करून टाकली. एरवी, मी हे नक्कीच मानभावीपणे बोलत आहे, असे तिला वाटले असते. पण तिला माझी सद्यस्थिती माहीत होती.
तिच्या तोंडावरची चिंता पाहून मी म्हटलं, “ अग, याचा फायदा पण होतो कधीकधी.” परवा मी सिग्नलला गाडी थांबवली तेंव्हा, पुढची दोन चाके पांढऱ्या पट्टयांना टच झाली बहुतेक. एक लेडी आरटीओ आली गाडीशी, आणि चाकांकडे बघू लागली. ती काही बोलायच्या आंत, मीच कांच खाली केली आणि म्हणालो, अक्षम्य चूक झाली आहे, खरे तर माझे लायसेन्सच रद्द केले पाहिजे नाहीतर गाडी जप्त केली पाहिजे. तेवढ्यांत पुन्हा सिग्नल मिळाला. माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पहात ती म्हणाली, “जावा आता गुमान, फुकटची नाटकं करून ऱ्हायलेत!”
तर, हे असं चाललंय सध्या !!!
.
.
.
.
.
डिस्क्लेमर : - वरील मनोभराऱ्या संपूर्ण काल्पनिक असून त्यांचे वास्तवाशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. प्रत्यक्षांत मी आहे तसाच, अहंकारी, उद्धटराव, तिरशिंगराव आहे, चिंता नसावी.
प्रतिक्रिया
आई ग्ग!
तिमा या लेखात तुम्ही कहर कहर केलाय्.
किती ते मार्मिक निरीक्षण आणि काय खुसखुशीत विनोद!!!
मजा आली राव्.
कृपया लिहीत जा. लेखणीस विश्रांती देऊ नका.
सनातन प्रभात वाचण्याने शांती मिळते.
सनातन प्रभात वाचण्याने शांती मिळते. मोठमोठे कबुली जबाब लिहून द्या. एक फोटो लागतो.
या प्रतिसादामुळे तुमची
या प्रतिसादामुळे तुमची अध्यात्मिक शक्ती एकसष्ट टक्के झाली आहे अचरटकाका...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
!
डबल जेपर्डीची कॉन्सेप्ट नसते काय हो तुमच्यात? अगदी इमॅजिनेशनमध्येसुद्धा?
एकसष्ट टक्के
एकसष्ट टक्के