नवीन आंतरराष्ट्रीय समीकरणे
२६/११च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अबू जिंदालला ताब्यात घेतल्यानंतर कसाबला फाशी दिल्यासारखा किंवा पाकने आपल्या कृत्यांची कबुली दिल्यासारखा आनंद सर्वजण व्यक्त करीत आहेत. हल्ल्याच्या दिवशीच कसाबला जिवंत पकडूनही आपण त्याला बिर्याणी खायला घालण्याखेरीज काहीही करू शकलो नाही तर मग जिंदालाला पकडल्याने काय दिवे लावणार आहोत?
असो..पण अबू जिंदाल नक्की कसा हाती लागला, भारतीय गुप्तहेर संघटनेची कार्यक्षमता खरोखरच वाढली आहे का, भारतीय दवाबामुळे त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले का या प्रश्नांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.
वास्तविक, अबू जिंदालच्या सौदीतील वास्तव्याची माहिती अमेरिकेने उघड केली होती. ९/११चा हल्ला व इतर कोणताही दहशतवादी हल्ला ज्यामध्ये अमेरिकन नागरिक मृत्युमुखी पडले आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अनेक दहशतवादी ठरवून टिपायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार, जगाच्या पाठीवर कोठेही कोणत्याही अमेरिकी नागरिकास इजा झाल्यास त्या विरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल करता येतो व त्यानुसार अमेरिकी यंत्रणा दोषींवर कारवाई करू शकते. याच नियमाच्या आधारे अमेरिकेची सी.आय.ए. हि गुप्तचर संघटना जिंदालच्या मागावर होती व याच संघटनेने तो सौदीत लपून बसल्याची माहिती भारतास दिली होती. नंतर भारत व सौदीमध्ये गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाचा कोणताही करार नसल्याने अमेरिकेनेच दबाव टाकून अल मुखाबरात अल अलाम या सौदीच्या मुख्य गुप्तचर संघटनेला भारताशी संपर्क करावयास लावला (याच संघटनेने ओसामाचा ठावठिकाणा लावण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती). त्यानंतर या संघटनेचे प्रमुख राजपुत्र मुखारिम अब्दुल अझीझ हे अनेकदा भारतात येऊन गेले. अबूच्या बीड येथील घरातून त्याच्या बहिणीच्या रक्ताचे नमुने घेऊन ते सौदीस पाठविण्यात आले. अबुची डी.एन.ए. चाचणी घेऊन सर्व खातरजमा करण्यात आली व यथावकाश अबूला भारताच्या हवाली करण्यात आले.
पण अमेरिकेची हि मदत भारत प्रेमासाठी किंवा मैत्रीसाठी नसून ती पाकिस्तान द्वेषासाठी आहे. अमेरिकेला याद्वारे पाकचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध जगासमोर आणायचे आहेत. आत्तापर्यंत रशियन फौजांना अफगाणिस्तानातून हुसकाविण्यासाठी अमेरिकेने तालिबान व पाकिस्तान या दोघांना पोसले. नंतर हि प्यादी वजीरावरच चाल करून गेल्यामुळे गणिते फिसकटली. अबोटा येथे ओसामाला कंठस्नान घातल्यानंतर व मानवाविरहित ड्रोन हल्ल्यात पाकचे २५ सैनिक मारल्यानंतर अमेरिका-पाकिस्तान संबंध ताणले गेले. त्यातच अफगाणिस्तानात असलेल्या अमेरिका व नाटोच्या सैनिकांची रसद पाक लष्करप्रमुखाने तोडल्याने अमेरिका पाकिस्तानला एकटे पडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सौदीवर दबाव टाकून भारताच्या हवाली केलेला अबू जिंदाल. याचबरोबर एक मोठी बाजारपेठ म्हणून व आशियामधील चीनचे वर्चस्व झुगारून देण्याकरिता अमेरिकेला भारताची गरज आहे. सध्याच्या राजकारणात भारताची अत्यंत निकड असल्याने अमेरिकेने भारताचे चोचले पुरवायला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे, भारत-अमेरिका संबंधांची रशियाने गंभीर दखल घेतली असून त्याला प्रत्युत्तर म्हणून सप्टेंबरमध्ये पहिल्यांदाच रशियाचे अध्यक्ष पाकिस्तानच्या दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारच्या लष्करी सहकार्यास नकार देणारा रशिया हा एकमेव देश होता. हे सर्व निर्बंध काढून रशिया यावेळी पाकिस्तानशी लष्करी व्यवहार करण्यास उत्सुक आहे. भारत-अमेरिका अणुकरार, लष्करी सहकार्यामध्ये झालेली वाढ, रशियाच्या तामिळनाडू येथील अणुभट्टीस होणारा विरोध, कमी झालेला व्यापार या सर्वांमुळे भारताचे धोरण अमेरिकाधार्जिणे झाले असल्याचे रशियाचे मत आहे.
जगभरातून टीकेचा धनी झालेल्या पाकशी संबंध सुधारण्यासाठी रशियाने घेतलेला पुढाकार, पाकिस्तान-चीन यांच्यातील मैत्री लक्षात घेता नजीकच्या काळात रशिया-चीन असे संबंध वृद्धिंगत होतील असे जाणकारांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात हितसंबंधाप्रमाणे मित्र-शत्रू जरी बदलत असले तरी अमेरिकेचा पूर्वइतिहास, भारताबद्दलची आकस व स्वार्थी दृष्टीकोन विचारात घेऊन भारताने आपल्या धोरणांचा पुनरविचार करावयास हवा.
प्रतिक्रिया
छान आढावा
चांगला माहितीपूर्ण लेख आहे.
अजून असे लेख यावेत.
अवांतर: पहिला पॅरा रिपल्सिव्ह आहे त्यामुळे पुढचा लेख वाचला न साण्याची शक्यता वाढते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थत्तेंशी सहमत,
थत्तेंशी सहमत, अवांतरासकट.
लेख चांगला झाला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार पकडण्याची प्रक्रिया कशी चालते, त्यात जागतिक राजकारणाचे कसे पडसाद उमटतात याचा चांगला आढावा आहे.
मात्र लेखातला 'अबु जिंदलला पकडलं म्हणजे आपली काही विशेष कामगिरी नाही, अमेरिकेच्या कृपेने झालं इतकंच' हा स्वर काही पटला नाही. अतिरेक्यांना पकडण्यासाठी गुप्तहेरखातं, राजनैतिक संबंध, परस्परसहकार्याचे करार, युद्धसामर्थ्य... हे सगळे मार्ग चोखाळले गेले पाहिजेत. तसे ते गेले, आणि त्यातल्या एका मार्गाने यश आलं. तेव्हा 'येन केन प्रकारेण' तो पकडला गेला हे उत्तमच.
येन केन प्रकारेण' तो पकडला
येन केन प्रकारेण' तो पकडला गेला हे उत्तमच...खरय पण अमेरिकेच्या स्वार्थी भावनेची भीती वाटते..काम झाले कि अक्षरशा फेकून देतात...
...............................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी
द्विरुक्ती
अमेरिकेच्या स्वार्थी भावनेची भीती वाटते..काम झाले कि अक्षरशा फेकून देतात...
या द्विरुक्तीचे प्रयोजन कळाले नाही
अवांतर : अमितसांगली यांची स्वाक्षरी बाकी दिलखेचक आहे. माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी. वा! धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती वगैरे....
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
द्विरुक्तीचे (संभाव्य) प्रयोजन (एक अटकळ)
विनोदाच्या संदर्भात कोणीसे म्हटलेले आहे: Some people laugh thrice upon being told a joke: Once when you tell it to them, the second time when you explain it to them, and the third time when they understand it.
इथे कदाचित थोडासा तत्सदृश प्रकार अपेक्षित असावा. म्हणजे, काही लोक तरी हे विधान केल्याकेल्या (डोळे झाकून) 'सहमत', '+१', 'अगदी!' वगैरे म्हणणारच. त्याउपर, ते विधान त्यांना समजावे, अशी लेखकाची इच्छा असावी, म्हणून (समजावून सांगण्याकरिता) द्विरुक्तीचे प्रयोजन असावे. (म्हणजे, फिरून एकवार 'सहमत', '+१' वगैरे आले.) आता, त्रिवार (आणि खरोखरीच समजूनसवरून) 'सहमत' वगैरे होण्याकरिता त्यांना ते प्रत्यक्षात समजणे हे केवळ त्यांच्याच हातात आहे, सांगणार्याच्या नव्हे, नाही का? सांगणारा तरी किती करणार? त्यामुळे, त्रिरुक्तीच्या ऐवजी द्विरुक्तीवरच भागवणे भाग पडले असावे, असा आमचा नम्र कयास* आहे.
* तूर्तास असा आम्हास केवळ संशयच आहे, त्यामुळे त्यास आमचा 'सिद्धांत' वगैरे म्हणण्याचा मोह सध्या तरी आवरता घेतो.
मुत्सद्दी
आपल्या गुप्तचर खात्याला आणि परराष्ट्र खात्याला अगदीच लिंबुटिंबु समजू नका. 'वेडा (म्हणून घेऊन) खातो पेढा' या कॅटेगरीतले असू शकतील ते!
कार्यकारणभाव पटला नाही
आमचेही अनेक पॅरे रिपल्सिव असतात. परंतु तरीही (किंबहुना त्यामुळेच) ते नीट वाचले जातात, असा आमचा संशय आहे.
स्वसंरक्षण महत्त्वाचे
अजूनही आपण एका गोष्टीकडे अनेकदा काणाडोळा करतो आणि ते म्हणजे जवळ जवळ सगळे देश असंच करतात. शत्रुचा शत्रु तो आपला मित्र हा नियम सगळे वापरतातच. आणि जोपर्यंत आपण आपलं बळ वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला कोणाची ना कोणाची भीती आहेच.
त्यामुळे नवी समीकरणे होत रहातील, आपण जुने मित्र सांभाळून नवे बनवणे आवश्यक आहे. ह्यावेळी रशियाला आपली मैत्री अबाधित आहे ह्याची खात्री देऊन त्यांचं पाकिस्तानशी असंणारं नात फार वाढणार नाही ह्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. अजूनही रशिया महत्त्वाची भुमिका बजाऊ शकेल.
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चांगला लेख रशियाने
चांगला लेख
रशियाने पाकिस्तानबरोबर लष्करी व्यवहार करण्यात स्वारस्य दाखवले आहे हे वाचनात आले नव्हते. बातमीचा दुवा मिळू शकेल का?
जरी हे खरे असेल, रशिया अमेरिका-पाकिस्तानचे संबंध बिघडल्याचा फायदा घेत असावा. एकदा पाकिस्तान शत्रुत्त्व घेणार नाही हे नक्की असेल व भारत तर पुरातन मित्र आहे, अशावेळी रशियाला अफगाणिस्थानवर अधिक कंट्रोल ठेवणे सोपे जावे. शिवाय दुबळ्या पाकिस्तानला कधीही पुन्हा झिडकारता येणे सोपे आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दुवा
Times of india..27/6/2012
...............................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी
चांगला लेख
लेख आवडला. नितीन थत्ते व राजेश ह्यांच्याशी सहमत आहे.
पाकिस्तानशी रशिया आता संबंध वाढवत आहे, ह्याविषयी ऋषिकेशप्रमाणे माझ्याही कुठे वाचनात आलेले नाही. एखादा विश्वासार्ह दुवा मिळाला तर बरे होईल.
मात्र
ह्याबद्दल असहमत आहे. रशिया व चीन ह्यांमधे आपापसात देवाणघेवाण सुरू असतेच. नुकतेच 'शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन' च्या वार्षिक बैठकीच्या निमीत्ताने पुतिन चीनमधे येऊन गेले. ह्या दोन महाकाय (भौगोलिक, आर्थिक व राजकीय- सगळ्याच परिमाणांत) देशांच्या संबंधासाठी पाकिस्तानसारख्या किरकोळ देशाची जरूर नाही.
अमेरिकेच्या स्वार्थीपणाविषयी तुम्ही लिहीले आहे. वास्तविक जागतिक वावरात प्रत्येक देशाने स्वार्थी व स्वार्थीच रहावे. अमेरिकेने तसे राहिल्याविषयी राग कशाला? आपणही तसेच व्हावे की!
लिहीत रहा.
दुवा
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-06-25/india/32408254_1_russia-pak-russian-weapons-afghanistan-withdrawal
...............................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी
लष्करी संबंध नाही
सदर बातमीत रशिया पाकिस्तानबरोबर 'लष्करी' सहकार्य करणार असल्याचे म्हटलेले नाही. पाकिस्तान प्रमाणे अन्य दोन देशांसोबत एक चौरंगी मिटिंग आहे जी या आधीही २०११मधे झाली होती.
ताजिकिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत अश्या पाईपलाईनच्या निमित्ताने भारतही या तीन देशांशी व्यापारी संबंध वाढवत-ठेवत आहे. सध्या अफगाणिस्तानसारख्या मध्यवर्ती भुभागावर कंट्रोल ठेवणे अमेरिका, रशिया व चीन या तिघांसाठीही महत्त्वाचे ठरले आहे. त्यात ताजिकिस्तान या पाश्चात्यांसाठी हळुहळु दार किलकिले करू लागलेल्या देशासाठी अमेरिका सध्या अगदी मौम्य धोरण ठेवत आहे. वर म्हटलेल्या तापी (ताजिक-अफ-पाक-भारत पाईपलाईन) प्रोजेक्टकडे इराणला शहदेण्याच्या दृष्टीने अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. भारताना येनकेनप्रकारेण इराण नाही तर ताजिकिस्तान असे करून तेल मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. अश्यावेळी पाकिस्तानवर आम्रिकेची वक्रदृष्टी असताना रशिया ती जागा भरून काढण्यासाठी धडपडत आहे असे वाटते.
यात (कफल्लक) पाकिस्तानशी लष्करी संबंध वाढवून तुलनेने सुस्थितीतील भारतासारख्या जुन्या मैत्रीपूर्ण संअबंध असलेल्या देशाशी फारकत घेण्याचा त्यांचा इरादा असेल असे वाटत नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लेख आवडला थत्ते यांच्या मताशी
लेख आवडला
थत्ते यांच्या मताशी सहमत
रशिया आणि पाकिस्तान यांच्या लष्करी सहकार्याबद्दलच्या मुद्द्याबाबत असहमती
.