मुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय
गुढी पाडवा हा पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! याच दिवशी १९७५ साली काही द्रष्ट्या विचारवंतानी एकत्र येऊन अन्नधान्यांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई ग्राहकांवर बाजारपेठेत होणारे अन्याय यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणून ग्राहकांना संघटित करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ग्राहक कुटुंबांचे संघ बनवून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे रास्त दरात मासिक वाटप करणे हे उत्तम साधन होऊ शकेल असा विचार करून त्याची अंमलबजावणी दादरच्या वनिता समाजात श्रीफळाच्या वाटपाने त्यांनी या मुहूर्तावर केली. या मान्यवरांमध्ये सर्वश्री. बिंदुमाधव जोशी, संगीतकार सुधीर फडके (कार्यकर्त्यांचे बाबूजी), पत्रकार पां. वा. गाडगीळ, नगरसेवक मधु मंत्री अशा अनेकांचा समावेश होता. मुळात अशा अभिनव वितरण व्यवस्थेची कल्पना पुण्यात बिंदुमाधव जोशी यांनी सुमारे एक वर्षापूर्वी अंमलात आणलेली होती.
या वितरण व्यवस्थेत काही पथ्ये सुरवातीपासून आजतागायत पाळली जात आहेत. उदा. शक्यतो छोट्या उत्पादकांकडून व ते न जमल्यास घाउक बाजारातून मालाच्या दर्जाशी तडजोड न करता खरेदी; कोठेही दुकान न काढता, सदस्यांकडून आगाऊ घेतलेल्या मागणीइतकीच खरेदी करून मालाचे वेळापत्रकानुसार नियमित वितरण; नफा घ्यायचा नाही पण तोटाही होऊ द्यायचा नाही; स्वदेशनिष्ठा, स्वावलम्बन, श्रमप्रतिष्ठा, विश्वस्त भावना या ग्राहक चळवळीच्या तत्वांचे पालन इ. सुरवातीला दरमहा १० वस्तूंचे वितरण करणारी संस्था आज ९५ ते १०० वस्तूंचे आणि वर्षाकाठी ४५० ते ५०० विविध वस्तूंचे वितरण करते. मुंबई, पुणे, वसई -विरार, पालघर, ठाणे, रायगड व रत्नागिरीपर्यंतचे सुमारे ३६००० ग्राहक या वितरण व्यवस्थेचा लाभ घेत आहेत. एप्रिल २०१२ पासून पुण्यामध्ये वितरणाचे काम सुरु झाले ते पाषाणमधील 'पुणे प्रारंभ ' या संघापासून ! किमान ११ सभासदांचा एक संघ असे ६५ संघ कोणत्याही जाहिरातिशिवाय आज पुण्यात वितरणात सहभागी झाले आहेत आणि सदस्य संख्या १२०० पर्यंत पोहोचली आहे. हा सर्व व्याप सांभाळण्यात विशेषतः वितरणासाठी करावयाच्या खरेदीत महिला कार्यकर्त्या आघाडीवर आहेत!
वितरण हा संस्थेचा पाया असला तरी ग्राहकांना संघटित करण्याचे ते माध्यम असून ग्राहक, उत्पादक, व्यापारी या सर्वांचे हित साध्य करणारी सक्षम ग्राहक चळवळ बांधणे हे संस्थेचे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी ग्राहक शिक्षण, ग्राहक संरक्षण, संघटन, संशोधन इ. विभाग विविध उपक्रम करीत असतात. शाळा/महाविद्यालये, सामाजिक संस्था अशा ठिकाणी शिबिरे, व्याख्याने, पथनाट्ये, वृत्तपत्रातील स्तंभ व प्रासंगिक लेखन, आकाशवाणी, दूरदर्शन वरील कार्यक्रम, 'ग्राहक तितुका मेळवावा' हे संस्थेचे मुखपत्र इ. विविध माध्यमांचा उपयोग ग्राहक प्रबोधनासाठी कार्यकर्ते करतात. तसेच जागृत ग्राहकांना आपल्या तक्रारींचे निवारण करून घेण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी दहा मार्गदर्शक केंद्रे ठिकठिकाणी कार्यरत आहेत. बहुसंख्य ग्राहकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मोहिमाही केल्या जातात. रिक्षांसाठी इलेक्ट्रोनिक मीटर्स बंधनकारक होणे किंवा अगदी ताजे उदाहरण द्यावायचे तर प्रस्तावित डाळ दर नियंत्रण कायदा हे मुंबई ग्राहक पंचायतीच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे याचा उल्लेख येथे करावासा वाटतो. ग्राहक संरक्षण कायद्याचा अधिक लाभ ग्राहकांना मिळावा म्हणून केलेल्या विविध प्रयत्नात लोहिया मशिन्स या कंपनीविरुद्ध संस्थेने केलेल्या व देशांतील सुमारे चार लाख ग्राहकांना रु.४० कोटी नुकसान भरपाई मिळवून देणाऱ्या तक्रारीने इतिहास घडवला आहे. याखेरीज अनुचित व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीविरुद्ध कारवाई, सणासुदीपूर्वी ग्राहक पेठांचे आयोजन, ग्राहक हक्कांना युनोची मान्यता मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेले कार्य इ. यशस्वी उपक्रमांचा वानगीदाखल उल्लेख करावासा वाटतो.
गेल्या ४१ वर्षात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी पद्धतीने केलेल्या कार्याचा आढावा या अनुदिनीच्या शब्द मर्यादेत घेणे अशक्य आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष कै. गंगाधर गाडगीळ यांनी या कार्याचे वर्णन "मुंग्यांनी रचलेला मेरु पर्वत" या शब्दात केला यातच सर्व आले! संस्थेबद्दल अधिक जाणून घेण्याची किंवा ग्राहक हिताय ग्राहक सुखाय कार्यरत असलेल्या आमच्या संस्थेच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर आपले स्वागत आहे.
छाया वारंगे ( खरेदी समिती प्रमुख व कार्याध्यक्षा पुणे विभाग)
मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
प्रतिक्रिया
१. ग्राहक पंचायतीचे कार्य
१. ग्राहक पंचायतीचे कार्य उल्लेखनीय आहे.
२. ग्राहकांना वस्तू स्वस्त दरात मिळण्यात "नॉन प्रॉफिट"संस्था असण्याचा जसा वाटा आहे तसाच व्हॉल्युंटरी काम करणार्यांची सेवा मोफत मिळते (त्याची कॉस्ट ग्राहकांच्या प्राइसमध्ये अंतर्भूत होत नाही) याचाही बराच वाटा आहे.
३. ग्राहक पंचायतच्या काही आयडिऑलॉजिकल डॉग्मामुळे ग्राहकांना विशिष्टच वस्तू घ्याव्या लागतात आणि काही वस्तू घेण्याचा ऑप्शन मिळत नाही. अर्थात त्या वस्तू खुल्या बाजारात घेण्याचा पर्याय ग्राहकास उपलब्ध असतोच.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दणदणीत +१
दणदणीत +१
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दणदणीत +२
दणदणीत +२
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छाया ताई - ग्राहक पंचायतीच्या
छाया ताई - ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा मला स्वताला आणि नक्कीच इथल्या सर्वांना थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या फायदा नक्कीच झालेला आहे. माझ्याकडुन सर्वांना धन्यवाद.
काम झाले नाही
काही वर्षांपूर्वी, मला मोदी हुंदाई यांच्या गोरेगांव येथील सर्व्हिस सेंटरचा वाईट अनुभव आला होता. माझी कार सर्व्हिस करायला दिली असताना त्यांनी फ्युएल पंप नीट बसवला नाही, परिणामी रस्त्यांतच धो धो पेट्रोल गळू लागले. कंपनीने दाद न दिल्याने मी पार्ला पश्चिम येथील ग्राहक पंचायतीकडे तक्रार नोंदवली. त्यांनी कंपनीला एक खरमरीत पत्र लिहिले. पण आजतागायत, पुढे काही झालेच नाही. कंटाळून मी त्या एजन्सीत जाण्याचे बंद केले.