जोडीदार
----------
जोडीदार
---------
रूमवर लोळत पडलो होतो. बाकीची पोरं लॉकडाऊनला कंटाळून घरी गेलेली . उन्हाळ्याची दुपार . गरमीने नुसता जीव चाललेला . वर पंखा नावालाच फिरत होता . वारंच लागत नव्हतं .
एकटं पडल्यासारखं वाटत होतं .
पश्याचा फोन आला . लय जुना रूममेट . त्याचं नाव स्क्रीनवर बघून जीवाला बरं वाटलं .
आणि मग डोकं फिरलं !...
त्याने एक निरोप दिलेला. त्याचा एक मावसभाऊ याच शहरात राहायचा. त्याची आई गेलेली . मदतीला कोणी नाही अन अशावेळी कोणी येतही नाही . म्हणून मला जायला सांगितलं होतं .
आता आली का पंचाईत !
तसा मी स्मशानभूमीत बऱ्याचदा गेलेलो आहे . पण मुळात तिथे जायलाच नको वाटतं - ते काय कॉलेज कॅन्टीन असतं का तरुण पोरा-पोरींनी भरलेलं ? आणि आत्ता या परिस्थितीत तर नकोच वाटतं . त्यात कोरोनाची भीती !
नाईलाजाने उठलो . मनात म्हणालो - पश्याचा भाऊ म्हणजे आपली आवडती मैत्रीण आहे असं समजू .
खरं तर मी पश्याच्या भावाला कधी भेटलो नव्हतो की त्याचा नंबर माझ्याकडे नव्हता . पश्याने माझा नंबर त्याला दिला होता .
परत पश्याचा फोन आला , ' डायरेक्ट स्मशान भूमीतच पोच . ते अजून अर्ध्या-एक तासाने तिथे येतील . ‘
आता थेट तिथेच जायचं तर मग मी कशाला पाहिजे ? तिथे माझी काय मदत होणार ? ... पण म्हणलं जाऊ दे . सध्या लोक मयतालाही येत नाहीत . जवळचेसुद्धा लोक टाळतात , घाबरतात जिवाला . काय करणार ? जो गेला तो सुटतो बाकीचेच अडकतात .
मी निघालॊ . रस्ते सामसूम . माणसंच नाहीत . रस्त्यांवर स्मशानशांतता .
स्मशानभूमी लांबूनच लक्षात येत होती .साऱ्या परिसरात धूरच धूर ! साला ! किती बॉड्या जळत असतील ? ...
ते आत गेल्यावर कळलं .
त्या वर वेटाळत पसरणाऱ्या धुराकडे पाहून डोक्यात काहीबाही वाटायला लागलं . स्पर्धा परीक्षांमुळे डोक्यात इतिहास घोळत असतो . आपल्या देशात कधी काळी सोन्याचा धूर निघायचा अन आता ? ...
आत गेलो तर हे गर्दी ! एकदम माणसात आल्यासारखं वाटलं . माणसात ? ... की ?
नकोसा वाटणारा घाण आवाज करत , सतत येणाऱ्या अँब्युलन्स , त्यांचे फटाकफट दार उघडण्याचे , स्ट्रेचर खाली ठेवण्याचे आवाज .
कुठे नातेवाईकांचे आक्रोश तर कुठे सुकलेले अश्रू . नातेवाईक कमी असले तरी बॉड्याच एवढ्या की स्मशानभूमी भरून गेलेली . लसीकरणाला वेटिंग तसं इथं जाळून घ्यायलाही वेटिंग ! ... जे जिवंतपणी तेच मेल्यानंतरही ! ...
संध्याकाळ वाढत चाललेली . वर झाडांवर वटवाघळं . घराकडे परतणारी पाखरं . कावळ्यांची कावकाव . पण ती पाखरं स्थिर नव्हती . धुरामुळे त्यांना नको होत असावं . पण आपलं घरटं सोडून ती जाणार तरी कुठे ?
कोरोनामुळे माणसं घरात दडली होती . अन त्याच कोरोनामुळे ह्या पाखरांना घर सोडावं लागणार होतं .
मी एका जागी बसून कंटाळलो . हा पश्याचा भाऊ कुठं मेला होता कोणास ठाऊक ? आपल्या तोंडात हे असे शब्द बसलेले असतात , कुठे मेलाय ? - पण त्या जागेत माझे ते शब्द मलाच आवडले नाहीत .
पुढे गेलो . एक तरुण मुलगी . एकटीच . रडणारी .तिला विचारलं, तर म्हणाली ," आई गेलीये . वडील दवाखान्यात आहेत . मदतीला कोणीच येत नाही . पण इथली व्यवस्था स्वयंसेवक बघताहेत . "
मी सुन्न होऊन पुढे गेलो . भिंतीवर रंगवलेले तुकाराम महाराज अन त्यांचे अभंग दोन्ही काळवंडलेले होते . पण माणुसकी अजून पूर्ण काळवंडलेली नव्हती . बऱ्याच संस्था कामासाठी पुढे सरसावलेल्या .
कट्ट्याला टेकून एक आजोबा एकटेच बसलेले. पांढरी गांधी टोपी. पांढरंच धोतर . नजर शून्यात , कसंतरीच झालं म्हाताऱ्याकडे बघून . आज्याचीच आठवण झाली .
मी जवळ गेलो , म्हणालो , " बाबा " .
त्याने नजर वर उचलली .
" काही मदत पाहिजे का ? "
" नगं , काय नगं ".
" कोण गेलंय तुमचं ? "
" आमची मंडळी गेली दादा, " त्यांनी लांबवर बोट दाखवलं, " संस्थेचे लोक करत्यात सगळं ” . त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं ," शेवटच्या टायमालाबी कोणच नाय ! "
मी म्हणालो , " बाबा, रडू नका , तुम्ही तरी आहात ना ! "
" मला तर यायलाच लागणार . माझी मंडळी म्हंजे जन्माची जोडीदार . शेवटपर्यंत साथ द्यायलाच हवी ना . "
मला पुढे काय बोलावं ते सुचेना .
तेच पुढे म्हणाले , "आत्ता दोन आठवड्यांपूर्वी मी गेलो ,त्या टायमाला ती आली होती . आता ती गेली तर , मला तर यायलाच हवं ना ! " ...
=\=\=\=
प्रतिक्रिया
चांगली कथा, पण...
आधी शेवट ठरवून बाकीची कथा रचण्याचा प्रयत्न केलेला वाटतोय. तो अतिमानवी शेवट काही रुचला नाही. इन फॅक्ट अनावश्यक वाटला. करण बाकीच्या कथेतील ह्यूमन एलिमेण्ट तसे फार चांगले जुळून आलेय. आणि कथेच्या सुरुवातीचे जे धागे आहेत त्यांना मध्येच पूर्णतः अबॅण्डन केलेय असे वाटते. कथेला शेवटपर्यंत मानवीयच राहू द्यायची होती आणि कथेतील मूळ सूत्र नीट मार्गी लावायला हवं होतं असं वाटलं. बाकी लेखकाची मर्जी.
पर्स्पेक्टिव्ह
पर्स्पेक्टिव्ह
आभार अन सहमत ,
शेवट महत्त्वाचा होता .
पण लिहिताना आधीचा सारा भाग वास्तवदर्शी अन गंभीर झाला आहे . त्या सिरिअस नोट वरच कथा पुढे न्यायला पाहिजे होती , असं मलाही वाटले नंतर .
ऑन अ सीरियस नोट...
म्हातारा-म्हातारी जर एकमेकांच्या लग्नाला उपस्थित राहू शकत होती, तर एकमेकांच्या मर्तिकांना उपस्थित राहू शकायला नक्की काय अडचण आहे?
'न'बा
ऑन सेम सिरिअस नोट:
तुमचा मृत्यू-पश्चात जीवनावर विश्वास आहे काय? कारण तसे असेल असे वाटत नाही. आणि नसेल तर तुमचा प्रश्न निरर्थक ठरत नाही काय?
पण तसेही, त्यापेक्षा स्वर्गात स्वागत करण्याची जय्यत तयारी करणे जास्त उचित ठरेल.
नबा
नबा
यावर माझ्या मनात उमटलेली प्रतिक्रिया जर दिली तर तुमच्या मनात मर्तिकाची आग असते तशी आग पेटेल .
पण तसं बोलणं हे तुमचं काम आहे , माझं नाही
बाप रे !
मृत्युनंतर देखिल हे दिले-घेतले, परतफेड वगैरे प्रकरण चालूच राहते काय?
टेन्शन आलंय ...
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
आवडली... ट्विस्टसकट!
आवडली... ट्विस्टसकट!
कथेच्या आधीच्या मूडनी अजिबातच सऺशय येऊ दिला नाही. सो सट्कन बसला पऺच.
ऍबरप्ट शेवट फार चपखल बसला इथे !!!
मनीषा
मनीषा
आभार . पण टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही .
नील
नील
मनापासून आभारी आहे
इतक्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल