Skip to main content

टु लाईक ऑर नॉट टु लाईक?

माझं सोशल मीडियाशी लव्ह-हेट रिलेशनशिप आहे.

शी! ही किती भिकार सुरुवात आहे. पण मग काय म्हणावं? समाजमाध्यमं मला एकाच वेळी आकर्षितही करतात आणि त्यांचा मला वीटही येतो. इथे ‘simultaneously’साठी वापरण्यात येणारा फेसबुकीय लेखकांचा आवडता मराठी शब्द मला लिहायचा होता. पण तो मला कधीच आठवत नाही. माझ्या आयुष्यात काही व्यक्ती आहेत ज्या सोशल मीडियावर नाहीत. किंवा असूनही त्यांना तिथं जाऊन काही लिहावं-वाचावं वाटत नाही. अशा व्यक्तींना त्यांच्या दिनचर्येबद्दल प्रश्न विचारायला मला फार आवडतं. पण 'तू सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय करतेस?’ हा प्रश्न विचारला, की लोक माझ्या असण्यात थोडी वेडाची झाक आहे का असं निरखून बघायला लागतात.

मला सोशल मीडिया वापरायची सवय कशानं लागली याबद्दल मी लिहिणार नाही. कारण मग मला 'आमची पिढी', 'आंतरजालाची बाल्यावस्था', 'मिलेनियल' अशा संकल्पना वापराव्या लागतील आणि वाचकांना आलाच असेल, पण मलाही त्या सगळ्याचा भयानक कंटाळा आला आहे. माझी आत्ताची स्थिती अशी आहे, की मला हे हवंही आहे आणि नकोही. मी आजच्या काळातली एक स्वतंत्र स्त्री आहे. मला हवं असेल, तर मी ९ ते ५ असा सतत आठ तास सोशल मीडिया वापरू शकते. सकाळी दोनेक तास व्हात्साप्प ग्रुपांमध्ये गप्पा मारायच्या, मग दोन-तीन तास फेसबुकवर राजकीय, किंवा स्त्री-पुरुष विषयांवर भांडायचं. मग दुपारनंतर इंस्टाग्रामवर सारा अली खान, अनन्या पांडे; आणि माझी समवयस्क आहे, मला विशेष आवडते म्हणून करीना कपूर यांच्या व्यायामलीला बघून हळहळायचं. आणि रात्री आपण आज काहीच 'प्रॉडक्टिव्ह' केलं नाही याचं दुःख वाटून घेऊन झोपी जायचं. किंवा न वापरायची निवड केल्यावर, दिवसभर तो न वापरण्यासाठी मानसिक यातायात करायची!

आमच्या ओळखीत एक काका होते. त्यांना गुटखा खायचं व्यसन लागलं होतं. त्यांच्या आजूबाजूचे सगळे त्यांना खूप लेक्चरं द्यायचे. त्यांच्या बायकोला त्यांच्या गुटखा खाण्याचा विशेष त्रास व्हायचा कारण ती कॉलेजमध्ये शिकवायची (या दोन गोष्टींचा एकमेकींशी काय संबंध आहे हे मला अजूनही उमगलेलं नाही). काका मुळात अतिशय कुटुंबवत्सल आणि प्रेमळ होते. त्यांनाही लोक सांगायचे ते पटायचं आणि मुख्य म्हणजे ते कुणाहीकडून लेक्चर ऐकून घ्यायचे आणि त्यांना 'हो बरोबर आहे तुमचं’ असं अगदी मनापासून सांगायचे. मग त्यांनी असं ठरवलं, की आता गुटखा विकतच घ्यायचा नाही. दोन दिवस असे गेल्यावर त्यांना चहाच्या टपरीसमोरच्या पानाच्या टपरीवर गुटख्याच्या पाकिटांची ती चकचकीत पताका दिसली. मग त्यांनी मोहाला बळी पडून दहा पाकिटं घेतली. त्यातलं एक त्यांनी तिथेच खाल्लं. दोन दिवसांच्या विरहानंतर मिळालेल्या गुटख्यामुळे काकांची एकदम ब्रह्मानंदी टाळी लागली. पण उरलेली नऊ पाकिटं घरी कुठे ठेवायची असा त्यांनी विचार केला. त्यांनी एक शिडी घेतली आणि बाथरूमवरच्या माळ्यावर सिंटेक्सच्या टाकीशेजारी काठीनं सरकवून आतल्या बाजूला ती पाकिटं लोटली. शिडीवरून खाली उतरले. काठी जागच्या जागी ठेवली. माळ्यावरच्या धुळीमुळे शर्ट मळला होता तो झटकला.

दोन तासांनी त्यांनी पुन्हा शिडी माळ्याखाली लावली. काठी घेऊन वर चढले, काठीच्या आधारानं पाकिटं पुढे ओढून घेतली. त्यातलं एक घेतलं. बाकीची पाकिटं पुन्हा होती तशी पण यावेळी थोडी पुढच्या बाजूला लोटली. शिडीवरून खाली उतरले. काठी जागच्या जागी ठेवली. माळ्यावरच्या धुळीमुळे शर्ट मळला होता तो झटकला.

दोन तासांनी त्यांनी पुन्हा शिडी माळ्याखाली लावली. काठी घेऊन वर चढले, काठीच्या आधारानं पाकिटं पुढे ओढून घेतली; आणि यावेळी त्यांतली दोन घेतली. बाकीची पाकिटं पुन्हा होती तशी पण यावेळी हाताला लागतील अशी ठेवली. शिडीवरून खाली उतरले. काठी जागच्या जागी ठेवली. माळ्यावरच्या धुळीमुळे शर्ट मळला होता तो झटकला.

नंतर तीन तासांनी ते काठीशिवाय शिडीवर चढले. यावेळी शर्ट झटकावा लागला नाही कारण आता माळाच स्वच्छ झाला होता. यावेळी मात्र त्यांनी उरलीसुरली सगळीच पाकिटं खाली आणली. ही सगळी कथा त्यांनीच आम्हांला सांगितली. आणि म्हणाले, "उगाच गुटख्यापायी गुडघे खराब नकोत व्हायला!"

हा किस्सा आठवायचं कारण म्हणजे माझ्या फोनला एक फोकस मोड आहे. ते बटण दाबलं, की आपलं चित्त विचलित करणारी सगळी ॲपं बंद होतात. मी ते बटण दाबून ठरवायचे, की आता आपण दोन तास फोन बघायचा नाही. पण मध्येच पटकन काही नवीन घडलं आहे का अशी उत्सुकता वाटून ते बटण पुन्हा दाबून माझी ॲपं मुक्त केली जायची. असं सतत चार वेळा झालं, की 'काय छळ आहे साला!' म्हणून पुढचा पाऊण तास फेसबुकवर उंडारण्यात जायचा. मग मला त्या गुटखा-काकांसारखं वाटायचं.

तरीही, स्वतःला मोकाट सोडून देण्यापेक्षा हे बरं असं वाटून मी तो आत्मछळ चालू ठेवला होता. मध्येच माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न यायचे. उदाहरणार्थ : आपण आजवर दिवसातून काही वेळा आपसूक सोशल मीडिया बघायचो. तसं करणं आपल्या जीवनशैलीचा भाग होता. मग आता आपण तसं न करता, वाचलेल्या वेळात नेमके काय आणि कसे दिवे लावणार आहोत? यावर उत्तरं खूपच होती आणि ती एकदम उफाळून यायची. स्वतःचं आणि मुलाचं वाचन, त्याचा अभ्यास (फोन सोडून त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला लागल्यावर काहीच दिवसांत त्यानं मला त्या पदावरून राजीनामा द्यायला लावला), आपले शेजारी कोण आहेत? (हा प्रकल्पही फारसा उत्साहवर्धक नव्हता) मैत्रिणींना फोन करून गप्पा मारणे इत्यादी, इत्यादी. आंतरजाल आपल्यात आणि माणसांत येण्याआधी आपण जे जे करायचो ते सगळं.

पण मग का जायचं असं मागे? काय गरज आहे?

याला मात्र काही स्पष्ट उत्तर नव्हतं. पण याला वैयक्तिक म्हणता येईल असं कारण म्हणजे मला सतत जीवघेणा नॉस्टॅलजिया होत असतो. परवा आंतरजालावर कुठेतरी एका रोटरी फोनच्या फोटोखाली ’जेव्हा फोन वायरनं बांधलेले असायचे तेव्हा माणसं मुक्त होती’ असं दवणीय वाक्य लिहून कुणीतरी मीम केलं होतं. ते वाचून मी एखाद्या भाबड्या मध्यमवर्गीय काकूसारखी, "अगदी अगदी. खरं आहे!" अशी स्वतःशीच मान डोलावली. त्या एका क्षणात, मला स्वतःची लाज आणि काळजी दोन्ही वाटून गेल्या.

कुठल्याही सुपरमार्केटमध्ये 'नूडल्स आणि पास्ता' सेक्शनमध्ये हल्ली मॅगी सोडून अनेक ब्रँड आलेले दिसतात. ते बघून मला लगेच माझ्या बालपणीचा मुक्त बाजारपेठेआधीचा भारत आठवतो. भारतीय लायसन राज मान्य करून, नेस्ले इंडिया म्हणून स्थापन झालेली नेस्ले, आणि पार्लेची शीतपेयं (गोल्डस्पॉट, लिमका, थम्सअप, मँगोला), नूडल्समध्ये फक्त मॅगी आणि बिस्का, चपला-बुटांमध्ये बाटा, वाहनांमध्ये कायनेटिक - बजाज - लुना - अँबॅसिडर - फियाट - मारुती ८०० (मारुती असं नाव असलेली गाडी नव-श्रीमंतांची इतकी लाडकी होती यावर आता विश्वास बसत नाही!) असे सगळे एकदम मर्यादित पर्याय असायचे त्यामुळे मी आणि माझ्या आजूबाजूचे प्रौढ लोक जास्त आनंदी होतो असं माझं अगदीच ठाम मत आहे. तेव्हा दुपारी शाळेतून घरी आल्यावर कंटाळा आला - आणि मुख्य म्हणजे तेव्हा रोज निदान एकदातरी कंटाळा येत असे - आणि टीव्ही लावला तर त्यावर कूऽ असा आवाज आणि रंगीबेरंगी पट्ट्या असायच्या. मग नाईलाजानं बाहेर खेळायला जावं लागायचं किंवा मग पुस्तक वाचावं लागायचं. तेव्हा यायचा तसा कंटाळाही हल्ली येत नाही.

पण माझ्या स्मरणरंजनाला जगाच्या लेखी काय किंमत आहे? आणि असं स्मरणरंजन करून मला हवे ते दिवस पुन्हा माझ्या आयुष्यात येणार आहेत का? किंबहुना या सगळ्या लेखनालाच कुणाच्या लेखी का किंमत असावी? माझा सोशल मीडियाचा वापर कमी झाला तर त्याचा इतरांना काय फायदा? कारण एखाद्याचं विषारी ट्रोलिंग करावं इतकं उपद्रवमूल्यही माझ्याकडे नाही (हे सगळे प्रश्न rhetorical आहेत. कृपया त्यांची उत्तरं देऊ नयेत).

आपल्या समरणरंजनाला आपणही किंमत द्यायची नाही असं ठरवल्यावर माझ्या असं लक्षात आलं, की खरं तर हा सगळा ताण निवड-स्वातंत्र्याचा आहे. जर भारतात फेसबुक, व्हात्साप्प, इंस्टाग्रामवर बंदी असती आणि या गोष्टी वाममार्गानं वापराव्या लागत असत्या, तर त्या मी नक्कीच बेछूटपणे वापरल्या असत्या. त्यांतून येणाऱ्या लाइक्सचा माझ्या डोपामिन-रिसेप्टरांवर परिणाम होतो; कालांतरानं तितकंच डोपामिन तयार करायला मला जास्त वेळ फेसबुक वापरावं लागतं; आणि या सगळ्याचं रूपांतर उत्तरोत्तर आनंदात न होता खिन्नतेत होत जातं - हा असा सगळा विचार मी अजिबात केला नसता. पण आता माझ्याकडे वापर करण्याचा किंवा न करण्याचा - असे दोन्ही पर्याय असल्यामुळे - काय म्हणतात त्याला - मला 'डिझीनेस ऑफ फ्रीडम' झाला आहे (बिचारा किर्कगार्ड*! एक मराठी काकू स्मार्टफोनपासून लांब राहायचा प्रयत्न करण्यासाठी त्याचा असा वापर करेल याची त्यानं कल्पनाही केली नसेल). पण इन माय डिफेन्स, निवड करायचं स्वातंत्र्य असल्यानं येणाऱ्या व्याकुळतेचा सामना मी धोक्याच्या सोळाव्या वर्षापासून सतत करते आहे. ही अशी व्याकुळता वरचेवर जाणवते हा जिवंत अनुभव मी किर्कगार्डबद्दल वाचायच्या आधीच घेतला होता. पण अशी व्याकुळता इतरही अनुभवतात हे समजल्यानं, आपण एकटे नसल्याचा दिलासादायी भास निर्माण होतो.

इथवर आल्यावर साहजिकच पुढचा प्रश्न असा उद्भवला, की आपलं फोन वापरायचं स्वातंत्र्य कुणी काढून घेऊ शकेल का?

हा प्रश्न वरवर विनोदी वाटला, तरी असं करणारे काही लोक मला माहिती आहेत. माझ्या ओळखीतल्या काही लोकांनी त्यांचे फेसबुक पासवर्ड त्यांच्या मित्र-मैत्रिणींना तयार करायला लावले. तसे त्यांनी केल्यावर, ठरावीक महिन्यानंतर मित्र/मैत्रीण त्यांना तो पासवर्ड सांगेल असा तह त्यांनी केला. यातल्या काही लोकांनी असं केल्यामुळे, 'आपला पासवर्ड परस्पर बदलला जाऊन आपल्याच खात्यातून आपण तडीपार होऊ शकतो' या भावनेचा आधार वाटल्याची कबुली दिली. पण मग मी असं केलं, तर 'काहीच दिवसांत मी फेसबुकचा पासवर्ड रिसेट करणार नाही कशावरून?' असा प्रश्न मला पडला. आणि मुळात मला तीन महिने सलग किंवा एक वर्षं सलग अशा प्रकारे हे करायचं नव्हतं. मला फक्त माझ्या मनाला फोनचा वापर कमी करूनही आनंदी राहायची शिकवण द्यायची होती. किंवा सोशल मीडियाव्यतिरिक्त मला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा आनंद मला कुठल्याही व्यत्ययाविना घ्यायचा होता.आणि सततच्या वापरानं खरंतर आनंदी वाटत नाही हेही सिद्ध करून दाखवायचं होतं (आता इथे सिद्ध करणारी मी कोण आणि सिद्धता तपासणारी मी कोण? असा एक उपप्रश्न उगवू शकतो. पण तो तूर्तास बाजूला ठेवू).

अशा वेळी आईची खूप आठवण येते. म्हणजे माझी आई अजून धडधाकट आहे. पण समजा मी उद्या 'मला फोन वापरू देऊ नकोस' असं तिला सांगितलं, तर ती अर्थातच अत्यानंदानं ती जबाबदारी स्वीकारेल. लहानपणी मला शक्य तितक्या प्रलोभनांना बळी पडू दिल्यानं मी अशी निपजले असा तिचाही ठाम गैरसमज आहे. जरी निवड-स्वातंत्र्याचा ताण येत असला, तरी कुठल्या मॅटरमध्ये आईला एंट्री देऊ नये आणि कुठल्या मॅटरमध्ये द्यावी इतकी अक्कल मला नक्कीच आली आहे. पण अशी व्याकुळता जाणवू लागली, की आईची आठवण येते हेही तितकंच खरं आहे. इथे लगेच पुढचा प्रश्न असा पडला, की माझ्याबरोबर रोज एकाच घरात राहणाऱ्या नवऱ्याची आठवण का येत नाही? यावर मला सुचलेलं उत्तर असं, की कदाचित माझी जोडीदाराची निवड पुरेशी फ्रॉइडियन नसावी. आणि एखाद्या पुरुषाच्या हाती (तोही लग्नाचा नवरा!) माझं निर्णय स्वातंत्र्य सोपवण्यापेक्षा ते आईकडे सोपवलेलं मला अधिक सोयीचं वाटतं.

पण माणसानं मुक्त, स्वच्छंद, सतत वापर करावा म्हणून काही ॲपं झटत असतात, तशीच त्याला या स्वातंत्र्याचाही वीट येऊ शकतो हे हेरून, स्वेच्छेनं स्वातंत्र्यावर अंकुश बसवून देणारी ॲपंही बाजारात आहेत. फेसबुकसारख्या माध्यमांवर वापरकर्त्यांना विचार मांडायचं स्वातंत्र्य आहे असा भास निर्माण करून त्यांचा डेटा विकला जातो. इथे तर माझं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य माझ्याच परवानगीनं काढून घेऊन माझा डेटा विकला जाणार होता! तरीही मी ते फोनवर बसवलं. तंत्रज्ञानानं मला अगतिकतेच्या टोकावर आणून उभं केलं आहे आणि आता एकतर आपल्या मनाचा ताबा परत मिळवून मागे फिरायचं आहे किंवा या कड्यावरून स्वतःला निरर्थकतेच्या आणि कोलाहलाच्या खाईत लोटून द्यायचं आहे - असे दोन पर्याय माझ्या समोर असताना, मी मागे फिरण्याचा पर्याय निवडत होते (असं मला तेव्हा वाटत होतं).

त्या ॲपला परवानगी दिली, की ते आपल्या फोनचा पूर्ण ताबा घेतं. फक्त फोन करायची आणि तो वाजला, तर उचलायची मुभा असते. असं करत असताना त्यावर असलेलं पॉझ बटण आपण लपवू शकतो. मी अर्थातच तो पर्याय निवडते. मग सांगितलेल्या वेळेपर्यंत आपल्याला फोनवर काहीही उघडता येत नाही. उघडायला गेलं तर 'डोन्ट वेस्ट युअर टाइम ऑन एनिथिंग दॅट डझन्ट काँट्रीब्युट टू युअर ग्रोथ' असा संदेश फोनच्या स्क्रीनवर झळकतो. आपण जितक्या वेळा असं करून यशस्वी होऊ तितक्या वेळा आपल्याला शाबासकी मिळते. मार्कं मिळतात. आठवड्याच्या शेवटी आपण दर दिवशी किती वेळ फोनवर घालवला याचे तक्ते येतात. आलेख येतात. शाबासकीयुक्त संदेश येतात. चार आठवडे झाले, दोन महिने झाले - माझं त्या ॲपवरचं प्रगतीपुस्तक उत्तरोत्तर चमकू लागलं. एक दिवस तर मी सलग चोवीस तास फोन उघडला नाही. त्यातले फक्त चारच तास मी तो सक्तीनं बंद ठेवला होता. त्या दिवशी त्या ॲपनं मला एक मेडल दिलं!

मग मला छंदच जडला. कालपेक्षा आज, आजपेक्षा उद्या, उद्यापेक्षा परवा! आज, कालच्या तुलनेत वीस टक्के कमी - सोशल मीडिया कमी कमी वापरत जाण्याचा. मी फेसबुक, व्हात्साप्प, इन्स्टावर नसायचे तेव्हा मला एकदम 'शुद्ध' वाटायचं. सतत या तीन जागांपैकी कुठेनाकुठे घसरून पडायच्या सवयीवर आपण विजय मिळवला आहे. आणि या काटछाटीतून मला सोशल मीडियासाठी जो वेळ मिळायचा तो मी इतर लोक किती पोस्ट करतात आणि कुठे कुठे कमेंट करतात ते मोजण्यात घालवू लागले. आजवर, माझं शील इतर कुणापेक्षा अधिक शुद्ध/श्रेष्ठ आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. कारण तसं वाटून घेण्यासाठी करतात ते कुठलंच वर्तन मला जमलं नव्हतं. माझ्यावर तसे संस्कार करायची तसदीही कुणी घेतली नव्हती. ना मी भारतातली शाकाहारी, ना मी पाश्चातत्त्य व्हीगन, ना मी निर्व्यसनी, ना मी उच्चविद्याविभूषित, ना माझा एखाद्या पुरातन भाषेचा अभ्यास, ना मी धार्मिक, ना मी नीट परंपरावादी, ना मी धड आधुनिक, ना मी ट्रायअथलॉन/हाफ-फुल मॅरेथॉनपटू, ना माझा कशाचा दांडगा व्यासंग (त्यात मी मूळची इंजिनियर!), ना मी आदर्श माता आणि/किंवा गृहिणी; मी खरंतर कुणीच नव्हते.

पण सोशल मीडियापासून सुटका करून घेतल्यामुळे मला आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत असं वाटायला लागलं होतं. कदाचित मी इतर प्रवाहपतित लोकांना मार्ग दाखवू शकेन या हेतूनं मी मग एक लेख लिहायला घेतला. त्या लेखात सोशल मीडिया न वापरल्यानं माझ्या मनःस्थितीत कसा कसा फरक पडला याचं सविस्तर वर्णन मी करणार होते. पण तो लिहायला घेतल्यावर मला तसे काही सकारात्मक बदल आठवेनात कारण मी त्या आधीचे बरेच आठवडे फक्त जीव खाऊन त्या स्वातंत्र्य काढून घेणाऱ्या अंकुश-ॲपची शाबासकी मिळवण्यात गुंगून गेले होते. पण आपण हे ॲप वापरत होतो हे जगाला माहिती असायची काहीच गरज नाही, असा विचार करून मी माझ्या मनावर त्या ॲपची मायावी पकड नसती तर कशी कशी सुधारले असते त्याची कल्पना करून, ती सत्यघटना म्हणून लिहून काढली. लेख छानच झाला होता. तो मी फेसबुकवर टाकणारच होते इतक्यात 'माणसामाणसांत आंतरजाल नसताना ती काय करीत असत' या प्रयोगातून जोडल्या गेलेल्या एका मैत्रिणीचा फोन आला. तिनं मला माझ्याचसारख्या एका सोशल मीडियातून संन्यास घेतलेल्या माणसाचा किस्सा सांगितला. त्यानं नुसताच सोशल मीडिया सोडला नव्हता; तो पुष्करमध्ये एका विपश्यना केंद्रातही जाऊन राहिला होता. नंतर त्यानं राजस्थानात जाऊन एका मिरच्या कुटायच्या फॅक्टरीत मजुरीही केली होती. आणि मग सोशल मीडियावर परत येऊन एक मोठा लेख लिहिला होता. हे सगळं ऐकून मला अगदी प्रसन्न वाटू लागलं होतं तेवढ्यात मैत्रीण म्हणाली, "मला ती पोस्ट वाचून असं वाटलं, की केलास ना मेल्या डीटॉक्स? मग आता पुन्हा इथेच येऊन आम्हाला का पकवतो आहेस तुझ्या आत्मसंतुष्टीच्या निरर्थक कथा सांगून?”

फोन झाल्यावर मी चुपचाप माझा लेख कचऱ्यात सारला आणि अंकुश-ॲप अनइन्स्टॉल केलं.

-------

*या डेनिश तत्त्वज्ञाच्या नावाचा उच्चार 'किअकिगौ'च्या जवळ जाणारा आहे हे मला माहीत आहे. पण मी लोकांना pretentious, अतिशहाणी वाटू नये म्हणून मी तो तसा लिहिला आहे. मग पुढचा प्रश्न असा उद्भवतो की ही तळटीप तरी कशाला? ती, अतिशहाण्यांना मी मूर्ख आहे असं वाटू नये म्हणून.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 30/12/2022 - 21:10

मी प्रतिक्रिया दिली म्हणून तुला अधिक मार्क मिळाल्यासारखं वाटेल, का प्रतिक्रिया वाचण्यासाठी फोन उघडला म्हणून ॲप तुझे मार्क कमी करेल. मी काय करू म्हणजे तुझे मार्क जास्त कमी होतील?

नवीन वर्षं भकास जाण्यासाठी दुरेच्छा.

सई केसकर Sat, 31/12/2022 - 05:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण मार्कलाच विचारू!

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 31/12/2022 - 08:08

In reply to by सई केसकर

सोमिचा वापर कमी केल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरच्या तेजामुळे मार्क गडबडला तर?

अस्वल Fri, 30/12/2022 - 23:56

कुठलीही गोष्ट ॲप म्हणून एकदा वापरली की शतपटीने व्यासनिक बनते.
उदा. फेसबुक. जर का फेबु फोनवर असेल तर -
१. नोटिफिकेशनवर बोट ठेवलं की डायरेक्ट फेबुतलं पोस्ट दिसतं (काहीवेळा नोटिफिकेशनमधेच दिसतं- म्हणजे फक्त डोळे उघडले की खेळ खलास)
किंवा
२. नोटिफिकेशन बंद ठेवल्यास ॲपवर एक बोट टेकवलं की फेबु उघडतं.
किंवा
३. SSO (single sign on) बंद ठेवल्यास ॲपवर बोट ठेवून जर जुजबी माहिती ( बोटाचे ठसे, चेहेरा) वगैरे पुरवली तर फेबु पोस्टकडे जाता येतं.
किंवा
४. ॲपवर बोट टेकवून, लॉगिन-पासवर्ड टाकून मग पोस्टकडे जाता येतं.

आता ॲप असेल तर शक्यतो कुणीही पर्याय ३-४ वापरत नाही कारण ते फारच तर्कविसंगत आहे.

ह्याउलट जर ॲप नसेल आणि वेबसाईट उघडायला लागली तर -
१. लॅपटॉप/डेस्कटॉपकडे जाणे
२. तो उघडणे
३. त्यावर ब्राउसर उघडणे
४. मग काही बटणं दाबणे (किंवा एखादं क्लिक तरी करणे)
५. तुम्ही फेबुला परवानगी दिली असेल तर चित्रावर क्लिक करून लॉगिन करणे
६. परवानगी दिली नसेल तर पुन्हा तिथे लॉगिन/पासवर्ड टाकणे

एवढं करावं लागतं. ह्यातल्या बारीक सारीक हालचाली नोंदण्यामागचं कारण म्हणजे फोनच्या ॲपवर ह्यातलं काहीही करावं लागत नाही.

काही महिने फेबु ॲप वापरल्यावर हे जाणवलं की "निव्वळ आहे म्हणून चाळा असल्यागत वापरलं जातं"
लहानपणी उगाच खाउचं कपाट उघडून बघायचो, किंवा फ्रीज उघडून बघायचो त्यातलाच प्रकार.

वेबसाईटवर फेबु वापरलं की आपोआपच फेबु वापरायची इच्छा कमी होते. त्यात जर पुन्हा आपण थोडी संगणकीय साक्षरता दाखवली तर काही गोष्टी कठीण/अशक्य करता येतात त्यामुळे सोशल मिडिआ वापरायला आणखी वेळ लागतो.

अर्थात संग्राम टाकरमोडे ह्यांनी म्हटलंच आहे - "मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक". पण तो ब्रेक लावण्याची क्षमता बहुतेक ०.००००१% लोकांमधेच असते.

पुंबा Sat, 31/12/2022 - 01:11

In reply to by अस्वल

मी सोशल नेटवर्किंगचे ॲप्स न वापरता मोबाईलमध्येच ब्राऊझरमध्ये उघडत असतो. लॉजिक तेच की कमी वापर व्हावा पण असे होत नाही. काही काळाने आपोआपच हात मोबाईलकडे जातो आणि फेबु, ट्विटर उघडले जाते. नव्या वर्षात काही बरे, लोकांना सांगण्याजोगे लिहायचे असेल तरच फेबु, ट्विटर उघडायचे असा काही संकल्प करावासा वाटतो.
पण बप्पी लहिरीने म्हणून ठेवलेच आहे ना 'मन चंगा तो कठौटी मे गंगा' त्यामुळे असा संकल्प न करता असंच निवांत राहणेच श्रेयस्कर.

अस्वल Sat, 31/12/2022 - 04:04

In reply to by पुंबा

संकल्प ऑर नो संकल्प : पण कळीचा मुद्दा असा आहे की आपण सो.मि. व्यसनाधीन झालोय - हे कसंही करून कळलं पाहिजे.
एकदा का आपण व्यसनी झालोय हे समजलं की मग त्यातनं बाहेर पडायचा कुठला उपाय आपल्याला लागू पडतो ते चुकतमाकत शोधता येतं.

त्या बाबतीत ट्रॅकर ॲप थोडी उपयोगी पडतात - की रोज १ तास सो.मि वापरणारा माणूस अचानक ४-५ तास सो.मि. वर पडीक राहू लागला हे कुणीतरी सांगायला पाहिजे
पण हे सांगायला यंत्राऐवजी माणूस असेल तर उत्तम.

सई केसकर Sat, 31/12/2022 - 05:37

In reply to by अस्वल

मला ॲप फोनवरून न काढता किंवा deactivate न करता ते वापरायची सवय बंद करायची होती. लेख थोडा अतिरंजित आहे. पण मला २ महिन्यांत हे करायला जमू लागलं. फक्त मी व्हॉट्सॲपवर group chats archive केले. सुरुवातीला सगळे group chats आणि फेसबुकवरचे काही ग्रूप सोडून दिले. पण नंतर पुन्हा जॉईन केले आणि आर्काइव्ह केले. आता नोटीफिकेशन बंद ठेवले आहेत.

आता निदान कामाच्या वेळेत आणि रात्री वाचन करताना सोशल मीडिया फार वापरला जात नाही. अर्थात, हे सुरुवातीचे दिवस आहेत. त्यामुळे you never know. पण मी असा विचार केला की कामाच्या ८ तासांत जर वापर कमी राहिला तर बाकीच्या दिवसात फार काही उरतच नाही.

Rajesh188 Sat, 31/12/2022 - 10:04

लेखातील प्रत्येक भावनेशी सहमत.

कल्पना शक्ती वापरून लेख लिहला नाही तर अनुभव वर लिहला आहे.
त्या मुळे सत्याच्या एकदम जवळ जाणारा आहे.
सोशल मीडिया वावरताना सुरवातीला उस्ताह वाटतो आणि नंतर त्याचा कंटाळा येतो.
नैराश्य येते.
हे सत्य च आहे.
ज्या विषयाशी आपला काहीच काडी चा संबंध नाही आणि कधी येणार पण नाही.
त्याचे टेंशन माणूस घेवू लागतो.
त्या मधील फौल पना लक्षात आला की निराशा येते.
दुर्गम खेड्यात राहणार व्यक्ती रशिया,युक्रेन युद्ध चे टेंशन घेत असतो .
पुतीन बरोबर की चूक ह्या वर वाद घालत असतो.
निष्फळ कृती ह्यालाच म्हणतात.

Rajesh188 Sat, 31/12/2022 - 10:04

लेखातील प्रत्येक भावनेशी सहमत.

कल्पना शक्ती वापरून लेख लिहला नाही तर अनुभव वर लिहला आहे.
त्या मुळे सत्याच्या एकदम जवळ जाणारा आहे.
सोशल मीडिया वर वावरताना सुरवातीला उस्ताह वाटतो आणि नंतर त्याचा कंटाळा येतो.
नैराश्य येते.
हे सत्य च आहे.
ज्या विषयाशी आपला काहीच काडी चा संबंध नाही आणि कधी येणार पण नाही.
त्याचे टेंशन माणूस घेवू लागतो.
त्या मधील फौल पना लक्षात आला की निराशा येते.
दुर्गम खेड्यात राहणार व्यक्ती रशिया,युक्रेन युद्ध चे टेंशन घेत असतो .
पुतीन बरोबर की चूक ह्या वर वाद घालत असतो.
निष्फळ कृती ह्यालाच म्हणतात.

shantadurga Sat, 31/12/2022 - 11:28

एकंदरीत लेखाचा गोषवारा आणि प्रतिक्रिया वाचून इथेही मिनिएचर फेबु तयार झाल्या सारखं वाटलं :-)

अबापट Sat, 31/12/2022 - 17:39

ते सगळं ठिके
पण आधी हत्तीचं खरडफळा व्यसन कुणीतरी थांबवा .
सार्वकालिक ज्वलंत धगधगता प्रश्न आहे तो.

'न'वी बाजू Sat, 31/12/2022 - 18:32

In reply to by अबापट

नको.

हत्तीचे खरडफळ्याचे व्यसन जर थांबवले, तर हत्ती मरेलबिरेल. पापबीप लागेल उगाच. नकोच ते!

तसेही, खरडफळ्याबाहेर हत्तीशी कोणाला देणेघेणेही नाही, आणि खरडफळ्याबाहेर हत्ती (फारसा) कडमडतही नाही.

उद्या हत्तीचे खरडफळ्याचे व्यसन जर थांबवले, आणि परिणामी हत्ती खरडफळ्याबाहेर जर धुडगूस घालू लागला, तर पंचाईत येईल ना!

हत्ती खरडफळ्याच्या कोंदणातच बरा. तेथेच शोभतो.

राजन बापट Sun, 01/01/2023 - 06:31

लेख गंमतीशीर आहे; प्रामाणिक आहे; अंतर्मुख करणाराही आहे. अधिक लोकांनी प्रतिसाद दिला तर त्याचं स्वरूप अधिकाधिक अर्थपूर्ण होत जाईल.

सोशलमिडियापुरत्या मी मनातल्या मनात काही मान्य केलेल्या गोष्टी. किंवा क्लिशेज. पुढे मांडलेले मुद्दे obvious आहेत हे मान्य. पण मला माझ्यापुरता नेमका संदर्भ आधी नीट लावावासा वाटला.

- मोकळा वेळ, जगण्याच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेची सार्वकालिक हमी, कामावरून जाण्यायेण्याकरताचा घाईगर्दी नसलेला किंवा अतिशय लहान कम्युट, घरूनच काम करण्याची मुभा, फास्ट इंटरनेट, ४-जी, ५-जी मोबाईल डेटा ॲक्सेस या गोष्टी असल्यानंतरच अपल्याला "आपली सोशल मिडियावजा व्यसने आपण कशी सोडवावीत" असे प्रश्न पडणार आहेत. यातल्या काही गोष्टी मला आता शक्य आहेत.

- सोशल मिडिया का हवासा वाटतो? असंख्य कारणं आहेत. मला ज्यांचा बोध झाला आहे ती द्यावी वाटतात.

- सोशल मिडिया वापरणं ही अतिसोपी गोष्ट आहे. ती जगातली सर्वात पॅसिव्ह ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही आयुष्यभर व्हॉट्सॅप वाचत बसू शकतां. अर्थात तितका कंटेंट देणारे अंकल-आंटी आजूबाजूला हवेत. नाहीतर मग तुम्हाला फेसबुक फीड किंवा ट्वीट्स वाचायला लागणार. इन्स्टा रील्स पहावे लागणार. हेन्स सोशलमिडिया.

- समजा "आपण सोशल मिडियावर निव्वळ वाचत नाही; काहीतरी काँट्रिब्युट सुद्धा करतो" असं आर्ग्युमेंट केलं तर - सोशल मिडिया ही बऱ्यापैकी नेव्हल-गेझिंग प्रक्रिया असू शकते. "ईटिंग कांदेपोहे; फीलिंग ब्लेस्ड" अशा पोस्टी आपण वाचतो. मुख्य म्हणजे त्यावरच्या लाईक्स नि कमेंट्स आपण मोजण्यात दिवस घालवू शकतो. फेसबुकावर असंख्य मीम्स येतात त्यातलं (खूप वर्षांपूर्वी) मी पाहिलेलं मीम - ज्यावर मी खूप हसलो होतो. एक कुठला तरी वन्यपशू - बहुदा सिंह होता - तो आपल्या स्वत:ची टेस्टिकल्स चाटत बसला आहे. त्याखाली कॅप्शन आहे "This is you liking your own post". हेन्स सोशलमिडिया.

- FOMO. म्हणजे आपण सोशल मिडियावर नसताना तिथे गंगावतरण, किंवा मूनलँडिंग किंवा तत्सम काहीतरी घडलं नि ते पहायला आपण नसलो तर? म्हणून जायलाच पाहिजे. तर तसं तर घडत कधीच नसतं. तरी आपण जातो. तरी या FOMOची वर्गवारी काहीतरी ऑनरेबल आहे. दुसरा FOMO म्हणजे माझे मित्रमैत्रिणी अमुक काहीतरी करतात नि मला त्यात सामील केलं नाही किंवा ते चाललेलं असताना मी तिथे गेलो नाही तर? हे म्हणजे भातुकलीच्या खेळात मी नसलो तर आयुष्य व्यर्थ आहे असं वाटणं इत्यादिवगैरे. हेन्स सोशलमिडिया.

- दुसरी शक्यता : A severe decline in Attention Span : आपण जाडजूड पुस्तकं वाचणं बंद केलं आहे. (किंबहुना आपण वाचनच बंद केलं आहे!) तीन तासांचे सिनेमे दीड दोन तासांवर आले. (ही यादी तशी मोठी आणि सुप्रसिद्ध आहे. मी सँपल दिलं.) तर सोशल मिडियावर सर्व गोष्टींची मायक्रो मिनि व्हर्जन्स वाचता येतात. नि त्याहून आकर्षक म्हणजे इतर लोकांची processed मतं सहज वाचता येतात आणि आपलीही - फारसा विचार न करता मांडलेली - मतं खपून जातात. हेन्स सोशलमिडिया.

- आणखी एक शक्यता : तुमच्या रोजच्या जीवनातल्या व्यक्ती - यात तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक येतात - त्यांचा सहवास तुम्हाला कंटाळवाणा वाटतो पण न भेटलेल्या किंवा भेटण्याची शक्यता नसलेल्या व्यक्ती - त्यांच्या लिखाणाद्वारे - अधिक इंटरेस्टिंग किंवा हव्याशा वाटणे. हे पूर्णांशाने खरं नाहीच. पण असं *काहीसं* वाटू शकतं. हेन्स सोशलमिडिया. (फॉर एक्झांपल मला असं नवी बाजूबद्दल वाटतं. खोटं कशाला बोला. मजेशीर आहेत ते. आणि आम्ही कधी भेटू असं वाटत नाही. )

-------------

आता थोडं व्यसन सोडण्याबद्दल :

माझ्यापुरतं उत्तर सोपं आहे. इतर लोकांना ते सोपं वाटणार नाही किंवा निरुपयोगी वाटेल. पण आपल्यापुरतं लिहितो.

पूर्वीपेक्षा छंदांकरता अधिक वेळ देणे. किमान थोडा वेळ व्यायामाला देणे. पूर्वीपेक्षा घरातली कामं अधिक करणे. पूर्वीपेक्षा ओपन स्पेसेस मधे अधिक वावरणे. (अतिथंडीमधे हे नको वाटतं. पण तरी, ट्रेडमिलच्या जोडीने आठवड्यातले एखाद दोन दिवस बाहेरच फिरणे.) पूर्वीपेक्षा वाचन अधिक करणे. पूर्वीपेक्षा थोडं तरी लिखाण करण्याचा प्रयत्न करणे. पूर्वीपेक्षा अधिक लाईफ स्किल्स शिकण्याचा प्रयत्न करणे. (म्हणजे याचा अर्थ शून्यापासून सुरवात करणे असाही अर्थ असू शकतो!)

---

एक सजेशन : प्रस्तुत लेखामधे थोडी चित्रं द्यावीत.

'न'वी बाजू Sun, 01/01/2023 - 10:59

In reply to by राजन बापट

(फॉर एक्झांपल मला असं नवी बाजूबद्दल वाटतं. खोटं कशाला बोला. मजेशीर आहेत ते.

हे तुमचे मत झाले. ते तुम्हाला मुबारक. (अर्थात, आक्षेप घेणारा मी कोण? To each his own, There is no accounting for taste, झालेच तर, It takes all sorts to make a world, वगैरे वगैरे. त्याला काय करणार?)

सांगायचा मतलब एवढाच, की याविषयी दुमत असू शकते. (लोकांचे सोडा; कदाचित माझेसुद्धा.)

आणि आम्ही कधी भेटू असं वाटत नाही. )

खरे आहे. No such fear.

(अर्थात, जगातली प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे, असे थोडेच आहे? किंबहुना, काही गोष्टी न झालेल्याच बऱ्या असतात.)

असो चालायचेच.

अस्वल Wed, 04/01/2023 - 01:13

In reply to by राजन बापट

प्रतिसाद आवडला आहे :)
----------------------------

व्यायाम + मोकळ्या वातावरणात फिरणे + ॲक्टिव काहीतरी करणं; म्हणजे माहितीचे धबधबे अंगावर कोसळण्याच्या उलट.
ह्या सगळ्यामुळे सो.मि.पासून यशस्वीरित्या बराच काळ दूर रहाण्याची शक्यता वाढते.
किंवा आपलेच काका/मामा/आत्या/मावशा/डावेउजवेभक्त इ. इ. ह्यांचे फे.बु/व्हाट्सापी स्टेटस सतत वाचणे - हा उपायही सो.मिचा तिटकारा आणायला फार जालीम आहे.

'न'वी बाजू Sun, 01/01/2023 - 10:21

(डिस्क्लेमर: हा वरकरणी प्रस्तुत धागा हायजॅक करण्याचा निरागस प्रयत्न वाटू शकेल. परंतु, त्याबद्दल प्रत्यवाय नाही. कारण, तसा तो आहेच. याविषयी काही संदेह जर असलाच, तर तो केवळ प्रस्तुत प्रयत्न निरागस असण्याच्याच संदर्भात आहे; अन्यथा नाही.)

याला मात्र काही स्पष्ट उत्तर नव्हतं. पण याला वैयक्तिक म्हणता येईल असं कारण म्हणजे मला सतत जीवघेणा नॉस्टॅलजिया होत असतो. परवा आंतरजालावर कुठेतरी एका रोटरी फोनच्या फोटोखाली ’जेव्हा फोन वायरनं बांधलेले असायचे तेव्हा माणसं मुक्त होती’ असं दवणीय वाक्य लिहून कुणीतरी मीम केलं होतं. ते वाचून मी एखाद्या भाबड्या मध्यमवर्गीय काकूसारखी, "अगदी अगदी. खरं आहे!" अशी स्वतःशीच मान डोलावली. त्या एका क्षणात, मला स्वतःची लाज आणि काळजी दोन्ही वाटून गेल्या.

आमच्या बालपणी (नि तारुण्यातसुद्धा) हिंदुस्थानात शहरी भागांत रोटरी डायलवाल्या फोनचाच सुळसुळाट होता. (पुशबटनवाले फोन – विशेषतः नंतरनंतर – अगदीच नसत असे नाही, परंतु अगदी क्वचित. ग्रामीण भागांतून तर बहुतकरून बिनडायलवाले-हँडलवालेच फोन असत, असे आठवते.) आणि, बिना-डायल, रोटरीडायल, पुशबटन , कोठल्याही प्रकारचे फोन हे अंतिमतः वायरीनेच बांधलेले असायचे. (कॉर्डलेस – तोसुद्धा तो बाबा आदमच्या जमान्यातला ४९MHzवाला धिप्पाड हँडसेटवाला – हा प्रकार म्हणजे मुद्दाम आयात करावा लागणारा नि खूपच थोड्या लोकांच्या घरी सापडणारा होता. आणि, तसेही, त्याचा बेसही अंतिमतः वायरीनेच बांधलेला म्हटल्यावर “मुक्तता” अत्यल्प परिघापुरतीच मर्यादित होती. बाकी, मोबाइल फोन हा प्रकार अमेरिकेतच जिथे (१) बाल्यावस्थेत, नि (२) अत्यल्पप्रचारात होता, तिथे हिंदुस्थानाची काय कथा!

मात्र, माणसे त्या काळात मुक्त होती ही धडधडीत थाप आहे. ही थाप पसरविणाऱ्यास उलटे टांगून त्याचे साक्षात दवण्यांकडून (पार घशापर्यंत जीभ घालून, वगैरे) मुखचुंबन घेवविले पाहिजे.

कुठल्याही सुपरमार्केटमध्ये 'नूडल्स आणि पास्ता' सेक्शनमध्ये हल्ली मॅगी सोडून अनेक ब्रँड आलेले दिसतात. ते बघून मला लगेच माझ्या बालपणीचा मुक्त बाजारपेठेआधीचा भारत आठवतो. भारतीय लायसन राज मान्य करून, नेस्ले इंडिया म्हणून स्थापन झालेली नेस्ले, आणि पार्लेची शीतपेयं (गोल्डस्पॉट, लिमका, थम्सअप, मँगोला)

आमच्या बालपणी कोकाकोला नि फँटासुद्धा होते. गोल्डस्पॉट-लिम्का-मँगोलासोबत एकसमयावच्छेदेकरून गुण्यागोविंदाने नांदायचे. मग जॉर्ज फर्नांडिसाने कोकाकोलास (आणि आयबीएमला) हिंदुस्थानातून हाकलले. त्यानंतर मग बाजल-कोला, डबल सेव्हन, कँपा कोला, झालेच तर थम्सअप वगैरे अनेक बांडगुळे उगवली नि मावळली. पैकी बहुधा फक्त कँपा कोला तथा थम्सअप हेच तेवढे दीर्घकाळपर्यंत (म्हणजे ‘लेहर-’पेप्सीच्या आगमनापर्यंत नि कोकाकोलाच्या पुनःप्रतिष्ठापनेपर्यंत) टिकले. (थम्सअप तर पुढे कोकाकोलानेच ताब्यात घेतले.)

नूडल्समध्ये फक्त मॅगी आणि बिस्का

बिस्का हे नाव ऐकलेले नाही. आमच्या वेळेस नसावे बहुधा. आणि मॅगीचे म्हणाल, तर मॅगीमध्ये आम्हीच पायोनियर होतो. आम्ही कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना नुकतेच बाजारात येऊ घातले होते. आमच्या कँपसवरचे पहिलेवहिले ग्राहक बहुधा आम्हीच असू. (पुढे आमच्या तिसऱ्या वर्षापर्यंत, मेसमधून स्टुडंट कन्सेशन रेटने अर्ध्या किमतीत आख्खी खोकीच्या खोकी उचलण्याचा ट्रेंडही बराच वाढला होता. या खोक्यांतल्या मॅग्या अर्थातच individually wrapped नसत, परंतु, की फ़र्क पैंदा? क्वचित्प्रसंगी यातली काही खोकी ही नंतर खुल्या बाजारात विकलीही जात, अशीही एक किंवदन्ता आहे. (दिल्लीवाले काय वाटेल ते करतील!) परंतु, ते असो. सांगण्याचा मतलब, बाजारात आल्याआल्या उत्साहाने सर्वप्रथम मॅगी विकत घेणारे बहुधा आम्हीच.)

मॅगीच्या सर्वात पहिल्या फ्लेवरांमध्ये ‘लसान्या’ नावाचा एक फ्लेवर होता, याची तुम्हाला कल्पना आहे काय? (Lasagna नव्हे. Lasanya. ‘अनन्या’सारखा. किंबहुना, इतालियन Lasagnaचा नि या प्रकाराचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, तर, चक्क लसणीचा स्वाद नि लालभडक रंग होता. फ्लेवर तसा बरा – नव्हे, चांगला – होता. पुढे का बंद पडला, कोण जाणे.

चपला-बुटांमध्ये बाटा

करोना नि (पुणे-परिसरात) स्वस्तिक ही नावे ऐकली नाहीत वाटते? (स्वस्तिक तशी – निकृष्ट दर्जामुळे – बरीच अगोदर – बहुधा तुमच्या जन्माच्या आधी – बंद पडली, म्हणा; परंतु, करोना तर अगदी परवापरवापर्यंत होतीसे वाटते. (चूभूद्याघ्या.)

वाहनांमध्ये कायनेटिक - बजाज - लुना - अँबॅसिडर - फियाट - मारुती ८००

लँब्रेटा, झालेच तर व्हेस्पा, प्रिया, ही नावे ऐकली नाहीत वाटते कधी? (मोटारींमध्ये स्टँडर्ड नावाचाही एक अनुल्लेखनीय प्रकार होता, परंतु ते एक असो.) आणि लूना जरी आयकॉनिक झाली, तरी लूनासारखेच टीव्हीएस-५० वगैरेही क्लोन होते.

आणि फटफटी ही जॉन्र तुमच्या ऑर्बिटबाहेरची दिसतेय. (आमच्याही होती, म्हणा, त्यामुळे, चालू द्या.)

(मारुती असं नाव असलेली गाडी नव-श्रीमंतांची इतकी लाडकी होती यावर आता विश्वास बसत नाही!)

तसे मोटार असणे हेच मुळात श्रीमंतीचे लक्षण समजले जात होते, म्हणा; परंतु, मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

बाकी, तुम्ही जी म्हणताय, ती मारुती गाडी प्रत्यक्षात बाजारात आल्यानंतरची कहाणी आहे. त्याच्या कित्येक वर्षे आधी, मारुती कंपनी जेव्हा संकल्पनावस्थेत होती, तेव्हाची परिस्थिती ठाऊक आहे काय? गुंतवणूकदारांना चुना लावणारी नि प्रत्यक्षात काहीही न करणारी (देशातील उच्चतम पातळीवरील धेंडांशी संबंधित असलेली) फ्रॉड कंपनी म्हणून बदनाम होती ती. (पुढे मग पुलाखालून – नि यमुनेतून – बरेच पाणी वाहून गेले.) तुमच्याकरिता हा कदाचित पुरातन इतिहास असेलही, कदाचित नसेलही; आमच्या बालपणी तो करंट टॉपिक्समध्ये मोडत असे.

तेव्हा दुपारी शाळेतून घरी आल्यावर कंटाळा आला - आणि मुख्य म्हणजे तेव्हा रोज निदान एकदातरी कंटाळा येत असे - आणि टीव्ही लावला तर त्यावर कूऽ असा आवाज आणि रंगीबेरंगी पट्ट्या असायच्या.

आमच्या बालपणी हे एवढे सोपे नव्हते. आमच्या बिल्डिंगीतल्या तीन आणि समोरच्या वाड्यातल्या एक इतक्या बिऱ्हाडांत मिळून एक टीव्ही होता. (टेलिफोनही – तोच, वायरीने बांधलेला! – एकच होता, परंतु तो वेगळा विषय आहे.) त्यामुळे, शाळेतून घरी आल्यावर कंटाळा आलेला असायचाच, परंतु तरीही, थेट टीव्ही लावण्याची सोय नसे. शेजाऱ्यांकडे जाऊन निर्लज्जपणे ठाण मांडावे लागे. शेजारी अनेकदा घुसू देत, परंतु, त्यांना जेव्हा सोयिस्कर नसेल, तेव्हा, पुणे-३०मधील कोकणस्थच जितक्या निर्विकारपणे थेट शब्दांत कोणाला घालवू शकतात, तितक्या निर्विकारपणे नि थेट शब्दांत आम्हाला घरी जायला सांगत असत. अर्थात, आम्हीसुद्धा (कोकणस्थ नसलो, तरीही) गेंड्याला कातडी उधारीवर देऊ करणारे पक्क्या गुरूचे चेले असल्याकारणाने, दूरदर्शन(मुंबई बँड १ चॅनेल ४ तथा पुणे बँड ३ चॅनेल ५)च्या सायंकालीन प्रसारणाच्या सुरुवातीपासून ते रात्री जेवणाच्या वेळेपर्यंत, तथा रविवारी सकाळी ‘मॅजिक लँप’पासून ते ‘साप्ताहिकी’पर्यंत, आमचा दररोजचा मुक्काम शेजाऱ्यांच्या टीव्हीसमोरच असे.

त्या काळात प्रसारणाच्या सुरुवातीस (‘दूरदर्शन’चा तो चंद्रसूर्यांनी ग्रासलेल्या पृथ्वीचा लोगो नि त्याखालचे ते ‘सत्यं शिवं सुंदरम्’वाले बोधवाक्य दिसण्यापूर्वी नि त्यासोबतची सिग्नेचर ट्यून वाजण्यापूर्वी) जे कूऽ वाजत असे, त्यासोबत (१) पट्ट्या नसत (काहीतरी वर्तुळाकृती पॅटर्न असे), नि (२) त्या (नसलेल्या) पट्ट्या रंगीत नसत, उलट तो (असलेला) वर्तुळाकृती पॅटर्न नि सभोवतालचा आख्खा स्क्रीन ब्लॅक-अँड-व्हाइट असे.

(त्या काळातले काही आंबटशौकीन वीर त्या काळ्यापांढऱ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी काच चिकटवून खोटाखोटा ‘रंगीत टीव्ही’ पाहण्याची हौस भागवून घेत असत. परंतु, ते सोडून देऊ.)

किंबहुना, आमच्या अगदी लहानपणी, पुण्यामुंबईच्या दूरचित्रवाणी प्रसारणाच्या सुरुवातीच्या काही वर्षांच्या काळात, तो सूर्यचंद्रांनी पृथ्वीला ग्रासलेला ‘सत्यं शिवं सुंदरम्’वाला लोगोसुद्धा नसे. तेव्हा दूरदर्शन हे ‘दूरदर्शन’ नसून आकाशवाणीचाच एक विभाग होता. स्क्रीनच्या मध्यभागी आकाशवाणीचा लोगो, ‘आकाशवाणी दूरदर्शन’ असे लीजंड, आणि आकाशवाणीचे ‘बहुजनहिताय बहुजनसुखाय’ हे बोधवाक्य त्या जागी असे. परंतु ते एक असो.

त्याच काळात, पावसाळ्याच्या दिवसांत पुण्याच्या दूरचित्रवाणी प्रेक्षकांना आणखी एक गंमत पाहावयास मिळत असे. वातावरणातील काही घडामोडींमुळे, पुण्याच्या (सिंहगडावरील) सहक्षेपण केंद्रात मुंबई दूरदर्शन अधिक पीटीव्ही कराची अशा दोन केंद्रांच्या सिग्नलची सरमिसळ होऊन, पुण्याच्या प्रेक्षकांना मुंबईचा कार्यक्रम आणि मध्येच एकदम त्यावर सुपरइंपोज़ झालेले कराचीच्या कार्यक्रमाचे अंधुक चित्र, असे काहीतरी चमत्कारिक दिसू लागत असे. अशा वेळेस सिंहगडावरील केंद्र मुंबईचे सहक्षेपण बंद करून, एफटीआयआयच्या आर्काइव्ह्ज़मध्ये पडीक असलेली जुन्या कार्टून्सची वगैरे रेकॉर्डिंगे वाजवीत असे. बहुतांश वेळा ही रेकॉर्डिंगे मुंबई दूरदर्शनवरील चालू रटाळ कार्यक्रमाच्या तुलनेत सरस असल्याकारणाने त्याबद्दल फारशी कोणालाच तक्रार नसे.

पण माझ्या स्मरणरंजनाला जगाच्या लेखी काय किंमत आहे?

आता, माझ्या या वरील स्मरणरंजनाला नक्की कोणाच्या लेखी नक्की काय किंमत आहे? पण त्यामुळे मी स्मरणरंजन करायचा थांबतो का? का थांबावे? आणि, नक्की कोणी अडविले आहे मला स्मरणरंजन करण्यापासून? आणि, समजा अडविले, तरीही, त्याला मी कितपत भाव देतो किंवा द्यावा? नि काय म्हणून?

खरं तर हा सगळा ताण निवड-स्वातंत्र्याचा आहे. जर भारतात फेसबुक, व्हात्साप्प, इंस्टाग्रामवर बंदी असती आणि या गोष्टी वाममार्गानं वापराव्या लागत असत्या, तर त्या मी नक्कीच बेछूटपणे वापरल्या असत्या. त्यांतून येणाऱ्या लाइक्सचा माझ्या डोपामिन-रिसेप्टरांवर परिणाम होतो; कालांतरानं तितकंच डोपामिन तयार करायला मला जास्त वेळ फेसबुक वापरावं लागतं; आणि या सगळ्याचं रूपांतर उत्तरोत्तर आनंदात न होता खिन्नतेत होत जातं - हा असा सगळा विचार मी अजिबात केला नसता.

इतना टेन्शन नहीं लेने का। आणि, इतका विचारसुद्धा नाही करायचा. सोमी नव्हते, तेव्हा नव्हतोच वापरत. आता आहे, म्हटल्यावर, वाटले, तर वापरावे, नाहीतर वापरू नये. मामला खतम. यात विचार करण्यासारखे काय आहे?

बाकी, माझ्यापुरतेच म्हणाल, तर ही ‘ऐसी’सारखी संस्थळे सोडली, तर मी सोमीवर मी जवळपास नाहीच. एक तर व्यक्तिगत आयुष्यात मी प्रचंड माणूसघाणाच नव्हे, तर बॉर्डरलाइन मनुष्यद्वेष्टा असल्याकारणाने, नि त्यातसुद्धा संभाषणाची विशेष आवड नसल्याकारणाने (Monologues are a different story. Especially when I am inflicting my views upon the world at large.) सोमीची मला गरज भासत नाही. फेसबुक हा ‘आज सकाळी मला पातळ शी झाली’ हे शुभवर्तमान (‘स्टेटस’) अर्ध्या जगाला क्षणार्धात कळविण्याचा – आणि, उलटटपाली, अर्ध्या जगाने त्यास निमिषार्धात (‘लाइक’द्वारे) मान्यता देण्याचा – सर्वात कार्यक्षम मार्ग आहे, हे माझे फेसबुकबद्दलचे जुनेच मत जगजाहीर आहे. एक तर मला माझ्या आयुष्याशी निगडित इतक्या खाजगी स्वरूपाच्या अशा कोठल्याही गोष्टीची जगासमोर जाहीर वाच्यता करण्याची हौस नाही. (घाई तर नाहीच नाही.) आणि, कोठल्याही खाजगी बाबतीत उभ्या जगाच्या (खाजगी अथवा जाहीर) मान्यतेची मला गरजही नाही. मग मी मुळात फेसबुकच्या वाटेला जाऊच कशाला? सबब, आजतागायत माझे फेसबुकावर खाते नाही. भविष्यात उघडणे संभवतही नाही. (बायकोचे आहे. ते तिलाच लखलाभ होवो. अर्थात तीसुद्धा तेथे फारशी अॅक्टिव नसतेच म्हणा. तिच्या समवयस्क नातेवाइकांच्या सर्कलशी जुजबी संपर्कात राहण्यापुरता बहुतांशी पॅसिव वापर, इतकेच. मी त्यात लक्ष घालत नाही.) व्हॉट्सअॅप हे बहुतांशी केवळ सासूसासऱ्यांना भारतातून बोलताना फोनकॉलऐवजी सोयिस्कर पडते, म्हणून. अन्यथा, तिथली काँटॅक्टलिस्ट फारशी मोठी नाही. त्यातसुद्धा केवळ रटाळ फॉर्वर्डे(च) पाठवणारा एखादा महाभाग क्वचित्प्रसंगी सापडतो, परंतु त्याकडे दुर्लक्ष करता येते. उत्तर न देता मेसेज डिलीट केला, की काम भागते. राहता राहिली गोष्ट ट्विटरची. Inflicting one’s views upon the worldकरिता हे एक उत्तम साधन आहे, असे वरकरणी वाटू शकते. परंतु, त्याकरिता पूर्वी ब्लॉग लिहिण्याचे प्रयत्न करून झाले; लवकरच त्याचाही कंटाळा आला. आता वय झाले. मुद्दाम ट्विटरवर खाते खोलण्याइतके स्वारस्य उरलेले नाही. सध्या ‘ऐसी’वर आहे, तेवढी स्व-करमणूक पुरेशी आहे.

तर असे आहे एकंदरीत सगळे.

बाकी,

माझ्याबरोबर रोज एकाच घरात राहणाऱ्या नवऱ्याची आठवण का येत नाही?

रोज डोळ्यांसमोर असल्यावर आठवण कशाला येईल? आठवण येण्याकरिता अगोदर विस्मरणात जाणे आवश्यक नसते काय? तशी संधीच नसल्यावर… असो.

——————————

ही ट्रीटमेंट मला एकदा (दवण्यांकडून नव्हे, तर) आमच्या शेजाऱ्याच्या बॅक्यार्डात राहणाऱ्या (आता दिवंगत) चतुष्पादाकडून (आणि, उलटे टांगलेल्या अवस्थेत नव्हे, तर कुंपणावरून झुकलेल्या अवस्थेत) मिळाली होती. मोठा अवर्णनीय अनुभव असतो तो! (कुत्रा गोड होता; मात्र, त्याची लाळ खारट होती. असो चालायचेच.)

आमच्या अटलांटाच्या कोक-जागतिक-मुख्यालयात, कोक म्युझियम नावाची एक दहा डॉलर (पूर्वीचा दर; याऐवजी सध्या जे काही वाढीव प्रवेशमूल्य असेल ते; बऱ्याच वर्षांत पिसाळलेल्या कुत्र्याचे चावणे झालेले नाही तथा तेथे जाणे झालेले नाही.) भरून पाहण्याची कोकची जाहिरात आहे. (अटलांटात पाहण्याच्या लायकीची ठिकाणे तशीही फारशी नसल्याकारणाने, बाहेरगावाहून वा बाहेरदेशातून टपकणाऱ्या पाहुण्यांना पूर्वी क्वचित्प्रसंगी नाइलाजाने आम्ही तेथे घेऊन जात असू. हल्ली बाहेरचे पाहुणे फारसे टपकत नाहीत. तर ते एक असो.) तर त्या कोक म्युझियममध्ये एके ठिकाणी, कोकाकोला कंपनी जगभरात ठिकठिकाणी जी जी म्हणून काही चित्रविचित्र नि भयंकर पेये विकते, त्या सर्वांची फ्री सँपले वाटेल तेवढी नि पोटाला तडस लागेपर्यंत पिण्याची सोय आहे. ती सर्व पोटात गेल्यानंतर अर्थातच प्रचंड ढवळाढवळ होऊन उलथापालथ होण्यापर्यंत वेळ येते. तर सांगण्याचा मतलब, त्या सर्व अद्भुत रसायनांत आजकाल थम्सअपचासुद्धा समावेश असतो.

अच्युत गोडबोल्याच्या आयचा घो!

उघड्यानागड्या झीनत अमानचा याच नावाचा चित्रपट पुढे बऱ्याच वर्षांनंतर आला.

सई केसकर Sun, 01/01/2023 - 22:39

In reply to by 'न'वी बाजू

>>फटफटी ही जॉन्र तुमच्या ऑर्बिटबाहेरची दिसतेय.
राहून गेलं! पण तेव्हा बुलेटसदृश फटफटी असायची तिला येझदी असं नाव होतं का? पण तिला बटण स्टार्ट नव्हता. त्यामुळे तेव्हा तरुण असलेले सगळे आजोबा आताच्या बुलेटला तुच्छ लेखतात.

'न'वी बाजू Tue, 03/01/2023 - 08:10

In reply to by सई केसकर

फटफटी ही जॉन्र माझ्याही ऑर्बिटबाहेरची असल्याकारणाने, अधिक तपशिलांत खात्रीनिशी बोलू इच्छीत नाही. मात्र, माझ्या कल्पनेप्रमाणे, त्या काळात बुलेट आणि येझदी हे दोन्ही प्रकार होते.

बुलेट ही माझ्या कल्पनेप्रमाणे रॉयल एन्फील्डची देशी आवृत्ती होती (बहुधा अजूनही असावी), तर येझदी ही जावाची पूर्वाश्रमीची देशी आवृत्ती.

सखोल माहिती जाणकार (असल्यास) देतीलच. (कॉलिंग @अबापट?)

——————————

(अतिअवांतर: एचएमटीची घड्याळे आठवतात?)

सई केसकर Tue, 03/01/2023 - 09:51

In reply to by 'न'वी बाजू

>>>फटफटी ही जॉन्र माझ्याही ऑर्बिटबाहेरची असल्याकारणाने, अधिक तपशिलांत खात्रीनिशी बोलू इच्छीत नाही. मात्र, माझ्या कल्पनेप्रमाणे, त्या काळात बुलेट आणि येझदी हे दोन्ही प्रकार होते.

हो. आणि (बहुतेक) ऐंशीच्या दशकाच्या शेवटाकडे बुलेट आणि येझदीसारख्या गजगामिन्यांची पॉप्युलॅरीटी कमी होऊन यामाहा RX १०० सारख्या स्लीक फटफट्यांची वाढली. मिथ्थुनदांचे सिनेमे + पुरुषांची मलेट (mullet) केशरचना + यामाहा असं समीकरण झाल्याचं आठवतं आहे.

>>अतिअवांतर: एचएमटीची घड्याळे आठवतात?

हो! एखादं घड्याळ किती कुरूप असू शकतं याचं परिमाण एचएमटीची घड्याळं होती. आता कुणी ॲनालॉग घड्याळंही घालत नाही. आता हृदयाचे ठोके, पावलं, कॅलरी, हताश उसासे वगैरे मोजून देणारी घड्याळं असतात. त्यात वेळ दिसते की नाही माहित नाही. पुण्यात एखाद्या लग्नाला गेलं की ४० - ५५ वयाच्या पैठण्या नेसलेल्या सगळ्या काकवा शिंदेशाही तोड्यांच्या जोडीनं ती स्मार्टवॉच घालून फिरत असतात.
एचएमटीच्या जाहिरातीत वापरलेलं गाणंही आठवतंय. त्यात शेवटी "एचएमटी" असा त्या घड्याळांइतकाच दणकट कोरस होता.
असो आता मला जाहिरातींचा नॉस्टॅलजिया व्हायच्या आत मी इथून पळून जाते.

Rajesh188 Tue, 03/01/2023 - 13:51

In reply to by सई केसकर

आणि ती योग्य वेळ सर्व जाती जमाती ची घड्याळ योग्य च दाखवतात.
तिथे जाती भेद नको.
नाडी, heart rate, किती पावले चाललो .
हे फक्त नखरे आहेत.
दम लागत नाही तो पर्यंत चालणे साधे , सिंपल आहे.
Heart rates, का,कसे,कशा मुळे वाढतील ह्याची कारण अनंत आहेत.
सामान्य लोकांनी तो विचार करू नये.
आधुनिक घड्याळ जे हे सर्व मोजतात.
त्यांचे फक्त निगेटिव्ह परिणाम च असतात.
किंमत 7 हजार रुपये

Rajesh188 Tue, 03/01/2023 - 13:51

In reply to by सई केसकर

आणि ती योग्य वेळ सर्व जाती जमाती ची घड्याळ योग्य च दाखवतात.
तिथे जाती भेद नको.
नाडी, heart rate, किती पावले चाललो .
हे फक्त नखरे आहेत.
दम लागत नाही तो पर्यंत चालणे साधे , सिंपल आहे.
Heart rates, का,कसे,कशा मुळे वाढतील ह्याची कारण अनंत आहेत.
सामान्य लोकांनी तो विचार करू नये.
आधुनिक घड्याळ जे हे सर्व मोजतात.
त्यांचे फक्त निगेटिव्ह परिणाम च असतात.
किंमत 7 हजार रुपये

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/01/2023 - 00:10

In reply to by सई केसकर

मला माझं घड्याळच हल्ली "ताई, जमिनीवर या", असं सांगतं. जेव्हा ही घड्याळं जुनाट ठरतील तेव्हाच मी हताश, स्मरणरंजनी उसासे टाकणार आहे.

अबापट Wed, 04/01/2023 - 15:56

In reply to by 'न'वी बाजू

येझदी ही जावाची पश्चिमावृत्ती होती. बोले तो पूर्वीची जावा , नंतरची येझदी
https://en.wikipedia.org/wiki/Ideal_Jawa#:~:text=Ideal%20Jawa%20(India)….
अवांतर : आता बुलेटची अनेक मॉडेल्स बाजारात आहेत. बाडी बनवणारे व बाडी दाखवणारे अनेक जण ती मिरवितात . एवढेच नव्हे तर आता बटन स्टार्ट असल्याने अनेक काडी पैलवान लोकही विविध बुलेट उडवत असतात.

सई केसकर Mon, 02/01/2023 - 07:55

In reply to by 'न'वी बाजू

तुम्हाला compliment देण्याआधी, तुमच्या प्रतिसादात माझ्या भावना दुखवून घेण्यासारखं काही आहे का ते दोन वेळा वाचून तपासलं. तसं काही सापडलं नाही.

तुमचा प्रतिसाद फारच आवडला!

आता, माझ्या या वरील स्मरणरंजनाला नक्की कोणाच्या लेखी नक्की काय किंमत आहे? पण त्यामुळे मी स्मरणरंजन करायचा थांबतो का? का थांबावे? आणि, नक्की कोणी अडविले आहे मला स्मरणरंजन करण्यापासून? आणि, समजा अडविले, तरीही, त्याला मी कितपत भाव देतो किंवा द्यावा? नि काय म्हणून?

हे खरं असलं तरी स्मरणरंजन करणारे लेखन इतरांसाठी कंटाळवाणे होऊ शकते. अर्थात, त्याचा विचारही लेखकाने करू नये हे म्हणणेही योग्यच आहे. पण सोशल मीडियामुळेच नॉस्टॅल्जिक लेखन स्वस्त झाले आहे. दुसरी बाब अशी की काहीवेळा अशा प्रकारच्या नॉस्टॅल्जियामध्ये पूर्वीचंच सगळं किती छान होतं असा सूर येतो. त्याचा वाचणाऱ्यांना कंटाळा येतो. तेही ठीकच आहे.

तरीही, माणसाला (इतर प्राण्यांना करता येतं की नाही माहिती नाही) स्मरणरंजन करता येतं किंवा अजून न घडलेल्या किंवा कधीच न घडू शकणाऱ्या गोष्टींचा विचार करता येतो ही मला एक अद्भुत गोष्ट वाटते.पण आपण तिच्या आहारी जाऊन लेखन करू नये असंही वाटतं .आणि अशा प्रकारे द्विधा न होणाऱ्या लोकांचा हेवा वाटतो.

त्यातही, एखाद्या बदलेल्या जागेबद्दल किंवा आता आयुष्यात नसलेल्या माणसाबद्दलच्या नॉस्टॅल्जियापेक्षा (निदान मलातरी) बदलत गेलेल्या वस्तूंचा आणि पद्धतींचा (उदाहरणार्थ: फॅशन, संगीत ऐकायची तंत्रं) नॉस्टॅल्जिया अधिक प्रिय आहे. It is an escape which makes one feel good without thinking about break-ups and dead relatives.

जयदीप चिपलकट्टी Sun, 01/01/2023 - 11:29

राबा आणि सके यांना मित्रत्वाचा सल्ला: पन्नास वर्षं थांबा. क्षितिजावर नवं काही आलं की ते थिल्लर आहे अशी अोरड सुरू होते. कादंबऱ्या वाचणं हे छचोर पोरींचे वेळ फुकट घालवण्याचे धंदे आहेत असा समज अठराव्या शतकात सार्वत्रिक होता. (पोक्त मंडळी घरी येणार अशी चिन्हं दिसताच दोन मुली कादंबऱ्यांचा ढिगारा लपवून टेबलावर सर्मन्स मांडून ठेवतात असा प्रसंग ‘The Rivals’ मध्ये आहे.) रेडिओ आल्यावर तशीच अोरड झाली, मग टेलिव्हिजन आल्यावर तेच. आजकालचे तरुण फेसबुक पाहायचं सोडून व्हर्चुअल सेक्समध्ये वेळ दवडतात अशा आशयाचा लेख सकेंच्या नातीकडून लिहिला जाईल. त्याचं डीटॉक्स कसं करायचं याच्या सल्ल्यासकट. डोळे लवकर मिटोत रे देवा.

Rajesh188 Sun, 01/01/2023 - 19:38

In reply to by जयदीप चिपलकट्टी

पण virtual sex, आभासी दुनियेत राहणे, यांत्रिकरण ह्या मुळे रोजगार वर संकट.,कमी वयात व्यसन,

कुटुंबीय व्यवस्था च्या चिंध्या उडाल्या आहेत.
मानसिक आधार नाही,खरे मित्र नाहीत, रोजगार ची खात्री नाही.
जीविताची पण खात्री नाही.
पण आभासी जगात स्वतः राजे आहात,सेक्स पण आभासी.

. पुढे काळ कठीण आहे..
आत्महत्या चे प्रमाण आज च खूप वाढले आहे.
विनाकारण गोळीबार करून द्वेष व्यक्त करण्याचे प्रमाण वाढले आहे

पहिले तंत्र ज्ञान बदल आणि आजचा बदल ह्याची तुलना कधीच होवू शकत नाही.
उगाच कोणी पण अशी तुलना करू नये

राजन बापट Sun, 01/01/2023 - 19:45

In reply to by Rajesh188

>>>विनाकारण गोळीबार करून द्वेष व्यक्त करण्याचे प्रमाण वाढले आहे

विनाकारण हवेत गोळीबार करण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.

Rajesh188 Sun, 01/01/2023 - 19:49

In reply to by राजन बापट

अमेरिका आणि बाकी देशात शाळेतील कोवळ्या मुलांवर गोळीबार होवून त्यांचे जीव घेतल्याच्या घटना आहे.
हट्ट सोडून कधी सत्य स्वीकारत जा.
जगात अशा अनेक घटना घडल्या आहेत.
काहीच दुश्मनी नसतात,अगदी ओळख पण नसताना त्यांचे जीव फक्त .
आभासी दुनियेत राहून अस्थिर मनोवृत्ती झालेल्या विकृत लोकांनी घेतले आहेत.

Rajesh188 Sun, 01/01/2023 - 19:49

In reply to by राजन बापट

अमेरिका आणि बाकी देशात शाळेतील कोवळ्या मुलांवर गोळीबार होवून त्यांचे जीव घेतल्याच्या घटना घडल्या आहेत
हट्ट सोडून कधी सत्य स्वीकारत जा.
जगात अशा अनेक घटना घडल्या आहेत.
काहीच दुश्मनी नसतात,अगदी ओळख पण नसताना त्यांचे जीव फक्त .
आभासी दुनियेत राहून अस्थिर मनोवृत्ती झालेल्या विकृत लोकांनी घेतले आहेत.

समाज मध्यान ही फक्त विकृत समाज निर्मिती करण्यात हातभार लावत आहेत.
आभासी जगात च लोकांनी राहावे हाच हेतू समाज माध्यमांचा आहे
म्हणून तर ती फुकट आहेत.
चतुर लोक मात्र त्या मध्ये स्वतः ल कधीच अडकून घेत नाहीत ..आणि तेच सत्ताधारी,जगाचे नियंत्रक असतात.

'न'वी बाजू Sun, 01/01/2023 - 20:02

In reply to by Rajesh188

चतुर लोक मात्र त्या मध्ये स्वतः ल कधीच अडकून घेत नाहीत ..आणि तेच सत्ताधारी,जगाचे नियंत्रक असतात.

मी स्वतःला समाजमाध्यमांमध्ये अडकवून घेतलेले नाही.

मात्र, मी सत्ताधारी (कशावरही वा कोणावरही) आणि/किंवा जगाचा (वा अन्य कशाचाही) नियंत्रक नाही.

(काश!…)

'न'वी बाजू Sun, 01/01/2023 - 20:07

In reply to by जयदीप चिपलकट्टी

सकेंना नातच होईल, हे आपण नक्की कशाच्या आधारावर म्हणता?

आपण clairvoyant आहात काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/01/2023 - 01:24

In reply to by जयदीप चिपलकट्टी

आताही डोळे मिटायची सोय आहे तुम्हाला. डोळे मिटायची म्हणजे न वाचायची! उगाच भलत्या शंका घेऊ नयेत. एवीतेवी डोळे उघडे ठेवूनही तुम्ही फेसबुक सकेंच्या नातीच्या अंमळ सज्ञान होण्यापर्यंत टिकेल असं म्हणत आहात!

Rajesh188 Sun, 01/01/2023 - 20:13

स्त्री हक्कावर समाज माध्यमावर भांडते पण खऱ्या आयुष्यात काय प्रयत्न करतो..
..आपला रिअल लाईफ मध्ये रिअल सहभाग काय?

काहीच नाही.

आभासी जगातून खऱ्या जगात जेव्हा येतो तेव्हा सर्व उलट असते.
त्या मुळे निराशा येते.

थोडक्यात लेखिका हेच म्हणत आहे

Rajesh188 Sun, 01/01/2023 - 20:13

स्त्री हक्कावर समाज माध्यमावर भांडते पण खऱ्या आयुष्यात काय प्रयत्न करतो..
..आपला रिअल लाईफ मध्ये रिअल सहभाग काय?

काहीच नाही.

आभासी जगातून खऱ्या जगात जेव्हा येतो तेव्हा सर्व उलट असते.
त्या मुळे निराशा येते.

थोडक्यात लेखिका हेच म्हणत आहे

तिरशिंगराव Fri, 06/01/2023 - 14:50

जेंव्हा आम्ही वयपरत्वे, ' हे आपण केलंच पाहिजे ' या मनोभूमिकेतून बाहेर आलो तेंव्हाच आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं. रिटायर झाल्यावर रॅट रेस मधून एकदा बाहेर पडलं, की सोशल मिडियातलीच काय, प्रत्यक्ष जीवनातल्या लोकांचे वागण्याचे निरीक्षण करणे, हीसुद्धा एक उत्तम करमणुक वाटू लागते.
चमचमीत खाण्याचे प्रकार, वाचन,गायन, सिनेमे, चॅनेल्स, फेबु, वत्साप या सर्वांचाच मर्यादित आस्वाद घेत राहिलं तर म्हातारपण सुद्धा खूप आनंदात जाऊ शकतं, याचा आता शोध लागलेला आहे. जगांत, एक आयुष्य सुद्धा न पुरणाऱ्या अनुभवायच्या अनेक गोष्टी आहेत. पण म्हणून सर्वच गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत, हा अट्टाहास सोडला की जीवन निरामय होतं. नवीन गोष्टीतही आनंद वाटू लागतो आणि जुन्या आठवणींचे कढ यायचं बंद होतं.

मनीषा Sat, 07/01/2023 - 14:50

लेख जरा विस्कळीत वाटला पण समजला..

सोशल मिडीया एक व्यसनच झाले आहे खरे आहे..
पण काळानूसार किंवा व्यक्तीनूसार व्यसने बदलतात. कशाचेतरी व्यसन असणे हे सर्वकालीक सत्य आहे.
कशाला? किती? केव्हा?आणि का? महत्व द्यायचे हे समजले की अशा समस्या उद्भवणार नाहीत.

'न'वी बाजू Sat, 07/01/2023 - 19:27

In reply to by मनीषा

सोशल मिडीया एक व्यसनच झाले आहे खरे आहे..

<Rajesh188>
एखाद्या गोष्टीस व्यसन केव्हा म्हणतात?

माणसे रोज दिवसातून कित्येकदा चहा पितात. काही मनुष्ये रोज दिवसातून कितीतरी वेळा सिगरेटीसुद्धा फुंकतात.

आता, सिगरेट फुंकणे हे आरोग्यास अपायकारक आहे, त्याने फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो, इतरही तऱ्हेतऱ्हेचे रोग होऊ शकतात, हे सर्व खरेच आहे. मात्र, केवळ त्यामुळे सिगरेट हे व्यसन ठरत नाही. (घातक सवय ठरेलही कदाचित, परंतु व्यसन नव्हे. निदान, या कारणाकरिता तरी नव्हे.)

किंवा, आजकाल कोणाकडेही कधीही गेले, तरी चहा हा होतोच. (कोकणस्थांकडे गेल्यास त्याऐवजी ‘चहा घेऊनच आला असाल!’ असे ऐकायला मिळते, अशी एक किंवदन्ता आहे, परंतु तिच्यात फारसे तथ्य नाही. बहुधा पूर्वीसारखे कोकणस्थ आजकाल बनवत नसावेत. मी स्वतः अनेक चांगल्या कोकणस्थांच्या — हे वदतो व्याघातःचे उदाहरण नव्हे! — घरी कपांवर कप चहा ढोसलेला आहे. तर ते एक असो.) आणि, चहाला — मग तो कितवाही असला, तरीही — नाही म्हणणे हे ‘आपल्या समाजा’त पुरुषार्थाचे लक्षण समजले जात नाही. (स्त्रियांकरितासुद्धा!) मात्र, केवळ त्यामुळे चहा हे व्यसन ठरत नाही.

मग, चहा, सिगरेट ही व्यसने कधी ठरतात? तर, सकाळचा पहिला चहा ढोसल्याशिवाय, किंवा सकाळची पहिली सिगरेट फुंकल्याशिवाय, तुम्हाला शीची धारणासुद्धा जर होत नसेल, तर. तोवर नव्हे.

सांगण्याचा मतलब, सकाळीसकाळी फेसबुकात डोकावल्यावाचून तुमची शी जर का अडत नसेल, तर (व्यसनाबिसनाची चिंता न करता) खुशाल डोकावा. मजा करा, स्वतःला मनसोक्त indulge करा. आणि, (शक्य तोवर शी झाल्यानंतर) ‘आज सकाळी मला पातळ शी झाली.’ असे स्टेटससुद्धा खुशाल अपडेट करा. (जमल्यास पुराव्यादाखल एखादा फोटोसुद्धा चढवा.) लक्षात घ्या, अर्ध्या जगास या माहितीची नितांत तथा निकडीची आवश्यकता आहे. पाहा क्षणार्धात ‘लाइकां’चा पाऊस धोधो कोसळतो की नाही, ते. (जळतात, लेकाचे!)

असो चालायचेच.
</Rajesh188>

'न'वी बाजू Sun, 08/01/2023 - 01:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचाच डु आयडी आहे का?

माझे एक वेळ सोडा, परंतु, गेला बाजार त्या राजेश१८८जींचा तरी अपमान करू नका!!!

हा राजेश१८८ मोड का म्हणे?

काही नाही, त्यांच्यासारखा अचाट, अतार्किक प्रतिसाद, तोसुद्धा केवळ हाताशी कळफलक आहे म्हणून, देण्याचा प्रयत्न करून पाहिला, इतकेच.

ते काय ते म्हणतात ना, Imitation is the best form of flattery, तशातली गत.

तरीही, तितकेसे नीट जमलेले नाही, याची कल्पना आहे. शेवटी, तेथे पाहिजे जातीचे.

असो चालायचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/01/2023 - 02:17

In reply to by 'न'वी बाजू

चुका कुठे झाल्या -
१. उदारमतवाद उतू चालला आहे.
२. अध्येमध्ये, कुठेही, अचानक एआयचा उल्लेख नाही. यंत्रं आणि आजची जीवनपद्धती आपला घात करणार, असा काही जिक्र नाही. (नुक्ता वापरणार नाही; कारण मला वापरता येत नाही.)
३. मुद्देसूदपणा आणि प्रमाणलेखनाचा सढळ हस्ते वापर.

एकंदरच, 'न'वी बाजूंची एका टोकाला जाऊन युक्तिवाद करायचं ठरवलं, या पलीकडे प्रतिसाद गेलेला नाही. ही टिप्पणी प्रतिसादाच्या धाटणीबद्दल आहे; रंजकतेबद्दल नाही. यात बहुतेक अस्वल आणखी भर घालू शकेल.

आणि हो, आपण इंटरनेटवर लिहीत आहोत. कुणाचाही, निष्कारण अपमान करायचा नाही तर इंटरनेटवर लिहिण्याचा फायदा काय!

'न'वी बाजू Sun, 08/01/2023 - 20:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तितकी उंच पातळी गाठणे ही आपल्या बसचीच काय, तर रिक्षा, टॅक्सी, फार कशाला, अगदी विमानाचीसुद्धा बात नाही. राजेश१८८जी राजेश१८८जी आहेत. (x = x?)

सर्व दोष अर्थातच मान्य आहेत.

Rajesh188 Sun, 08/01/2023 - 21:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खरे व्यक्त होणे , नाटकी व्यक्त होणे ,खोटे खोटे व्यक्त होणे
पण जे वाटत ते व्यक्त होणे खूप कठीण.

येथील सर्व विचाराची लोक खुश हो यातील असे नाटकी व्यक्त होणे काही अवघड नाही.
पण तो स्वतः शीच द्रोह आहे.

Rajesh188 Sun, 08/01/2023 - 21:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खरे व्यक्त होणे , नाटकी व्यक्त होणे ,खोटे खोटे व्यक्त होणे
पण जे वाटत ते व्यक्त होणे खूप कठीण.

येथील सर्व विचाराची लोक खुश होतील असे नाटकी व्यक्त होणे काही अवघड नाही.
पण तो स्वतः शीच द्रोह आहे.
मला जे मनापासून वाटते ते मि लीहतो.
त्या वर बाकी लोक काय प्रतिक्रिया देतील तो त्यांचा हक्क आहे.

जनमत संभ्याळने माझे कर्तव्य नाही.
खरे व्यक्त होणे हेच कर्तव्य आहे

मनीषा Sun, 08/01/2023 - 19:21

In reply to by 'न'वी बाजू

हा जर 'R...8' मोड असेल तर जरा चुक्या है, कारण की मराठी बरच ठीक लागतं हय.

अवांतर शंका .. किंवदंता म्हणतात? का किंवदंती असा शब्दं आहे?
वदंता हा शब्दं माहिती आहे.

'न'वी बाजू Sun, 08/01/2023 - 19:45

In reply to by मनीषा

हा जर 'R...8' मोड असेल तर जरा चुक्या है, कारण की मराठी बरच ठीक लागतं हय.

दोष आगाऊ मान्य आहे. तितकेसे नीटसे अर्थातच जमलेले नाही. किंबहुना, 'न'वी बाजू-Rajesh188 द्वैताचा याहून सबळ पुरावा आणखी काय हवा?

अवांतर शंका .. किंवदंता म्हणतात? का किंवदंती असा शब्दं आहे?
वदंता हा शब्दं माहिती आहे.

चांगला प्रश्न आहे. टॅम्प्लीज़!

सई केसकर Mon, 16/01/2023 - 12:31

https://www.theverge.com/23549905/tinder-swipe-creation-dating-app-revo…
हा एपिसोड या धाग्याशी सुसंगत वाटला.
भांडवलशाही + माणसाची प्रेम/जोडीदार शोधण्यामध्ये असलेली व्हल्नरेबिलिटी या दोन्हीं गोष्टी एकत्र येऊन डेटिंग ॲप तयार झाली. आधीही अशा प्रकारचे प्रयोग सुरु होते. भारतात अशा मॅट्रिमोनियल वेबसाईट होत्या. पण जोडीदार शोधण्यासाठी जेव्हापासून ॲप तयार झाली तेव्हापासून त्या तंत्रज्ञानात आणि लोकांच्या मानसिकतेत कसे बदल झाले आहेत त्याबद्दल चर्चा आहे.
याविषयी आलँ बादियुच्या 'इन प्रेझ ऑफ लव्ह' मध्येही एक प्रकरण आहे. डेटिंग ॲप/अल्गोरिदम, एखाद्याच्या प्रेमात पडण्यांत जी रिस्क किंवा ज्या रँडम शक्यता असायच्या त्या काढून घेतात असं बादियु म्हणतात. कारण, 'आपल्याला प्रेमात पडण्यासाठी कशा प्रकारची व्यक्ती हवी आहे?' हा प्रश्न विचारून आपल्यासाठी पुढच्या सगळ्या शक्यता तयार केल्या जातात.
https://www.youtube.com/watch?v=CytC6A-K8c4