Skip to main content

जनम जनम के फेरे

xxx

माणूस मृत्युपश्चात अनेक कामना, आशा, आकांक्षा, भावना, वासना, जबाबदा‍र्‍या मागे ठेवून जातो. त्याच्यामागे राहणारे सगेसोयरे मात्र त्याच्यात गुंतलेले असतात. त्यामुळे त्या जवळच्या माणसाच्या कायम वियोगाची ही कल्पना सहजासहजी सहन होणारी नसते. म्हणूनच भारतीय परंपरेनी याची सोय पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांच्या आधारे केली आहे. आपली परंपरा, आपल्या धर्मकल्पना ठामपणाने आत्मा मानतात; आत्मा अविनाशी असतो; शस्त्राने न मारला जाणारा; पावसाने न भिजणारा; अग्नीने न पोळणारा असा तो असतो. ही परंपरागत भावना आपल्या मनात पक्की रुजलेली आहे. याचबरोबर चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा जन्म-मृत्यूचा फेरा जोडीला आहेच. हा फेरा छेदून स्वर्गात जाणारे पुण्यात्मे वा नरकात जाणारे पापात्मे वा परमेश्वराच्या सानिध्यात जाण्यासाठी मोक्ष मिळविणारे यांची संख्या फारच थोडी असणार. इतर मात्र या जनम जनम के फेरेमध्ये अडकतात. हा फेरा मानण्यासाठी पुनर्जन्म मानल्यावाचून गत्यंतर नाही.

मृतव्यक्तीचा आत्मा मागे राहून तो काही काळाने प्रगट होतो हे मान्य केल्यास काही प्रश्न विचारावेसे वाटतात. मधल्या काळात हे आत्मे कोठे राहतात? हवेत भटकतात की वेताळाच्या टेकडीवर? वाढत्या जनसंख्येसाठी लागणार्‍या आत्म्यांचा पुरवठा कोण करतो? त्याचा काही ठराविक कोटा असतो का? आत्म्याला पुनर्जन्म मिळत असल्यास कोणत्या आधारावर? कुठल्या आत्म्यानी कोठे जावे हो कोण ठरवतो? या व अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर म्हणून पूर्वसंचित व कर्मविपाक सिद्धात पुढे आले असावेत. या जन्मीचा पाप-पुण्याचा हिशेब होणार; त्याआधारे कुठल्या योनीत पुनर्जन्म येणार की स्वर्ग, नरक वा मोक्ष हे ठरणार; हीच पुनर्जन्माची कल्पना या जगातील विषमतेचे समर्थन करणार; चातुर्वर्ण्याला मान्यता देणार; स्त्रियांवरील अत्याचाराला क्षुल्लक ठरविणार; दैववाद बळकट करणार; प्रारब्ध माथी मारून माणसांना निष्क्रीय करणार. मुळातच आत्मा म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये कोणती? याचे विवेकी विश्लेषण उपलब्ध नाही. फक्त कल्पनाशक्तीच्या जोरावर पुनर्जन्माची संकल्पना गेली शेकडो वर्षे टिकून आहे. हे फक्त हिंदू धर्मात नव्हे तर भारतात उगम पावलेल्या इतर धर्मातसुद्धा आहे.

भारतात उगम पावलेले हिंदू, बौद्ध, जैन व शीख धर्म व पश्चिम एशियातील पारसी, ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम हे आठ धर्म जगभर पसरलेले आहेत. हेच आठ धर्म जगातील बहुतांश लोकसंख्येच्या आध्यात्मिक आचार-विचारांचे नियंत्रण करतात. गंमत म्हणजे मानवी जीवनातील या सर्व धर्मामध्ये आत्मा व मृत्युनंतरचे जीवनसातत्य या बाबी अवश्य व काही अंशी समान आहेत. हे सगळे आठही धर्म मानवी जीवन सुखसमाधानाने जगण्यासाठी नियमन केल्याचे दावे करत असतात. विशेषत: मृत्युनंतरचे 'जीवन' दीर्घतम असल्यामुळे त्याला धर्मामध्ये महत्वाचे स्थान आहे. मृत्युनंतरचे जीवन म्हणजे स्वर्ग, नरक, मुक्ती, मोक्ष. जे मेल्याशिवाय दिसत नाही.

जीवनसातत्यासाठी मृत्यूने नष्ट होत नाही अशी काही तरी वस्तू हवी आणि अशी ही अमर वस्तू आहे 'आत्मा'. ऐहिक सुख दु:खासाठी शरीर व मन व मृत्युनंतरच्या जीवनासाठी आत्मा अशी ही विभागणी आहे. म्हणूनच हा आत्मा आठही धर्मात आहे; अगदी ईश्वर नाकारणार्‍या बौद्ध व जैन धर्मातही! हिंदू, बौद्ध, जैन व शीख धर्मात पुनर्जन्म आहे व इतर धर्मात त्याऐवजी सैतानाचे अस्तित्व गृहित धरले जात आहे.

जगात असलेल्या अपरिमित दु:खाच्या उत्तरदायित्वातून परमेश्वराला मोकळे करण्यासाठी भारतात उगम पावलेल्या या चारी धर्मांनी अत्यंत धूर्तपणे पुनर्जन्म या संकल्पनांचा घाट घातला आहे. सर्वांची दु:खे ज्याच्या त्याच्या पूर्वजन्मीच्या पापाची फळे आहेत असे म्हटल्यावर ईश्वराला दोषमुक्त करण्यास आस्तिक मोकळे. कर्मफळ व पुनर्जन्म या दोन सिद्धांतामुळे पुष्कळच स्पष्टीकरण मिळू लागतात. कर्मफल हा स्वयंचलित नियम आहे; या नियमाप्रमाणे प्रत्येक मनुष्य (व इतर प्राणीमात्रसुद्धा!) आपापल्या चांगल्या - वाईट कर्मांची फळे याजन्मात किंवा पुढील जन्मात भोगतो; परमेश्वर निष्पक्षपाती असून या नियमात ढवळा ढवळ करत नाही; कुणाला उगाच पाप पुण्य देत नाही; किंवा कुणाचे घेत नाही. त्याच्यावर श्रद्धा ठेवल्यामुळे फार फार तर दु:खाचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल वा दु:ख सहन करण्याची ताकद वाढू शकेल वा मानसिक समाधान मिळेल. (व हेसुद्धा तुमच्या पापपुण्याच्या हिशेबानुसारच घडेल!) त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, बालमृत्यू, अकाली मृत्यू, दारिद्र्य, रोगराई इत्यादीसाठी ईश्वराला वेठीस धरण्याचे कारण नाही.

आत्मा, पुनर्जन्म वा सैतान इत्यादी सर्वच केवळ कपोल कल्पित गोष्टी आहेत असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. भूलोकी मृत्यू आहे म्हणून अमर आत्म्याची कल्पना; सर्वत्र अन्याय, विषमता आहे म्हणून पुनर्जन्म, सैतान, निवाड्याचा दिवस या कल्पना. या सर्व कल्पना विसंगत व परस्पर विरोधीसुद्धा आहेत. पुनर्जन्माला किंवा कुठल्याही स्वरूपातील जीवनसातत्याला कुठलाही तार्किक आधार नाही. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे अधून मधून जिवंत 'पुरावे' सादर करत असतात. अमुक अमुक मुलीला पूर्वजन्मातील एकूण एक गोष्टी आठवतात म्हणून डांगोरा पिटला जातो. परंतु या मंडळीना एक प्रश्न विचारावासा वाटतो. आपल्या धर्मशास्त्रानुसार मृत मनुष्य माणसाच्याच जन्माला येईल याची खात्री नसते. त्याने/तिने केलेल्या पापपुण्यनुसार चौऱ्याऐंशी लक्ष योनींपैकी कोणताही जन्म लाभू शकतो. मग या गतजन्माच्या बातमीतील माणसं कोणी मी मागल्या जन्मी डुक्कर किंवा गांडूळ होतो असे का बरे सांगत नाहीत?

चार्वाक दर्शन सोडले तर सर्व भारतीय दर्शनांनी कर्मसिद्धांत स्वीकारला आहे. त्याचे विवरणही थोड्याफार फरकाने सर्वांनी सारखे केले आहे. आपल्या या जन्मातील बर्‍यावाईट कर्मांची भलीबुरी फळे आपल्याला मरणोत्तर मिळतात, हे मत अन्य धर्मातही आढळते. परंतु यासाठीचा भारतीयांची कर्मसिद्धांताची कल्पना अन्यत्र कोठेही आढळत नाही. कर्म सिद्धांत हा वैश्विक नियम आहे, असे येथे मानले जात आहे. चांगल्या कर्मांना मधुर फळे आणि वाईट कर्मांना कटू फळे येतात. हे कोणा ईश्वराचे किंवा अन्य शक्तीचे कार्य नव्हे. तो श्रृष्टीच्या नैसर्गिक क्रमाचा भाग आहे, असे हिंदू धर्म मानतो. भौतिक जगात सर्वत्र लागू पडणारा कार्यकारणाचा अटळ सिद्धांत कर्माच्या सिद्धांतामध्ये मानसिक आणि नैतिक कृत्यांना लावण्याचा प्रयत्न यात केला आहे. परंतु हा सिद्धांत प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर बनविलेला आहे असे म्हणता येणार नाही. अथवा प्रयोग करून त्या सिद्धांताचा पडताळा पाहता येईल असेही म्हणता येणार नाही.

कर्मसिद्धांताचे परिणाम फार दूरगामी आहेत. जीवांचे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे कर्मसिद्धांताचे उपसिद्धांत असावेत. आपल्याला भोगावी लागणारी सुखदु:खे आपण स्वकर्माने कमावलेली किंवा ओढवून घेतलेली असतात, असे कर्मसिद्धांताचे प्रतिपादन आहे. त्यामुळे कोणतेही कर्म करण्याआधीच जी सुखदु:खे भोगावी लागतात त्याची तार्किक सुसंगती लावण्यासाठी, तिच्यातून सुटण्याचा उपाय म्हणून पूर्वजन्म ही संकल्पना रूढ झाली असावी. त्यामुळे आपल्याला जन्मत:च येणारे सुखदु:खानुभव पूर्वजन्मीची फळे आहेत, असे म्हणणे तर्कशुद्ध वाटू लागते.

मुळात प्रत्येकाला त्याच्या कर्माची योग्य व न्याय फळ मिळाली पाहिजे ही एक रास्त मागणी असते. सत्कर्माबद्धल प्रशंसा, पारितोषक व दुष्कर्माबद्दल दंड व शिक्षा याची अपेक्षा असते. परंतु हे आपोआप, नैसर्गिकरित्या घडू शकत नाही. यावर उपाय म्हणून कर्मसिद्धांताचा प्रस्ताव पुढे आला असावा. मुळातच न्याय ही गोष्ट मानवनिर्मित आहे. त्यात नैसर्गिक असे काही नाही. न्याय - अन्याय या संकल्पना माणसांना जेव्हा समज आली तेव्हा अस्तित्वात आल्या. परंतु कर्मसिद्धांतात आपल्याला नेमके काय करावे व काय टाळावे याचा उल्लेख नाही. फक्त मोघमपणे सत्कर्म करण्याची व दुष्कर्म न करण्याची विधानं आहेत. सत्कर्म कोणती व त्या सत्कर्माची नेमकी फळे कोणती हे सांगितले जात नाही. त्यामुळे हा सिद्धांत अत्यंत अन्यायकारक आहे असे म्हणता येईल. अपराध्याला शिक्षा कोणत्या दुष्कृत्याबद्दल झाली आहे हेच जर त्याला कळले नसेल तर तो ते कसे काय टाळू शकणार?

yyy

कर्मसिद्धांतानुसार आपण केलेल्या कर्माची नैतिक दृष्ट्या योग्य किंवा उचित फळे मिळतात, असेही सांगितले जात असते. परंतु नीतीकल्पना आणि नैतिक नियम, स्थळ-काळ-सापेक्ष असल्यामुळे नेमके काही सांगता येत नाही. यात सदाचार म्हणजे कोणता आचार हेच माहित नसल्यामुळे मनुष्य गोंधळतो.

कर्मसिद्धांत उघडपणे प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली सामाजिक अवस्था अत्यंत योग्य आहे अशी भलावण करू शकते. अन्यायकारक गोष्टींना नाहिसे करण्याची प्रेरणा नाहिशी करते. आपले दु:ख, वेदना, आपल्यावर होत असलेले अन्याय, अत्याचार यास आपण स्वत:च जबाबदार आहोत हे एकदा मान्य केले की तक्रार करता येत नाही. दु:ख, दारिद्र्य, दुष्टाचार, भ्रष्टाचार, इत्यादींना नावे ठेवता येत नाही. गैर मानता येत नाही. कारण हे सर्व पूर्वजन्मातील दुष्कृत्याची फळे ठरतात. असे करणार्‍यांना या जन्मी दंड, शिक्षा करण्याचे कारण नाही. कारण पुढच्या जन्मी त्यांना या दुष्कृत्याची फळे भोगावी लागणार याबद्दल आपल्या मनात शंकाच नसते. म्हणूनच या तत्वज्ञानातून मानवाच्या हातातील उपक्रमशीलता, प्रयत्नशीलता हिरावून घेतल्या जातात व उरते ती फक्त उदासीन निष्क्रीयता.

आपल्या देशातील मागासलेपणाचे आणि अवनतीचे एक प्रमुख कारण कर्मसिद्धांत व पुनर्जन्म यावर असलेली आपल्या समाजाची नितांत श्रद्धा! दैववादी विचारसरणीचा इतका जबरदस्त पगडा भारतीय समाजमनावर आहे की गुलामापेक्षा काय, पशूपेक्षाही लाजिरवाणे जिणे पिढ्या न् पिढ्या जगत राहणार्‍या या माणसांच्या मेलेल्या मनामध्ये बंडाची आग कधीच लागणार नाही. पूर्वजन्मातील कर्मानुसार आपले आयुष्य जाणार, त्यात फेरफार करण्याचा आपल्याला हक्क नाही, हीच मानसिकता मूळ धरल्यामुळे हा जन्म सुखी कसा होईल हे पाहण्यापेक्षा, या जन्म मरणाच्या फेर्‍यातून कायमची सुटका कशी होईल, ते पाहण्यातच सर्व वेळ, श्रम खर्ची घातले जात आहेत. (त्याकरता सर्वात सोपा मार्ग म्हणजे परमेश्वराच्या भक्तीत आकंठ बुडून जाणे!)

गतजन्मीचे भोग विनातक्रार भोगत राहणे हीच आपल्या आयुष्याची इतीकर्तव्यता असा जो समाज मानतो तो समाज अंधाराकडे जाणार हे मात्र नक्की!

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

विवेक पटाईत Fri, 11/08/2023 - 10:27

पुराण काळ अर्थात चौथ्या पाचव्या शताब्दी नंतर भारतात कर्म सिद्धांत जागी त्याची जागा भाग्यवादाने घेतली. आज ही चमत्कार करणाऱ्या उदाहरण साईबाबा इत्यादी सारख्या देवतांचे लोक भारी संख्येत दर्शन घेतात. चमत्कारांवर विश्वास, हे मागास असण्याचे कारण आहे. कर्म सिद्धांताचे पालन करणारे अखंड प्रचंड पुरूषार्थ करतात उदाहरण अठरा अठरा तास काम करणाऱ्या आपल्या नेत्याने नऊ देशाला गेल्या नऊ वर्षातच देशाला पाचवी अर्थव्यवस्था बनविले. बाकी कर्म सिद्धांताचा चुकीचा अर्थ काढू नका.

अमुक-ढमुक Sat, 12/08/2023 - 22:10

In reply to by विवेक पटाईत

अरेच्या अमास्नी कलेना तुमी बी त्याचे नांव का घेऊन नाही राहिले? नाही म्हंजे तुमी इस्तुती का तारीफच करून राहिले ना? आमी यक वंगाळ तोंडाचे, आमी कुठून चांगलं बोलनार, पर तुमी, तारीफ वाले ( तारीफ करू क्या ऊसकी जिस्ने तुमें बनाया, जं ग ली ही शीनेमा वाणी ) मंग तुमाला काय फिकीर नाव घ्याया? का तुमी बी अमच्यावानी मूग गिळून बसले?

आनि रागावणार नसाल तर यक विचारतो - आता नाव न घेतल्याने आमास्नी कळेना तर - हे सम्दे राजें लोक १८-२० तास काम करत्यात म्हंजी फकस्त ४-६ तासच झोप्त्यात, आता आपल्याला हे गुपित कसं कळावं? म्हंजी भालदार चोपदार नि सांगितलन की पाय चेपून देणारा कि वारा घालणारा गडी हाय त्यो बोलला? का त्यांच्या दरबारातल कोंबडं? आमचा तर झोपण्या आणि घोरण्या वर लय इश्वास हाए. त्यामुळे आरोग्य आणि विजेची बचत दोनी भी होते.

सुधीर Tue, 15/08/2023 - 23:36

आमच्या लहानपणी साई बाबांची खूप चलती होती आजही असावी. त्याकाळात साई बाबांचे प्रस्त व्यवस्थित वाढविले गेले असावे. मला आठवते आहे त्यावेळेला ट्रस्टींनी अफरातफर केल्याचाही आरोप होत होता (स्मिता जयकर नावाच्या कुणी कलाकार त्या ट्र्स्टी बोर्डावर होत्या असे वाचले होते). शिर्डी संस्थानांची उलाढाल त्यावेळेस कोट्यावधी रुपयांची होती असेही वाचले होते. पण जे कुणी ट्रस्टी होते त्यांनी एखाद्या कॉर्पोरेट स्ट्रेटेजी सारखे साईबाबांचे प्रस्थ वाढवले. त्यात प्रसिद्ध गायकांकडून साईबाबांची गाणी गाऊन घेणे, चित्रपट तयार करणे, सेलीब्रेटीज कसे शिर्डीला येत आहेत त्याची पद्धतशीर जाहिरात करणे इ. मुंबईत मग गल्लो गल्ली साई मंदिरे झाली आणि साई भंडारे घातले जावू लागले, पायी शिर्डी वार्‍या निघू लागल्या. अगोदरच्या पिढीतल्या काहिंना साईबाबा असे नावही माहित नव्हते हे विशेष. 

आणि आजकाल लालबागच्या राजानंतर हीच स्ट्रेटेजी स्वामी समर्थांच्या ट्रस्टीने उचलली असावी असे वाटते (आणि हाच कित्ता इतर बाबागुरुंच्या ट्रस्टींनी उचलला आहे. टिव्हीवर त्यांच्या मालिकांचा सुळसुळाट झाला आहे.). त्यांच्या मालिकांची भूरळ "सुशिक्षितांवरही" पडताना पाहतो आहे. त्यात काम केलेले कलाकार कसे "स्वामी"मय झाले आहेत असेही एके ठिकाणी वाचावयास मिळाले.  या स्वामींची थोडी फार माहिती गोळा केली असता, नेहमीप्रमाणे चमत्कारांची यादीच्या यादी दिसते. हे चमत्कार (या सगळ्यांचेच) जन्मापासूनच सुरु होतात. म्हणजे ही लोकं कुठूनतरी "प्रकट" झालेली दिसतात. वा अमक्या तमक्याचा हा "पुनर्जन्म" असे त्यांचे भक्त मानतात. म्हणजे काहीसे ३०० वर्षांनी तपश्चर्या करून कुठल्याशा जंगलातून बाहेर आले इ. (बायदवे, सेल डिके रेट कमी करून, रिवर्स एजिंग करून आयुर्मान वाढवण्याचा शोध प्राचिन भारतात फार अगोदरच लागलेला आहे. आधुनिक विज्ञानाला तो अजून लागला नाही इतकेच.) बर, या लोकांचा कालावधी पाहिला तर १९व्या शतकाचा उत्तरार्ध. पण या काळातल्या तत्कालिन समाजाच्या समस्यांवर, जसे स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, अस्पृश्यता निर्मुलन, पारतंत्र्य इत्यादींवर या लोकांनी काही खास कार्य केले होते अशी इतिहासात तरी नोंद नाही. म्हणजे इतकी दैवी शक्ती असतानापण त्यांनी काहीच "भरीव कार्य" का बरे केले नसावे असा प्रश्न पडतो. बरे अशा समाज सुधारणांना समर्थन होते तर, आपले विचार पत्रलेखनातून वा ग्रथांतून समकालीन इतर कुणास, म्हणजे अशा सामाजिक प्रश्नांसाठी आपले आयुष्य पणाला लावणार्‍या मर्त्य मानवाला- कळविल्याचेही काही ज्ञात नाही. अचानक २१ व्या शतकात इतिहासात फारशी दखल न घेतलेल्या या दैवी शक्तींचा इतका बोलबाला होतो की दडवून ठेवलेला इतिहास-इतिहास तो हाच असे वाटावे.असो,

वैयक्तिक आयुष्यात हे स्वामी, बाबा आपल्या अक्कल हुषारीने पंचक्रोशीतल्या वा फार फार तर जिल्ह्यातल्या सामान्य भोळ्या-भाबड्या माणसांचे "कौन्सलिंग" आपापल्यापरिने करतही असतील. (हाथचलाखीरुपी चमत्कार पद्धतीने, आणि त्याचा त्यांना उपयोग होतही असेल) त्यांच्याबद्धल मला जास्त काही माहित नाही आणि त्यांच्या या तत्कालीन "कौन्सलिंग पद्धतीविषयी" मला काही राग-लोभ पण नाही. पण त्यांच्या नावाने ट्रस्ट सांभाळणार्‍या व्यक्ती मात्र पक्क्या "कॉर्पोरेट" आहेत. जर या ट्रस्टींना  पब्लिक लिस्टेट कंपनी बनविले तर तर दर क्वार्टला, गेल्या क्वार्टर मध्ये अमूक अमूक नवीन मठ बांधून पूर्ण झाले.. त्याचा वार्षिक वृद्धीदर १०% आहे. भक्त संख्या इतक्याने वाढून इतकी झाली, डोनेशन्स वार्षिक २५% वाढले, मार्केटींग एक्स्पेन्सेस इतके होते... अशी माहिती प्रसिद्ध करतील. 

आजच्या काळात हाथचलाखीरुपी चमत्कार दाखविणारे बागेश्वरधाम आणि इतर भुरट्या बाबांना बघतो आहे आणि केवळ राजकारणाचा भाग म्हणून अशा बाबांची तळी उचलणारे नेते आणि त्यांचे समर्थकही पाहतो आहे.

दहा वर्षापूर्वी जेव्हा गीतारहस्य वाचले होते तेव्हा नीतिमत्तेच्या दृष्टीकोनातून थोडा फार प्रभाव पडला होता. पण नीतिमत्तेच्या, न्याय-अन्यायाच्या कल्पना गेल्या शंभर वर्षात कशा बदलत गेल्या ते जाणवले.  हळूहळू जसा उत्क्रांतीवाद समजत गेला तेव्हा पुनर्जनन्म, आत्मा, कर्मसिद्धांत या श्रद्धासुद्धा गळून पडल्या. डॉकिन्सच्या पुस्तकांनी श्रद्धेच्या शवपेटीकेवरचा शेवटचा खिळा ठोकला.

अभिजीत देशपांडे Wed, 16/08/2023 - 11:42

‘या तत्वज्ञानातून मानवाच्या हातातील उपक्रमशीलता, प्रयत्नशीलता हिरावून घेतल्या जातात व उरते ती फक्त उदासीन निष्क्रीयता’-
‘निष्क्रीयता’ कुठल्या देवानं/देवतेनं/देवीनं याचा खुलासा न करता कर्मसिद्धांताच्या नावाखाली चांगलाच हात धुवून घेतलाय सरांनी!
मूळ कर्मसिद्धांत काय आहे, हे त्यांना समजलेले नाही हे त्यांच्या लिखाणावरून सिद्ध होतंय.

पुनर्जन्म आहे असं ज्या उपनिषदांत आणि गीतेत ईश्वरानं सांगितलंय त्याचा अनर्थ करून आणि आधुनिकतेल्या शोषण-शोषक framework चा वापर करून अपेक्षित उत्तरं मिळवलेली आहेत.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ।
‘तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे पण कर्मफळांचा नाही. म्हणजे कर्माचे फल काय मिळणार यावर तुझे आधिपत्य नाही. कर्मफळांवर आधिपत्य गाजवायचा प्रयत्न करू नको परंतु ‘कर्मफळांवर आधिपत्य नाही’ म्हणून कर्म करायचे सोडू नको.’ असं गीतेत कृष्ण सांगतो. यात ‘निष्क्रीयता’ कुठं आहे?

अहो भगवद्गीतेत अर्जुनाने साक्षात देव समोर असतानाही किती खोदून खोदून प्रश्न विचारले ते एकदा तरी वाचा. भगवंताने अकराव्या अध्यायात तर विश्वरूप दाखवले तरीही अर्जुनाच्या शंका संपल्या नाहीत. त्याच्या सर्व शंकांचे निरसन होई पर्यंत तो योगेश्वर उत्तरे देत होता. शेवटी श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारले की तुझ्या सर्व शंका आणि मोह मिटले का, नसतील तर मी पुनःपुनः गीता नव्याने सांगायला तयार आहे. यावर अर्जुनाचे उत्तर आहे, हो सर्व शंकानिरसन झाले. त्यावर तो देव म्हणतो, मग आता तुला जे योग्य वाटते ते कर. आता असा प्रश्न विचारणारा भक्त आणि सर्व उत्तरे देवून ‘तुला योग्य वाटते ते कर’ म्हणणारा देव, ज्या हिंदू धर्माचे आहेत त्या धर्माच्या देवाला कसल्या अंधश्रद्धा वगैरे म्हणत हिणवता आणि सुधारणेच्या बाता मारता?

‘गतजन्मीचे भोग विनातक्रार भोगत राहणे हीच आपल्या आयुष्याची इतीकर्तव्यता असा जो समाज मानतो तो समाज अंधाराकडे जाणार हे मात्र नक्की!’
अहो दु:ख जर कोणी विनातक्रार भोगत असेल तर आसा मनुष्य याच जन्मी जिवंतपणी जीवन्मुक्त होतो. ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती आणि शाश्वत सुख प्राप्ती’ हाच तर मोक्ष!

तुमचा हिंदू धर्माचा, परंपरांचा (न्याय, वैषेशिक, योग, सांख्य, मीमांसा, अद्वैत, चार्वाक, बौध्द आणि जैन) आणि पंथांचा काहीही अभ्यास नाही. समाजाच्या मागासलेपणाचा आणि अवनतीचा विचार करतो असं म्हणता पण भारतीय समाज ज्या हिंदू विचारातून पुढे आला त्या हिंदू विचारांची टर उडवण्यासाठी तुम्ही लिहिता. समाजाच्या मागासलेपणावर आणि अवनतीवर हिंदू धर्माच्या आणि परंपरांच्या चौकटीत उपाय काढण्यापेक्षा तो विचार आणि परंपराच कशा चुकीच्या आहेत हे सतत म्हणत राहणे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर असेच म्हणावे लागेल. थोडा इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येतं की भारतीय समाज हिंदू धर्म आणि परांपरांमुळे (न्याय, वैषेशिक, योग, सांख्य, मीमांसा, अद्वैत, चार्वाक, बौध्द आणि जैन) self-correction करीत आला आहे. मुळात हिंदू धर्माच्या विविध दर्शन परंपरांचा विकासच मुळी या सनातन वृत्तीमुळे झाला आहे आणि तो पुढेही होत राहील.

अहिरावण Wed, 16/08/2023 - 13:39

अकलेचे तारे तोडणे म्हणजे काय ते कळाले..
धन्यवाद नानावटी.. ओकत रहा

मनीषा Fri, 29/09/2023 - 11:34

यातील अनेक मुद्द्यांशी सहमत आहे.

गरीब, परिस्थितीने गांजलेल्या, भविष्याच्या चिंतेने धास्तावलेल्या जनतेला मानसिक गुलाम करून त्यांच्यावर सत्ता गाजवण्याकरता अशा धार्मिक, नैतिक इत्यादी संकल्पनांचा वापर करण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे.
मूळ तत्वे आणि त्यांचा लावण्यात आलेला किंवा सांगण्यात आलेला अर्थ यात फरक असावा असे वाटते.

परंतु यात फक्त अडाणी, अशिक्षितच नाही तर उच्चशिक्षित, कर्तृत्ववान वगैरे लोक देखिल फसतात याचे नवल वाटते.
श्रद्धा असणे काही गैर नाही पण ती अंध नसावी .

आत्मा, पुनर्जन्म इत्यादी कथांवर लाखो जन विश्वास का ठेवतात कळत नाही, तेही कुणालाही अनुभव नसताना.

असे सांगितले जाते की ८४ लक्ष फेऱ्यातून शेवटचा जन्म मिळतो तो मनुष्यजन्म.. तरीही पुढचा किंवा आधीचा जन्म माणसाचाच असेल असे कसे समजले जाते?

चांगला विषय आहे आणि उत्तम लेख.

रेवती१९८० Fri, 29/09/2023 - 15:54

सनातन धर्म हा जगातील सर्वात भिकार धर्म आहे.
जातीव्यवस्थेची सामाजिक श्रेणी बनवून लोकांना त्यांच्या जन्मावर आधारित वेगवेगळ्या गटांत विभाजन करणारी सनातन धर्मातली हीन प्रथा, विषमता आणि भेदभाव याला कायम खत पाणी घालत आलेली आहे. निम्न जातीच्या हिंदूंना अनेकदा शिक्षण, नोकरी आणि इतर संधीं नाकारून त्यांचे खच्चीकरण करायचे आणि त्यांना हिंसा करायला भाग पाडायचे असाच दुर्व्यवहार सनातन धर्म करत आला आहे.

सनातन धर्माने स्त्रियांच्या बाबतीत केलेला दुजाभाव अनेक पारंपारिक हिंदू समाजात स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी लेखतो. त्यांना अनेकदा त्यांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य नाकारले जाते. स्त्रियांच्याकडून अजूनही कन्यादानाची अपेक्षा केली जाते. हुंडा हवाच. स्त्रियाना घरगुती हिंसेला बळी पडावे लागते अजूनही.

सनातन धर्मातील ढोंगीपणा आणि अंधश्रद्धा यांचे हजारदा समर्थन करायला हवे. अनेक हिंदू ज्योतिष, कर्म आणि पुनर्जन्म यांसारख्या विविध बाता मारतात आणि सनातनी त्यावर विश्वास ठेवतात. हे विश्वास इतके अतार्किक आणि हानिकारक असतात कि त्याबद्दल वरती नानावटी यांनी लिहिले आहेच. एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर तो तिच्या पूर्वजन्मीच्या वाईट कर्मामुळे झाला आहे. खरे की काय?
सनातन धर्म इतर धर्मांबद्दल एवढा असहिष्णु का? "आमचीच लाल आहे" असा ढोल बडवणे आणि इतर सर्व धर्म मानणाऱ्यांची काळी आहे असा डांगोरा पिटणे, आणि मग धार्मिक हिंसा करणे हाच एकमेव अजेंडा सनातन धर्म राबवत आला आहे.

सनातन धर्मावर गरळ ओकणे ही जर नवी फॅशन असेल तर सर्वांनी या फॅशनचा हसत मुखाने स्विकार करावा. सनातन धर्माच्या बाजूने बोल णाऱ्यानी उद्यापासून शेंडी राखावी, धोतर नेसून फिरावे, तिन्ही त्रिकाळ संध्या करावी, केळीच्या पानावरच जेवावे आणि घरच्या लक्ष्मीला येता जाता दुरुत्तरे करावीत.

'न'वी बाजू Fri, 29/09/2023 - 16:20

In reply to by रेवती१९८०

(जमल्यास) दीर्घ प्रतिसादासाठी जागा अडवून ठेवीत आहे.

मरू द्या. Not worth the efforttrouble. बाकी सर्वांचे चालू द्या.

तुमच्या आक्षेपांच्या मुद्द्यांबद्दल आक्षेप नाही, परंतु, in the bargain, you are missing the bigger picture somewhere, अशी शंका येते. तूर्तास इतकेच.

(टीप: मी सनातनधर्माचा – किंवा फॉर्दॅटमॅटर कोणत्याच धर्माचा – फॅन आणि/किंवा समर्थक नाही. फार फार तर, to each, his or her own poison एवढेच मानतो. आणि, (एतद्द्वारे) सनातन आणि/किंवा कोठल्याच धर्माचे समर्थन आणि/किंवा बचाव करू इच्छीत नाही.)

अहिरावण Sat, 30/09/2023 - 12:40

In reply to by रेवती१९८०

>>सनातन धर्माच्या बाजूने बोल णाऱ्यानी उद्यापासून शेंडी राखावी, धोतर नेसून फिरावे, तिन्ही त्रिकाळ संध्या करावी, केळीच्या पानावरच जेवावे आणि घरच्या लक्ष्मीला येता जाता दुरुत्तरे करावीत.

फाउल.
आम्ही सनातन धर्माच्या बाजुने बोलतो पण
आमच्यात शेंडी राखत नाहीत. कारण आमच्यात मुंज होत नाही. चांडाळ जातीचे आम्ही....
सनातन धर्म शेंडी राखाच असे सांगत नाही. मुंज कराच असे सांगत नाही.
धोतर आधीपासून नेसत आहोत. धोतर नेसणे ही सनातन धर्माची व्यवच्छेदक खुण नाही. अनेक जैन, बौध्द्द धोतर नेसतात.
संध्या मुंज नसल्याने प्रश्नच नाही. मुंज असती तरी सनातन धर्म संध्या कराच असा आग्रह करत नाही.
केळीच्या पानावर जेवण अख्खा दक्षिण भारत करतो.. आम्ही पण करतो. सनातन धर्म केळीच्या पानावरच जेवा असा आग्रह करत नाही.
सनातन धर्म घरच्या लक्ष्मीला दुरुत्तरे करा असा आग्रह करत नाही, तरी घरच्या लक्ष्मीला काय करयचे ते ती आणि आम्ही पाहून घेउ...

तुम्हाला सनातन धर्मच कळलेला नाही.

अजुन काही....

रेवती१९८० Sun, 01/10/2023 - 12:42

In reply to by अहिरावण

सनातन धर्मातले आस्तिक अशक्य आणि भंपक गोष्टीवर पाच ही इंद्रिये बंद करून विश्वास ठेवतात कारण त्यात ईश्वराच्या महिमेचा पोवाडा गाईलेला असतो. एक अशी कथा ऐकलेली आहे की पार्वतीने आपल्या शरीरावर साठलेल्या मळा पासून पुतळा बनवला आणि नहाण्याच्या वेळी कोणी डोकावूं नये म्हणून त्या पुतळ्यात जीव फुंकला आणि त्याला पहाऱ्यावर बसवले. पुतळा तयार करण्याइतपत पाच पंचवीस किलो मळ तिच्या शरीरावर साठला होता? पार्वती काय दहा वर्षातून एकदाच नहात होती की त्यातून एक पुतळा बनला? पुतळ्यात कसा काय कोणी जीव फुंकू शकतो?, चला आपण समजू की ती भगवान शिवाची पत्नी होती म्हणून तिच्या साठी सर्व काही शक्य होते. पण प्रश्न हा आहे की ती काय चाळीत रहात होती की अंघोळ करताना कुणी बघेल? बर,तिसरा डोळा उघडून क्षणात भस्म करणाऱ्या भगवानाच्या बायकोकडे कुणी वाकड्या नजरेने बघेल? आहे हिम्मत?
मग साक्षात् भगवान शिव आले आणि आत जाऊ लागले. जिवंत पुतळ्याने त्यांना प्रवेश नाकारला. झालं, क्रोध ज्याच्या नसा नसात भरला आहे अशा भूतनाथाने त्याचे मुंडके की हो उडवले? कारण काय तर पुतळ्याने जय जय शिव शंकर यांना ओळखलेच नव्हते. कसे ओळखणार? मी पार्वतीचा पती आहे असे आय कार्ड देवोंके देवांच्या गळ्याभोवती नव्हता. होता तो जहरीला नाग. आता या क्षणी डसेल असा फणा काढून फूत्कार करणारा. मुंडके उडून बाजूला पडले त्या क्षणी पार्वती अवतरल्या. सुस्नात. तो मर्डर त्यांनी पाहिला आणि त्या विलाप करू लागल्या. मुंडके आताच्या आता, अब और इसी वक्त, जोडा असा स्त्री हट्ट त्यांनी धरला. परंतु महा महादेव यांना ते काही जमले नाही. तिथेच मॅटर्निटी वॉर्ड मधून नुकतीच बाहेर पडलेल्या हत्तिणिच्या पिल्लाचे शिर कापून त्या पुतळ्याला जोडले आणि श्री गजानन अवतरले. महादेवाना ना ब्लड ग्रुपची अडचण आली ना सर्जरी करावी लागली. हे गजानन इतके अतरंगी होते की ते म्हणाले मीच प्रथम देवता. मग सर्व देवी देवतांची शर्यत लावण्यात आली. त्या शर्यतीत पृथ्वी प्रदक्षिणा करायची आणि जो पहिला येईल तो प्रथम देवता असेल असे ठरले. गजानन यांनी पार्वतीला, आपल्या मातोश्रीना प्रदक्षिणा घातली आणि म्हणाले की हीच ती पृथ्वी प्रदक्षिणा. सर्व देवी देवतांना त्यांनी येडा बनवले. जसे आताच आपल्याला दहा दिवस येडा बनवून वेठीला धरले आणि कानाची वाट लावली. टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन आणि जन जागृती साठी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता अचकट विचकट आणि अश्लील या पातळीवर येऊन पोचला तरी गणेश बुवांचा मोदक खाण्याचा हव्यास काही सुटत नाही. गेले की ब्रिटिश आता पंच्याहत्तर वर्षापूर्वी. कशाला पाहिजे आता सार्वजनिक गणेशोत्सव? दहा दिवस डीजे, त्यात टीवीतल्या तारे तारका ढोल बडवणार, सनातन धर्माचे दारू प्यायलेले तरुण त्यात चाळीस पन्नास तास नाचणार, गर्दीत तरुणींच्या मागे चिकटणार, जमल्यास त्यांच्या
ढुंगणाला चिमटा काढून आपण त्या गावचेच नाही असा आविर्भाव दाखवणार, विसर्जनाच्या वेळी पाच पंचवीस जण मरणार, शेकडो मोबाईल चोरी करणार, पोलिसांना बंदोबस्तात गुंतवून त्यांच्या फॅमिली लाईफची वाट लावणार आणि जमलेल्या वर्गणीचा ताळेबंद मांडताना त्यात गफला करून पैसे खाणार. हा आहे सनातन धर्म.

सनातन धर्म तिन्ही त्रिकाळ खाऊन खाऊन पिऊन पिऊन ज्यांना त्याचे अजीर्ण झाले आहे त्यांच्यासाठी बाजारात आयुर्वेदिक चूर्ण आणि वटी मिळते. त्यामध्ये सगळ्यात हमखास गुण येणारी वटी म्हणजे प्रभाकर फार्मसीचे नानावटी. एकदाच सकाळी घ्यायचे. संध्याकाळपर्यंत कोठा एकदम साफ. त्यावर तिसरी कसम मधल्या हिराबाईने बनवलेले पान खायचे. एका प्रसंगात ती हिरामण गाडीवाल्याला म्हणते, " ऐ हिरामन, पान खाओगे का?" तो बिचारा पान खातो पण लाल शिंतोडे त्याच्या कुर्त्यावर पडतात. "उड़ उड़ बैठी पनवड़िया दुकनिया, आरे, बीड़ा के सब रस ले लिया रे पिंजड़े वाली मुनिया" ह्या गाण्याचे शब्द बॅकग्राऊंडला वाजत राहतात. हिराबाई परत म्हणते, " ऐ हिरामन, का हुआ? कहां खुई गवा?" काल मी हा चित्रपट पाहिला. ती " ऐ हिरामन.." म्हणते तेंव्हा मला "अई रावन" असे ऐकू आले. अरे तो ऐरावण, मैरावणचा भाऊ.
....

https://chng.it/fRSsjJWf

Please sign the above petition for noise pollution. Don't pay any money but forward it to the like minded people We must stop this menace from growing multifold.

Rajesh188 Wed, 07/02/2024 - 23:50

चार्वक्या पासून अनेकांनी धर्म,आत्मा ,अध्यात्म ह्या वर टीका केली.
नको नको ते सिद्धांत मांडले पण लोकांनी सर्वांना झिटकारले आहे.
आज पण जगात धर्म,आत्ना,स्वर्ग,कर्म सिद्धांत हेच सत्य आहे असे मानणाऱ्या लोकांची संख्या खूप प्रचंड आहे हे न मानणाऱ्या लोकांची संख्या अगदी नगण्य आहे त्यांची खिल्ली उडवली जाते.

Rajesh188 Thu, 08/02/2024 - 00:24

देव नाही,आत्मा नाही. ह्या वर किती ही बुध्दी वापरून देव नाकारला,आत्मा नाकारला तरी लोक ते स्वीकारत नाहीत.

लोकं देव नाही ,आत्मा नाही ,ह्या जगाचा निर्माण करता कोणी नाही हे तेव्हाच स्वीकारेल .
जेव्हा प्रतेक माणसाला आर्थिक स्थिरता मिळेल, सुरक्षा मिळेल,पोट भर अन्न मिळेल,न्याय मिळेल, .

युद्ध जन्य स्थिती निर्माण होणार नाही,नैसर्गिक आपत्तीचा चे संकट येणार नाही.

आजार, रोग पासून पूर्ण मुक्ती मिळेल..तेव्हाच लोक देव,धर्म,आत्मा नाकरतील.
जो पर्यंत वरील सर्व गोष्टी साध्य होणार नाहीत तो पर्यंत कोणताच धर्म नष्ट होणार नाही..देव मानणाऱ्या लोकांची संख्या कमी होणार नाही.
ह्या जगाचा कोणी तरी निर्माण करता आहे ह्या वर र्चा र्विश्वास कमी होणार नाही....