Skip to main content

मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३२

...

राजेश घासकडवी Wed, 04/02/2015 - 12:05

होलोकॉस्ट डिनायल करणे फ्रान्समध्ये बेकायदेशीर आहे. याला अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला का म्हणू नये?

चर्चेसाठी हा छान विषय आहे. होलोकॉस्ट नाकारणं हा गुन्हा फ्रान्सच नव्हे तर जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जियम वगैरे इतर देशातही आहे. प्रत्येक देशातल्या कायद्याचा फ्लेवर थोडा वेगळा आहे. काही ठिकाणी हेट-स्पीचचे कायदे आहेत, त्यात जेनोसाइड नाकारणे हा हेट-स्पीचचा प्रकार धरलेला आहे. काही देशांत नाझी क्रूरकर्मांसाठी कायद्यामध्ये उल्लेख करून विशेष तरतूद केलेली आहे.

अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नाही हे तत्त्व अनेक देशांच्या कायद्यांमध्ये स्पष्ट केलेलं आहे. गच्च भरलेल्या थिएटरमध्ये आग नसतानाही 'आग, आग' असं ओरडण्याचं स्वातंत्र्य कुठेच नाही. कारण अशा ओरडण्यातून जी पॅनिक निर्माण होते, त्यातून चेंगराचेंगरीतून लोकं मरू शकतात. असा मृत्यूतून होणारा तोटा हा त्या विशिष्ट व्यक्तीचं अभिव्यक्तीव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याच्या फायद्यापेक्षा अधिक आहे हे सर्वमान्य आहे. त्यामुळेे कुठे ना कुठे प्रत्येक देश/समाज अभिव्यक्तीवर बंधनं घालतोच.

याचा अर्थ असाही नाही की सर्वच समाजांना हवी ती बंधनं लादण्याचा अधिकार आहे. जोपर्यंत एखाद्या अभिव्यक्तीतून 'क्लीअर आणि प्रेझेंट डेंजर' नसतं तोपर्यंत ती चालवून घ्यावी. 'या अभिव्यक्तीने आमच्या भावना दुखावतात, त्यामुळे आम्ही दंगे करायला प्रवृत्त होतो' असा युक्तिवाद स्वीकारला जाऊ नये.

अजो१२३ Wed, 04/02/2015 - 12:12

In reply to by राजेश घासकडवी

मार्मिक.
--------------
प्रत्येक जण स्वतःप्रमाणे काय योग्य स्वातंत्र्य आणि काय अयोग्य स्वातंत्र्य याचा अर्थ काढायला जातो नि घोळ होतो.

ऋषिकेश Thu, 05/02/2015 - 15:14

फेसबुकावर एक बातमी फिरतेय, की म्हणे साक्षी महाराज नोव्हेंबर २०१३ मध्ये ट्विटरवर म्हणाले होते, की दिल्ली आणि मुंबईच्या मुली भारतीय संस्कृतीसाठी "बहुत बडा खतरा" झाल्या आहेत. त्यांना "काबू मे लाने के लिये" बीजेपी का जितना अत्यंत आवश्यक है! :)

अर्थात हे आता फेसबुकवर फिरण्यामागचे निवडणुकांच्या जवळचे "टायमिंग" समजू शकतो पण तरीही कधीही केले असले तरी मी हे वक्तव्य ऐकून सर्द झालो. राग वगैरेपेक्षा आता अशा व्यक्तींची कीव येते!

आशा आहे गेल्या सव्वा वर्षात त्यांना त्यांची चुक उमगली असेल नी ते बरे झाले असतील!

मेघना भुस्कुटे Thu, 05/02/2015 - 15:23

In reply to by ऋषिकेश

हे आजच ऐकले. माझे ’खतरनाक’ स्टेटस ऐकून कान तृप्त झाले. हे लोक काय करू शकतील किंवा कितपत धोकादायक ठरतील, हा खरा मुद्दाच नव्हे. यांची असले काही बरळायची हिंमत होते, याचाच अर्थ काहीतरी चुकते आहे.

अर्धवट Thu, 05/02/2015 - 15:28

In reply to by मेघना भुस्कुटे

किंचितसा मतभेद -
या लोकांची असलं काही बरळायची हिंमत होते हा मुख्य मुद्दा नव्हे,
माझ्यातरी आजूबाजूला असलं काही आणि याउप्परही गावगप्पा मारणारे लोक पाहिले आहेतच, फक्त हे बोलणारे लोक लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवू शकणार्या संसदेत जाऊन बसतात तेव्हा खरी धडकी भरते.
खरंच लोकांचे प्रतिनिधित्व करणारे हे विचार झाले असतील तर काहीतरी चुकत आहे हे नक्की.

अजो१२३ Thu, 05/02/2015 - 18:25

In reply to by अर्धवट

आणिबाणी लावून प्रिअँबल मधे सेक्यूलर शब्द बिना एका शब्दाच्या चर्चेने घुसडणारी साडेसाती संसदेत असेल तर तितक्याच हिरीरीने विरुद्ध मत मांडणारे लोक देखिल संसदेत हवेत.

अर्धवट Thu, 05/02/2015 - 19:13

In reply to by अजो१२३

मी जे म्हणालोच नाही ते म्हणालोच असं भासवून त्याचाच प्रतिवाद करायची ट्रिक चांगली आहे पण खूप जुनी आहे. सो आय वोन्ट फॉल फॉर द्याट, सॉरी.

बायदवे "साडेसाती संसदेत असेल तर" या साडेसातीलाही माझा पाठींबा नाहीच पण मला (आणि ऐसीलाही ) जन्माला यायला जरा उशीरच झाल्यामुळे या साडेसातीला माझा विरोध असल्याचा पुरावा तुम्हाला मिळू शकत नाही,

एक अवांतर प्रामाणिक प्रश्न - माझा या साडेसातीला पाठींबा असेल असं का बरं वाटलं तुम्हाला?

अजो१२३ Thu, 05/02/2015 - 19:27

In reply to by अर्धवट

एक अवांतर प्रामाणिक प्रश्न - माझा या साडेसातीला पाठींबा असेल असं का बरं वाटलं तुम्हाला?

मला असं वाटलेलं नाही. But an extremity of one kind counter-produces extremity of another kind. असो. आपला पैकी कोणत्याच टोकाच्या भूमिकेला पाठिंबा नाही हे स्पष्टच आहे. माझं म्हणणं कुठेतरी मांडायचं म्हणून मांडलं.

गब्बर सिंग Thu, 05/02/2015 - 21:55

In reply to by अर्धवट

माझ्यातरी आजूबाजूला असलं काही आणि याउप्परही गावगप्पा मारणारे लोक पाहिले आहेतच, फक्त हे बोलणारे लोक लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवू शकणार्या संसदेत जाऊन बसतात तेव्हा खरी धडकी भरते

Bad currency drives good currency out of circulation.

Nile Thu, 05/02/2015 - 21:15

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या राजवाडे यांच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत डांगे यांनी मनुच्या आधी वर्ण आळीपाळीने बदलत असत असा उल्लेख केला आहे. (म्हणजे, आजच्या पिढीतील लोकांचा एक वर्ण असेल तर पुढे दोन तीन पिढ्यानंतर तो बदलतो.) हे कितपत खरे आहे हा एक प्रश्न झाला, पण जर त्यात तथ्य असेल तर असे का होत असावे? कोणत्याही समाजात महत्वाची कामं जर विभागली गेली असतील तर ती बदलली जाणे साहजिक वाटत नाही.

धर्मराजमुटके Thu, 05/02/2015 - 22:06

मुंबईतून बाहेर पडून जेव्हा बाहेर छोट्या शहरात / गावांत जातो तेव्हा तेथे दुकान (शॉप) आढळत नाही तर शॉपी आढळते. याचे काय बरे कारण असावे ?

अतिशहाणा Fri, 06/02/2015 - 00:24

मनातील छोटा प्रश्नः

काळ्या पैशाबाबत निवडणुकीच्या काळातील मोदींची वाक्ये या 'म्हणी' होत्या म्हणे! http://www.esakal.com/Tiny.aspx?K=EC9BL

'अच्छे दिन आनेवाले है!' ही देखील म्हण आहे काय?

बॅटमॅन Fri, 06/02/2015 - 12:42

In reply to by आदूबाळ

मला वाटतं की 'खाशी जिरली' या वाक्प्रचाराचं ते शॉर्ट हँड रूप असावं. खाशी (घमेंड) जिरणे हे अभिप्रेत असू शकेल.

अतिशहाणा Fri, 06/02/2015 - 17:06

In reply to by आदूबाळ

मला वाटतं जिरणे हा प्राण्यांच्या संभोगासंदर्भातील हा काहीतरी अश्लील शब्द आहे. नक्की त्याचा अर्थ आता आठवत नाही. अजागळ, गलथान, आयला, मायला, च्यायला, लेका वगैरेही त्याच पठडीतले सोज्वळ झालेले शब्द. तसेच आता मारणे, फाटणे वगैरे शब्दही सार्वजनिक ठिकाणी (मुलींनाही!) बोलता येतात

शहराजाद Sat, 07/02/2015 - 02:13

In reply to by अतिशहाणा

अजागळ- अजागलस्तन. बकरीच्या गळ्याजवळ्चा एक लोंबता निरुपयोगी अवयव.
गलथान- अजागळाशी संबंधित असावे

एखाद्याची जिरणे- खोडकी मोडणे / जिरणे यावरून आला आहे.

अमुक Fri, 06/02/2015 - 17:53

In reply to by आदूबाळ

काय "जिरणे" अभिप्रेत असतं?
...........सामान्यतः घमेंड, मस्ती, खोड, खाज.
(हे जिरणं 'टाळूवर तेल जिरते' यापेक्षा अर्थातच (!) वेगळं आहे.)

धर्मराजमुटके Sat, 07/02/2015 - 22:17

In reply to by नितिन थत्ते

अहो लाजता काय ? सांगा की रावं ! तुमच्या मनात अर्थ आला म्हणजे आता तुम्ही पुर्णपणे सभ्य नाहि राहिले.

सलील Fri, 06/02/2015 - 18:11

काल बायकोने एक गोष्ट सांगितली, मुलाच्या शाळेत ३ मुले अशी आहेत की ज्यांना वडील नसून २ आया आहे. तीनही घरात १ बाई घर बघते आणि १ कामाला जाते. आणि पुरुषांचे स्प्रेम वापरून मुले जन्माला घातली. तेंव्हा मनात विचार येतोय की हे बरोबर का चूक माहिती नाही पण त्या मुलांन्वर ह्याचा काय परिणाम होत असावा. बायको म्हणते काय फरक पदातोये तसेही अनेक लोक विभक्त होतात तसेच होत असेल. माहिती नाही पण थोडे विचित्र वाटले खरे कदाचित एकाच एक पाहायची सवय असल्याने थोडे वेगळे वाटले असावे मला

अर्धवट Sat, 07/02/2015 - 10:20

In reply to by अजो१२३

किंवा एक स्त्री एक दगड, अनेक स्त्रिया एक दगड, एक स्त्री एक तुळस वगैरेही कॉम्बो असू शकतो ना.

नगरीनिरंजन Fri, 06/02/2015 - 18:41

In reply to by सलील

सगळंच कसं हवं असतं लोकांना याचं आश्चर्य आणि किळस वाटल्याशिवाय राहात नाही. सालं आहात वेगळे बहुसंख्यांपेक्षा हे मान्य करा की, समलिंगी आहात तर समलिंगी विवाह वगैरे सगळं मान्य आहे पण मग पोरं कशाला पाहिजेत विरुद्ध लिंगी व्यक्तीचं बीज वापरुन? सिक!!

सलील Fri, 06/02/2015 - 18:50

In reply to by नगरीनिरंजन

पूर्ण +१ म्हणवत नाहीये +१/२ म्हणतो. किळस नाही आली पण वाटलेच की अरे पोरे कशाला? मुदलात कितीही जनजागृती झाली आणि कायदे केले तरी एक ठराविक मर्यादे नंतर सगळेच लोक ह्याचा उदो उदो जो सध्या चालला आहे त्याच्या विरुद्ध जातीलच. तेंव्हा हे पण भरडले जाणारच आणि त्यांची पोरे पण. आपल्याकड इतर ह्या पोरांचे अजूनच हाल होतील.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/02/2015 - 02:01

In reply to by सलील

या विनोदाबद्दल स्प्रेम नमस्कार

अर्धवट Sat, 07/02/2015 - 10:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या चर्चेमधे हे सर्व अवांतर होईल याची जाणीव असूनही लिहितोच,

मूल कशाला हवे या प्रेरणेचा संबंध वैयक्तिक कॉन्शस जाणीवेतून आलेल्या निवडीपेक्षाही उत्क्रांतीच्या तत्त्वातून आलेल्या सबकॉन्शस कंपल्शनशी खूप जास्त असतो, कोट्यावधी वर्षे असलेल्या 'मूल'भूत प्रेरणा एका आयुष्यात सहजी झटकून टाकता येणार नाहीत.

१ - अशी सगळीच सबकॉन्शस कंपल्शन पुढे वाहून नेण्याजोगी असतीलच असे माझे म्हणणे नाही.
२ - त्या प्रेरणा झटकून टाकाव्यात की नाही यावर मी काहीही मतप्रदर्शन केलेले नाही.

अजो१२३ Fri, 06/02/2015 - 19:06

In reply to by नगरीनिरंजन

निसर्गात ऑर्डर नाही, सम्यकता नाही, काहीही योग्य/सुंदर म्हटलं जाऊ शकतं, नॉर्मल किंवा नैसर्गिक असं काहीच नाही असं मानलं कि हे लोचे होतात. मग फक्त स्त्रीयांचेच (वा फक्त पुरुषांचेच) घर कशाला. टेक्नॉलॉजी परमिटेड, एक दोन प्राणीही घ्या. आणि मुले नॉर्मल झालेली का हवीत? पोटची का हवीत? आपल्याच स्पेसीसची का हवीत? आणि हवीतच कशाला? मग कोणत्याही पद्धतीने मुले जन्मवा. कोणतेही प्राणीबालक दत्तक घ्या. घर हे एक आर्थिक लघु पशुसंग्रहालय युनिट बनवता येईल. यात असुंदर काय? तिकडेच तर आपण चाललो आहोत.

अर्धवट Sat, 07/02/2015 - 11:03

In reply to by अजो१२३

निसर्गात ऑर्डर नक्की आहे पण ती ऑर्डर हवीच असा निर्णय घेऊन आलेली नाही, भौतिकशास्त्राच्या नियमांनी आलेली आहे.

>> काहीही योग्य/सुंदर म्हटलं जाऊ शकतं, नॉर्मल किंवा नैसर्गिक असं काहीच नाही असं मानलं कि हे लोचे होतात.

वटवाघूळ-माणूस दृष्टांत -
वाघळांच्या एका कॉन्फरन्समध्ये एका सद्वाघळाने असा पेपर पब्लिश केला की जो ऐकुन सर्व विद्वान वाघळे वाघळे अगदी चकित झाली. त्या पेपरमधे असं संशोधन/ थेअरी मांडली होती की माणूस नावाची एक प्रजात वाघूळविज्ञानाने नुकत्याच शोधलेल्या फोटॉन नावाच्या लहरींच्या सहाय्याने आपले अन्न कमावतात वा कुठेही न धडकता येजा करतात. या फोटॉन लहरीं 'ऐकणारी' इंद्रिये या प्रजातीमध्ये उत्क्रांत झालेली आहेत. एवढेच नव्हे तर या फोटॉन लहरींच्या सहाय्याने हि इंद्रिये आपल्या भोवतालचे जे चित्र त्या प्रजातीच्या मेंदूमध्ये बनवतात ते कदाचित आपण नॉर्मली जितक्या स्पष्टपणे ऐकतो तितकेच स्पष्ट आणि तपशीलवार असू शकेल.
यावर त्यातील काही वाघळांना ही गोष्ट फारच अशक्य इतकेच नव्हे तर अपमानास्पद वाटली कारण मानवासारखी एक साधी प्रजाती एका विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकत असेल, की ज्या तंत्रज्ञानावर अजून वाघूळ प्रजातीलाही पूर्ण प्रभुत्व मिळवता आलेले नाही.

_____________________________________________

आणि मुले नॉर्मल झालेली का हवीत? पोटची का हवीत? आपल्याच स्पेसीसची का हवीत?
हे प्रश्न अज्ञानमूलक आहेत असे नोंदवतो.
मुले नॉर्मल म्हणजे नक्की व्याख्या काय?
मुले पोटचीच असतात की कायम, त्यासाठी जीन्स देणारे दाते वेगळे असतील कदाचित.
आपल्याच स्पेसीजची म्हणजे काय?
स्पेसीजची व्याख्या मुळातून तपासावी, स्पेसीज म्हणजे ज्या समुहातील दोन जननक्षम घटकांनी एकत्र आल्यास नॉर्मली जननक्षम संतती निर्माण होऊ शकते असा समूह, अर्थात ही मी संदर्भासाठी धरलेली आणि जगन्मान्य व्याख्या आहे, तुमच्या मनात दुसरी कोणती व्याख्या असेल तर तसे सांगा.

अजो१२३ Mon, 09/02/2015 - 11:06

In reply to by अर्धवट

निसर्गात ऑर्डर नक्की आहे पण ती ऑर्डर हवीच असा निर्णय घेऊन आलेली नाही, भौतिकशास्त्राच्या नियमांनी आलेली आहे

भौतिकशास्त्राच्या नियमांत तरी ऑर्डर का असावी किंवा त्या नियमांना निसर्गात ऑर्डर का अभिप्रेत असावी?
------------
दृष्टांत का दिला आहे ते समजले नाही. म्हणजे संदर्भ लागला नाही.
-------------
दोन स्पेसिजमधे ब्रीडींग होऊन तिसरी निर्माण होते. स्पेसीज इक नॉट ओन्ली अबाउट ब्रीडींग. असो. पण तुमचे प्रश्न पुढे नेत सजीवसुर्‍ष्टी तरी का असावी, ती नसली तर काय बिघडते असे प्रश्न विचारता येतात.

अर्धवट Mon, 09/02/2015 - 11:36

In reply to by अजो१२३

>>>भौतिकशास्त्राच्या नियमांत तरी ऑर्डर का असावी किंवा त्या नियमांना निसर्गात ऑर्डर का अभिप्रेत असावी?

का असावी ते माहित नाही, असावी की नसावी तेही माहित नाही, पण आहे हे मात्र नक्की. उदाहरणार्थ पाणी एका तापमानाला प्रवाही आणि एका तापमानाला घन असते हे नक्की, ते तसे का असावे या प्रश्नाला माझ्या मते काही अर्थ नाही.

>>दृष्टांत का दिला आहे ते समजले नाही. म्हणजे संदर्भ लागला नाही.

ओके, नो प्रॉब्लेम.

>>दोन स्पेसिजमधे ब्रीडींग होऊन तिसरी निर्माण होते. स्पेसीज इक नॉट ओन्ली अबाउट ब्रीडींग. असो. पण तुमचे प्रश्न पुढे नेत सजीवसुर्‍ष्टी तरी का असावी, ती नसली तर काय बिघडते असे प्रश्न विचारता येतात.

दोन स्पेसीज मधे ब्रीडिंग होऊन तिसरी निर्माण होते हे धादांत असत्य आहे अथवा मोठ्या गैरसमजावर आधारित विधान आहे. आपणाला खरंच हे माहित नसेल तर स्पष्टीकरण द्यायला मी तयार आहे. पण त्याआधी आपला याबाबतीतला (गैर)समज स्पष्ट शब्दात सांगितलात तर संवाद होऊ शकेल.
दोन स्पेसीजमधे नैसर्गिकरीत्या कधीही ब्रीडिंग होत नाही, समजा तसा प्रयत्न केलाच आणि समजा तो यशस्वी झालाच तरीही जन्माला येणारी प्रजा स्टराईल असते.

१ - इथे स्पेसीज हा शब्द जीवशास्त्रीय व्याख्येप्रमाणे वापरला आहे.
२ - उत्क्रांतीच्या विषयात रस असणाऱ्या लोकांसाठी अधिक माहिती - एकाच स्पेसीजच्या एकाच प्राणीसमुहाच्या दोन भागांमध्ये खूप काळ3 ब्रीडिंग झाले नाही. म्हणजेच हे प्राणीसमूह काही भौतिक अडथळे अथवा इतर कारणामुळे खूप काळ वेगळे व वेगळ्या परिसरात राहिले, म्हणजे पुढे त्यांचे गुणधर्म इतके बदलतात की एक वेळ अशी येते की ते आपापसात ब्रीडिंग करू शकत नाहीत, असे झाल्यास मूळ एका स्पेसीज पासून या दोन स्पेसीज निर्माण झाल्या असे आपण म्हणतो.
3 - हा काळ काही हजार ते काही लाख वर्षे असू शकतो, याचा नक्की फॉर्म्युला उपलब्ध नाही, म्युटेशन रेट, सिलेक्शन फोर्सेस, लाईफस्पैन वगैरे बऱ्याच बाबींवर तो अवलंबून असतो.
४ - भौतिक अडथळे अनेक असू शकतात उदा. जमिनीचा मोठा खंड वेगळा होऊन वहात जाणे, मुख्य भूभागापासून तोडले जाऊन एखाद्या पुरामध्ये काही प्राणी एखाद्या बेटावर जाऊन पडणे, एखाद्या जहाजातून एका नवीन भूभागावर जाणे इत्यादी.
५ - घोडा, गाढव आणि खेचर यांचा अभ्यास यासाठी उपयुक्त ठरू शकेल.

अजो१२३ Mon, 09/02/2015 - 11:43

In reply to by अर्धवट

दोन स्पेसीजमधे नैसर्गिकरीत्या कधीही ब्रीडिंग२ होत नाही, समजा तसा प्रयत्न केलाच आणि समजा तो यशस्वी झालाच तरीही जन्माला येणारी प्रजा स्टराईल५ असते.

नक्की? सध्याची युरोप आणि एशियामधली माणसे होमो सेपियन्स आणि निअँडरथॅल्स यांची इंटरब्रीड आहेत. आणि ते स्टराईल नाहीत हे आपण पाहतच आहोत.

अर्धवट Mon, 09/02/2015 - 12:04

In reply to by अजो१२३

>>नक्की? सध्याची युरोप आणि एशियामधली माणसे होमो सेपियन्स आणि निअँडरथॅल्स यांची इंटरब्रीड आहेत. आणि ते स्टराईल नाहीत हे आपण पाहतच आहोत.

अगदी १००% नक्की, तुही म्हणताय तसं इंटरब्रीड हे संपूर्ण अशक्य आहे, आपला काहीतरी मोठा गैरसमज झालेला दिसतो.

याउप्पर होमो सेपियन्स आणि निअँडरथॅल्स हे जेव्हा नुकतेच सेपरेट झाले होते तेव्हा असे ब्रीडिंग शक्य आहे, परंतु असे ब्रीडिंग जेव्हा झाले असेल तेवा या दोन्ही प्रजाती संपूर्ण वेगवेगळ्या ओळखू येणे शक्य नाही कारण स्पेसीज कंटिन्युअम हा एक मोठा प्रकार आपण इथे लक्षात घेतलेला नाहीये.
तुम्ही म्हणता त्याचे आणखी एक कारण सबस्पेसीज पाथ हे असू शकेल. म्हणजे होमो सेपिअन आणि यांच्या मधली आजून एक स्पेसीज अस्तित्वात असताना हे झालेलं असू शकेल.

रिगार्डलेस ऑफ धिस चर्चा - दोन स्पेसीजमधे ब्रीडिंग होऊन तिसरी स्पेसीज तयार होते हे विधान आपण मागे घेत आहात काय?

१ - स्पेसियेशन पूर्ण झाल्यानंतरचं बोलतोय मी. कारण स्पेसीजची व्याख्याच तशी आहे.

अतिशहाणा Fri, 06/02/2015 - 19:11

In reply to by नगरीनिरंजन

या प्रतिसादातून ज्यांना मुले होऊच शकत नाहीत त्यांनी मुले होण्यासाठी प्रयत्न करुच नयेत असे काही अभिप्रेत आहे काय?

अतिशहाणा Fri, 06/02/2015 - 19:20

In reply to by नगरीनिरंजन

नाही तसे अभिप्रेत नाही. बरं जाऊ द्या. मलाही आधी मुलांबाबतचा प्रकार थोडा वेगळा वाटत असे पण* शारीरिक/मानसिक मर्यादांमुळे एखाद्या/दीने वेगळ्या मार्गाने मातृत्वाचा अनुभव घेतला तर आश्चर्य वा किळस वाटत नाही. (आयवीएफ व तत्सम बीजारोपण केंद्रे यांचे फोफावणारे 'मार्केट' अर्थशास्त्रासाठी चांगलेच. शिवाय आणखी एक नवा कंझ्युमरही मार्केटमध्ये येणार)

* मॉडर्न फ्यामिली नामक एका सिटकॉममध्ये गे पालकांनी दत्तक घेतलेल्या मुलीला सांभाळणं दाखवलंय. सिटकॉम असल्याने अतिशयोक्ती, स्टीरिओटाईप वगैरे प्रकार अर्थातच आहे. पण कदाचित या मालिकेमुळे मला आता ते वेगळं वाटणं बंद झालंय असं वाटतं.

नगरीनिरंजन Fri, 06/02/2015 - 19:25

In reply to by अतिशहाणा

डिस्क्लेमर टाकणं म्यानडेटरी झालंय ऐसीवर. इथे किळस समलिंगी लोकांशी संबंधीत नाहीय. सगळंच हवं असणार्‍या लोकांच्या वृत्तीची किळस येते असं म्हटलंय मी.
फॉर द्याट म्याटर मूल झाल्यावर गरज म्हणून परदेशात सासूचा सहा महिने सहवास सहन करणार्‍यांनाही यात धरायला माझी हरकत नाही.

नंदन Sat, 07/02/2015 - 04:10

In reply to by नगरीनिरंजन

सगळंच कसं हवं असतं लोकांना याचं आश्चर्य आणि किळस वाटल्याशिवाय राहात नाही.

'किळस वाटणे' यामागच्या भावना पोचल्या, पण यात आश्चर्य वाटण्याजोगं काय आहे? पालकत्वाची भावना ही ऊर्मी आहे. ती जशी भिन्नलिंगी लोकांना असू वा नसू शकते, तीच गत समलिंगी व्यक्तींचीही. यात हव्यास कुठे आला?

सालं आहात वेगळे बहुसंख्यांपेक्षा हे मान्य करा की, समलिंगी आहात तर समलिंगी विवाह वगैरे सगळं मान्य आहे पण मग पोरं कशाला पाहिजेत विरुद्ध लिंगी व्यक्तीचं बीज वापरुन? सिक!!

यात 'हे मिळतंय तितकं स्वातंत्र्य घ्या. उपकार केलेत, अजून मागायचं नाही.' असा काही सूर आहे का? हेच लॉजिक वापरून कृष्णवर्णीयांनीही 'सेपरेट बट इक्वल'मधल्या अन्यायाविरूद्ध दाद मागू नये का?

जोवर कुणाची फसवणूक, शोषण वा बळजबरी करून हे साध्य केलं जात नाही; तोवर यात निषेधार्ह काय आहे?

असो. यावरून आयोवा राज्यातल्या दोन लेस्बियन स्त्रियांच्या मुलाचं मनोगत आठवलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/02/2015 - 11:25

In reply to by नगरीनिरंजन

अच्छा, म्हणजे आऊटसोर्सिंग सिक नाही का?

(पण, पण, पण मूल वाढवणं हे सुद्धा स्त्रियांसाठी अधिक आणि पुरुषांसाठी किंचित कमी, तरीही उत्क्रांतीजन्य नैसर्गिक प्रेरणेतूनच आलेलं आहे. ते का ब्रं चालतं?)

नगरीनिरंजन Sat, 07/02/2015 - 11:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आऊटसोर्सिंग? दत्तक घेतलं जाणारं मूल आधीच जन्माला आलेलं असतं असं वाटतं. चु.भू.दे.घे.

नगरीनिरंजन Sat, 07/02/2015 - 12:03

In reply to by नगरीनिरंजन

दत्तक घेण्याचा पर्याय असतो.

हे मिळतंय तितकं स्वातंत्र्य घ्या. उपकार केलेत, अजून मागायचं नाही.' असा काही सूर आहे का?

असा अजिबात सूर नाही. इथे समलिंगी असण्याचा काही विशेष संबंध नाही. सरोगेट आई वापरुन अपत्यप्राप्ती करणार्‍या हेटरोसेक्शुअलांबद्दलही हेच मत आहे.

पालकत्वाची भावना ही ऊर्मी आहे.

इफ विशेस वेअर हॉर्सेस द वर्ल्ड वुड हॅव बीन फुल ऑफ हॉर्सशिट.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/02/2015 - 13:59

In reply to by नगरीनिरंजन

इच्छा आणि नैसर्गिक प्रेरणा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. इच्छा - wish, desire. नैसर्गिक प्रेरणा - instinct.
---

दत्तक घेतलं जाणारं मूल हे पालकांना आपला लैंगिक कल समजण्याच्या किंवा जोडीदार निवडण्याच्या आधीच जन्माला येतं असं नाही.

नगरीनिरंजन Sat, 07/02/2015 - 15:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मान्य. पण इच्छा असो वा इन्स्टिन्क्ट्स त्यांच्यावर विचारांनी काबू ठेवणे यालाच सभ्यता म्हणतात ना?
काही इन्स्टिन्क्ट्स पूज्य आणि काही त्याज्य याचे भलतेच आर्बिट्ररी नियम आहेत.

बॅटमॅन Sun, 08/02/2015 - 20:25

In reply to by नगरीनिरंजन

काही इन्स्टिन्क्ट्स पूज्य आणि काही त्याज्य याचे भलतेच आर्बिट्ररी नियम आहेत.

साला हेच आम्ही कधीपासून बोंबलतोय तर सगळे गांधीजींच्या (की अजून कुणाच्या) माकडागत दुर्लक्ष करतात तिकडे.

अतिशहाणा Fri, 06/02/2015 - 19:13

In reply to by सलील

पण त्या मुलांन्वर ह्याचा काय परिणाम होत असावा

या विशिष्ट गोष्टीचा काहीही परिणाम होत नसावा. दारुडा बाप, घटस्फोटित आईवडील, बाहेरख्याली आई, भोचक नातेवाईक, स्वार्थी भावंडे यामुळे मुलांवर ज्या स्वरुपाचे परिणाम होऊ शकतात वा शकत नाहीत त्याच स्वरुपाचा काहीतरी परिणाम होईल असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.

Nile Fri, 06/02/2015 - 19:17

In reply to by अतिशहाणा

सहमत आहे. लोकांची बायनरी विचारसरणी पाहिली की अजूनही आश्चर्य वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/02/2015 - 11:16

In reply to by अतिशहाणा

प्रतिसादाचा आशय मान्य आहे, पण प्रतिसादातला माफीचा सूर मान्य नाही. घरात दोन आया किंवा दोन वडील असण्याचं प्रमाण वाढत जाईल तसा त्यातला टॅबूही कमी होत जाईलच. पण त्यापेक्षाही दोन आई/वडील चांगले, प्रेमळ पालक असू शकतात आणि इतर 'नॉर्मल' घरांमध्ये मुलं जितपत आनंदात वाढतात तितपत आनंदात या कुटुंबांमध्येही मुलं वाढू शकतात.

नितिन थत्ते Sat, 07/02/2015 - 17:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>घरात दोन आया किंवा दोन वडील असण्याचं प्रमाण वाढत जाईल तसा त्यातला टॅबूही कमी होत जाईलच.

प्रमाण कितपत वाढेल? मुळातच डिफरंट ओरिएण्टेशन असलेल्यांचं प्रमाण नगण्य/अत्यल्प असेल तर या प्रकारच्या जोडप्यांचं प्रमाण त्याहून अत्यल्प असेल. म्हणजे हे प्रमाण एकूण कुटुंबसंख्येच्या प्रमाणात वाढणार नाही. त्यामुळे त्या कुटुंबांची समाजाला सवय होऊन जाईल इतकी काही संख्या वाढणार नाही.

ती तशी वाढली..... म्हणजे डिफरंट ओरिएण्टेशन असलेल्यांची संख्या सध्या १ टक्का असेल आणि पुढे ती १५ % झाली तर मग डिफरंट ओरिएण्टेशन हे नॅचरल न मानता इन्ड्यूस्ड मानावे लागेल.
.
.
.
.
.
अवांतर: अभ्यास असणे किंवा नसणे म्हणजे काय?

अजो१२३ Wed, 11/02/2015 - 12:10

In reply to by अतिशहाणा

या विशिष्ट गोष्टीचा काहीही परिणाम होत नसावा.

सहमत. निसर्गप्रणित अशी पालकत्वाची संकल्पना नसावी. बॅक्टेरिया, गांडूळ इ इ मधे सुद्धा एक आई एक बाप असे पालक नसतात. त्यांच्या मुलांवर काय परिणाम होतो? काहीही नाही. मग माणसाच्याच मुलांवर का होईल?

नितिन थत्ते Sat, 07/02/2015 - 19:41

In reply to by गवि

शॉर्टनिंग म्हणजे (मैद्याच्या केसमध्ये) ग्लूटेनच्या लांब चेन्स निर्माण होऊ न देणे. त्यासाठी सहसा कोणतेतरी फॅट वापरतात. तेल, तूप बटर इत्यादि.

http://en.wikipedia.org/wiki/Shortening

'न'वी बाजू Sat, 07/02/2015 - 21:01

In reply to by गवि

...ही मराठीतील 'मोहन' अशा अर्थाची जेनेरिक संज्ञा आहे. त्यात तेल, तूप, डालडा इथपासून ते पार डुकराच्या चरबीपर्यंत काय वाटेल ते समाविष्ट होऊ शकते.

गवि Wed, 11/02/2015 - 12:22

In reply to by 'न'वी बाजू

उपरोक्त माहितीनुसार शॉर्टनिंग म्हणजे मुख्यतः रूम टेम्परेचरला घन असणारी फॅट असं दिसतंय. उदा मार्गरिन, लार्ड वगैरे.

मोहन म्हणजे बहुधा तेल किंवा द्रवरुप स्निग्ध पदार्थ असावेत.

रुची Thu, 12/02/2015 - 00:18

In reply to by गवि

शॉर्टनिंगचा वापर मोहनसदृश्य असला तरी सामान्यतः लार्ड, वनस्पती तूप या गोष्टी शॉर्टनिंग म्हणून वापरतात. माझ्या अंदाजाने लार्ड, सुएट, वनस्पती तूप हे स्निग्ध पदार्थ वितळण्याचा आणि जळण्याचा (धूर वगैरे होणे, स्मोकिंग पॉईंट) बिंदू अन्य स्निग्ध पदार्थांहून बराच जास्त असल्याने शॉर्टनिंग म्हणून हे पदार्थ वापरतात.

Nile Mon, 09/02/2015 - 06:53

अरूणजोशींना ऋण श्रेण्या देऊ नयेत अशा अर्थाची बहुसंख्य "सिग्नेचरं" असताना त्यांच्या प्रतिसादांना धन श्रेण्या कशा नाहीत असा एक सांख्यिक प्रश्न पडला. देव-दैवावाद्याचं यावर काय मत आहे? ;-)

मन Mon, 09/02/2015 - 09:45

In reply to by Nile

vocal minority, active but silent majority वगैरे संज्ञा आठवून गेल्या.
बोलणारे दिसतात, डोळ्यावर येतात.गुमान गेम करुन चालू लागणारे संख्येने अधिक असावेत.
शिवाय भगवंताबद्दल हिंदित एक म्हण/मुहावरा आहे :-
उसकी लाठी लगती है, लेकिन आवाज नही करती.
.
.
तसे काही असावे. साक्षात भगवंताने गेम केला असावा.

गवि Tue, 10/02/2015 - 17:03

मोबाईल फोन या एकमेव उपकरणामुळे बरीच इक्वेशन्स पूर्ण बदलली. बरीच ऑब्सोलीटही झाली असावीत.

केवळ कोणालाही कुठूनही केव्हाही फोन करता येणे इतक्या एका सोयीमुळे अनेक चित्रपटांच्या कथेचे मूळ गाभेच नष्ट झाले असते आणि इतर अनेकांतलं नाट्य संपलं असतं.

अश्या कथा / सिनेमे / कादंबर्‍यांचा विचार करताना काही नावं पटकन मनात आली.

चुकामूक या थीमवरच्या अनेक कथा (या ठिकाणी या वेळी भेटू असं म्हणून अपघाताने अथवा अन्य कारणाने एकजण पोचूच न शकणे आणि दुसर्‍याने वाट पाहून कायमचे निघून जाणे.)

"कभी हां कभी ना" सिनेमात अ‍ॅना आणि क्रिसची कार्निवलनजीक भेटण्याची वेळ आधी ठरलेली असताना ती खोट्या निरोपाने बदलून त्या भेटीचा बट्ट्याबोळ करण्याचा सुनीलचा यशस्वी प्लॅन. अ‍ॅनाचं वाट बघून निराश होणं, रागावणं आणि सुनीलसोबत कार्निवलमधे भाग घेणं वगैरे. जगात मोबाईलफोन आहेत या एका जाणिवेनेसुद्धा या भागाचा गाभा नाहीसा झाला असता. मुळात वेळेचा बदल थेट एकमेकांना मोबाईलने सांगितला गेला असता आणि जागेवर पोचून वाट पाहण्याऐवजी "अजून का आला नाहीस" हे विचारलं गेलं असतं.

अनेक हॉरर मूव्हीजचा यूएसपी असलेलं एखाद्या वाड्याचं किंवा ठिकाणाचं आयसोलेशन मोबाईलने विरळ झालं असतं.

अत्यंत गाजलेली एखादी अशी मोबाईलपूर्व काळातली कलाकृती / थीम आहे का की जी या एका शोधाने पूर्ण अप्रस्तुत ठरली असती..?!

नितिन थत्ते Tue, 10/02/2015 - 17:23

In reply to by गवि

दूरदर्शन मालिकांच्या सुरुवातीच्या काळात "श्वेतांबरा" ही मालिका होती. 'वूमन इन व्हाइट' या कादंबरीवर बेतलेली. त्याचा काळ कुठलासा १७ व्या शतकातला होता. त्यात पत्रे कुणाच्या तरी हाती पाठवण्याची सोय होती. या वस्तुस्थितीमुळे अनेकदा नायिकेचे डिस्ट्रेस कॉल ज्याच्या हाती पत्र पाठवले त्याला कळून नायिका असहाय झालेली दिसे. "पत्रे हाती पाठवणे" ही स्थिती आउटडेटेड झाल्यामुळे या मालिकेतले प्रसंग १९८०च्या दशकात विचित्र वाटत असत. तसेच काहीसे मोबाइलपूर्व कथांचे होईल.

आख्खा शेरलॉक होम्स मोबाइलच्या शोधाने अप्रस्तुत ठरेल.

खरी घडलेली घटना......

माझी पत्नी आणि तिची मैत्रिण एकदा भेटणार होत्या. दादरला प्लॅटफॉर्म क्र १ वर मिडल लेडीजपाशी भेटायचे ठरले होते. त्यानुसार दोघी तेथे गेल्या. नंतर एकमेकींना मनसोक्त शिव्या देऊन झाल्यावर दादरला प्लॅटफॉर्म क्र १ नावाच्या दोन वास्तू आहेत हे लक्षात आले. :)

अनुप ढेरे Tue, 10/02/2015 - 17:26

In reply to by नितिन थत्ते

इथेच बीबीसीच्या नव्या शेरलॉकचे लेखक जिंकले आहेत. गाय रिची विरुद्ध. बीबीसीवाल्यांनी नया जमान्यातला शेरलॉक भारी उभा केलाय. टेक्स्ट पाठवणारा, फोन क्यामेरा वापरणारा. गाय रिचीने जुनाच शेर्लॉक उभा केलाय. जो त्यामानाने पिचकवणी वाटतो.

मेघना भुस्कुटे Tue, 10/02/2015 - 17:31

In reply to by अनुप ढेरे

थत्तेचाच्यांच्या विरोधात - आणि ढेरेशास्त्र्यांच्या खांद्याला खांदा लावून - उभं ठाकण्याचे प्रसंग विरळा का काय ते. आज ह्या ठिकाणी, ह्या माधमातून या विरळा प्रसंगाची नोंद करण्यात येत आहे.

चिमणराव Wed, 11/02/2015 - 18:21

माजणे चेकाळणे वगैरे हत्तीँच्या संदर्भात असते हे पाहतो. विमानप्रवासाला जाणे किंवा संस्थळावर जाताना मनुष्यप्राणीसुद्धा असं करायच्या विचारात असतो का?

वृन्दा Wed, 11/02/2015 - 21:16

एखादा आरोग्यविषयक बातम्यांचा धागा काढला तर? मला तरी आरोग्यसंबंधी बातम्या आवडतात अन सतत अशा बातम्या वाचल्याने आहार-विहारात सकारात्मक बदल होतो असे जाणविले आहे.
उदा - कर्करोगसंहारक अन्नघटक, व्यायाम, सूर्यनमस्कार, चांगल्या सवयी आदि बातम्या टाकता येतील.

अजो१२३ Thu, 12/02/2015 - 10:51

In reply to by वृन्दा

प्रवाहपतित होण्यास श्रम पडत नाहीत, प्रवाहाविरुद्ध पोहण्यास धैर्य लागते. जे कमी लोकांकडे असते.

प्रवाहाविरुद्ध पोहणे कठिण असावे, पण नि:शस्त्र, नि:अस्त्र नुस्त्या शरीरानिशी समोरच्या भिंतीत घुसणे असंभव असावे.

गवि Thu, 12/02/2015 - 10:59

In reply to by अजो१२३

शस्त्र आणि अस्त्र यांत फरक काय?

हा धाग्यातला पुढील प्रश्न आहे. अजोंच्या प्रतिसादाचे अवांतरच असं नव्हे. ;)

सुहृद Mon, 16/02/2015 - 15:25

In reply to by गवि

शस्त्र हे भौतिक, म्हणजे ज्याला आयुध म्हणतात, ते असावे आणि अस्त्र हे अभौतिक युक्ति जी शस्त्रापेक्षा अधिक परिणामकारक असते असे असावे

'न'वी बाजू Mon, 16/02/2015 - 18:23

In reply to by गवि

जे हातातच धरून (वार करण्यासाठी, भोसकण्यासाठी इ.) वापरायचे, ते शस्त्र.

जे फेकून मारायचे, ते अस्त्र.

अनु राव Thu, 12/02/2015 - 12:29

In reply to by अजो१२३

हपतित होण्यास श्रम पडत नाहीत, प्रवाहाविरुद्ध पोहण्यास धैर्य लागते. जे कमी लोकांकडे असते.

प्रवाहाविरुद्ध पोहणे कठिण असावे, पण नि:शस्त्र, नि:अस्त्र नुस्त्या शरीरानिशी समोरच्या भिंतीत घुसणे असंभव असावे.

ह्.कॅ. ची फूटनोट अजोंच्या शस्त्र म्यान करण्याबद्दल असावी हे लक्षात च आले नव्हते पण स्वता अजोंनीच लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

ऋषिकेश Thu, 12/02/2015 - 11:18

In reply to by वृन्दा

हात्तीच्या! काढा की धागा! होउ दे खर्च! :)
चालला तर पुढचे-पुढचे भाग काढु. नाहितर जितकी माहिती येईल तितकी उपयोगी ठरेलच

बॅटमॅन Thu, 12/02/2015 - 14:25

In reply to by प्रकाश घाटपांडे

विचारमंथन व विचारमैथुन यात नेमका फरक काय? ऐसी वर होते ते नेमके काय?

अ = {ऐसीवरील सर्व विचारसरण्यांचा संच}.
ब = अ संचाच्या सदस्यांची संख्या.
ड = आपली विचारसरणी.

(फॉर क=१, कब, क++)
जर अ==डः
प्रिंट (ऐसीवर होते ते विचारमंथन);
नाहीतर
प्रिंट (ऐसीवर होते ते विचारमैथुन)

रेड बुल Thu, 12/02/2015 - 14:38

In reply to by प्रकाश घाटपांडे

विचारमंथन व विचारमैथुनातील फरक शेवटाला हाती काय लागले/पडले तो (त्यावर अवलंबुन) असतो, काइंड ऑफ अ सब्जेक्टीव स्टफ. अगेन ऐसी वर होउदे अथवा तैसीवर इट इज सब्जेक्टीव अ‍ॅट लार्ज.

मन Sat, 14/02/2015 - 19:10

गाजलेल्या हत्यांत बिग शॉट्सचा सूचित होणारा सहभाग
लोकांची जबानी, उलटतपासणी ,माफीच्या साक्षीदाराचे दावे, केसदरम्यानच्या घडामोडी व घटना हे सर्व पाहता
गाजलेल्या राजकीय खुनाच्या केसेसमध्ये (म्हणजे उदा :- गांधींचा खून व रँडची हत्या ) मोठमोठी नावे मधून मधून येत राहतात.
त्यातून नक्की काय सुचवायचे असते ?
बघा बघा, ह्या लोकांनी कशी प्लानिंग करुन नामानिराळे राहून दाखवले , असे सुचवायचे असते ?
की ह्यांनी स्वतः प्लानिंग केली नसली किम्वा सक्रिय सहभाग घेतला नसला तरी ह्यांना कसे मनातून हेच हवे असते हे दाखवायचे असते ?
.
.
ह्या तपशीलांचे वाचक,अभ्यासक,आम पब्लिक किम्वा डॉक्युमेंट्र्या पाहणारे वगैरेंनी नेमके काय करायला हवे असते ?
रहस्यपटातल्या कथांची सुटी सुटी राहून गेलेली टोके, कच्च्या पटकथेची निशाणी म्हणत सोडून द्यावे काय ?
ह्या काय निव्वळ कथा आहेत काय ?
.
.
उदाहरणे सुरु :-
२२ जून १८९७ला चाफेकर बंधूंनी रॅण्डला गोळ्या घातल्या. तात्कालिक कारण :- प्लेग नियंत्रण मोहिमेदरम्यान आमच्या स्त्रिया व देवतांची विटंबना.
मग कधी उल्लेख सापडतात की त्याच वर्षीच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात थोडाच काळ आधी टिळकांनी चाफेकर बंधूंनी भडक्क-प्रचारकी कविता
वाचल्यानंतर मारलेला टोमणा. टोमण्याचा आशय :- "तुम्ही खरे मर्द असाल तर रॅण्ड अजून जिवंत कसा ?"
तोवर चाफेकर बंधूंचे आधीच भडक माथ्याचे जहाल आक्रमक, प्रसंगी रक्तपात करु शकणारे म्हणून रेप्युटेशन झाले होते.
.
.
शिवाय त्यापूर्वी अथवा खुनाच्या केसदरम्यानही चाफेकर बंधूंशी असलेल्या संवादातून जाणवत राहते की प्रत्यक्ष सहभाग नसला तरी ह्यांना ह्या सगळ्याची आधीपासूनच कल्पना होती का काय . (हे सूचित करायला २२ जून १८९७ चित्रपटात एक संवाद आहे. चाफेकरांनी पैकीजण ब्रिटिश सोजिरांना अंधारात हाणून येत असतो तेव्हा टिळक म्हणतात "ह्यांना मारुन काय उपयोग? हे हुकुमाचे ताबेदार. खरा दोषी वेगळाच आहे."(म्हणजे रॅण्ड आहे. त्याला धरा. कापा.मारा साल्याला.) )
.
.
नंतर चाफेकरांना शिक्षा झाल्यावर टिळक त्यांना अपीलाचा ड्राफ्टसुद्धा तयार करुन देतात. अपील फेटाळले जाउन नंतर चाफेकरांना फाशी होते.
चाफेकर फाशी जाताना टिळकांनी दिलेली गीतेची प्रत हाती घेउन फाशी जातात.
.
.
हे नकी काय आहे ? हे असेच सोडून द्यायचे का ? हे निश्कर्ष काधण्यास पुरेसे नाही का ?
.
.
३० जानेवारी १९४८. गांधींना नथुरामने गोळ्या घातल्या. केस उभी राहिली.माफीच्या साक्षीदाराने सांगितल्यानुसार खुनाच्या काहिच दिवस नथुराम व त्याचा प्रमुख साथीदार आपटे हे सावरकरांना प्रत्यक्ष भेटले. मागील कित्येक दिवस केवळ गांधींच्या खुनाच्या विचारानएच झपाटलेल्या इतर काहीही न सुचणार्‍या नथुरामने सावरकरांची भेट घेतली.
माफीचा साक्षीदार बाहेरच उभा होता. नथुराम व आपटे सावरकरांना भेटायला आत गेले, व थोड्याच वेळात बाहेर आले.
मागोमाग सावरकर आले; त्यांनी हात उंचावून "विजयी भव" असे म्हटले. खुनाच्या इराद्याने झपाटलेले लोकांनी पुढच्या काही दिवसातच खून केला.
प्रत्यक्ष खून खटला वगैरे सुरु असताना नथुरामने बचावाचे भाषण केले. तुरुंगात का कोर्टाच्या आवारातच सावरकर आणि नथुराम ह्यांची भेट झाल्यावर त्यांनी "बचावाच्या वेळी तुझ्या मुखातून साक्षात सरस्वतीच बोलत होती" असे गौरवोद्गार काढले.
.
.
"गांधीहत्या आणि मी" वाचून फार म्हणजे म्हणजे फारच दिवस झालेले आहेत. पण त्यातही आडून आडून सावरकरच कसे खरे खुनाचे मास्टरमाइंड होते हे सुचवले आहे.
आजही नथुरामचे काही फ्यान आहेतच. तेसुद्धा जे विधानं करतात त्यातून फायनली सावरकरांना असा खूनच होणं कसं मनातून हवं होतं वगैरे सूचित करतात.
आता ह्या गप्पा लिखित असत नाहित. तोंडी गप्पा असतात. त्यामुळे पुरावे देउ शकत नाही. पण भावनाओं को समझो.
.
.
गांधींच्या हत्येत सावरकरांचा सहभाग आणि रॅण्डच्या हत्येत टिळकांचा सहभाग आडून आडून सूचित केला जातो.
हे असं का ?

--मनोबा

गांधींच्या हत्येत सावरकरांचा सहभाग आणि रॅण्डच्या हत्येत टिळकांचा सहभाग आडून आडून सूचित केला जातो.
हे असं का ?

प्रत्येक गोष्टीचं मॅक्सिमम यूटिलायझेशन व्हायला हवं. It is immaterial whether Sawarkar sympathized with Nathuram or not. पण अपोजिट पार्टीला फूल फायदा पाहिजे असतो. नथूच्या एका गोळीच्या पुण्याईनं काँग्रेसला ५० वर्षे भारतावर निर्विरोध राज्य करता आलं. आजही टीवीवर भाजपचा पक्ष कोणी तावातावानं मांडू लागला आणि डिबेटमधे त्याची सरशी होऊ लागली तर समोरचा काँग्रेसी तिथे काही एक संबंध नसताना 'गांधींना मारणारे तुम्ही', 'नथूरामचे मंदिर बांधणारे तुम्ही' इ इ ४-५ शेलकी वाक्यं बोलतं. त्या भाजपवाल्याचा चेहराच पडतो. कारण काँग्रेसवाल्याकडे 'गांधीहत्येत जेलमधे गेलेल्या भाजप सदस्यांची यादी' आहे कि काय इतका काँफिडन्स असतो.
प्रत्येक विचारसरणीचा अनुयय करणारी अतिरेकी टाळकी असतात. कधी कधी त्यांच्याकडे काही करण्याइतका वेळ आणि स्रोत असतो. कधी कधी त्यांच्या नशीबाने काही ऐतिहासिक होऊनही जाते. पण त्यावर (त्यांच्या विरोधकांनी) पुढची अनेक वर्षे खात राहणे यातच खरं कौशल्य सामावलेलं आहे.
काँग्रेसनं आजही शिक्षित, संतुलित विचार करणार्‍या प्रत्येक माणसाला भाजपचे समर्थन करण्यापूर्वी 'आपण गांधीजीच्या हत्यार्‍यांचे तर समर्थन करत नाहियोत ना' असा विचार अवश्य करावा लागावा असे वातावरण ठेवले आहे. हत्येचं हे मार्केटींग अभिनंदन पात्र आहे.

नितिन थत्ते Sun, 15/02/2015 - 13:22

In reply to by अजो१२३

>>भाजपचे समर्थन करण्यापूर्वी 'आपण गांधीजीच्या हत्यार्‍यांचे तर समर्थन करत नाहियोत ना

मोदींच्या उदयानंतर त्यांनी विकास हा प्रचाराचा मुद्दा केल्यासारखा दाखवेपर्यंत तरी भाजपने ८० सालापासून आत्तापर्यंत मुस्लिमतुष्टीकरण हाच आपल्या प्रचाराचा मुद्दा ठेवला होता. स्वत:ला उजव्याविचारसरणीचे असल्याचे म्हणवूनही ९१ नंतरच्या धोरणांना विरोधच केला. इनफॅक्ट ८९ ते ९९ पर्यंत भाजपचा ग्राफ वर जात होता तो हिंदुत्वाच्या [आणि पर्यायाने मुस्लिमद्वेषाच्या] पॉइंटवरच होता. त्यामुळे नथुरामच्या नावाने खजील होणे भाग पडले.

>>'नथूरामचे मंदिर बांधणारे तुम्ही' इ इ ४-५ शेलकी वाक्यं बोलतं. त्या भाजपवाल्याचा चेहराच पडतो.

यात खोटे काहीच नाही हे नुकतेच राजस्थानातील पुलाला नथुरामचे नाव देण्यातून सिद्धच झाले ना?

आम्ही नथुरामचा निषेधच करतो असे भाजप म्हणाला तरी ते तोंडदेखले आहे हे लोकांना सहज समजत होते. त्यामुळे नथुरामच्या नावाने खजील होणे भाग पडले.

यात भाजपची राजकीय चूक ही आहे की सावरकर हे संघीय नव्हते. पण हिंदुमहासभेच्या अस्तानंतर हिंदुत्ववादी मतांच्या हव्यासापायी संघाने त्यांना अ‍ॅडॉप्ट केले. त्या अ‍ॅडोप्शनबरोबर त्यांची लाएबिलिटीपण घ्यावी लागली. दुसरीकडे सावरकरांचा आधुनिकवाद स्वीकारण्याऐवजी संघाने/भाजपने प्राचीन संस्कृतीचा उदोउदो करण्याचे धोरण ठेवले.

थोडक्यात काय तर हिंदुत्ववाद आणि मुस्लिमद्वेष हाच आपला यूएसपी आहे असे धोरण भाजपने ठेवले. मोदींनीसुद्धा २००२ ते २०१३ हेच दाखवले. त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या मुस्लिमकत्तलीच्या आरोपांना आपला यूएसपी मानले (त्या यूएसपीसाठीच त्यांना २०१४ मध्ये अर्धीतरी मते मिळाली आहेत). या स्ट्रॅटेजीवर आपण १८० सीटच्या वर जाऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे विकास हा मुद्दा करण्यात आला.

अजो१२३ Mon, 16/02/2015 - 12:58

In reply to by नितिन थत्ते

हिंदुत्वाच्या [आणि पर्यायाने मुस्लिमद्वेषाच्या]

हिंदुत्व म्हणजे मुस्लिमद्वेष?

यात खोटे काहीच नाही हे नुकतेच राजस्थानातील पुलाला नथुरामचे नाव देण्यातून सिद्धच झाले ना?

लिंक आहे का?

मोदींनीसुद्धा २००२ ते २०१३ हेच दाखवले.

मुस्लिमद्वेष दाखवणारी २००२ ते २०१३ मधली मोदींची विधाने वा कृती कोणत्या?