Skip to main content

बागेतून ताटात - प्रयोग ३ : मायक्रो -ग्रीन्स

बागेतून ताटात - प्रयोग १ : भोपळा
बागेतून ताटात - प्रयोग २ : पालेभाज्या

कोणतंही धान्य पेरून त्याचे जे अंकुर उगवतात त्यांना मायक्रोग्रीन्स म्हणून खाण्याचं फॅड सध्या वाढलंय. कमी कष्टांत आणि कमी वेळेत उगवून येणारे मायक्रोग्रीन्स नव-बागकामप्रेमींचे आवडते आहेत. मोहरी -अळीव - मूग - अशा घरी असलेल्या कोणत्याही धान्यांचे उगवून आलेले अंकुर मुख्यतः सलाड्स -कोशिंबिरींमध्ये किंवा कोथंबिरीसारखे वरून गार्निश म्हणून वापलेले बघितलेत.  मी जरा वेगळ्या प्रकारे वापरले. 

१. मुगांकुर डाळ 
साहित्य : १ वाटी मुगाची डाळ ( किंवा तूर/ मसूर पण चालेल.) , १ चमचा तूप ( किंवा तेलपण चालेल), जिरे, हिंग, हळद, मीठ , लसूण- मिरची ( ऐच्छिक) आणि हिरवे मूग पेरून उगवलेले अंकुर - १ ते २ वाट्या.    
कृती:

  1. डाळीत हळद मीठ घालून कूकरमध्ये शिजवून घेणे. 
  2. मुगांकुर खुडून स्वच्छ धुवून - गरज वाटल्यास चिरून घेणे. 
  3. तुपात हिंग-जिऱ्याची फोडणी करून मुगांकुर परतणे. 
  4. रंग बदलला की त्यांत शिजलेली डाळ घोटून टाकणे. 
  5. चव आणि गरजेनुसार मीठ -पाणी घालून एक उकळी येऊ देणे. 

1

२. मिश्र डाळींची मायक्रोग्रीन धिरडी  
साहित्य: मूग - मसूर- तूर- उडीद - हरभरा - सगळ्या डाळी मिळून एक वाटी, तांदूळ एक वाटी, हिरवी मिरची - आलं -लसूण - कढीपत्ता - मीठ आणि कोणत्याही धान्याचे अंकुर (मी मोहरीचे वापरले.)
कृती:

  1. मिश्र डाळी आणि तांदूळ वेगवेगळे भिजवणे (रात्रभर किंवा ८ तास ).
  2. आधी डाळी मग तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे. 
  3. वाटताना त्याच मिक्सरच्या भांड्यात धान्याचे अंकुर टाकणे. पिठाचा रंग हिरवा होतो. 
  4. मिरची - आलं -लसूण - कढीपत्ता ह्यांचं वाटण करून ते वाटण आणि मीठ वरील पिठात चवीनुसार घालणे. 
  5. लोखंडी तव्यावर धिरडी टाकून खाणे. 

2

मिसळपाव Fri, 15/01/2021 - 04:13

एक प्रश्न. मी अधनं मधनं वेगवेगळ्या डाळी पेरतो - पिटुकल्या कुंड्या आहेत काउंटरवर, त्यात. काही नाही, मोड येतात, पान उघडतात ते बघायला मजा वाटते म्हणून! कवतिक ओसरलं की टाकून देतो. हा लेख वाचल्यावर डोक्यात आलं की ती कोवळी पानं वगैरे खुडून आमटीत टाकली तर चालतील? आम के आम, गुटलीयों के भी दाम! पण स्वत:चा गिनी-पिग करायची ईच्छा नाहीये. "अहो गेल्याच आठवड्यात गप्पा झाल्या होत्या. मसुरांकुर झकास लागतात सांगत होता. काल कळलं की डायलीसीस वर आहे. त्या मसुरांकुरात म्हणे कायतरी अल्कलॉईड असतं त्याने किडनीज गेल्यात कामातनं. बघायचं आता काय होतं ते." असलं काही नको व्हायला :-))))

'न'वी बाजू Fri, 15/01/2021 - 05:37

In reply to by मिसळपाव

मी अधनं मधनं वेगवेगळ्या डाळी पेरतो

शंका: डाळी पेरून मोड कसे येतात? आख्खे धान्य नको काय?

मिसळपाव Sat, 16/01/2021 - 05:14

In reply to by 'न'वी बाजू

त्याबद्दल प्रश्नच नाही. डाळी = कडधान्य हे माझ्या प्रश्नापुरतं सिमीत आहे. फाटे नको फोडू, हाती लागेल ते धान्य पेरून आलेले अंकूर / मोड / पानं खाऊ का नको ते सांग आधी.

चिमणराव Fri, 15/01/2021 - 08:29

In reply to by मिसळपाव

रस्त्याने जाताना कोंबड्याच्या शेंगा पडलेल्या वेचून आणायचो. त्यातले मोठे लाल बी पेरले की उगवायचे. बी घासून तापले की चटका बसतो. चिंचोके पेरायचे.

#१ Indian coral tree / पांगारा याचंच लाकूड सावंतवाडीची खेळणी बनवायला वापरतात.

सिद्धि Sat, 16/01/2021 - 00:24

In reply to by मिसळपाव

नेहमीची कडधान्यं पेरून येणारे अंकुर खाऊन काही विशेष त्रास मला तरी झाला नाही. पण आपापल्या जबाबदारीवर प्रयोग करून खाणे. :) 

मिसळपाव Sat, 16/01/2021 - 05:28

In reply to by सिद्धि

मुगाचे सोडून अजून कुठले खाल्लेस आत्तापर्यंत? आणि खवचटपणा म्हणून नाही हां विचारतंय. "फावा बीन्स" हा प्रकार ऐकलायंस? ते घातलेलं स्ट्यु खाऊन माझा ॲडव्हायझर आडवा झाला होता! पानात काय वाट्टेल ते पडेल ते खाऊन पचवणारा माणूस तो, हास्पिटलात चार दिवस मुक्काम ठोकायला लागला होता. म्हणून मी आपलं लगेच कोचरेकर गुरूजींसारखं विचारून घेतोय - " नाही म्हणजे, काही गडबड नाही ना होणार?" :-)

'न'वी बाजू Sat, 16/01/2021 - 09:54

In reply to by मिसळपाव

(आगाऊ इशारा: ऐकीव अर्धवट माहिती - अर्थ आपापल्या जबाबदारीवर लावावा.) दुवा १, दुवा २.

Looks like राजमा, झालेच तर तुम्ही सांगितलेली फावा बीन्स, आणि अशा अनेक तत्सम बीन्समध्ये/द्विदल धान्यांत Phytohemagglutinin नावाचे विष असते. (मास्तर मोड ऑन.) बीन्स पुष्कळ वेळ शिजवल्यास ते नाश पावते आणि बीन्स खाण्यास निर्धोक बनतात, परंतु बीन्स पुरेश्या प्रमाणात न शिजविल्यास/कमी तापमानाखाली (जसे, slow cookingमध्ये वगैरे) शिजविल्यास , ते विष पूर्णपणे denature न होता अंशत: तसेच राहाते, नि घात करते. म्हणून अशा बीन्स चांगल्या सणसणीत शिजविल्याशिवाय न खाणे श्रेयस्कर.

डिस्क्लेमर:
१. ऐकीव माहिती. मला यातले शष्प समजत नाही. तज्ज्ञांकडून सविस्तर खुलासा मिळू शकल्यास स्वागत आहे.
२. कोणत्या बीन्समध्ये/कडधान्यांत किती प्रमाणात हे विष असते, कल्पना नाही. मॉरल ऑफ द स्टोरी, खात्रीलायक माहिती असल्याखेरीज कोणतीही कडधान्ये अथवा बीन्स ही भरपूर वेळ (आणि चांगल्या उकळत्या पाण्यात) शिजविल्याखेरीज खाणे धोक्याचे. (पुरेसा वेळ म्हणजे किती वेळ, हे आपापल्या जबाबदारीवर शोधून काढावे. वेगवेगळ्या बीन्सकरिता आणि शिजविण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींप्रमाणे हे वेळाचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.)
३. मोड काढण्याने (sprouting) या विषावर काही फरक होतो किंवा कसे, किंवा होत असल्यास कितपत प्रमाणात होतो, कल्पना नाही.
४. मूग, मटकी वगैरे कडधान्यांत या विषाचे प्रमाण तुलनेने कितपत कमीजास्त असते (आणि, वरील ३.च्या अनुषंगाने, कच्चे मुगांकुर किंवा कच्चे मटक्यांकुर तुलनेने कितपत निर्धोक असतात), कल्पना नाही. (अंकुर शिजविल्यास बहुधा प्रॉब्लेम नसावा. बोले तो, मटकीची उसळ खाऊन फारसे कोणाचे पोट बिघडल्याचे निदान ऐकण्यात तरी नाही. अर्थात, याला ॲनेक्डोटल डेटा अत एव सांगोवांगीची कथा म्हणून निकालात काढता यावे.)

बॉटमलाइन:
१. असले प्रयोग स्वत:च्या जबाबदारीवर करावेत.
२. सणकून शिजविण्याने धोका कमी होऊ शकतो.

(चूभूद्याघ्या.)

मिसळपाव Sat, 16/01/2021 - 20:39

In reply to by 'न'वी बाजू

माहीती आणि दुव्यांबद्दल धन्यवाद. राजमाबद्दल ही माहीती नव्हती. "भिजवून चावणेबल झालं कडधान्य की सॅलडात घालता येतं" ही माझी समजूत चुकीची आहे *straightface*. अगदी "शवपेटीकेची" वेळ नाही आली तरी न करणं श्रेयस्कर!

सेमी अवांतर: सध्या किनवाचं कौतुक चालू आहे, एका कुकिंग शोमधे "ड्रॅगन फ्रूट" पहिल्यांदा बघितलं. पण माझ्या माहीतीत असलेल्या अशा उदाहरणात तरी जगातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात आधीच माहीती असलेलं / सरसकट खाल्लं जाणारं काहीतरी - ईंटरनेट आणि वस्तूंची सहजगत्या करता येणारी आयात/निर्यात - यांच्यामुळे उजेडात येतं ईतकंच. पण साउथ अमेरीकेतला कोणी ते पचवू शकतो म्हणजे मलाही चालेलंच असं नाही.

सिद्धि Wed, 20/01/2021 - 00:18

In reply to by मिसळपाव

हरभरा, मेथी, मोहरी, मूग, चवळी, अळीव - ह्यांचे अंकुर खाऊन मला आणि माझ्या घरच्यांना काहीही त्रास झालेला नाही. तरीही आपापल्या जबाबदारीवर खाणे.  :) 

चिमणराव Sat, 16/01/2021 - 11:28

यांमध्ये फरक असा की डाळींतले 'ट्रिप्सिन ' किंवा एक द्रव्य प्रोटिन्स पचू देत नाही. मोड आल्यावर ते नष्ट होते. म्हणजे पचायला हलके होते. जनावरांमध्ये ट्रिप्सीन नष्ट करण्याची शक्ती/कुवत असते.
मसुर,शेंगदाणे,बटाटा ही पिके थंडीत वाढतात. पाने जेमतेम ऊष्ण प्रकाशातही अन्न तयार करून पिकात साठवतात. ती कुणी जनावरांनी खाऊ नये म्हणून विषारीपणा असतो. (बाजरी आणि गहूही थंडीतच येतात. झाड खाऊ नये म्हणून कुसं असतात . यांचा कडबा म्हणून उपयोग होत नाही. )
सोयाबिनचे दाणे/पीठही ट्रिटमेंट केलेले असते म्हणतात.
आंबवण्यानेही प्रोटिनचे विघटन होऊन हलके होते.