घालीन लोटांगण...
घालीन लोटांगण वंदीन चरण... इ.इ. हे पूजेच्या अखेरीस म्हटले जाणारे श्लोक आहेत. त्याबाबत माझ्याकडे Whatsapp वरून आलेली मनोरंजक माहिती सर्वांसाठी देत आहे.
घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला 'त्वमेव माता...' ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?
या माझ्या प्रश्नावर रवि अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.
रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!
*रवि उवाच*
विकास,
'घालीन लोटांगण' हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.
(१) पहिलं कडवं 'घालीन लोटांगण' हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.
(२) दुसरं कडवं 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु:' श्लोक समाविष्ट आहे.
(३) तिसरं कडवं 'कायेन वाचा' हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.
(४) चौथं कडवं 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.
(५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.
-- रवि अभ्यंकर
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
यानिकानिज पापानि
फेर्या मारताना
"यानि कानिजपापानि जन्मांतर तानिजतानि तानि विनष्यंति प्रदक्षिण पदेपदे
अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणं मम, तस्मात करुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर"
हे म्हणायचे असते. ह्याचा स्त्रोत माहिती नाही, पण प्रत्येक प्रदक्षिणेबरोबर पापे नष्ट होवोत, आणि पापांसाठी क्षमा करून परमेश्वरा, तू रक्षण कर, कारण माझे तुझ्याविना कोणी नाही, असा अर्थ प्रतीत होतो.
"घालीन लोटांगण" म्हणतांना फेर्या मारण्याची प्रथा चुकीची असावी.
यानि कानि च पापानि
यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च|
तानि तानि विनश्यन्तु प्रदक्षिणपदे पदे ||
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम |
तस्मात्कारुण्यभावेन रक्ष मां परमेश्वर ||
ह्या दोन श्लोकांचे अनेकविध पर्याय शेकडो स्तोत्रांमधून, तसेच अनेक पूजाविधींमधून पाहायला मिळतात. त्यांची इतकी गल्लत झाल्याने कोणी कोणाकडून कधी उचलले आहे हे आता उलगडणे अशक्य आहे.
'घालीन लोटांगण'च्या वेळी स्वतःभोवती फिरणे हे प्रदक्षिणेचे रूपक असावे असे वाटते. देवळात प्रदक्षिणेला जागा असते तशी जागा घरामध्ये पूजाविधीच्या वेळी असणे अवघड असते. त्यासाठी हा सुकर पर्याय. 'प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलाबरोबर पापे नाश पावोत' असा श्लोक अखेरीस म्हटला जातोच.
बालाजी तांबे यांच्या
बालाजी तांबे यांच्या "फेमिनाइन बॅलन्स" सीडी मधील "अच्युताष्टक" इतके मधुर आळविले आहे. सत्यभामाधवम वरती जी बासरीची तान आहे निव्वळ व्याकुळ करते. आज घरी गेल्यावर ऐकेन :) सत्यभामा आणि माधव यांच्या उल्लेखातच ही व्याकुळता आढळली. It does ring an irrational bell for me. सत्यभामा आवडते. तिचा मत्सर, हट्ट सर्वासकट. :) (राधा, रुक्मिणी, मीरा या संर्वांपेक्षाही सत्यभामाच आवडली. कारण ती अधिकार गाजवते. तिच्या स्वतःच्या ष्डरिपुंशी ती प्रामाणिक आहे. आणि ती डॉमिनेटिंग आहे )
धागा फार आवडला.
पुरुषप्रधान संस्कृतीचा नमुना
होय होय. हे तेच तांबे.
.
बाय द वे माझ्या आवडत्या आणि समानशील्व्यसनवाल्या काही मित्रमैत्रिणींना हे पाठवले जे इथे देते आहे -
.
पांडवप्रतापमधील हा प्रसंग (अतोनात पुरुषप्रधान संस्कृतीचा नमुना. आपल्या आपल्या जबाबदारीवरती वाचावा. ;))
शिवाय नणंद-भावजयीचं नातं कसं ज्वालाग्राही असतं तेही दिसतच आहे. द्रोपदीला भावाचा काय अभिमान. - ;)
.
सत्यभामा पांचालीला एकांतात घेऊन जाऊन विचारते, आम्ही शोडषसहस्र कामिनी पण चक्रपाणि आम्हाला वश होत नाही. तू मात्र पाच पांडव तर वश केलेच पण ऋषीकेशाचेही मन जिंकलेस, रात्र नाही दिवस नाही त्याला हृदयाशी धरीलेस - ते कसे? त्याला मोहीनी घातलीस तरी कशी? अशी कोणती विद्या तू जाणतेस, ती वशीकरणविद्या मजला शिकव.
.
मग पांचाली तिची कान उघडणी करत तिला म्हणते - सत्यभामे तुझे हृदय निर्मळ नाही. मलीन आहे. तू सवतीमत्सर करतेस. परमात्मा पूर्ण श्रीधर त्याच्याशी भेद करतेस. जो आदिपुरुष आहे, ईश्वर आहे त्याने तुझ्यासारख्या मनुष्य स्त्रीला हृदयी धरिले हा गौरव तुला पुरला नाही. जो वेदशास्त्रांनाही नकळे, वेदांनाही जो अगम्य त्याचे दान तुला नारदमुनींनी केले. वेडे आहेत नारदमुनी. तुझी पात्रता आहे का श्रीधरास प्राप्त करण्याची? माझा दीनदयाळू भाऊ, कृपासिंधू तो तुला मिळाला. पण तू काही रुक्मिणीचा दुस्वास सोडला नाहीस. रुक्मिणी म्हणजे साक्षात ज्ञानकळी, प्रणवरुपिणी वेल्हाळी अशी जिचा तू मत्सर करतेस. तू अभाविक आणि सदासर्वदा मलीन, तुला वश तरी कोण होणार? एक लक्षात ठेव, जिचे किंवा ज्याचे अंतरंग निर्मळ आहे अशा भाविकासच कृष्ण साध्य होतो. अभाविकाला तर स्वप्नातही ते सुख मिळत नाही.
.
या कान उघडणीवरती सत्यभामा एकदम गप्प होऊन गेली.
त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.
चांगली माहिती. पण त्याने जास्त काही फरक पडत नाही.
गणपतीसमोर पहिली जी गणपतीची आरती म्हटली जाते त्यानंतर शंकराची, दुर्गेची, पांडुरंगाची, रामाची, दशावताराची, मारुतीची, तुकारामाची, ज्ञानदेवाची, नामदेवाची अशा वेगवेगळ्या देवांच्या आरत्या म्हटल्या जातात.
आता तुम्ही म्हणता ती कडवी वेगवेगळी आणि मुळात दुसर्या कुणाला उद्धेशुन लिहिलीही असतील पण अर्थाच्या दृष्टीने ती इथेदेखील चपखल बसतात. लेटेस्ट उदाहरण घ्यायचं झालं तर हिंदी चित्रपटातील काही गीतांमधील काही ठराविक कडवी म्हणून बघा. ती देखील इथे भावाच्या दृष्टीने चपखल बसतील.
उदा. तु मेरी जिंदगी है ! तु मेरी बंदगी है!!
बराच फरक पडतो...
"चांगली माहिती. पण त्याने जास्त काही फरक पडत नाही." असे वर धर्मराजमुटके म्हणतात.
मी हा धागा येथे का उघडला आणि माझ्या मते कोणता फरक पडला हे येथे नोंदवतो.
संस्कृत, मराठी आणि अन्य भाषांतहि फार मोठ्या प्रमाणात स्तोत्रवाङ्मय उपलब्ध आहे. मराठी आणि संस्कृतमधली अशी कित्येक स्तोत्रे लोकांच्या नित्य पठनात असतात आणि संस्कृतीचा मोठा भाग त्या स्तोत्रांनी व्यापलेला आहे. पण स्तोत्राच्या पठनापलीकडे आपण क्वचितच डोकावून पाहतो. अमुक स्तोत्र कोणी लिहिले, ते किती वर्षे - शतके - वापरात आहे अशा प्रकारची माहिती जवळजवळ कोठेच उपलब्ध नसते.
तुकाराम-नामदेव-रामदास अशा संतांची जी काव्ये पठनात असतात त्यांमध्ये 'तुका म्हणे'. 'नामा म्हणे', रामी रामदासा' अशा उल्लेखांवरून त्या स्तोत्राबद्दल, आरतीबद्दल अशी माहिती मिळते. पण एकूण जे स्तोत्रवाङ्मय उपलब्ध आहे त्याचा हा थोडाच भाग आहे.
व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र अशा लाखोंच्या तोंडी असणार्या स्तोत्रांबद्दल आपणास ठोस माहिती किती आहे? रामरक्षा बुधकौशिकाने रचली असे स्तोत्रातच म्हटले आहे पण हा बुधकौशिक कोण होता, केव्हा होता हे माहीत नाही. 'पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद', 'उडदामाजी काळेगोरे काय निवडावे निवडणारें', 'समर्थाघरचे श्वान', अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा' असले अलंकार मराठी भाषेला घालणारा देविदास कोण होऊन गेला ह्या प्रश्नाला उत्तर नाही. तीच कथा शिवमहिम्न रचणार्या पुष्पदंताची.
ह्या पार्श्वभूमीवरती 'घालीन लोटांगण'ची पूर्ण कथा देणारी ही माहिती मला महत्त्वाची वाटली म्हणून ती येथे नोंदविण्याचा उद्योग मी केला. अन्यथा गणपतीपुढच्या आरत्या गणपतीच्या नाहीतच हे सामान्यज्ञान सर्वांनाच असावे.
'पुत्राचे सहस्र अपराध, माता
'पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद', 'उडदामाजी काळेगोरे काय निवडावे निवडणारें', 'समर्थाघरचे श्वान', अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा' असले अलंकार मराठी भाषेला घालणारा देविदास कोण होऊन गेला ह्या प्रश्नाला उत्तर नाही.
येस्स्स!
मला विष्णुदास कोण आहेत याबद्दल कुतुहल आहे. देवीच्या आरतीमध्ये उल्लेख येतो.
तसेच सूर्य स्तोत्र=कश्यप ऋषी, शंकर् स्तोत्र=अगत्स्य मुनी, चंद्र स्तोत्र = गौतम ऋषी, बुध स्तोत्र = वसिष्ठ ऋषी अशाही जोड्या आढळतात. ते का असा प्रश्न पडतो.
विष्णुदास
विष्णुदास - विष्णुदास नामा का? संत होते बहुधा. फारशी माहिती नाही मला, पण हे एक अतिशय सुंदर गाणे त्यांचेच आहे.
https://www.youtube.com/watch?v=_42M2-IDnzQ
अरविंद कोल्हटकर - इंटरेस्टिंग माहिती! मला आधी मंत्रपुष्पांजली सुद्धा देवांबद्दल आहे असे वाटायचे. नंतर समजले की ती जरी देवाला केलेली प्रार्थना असली, तरी ती राजाबद्दल्/राज्याबद्दल आहे.
विष्णुदास-विष्णुदास नामा-नामा विष्णुदास.
@स्वप्न @फारएण्ड - देवीच्या स्तोत्रातील 'विष्णुदास' आणि 'विष्णुदास-नामा' हे एकच का वेगवेगळे हे मला माहीत नाही. वि.ल.भावेकृत 'महाराष्ट्रसारस्वता'मध्ये आणि त्याला डॉ.शं.गो.तुळपुळे ह्यांनी जोडलेल्या पुरवणीमध्ये 'विष्णुदास-नामा' ह्याचा उल्लेख असून तो ज्ञानेश्वरानंतरचा आणि मुक्तेश्वरापूर्वीचा असा अंदाज केला आहे. तोच कवि 'नामा विष्णुदास' ह्या नावानेहि लिहीत असावा असाहि तर्क आहे. हा जातीने ब्राह्मण असावा अशी शक्यता तुळपुळे नोंदवितात कारण त्याने रचलेल्या कामाईच्या आरतीत त्याचा उल्लेख 'विप्र विष्णुदास' असा आहे. त्याने महाभारताची सर्व पर्वे संक्षिप्त रूपात लिहिली होती आणि ती सर्व महाराष्ट्रभर पसरली होती अशी माहिती मिळते.
अशा ह्या बर्याच शक्यता आणि तर्क त्याच्या विषयात आहेत.
व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा
व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र अशा लाखोंच्या तोंडी असणार्या स्तोत्रांबद्दल आपणास ठोस माहिती किती आहे
याशिवाय स्त्रोत्रांच्या कंटेटबद्दलही मला फार उत्सुकता आहे. उदा. मारुतीस्त्रोतात जेव्हा रामदास 'अणुपासौनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे' किंवा 'भेदिले शून्यमंडळा' असे म्हणतात तेव्हा अणु, ब्रह्मांड,शून्यमंडळ म्हणजे रामदासांना काय अपेक्षित होतं? या काही सहज सुचणार्या कविकल्पना नव्हेत आणि रामदासही काही साधेसुधे कवी नव्हेत.
शाळेत संस्कृत विभक्ती प्रत्ययाचे उदाहरण देताना रामरक्षेतील
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे |
रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नम: ||
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं |
रामेचित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर
हा श्लोक शिकवत. हे काव्यप्रतिभेचं दर्शन म्हणून रचलेलं आहे की घडून गेलेलं आहे?
रामो राजमणि:
मुद्दामच केलेलं आहे. भट्टिकाव्य नामक एक पूर्ण काव्य असंच रचलेलं आहे. पूर्ण कथा ही म्हटली तर कथा, म्हटले तर व्याकरणपाठही होतो. लक्षात ठेवायला म्हणून बरे अशी योजना असे.
https://en.wikipedia.org/wiki/Bha%E1%B9%AD%E1%B9%ADik%C4%81vya
तसे तर
तसे तर मंत्रपुष्पांजलीचासुद्धा आरती आणि गणपतीशी काही संबंध नाही. मंत्रपुष्पांजली अर्थाच्या दृष्टीने प्रार्थना नाही आणि एकसंध सुद्धा नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Mantrapushpanjali
ऋग्वेद/ अथर्ववेद, तैत्तिरीय आरण्यक, ऐतरेय ब्राह्मण अशी खिचडी/मिसळ आहे.
मान्य
> अमुक स्तोत्र कोणी लिहिले, ते किती वर्षे - शतके - वापरात आहे अशा प्रकारची माहिती जवळजवळ कोठेच उपलब्ध नसते.
पूर्ण मान्य. तशाच सत्यनारायणाची कहाणी, बुधवारची कहाणी वगैरे कुणी लिहिल्या याबद्दल काही माहिती आहे का? त्यांची भाषा पाहता अठरा-एकोणीसाव्या शतकाचा ‘वास’ येतो, पण लेखक कोण याचा उल्लेख मी कुठेच पाहिलेला नाही.
गंमतीशीर माहिती
ह्यावरून कालच फेसबुकवर दिसलेला विनोद आठवला -

श्रेय - ओंकार कुकडे.
मी एक ऐकलं होतं; भिकाऱ्यांचं गाणं म्हणून कोणीतरी नक्कल करून, गाऊन दाखवलं होतं -
केशवा, माधवा, तुझ्या नावात रे गोडवा।
फुलों में, कलियों में, सपनों की गलियों में,
तेरे बिना कुछ कही ना।
केशवा, माधवा, तुझ्या नावात रे गोडवा॥
चांगली माहिती.. ही सर्व खिचडी
चांगली माहिती..
ही सर्व खिचडी करण्यामागे एकच कारण दिसते- मीटरमध्ये बसणे
वास्तविक एकाच देवाच्या विविध आरत्यांमध्ये तेच तेच वर्णन असते परंतु चाली वेगवेगळ्या असल्याने त्याची मजा वाढते.
संस्कृतातल्या आरत्या हा तर अजून एक रोचक प्रकार आहे.
'अष्टक' हा प्रकार नक्की आठ या त्यातील कडव्यांच्या संख्येशीच संबंधित आहे का ?. कारण आमच्या घरी नित्यपाठात असलेल्या अष्टकांमध्ये सुद्धा आठ कडवी नाहीत. किंवा काही कडवी 'प्रक्षिप्त' का म्हणतात तशी असतील. :)
बाकी ऐसीवर असा धागा पाहून जरा रोचकपणा वाटला.
परिलीना
Interesting! पण ती ताडून पाहायची आणि तेथे काही अधिक असल्यास ते वाचायची इच्छा आहे. अधिक नेमका संदर्भ किंवा त्या पृष्ठाचा scan मिळाल्यास बरे होईल.
(माझ्याकडे परशुरामतात्या गोडबोलेकृत वृत्तदर्पणाची १८९० ची ११वी आणि १९२० ची १७वी अशा दोन आवृत्त्या आहेत. त्यांमध्ये मला असा काही उल्लेख दिसला नाही. छंदप्रभाकर ह्या हिंदी बृहद्ग्रन्थातहि असे काही सापडले नाही. म्हणून पृच्छा.)
चांगली माहिती
'घालीन लोटांगण', ही माहिती आधी कोणाकडूनच ऐकली नव्हती. लहानपणापासून नुसती आरती ऐकली आहे. आरत्यांमधे सहभागी होण्याची वेळ आलीच, तरी मी कधीही आरती म्हणत नाही. फक्त टाळ्या वाजवत इतरांचे निरीक्षण करण्यातच मजा येते.
'घालीन लोटांगण', चे पॉर्न विडंबन लहानपणीच ऐकले. कोणी आरती म्हणायला लागले की ते आठवतेच.
कलिसन्तरण, ट्यांजंट
(५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
आनुषंगिक टिपण जाड ठशातील वाक्याबाबत आहे. "ॐ सह नाववतु ..." हे पाठ्य पुष्कळ लोक जाणतात, त्याचे कारण कलिसन्तरण उपनिषदाशी संबंधित नसावे. कठ या तुलनेने प्राचीन आणि प्रसिद्ध उपनिष्दात हे पाठ्य येते, प्रचलित असण्याचा स्रोत तो असावा. कलिसन्तरण त्या मानाने अर्वाचीन आहे, आणि कमी प्रसिद्ध आहे. हे पाठ्य तिथेही उद्धृत आहे, हे खरे आहे, परंतु त्या मार्गातून ते इतके परिचित होण्याची शक्यता कमीच.
आम्हाला कठ काय अन कलन्तिसरण
आम्हाला कठ काय अन कलन्तिसरण काय दोन्ही बी इकवली परिचीत (किंवा आरिचित ;)) आहेत.
काला अक्षर भैंस बराबर सारखे.
____
हां मात्र वरुण, अग्नी, यम, सविता, अश्विनीकुमार, भग, पूषा या सर्वांचे आवाहन कोणत्या तरी वेदात वाचले होते. मस्त होते तरी कसं म्हणू पण वेल आवडलेइश. कारण त्यात त्यांच्या गायत्रीही होत्या.
एकदा तो चंडीपाठ का काय तो
एकदा तो चंडीपाठ का काय तो सगळेजण म्हणत होते -
या देवी सर्व भूतेषु निद्रा रुपेण संस्थिता नमस्तस्यै वगैरे ....
त्यात इतकं भयानक रीपीटीशन आहे ना - निद्रारुपेण, शांतीरुपेण, मातृरुपेण, क्षांतीरुपेण, बुद्धीरुपेण, शक्तीरुपेण,क्ष्हुधारुपेण्,स्मृतीरुपेण. तेजायला वाट्टेल ने नाम घाला आणिरुपेण लावा. हे "रुपेण" फक्त बदलत असते.
काही लोक संपला तरी उत्साहात पुढे पुढे म्हणायला लागतात. त्यांना शांतवावं ;) लागतं मग.
लक्षात आणुन दिल्याबद्दल
लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. खरे आहे. आजचा दिवस तसाच गेला. त्याला कारणही आहे. व्यायाम अत्युत्तम (=व्हिगरस)झाला की मूड स्विंगस टू अनदर एक्स्ट्रीम होतात ( अनलेस रोजच्या रोज व्यायाम केला. रोज केला मूड तर सेटल होतो.) आज खर्चही फार झाला. पण नशीब खर्च व उथळपणा वगळता अन्य "बिहेव्हिओरल" त्रास झाला नाही.
.
हे मूडमधील बदल, नवरा जवळ असताना, ताबडतोब प्रेमाने पण कठोरतेने सांगणारं कोणीतरी होत. तो सध्या नसल्याने माझ्या लक्षात "डिप्रेसिव्ह" बदल येतायत पण दुसर्या एक्स्ट्रीमचे येत नाहीयेत.
.
हे सर्व व्यक्तीगत लिहायचे कारण आहे. सर्वांचा मेंटल हेल्थ्बद्दलचा अवेअरनेस मी वाढवु शकत नाही पण प्रयत्न तर करु शकतेच.
.
कोल्हटकर यांचे मनापासून धन्यवाद.
_________
Despite the lack of literature on exercise and physical activity in bipolar disorder, there is preliminary evidence that exercise may be a double-edged sword for patients with bipolar disorder.............
.
.
Specifically, they found that exercise could be beneficial in helping to direct excess energy, but potentially detrimental in exacerbating manic symptoms and potentially putting patients at risk for a spiraling of manic and hypomanic symptoms.
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4349127/
हे १०१% खरे आहे. हाच्च अनुभव आहे. स्लो व्यायामाने calming effect येतो याउलट व्हिगरस व्यायामाने, हायपोमॅनिआची लक्षणे त्वरीत दृगोचर होतात.
_____
वरील विवेचन म्हणजे - स्वतःच्या बालीश वागण्याचे समर्थन नसून, शेअर केलेला अनुभव आहे. खरं तर मला स्वतःला स्पेसिमन म्हणुन कोण्या चांगल्या रिसर्च करणार्या संस्थेस व्हॉलन्टीअर करायचे आहे.असो.
.
एकदा लक्षात आल्यावर काळजी घेणं अतोनात सोपे असते.

मजेशीर
'घालीन लोटांगण' म्हणताना स्वतःभोवती गोलगोल फेऱ्या मारण्याची प्रथा कधीपासून सुरु झाली?