अग्रलेखाचे अल्गोरिथम
TLDR; म्हणजे काय की "लोकसत्ता ह्या दैनिकाचे अग्रलेख हे एका अल्गोरिथमने लिहिलेले असतात.
हा सौंशय आम्हाला फार पूर्वीपासून - म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा बिन- भातुकलीतले मुख्यमंत्री होते - होता. मग काय? आम्ही ह्याचा छडा लावायचं ठरवलं.
लोकसत्तेचे वर्षभराचे अग्रलेख आम्ही मोठ्या प्रयत्नपूर्वक वाचले. अभ्यासले. कॉफीशिवाय पुन्हा वाचले. त्या सगळ्या अभ्यासाचा सारांश आज इथेआम्ही मांडत आहोत.
तुम्ही लोकसत्ता वाचता का? खरं तर प्रश्न असा हवा की तुम्ही लोकसत्ता का वाचता? बातम्या ह्या अतिशय ब्रॉड क्याटेगरीत ते सध्या वाट्टेल ते टाकतात. खरं तर त्यांनी "कोण कोणास म्हणाले" असं नामकरण करायला हवं कारण कोण ट्विटरवर काय बरळलं हेच बहुतांशी दिसतं. नाहीतर मग सामनाकार राऊतांची मुक्ताफळं तपशीलवार लिहिलेली असतात. सामनाचा अग्रलेख दोन ठिकाणी छापून येतो - एकदा सामना मध्ये आणि पुन्हा एकदा लोकसत्तेत!
असो.
आजचा आमचा विषय आहे लोकसत्तेचे अग्रलेख. तुम्हाला देखील लोकसत्तेसारखे अग्रलेख लिहायचे आहेत का? (पुन्हा खरं तर प्रश्न चुकला. तुम्हाला लोकसत्तेसारखे अग्रलेख का लिहायचे आहेत? हा अधिक गंभीर प्रश्न आहे, जाऊ दे. )
तर आम्ही इथे आहोत ना! लेखणी घ्या, शब्दकोष पुढे ओढा आणि सुरुवात करा!
E.g. ही बातमी बघा.
--------------------------------------------- ---------------------------------------------
सासुरवाडीला जेवला नाही म्हणून जावयाला सासरच्या लोकांनी बेदम मारलं
--------------------------------------------- ---------------------------------------------
आता सुरुवात करू मथळ्यापासून.
अल्गोरिथम नियम १ -
मथळ्यात अनुप्रास हवाच. विषयाचा संबंध नाही. किंबहुना मथळा पाहूनच बातमीतलं फोलपट किंवा सत्त्व निवडता येऊ शकतं.
कसं ते पहा.
उदा. आपल्या बातमीसाठी काही मथळे आणि त्यावरून लिहिलेल्या अग्रलेखाची रूपरेषा बघा -
जावयाशी जबरदस्ती ( कौटुंबिक हिंसा )
सासरची सुरसुरी ( पुरूषसत्ताक व्यवस्था - त्याचे दुष्परिणाम )
बाहेरची बेफिकिरी (रेस्टोरंटचे जेवण - निकस आहार -. कुपोषण )
अल्गोरिथम नियम २ -
पहिला परिच्छेद हा विषयाचा फोलपणा स्पष्ट करण्यात खर्ची करावा. म्हणजे मुळात ही बातमी किती किरकोळ आहे, त्यात काहीच विशेष नाही वगैरे पाल्हाळ लावावं. उदा.
"आजकाल घरोघरी स्विगी आणि झोमॅटोचे पीक आले असताना एखाद्या घरात जेवणातून मारहाण होते ह्यात नवल ते काय? गृहिणी तर आठवड्याचे अर्धाअधिक दिवस स्वयंपाकच विसरल्या आहेत अशी परिस्थिती इ. इ.
असा परिच्छेद पूर्ण करतानाच शेवटल्या वाक्यात पलटी मारावी की असं सगलं असलं तरी अग्रलेख लिहावा लागेल.
"असे असले तरीही ह्या विषयाची> दखल घेतलीच पाहिजे"
"या निमित्ताने समाजातल्या विषयाचा> तपास केला पाहिजे. "
"विषय> ह्याचा परामर्श घेणे आवश्यक ठरते"
अल्गोरिथम् नियम ३ -
तेल आणि अर्थव्यवस्था ही ओढूनताणून का होईना, घेऊन या.
विषय काहीही असला तरी त्याचा संबंध अर्थव्यवस्था आणि तेल ह्याच्याशी जोडा.
उदा.
"स्वयंपाकाच्या जिन्नसांचे भाव गगनाला भिडले आहेत त्याचं कारण आहे आखाती देशातील कुठलासा अगम्य ग्रुप> ने तेलाचे वाढवलेले दर"
"ह्या विषयावर> आर्थिक भान नसल्याने लोकांमध्ये गैरसमज आहेत, त्यात नवल काय?
"सासरी न जेवण्याचे खरे कारण अर्थव्यवस्थेने कोलमडले कौटुंबिक संबंध आहेत हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही."
हा परिच्छेद कसाही आणि कितीही लांबवता येतो - कारण आपलंच होम ग्राउंड!
आणि शेवटला नियम -
मोदीजी आलेच पाहिजेत.
विषय काहीही असला तरी त्याचा संबंध सध्याच्या सरकारशी लावता आला पाहिजे.
समीक्षेचा विषय निवडा
शिवाय खालील वाक्यांची पखरण
शिवाय खालील वाक्यांची पखरण विसरलात.
.. हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
.. हे तर शाळकरी पोर देखील सांगेल.
.. सर्वांनाच माहित आहे.
.. याच्या तपशीलात जाण्याची गरज नाही..
आणि विद्यमान पंतप्रधानांचे कौतुक करण्याची वेळ नाईलाजाने आलीच तर त्या कौतुकाला शेवटी "च" लावून त्यानंतर "पण" .... असे म्हणून काय (सगळेच) चुकले त्याचा "परामर्श"
म्हणजे..
सवलत दिली याबद्दल मोदी यांचे कौतुकच.. पण..
चीनला असे सुनावले याबद्दल अभिनंदन केलेच पाहिजे... पण..
...
या निर्णयाबद्दल पंतप्रधान कौतुकास पात्र ठरतात हे नि:संशय.. पण कौतुकाच्या उत्सवी वातावरणात सत्याचे विस्मरण होऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच करणे आवश्यक.
जबरी निरिक्षण आहे
मी लोकसत्ता चा नियमित वाचक. मला अग्रलेखाची भाषा आवडते. मात्र कुबेरकाका कधीकधी फारच थोर लिहितात. बहुधा अग्रलेखाचे मथळे हे कुठल्यातरी काव्यपंक्ती, समास, सुभाषित किंवा तत्सम रुढ अर्थाच्या म्हणी वा रुपक अलंकारिक भाषेचे मॉडिफाईड व्हर्जन असतात.
कुबेर सरांचं तेलाविषयी लिखाण मला खूप आवडलं होतं. नंतर इंग्रजी साहित्य वाचनात आल्यानंतर त्यांचं मराठीतील लिखाण गोषवारा प्रमाणे वाटू लागलं.
कुबेर सरांचा रामदास स्वामी वर विशेष लोभ दिसतो. त्यांच्या विषयी लिहिताना निरूपण सांगितल्याप्रमाणे लिहितात.
लोकसत्ता चे काही अग्रलेख वाचण्याआधी जर एक दोन दिवसांपूर्वीचे प्रमुख इंग्रजी वर्तमानपत्रातले अग्रलेख जर वाचले असतील तर लेख लिहिण्याची कुणीतरी खूपच सक्ती केली की काय असा प्रश्न पडतो.
गवि यांचे निरीक्षण पण भारी आहे. कौतुक करून हळूच उपदेशपर प्रश्न किंवा टोमणा लोकसत्ताच्या अग्रलेखात नेहमीच सापडतो.
असंताचे संत मला विशेष आवडलेला अग्रलेख पण माघार घेतली हे पटलं नाही.
बाकी महाराष्ट्रात अग्रलेख लिहून स्वतःला वेगळं सिद्ध करणारे खूप कमी संपादक पत्रकार वगैरे आहेत. त्यापैकी कुबेरकाका.
गिरीश कुबेर
- पहिल्यांदा एक सांगू इच्छितो की मी कुबेरांचा फॅन होतो/आहे(बहुतेक.)
त्यांची निरीक्षणं आणि आसपासच्या कचऱ्याकडे न बघता महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायची शैली ( आठवा: अन्यथा हे सदर) मला फार आवडायची.
महत्त्वाच्या संस्था/आर्थिक बाबी/ पुरोगामित्त्व इ.इ. २०१४त्तर शिव्याखाऊ विषयांवर ते आत्मियतेने, पोटतिडीकीने लिहित असत(असतात)
उ.दा. पावसाळ्यात गटाराचं झाकण उघडं राहिल्याने कुणी एक नामवंत डॉक्टर त्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला - ह्यावर कुबेरांनी जे लिहिलं होतं ते वाचू मला भडभडून आलं. एका विशेषज्ञाचा असा अकाली, अकारण आणि स्वस्त मृत्यू हे फार भयानक आहे- हे बाकी तेव्हा कुठे वाचल्याचं आठवत नाही.
त्यांचं बरंच लिखाण इंग्रजीतून मराठीत आणलेलं असतं - हेही ठीकच आहे, माझ्यासाठी तरी.
तेव्हा प्रॉब्लेम त्यांच्या आशयाबद्दल नाहीये, शैलीबद्दल आहे.
आणि त्यांच्या अग्रलेखाची शैली प्रचंड repetitive, boring and predictable झालेली आहे. बहुतेक इंटर्नकडूनच लिहून घेतात.
राशीभविष्य कसं कुठेही कसंही फिरवता येतं तसंच.
त्यापेक्षा आठवड्यातून एकदा लिहा कुबेर सर.
फार पूर्वी मी सामना आणि लोकसत्ताचे अग्रलेख वाचून
फार पूर्वी मी सामना आणि लोकसत्ताचे अग्रलेख वाचून खालील मजकूर लिहिला होता. उगाचंच स्वतःची जाहिरात वगैरे. :-)
लेखनशैली रिपीट होते हे सलग काही दिवस वाचल्यावर लगेचच समजते.
अमुक एवढ्या वेळात तमुक शब्दांत फलाना टिमका वर लिहा अशी सक्ती केली जात असावी तेव्हा तीच सहजसोपी शैली लिखाणात येत असावी. असा माझा अंदाज.
नशीब अजून चॅट जीपीटी ला मराठी लेख, अग्रलेखांचा डेटा पुरवून कोणी अग्रलेख वगैरे छापले नाहीत. तसे छापखाने जर सुरु झाले तर मराठी ब्लॉगर्सची दसपटीनं वाढ होईल.
सध्या कित्येक इंग्रजी ब्लॉग्ज वर येणारी आर्टिकल्स ही एक दोन वाय वाचल्यावर लगेचच लक्षात येतात.
आठवड्यातून एकदा लिहिले तर भरपूर वेळ मिळेल आणि लेखनशैली रिपीट होणार नाही.
.
वर्तमानपत्रात रोजच्या रोज अग्रलेख आलाच पाहिजे हा पायंडा माझ्या मते घातक आहे. त्यामुळे शैलीतला तोच तो पणा टाळणं अवघड होऊन बसतं. माधव गडकरी किंवा गोविंद तळवलकरांच्या लिखाणातही हा दोष दिसायला लागलाच होता. त्याऐवजी नीट विचार करून निवांतपणे थोडंफार पुनर्लेखन करून अग्रलेख समजा आठवड्यातून दोनच वेळा प्रसिद्ध केला तर काय बिघडेल? अगदी संग्राह्य जरी नाही झाला तरी वाचल्यानंतर तो थोडा जास्त वेळ लक्षात राहण्याची शक्यता त्यामुळे कदाचित वाढेल.
‘ऐसी’चा दिवाळी अंक जे वाचतात त्यांना डेडलाईन प्रेशरचे अनिष्ट परिणाम विस्ताराने समजावून सांगण्याची गरज नाही.
----
+१
+१
आणि कोणत्याही अग्रलेखातील मूळ टीका प्रवाह सुरू करण्यापूर्वी नेहमी काही प्रश्न किंवा विषय "बाजूला ठेवणे" आवश्यक.
अ , ब, क ही चर्चा बाजूला ठेवू, त्या विषयात न शिरता आपण तमुक मूळ मुद्द्याचा परामर्श घेऊ. , क, ख, ग, घ हे असे प्रश्न उभे न करता आपण थेट तमुकविषयाकडे जाऊ.. पण ते सर्व प्रश्न आणि विषय , आरोप इत्यादि परेग्राफ भरून नीट लिस्ट मात्र केलेले असतात .. आणि मग ते सोडून द्यायचे असतात.
लोकसत्ता काही
लोकसत्ता काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत वाचनीय पेपर होता. संपादकांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व उत्कृष्टच आहे. पण हल्ली त्यांचे अग्रलेख आणि इतर लेखन खूपच boring आणि predictable झाले आहे. इतर सदरंही पूर्वीप्रमाणे interesting आणि माहितीपूर्ण नाहीत. (काही अपवाद वगळता, उदा. श्रीराम गीत, अमृत बंग, रघुनंदन गोखले). एकंदरीतच, पूर्ण अंकात, एक नकारात्मकता भरुन राहिलेली असते. फक्त लोकसत्ताच वाचला तर असे वाटावे की ह्या भारतदेशात काही चांगले घडतच नाहीये! रोजच्या अंकात आता पहिली नजर जाते ती सुडोकुवरच!!
मी खूप वर्षांपासून लोकसत्ताचे
मी खूप वर्षांपासून लोकसत्ताचे अग्रलेख वाचणं बंद केलं आहे. बंद करण्यामागे भंकसगिरी हे एक कारण होते. कळवळा नीट कळवण्याच्या स्वरूपात येत नाही. सणसणीत, चणचणीत असण्याला वावडं नाही पण त्याचा अतिरेक खूप... विषय मर्यादित का ठेवत नाहीत देव जाणे. अदिती mam ची क्षमा मागून असे म्हणतो की कुबेर हे अच्युत गोडबोले यांप्रमाने सर्वमाहिती सम्राट वाटतात. दोन्हींमध्ये अस्मानी-सुलतानी फरक असला तरी...
तरीही अर्थशास्त्रविषयक त्यांचे लेख वाचावेसे वाटतात. वाचून होत नसले तरी...
हा हा हा.. couldn't agree
हा हा हा.. couldn't agree more.