ज्योतिषांकडे जावे का? का जावे? … आमचेही काही प्रयोग
सांप्रतकाळी भारतवर्षात काय, किंवा विलायतेस काय, बरेच उच्चविद्याविभूषित जंटलमन आणि सुविद्य लेड्या ज्योतिषांची टर उडविताना दिसतात; कां की त्यांचे मते ज्योतिष हे एक थोतांड असून लबाड ज्योतिषी मडळींनी केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी ते रचिलेले आहे, आणि ज्याअर्थी विश्वचूडामणि असलेल्या ‘आम्रविका’ खंडातील प्राख्यात ‘सायनस’ या महासिकाची ज्योतिषविद्येस मान्यता नाही, त्याअर्थी हे थोतांड असल्याचे निर्विवादपणे सिद्धच होते, सबब समस्त लुच्च्ये ज्योतिषी हे खेटरे मारण्याच्या लायक होत.
बरे, एकीकडे हे चित्र, तर दुसरीकडे पहावे तो ज्योतिषांकडील गर्दीस खळ नाही, वृत्तमानपत्रादिकात याविषयीची सदरे, धोत्रे, बंड्या, चोळ्या, इत्यादि वर्षानुवर्षे सुखनैव चाललेली असतात, त्यांसही खळ म्हणून नाही; राशिचाक्रादि कार्यक्रम लोक दमड्या खर्चून चवीने बघतात, दूरदर्शनादिवरील गुबगुबीत, साजर्या - गोजर्या ज्योतिषांचे तर उखळ कायमचे पांढरे झाल्याचे दिसूनच येत असते, ज्योतिषाचीच जुळी भावंडे म्हणावीत, अश्या वास्तुशास्त्र, फ़ेंगशुई, नाडी इ. ची भलावण करणारेही बहुत लोक सांप्रत दिसून येतात.
सारांश, या दोन्ही प्रकारची माणसे एकसमयावच्छेदेकरून दृष्तोत्त्पत्तीस येत असल्याने मति गुंग होऊन बहुत मनुष्यांचे ठायी आपण ज्योतिषाकडे जावे किंवा कसे, असा संभ्रम निर्माण झालेला दिसून येत असतो.
आम्ही स्वत: ज्योतिषाच्या वाटेस कधीच गेलेलो नव्हतो, परंतु एके दिवशी योगायोगाने ‘लंबक विद्या’ हे पुस्तक आमच्या हाती पडले, आणि बघता बघता आम्ही स्वत:च लंबकाद्वारे भविष्यकथन करू लागलो.
कालांतराने आम्ही लंबकाचे प्रयोग करणे कमी करत गेलो, त्या सुमारास एक दिवस आमच्या परिचयातील एक वयस्क जोडपे आपल्या तरूण मुलीस घेऊन आमचेकडे आले. सदर तरुणीची मलूल मुद्रा, हताश दृष्टी इत्यादिंवरून तिला काही असाध्य व्याधी जडली असावी, असे वाटत होते. इला काय झाले, अशी पृच्छा करता इचा प्रेमभंग जाहलेला असून त्यायोगे ती फार कष्टी जाहलेली आहे, सबब दिवसभर उदासवाणी बसून असत्ये, खातपीत काहीएक नाही, आम्ही सर्वांनी तिची फार समजूत घातली, तरी त्याचा काहीएक उपयोग नाही, दिवसेंदिवस इची प्रकृती खालावत चाललेली आहे, डागतरांचे औषधाचाही काहीएक परिणाम नाही, सबब ज्योतिषाच्या तोडग्याशिवाय काही तरणोपाय आम्हास आता दिसत नसल्याने तुमचेकडे आलो आहोत, असे उत्तर मिळाले.
हे सर्व ऐकून आम्ही फार कष्टी होऊन स्वत:शीच ह्मणालो:
“अरेरे, काय या बापुडीचे प्रारब्ध, “वो हस के मिले हमसे, हम प्यार समझ बैठे” अशी सुरुवात होऊन आता इची अवस्था “ तंग आ चुके ही कश्म-कशे जिंदगीसे हम, ठुकरा न दे जहां को कहीं बेदिली से हम ” अशी झालेली आहे. “बहार आनेसे पहले, खिजां चली आयी” हेही तिच्या मुद्रेवरून दिसून येत आहे. इच्या “बेदर्दी बालमा” ने “बेमुरव्वत” पणे इजला “हाय अकेला छोड गये” असे करून तो स्वत: मात्र कुणाबरोबर तरी “ये राते, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा” म्हणत खुशाल हिडत आहे. इची “तडप ये दिन-रातकी” अशी अवस्था बघून कुणीतरी आता इजला “राही तू मत रुक जाना… कभी तो मिलेगी तेरी मंजिल, कहीं दूर गगन की छाओंमे” अशी सांत्वना तातडीने देणे गरजेचे आहे, आणि ज्याअर्थी हे तुजकडे मोठ्या आशेने आलेले आहेत, त्याअर्थी हे काम आता त्वां सत्वर करावेस, याबद्दल किमपि संशय नाही”
आमच्या अंतर्मनाने असा निर्वाळा देताच आम्ही ताबडतोब आमच्या लंबकविद्या करण्याच्या जागी स्थानापन्न होऊन त्या मुलीस आमचे समोर, तर तिच्या माता-पित्यास दोन्ही बाजूला बसवून दृष्टी लंबकावर स्थिर ठेवण्यास सांगितले, आणि आम्ही त्या बापड्या मुलीस मदत करण्याचे आवाहन आमच्या लंबकास करून चित्त एकाग्र केले.
लंबकाकडून अनुकूलतेचा इशारा मिळतच आम्ही मोठ्याने “हिचा ज्याच्यावर जीव जडलेला आहे, तो तरूण या घडीस काय करीत आहे?” असे विचारले, यावर लंबकाकडून “सांप्रत तो दुसर्या स्त्रीसोबत रममाण झालेला आहे” असे उत्तर मिळाले, त्यावरून ती तरुणी हमसाहमशी रडू लागली. तिचे जरा सांत्वन करून मग आम्ही “बरे, तर मग तो तरूण स्वभावाने कसा आहे?” असे विचारता “तो चंचल स्वभावाचा असून नित्य नवीन स्त्रियांच्या शोधात फिरणारा लंपट पुरुष आहे” असे आले. मग “इचा त्याचेशी विवाहसंबंध घडून आल्यास तो सुखाचा ठरेल काय?” असे विचारता “किमपि नाही” असे उत्तर त्रिवार आले. “विवाह केल्यास आणखी काय घडेल?” अशी पृच्छा करता “सासरी फार छळ होऊन पुढे वैधव्य येईल” असे उत्तर मिळाले.
एवढे सर्व होईतो साधारणत: अर्धा कलाक उलटलेला होता, आणि त्या मुलीच्या चर्येवर अंमळ तरतरी येऊ लागलेली होती. पुढे “हिने आता काय करावे?” अशी पृच्छा लंबकाद्वारे केल्यावर “अभ्यासात लक्ष घालून शिक्षण पूर्ण करावे” असे उत्तर मिळाले, आणि "हिच्या विवाहाचे काय?" असे विचारता “शिक्षण पूर्ण झाल्यावर आई-वडीलांनी शोधलेला उत्तम पती लाभून सुखाचा संसार होईल” असे कळले.
आता मुलगी चांगलीच सावरली होती आणि तिच्या मुद्रेवरील भाव पालटून ती समाधानी दिसत होती. बर्याच दिवसांनंतर ती प्रथमच पोटभर जेवली, आणि आणि आमचे वारंवार आभार मानून ती मंडळी स्वगृही परतली. आठवडाभरातच तिच्या वडिलांनी ती आता पुनश्च पहिल्यासारखी झाली असून नीट अभ्यासाला लागली असल्याचे कळवले. आम्हालाही ती पुन्हा “आज फिर जीने की तमन्ना है” या स्थितीत आल्याचे ऐकून बरे वाटले.
आणखी एक उदाहरण म्हणजे आमच्या परिचयातील (आता दिवंगत) पासष्ठ वर्षे वयाचे एक चित्रकार विधुर असून एकटेच मोठ्या घरात रहात असत. त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झालेला होता. एक दिवस मला ते म्हणाले, की तुला अगदी खाजगी असे काही सांगायचे आहे, आणि तुझ्या लंबकविद्येद्वारे त्या बाबतीत भविष्य जाणून घ्यायचे आहे.
त्यांच्या संपर्कातील सुमारे पन्नाशीतील एका विवाहित स्त्रीवर त्यांचे मन जडले होते. त्या स्त्रीस तीन मुले असून ती पती व मुलांसोबत रहात असे. त्यांना असे वाटू लागले होते, की तीही त्यांच्यावर अनुरक्त असून यांनी पुढाकार घेतल्यास ती सहजच आपले घर सोडून यांच्याबरोबर येऊन राहील.… आम्हाला जरी हा सर्व त्यांच्या एकटेपणाचा, विधुरावस्थेचा आणि कल्पनाशीलतेचा परिणाम आहे, असे वाटले, तरी त्यांना मात्र पूर्ण खात्री वाटत होती, हिंम्मत मात्र होत नव्हती.
मी त्यांना विचारले, की सध्या तिचे तुमच्याबद्दलचे आकर्षण, (आणि त्यामुळे तिची तुम्हाला ‘हो’ म्हणण्याची शक्यता) किती टक्के असावे असे तुम्हाला वाटते? “ऐशी टक्के” ते म्हणाले. मग मी टक्केवारीचा चार्ट वापरून लंबकाद्वारे तिचे हे आकर्षण पुढील काही वर्षात कमी कमी होत होत पाच-सात वर्षात ते पूर्णपणे लयाला जाईल, असे त्यांना दाखवून दिले. परिणामी त्या गृहस्थांनी तो नाद सोडून दिला (आणि संभाव्य मानहानि आणि संकटापासून बचावले).
वाचकहो, निराशेच्या गर्तेत सापडलेली ती मुलगी आणि खोट्या आशेत दिवास्वप्ने बघणारे ते गृहस्थ यांना त्यांच्या त्या त्या स्थितीतून बाहेर काढण्यास या विद्येचा उपयोग आम्ही करू शकलो, हे काय कमी आहे? हे प्रयोग आम्ही कवडीही न घेता करायचो, शिवाय येणाराचे आदरातिथ्य करायचो, यात आमचा कोणता स्वार्थ होता? त्या दीड-दोन वर्षात आम्ही बरेच जणांना दिलासा देऊ शकलो, मदत करू शकलो. पुढे मात्र आम्ही असे प्रयोग करणे थांबवले, ते आजतागायत.
सारांश, ज्योतिषाच्या विविध पद्धतींचा निस्वार्थीपणे, समजून उमजून नीट उपयोग केला गेला, तर ती एक उपयोगी, हितकारक विद्या ठरू शकते, भले तीस ‘शास्त्र’ म्हणता येवो वा न येवो.
पत्रिका बघून सांगितलेले भविष्य तंतोतंत खरे ठरल्याचे अनुभवही आम्हाला आलेले आहेत, मात्र हे अनुभव धंदेवाईक ज्योतिषांकडून आलेले नसून निस्वार्थीपणाने लोकांच्या मदतीसाठी आपल्या विद्येचा उपयोग करणार्या, विनम्र व्यक्तींनी केलेल्या भविष्यकथनाविषयी आहेत. त्याविषयी पुढे कधितरी.
पूर्वप्रसिद्धी: मिसळपाव
प्रतिक्रिया
कितवा धागा?
<सारांश, ज्योतिषाच्या विविध पद्धतींचा निस्वार्थीपणे, समजून उमजून नीट उपयोग केला गेला, तर ती एक उपयोगी, हितकारक विद्या ठरू शकते, भले तीस ‘शास्त्र’ म्हणता येवो वा न येवो.>
असल्या पिष्टपेषणाचा हा येथील कितवा धागा असावा? काही तर्क? नेहमीचेच यशस्वी कलाकार येथेहि उतरून नेहमीचीच डायलॉगबाजी सुरू करतील का?
'श्रद्धा - धार्मिकांचा प्लॅसिबो' हा धागा २०० प्रतिसादांचे लक्ष्य लवकरच गाठेल असे वाटते.
शब्द
पिष्टपेषण शब्द आवडला, धन्यवाद.
-Nile
रोचक धागा. असे अनुभव पाहिलेले
रोचक धागा. असे अनुभव पाहिलेले आहेत खरे, पण त्यासोबत तो नारळीकरांचा पेपरही पाहिलेला असल्याने ज्योतिषाला शास्त्र म्हणू धजत नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पत्रिका बघून सांगितलेले
जरुर! पत्रिका न बघताही भविष्य तंतोतंत खरी ठरल्याची उदाहरणेही लोक देउ शकतात.
>>ज्योतिषाच्या विविध पद्धतींचा निस्वार्थीपणे, समजून उमजून नीट उपयोग केला गेला, तर ती एक उपयोगी, हितकारक विद्या ठरू शकते, भले तीस ‘शास्त्र’ म्हणता येवो वा न येवो.<<
यावर आम्ही या ज्योतिषाच काय करायचें? हे लिहिले आहेच.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
पूर्वी हा धागा इतरत्र
पूर्वी हा धागा इतरत्र वाचलाय.. तिथलाच प्रतिसाद इथे डकवतो..
दोन्ही उदाहरणात जोतिषाचा काहीच संबंध नाही.. तुम्ही चांगलं समुपदेशन केलत असं म्हणता येईल.
यात वेळप्रसंगी खोटं बोलणं हितकारक असं म्हणता येईल.. उगाच लंबक, जोतिषाची भलावण कशाला.. (लंबकविद्या गमतीचा भाग असला तरीही)
तुमचं समुपदेशन कौशल्य चांगलं आहे तर जोतिष वगैरे न वापरताही लोकांचं भलं करु शकाल तुम्ही !!
त्यामुळे जोतिष विद्या नाही शास्त्रही नाही.. तुमच्या तंतोतंत खरं ठरलेल्या भविष्याच्या अनुभवावर पुन्हा कधीतरी लिहाल तेव्हा ते खरं खोटं ठरवुच
आपला स्वतःचा जोतिषावर विश्वास असेल तर गोष्ट वेगळी.
पण आपला विश्वास नाही पण लोकांचा आहे म्हणून आपण जोतिषाच्या भूमिकेतून खोटं सांगून लोकांचं भलं करण्यापेक्षा आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून लोकांना जोतिषातला फोलपणा दाखवून त्यांच्या स्ट्रेंग्थ दाखवून देउन योग्य मार्गदर्शन करणे जास्त उचित वाटते..
सहमत
सहमत
ते सर्व गमतीचाच भाग म्हणून लेखात आले असावे असे वाटते.
जोतिष विद्या नाही शास्त्रही
विद्या म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? (शास्त्रापेक्षा वेगळं काही अपेक्षित आहे असे समजून.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
थेट संबंध नसेल कदाचित, पण हा
थेट संबंध नसेल कदाचित, पण हा "शास्त्र" म्हणून जो काही प्रकार म्हटला जातो तो ISO सर्टिफिकेशनसारखा असावा. प्रोसेस ठरल्याबरहुकूम पार पडणं म्हणजे शास्त्र.. मग ती प्रोसेस काहीही असो.. ते शास्त्रोक्त.. तस्मात विज्ञानाला नुसतंच "शास्त्र" म्हणणं बंद केलं पाहिजे काय ?
तो पॉपर का कोण होता, त्याने
तो पॉपर का कोण होता, त्याने कैतरी व्याख्या केलीये म्हंटात शास्त्राची. त्या व्याख्येत बसणारी ज्ञानशाखा = शास्त्र असे सध्या म्हणतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चौदा विद्या
चौदा विद्या : चार वेद, सहा वेदांगे, तसेच न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र आणि पुराणे मिळून १४ विद्या आहेत.
संदर्भ - आम्हांस भावविभोर करणारे संकेतस्थळ, दै. सनातन प्रभात.
यात फक्त धर्माला शास्त्र म्हटलंय. प्लीज, पुन्हा त्यावरून धुळवड नको. हा विनोदाचा क्षीण प्रयत्न आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
'शास्त्र' म्हणजे काय?
'शास्त्र' हा शब्द भारतीय दार्शनिक परम्परेमध्ये ज्या अर्थाने वापरला जातो तो अर्थ आणि आजच्या मराठीतील त्याच शब्दाचा अर्थ हे सर्वस्वी भिन्न अहेत. आज आपण पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, जीवविज्ञानशास्त्र अशा ज्ञानशाखांना शास्त्र मानतो. प्राचीन परम्परेमध्ये मीमांसा, न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, वेदान्त ह्यांना शास्त्र असे मानत असत.
चालू धाग्यातील चर्चा ही मराठी अर्थाच्या संदर्भात चालू आहे असे वाटते.
(अवान्तर - मराठीमधील 'जा तुझ्यासारखे छप्पन्न पाहिलेत' ह्या तुच्छतादर्शक वाक्प्रचारामागे हाच संस्कृत अर्थ आहे. 'छप्पन्न' हा 'षट्प्रज्ञ' (सहा शास्त्रे जाणणारा, पक्षी मोठा विद्वान्) ह्याचा अपभ्रंश आहे असे वाचनात आले आहे. मोल्सवर्थने ह्याचाच अर्थ '(जुन्या भारतीयांच्या) समजुतीतील ५६ भाषा आणि ५६ देश माहीत असलेला' असा दाखविला आहे हे खरे आहे पण त्याला कसलाहि आधार दाखविलेला नाही. जुन्या भारतीयांच्या समजुतीत एकूण भाषा आणि देश ५६ होते असेहि अन्यत्र कोठे वाचलेले नाही. सारांश 'षट्प्रज्ञ पासून छप्पन्न' हे अधिक सयुक्तिक वाटते.)
अवांतराविषयी.. 'छप्पन्न' --
अवांतराविषयी..
हा उगाच जुळवलेला कींवा कल्पनाविलास वाटतो.. "तुझ्यासारखे छप्पन्न" यात तु हा कोणी मोठा असं अपेक्षितच नाही.. तु जो कोणी आहेस तसे खूप बघितलेत.. ५६ हा आकडा १७६० प्रमाणे खूप याअर्थीच असावा..
सहमत.. खाली मत दिलंच आहे.
सहमत.. खाली मत दिलंच आहे. शिवाय, असले छप्पन्न फुशारक्या मारणारे पाहिलेत, किंवा तुझ्यासारखे बोलबच्चन छप्पन्न पाहिलेत.. असे प्रत्यक्ष विशेषण वेगळे वापरुनही हा शब्द वापरला जातो.
अति-अवांतर
"अब तक ५६" चित्रपटाच्या नावाची प्रेरणा "तुझ्यासारखे छप्पन्न"मध्ये असावी काय?
धन्यवाद. बाकी षट्प्रज्ञ पासून
धन्यवाद.
बाकी षट्प्रज्ञ पासून छप्पन्न हे पटत नाही, कारण शेल्डन पोलीकच्या पुस्तकात जुन्या भारतीयांच्या समजुतीत ५६ च्या आसपास देश असल्याची एकदोन उदा. आहेत- माझे स्मरण बरोबर असेल तर एकदा ६४ आणि एकदा ५२ अशी काहीशी लिस्ट आहे ती.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माहिती रोचक. शिवाय वर बास
माहिती रोचक. शिवाय वर बास यांनी म्हटल्याप्रमाणे छप्पन्न हा संख्यावाचक शब्द संख्यावाचक अर्थानेच वापरला जात असताना त्यात वेगळा अर्थ असेल असं वाटत नाही. इन द्याट केस "जा.. तुझ्यासारखे दहा छप्पन्न पाहिलेत" असं काहीतरी झालं असतं.
ज्योतिषाचा संबंध
दोन्ही उदाहरणात ज्योतिषाचा खरेतर संबंध नाही हे खरे, परंतु ती मंडळी माझ्याकडे समुपदेशक म्हणून कधीच आली नसती. त्यांना ज्योतिषावर विश्वास असल्याने, आणि मी लंबकाद्वारे भविष्य सांगू शकतो, अशी त्याकाळी जी थोडीबहुत ख्याति पसरली होती, त्यामुळे ते आले होते. दुसर्या उदाहरणातील व्यक्तीशी माझा परिचय या प्रसंगापूर्वीही वीस वर्षांपासूनचा असून त्यांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक गोष्टी उघड केल्या नव्हत्या. ते वृद्ध चित्रकार आता दिवंगत झालेले आहेत. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे, कधीकाळी दिल्लीतील प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक, आणि काहीसे आढ्यताखोर होते. खरेतर ते मला (आणि इतर सर्वांना) कःपदार्थ समजत. मला कोण काय शिकवणार? असे त्यांना वाटायचे, त्यामुळे समुपदेशकाकडे ते कधीच गेले नसते. कित्येक यशस्वी लोकांना आपल्याला लोकांपेक्षा जास्त कळते, असे वाटत असूनही 'ज्योतिषाकडे मात्र काही विशिष्ट योग्यता असते, त्यामुळे त्यांना भविष्य जाणून घेता येते' अशी समजूत असते, असे बघितले आहे.
मुळात आपले विचार चुकीचे आहेत (वा सध्या चुकीच्या दिशेने जात आहेत), हेच बहुतेकांना मान्य नसते. त्यामुळे समुपदेशनाची गरज आपल्याला आहे, हे पटत नसते. तरी भविष्यात काय होणार आहे ? हे कुतुहल मात्र असते.
'इंद्रियातीत बोध' असे ज्याला साधारणपणे म्हणता येईल, त्याचा ज्योतिषात प्रयोग होत असतो. लंबकाच्या प्रयोगातही खरोखर भविष्यात डोकावता येऊन ते जाणून घेण्याचे अनुभव आलेले आहेत, म्हणूनच काही काळ मी कसोशीने त्याचा पाठपुरावा केला होता.
उद्या मी जर समुपदेशकाचा बोर्ड घरावर लावला तर कोणीही माझ्याकडे सल्ल्यासाठी येणार नाही (हे मी अनेक वर्षांच्या अनुभवाने सांगतो आहे, ती पण एक मोठी कथाच होइल) पण ज्योतिषाचा लावल्यास दोन-चार लोक तरी लगेच येऊ लागतील, ही वस्तुस्थिति आहे. त्यातून हा फुकटात भविष्य सांगतो म्हटल्यावर तर एरव्ही कधी त्या वाटेस न जाणारे सुद्धा येतात, हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे.
ज्या शहरात मी रहातो, तिथे किती आणि कोणकोण समुपदेशक आहेत, हे मला वा माझ्या परिचयातल्या कुणाला ठाऊक नाही, ज्योतिषी मात्र अनेकांना ठाऊक आहेत. अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन कुणाला फसवू नये, हे अगदी खरे, आणि हे फक्त ज्योतिषांसाठीच नाही, तर सर्वांसच लागू होते. (हल्ली तर या बाबतीत डागतर आणि इस्पितळे यांचा हात धरणारा कुणी नसेल). माझ्या स्वतःच्या माहितीत काही पैका न घेणारे, आणि उत्तम मार्गदर्शन करणारे (समुपदेशन करणारे म्हणा हवे तर) ज्योतिषी आहेत, अश्या लोकांकडे जाणे मलातरी काहीच चुकीचे वाटत नाही. असो.
दोन्ही उदाहरणात ज्योतिषाचा
असही म्हणता आणि
असही म्हणता तेव्हा तुमचं ज्योतिषविषयक मत आधी नक्की ठरवा..
जर त्याने नक्की काहिही सांगता येत नाही हे पटलं असेल तर ज्योतिषाच्या बुरख्याआडून करावसं वाटणार नाही. तुमचं मत नक्की ठरवा आणि त्याच्याशी प्रामाणिक रहा..
तसं जास्त लोकांच्या विश्वासाचं म्हणाल तर एखाद्या बाबाबुवाचं सोंग आणाल तर त्याहून जास्त माणस येतील.
तसच तुम्ही ज्योतिषाच्या बुरख्याआडून काहीतरी चांगलं केलत, पण यामुळे ज्योतिषावरील विश्वास दृढ होउन ती लोकं यानंतर तशाच गोष्टींच्या मागे लागू शकतील व इतर ज्योतिषांकडून फसवून घेण्याची शक्यता वाढवतील.. असा दूरगामी तोटा होउ शकतो..
असे एकच एक मत असावे हा आग्रह
असे एकच एक मत असावे हा आग्रह पटला नाही. बाकी लोकांना तर्कविसंगत वाटणारी मते कैकजणांची असू शकतात, नव्हे असतात. त्याने दूरगामी तोटा वगैरे उदाहरणार्थ रोचक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लेखातील दोन्ही उदाहरणे म्हणजे
लेखातील दोन्ही उदाहरणे म्हणजे दारु सांगून एखादे न चढणारे पेय दिल्यासारखे आहे. ज्याने पिणार्याला बरं वाटलं आणि समजही असा झाला की दारु पिउन बरं वाटतं. आणि यांनी तर लंबक वगैरे बंदच केलय..
आता पुढच्या समस्येला लेखातील दोन्ही पार्टींना असच वाटणार की दारु प्यातला हवी.. पण सगळे काही चांगलं करायच्या हेतुनं दुसरे न चढणारे पेय देणारे असतातच असं नाही .. बहुतांशी नसतातच!!
लोकांचे भले होत असेल तर
लोकांचे भले होत असेल तर समुपदेशन कुठल्या मुखवट्याखाली केले जाते याला कै महत्त्व नाही.
अन स्वतःचा तरीही त्यावर विश्वास असणेही विशेष चूक नाही. कुठे ना कुठे अशी परस्परविरोधी मते असणे हेच तुम्हांला पटत नाही हे रोचक आहे.
शिवाय, दिलेले उदा. देखील तितकेच रोचक आहे. यातून समाजाचे फार कै नुकसान होते असे वाटत नाही. नुसतेच "असे नै तसे होईल" छाप डूमसेयिंगला अंत नसतो, सबब विदा नसेल तर या केसमध्ये बोलणे निरर्थक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लोकांचे भले होत असेल तर
अगदी बरोबर पण हे शॉर्ट टर्म भलं आहे.
कारण होणार्या भल्यापेक्षा तो मुखवटा लोकांना जास्त आकषित करतो ..
असहमत. एंड शुअरलि जस्टिफाईज़
असहमत. एंड शुअरलि जस्टिफाईज़ द मीन्स इन धिस केस.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अरे बस बस .... कोणीतरी
अरे बस बस .... कोणीतरी थांबा!!!
बसच्या
ड्रायव्हरला उद्देशून आहे का हे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आई ग्ग!!!
आई ग्ग!!!
___
बॅट्या तुझ्यामुळे मला आज समं कडून अवांतराबद्दलची ताकीद मिळणार असं दिसतय
प्रतिसाद आवडला. ज्योतिषी हा
प्रतिसाद आवडला.
ज्योतिषी हा एकप्रकारचा कौन्सिलर म्हणुन काही ठिकाणी भुमिका बजावतो..ते योग्य कि अयोग्य हे व्यक्तिसापेक्ष आहे.परिस्थिती सापेक्श देखील आहे.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद मधे माझी भुमिका विशद केली आहे
बरेच लोक कृष्णधवल अशा द्विमितीत विषयाकडे पाहतात. एक तर व्हय तरी म्हना नाही ता नाई तरी म्हना हा त्यांचा खाक्या असतो. असो....
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
फलज्योतिष शास्त्र आहे काय?
फलज्योतिष शास्त्र आहे काय? http://mr.upakram.org/node/854
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
शैली प्रचंड आवडली. एखादा मस्त
शैली प्रचंड आवडली. एखादा मस्त रेट्रो मूव्ही बघत असल्यासारखं वाटलं.
भविष्य सांगितल्यामुळे ते तसं घडतं हा मुद्दा फारच रोचक. तुमच्या सत्कृत्यांतून दोन आयुष्य मार्गी लागली याबद्दल तुमचं कौतुक वाटतं.
दुसर्याची मानसिकता समजून,
दुसर्याची मानसिकता समजून, त्याला उचित मार्गदर्शन करणे, हा हेतू असेल तर त्यात काहीच वाईट नाही. अधिकांश ज्योतिषी बहुधा हेच करतात.