‘कहानी’ चित्रपटाविषयी एक मुक्तचिंतन
(हा ‘कहानी’ चित्रपटाचा परिचय नाही. त्यामुळे त्यात गोष्ट वगैरे सांगितलेली नाही. पण गोष्ट माहीत असली तर वाचायला सोपं जाईल. जिथे रहस्यभेद उघड केलेला आहे तिथे तशी नोंद आहे. ज्यांना तो जाणून घ्यायचा नाही असे वाचक तेवढा भाग टाळून उरलेला लेख वाचू शकतील.)
‘कहानी’ पाहून काही प्रश्न पडले. त्यातले काही इतरांनासुद्धा पडले असतील आणि ज्यांना चित्रपट आवडला त्यांच्यापाशी कदाचित समर्पक उत्तरं असतील म्हणून माझे काही प्रश्न आधी वाचकांपुढे ठेवत आहे :
ज्या दहशतवादी कृत्यानं सिनेमाची सुरुवात होते त्यात विषारी द्रव्याची कुपी फुटेलच अशी व्यवस्था असते का? प्रसंगात दाखवल्याप्रमाणे काही अपघात होईल आणि मग कुपी फुटली तर फुटेल असा भाग्यावर हवाला दहशतवादी ठेवतील का?
आपल्याकडे आलेली केस याच पोलीस ठाण्यात का, इतरत्र का नाही वगैरे काथ्या कुटण्यात कोणताही भारतीय पोलीस पटाईत असतो. कालीघाट ठाण्यात केस का दर्ज करावी याचं कुठलंच कारण नायिका देऊ शकत नाही – कारण नवरा कलकत्त्यात आल्याचाही काही पुरावा नाही तर कालीघाट पोलीस ठाण्याजवळ तो कुठून येणार? तरीही त्या केसवर त्या ठाण्यात तपास का चालू राहतो?
नायिकेच्या केसविषयी प्राथमिक तपासात काहीही हाती लागत नाही. तरीही तिच्याबरोबर दुनिया हुडकत बसायला त्या पोलिसाला एवढा वेळ कसा मिळतो? त्याला काही काम नसतं का? असेल तर ते केलं नाही म्हणून त्याचे वरिष्ठ त्याला काही सुनवत नाहीत का? (खूप उशीरा कधीतरी त्याचं किंचितसं स्पष्टीकरण येतं, पण ते सिनेमाच्या नंतरच्या भागापुरतं आहे. आधीचं काय?)
ज्या गेस्ट हाऊसमध्ये नायिका राहायला जाते त्याचा कथेतल्या तिढ्याशी नक्की काय संबंध असतो? का ते उगीचच जरा वातावरणनिर्मितीसाठी आहे? तिचा नवरा तिथे राहिला होता असं ती म्हणते खरं, पण नंतरच्या कथानकात त्या गेस्ट हाऊसचं विशेष ‘कर्तृत्व’ म्हणावं असं काहीच नाही. मग नयिकेविषयी आपल्याला सहानुभूती वाटावी म्हणूनच केवळ ते भिकार गेस्ट हाऊस का?
कथानकात अविश्वसनीय घटनांचा इतका भरणा का? उदाहरणार्थ, भाडोत्री मारेकऱ्याला नायिकेचा ठावठिकाणा सहज लागतो, किंवा जुन्या सरकारी कागदपत्रांनी शिगोशीग भरलेल्या कार्यालयात रात्रीच्या वेळी हवा तो एकच कागद सापडतो, पोलिसांच्या खबऱ्याला पूर्वी घडलेल्या आणि जिवंत साक्षीदार नसलेल्या घटनेचा मागोवा लागतो, कथानकाची गरज असते तेव्हा गर्दीत लोक एकमेकांना बरोब्बर आणि पटापट शोधून काढतात, पण कथानकाला गैरसोय होते तेव्हा शोधू शकत नाहीत, वगैरे.
आय.बी.च्या माणसाला स्थानिक पोलीस ठाण्याकडून केस आपल्या ताब्यात घेताना इतकी दमदाटी कशाला करावी लागते? सरळ सांगता येत नाही का की कुठल्यातरी गोपनीय कारणामुळे पुढचा तपास आम्ही करु म्हणून? ते पोलीस तसेही पट्कन मऊ पडणारे गोड पोलीस असतात.
मनमोहन देसाईंच्या, गोविंदाच्या किंवा सलमान खानच्या वगैरे सिनेमांत असले प्रश्न विचारायचे नसतात हे ठीक आहे, पण हा सिनेमा तर नव्या, कात टाकलेल्या, वास्तवदर्शी आणि तरीही रंजक असणाऱ्या हिंदी सिनेमाचा ताजाताजा अवतार आहे म्हणून सगळीकडे त्याच्या हुशारीचं कौतुक होतंय असं दिसतंय. मग पटकथेतल्या इतक्या साध्या गोष्टींवर थोडे कष्ट घेता आले नसते का?
लोक ‘बोर्न’ सिरीजमधल्या थरारक सिनेमांशी ‘कहानी’ची तुलना करत आहेत; आणि दिग्दर्शकाला खरोखर तसं काहीतरी करायचं होतं असं म्हणण्याला जागाही आहे, कारण ‘बोर्न’ आणि ‘कहानी’मध्ये अनेक साम्यस्थळं दिसतात. उदा :
सुरुवातीच्या प्रसंगांतले जंप कट (मराठी मालिकांमध्ये वापरून वापरून ते आता इतके झिजले आहेत की मला ते बघताच कंटाळा येतो, पण असो.) आणि हातानं धरलेल्या कॅमेऱ्यानं केलेलं चित्रण.
मारेकऱ्याला मोबाईलवर फोटो पाठवून ‘ह्याला मार’ असं सांगायचं.
सतत कुणीतरी कुणाच्या तरी मागावर असणं.
ज्यांच्यावर भिस्त टाकावी अशी यंत्रणा भ्रष्ट आणि स्वार्थी लोकांनी पोखरलेली असणं.
मारेकरी आपल्या सावजाला मारतो हे अगदी सहज, रोजची घटना असल्यासारखं दाखवायचं. सायलेन्सरमुळे गोळीचा आवाजदेखील फारसा येत नाही. जणू फार काही घडलंच नाही असा मग लगेच पुढचा प्रसंग चालू.
विचार करायला फारसा वेळ न देता एकामागोमाग एक घटना घडत जातात.
गुप्तहेर खात्यानं प्रशिक्षित केलेल्या कमांडोची कथानकाला असणारी पार्श्वभूमी.
वगैरे.
आता ‘बोर्न’ मालिकेतले सिनेमे चांगले की वाईट ते तात्पुरतं बाजूला ठेवलं तरीही हे मान्य करायला हवं की सिनेमाची पटकथा चित्तथरारक आणि जलदगतीची (आणि म्हणून रंजक) असली तरी ती त्याबरोबर पुष्कळ इतर तपशील आणि मुद्दे घेऊन येते. उदाहरणार्थ, निव्वळ भ्रष्ट आणि स्वार्थी लोकांनी पोखरलेली यंत्रणा दाखवून न थांबता [इथे ‘बोर्न’ मालिकेतली थोडी रहस्यं उघड केलेली आहेत. ज्यांना ती माहीत करून घ्यायची नसतील त्यांनी 'रहस्यभेद संपला' अशी सूचना येईस्तोवरचा भाग टाळावा] सी.आय.ए.चा एक प्रशिक्षित मारेकरी एक बेकायदेशीरपणे होणारी राजकीय हत्या आयत्या वेळी आपल्या सदसद्विवेकबुद्धीच्या टोचणीमुळे टाळण्याचा प्रयत्न करतो असा संदर्भ 'बोर्न’मध्ये आहे. [रहस्यभेद संपला] त्याच्या या क्रियेमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते आणि त्याला जगणं मुश्कील होऊन जातं. आपण कोण हेच तो विसरतो. आणि मग प्रेक्षकांना उलगडत जाणारी त्याची गोष्ट म्हणजे जेसन बोर्नचा ‘स्व’शोध आहे.
याशिवाय अजून एक गोष्ट ‘बोर्न’मालिकेत जाणवते : आधुनिक जगात सरकारं लोकांवर किती नजर ठेवून असतात आणि सर्वसामान्य नागरिकाची जवळपास प्रत्येक कृती ही सरकारला कशी दिसत जाते याचं अंतर्मुख करणारं किंवा भयप्रद चित्रण सिनेमात आहे. जागोजागी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रायव्हिंग लायसेन्स-पासपोर्ट-क्रेडिट कार्डसारख्या साधनांच्या वापराचं किंवा इंटरनेट वापराचं टॅपिंग अशा सर्व गोष्टींद्वारे तुमची इत्थंभूत माहिती तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणेला उपलब्ध होते. नागरिकाला काही खाजगीपणा उरत नाही याचा 'बिग ब्रदर' प्रत्यय जागोजागी येत राहतो. बोर्नची गोष्ट कुणाचीही गोष्ट बनू शकते याची हळूहळू होत जाणारी पण तीक्ष्ण जाणीव प्रेक्षकाला अस्वस्थ करते. मग बोर्न सर्वशक्तिमान, असामान्य ‘सुपरहीरो’ राहत नाही, तर भयग्रस्त, शंकाग्रस्त, परिस्थितीच्या तावडीत हकनाक सापडलेला माणूस होतो. सामान्य प्रेक्षक मग त्याच्या ‘स्व’शोधाशी अगदी समरस होतो.
कोण कुणाच्या बाजूनं आणि कोणती बाजू न्यायाची याविषयी संदिग्धता हा ‘बोर्न’मालिकेचा अजून एक गुण मानता येईल. नायकाला अधूनमधून अत्यंत क्रूर किंवा निर्घृण कृत्यं अगदी थंड डोक्यानं करताना दाखवलं आहे. आपण कोण आहोत हे विसरलेला नायक स्वत:बद्दलच तिथे साशंक होताना दिसतो. तथाकथित नायकाविषयी अस्तित्ववादी प्रश्न उपस्थित करण्याचा असाही धोकादायक मार्ग पटकथेत निवडला आहे.
या पार्श्वभूमीवर ‘कहानी’ पाहिला तर काय दिसतं?
भ्रष्ट, स्वार्थी, पोखरलेली यंत्रणा इथेही दिसते, पण ‘स्व’चा शोध वगैरे तत्त्वचिंतनात्मक प्रकार ‘कहानी’मध्ये नाही. प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यासाठी असाहाय्य गरोदर नायिका दाखवली आहे [रहस्यभेद सुरु] पण अखेर तेही सत्य नाही हे कळतं. सदसद्विवेकबुद्धीच्या टोचणीमुळे राजकीय हत्या करायला नाकारणारा नायक इथे नाही. त्याउलट व्यक्तिगत सूडाच्या कथेला दहशतवादाविरुद्धच्या लढ्याची फोडणी देऊन उदात्त बनवलं आहे.
[रहस्यभेद संपला]
मग 'कहानी'त अखेर हाती काय लागतं?
कलकत्ता, बंगाली गाणी आणि बंगाली नट वगैरे वापरून बंगाली प्रेक्षक खेचण्याची खेळी
विद्या बालन हे चलनी नाणं वापरून आणखी पुष्कळ प्रेक्षक खेचण्याची खेळी
दहशतवाद आणि त्यावर ताबा मिळवण्यात अयशस्वी ठरणारी सरकारं हा सामान्य प्रेक्षकांची सहानुभूती खेचणारा हुकुमाचा एक्का (यानंतरही खेचले न जाणारे उरलेसुरले अल्पसंख्य प्रेक्षक म्हणजे आमच्यासारखे शंकेखोर. त्यांच्यामुळे कुण्णाला काऽही फरक पडत नाही.)
बाकी सिनेमा तसा स्वस्तात केला आहे. त्यामुळे गल्ल्यावर यश मिळवणं सोपं जातं.
सुष्ट-दुष्टाचा 'with us or against us' छापाचा घिसापिटा, काळापांढरा सामना वापरला आहे. पहिल्या दहा-पंधरा मिनिटात सुष्ट कोण ते कळतं. मग अखेरचा पर्दाफाश होईपर्यंत एकेक दुष्ट समोर येत राहतात.
कसलाही धोकादायक मार्ग पटकथा चोखाळत नाही. 'बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको' हा मूलमंत्र आहे असं वाटत राहतं.
बरं नैतिक गुंतागुंत नको असेल तरी ठीक, पण किमान तर्कशुध्द मांडणी करण्याचे कष्टदेखील घेतलेले नाहीत.
थोडक्यात काय, तर कष्ट टाळून पैसे कमवायचा एक सोपा मार्ग यात सापडलेला दिसतो; प्रेक्षकही खूश आणि निर्मातेही खूश. मग आमच्या शंकेखोर मनाला कोण विचारतंय असं म्हणून आम्ही आपले घराकडे वळतो आणि 'कहानी'ला विसरून जातो. बाकी वेळोवेळी काही तास अक्कलखाती गहाण टाकण्याची सवय आम्हाला आहेच. किंबहुना ते 'ऑक्युपेशनल हॅझर्ड'च म्हणता येईल. त्यामुळे त्याविषयी तक्रार नाहीच. मग आपल्या हक्काच्या ठिकाणी थोडी भडास काढावी एवढाच या धाग्यामागचा हेतू. असो.
प्रतिक्रिया
हे असले प्रश्न पडतात हे
हे असले प्रश्न पडतात हे अनुभवाने माहिती असल्याने मी चित्रपट गाजत असताना पाहायच्या फंदात पडत नाही फारशी चित्रपट परीक्षणं (ती वेगवेगळी भरपूर असतात - वेगवेगळे दृष्टिकोन मांडणारे) वाचून अंदाज येतो एकंदर. कधीतरी मग नंतर निवांत पाहिला की आपल्या अपेक्षा मुळात मोजक्या राहतात - म्हणजे आपण नेमका कशासाठी अमुक एक चित्रपट पाहतो आहोत हे आपलं आपल्याला माहिती असतंच. त्यामुळे 'कहानी' कधीतरी तीन-चार वर्षांनी जमलाच सहज तर पाहीन
***
अब्द शब्द
हम्म
"छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे" च्या चालीवर... आता हे पाह्यला पाहिजे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
यानंतरही खेचले न जाणारे
खोटं बोलू नका. पिक्चर पाहिला ना, मग स्वत:ला खेचले न जाणारे काय म्हणता? का तुम्हीपण वर्तकांसारखे समाधी लावून 'कहानी' बघून आलात? त्यापेक्षा 'जॉनी गद्दार' वगैरे करमणूकप्रधान चित्रपटांबद्दल लिहा की!
पण एवढं सगळं म्हणताच आहात तर नाही पहात 'कहानी'.
अवांतरः आत्ताच 'इन्सेप्शन' पहाताना भयंकर वैताग आला. एकतर मारामारी दाखवा नाहीतर डोक्याला त्रास द्या. डोक्यांच्या मारामार्यांत उगाच खरी मारधाड, रक्त वगैरे हिंसा कशाला टाकायची? बरं या मारामारीतसुद्धा किती तोचतोचपणा आहे. "एक तो चतुर बोल नहीं तो घोडा बोल."
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भडास
'कहानी' पाहून काय लक्षात राहिले हे सांगणे कठीण आहे, पण हे 'मुक्तचिंतन' वाचून ध्यानात राहिला तो 'भडास' हा ओंगळवाणा शब्द.
संपूर्ण जगाला एका सूक्ष्मदर्शकासारख्या यंत्राखाली ठेऊन बघणार्या शास्त्रज्ञाची नारायण धारपांनी लिहिलेली एक कथा आहे. समीक्षकांची हीच कथा (आणि व्यथा) आहे. गुलाबजामुन खाताना कॅलरीजचा विचार करणारे, नायगाराच्या तळाशी उभे असताना यातून नक्की किती घनफूट पाणी एका सेकंदाला वाहून जात असावे असा विचार करणारे, 'राधी' वाचताना 'छा.. हे अगदी कृत्रीम, बायकांच्या आड्यन्सला रडवण्यासाठी लिहिलेले, उबवलेले आहे' असे म्हणणारे हे लोक असतात. त्यातून चारचौघांना बरे वाटेल त्याला आपण बरे म्हटले तर आपला विचारवंती काष्टा काही इंचांनी खाली घसरेल की काय अशा शंकेने त्यांना हातातली करंजी कडू वाटू लागलेली असते. डोळ्यांच्या जागी अंतर्गोल- बहिर्गोल भिंगे आणि हातापायांच्या जागी इंच फुटांची मापे घेणार्या पट्ट्या आणि कोन मोजणारे कोनमापक असणार्या या चिकित्सकांना खरे तर इतरांकडून कशाची अपेक्षा असत नाही, पण त्यांना लोकांनी दिलेली सहानुभूती स्वीकारतानाही 'तशी बरी आहे..पण...' असे म्हणून कपाळावरची एक सुरकुती वाढवायला आवडत असते. एखादे नृत्य बघताना 'प्रत्यक्षात कुणी असे चालत असते काय?' हा प्रश्न पडणार्या (या उपमेचा श्रेयअव्हेर) आठ्याळ राखुंड्या (या उपमेचा श्रेयस्वीकार) चिकित्सकांना आपली 'भडास' काढण्यासाठी हे ठिकाण 'हक्काचे' वाटावे हा खरे तर 'कहानी' च्या दर्जापेक्षा चिंताजनक प्रश्न आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
का बुवा?
अगदी तळाशी नाही, पण ऑब्झर्व्हेशन डेकवर उभं राहून प्रति सेकंद वाहून पाण्याचं आकारमान आणि यातून वीज कशी तयार करत असतील याचा विचार करताना आम्हाला तरी चिक्कार मजा आली. आमची मांजर जमिनीवरून खिडकीत उडी मारायची तेव्हा तिच्या पायांतून किती बल वापरलं जात असेल याचा विचार करणाराही एक मित्र होता त्याचीही आत्ता आठवण झाली.
अजून एक सांगते. अर्ध्यापेक्षा छोटा चंद्र दिसत असताना नेहेमी दिसतो त्यापेक्षा अधिक तिरका दिसत असेल तर त्यामागची त्रिमितीय भूमिती स्वतःची स्वतः, गूगल आणि विकीशिवाय समजून घ्यायला मला तर फार मजा आली होती.
जो विचार करेगा उस का भला, जो नही करेगा उस का भी भला।
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सिनेमाबद्दल आक्षेप पटले परंतु
मुळात अतिशय चिकित्सक स्वभाव असल्याने सिनेमाच, कलाकृती नव्हे तर कोणतीही गोष्ट/ निर्णय त्याची अशी उकल/चिरफाड होतेच. त्यामुळेच ररा, चिंजं, आरागॉर्न, भडकमकरमास्तर व काही अन्य लोक जेव्हा देश विदेशचे 'हटके' सिनेमे वर्णन करतात त्यातही कमी चिरफाड / कमीत कमी आठ्या पाडल्या गेल्या आहेत केवळ असेच सिनेमे मी बघतो.
पण चिंजं, अहो बारा विश्वातले सिनेमे पाहिलेले तुम्ही, अनेक हिंदी-मराठी सिनेमे किमान ठोकताळा पद्धतीने भंपक असणार हे माहीत असूनही का बघता हा मला न उलगडलेला प्रश्न आहे. जगाच्या सुरवातीपासून बनलेल्या पण तुम्ही न बघितलेल्या सिनेमांची यादी फार तर एका हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगी असावी असे वाटत आहे
हॅव्हिंग सेड दॅट, डोके बाजुला ठेवून सिनेमे बघायला आपल्यापैकी बरेच जणांना वेळोवेळी आवडते (लेट अस नॉट डिनाय इट) तसेच काही सिनेमे बघायचे वय असते. तसेच काही सिनेमे कितीही टुकार असले तरी विशिष्ट ग्रुप मधे टोमणे टाकत बघायला धमाल येते. उदा. भडकमकर मास्तर अथवा फारएन्ड बरोबर जुना हिंदी सिनेमा.
पण प्रदर्शित होणारा प्रत्येक सिनेमा बरीच लोक कसा काय बघतात हे मला न उलगडलेले कोडे आहे. कोणताही सिनेमाविषयक धागा घ्या, टुकार सिनेमे देखील बघणारे बरेच सदस्य सापडतील.
तुमची मते बुद्धीवादी, कमी त्रुटी असलेल्या सिनेमाकडे झुकणारी आहेत हे मान्य. आदर आहेच. पण सर्व जगात असे किती देश आहेत जिथे फक्त व फक्त बुद्धीवादी चित्रपटच निघतात व चालतात? असो अश्या विचारसरणीने केवळ "बुद्धीवादी" अथवा "ब्लू फिल्म्स" निघतील जगात.
सिनेमा हा व्यवसाय आहे व अन्य कोणत्याही व्यवसायाप्रमाणे कमीत कमी भांडवलात (बुद्धी, श्रम, साहित्य, साधनसंपत्ती, वेळ, पैसा सगळेच) जास्तीत जास्त परतावा (पैसा, मान, सन्मान) हा मनुक्श/प्राणी स्वभाव नाही का? असेही येनकेनप्रकारेण भांडवलशाही शाबूत रहाण्यात सध्यातरी इथल्या बहुसंख्यांचे हित आहे. कमीत कमी भांडवल वापरले गेल्याने पर्यावरणवादीही खुश होतीलच. दर्जाचे काय मानण्यावर आहे. रग्गड श्रम, पैसा, उद्दात विचारसरणी मांडूनही फ्लॉप गेलेल्या सिनेमांची व जीव दिलेल्या कलाकारांची यादीही आपल्याकडे असेलच.
असो एखाद्याचे 'ऑक्युपेशनल हॅझर्ड' त्यामुळे कामाचा भाग हे समजुन घेतले तरी असे सिनेमे पाहून मेंदुला त्रास झाल्याने समीक्षक लोकांच्या मानसिक/शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम असे संशोधन झाले आहे का? शेवटी भडास काढायची वेळच शहाण्या माणसाने स्व:तावर का येउ द्यावी? किमान सिनेमे न बघणे आपल्या हातात आहे.
असो कहानी सिनेमा आवडला असे अनेक लोक तुम्हाला इथेच सापडतील. सर्वांच्या निकषात बसतील असे सिनेमे काढणे ही एक अशक्यप्राय गोष्ट आहे. थोडक्यात आपापला ब्रँड निवडा व पेग भरा...
जाताजाता - चिंजं यांची सिनेमाविषयक मते मला पटतात, त्यांनी अप्रुव्ह केलेले सिनेमे जमेल तसे बघण्याचा माझा प्रयत्न असतो. कहानी बाद केल्या गेल्या आहे.
वा:
सहजरावांशी जोरदार सहमत. यावेळी मेगाबायटी प्रतिसाद देण्याचा त्रास वाचला. चिंतूशेट चित्रपटात पण जातीव्यवस्था असते हो. प्रत्येक जातीसाठीचे चित्रपट असतातच की. कुठल्या चित्रपटाकडून काय अपेक्षा ठेवावी याला काही लिमिट.
तसेच काही सिनेमे कितीही टुकार असले तरी विशिष्ट ग्रुप मधे टोमणे टाकत बघायला धमाल येते.
द्या टाळी.
अवांतर: बराच काळ निग्रहाने टाळलेला अलिकडचा एक हिट्ट चित्रपट शेवटी चार मित्राच्या अतीव आग्रहाने १२०/- रु ची शिडी आणून पाहिला. (नशीब डीवीडी नाही घेतली.) थोडा 'दिल चाहता है', थोडा 'मुन्नाभाई', थोडा 'थ्री इडियट्स' यांची भेळ. 'दिल...' मधे एक आर्टिस्ट म्हणून तिकडे एक, 'इडियट्स' प्रमाणे 'स्वतःशी एकनिष्ठ रहा (मला 'साहित्याशी एकनिष्ठ रहा' वाला सखाराम गटणे उगाचच आठवून जातो) हा संदेश, दिल...' मधल अमीरखानही लगीन वगैरेच्या भानगडीत पडत नसतो तरी अखेर 'आपल्या भावनांशी एकनिष्ठ' वगैरे रहा आपल्या प्रेमिकेच्या लग्नात तिला प्रपोज करतो. इथेही एक तसाच... पण थांबा फारच प्रेडिक्टेबल होतंय. माणूस बदला नि उलट करा. आधी प्रपोज कर नि मग 'स्वतःशी एकनिष्ठ राहण्याची' प्रतिज्ञा पाळण्यासाठी तिला फुटवा. सात-सात आठ-आठ मिनिटांच्या नेत्रदीपक(?????) वगैरे अड्वेंचर स्पोर्ट्सची दृश्ये (अर्धा तास इथेच भरला राव), चलनी नाणं म्हणून एक विवाहपूर्व सेक्स सीन, एका न दाखवलेल्या विवाहपूर्व सेक्सची आल्रेडी २५-३० वर्षांची होऊन बसलेली फलश्रुती, 'दिल...' प्रमाणे मधूनच एक प्रॅक्ट्कल जोक मारणे वगैरे, एक-दोन गाणी. भेळ तयार. कथा???? ते काय असतं बुवा? अहो नक्की काय सांगायचंय तुम्हाला? कशाला काय सांगायचं?..... जाऊ द्या. त्या चार मित्रांकडून प्रत्येकी २५/- रु ची भरपाई मागणारी नोटीस पाठवणार आहे. त्यात तुम्ही असाल तर चेक पाठवून देणे.
अतिअवांतरः २५x४ शंभरच होतात हे ठाऊक आहे. जो गणिताची चूक काढायला येईल त्याच्याकडून उरलेले २० रु. वसूल करायचे ठरवले आहे.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
धमाल प्रतिसाद
२५x४ शंभरच होतात हे ठाऊक आहे. जो गणिताची चूक काढायला येईल त्याच्याकडून उरलेले २० रु. वसूल करायचे ठरवले आहे.
गुरुजी भन्नाट
लेखात मांडलेले मुद्दे रास्त
लेखात मांडलेले मुद्दे रास्त आहेत आणि अगदीच छिद्रान्वेषी म्हणता येणार नाहीत.
तरीही चित्रपटाची समीक्षा करण्यासाठी पाहण्याऐवजी निव्वळ आनंदासाठी पाहणार्या लोकांना आवडेल असाच आहे असे म्हणतो.
बर्याच वेळा सुमार अभिरुचि असल्यास जास्त आनंदाचा लाभ होतो असा अनुभव आहे. अर्थात जास्त विचारक्षमता असलेल्या लोकांना "मला आवडेल असे फार थोडे आहे" याचा आनंद मिळत असेल हेही खरे.
'भावनाप्रधान' असणे हेच बॉलिवूडचे वैशिष्ट्य
चिंजं, चुक तुमची आहे.
बॉलिवूडपट, अमेरिकन 'सेव्ह दवर्ल्ड' छापाचे चित्रपट वगैरे बघते वळी तुम्हाला आशयगर्भ इराणीपट किंवा रूपकांनी भरलेला जपानी चित्रपट किंवा रहस्यभेदी फ्रेंच/युरोपियन/(सेव्ह द वर्ल्ड सोडून बनलेले) हॉलिवूडपट वगैरे चित्रपट यांच्यासारखा 'संपूर्ण' करेल ही अपेक्षाच चूक आहे.
बॉलिवूडपट हा 'भावनाप्रधान' असणे हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. भावनाप्रधान चित्रपटात तर्क लागेलच याची खात्री देता येईल कशी? सर्वसाधारण भारतीय प्रेक्षक (काहि मर्यादेपर्यंत) तर्कदुष्टता खपवून घेईल एकवेळ पण 'दुष्टता' कधीच नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मला आवडला बुवा !!
मला आवडला बुवा !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मलाही
मलाही आवडला. त्याच वेळी दाखवलेल्या इतर भयानक ट्रेलर्स च्या मानाने कितीतरी उजवा वाटला.
बुवाच का? बाई का नाही?
थत्ते साहेब,
तुम्हाला बुवा कसा काय आवडला? नैसर्गिक आकर्षणानुसार बाई आवडायला हवी.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
करेक्शन
थांकू हां चूक दाखवल्याबद्दल.
मला आवडला ब्वॉ (हा चित्रपट)
(क्लिअर) नितिन थत्ते
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आणखी एक करेक्षन... (सरळ)
आणखी एक करेक्षन...
(सरळ) नितिन थत्ते
असे हवे होते काय?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
शंकेखोरांमुळे कुण्णाला काऽही फरक पडत नाही
'आमच्यासारख्या शंकेखोरांमुळे कुण्णाला काऽही फरक पडत नाही', 'आपल्या हक्काच्या ठिकाणी थोडी भडास काढावी एवढाच या धाग्यामागचा हेतू' वगैरे आमचा काव्य-शास्त्र-विनोदाचा किंचित प्रयत्न काही शंकेखोरांना रुचलेला दिसत नाही. असो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
काथ्याकूट :-)
ज्या मोनालिसा गेस्टहाउस मध्ये बागची चा नवरा राहिला असतो, तो कालीघाट स्टेशनच्या "अंडर" आहे - त्यामुळे तिने तिथे प्रथम जाणे ठीक आहे, यात चूक काय? एफ आय आर अर्ज भरायला या पलिकडे काही लागतं का? माझ्या अंदाजे हरवल्या व्यक्तीच्या अर्जाची प्राथमिक चाचणी तरी करावीच लागते.
बाकीचे पोलीस तिला टाळायचा प्रयत्न करतातच, इं. सात्यकी तेवढा वैयक्तिक पातळीवर तिला मदत करतो, आणि उशीरा घरी जातो -त्याच्या आईचा त्याला त्याबद्दल फोनही येतात. पोलीसांना सतत काम असतं, ते ते नियमितपणे करतात, त्यांचे वरिष्ठ हे काम वेळेवर करण्यासाठी सतत त्यांच्या मागे लागून असतात, असा आदर्श तुम्ही समोर ठेवून पाहिलंत तर हे सगळं विचित्र वाटेल खरं, पण यात एवढे काही आश्चर्यजनक किंवा अविश्वसनीय मला तरी नाही वाटले.
<<<स्पॉइलर!!>> बागची चा खरा नवरा तिथेच राहिलेला असतो. म्हणूनच तिला सगळे तपशील आधीपासून माहित असतात, तिथे गेल्यावर तिला रडू फुटतं. ती फक्त त्याचं नाव बदलते. पोलीस ती सांगते त्याच तारखांना नेमकं कोण तिथे राहिलं होतं, तो ही लंडन हूनच आला होता, मग यात काही गोची आहे का, हे तपासू शकला असता. आधीच्या धाग्यात मी या मुळेच म्हटलं होतं की बागची च्या बॅकस्टोरी बद्दल थोडी पोलीस तपासणी, आणि त्याची तिनेच आधी घेतलेली खबरदारी दाखवता आली असती.
<स्पॉइलर>>
हे वीक पॉइंट आहेत असे समजूया, पण ९० मिनिटाच्या थ्रिलर मध्ये सगळे काही अगदी १००% वास्तववादी असते का? तसे असते तर प्रत्येक अॅक्शन थ्रिलर मध्ये घड्याळावर ४ सेकंद उरलेले असताना नेमकी तार तोडून अणुबाँब बंद करणे, जळत्या बसहून उडी मारून कार वर उभे राहणे, वगैरे काहीच लोकांना पचले नसते. थ्रिलर विद्याचे काही ठराविक वाक्प्रचार आहेत असं समजूया. वास्तववादाचे आणि सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ चे एक विचित्र, ठराविक मिश्रण प्रेक्षकांना ही अपेक्षित असते. नाहीतर गर्दीचे सीन्स, गाड्यांचे रेस वगैरे सगळ्या थ्रिलर मध्ये एवढे सारखे झालेच नसते. बॉब बिसवास चे पात्र तसेच आहे - तो खरोखर असा माणूस असू शकेल हे सगळ्यांना मान्य आहे का? त्याचा चष्मा, पोट, बॅग इत्यादी सगळेच कृत्रिम आणि विनोदी आहे.
हे खरोखर कळले नाही. नाट्यमय लाइसेन्स जाऊच दे, पण आपल्या देशात सरकारी उतरंडीत, खासकरून पोलीसांत वगैरे वरिष्ठांकडून अशी दमदाटी अजिबात होतच नाही काय?
मी बोर्न मालिका पाहिलेली नाही, आणि ती चित्तथरारक वगैरे आहे हे ऐकले आहे. पण टीकाच करायची झाली, तर मिशेल फूकोची ७०च्या दशकातली फोडणी ९०च्या दशकातल्या सिनेमाला थोडी शिळीच आहे की हो, असे ही तुमच्या वर्णनावरून म्हणता येईल!
असो. कहानी फारशी आधुनिक किंवा आधुनिकोत्तर तत्त्वचिंतनात्मक वगैरे नाही हे मान्य करू. दुर्गामहात्म्याचेच एक अत्याधुनिक कीर्तन असे त्याच्या कडे पाहूया. पण आयडेंटिटीचे तेच प्रश्न भारतातल्या सरकारी-गोची-थ्रिलर माध्ये तसेच उमटावेत असं काही नाही. इथेही फूको च्या पॅनॉप्टिकॉन चे राज्य ठाण मांडू पाहत असले तरी निलेकणी-चिदंबरम बायोमेट्रिक प्रभृतींना अजून त्यात यश आलेले नाही. सरकारच्या माहितीजाळातून सटकणे, अदृश्य होणे हे अजून इथे जसं शक्य आहे, तसेच सरकारच्या - निमसरकारी शक्तींमुळे, किंवा निव्वळ योगायोगामुळे इथे जीवन फारच स्वस्त ही आहे, या बर्यावाइट शक्यतांवर इथले थ्रिलर बेतले गेले, तर यात गैर काय? आणि माणुसकीचा चांगला नाट्यमय वापर केला (बागची आणि सात्यकींमधले आकर्षण, त्याचा दोघांनी केलेला स्वार्थी वापर, खानचे निवळणे) तरी चांगलेच आहे.
अहो कलकत्ता काही न्यू यॉर्क किंवा स्वित्झरलंड आहे की त्याला वापरून लोक थेटरात खेचले जातील? हे अजिबात कळले नाही.
हो, बट सो वॉट? कोएन ब्रदर्स नी ओ ब्रदर वेअर आर्ट दाओ मध्ये नाही का क्लूनीचा वापर केला?
आता यातला वास्तववाद तुम्हाला नाही का आवडला?
वर (आणि आधीच्या धाग्यात) म्हटल्याप्रमाणे अनेक धागे सुटे आहेत खरे, पण एवढा काही वाइट आणि टाकाऊ मला खरंच नाही वाटला. पण बघण्याआधी पूर्वग्रह काहीच नव्हते हे ही खरे. त्यामुळे कथेत गॅप असल्या तरी एकूण मांडणी मला बर्यापैकी टाइट वाटली होती.
.
.
निषेध, निषेध, निषेध.
स्वित्झर्लंड प्रत्यक्षात पाहिलेलं नाही, पण एसीत कापूस पसरून प्लास्टीकची सूचीपर्णी झाडं ठेवली आणि तिथे हिंदीत किंचाळणारी भारतीय माणसं सोडली की झालं स्वित्झर्लंड, हाय काय नाय काय! पण दोन-चार दिवसात कोलकाता आणि न्यूयॉर्क जे काही पाहिलं त्याचा विचार करता दोन्हीची तुलना करून कोलकात्याचा अपमान करून कृपया बंगाल्यांचा (आणि माझाही) रोष ओढवून घेऊ नये.
हे मला दिसलेलं कोलकाता: चित्र १, चित्र २, चित्र ३, चित्र ४
न्यूयॉर्क शहर, विशेषतः मॅनहॅटनमधे मला क्लॉस्ट्रोफोबिया जाणवला. पायाखालची जमीन मुंबई आणि कोलकात्यातही अभावानेच दिसते, पण निदान आसुरी आकाराच्या, एकसुरी खोक्यांमधे अडकण्याची भावना या शहरांच्या गर्दीमधे निरूद्देश भटकताना येत नाही.
आता आला ना प्रश्न! आता 'कहानी' पहावासा वाटतो आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे मला दिसलेलं कोलकाता: चित्र
अगं मी कलकत्त्यातच (अगदी आनंदाने) राहते, त्यामुळे कोणाचा रोष ओढवून घेण्याचा प्रश्नच नाही - तू पुन्हा इथे आलीस की मनसोक्त भटकूया! शहर खरोखर मस्त आहे. पण हिंदी सिनेमे आजकाल न्यू यॉर्क-लंडन मध्ये जास्त आणि मुंबई-दिल्लीत कमी असा माझा अंदाज आहे - त्यामुळे कलकत्ता हे गॅरंटी आकर्षक लोकेशन असे वाटले नाही. रें चे महानगर (आणि एकूण कलकत्ता मालिका) पाहिला तर हे शहर पडद्यावर किती सुंदर दिसू शकते हे पटतेच...
चित्रं छान आहेत - ३ नंबर मधलं नाटक तू बघितलं होतंस का? नंबर ४ अगदी अस्सल अस्सल कलकत्ता!!! मस्तच.
@जंतू - गिल्टी अॅस चार्ज्ड! पण शेवटी मला कहानी ९० मिनिटाचा टोटल पैसा वसूल वाटला होता, म्हणून तेवढे लिहावेसे तरी वाटले.
समाधान
बोर्न सिरीजच्या फॅक्चूअल+इतर मिस्टेक्स इथे वाचायला मिळतील, अर्थात सगळयाच बाजू नेहमीच योग्य असतील असे नाही, पण पहाणार्याला काय हवे हे पहाणार्याने ठरवावे म्हणजे चीडचीड होत नाही.
भडास काढून समाधान झाले असेल तर अत्ताच झालेल्या युरोपिअन फिल्म फेस्टीवल वर काही लिहा अशी विनंती करतो.
छ्या!! ह्यापेक्षा "श्रीपाद ब्रम्हे" किंवा "मुकुंद लेले" बरे. (ह.घ्या.)
या सर्व शंकांची उत्तरे एकाच
या सर्व शंकांची उत्तरे एकाच वाक्यात देता येतील.
ये हिंदी पिच्चर है, भाई...!
मग ‘कहानी’ ची मजा घ्यायची असेल तर त्यांच्याकडे कानाडोळा केलाच पाहिजे, नाही का ?
आणि टीकाच करायची असेल तर ‘कहानी’ च का, कुठलाही हिंदी पिक्चर चालेल !
मुक्तचिंतन आवडले.
चिंतातुर जंतू जी,
'कहानी' चित्रपटाबद्दल बरेच चांगले ऐकले आहे. हिंदी चित्रपट मी क्वचित एन्जॉय करु शकतो, त्या मानाने तुमचे हे मुक्तचिंतन मला बरेच जवळचे वाटले. भडास हक्काच्या ठिकाणी नाही काढायची तर कुठे काढायची?
मला तरी तुमचे हे मुक्तचिंतन आवडले
काहीतरी गोंधळ होत आहे
असे प्रतिसाद वाचून काहीतरी गोंधळ होत आहे असं जाणवलं. 'दबंग' किंवा 'मुन्नाभाई...' सिनेमाला मी अशी फूटपट्टी लावत नाही आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता 'कहानी' त्याच ओळीतला किंवा जातीतला आहे असं मला वाटत नाही. 'हिंदी पिच्चर'ला नावं ठेवणार्या अनेकांना 'कहानी' 'अधिक हुशार प्रेक्षकासाठी बनवलेला' आहे असं वाटून आवडला आहे. दिग्दर्शकाची भूमिकादेखील तशी आहे - कारण सिनेमात 'हिंदी पिच्चर'सारखी कवायती गाणी, आयटम गर्ल, टाईमपास विनोद, टाळ्याखेचू संवाद, दे दणादण मार्यामार्या, कंठाळी अभिनय वगैरे मसाला नाही. 'रामोजी फिल्म सिटी'छाप लोकेशनपेक्षा प्रत्यक्ष स्थळी (कालीघाट, मेट्रो, मोकँबो वगैरे) चित्रणावर भर आहे. एकंदर शैली वास्तववादी आहे. म्हणून मग 'पण हा सिनेमा तर नव्या, कात टाकलेल्या, वास्तवदर्शी आणि तरीही रंजक असणाऱ्या हिंदी सिनेमाचा ताजाताजा अवतार आहे म्हणून सगळीकडे त्याच्या हुशारीचं कौतुक होतंय असं दिसतंय.' असं म्हणावं लागलं आणि म्हणून अशी फूटपट्टी लावावी लागली.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हं...
एका कहानीच्या निमित्त सुरू झालेलं कवित्त्व.
काय हो
तुम्ही काय नुसते 'इन्द्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' म्हणण्यापुरते येताय काय? गुमान सामील व्हा बघू. अन्यथा प्रत्यक्ष भेटीत निवडक भिक्कार चित्रपटांतील भिक्कार गाणी आमच्या भिक्कार (ज्याच्यापेक्षा सर्दी झालेल्या बेडकाचा आवाजही अंमळ श्रवणीय म्हणता येईल असा) आवाजात ऐकवण्यात येतील.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
खिक्...
ररा, अशा चुका न निघणारा चित्रपट सांगा. तो पाहतो आणि मग ठरवतो गुमान कुठं सामील व्हायचं ते...
च्यायला, पुन्हा या चुका देखील दृष्टिकोनाचा परिपाक असतात. उदाहरणार्थ, वरचे प्रश्न क्रमांक दोन आणि तीन. त्यानंतर आयबीचा तपास. आयबीच्या तपासाविषयी चिंतूंनी प्रश्न उपस्थित केला तो वरवरचा. आयबी कधीपासून असल्या गुन्ह्यांचे तपास करू लागली, हा मुळात प्रश्न पाहिजे. च्यायला, आडातच नाही, पोहऱ्यात पाणी कसे आले याची चर्चा.
तेव्हा, असो.
मी 'कहानी' पाहिलेला नाही. पण त्याचे इतके कवित्त्व पाहून तर आता पाहणारही नाही.
आयबीचा तपास नसणारे 'जॉनी
आयबीचा तपास नसणारे 'जॉनी गद्दार' आणि 'इस रात की सुबह नही' बघून टाका पाहू. अडीच-तीन तासांचे शुद्ध मनोरंजन आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कहानी भिकारडा चित्रपट आहे !
साला त्यापेक्षा एम. एफ. हुसेनची चित्रे पाहिलेले किंवा चिन्हचा अंक वाचलेले परवडले.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
आता आली ना पंचाईत
पाहावासा वाटला तरी हरकत नाही, पण वरच्या परिच्छेदात रोचनाचा काव्य-शास्त्र-विनोदाचा प्रयत्न होता असं मला वाटलं (चूभूदेघे). कारण :
म्हणजे हॉलिवूडचा सिनेमा तसाही काळाच्या मागेच आहे, कारण एका फ्रेंच विचारवंतानं ७०च्या दशकात मांडलेली तत्त्वचिंतनात्मक मांडणी आता कुठे हॉलिवूडला सापडते आहे.
याच्याशी जंतू सहमत आहे. म्हणूनच मूळ धाग्यात 'आता ‘बोर्न’ मालिकेतले सिनेमे चांगले की वाईट ते तात्पुरतं बाजूला ठेवलं तरीही' असं वाक्य टाकलं होतं.
या पार्श्वभूमीवर कहानी तर दुर्गामहात्म्यच पुन्हा एकदा सांगते (इति रोचना)
जंतू : सहमत. म्हणजे हे तर आणखीच जुनाट आहे.
भारतात अजून तरी सामान्य माणूस यंत्रणेपासून लपून राहू शकतो. म्हणून हॉलिवूडला जाणवणारा खाजगीपणाचा अंत वगैरे आपल्या सिनेमात कशाला येईल? (इति रोचना)
जंतू : ते सर्व ठीकच आहे, पण मग 'कहानी' इतर सर्वसामान्य हिंदी सिनेमांसारखाच होतो (ढिसाळ पटकथा, योगायोग, मेलोड्रामा वगैरे). म्हणजे त्यात विशेष उल्लेखनीय असं काही नाही.
म्हणून थोडक्यात: अजूनही कहानी पाहावासा वाटला तर जरूर पाहा, पण रोचनानं त्याला चांगलं म्हणत म्हणत काय गंमत केली आहे हे लक्षात घ्या
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सिनेमा
सिनेमा पाहिला.
एकंदर प्रयत्न एक "सेरेब्रल थ्रिलर" बनवण्याचा आहे हे प्रतीत होते काय ? - होय.
काही प्लॉट लाईन्स कमजोर आहेत काय ? - आहेत.
पण एकंदर बटबटीतपणा, आयटम साँग गिरी , स्लॅप्स्टिक विनोद याला फाटा आहे काय ? - होय.
गुंतागुंतीच्या कथानकातून चित्रपटाच्या सुरवातीला येत असलेले संदर्भ जसजसा चित्रपट उलगडत जातो तसतसे अधिकाधिक अर्थपूर्ण वाटतात काय ? - होय.
मात्र या गुंतागुंतीच्या कथनतंत्रांचा उपयोग कथानकालाच अधिकाधिक संपृक्त बनवायला होतो. त्यातून एकंदर व्यवस्थेबद्दल किंवा मानवी अवस्थेबद्दल काही अधिक अर्थपूर्ण भाष्य सूचित केले गेलेले आहे काय ? - नाही.
म्हणजे ही अंतिमतः ही एक सूडकथा ठरते - आणि मुख्य म्हणजे सूड घेणार्यांच्या दृष्टीकोनातून हा सिनेमा बनवलेला आहे हे - काहीसे एकारलेले असे - मर्म मानायचे काय ? - होय.
असो. एकंदर सिनेमा स्वागतार्ह वाटला. असेच सिनेमे येत राहिले तर अधिकाधिक अर्थसंपृक्त सिनेमे पहायला मिळण्याची आशा वाढते.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
शेवटी हा 'कहानी' पाहिला. मला
शेवटी हा 'कहानी' पाहिला. मला आवडला. सिनेमॅटोग्राफी खल्लास आहे. चार दिवसांत कोलकाता पाहून बरंच काही बघायचं राहिलं असं पुन्हा एकदा वाटलं.
आमच्या कामासाठी आम्ही तुला वापरून घेतलं असं नायिकेला तोंडावर सांगणारा, बॅडी आणि पोलिसांमधे काहीही फरक नाही हे वाक्य कसलाही मुलामा न चढवता सांगणारा माणूस कोणाला काही गोडीगुलाबीने सांगू शकेल का? असा माणूस आय.बी.चा दोन नंबरचा महत्त्वाचा ऑफिसर कसा काय बनू शकतो असा प्रश्न मात्र जरूर पडला.
वेबसाईट्स आणि कंप्यूटर्स एवढ्या चटकन हॅक होऊ शकतात हे मला अविश्वनीय वाटलं. पण चित्रपटाच्या वेगामुळे ती शंका बाजूला ठेवली. पण शेवटी अमिताभच्या आवाजातलं निवेदन सगळ्याचा कचरा करणारं वाटलं. त्यापेक्षा त्याच्या आवाजातलं गाणं अधिक आवडलं.
काही छोट्या-मोठ्या गोष्टींमधले तपशील आवडले. विद्याला बॉब बिस्वास मेट्रो स्टेशनवर धमकी देतो तेव्हा तिने डोक्याला मागे हात लावून केसाची पिन शोधणं आणि शेवटच्या 'मारामारी'त साडीमधून, पदराखाली लपवून पोटावरचं आवरण काढणं सोपं असणं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कहानी पाहिला.
नुकताच कहानी पाहिल. धाग्यातील सारांशाशी सहमत आहे. कहानी चित्रपट 'चांगला' असला तरी उत्तम सिनेमा म्हणण्यासाठी बरेच अंतर कमी पडला आहे.
मात्र धाग्यात लिहलेल्या काही शंकांचे उत्तर देता येईल असे वाटते.
तिची गोष्ट 'खरी' आहे हे दाखवण्याकरता हे आवश्यक असावे असे वाटते. (आठवा, पोलिसाला मोर पाहून तिच्यावर विश्वास बसतो?) तिथे राहण्यात सहानूभूती (आपल्यापेक्षा त्या पोलिसाची इ.) मिळवणे हा उद्देश दाखवण्याचा हेतू आहे असे वाटते.
बोर्न सिनेमातून ब्लॅटंटली कॉपी केलेली मारण्याची पद्धत खटकली, (त्याचे नोकरीच्या ठिकाणी इनकंपिटंट असणे का दाखवले आहे कोणास ठावूक) पण त्याचा देशी अवतार आवडला. (म्हणजे अन-नोटीसेबल-नेस)
वरती मी यांच्या प्रतिसादात दिलेल्या दुवावरील बोर्नमधील काही चुका वाचल्या, त्यामानाने कहानी मधील चुका फारच जास्त गंभीर आहेत असे वाटते.
-Nile
गेस्ट हाऊस
ज्या गेस्ट हाऊसमध्ये नायिका राहायला जाते त्याचा कथेतल्या तिढ्याशी नक्की काय संबंध असतो? का ते उगीच..
त्या गेस्ट हाऊसमधे सीसी टीव्ही कॅमेरा नसतो ..कोणतेहि रेकॉर्ड ठेवले जात नसतात..
ती कोणत्याही स्वरूपाचा आय डी देत नही ..म्हणून ती असा भिकार लॉज निवडते..त्या मुळे कोणताही माग मागे न ठेवता निसटता येइल ..
म्हणूनच ती सदा सर्व काळ रूममधले ठसे पुसत असते..स्वच्छतेच्या नावाखाली
+१
चेक इनच्या वेळी रजिस्टरमध्ये सही करायच्या वेळेस तिला नेमकी चक्कर येते.
आणि हे स्पष्टीकरण सिनेमाच्या शेवटास सिनेमातच दिले आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मला तर आवडला कहानी
मला तर आवडला कहानी....
नुकताच आमिरखानचा तलाश पाहिला. त्याचा शेवट पाहिल्यावर वेळ फुकट गेला असे वाटले. (शेवट पाहेपर्यंत तसे वाटत नव्हते).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सहमत. मला हा फारच बाद चित्रपट
सहमत. मला हा फारच बाद चित्रपट वाटला.
सिक्स्थ सेन्सची प्रेरणा + इकडचा/तिकडचा मालमसाला(रुमी/खोरशेदची गोष्ट) घेऊनही सादरीकरणात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. त्यातल्या त्यात आवडणार्या गोष्टी म्हणजे सुरवातीचा(धक्कादायक सीन), राणी मुखर्जी, नवाझ सिद्दिकी वगैरे. आमिर खान बर्याच विचारानंतर/वाचनांनंतर स्क्रिप्ट स्विकारतो असं वाचलयं, एकूण त्याला बर्याचदा वाचल्यानंतर पण ते समजत नसावं असं दिसतयं.
बराच काथ्याकूट झालेला दिसत
बराच काथ्याकूट झालेला दिसत आहे. मी हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी पाहिला. इतर बॉलिवुडपटांपेक्षा उजवा आहे पण खूप आवडला असं म्हणता येणार नाही. विद्या बालनची एकच एक प्रकारची संवादफेक नको वाटते आता- 'इश्किया', 'द डर्टी पिक्चर', 'नो वन किल्ड जेसिका', 'परिणीता' आणि 'कहानी' पाहिलेत तिचे...कंटाळा आलाय तिचा. असो.
"भाडोत्री मारेकऱ्याला नायिकेचा ठावठिकाणा सहज लागतो, किंवा जुन्या सरकारी कागदपत्रांनी शिगोशीग भरलेल्या कार्यालयात रात्रीच्या वेळी हवा तो एकच कागद सापडतो, पोलिसांच्या खबऱ्याला पूर्वी घडलेल्या आणि जिवंत साक्षीदार नसलेल्या घटनेचा मागोवा लागतो, कथानकाची गरज असते तेव्हा गर्दीत लोक एकमेकांना बरोब्बर आणि पटापट शोधून काढतात, पण कथानकाला गैरसोय होते तेव्हा शोधू शकत नाहीत, वगैरे."
अशा घटनांच्या भरण्याबद्द्ल सहमत.