पोलिसांची सर्वसामान्यांना भीती का वाटते?
आत्ताच ई-सकाळ वर ही बातमी वाचली.
या बातमी मुळे मनात एक प्रश्न आला त्यावर विचारमंथन व्हावे असे वाटले म्हणून हा धागा.
'मण्णपुरम् गोल्ड'च्या कार्यालयातून चोरीस गेलेले साडेसतरा किलो सोन्याचे दागिने पुणे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुद्देमालासह पकडले.
या चोरीतील दगिन्यांची व रोख अशी किंमत जवळपास तीन कोटी 39 लाख 14 हजार रुपये होती.
केवळ २४ तासांत पुणे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणून 'मण्णपुरम् गोल्ड' च्या सहाय्यक व्यवस्थापकासह त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.
या थेट धडक कारवाईमुळे पुणे पोलिस प्रशंसेस पात्र आहेत यात शंकाच नाही.
एकूणच या बातमी वरुन असे वाटले की चोरीतील मालाची रक्कम जास्त होती, म्हणून पोलिसांनी ही धडक कारवाई केली का?
की पोलिस सर्वच गुन्ह्यांबाबत अशी धडक कारवाई करतात?
चोरी, खून, बलात्कार, आर्थिक फसवणूक किंवा मग रस्त्यांवरील अपघात अशा सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांबद्दल पोलिस तेवढेच संवेदनशील आणि सहकार्य करणारे असतात का?
पोलिसांमध्ये जर केवळ २४ तासांत धडक कारवाई करण्याची क्षमता आहे (जे वरील घटनेवरुन दिसले) तरीसुद्धा पोलिसांकडे जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना भीती का वाटते? हा मुख्य मुद्दा आहे असे मला वाटते.
ऐसी अक्षरेच्या विचारवंत व सुज्ञ वाचकांना विनंती आहे की वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करावी.
धन्यवाद
दिवेआगरमधील सोन्याची मूर्ती
दिवेआगरमधील सोन्याची मूर्ती त्याहून किंमती असावी. परंतु ती शोधण्याची गरज नाही असे पोलीसांना (योग्यच*) वाटत असावे.
मण्णापुरम मधील सोने हे लोकांनी तारण ठेवलेले असावे. ते शोधण्याची गरज नक्कीच होती.
*हे माझे वैयक्तिक मत आहे. गणपतीचेही असेच मत असणार. म्हणून त्याने ती चोरी होऊ दिली असावी.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
शंका
>>दिवेआगरमधील सोन्याची मूर्ती त्याहून किंमती असावी. परंतु ती शोधण्याची गरज नाही असे पोलीसांना (योग्यच*) वाटत असावे.
दोन रखवालदार मेले, त्याचं काय?
+१ सहमत आहे
दोन रखवालदार मेले, त्याचं काय?
सोन्यापेक्षा या दोन रखवालदारांच्या जीवाचे मोल अधिक होते. त्यांच्या मारेकर्यांना शोधण्यात पोलिस (अजून तरी) अपयशी ठरले आहेत.
वर्तनातील फरक
सागर, तुम्ही म्हणता तशी पोलिस भीतीविषयीची परिस्थिती आहे हे सत्यच. त्यातही अशिक्षितांपेक्षाही सुशिक्षितांमध्ये असे वाटणे ही खरी चिंताजनक बाब आहे. त्याला कारणही दुसरेतिसरे काही नसून स्टेशनमधील कर्मचारी वर्गाची उद्दाम आणि मग्रुरीची वागणूक हेच होय. समोर आलेली व्यक्ती ही तक्रार देण्यासाठी येत नसून आपल्याला डोकेदुखी निर्माण करणारी आहे अशीच काहीशी समजूत तिथला "स्टेशन हवालदार" करून घेताना दिसतो. शिवाय भाषेचाही प्रश्न आहे. आपल्या टेबलसमोर उभा असलेला इसम हा कुठलातरी मटकेवाला, हातभट्टीवाला, सुर्यामार्या करूनच आलेला आहे अशीच कल्पना मनी बाळगून मग पुढील प्रश्नोत्तरे होतात.
माझी हक्काची स्प्लेन्डर होंडा चोरीला गेली तर ती मला परत मिळावी (च) या उद्देशाने मी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यास गेलो नव्हतो तर ज्या कुणी ती चोरून नेली होती त्याने जर त्या दरम्यान अपघात केला तर मालक या नात्याने त्या अपघाताची पूर्ण जबाबदारी (आणि अर्थातच नुकसानभरपाईची तरतूद) माझ्यावर येते हे माझ्या वकील मित्राने सांगितले म्हणून रितसर तक्रार करणे गरजेचे होते. मी एक सरकारी अधिकारी असल्याची कागदपत्रेही सोबत घेतली होती. तरीही त्या टेबलमागे बसलेल्या मुर्दाड दगडी चेहर्यावर कसलीही भावना उमटली नव्हती. माझी गाडी गेली म्हणजे जणू मीच काहीतरी मोठा गुन्हा केला आहे अशीच त्याने सोयिस्कर समजूत करून घेऊन असे काही प्रश्न विचारायाला सुरुवात केली की क्षणभर वाटले की, झक मारली ती गाडी आणि ते रीपोर्ट रायटिंग. पण परत गाडी अपघाताची ती भीती मनी वसलीच असल्याने सारा अपमानजनक प्रकार मी सहन केला....आयुष्यात परत पोलिस स्टेशनची पायरी चढायला नको या प्रार्थनेसह. [होंडा परत मिळविण्यासाठी माझे किती "गांधीबाबा" गेले त्याचा हिशोब इथे नको.]
असे अनुभव अनेकाना वेळोवेळी येत असतात. तक्रार नोंदविण्यापूर्वी ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकाला बसवितात त्याच मोडक्यातोडक्या बाकावर आजुबाजूला पाकिटमार, घाणेरडी दाढी वाढविलेले तिकिटे ब्लॅक मार्केट करणारे, चोरटी दारू गाळणारे, जुगारी, वेश्या आदीनी बेगुमानपणे ठिय्या मारलेला असतो. आपणही काही काळापुरते त्यांच्यापैकीच होऊन जातो. तुमच्या शिक्षणाचा, सोशल स्टेटसचा तिथे कसलीही नोंद घेतली जात नाही.
मण्णपुरम गोल्डची चोरी पकडली जाते आणि दिवेआगारचा सोन्याचा गणपती गायब होतो याची सांगड कशी घालायची ? दोन्हीकडेही त्याच जातीचे आणि क्षमतेचे पोलिस आहेत ना ? म्हणजेच मण्णपुरम अंतर्गत पोखरले होते हे त्या सुरक्षारक्षकाच्या साक्षीवरून अंदाजित करणे तितकेसे कठीण गेले नसणार....शिवाय 'थर्ड डीग्री' नावाचे एक जालिम औषधही असतेच पोलिस यंत्रणेकडे.
तुम्ही म्हणता तसे पोलिसांकडे धडक कारवाई करण्याची क्षमता आहे, पण ती अशा व्यापक संस्थांच्याबाबतीत. सर्वसामान्यांना अजूनही पोलिस आपला मित्र वाटत नाही हे कितीही कटू असले तरी सत्यच आहे आणि यात कधी बदल होईल याची सुतराम शक्यता नाही.
अशोक पाटील
अनुभवाने हादरलो
अशोक काका,
सर्वसामान्यांना अजूनही पोलिस आपला मित्र वाटत नाही हे कितीही कटू असले तरी सत्यच आहे आणि यात कधी बदल होईल याची सुतराम शक्यता नाही.
हे अगदी पटले. काका अनुभव वाचून अक्षरशः हादरलो.
तुम्हाला तुमच्या मोटारबाईकच्या अनुषंगाने आलेल्या अनुभवासारखेच अनुभव सर्वसामान्यांच्या पदरी जास्त येतात हे खेदाने म्हणावे लागते. मला वाटते भीतीचे हेच कारण असावे.
कायदेशीर कारवाईचा बडगा आपल्यासारख्या निरपराध सामान्य जनतेसाठीच का बरे असतो?
काका, तुम्ही चोरीला गेलेल्या बाईकमुळे काही अपघात वा अपराध घडला तर त्यासाठी जबाबदार ठरु नये यासाठी केवळ पोलिसस्टेशनमधे तेथील पोलिसांची नसती अरेरावी सहन केली. तुमची गाडी चोरीला गेली तरीसुद्धा गांधीबाबांचे दान करावे लागले हा म्हणजे पोलिसांच्या निर्लज्जपणाचा कळसच झाला. देश कुठे जाणार आहे तेच कळत नाही
च्यायला !
अक्षरशः सांगतो, हे वाचले आणि सर्वांगावरुन काटा आला बघा.
हागले पादले काही झाले की लगेच 'आता देशाचे काय होणार?' च्या चिंतेने ग्रासणार्या विचारजंतामध्ये सागर सारख्या मित्राला बघून आश्चर्य वाटले.
आता आज दोन पेग जास्ती ढोसून 'इस दुनियामे आये हो तो..' ऐकावे लागणार.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
हॅ हॅ हॅ
'आता देशाचे काय होणार?' च्या चिंतेने ग्रासणार्या विचारजंतामध्ये सागर सारख्या मित्राला बघून आश्चर्य वाटले.
परा मित्रा देशप्रेमापोटी असले जंत वळवळत राहतात रे ... काय करणार
शेवटी याच मातीने आपल्याला हे जग दाखवले आहे ना, तिचे प्रेम असे ओसंडून वाहणारच
शेवटी समाज आणि देश हे विषय वेगळे वस्तुतः भासत असले तरी एकमेकांत घट्ट रुतलेले आहेत.
अवांतरः तुझ्या अंगावर काटा आल्याचे बघून माझ्या अंगावर आता मात्र खरोखर काटा आला... आपले रोंगटे खडे हो गये
नाह !
असले काय नसते बे.
Survival of the fittest हे आणि हेच एकमेव सत्य. मग भारतातच नाही, तर जगात कुठेही जा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
आता आपण आधुनिक आहोत
Survival of the fittest हे आणि हेच एकमेव सत्य. मग भारतातच नाही, तर जगात कुठेही जा.
हा मूलभूत नियम झाला रे परा.
आपण आता वैचारिक मानवाकडे वाटचाल करतो आहोत तेव्हा मूलभूत नियमांच्या पलिकडे जावे लागतेच की.
देश नसेल तर समाजही अस्तित्तवात येऊ शकत नाही. समाज नसेल तर देशालाही अस्तित्त्व नसते.
भितीपेक्षा मला
भितीपेक्षा मला कंटाळा+कटकट+वेळेचा अपव्यय असे सारे वाटते. अर्थात हे चिंताजनक आहेच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पोलिसांची भीतीच सर्वांना आहे
भितीपेक्षा मला कंटाळा+कटकट+वेळेचा अपव्यय असे सारे वाटते. अर्थात हे चिंताजनक आहेच!
ऋ,
कटकट आणि वेळेचा अपव्यय समजू शकतो. पण तुझ्यासारख्या विचारवंताने कंटाळा करु नये
असो.
कटकट आणि वेळेचा अपव्यय हा कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या पाचवीलाच पुजलेला आहे. त्याशिवाय सध्यातरी गत्यंतर नाहिये. म्हणूनच लोक सरकारी यंत्रणांशी संपर्क येणे शक्यतो टाळतातच.
पण पोलिसांबद्दल भीती यासाठी की बर्याच वेळा गुन्हेगार नसतानाही सर्वसामान्य व्यक्तींना पोलिसी खाक्या अनुभवावा लागतो. माझ्या एका मित्राला कोणताही पुरावा नसताना, तो स्वतः त्यावेळी दुसर्या ठिकाणी हजर असल्याचे पुरावे असतानाही केवळ संशयाचे नाव देऊन (खरेतर खरा गुन्हेगार सापडत नसल्याने) पोलिसांनी गजाआड केले होते. वेळेवर काही ओळखींतून त्या पोलिस स्थानकाच्या पोलिस अधिकार्याला त्याची परिस्थिती सांगून त्याला पोलिसी मारहाणीपासून वाचवले होते. तेव्हापासून माझ्या या मित्राला पोलिसांची मोठी भीती बसली आहे.
दुसर्या एका मित्राला तर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेला असताना त्यालाच आत घेऊन मारहाण केली. असे चित्रविचित्र अनुभव लोकांच्या पदरी येतात म्हणूनच भीती हा शब्द जास्त लोकांसाठी लागू होतो.
प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेला अनुभव अर्थात भोगलेला अनुभव गाठीशी असल्याशिवाय पोलिसांची भीती वाटणे तसे अवघडच आहे. पण पोलिसांचा व्याप नकोच असा विचारही पोलिसांची एक प्रकारची भीती नाही का?
खिक् (हे 'विचारवंत'
खिक् (हे 'विचारवंत' बद्दल)
बाकी मला पोलिसांबद्दल भिती वाटावी असा वाईट अनुभव सुदैवाने नाही. ज्या दोन-चारवेळा पोलिस स्टेशनची पायरी चढलो आहे तेव्हा वेळकाढूपणा, दुर्लक्ष वगैरे मुळे वैतागलो असेन मात्र उलट धाक दाखवणे, तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ, माझ्याकडून पैसे मागणे (अगदी पासपोर्ट क्लियरन्सलाही पैसे मागितले नव्हते) हे किंवा तुम्ही वर म्हणता तसे अनुभव मला किंवा माझ्या परिचितांना न आल्याने असेल पण भिती वाटत नाही. किंबहूना एखाद रस्त्यावरच्या दुसर्या वाहनचालकाबरोबरच्या अपवादात्मक भांडणाच्या प्रसंगी पोलिसांचा आधार वाटल्याचेही स्मरते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गुन्ह्याच्या प्रतवारीप्रमाणे असावे
किंबहूना एखाद रस्त्यावरच्या दुसर्या वाहनचालकाबरोबरच्या अपवादात्मक भांडणाच्या प्रसंगी पोलिसांचा आधार वाटल्याचेही स्मरते.
याबाबत सहमतच आहे. कारण अशा दुष्टांशी दुष्टपणे वागण्यासाठी अमर्यादित अधिकार असलेला पोलिसच आपल्याला तारणहार वाटतो. अशा वेळी आश्चर्यकारकरित्या मदत मिळते देखील. माझाही हा अनुभव आहे. पण असे अनुभव कमीच आहेत.
पासपोर्टसाठी मलाही पैसे मागितले गेले नव्हते
थोडक्यात साध्या गोष्टींमध्ये पोलिसही साधे सरळच वागतात तर
गुन्ह्याच्या प्रतवारीप्रमाणे एकंदरीत पोलिसांचे वागणे असावे. किंवा मग सावज आपल्याला केवढे मालदार करु शकणार आहे या अंदाजावर सगळी ट्रीटमेंट अवलंबून असावी
ह्या
सध्याच्या पोलिसांपेक्षा आमच्या लहानपणी असलेले गोरे पोलिस बरे होते म्हणायचे वेळ आलेय. निदान वागणे,बोलणे आदबशीर असायचे त्यांचे.
ह्याही बाबी ध्यानात घ्याव्यात
<< पोलिसांमध्ये जर केवळ २४ तासांत धडक कारवाई करण्याची क्षमता आहे (जे वरील घटनेवरुन दिसले)>>
या निष्कर्षसदृश विधानाशी असहमत.
जशी तपास अधिकार्यांची तपास करण्याबाबतची गुणवत्ता असते तशीच चोरी करणार्यांचीही चोरी करण्याबाबतचीही गुणवत्ता असतेच ना? इथे आपण अशी एक शक्यता असेल की, गणपती चोरणार्यांपेक्षा तारण सोने चोरणार्या चोरांची गुणवत्ता कमी असावी. अजुन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुण्यासारख्या मोठ्या शहरात असणारे पोलीस बळ तूलनेने ग्रामीण पोलिसांपेक्षा अधिक असणार. त्याचबरोबर विमा कंपनीचा दबाव हाही एक महत्त्वाचा पैलू इथे विचारात घ्यायला हवा. गणपतीचा विमा अर्थातच कोणी केला नसणार परंतु तारण सोन्याचा विमा केला गेला होता. हे सोने पुन्हा मिळावे ही विमा कंपनी व मणप्पुरम गोल्ड या दोहोंचीही इच्छा असणारच त्यांचा तपासकार्याला सढळ हस्ते पाठिंबा असणार. अनेकदा पोलिसांच्या तपासकार्याकरिता वाहन, इंधन, भोजनभत्ता इत्यादी गोष्टी तक्रारदाराने पुरविल्यास तपास जलदगतीने होतो हे उघड सत्य आहे.
अजुन एक शक्यता म्हणजे, ही चोरी एक फार्स असू शकेल. म्हणजे बघा ना, ही चोरी होणे, त्यानंतर चोवीस तासात पोलिसांनी चोरांना मुद्देमालासह पकडणे या सर्वांमुळे कंपनीला किती प्रसिद्धी मिळाली. शंभर जाहिरातींमधून जे साध्य होत नाही ते एक बातमीतून मिळते.
असो. सत्य अजुनही काही वेगळे, आपल्या कल्पनेपलीकडचे असू शकते.
तेव्हा घाईने काहीही निष्कर्ष काढणे योग्य नव्हे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
प्रतिसाद
प्रतिसाद आवडला हो चेतन. अगदी तार्किक काय म्हणतात तसा.
धन्यवाद रमाबाई.
धन्यवाद रमाबाई.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
क्षमता आणि दबाव दोन्ही वेगळे मुद्दे आहेत.
परंतु तारण सोन्याचा विमा केला गेला होता. हे सोने पुन्हा मिळावे ही विमा कंपनी व मणप्पुरम गोल्ड या दोहोंचीही इच्छा असणारच त्यांचा तपासकार्याला सढळ हस्ते पाठिंबा असणार. अनेकदा पोलिसांच्या तपासकार्याकरिता वाहन, इंधन, भोजनभत्ता इत्यादी गोष्टी तक्रारदाराने पुरविल्यास तपास जलदगतीने होतो हे उघड सत्य आहे.
चेतन मित्रा,
हे मान्य पण यामुळे पोलिसांची क्षमता आहे की नाही हे सिद्ध होत नाही. मला वाटते हे दोन्ही वेगळे मुद्दे आहेत.
पैशाशिवाय पोलिस कामाला हातही लावत नाहीत हे सत्य असले तरी त्यांच्यात धडक कारवाई करण्याची क्षमता आहे म्हणूनच चोर पकडले गेले ना? अन्यथा सरकारी संथगतीने वर्षानुवर्षे फाईली धूळ खात पडलेल्या असतात.
चोरांची गुणवत्ता असो वा नसो, पोलिसांचे स्वतःचे एक तंत्र असते, त्यातली कुशलता-अकुशलता हा वादाचा मुद्दा असला तरी ती कार्यक्षमता अशी या प्रकारच्या घटनांमुळे दिसते.
गुणवत्ता (?)
<< चोरांची गुणवत्ता असो वा नसो, पोलिसांचे स्वतःचे एक तंत्र असते, त्यातली कुशलता-अकुशलता हा वादाचा मुद्दा असला तरी ती कार्यक्षमता अशी या प्रकारच्या घटनांमुळे दिसते. >>
मला जे म्हणायचे होते ते जरा अधिक सविस्तर रीतीने स्पष्ट करतो. १९९६ साली मी बजाज टेम्पो लि. मध्ये इलेक्ट्रॉनिक मेन्टेनन्स विभागात प्रशिक्षणार्थी अभियंता या पदावर कार्यरत होतो. तेव्हा तिथे साधारण अशी प्रथा होती की प्रॉडक्शन विभागाचे लोक मशीन बिघडली की मेंटेनन्स डिपार्टमेंटच्या हाती वेळेची नोंद करून मेमो देत. त्यानंतर ती मेंटेनन्स च्या ताब्यात येई. मग मेंटेनन्स डिपार्टमेंटचे लोक ती दुरुस्त करून पुन्हा प्रॉडक्षनच्या ताब्यात देत व त्यावर पुन्हा वेळेची नोंद करून मशीन दुरुस्त झाल्याचा शेरा व सही घेत. अजुन एक प्रथा म्हणजे प्रॉडक्शनचे लोक मेंटेनन्सच्या लोकांवर मशीन लवकर दुरूस्त करण्याकरिता एकप्रकारचा दबाव आणत, कारण जितका जास्त वेळ मशीन बंद तितका त्यांचा प्रॉडक्शन अलाऊंस बुडत असे. तर, अशा प्रकारे एकदा आमच्या विभागात एकाने मशीन बंद पडल्याबद्दल मेमो दिला व लवकर दुरूस्त करण्याविषयी सूचना दिली. मी प्रशिक्षणार्थी असल्याने अर्थातच मला ते मशीन दुरूस्त करणे शक्यच नव्हते. परंतु काय परिस्थिती आहे ते तरी जाऊन पाहूयात म्हणून मी त्या मशीनपाशी गेलो. तिथे गेल्यावर प्रॉडक्शनच्याच दुसर्या एकाने मला हळूच दाखविले की मशीन कशी मुद्दामच बंद पाडली गेली आहे व त्याने ती दुरुस्त करण्याची यूक्तिही मला दाखविली. मग काय तर? मी ती मशीन झोकात चालु केली आणि पुन्हा मेमो घेऊन त्या मेमो देणार्या प्रॉडक्शनच्या सेटर कडे गेलो व त्याला मशीन दुरुस्त झाली असून तसा शेरा लिहीण्यास व सही करण्यास सांगितले. त्याने सही केली पण खवटपणे विचारलेच की मशीन नेमकी कुणी दुरुस्त केली. मीही खोटे न बोलता पण खरेही न सांगता मोठ्या तोर्यात उत्तर दिले, "तुम्ही पाहिले नाही का? मी त्या मशीनपाशी जाऊन आलो आणि आता ती दुरुस्त झाली आहे. इतक्या लवकर ती मशीन दुरूस्त झाल्याबद्दल तुम्ही माझे आभार मानले पाहिजेत." त्यावर त्या सेटरने मोठे मार्मिक स्पष्टीकरण दिले जे मी कधीच विसरणार नाही. तो म्हणाला, "तुम्ही एका महिलेशी लग्न केले आणि तिला मूल झाले म्हणजे त्या मुलाचे जन्मदाते तुम्हीच अशी वस्तुस्थिती दरेकवेळी असेलच असे नाही. तेव्हा मशीनपाशी तुम्ही जाऊन आलात आणि ती दुरूस्त झाली म्हणजे ती तुम्हीच दुरुस्त केलीत असे होत नाही."
मला वाटते, जेव्हा गुन्हे झटपट उघडकीस येतात तेव्हा बरेचदा पोलिसांची "कार्यक्षमता" ही अशा प्रकारची असते. गुन्हेगाराने अगदीच बावळटासारखी ढळढळीत मोठी चूक करून ठेवलेली असते किंवा त्यांच्यातला कुणीतरी फुटतो आणि पोलिसांना (गुपचूप अथवा उघडपणे) माहिती देतो, किंवा फिर्यादी स्वतःच बरेच हुशार असतात आणि ते पोलिसांना इतकी अचूक दिशा दाखवितात आणि मदत करतात की पोलिसांना केवळ आयते जाऊन गुन्हेगाराला फक्त बेड्या ठोकायचेच औपचारिक काम करावे लागते, किंवा अजूनही काही...
असो. ह्या गुन्ह्याची नोंद कुठल्या खासगी गुप्तहेराकडे न होता पोलिस दफ्तरी झाली होती व आता गुन्हेगार सापडल्याने तपासकार्यास यश आले आहे. तेव्हा या यशाचे "औपचारिक / अधिकृत" बाप हे पुणे पोलिसच आहेत त्यामुळे इतरांप्रमाणेच मीही पुणे पोलिसांचे औपचारिक अभिनंदन करतो.
जाता जाता - या आठवड्यात मी लोकसत्तात एक लेख वाचला होता त्यात असे लिहीले होते की हल्ली ज्याने जे काम करायचे आहे त्याने तेच काम केले की अभिनंदन / सत्कार करण्याची फॅशन आहे. म्हणजे बसच्या वाहनचालकाने अपघात न करता वाहन चालविले की त्याचा सत्कार. शिक्षकाने मुलांना शिकविले की त्याचा सत्कार. मग पोलिसही या यादीला अपवाद का ठरावेत? (कुणाला जर या लेखाची लिंक मिळाली तर इथे देण्याची कृपा करावी)
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
चेतन यांच्याशी सहमत. शिवाय
चेतन यांच्याशी सहमत. शिवाय (ऐकीव माहितीप्रमाणे) पोलिसांचे असेही एक धोरण असते की अमुक इतक्या गुन्ह्यांमधे एक तरी तपास लागला पाहिजे. किंवा वैयक्तिक स्पर्धा अगर दुश्मनी यामधून मिळालेला दुवा , राजकीय हस्तक्षेप, लागेबांधे (पोलिसांचे अन इतरही अर्थार्थींचे ) या सगळ्या भानगडीतुन या धडक कारवाईमागचे नक्की इंगित समजणे अवघड आहे.
दॅट्स इट. यू गॉट द पॉईंट
<< या सगळ्या भानगडीतुन या धडक कारवाईमागचे नक्की इंगित समजणे अवघड आहे. >>
अगदी. मला नेमके हेच म्हणायचे होते. कुणीही "अनुभवी" व्यक्ति तुमच्या या विधानाशी नक्कीच सहमत होईल.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
ताकद
माझ्यामते अमुक एक ताकद असलेल्याची ती ताकद नसलेल्या (कायमच) भिती वाटते/वाटू शकते, हे नैसर्गिक असावे. पण हे सामान्यिकरण झाले, परिस्थितीला दोन्ही बाजू असतात, एक बाजू वर अशोक पाटील ह्यांनी मांडली आहेच, चेतन ह्यांच्याशी देखील सहमत.
नक्कीच
<< माझ्यामते अमुक एक ताकद असलेल्याची ती ताकद नसलेल्या (कायमच) भिती वाटते/वाटू शकते, हे नैसर्गिक असावे. >>
होय. आणि पोलिस वि. सामान्य लोक या तूलनेत ही ताकद फारच मोठी असते. खरेतर इतकी ताकद असताना गुन्हे घडायलाच नकोत किंवा घडले तरी लवकर निकाली निघायला हवेत.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
भीती मान्यच आहे.
श्री.चेतन सुभाष गुगळे यांचे या विषयावरील सारेच प्रतिसाद प्रभावी आहेत. त्याला कारण म्हणजे त्याना कल्पनेचा नसून प्रत्यक्ष अनुभवाची प्रखरता आहे. ज्याना ज्याना [कोणत्याही निमित्ताने] पोलिस स्टेशनच्या वैतागाच्या फेर्या माराव्या लागल्या आहेत ते सरळमार्गी आणि मध्यमवर्गीय परत त्या दिशेला जाण्याची वेळ येऊ नये म्हणून का प्रार्थना करतात ते तेव्हाच समजेल जेव्हा तिथला वारा घ्यावा लागेल. पोलिसांच्या कर्तृत्वाविषयी मला कसलाही प्रश्न उदभवू द्यायचा नाही. त्यानी कालची पुण्यातील चोरी २४ तासाच्या आत कशी पकडली वा आज २४ दिवस होऊन गेले तरी दिवेआगारचा छडा का लागला जात नाही याच्या खोलात जाण्याचे मला काही कारण नाही. मूळ धागा 'सर्वसामान्यांना भीती का वाटते पोलिसांची ?" अशा प्रश्नाचा आहे आणि त्याला माझे थेट उत्तर की, होय मला भीती वाटते. ज्याला वाटत नसेल त्याला तशी का वाटत नाही हे विचारण्यचीही माझी पात्रता नाही.
माझी होंडा मिळाली पण पोलिस स्टेशन ते थेट न्यायालयातील बाबू, कोर्टाच्या दारावरचा हाकमार्या शिपाई, इतकेच काय कोर्टाच्या डाव्या हाताला बसलेला स्टेनो या सर्वाना मला एकेक गांधीबाबा द्यावा लागला होता....तसे देण्याविषयी चक्क माझ्या वकीलानेच सुचविले आणि मी ते मुकाट्याने मान्य केले....कारण परत तेच....गाडी सोडवून घ्यायची होती. तिथे 'सत्यकाम' गिरी चालत नाहीच. ते पडद्यावर बघायला ठीक आहे. तीन दिवसाच्या धडका मार फेर्यानंतर गाडी मिळाली, तीही तांत्रिक कारणाची ढाल लावूनच. म्हणजे त्या चोरट्याला सप्टेम्बर २०१२ पर्यंत अगोदरच्या तीन गुन्ह्यासाठी शिक्षा झाली होती, आणि त्या दरम्यान एकदा एक आठवड्याचा "पॅरोल' त्याला मिळाला. बहाद्दराने त्या पॅरोल पिरिअडमध्ये एकूण चार होंडा लंपास केल्या त्यातील माझी एक. आता या चार गाड्यांच्या चोरीबाबत त्याच्यावर पोलिस रितसर खटला दाखल करणार सप्टेम्बर २०१२ मध्ये. म्हणजे त्या दरम्यान मला (आणि अन्य तिघांना) होंडा मिळाली ती 'भोगवट्या'साठी. तेही २०० रुपयांच्या स्टॅम्पवर वचनचिट्ठी लिहून देऊन. [हा २०० चा स्टॅम्पही कोर्टाबाहेर असलेल्या एका विशिष्ट नंबर टपरीतील बाईकडूनच घ्यावा अशी स्टेनोमहाशयांची सक्त ताकीद...घेतला, काय करणार ?].
म्हणजे पोलिसांच्या फेर्या आणि कोर्टातील फेर्या मारुनही माझी हक्काची गाडी आजही माझी नसून मी फक्त तिचा 'भोग' घेऊ शकतो. कोर्ट म्हणेल त्या दिवशी [स्वखर्चाने] गाडी कोर्टाच्या आवारात नेणे मला सक्तीचे आहे.
असा सारा प्रकार आहे पोलिस खात्याचा....कोण लागेल नादाला ?
अशोक पाटील
पोलिसी अनुभवांचे विश्वच विचित्र आहे.
<< श्री.चेतन सुभाष गुगळे यांचे या विषयावरील सारेच प्रतिसाद प्रभावी आहेत. त्याला कारण म्हणजे त्याना कल्पनेचा नसून प्रत्यक्ष अनुभवाची प्रखरता आहे. >>
धन्यवाद पाटील साहेब. माझे पोलिसांविषयक अनुभव लिहायचे ठरविले तर एक मध्यम आकाराचे पुस्तकच काढावे लागेल. अर्थात, ते संमिश्र स्वरुपाचे असले तरी नकारात्मक अनुभवांचे प्रमाण तुलनेने जास्तच आहे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
सेवेसाठी सत्कार
चेतनजी....तसे अनुभवविषयक पुस्तक काढायची काही गरजच नाही. कारण ज्याला पोलिस चौकीचा 'तसला' अनुभव आलेला नाही तो पुस्तकातील अनुभव खोटे वा अतिरंजित आहेत असे म्हणणार, तर ज्याला आले आहेत तो म्हणेल 'लेखकाने फार हातचे राखून लिहिले आहेत अनुभव."
एकूण काय वाघ्या म्हटले काय किंवा वाघोबा म्हटले त्याची तहान भक्ष्याच्या रक्ताचीच असते हे तुम्हाला मला माहीत असताना ती शब्दबद्ध झाली वा झाली नाही, इट मेक्स नो डिफरन्स.
[वर 'सत्कारा' बाबतही मांडलेले ते मत विचार करण्यासारखेच आहेत. फक्त अग्नीशामक दलाकडील कर्मचारी सोडल्यास एकही कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर 'सत्कारा'स पात्र असत नाही. अग्निशामक दल का ? तर त्याना निदान ड्युटीवर असताना वेळोवेळी प्राणाशी खेळावे लागते. बाकीच्यांना कसला डोंबलाचा त्रास ? मस्टरवर सही करण्यापुरतेच पेन उघडणारे महाभाग मला माहीत आहेत. "गेली ३३ वर्षे साहेबांनी प्रामाणिकपणे इथे नोकरी केली आहे ?" असे एक हमखास टाळ्याखावू वाक्य असल्या भाषणात असते. कपाळाची शीर तडकते त्यावेळी. अहो, प्रामाणिकपणेच काम करण्यासाठी सरकारने आम्हाला नोकरी दिली असताना ती तशी केली म्हणून कौतुक आणि सत्कार ?]
अशोक पाटील
पोलिसांचा एकच चेहरा पाहीलेली
पोलिसांचा एकच चेहरा पाहीलेली लोक असे काही विचार करू शकतात. त्यांच्या मानवी चेहर्या विषयी खूप कमी लोक बोलतात व लिहतात.. चालायचेच.
*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)
खरं आहे. मला असाच एक मानवी
खरं आहे. मला असाच एक मानवी चेहेऱ्याचाच नव्हे, तर चक्क सालस पोलीस निरिक्षक माहिती आहे. तोही मुंबईतला ! पण त्याने खात्यातल्या वातावरणाला कंटाळून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा दलात भरती करून घेतली !
पोलिस इन्स्पेक्टर
स्नेहांकिता ~
मी इथे प्रत्येक वेळेला "पोलिस आणि हवालदार' या दोन पदांचा उल्लेख केला आहे, वैताग अनुभवाच्या कंगोर्यांसाठी. काही पोलिस निरिक्षक तुम्ही म्हणता तसे खरेच सालस आणि कर्त्यव्यपरायण असतात....अर्थात अपवादात्मक.
तुम्ही श्री.अनिल अवचट यानी लिहिलेला "पाटीलसाहेब" हा पुण्यातील सुरेन्द्र पाटील या पोलिस इन्स्पेक्टरविषयी लिहिलेला लेख जरूर वाचा. भन्नाट व्यक्तिचित्रण आहे पोलिसातीलच एकाचे. यात अवचटांचेच एक वाक्य पाहा, "एरवी पोलिस-स्टेशनचा आपल्याला जो अनुभव असतो त्यात आणि पाटलांच्या इथल्या कारभारात जमीनअस्मानाचा फरक. इतर ठिकाणी कुणी नागरिक तक्रार घेऊन आला, की तो आधी कॉन्स्टेबल, मग हेड कॉन्स्टेबल. तिथं त्याला एक तर उद्धट वागणुकीला किंवा पैसे घेऊन काम करण्याच्या पध्दतीला तोंड द्यावं लागत. पाटलांच्या स्टेशनमध्ये त्यानी हे उलटं केलं. म्हणजे तक्रार करण्यार्याने थेट त्यांच्याकडेच जायचे......" इ. इ.
हा लेख सन १९९४ मध्ये प्रकाशित झाला. म्हणजे अवचटांनी लिहिलेला पोलिस स्टेशनमधील हा अनुभव १८ वर्षापूर्वीचा. सुरेन्द्र पाटील तिथून बदली होऊन गेल्यावर मग तेच जुने रहाटगाडगे सुरू झाले असणार. आजही त्यात तसूभर फरक नाही.
अशोक पाटील
पोलिसांची सर्वसामान्यांना
कल्पना नाही. भीती वाटू नये अशी अपेक्षा आहे.
आमच्या घरी अनेक वर्षांपूर्वी चोरी झाली होती. सकाळी लक्षात आल्यावर पहिला फोन पोलिसांनाच केला. पोलिस आल्यावर अर्थातच बिल्डींगमधली गर्दी जमा झाली. रिपोर्ट वगैरे लिहून घेत असताना कानावर चर्चा आली. "आमचीही एक साडी दोरीवरून गेली." "आमच्याकडचीही अमकी वस्तू खिडकीतून लंपास झाली." तो इन्स्पेक्टर अशी कुजबूज ऐकून भयंकर वैतागला. "@#$%^&* तुम्ही शिकलेले लोकं ना? टॅक्स भरता ना दरवर्षी? मग चोरी झाल्यावर पोलिसांना सांगायला तुमच्या बापाचं #$%^&* जात होतं का? तेव्हाच इथे पोलिस येऊन गेले असते तर कदाचित इथली मोठी चोरी झाली नसती." (आमच्या खिडकीचे गज थोडे कापून, थोडे वाकवून छोटा पोरगेला चोर घरात शिरून सामान घेऊन गेल्याचं लक्षात आलं होतं.)
चोर सापडला नाही, चोरीला गेलेल्या गोष्टीही परत मिळाल्या नाहीत. पण पुन्हा कुणाचं काही गेल्याचं गॉसिपही कानावर आलं नाही.
पुण्यातल्या माझ्या सरकारी हाफिसात एका विद्यार्थ्याचा कंप्यूटर उघडून आतल्या दोन हार्डडिस्क्स चोरीला गेल्या. पैशात फार मूल्य नाही, पण त्याचं दोन वर्षांचं काम त्या डिस्क्समधे होतं. एक हार्डड्राईव्ह उडला तर दुसर्यात बॅकप होता. अशी चोरी होईल अशी कोणाला कल्पना होती. एकंदर प्रकार पहाता कँपसवरच्याच कोणाचंतरी हे कृत्य असावं यावर अनेकांचा विश्वास होता पण पोलिसांत तक्रार झाली नाही. कारण काय म्हणे, सज्जनांना त्रास देतात, संस्थेची बदनामी होईल इ.इ.
त्याच चतु:शृंगी पोलिस ठाण्यात मला तीनदा गेले असता चांगलाच अनुभव आलेला आहे. दोनदा मोबाईल चोरीची तक्रार करण्यासाठी गेल्यावर न मागता लेक्चर आणि मागितलेल्या तक्रारीच्या प्रती मिळाल्या. एकदा मैत्रिणीच्या पासपोर्टाच्या कामासाठी मला मराठी येतं म्हणून घेऊन गेली होती. तेव्हाही माझा अनुभव चांगला होता. मात्र एक दोघांची उलटतपासणी कानावर पडून मैत्रिण थोडी घाबरली होती. आम्ही तिथून निघेपर्यंत एक बाईने माहिती द्यायला सुरूवात केलेली होती. संशयित गुन्हेगारांशी पोलिसांची वागणूक असा नवाच विषय पासपोर्ट मिळेपर्यंत काही दिवस चघळायला मिळाला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पासपोर्ट
अदिती.....तुला तसेच अनेकाना 'पासपोर्ट' संदर्भात पोलिस चौकीचा अनुभव चांगला आला आहे हे वाचून मला किंचितही आश्चर्य वाटले नाही. शेवटी पासपोर्टसाठी लागणार्या कागदपत्रांतील तो एक रितसर 'डीमांड प्रोसेस' आहे. त्यासाठीच्या अर्जात 'तक्रार' नसल्याने स्टेशनमधील हवालदार पदावरील क्लार्कला त्यात कसलाही इंटरेस्ट नसतो. त्यातही सरकारी पातळीवर 'स्त्री दाक्षिण्य' नावाचाही एक प्रकार असतोच. [मुलींच्याबाबतीत विदा नाही, पण मुलांकडून "प्रोसेस" साठी एक निळा गांधीबाबा घेतला जात असल्याचे मी पाहिले आहे. मुले देतातही विनातक्रार. पासपोर्ट एजंटही तसे सांगतोच] पण ज्यावेळी एखादी व्यक्ती [त्यातही पुरुष] 'तक्रार' - मग ती चोरीची असो, गल्लीतील भांडणाची असो, दादागिरीबाबतची असो, वा मुलगी पळून गेल्याबाबतची असो....हवालदाराचे वर्तन अत्यंत तुच्छतादर्शक असते.....अर्थात मी हे कोल्हापूर अनुभवावरून बोलतोय [अपवादासाठी एकदा रत्नागिरी पोलिस स्टेशनचीही पायरी चढलो...सेम पिच]. तुला वा अन्यांना पुणे, ठाणे तसेच मुंबई इथे पोलिस स्टेशनचे अनुभव प्रफुल्लीत वाटत असतील तर....देन लकी यू आर !
अशोक पाटील
पोलिसांना लोक घाबरतात? मला
पोलिसांना लोक घाबरतात? मला असं वाटत नाही. पोलिसांना लोक शक्यतो 'टाळतात' असं म्हणता येईल.
लोकांना पोलिसांची भीती वाटली, आणि तसे लोकांना चांगल्या अर्थी भीती वाटावी असे पोलिस असतील तर कदाचित बरेच दिवस येतील सर्वसामान्यांसाठी
***
अब्द शब्द
चांगल्या अर्थी भीती ?
सविता....
"तसे लोकांना चांगल्या अर्थी भीती वाटावी असे पोलिस असतील तर कदाचित बरेच दिवस येतील सर्वसामान्यांसाठी"
~ हे समजले नाही. "भीती" ला कायम काळी बाजू असते. परीक्षेसाठी जाताना मुलेमुली महाद्वार रोडवरूनच समोरच्या अंबाबाईला उडता नमस्कार करतात. त्यामागे देवीविषयी फार मोठी भक्ती नसून परीक्षेविषयीची छुपी 'भीती' च असते. इथे भीती टर्म कदाचित "चांगल्या' अर्थाने घेता येईल. पण पोलिसांच्याबाबतीत ते अप्लिकेशन कसे घेता येईल ? आणि पोलिसांमुळे सर्वसामान्यांसाठी बरे दिवस कसे येतील ?
अशोक पाटील
अतिवासच सांगु शकतील पण
अतिवासच सांगु शकतील पण चांगल्या अर्थाची भिती म्हंजे त्यांना 'धाक' म्हणायचे असावे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आभार ऋषिकेश. अशोकभाऊ, मला
आभार ऋषिकेश. अशोकभाऊ, मला 'धाक' म्हणायचे होते - त्याच्या अनेक छटा आपण प्रत्यक्ष जगताना अनुभवतो.
***
अब्द शब्द
भीतीचीच रुपे
धाक - जरब ही भीतीचीच रुपे नाही का?
पण पोलिसांच्या बाबतीत पोलिसाने नुसते काही विचारले तरी मनात कुठेतरी भीती असते की हा आपल्याला अडकवत तर नाही ना?
धाक वाटत असला तरी ती भीतीच असते असे मला वाटते
धाक जरब
नाही सागर.... 'धाक, जरब' ही भीतीच्या फॅमिलीतीलच सदस्य असले तरी त्या दोन संज्ञांना कौटुंबिक स्पर्श आहे. उदा. वडिलांच्या शिस्तीचा धाक वाटणे, काकांच्या पायताणाच्या आवाजाची जरब बसणे....शिक्षकांबाबतही भीती वाटत नाही तरी धाक जरूर वाटतो....कार्यालयातील बॉसची जरब असू शकते, भीती नाही.
पण पोलिसांच्या अरेरावी वागणूकीमुळे मनी जे भाव येतात {निर्ढावलेल्यांच्या संदर्भात हे कदाचित लागू होणार नाही} ते भीतीचेच येतात.
@ ऋषिकेश आणि सविता ~ थॅन्क्स.
अशोक पाटील
मान्य
अशोक काका,
'धाक, जरब' ही भीतीच्या फॅमिलीतीलच सदस्य असले तरी त्या दोन संज्ञांना कौटुंबिक स्पर्श आहे.
हे मनापासून भावले
सविता ताई म्हणतात तसे लोक
सविता ताई म्हणतात तसे लोक पोलिसांना टाळतात हे खरे आहे. पण चुकून माकून किंवा दुर्दैवाने कधी संशयास्पद परिस्थितीत जे कुणी पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत, त्यांचे हाल कुत्रेचं काय वाघोबाही खाणार नाही, हेही खरे आहे. म्हणून भीती.
धाक
सविताताई, सर्वसामान्य जनतेला पोलिसांचा धाक असला तर ठिकच आहे किंबहुना तो असावाच. त्यामुळेच दुष्कृत्यांना आळा बसेल.
पण इथे जी चर्चा चालू आहे तिच्यानुसार निर्दोष किंवा पिडीत व्यक्तीलाही पोलिसांशी संबंध आला की एवढा जास्त मनस्ताप होतो आणि खिशाला अशी चाट लागते की कुणालाही नैराश्य येवू शकते.
याच्याकरता हल्लीच येवून गेलेला आणि करमणूक मूल्य शून्य असलेला 'गली गली में चोर है' हा सिनेमा बघण्यासारखा आहे.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...